Saturday, February 28, 2015

`झेप` ते `पोलादी माणसे` : एक सकारात्मक शोध-पत्रकारिता...

आज २८ फेब्रुवारी २०१५... संसदेत अर्थसंकल्प सादर होतोय...
बरोबर ४ वर्षांपूर्वी, २०११ मध्ये आजच्याच दिवशी, आजच्याच वेळी, तिकडे अर्थसंकल्पाचे वाचन सुरु झाले त्याच वेळी मी `जालना आयकॉन्स`ची पहिली मुलाखत घेत होतो. त्या नंतर एक एक करीत जिल्हे फिरत गेलो... उद्या १ मार्च २०१५ ला याच जिल्हावार प्रेरक पुस्तक मालिकेतील १५वे पुस्तक परभणी येथे प्रकाशित होतेय. ४ वर्षांतील ही वाटचाल. एकंदर १५ जिल्ह्यांतून झालेला सगळा मिळून सुमारे ७५ हजार किलोमीटरचा `सेल्फ-ड्रिव्हन` प्रवास...!

या १५ पैकी ५ पुस्तके मागच्या दोन महिन्यात आली! १४ डिसेंबर २०१४ ला बीड, १८ जानेवारी २०१५ ला सोलापूर, १ फेब्रुवारीला कोल्हापूर, ८ फेब्रुवारीला हिंगोली आणि आता १ मार्च २०१५ ला परभणीचे पुस्तक येत आहे. ही प्रकाशने जरी एकापाठोपाठ एक झाली असली तरी या जिल्ह्यातील शोधयात्रा २०१३ च्या उत्तरार्धात सुरु झाली होती. साधारण सप्टेंबर २०१३ मध्ये मी परभणीतील कामाला प्रारंभ केला होता. त्यानंतर क्रमाक्रमाने हा प्रवास झाला. त्याची पहिल्या टप्प्याची पूर्तता १ मार्च रोजी होत आहे...!

खरे तर, प्रेरक लेखनाचा हा प्रवास २००३ मध्येच सुरु झाला होता. तेव्हा मी `सकाळ`मध्ये नोकरीत होतो. तरुण भारत आणि सकाळ या वृत्तपत्रात काम करताना सकारात्मकतेचा संस्कार माझ्यावर होत गेला. त्यातूनच मी विकासात्मक पत्रकारिता स्वीकारली. त्यातूनच औद्योगिक यशकथांकडे मी वळलो. `झेप` या शीर्षकाने औरंगाबाद सकाळ मध्ये सदर चालले. पुढे त्याचे पुस्तक झाले. आधी लिहिलेली `आयकॉन्स` मालिकेतील पुस्तके आणि त्याचे आता बदललेले `पोलादी माणसे` हे शीर्षक हा सारा प्रेरक प्रवास आहे. आज तो आपल्यासमोर ठेवण्याची इच्छा आहे.

मी कधीही विघातक पत्रकारिता केली नाही. सनसनाटी लेखनाच्या मागे लागलो नाही. १९९० च्या सुमारास पत्रकारितेत आलो. २००५ मध्ये नोकरीतून बाहेर पडलो. त्यानंतर मागची १० वर्षे मुक्त-पत्रकारिता करतो आहे. या शिवाय मी `branding & image building`च्या सेवा देतो. जनसंपर्क आणि जनसंवादाचा माझा २५ वर्षांचा समृद्ध अनुभव मी माझ्या क्लायंटला देतो.

सन २००३-०४ दरम्यान मी औरंगाबाद सकाळ मध्ये `झेप` शीर्षकाखाली उद्योजकीय यशकथांची मालिका लिहिली. औरंगाबादेतील पहिल्या पिढीतील उद्योजकांचा परिचय नव्या पिढीला करून देण्याचा उद्देश या मागे होता. त्याचीही सुरुवात योगायोगानेच झाली. `करियरनामा` नावाने करियर मार्गदर्शनाचे एक पान दर बुधवारी देण्याचे ठरले. साखळी वृत्तपत्र असल्याने इतर सर्व आवृत्तींचे लेख तेथे उपलब्ध असत. ते लावून पहिल्या आठवड्यातील हे पान तयार झाले. मात्र त्यात मराठवाडा दिसेना... उद्योजकता दिसेना. मी ही भूमिका संपादकांसमोर मांडली. साहजिकच `तुम्ही करून दाखवा`चे आवाहन झाले. माहितीत असलेल्या, शून्यातून उभ्या असलेल्या एका उद्योजकाची, श्री. मिलिंद सेवलीकर यांची मुलाखत घेवून ती वाटचाल मी लिहून काढली. संपादकांनी या कल्पनेला मान्यता दिली. २००३ मध्ये दि. २६ नोव्हेंबर रोजी या मालिकेचा पहिला लेख प्रकाशित झाला. त्यानंतर साधारण ३५-३६ आठवडे मालिका चालली. निकषात बसणारी माणसे मिळणे कमी झाले तेव्हा आठवड्याआड लिहू लागलो आणि `आमचेही छापा... देणे-घेणे पाहून घेवू`ची प्रलोभने सुरु झाली तेव्हा सदर बंद करण्याचा कठोर निर्णय मी घेतला. ज्यांच्याबद्दल लिहिले, त्यापैकी ४-५ जणांशी माझा पूर्वपरिचय होता. बाकी अनोळखी होते. मी अभिमानाने सांगेन, की या पैकी एकाही व्यक्तीकडून साध्या चहाच्या कपाचीही अपेक्षा नव्हती. कुणाकडून काहीही घेतले नाही. लेखनातील तटस्थता पाळण्यासाठी मी माझ्यावर ते बंधन घालून घेतलेले होते. (अर्थात, सक्रीय पत्रकारितेच्या १५ वर्षांत कधी कुणाचे रुपयाचेही मिंधेपण स्वीकारले नाही आणि एकही डाग अंगावर पडू दिला नाही...! असो.)११ जानेवारी २००५ रोजी नोकरी सोडली. त्यानंतर याच सर्वांनी माझ्या मागे लागून पुस्तक तयार करण्यास भाग पाडले. दैनिकात छापताना काही चांगली नावे सुटली होती... संदर्भ मिळाले नव्हते... वेळ जुळली नव्हती... अशी काही नवी माणसे या पुस्तकात आली. हे पुस्तक सप्टेंबर २००६ मध्ये प्रकाशित झाले.

सांगण्यास खूप आनंद होतो, की या पुस्तकाचे प्रकाशन `सकाळ`चे व्यस्थापकीय संचालक मा. प्रतापराव पवार यांच्या हस्ते झाले. केवळ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ते औरंगाबादेत आले होते. माझ्यासारख्या एकेकाळच्या सामान्य कर्मचाऱ्यासाठी एवढा वेळ देणे, हा त्यांचा मोठेपणा. पण हे ही तितकेच खरे, की औरंगाबादेत मी लिहित असलेल्या मालिकेचे ते चाहते आणि पाठीराखे होते. अशी मालिका सर्व आवृत्त्यांमध्ये असावी, असे त्यांना वाटत असे. मी नागपूर आवृत्तीत मोठी जबाबदारी सांभाळावी या दृष्टीने त्यांच्याशी बैठकाही झालेली होती. तो विषय नंतर मागे पडला. `सकाळ` सोडला, तरी स्नेहबंध कायम राहिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी `निर्लेप`चे प्रमुख श्री. राम भोगले होते.

हे पुस्तक चांगले झाले. या नंतर मी `झेप – २`ची तयारी करावी असा अनेकांचा आग्रह होता. मराठवाड्यातून बाहेर पडून इतर शहरांत उद्योग उभा करणारे उद्योजक, असा त्याचा विषय होता. अनेकांची नावे पुढे आली होती. नगरच्या श्री. अरुण कुलकर्णी यांची मुलाखतही २००७ च्या पूर्वार्धात घेवून झाली होती. पण काही कारणांनी तो विषय मागे पडला.माझा व्यवसाय सुरु होता. नवी कामे मिळवणे आणि पूर्ण करणे सुरु होते. मी ज्यांच्याबद्दल लिहिले, त्यांच्या प्रमाणेच मीही शून्यातून सुरुवात केलेली होती. डिझाईन, पीआर ही कामे मी करतो. वाटचाल सुरु झाली तेव्हा गाठीशी फक्त एका महिन्याचा पगार (सारी कपात होऊन हाती येणारे साडेनऊ हजार रुपये!) होता...! त्याच वेळी पाठीशी होते परिवार आणि मित्रांचे मदतीचे हात. आई-वडील, धाकटा भाऊ कमलाकर, पत्नी पद्मजा यांचा भक्कम पाठिंबा होताच, पण शाळेपासून मित्र असलेले डॉ. प्रकाश गुडसूरकर, शशांक जेवळीकर, श्रीकांत उमरीकर आणि औरंगाबादेत स्नेह लाभलेले डॉ. सुभाष देवढे पाटील, आशीष गर्दे... या सर्वांचा आधार होता... हात हाती होते... निभावून गेले...!दिवस जात होते... सन २०११ च्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मी माझ्या कार्यालयात बसलो होतो, तेवढ्यात जालना येथील श्री. सुनिलभाई रायठठ्ठा यांचा फोन आला. नमस्कार-चमत्कार झाल्यावर त्यांनी विषय मांडला - `दत्ताजी, हमको जालना का `झेप` लिखना है...` आणि ही पुढील प्रवासाची सुरुवात ठरली.

प्रेरक लेखन हा माझा आवडीचा प्रांत. सुनिलभाई यांनी स्वतःचा उद्योग प्रचंड संघर्षातून उभा केला. आज ते ५० देशांत निर्यात करतात. त्यांनी जालना येथे `यंग इनोव्हेटर्स` अशी एक चळवळ सुरु केली होती. या पुस्तकातून नव्या पिढीसमोर आपल्या जिल्ह्यातील आदर्श ठेवण्याची ही कल्पना.

या कल्पनेमागेही आणखी एक कहाणी होती. सुनिलभाई रायठठ्ठा, सुनीलजी बनारसीदास आणि आणखीही काही मंडळी या उपक्रमांत सहभागी असे. हे पुस्तक ही या ग्रुपची इच्छा. सुनिलभाई रायठठ्ठा यांच्यामुळे मी तिथवर पोचलो. साधारण मार्च अखेरपर्यंत जालना येथील मुलाखती संपल्या. `महिको`चे बद्रीनारायण बारवाले हे `जालना आयकॉन्स`पैकी एक व्यक्तिमत्व...!
त्याच दरम्यान सुनीलजी बनारसीदास यांच्याशी चर्चा करताना आपण अन्य जिल्ह्यात हा प्रयोग करता येईल का, असा विषय निघाला. सुनीलजी म्हणजे खूप वेगळेच प्रकरण. हा माणूस स्वतःपेक्षा इतरांसाठीच अधिक जगतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. `पोलाद` या ब्रांडनेम ने बाजारपेठेत विक्री होणाऱ्या सळईचे ते निर्माते. जालना येथील `भाग्यलक्ष्मी स्टील`च्या संचालकांपैकी ते अग्रणी. समाजात उद्योजकता वाढावी, भारत बलशाली व्हावा, ही त्यांची भावना. समाजात असलेली विशेषतः पहिल्या पिढीतील उद्योजकता संकलित करून पुस्तकाच्या रूपाने मांडावी, ही त्यांची इच्छा. मीही प्रारंभापासून त्याच वाटेवरील प्रवासी.


माणसे जोडण्यात आनंद असलेला आणि उद्योजकतेला सकारात्मकतेने पाहणारा मी पत्रकार असल्याने हे केले पाहिजे, असे मला वाटले. असे काही करायचे तर प्रचंड भटकंती करावी लागेल, खूप दिवस परिवारापासून दूर राहायला लागेल हे नक्की होते. पण माझ्याही मनात एक `जिप्सी` दडलेलाच आहे. त्याने साद घातली आणि `लक्ष्मी` व `सरस्वती`ची हातात हात घालून वाटचाल सुरु झाली. १-२ जिल्हे म्हणता म्हणता जालन्यापाठोपाठ क्रमाक्रमाने नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, बीड, सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली आणि आता परभणी अशी १५ जिल्ह्यांची भटकंती झाली. दरम्यान ११व्या  पुस्तकापासून या पुस्तक मालिकेचे नामकरण `पोलादी माणसे` असे झाले...


ही झाली संक्षिप्त वाटचाल...
या प्रवासात मी खूप `श्रीमंत` झालो...! ही श्रीमंती शाश्वत टिकणारी आहे. आपण ज्या माणसांत राहतो, त्यांचे गुण आपल्याला चिकटत असतात. माझेही असेच होते आहे. माझ्याकडे साठलेली ही श्रीमंती याच गुणांची आहे...! `झेप`पासूनचा विचार केला तर आजवर साधारण पावणे पाचशे उद्यमशील व्यक्तींच्या मुलाखती घेण्याची संधी मला मिळाली. प्रत्येक जिल्ह्यात १०० ते २०० जणांची पहिली यादी होत असते. आम्ही ठरवलेले निकष लावत ती संख्या तेथील क्षमतेनुसार खाली येत असते. एखाद्या जिल्ह्यात १७-१८ जण पुस्तकात येतात तर एखाद्या जिल्ह्यात ३८ जण...! पण हे प्रत्येक जण पारखून घेतलेला असतो. वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक चारित्र्य स्वच्छ हवे, सामाजिक उत्तरदायीत्व मानायला हवे... हे आमचे मुलभूत निकष. कुणाकडूनही कुठल्याच रूपाने आर्थिक अपेक्षा न ठेवता मेरिटवर निवड करायची, हे आम्ही मुळात ठरवलेले... सुनीलजी यांनी यात कुठेही हस्तक्षेप केला नाही... निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य मला दिले... त्यातून ही पुस्तके आकाराला आली.

राज्याच्या विविध भागांतून ही माणसे कार्यरत आहेत. ग्रामीण भागात आपापल्या क्षमता आणि इच्छाशक्तीवर ती आपापले उद्योग सांभाळत आहेत. कामांवर निष्ठा, सचोटीपूर्ण व्यवहार, संपूर्ण पारदर्शिता... प्रत्येकाची गुणवैशिष्ट्ये वेगवेगळी. कुणाच्या अंगावर घालायला एकेकाळी फाटके कपडे असत तर कुणी उपाशीपोटी झोपत. आज ते शेकडो कोटींच्या व्यवहाराचे धनी आहेत. असे असले तरी त्यांचे पाय जमिनीवर घट्ट रोवलेले...! हे खूप अवघड असते...! अशी माणसे भेटली की अल्प-स्वल्प यशाने आपल्या डोक्यात शिरलेली हवा आपोआप निघून जाते.

हा प्रत्येक माणूस म्हणजे स्वतंत्र विद्यापीठ. केवळ जिद्दीपोटी उद्योग-व्यवसायात शिरून यशाचे शिखर गाठणारी अनेक माणसे साधे दहावी पास नाहीत...! काही इंजिनियर झाली आणि वेगळ्याच उद्योगात शिरली. काही बी कॉम झाली आणि आज पाच-सातशे कोटींची उलाढाल करणारी कंपनी चालवितात...! सर्वात महत्वाचे म्हणजे या पैकी कुणीही लाखोपतीची मुले नाहीत...! ही सारी साम्राज्ये कष्टाने उभी राहिलेली आहेत.

ही पुस्तके जिल्हावार आहेत. याचा अर्थ ही माणसे जिल्ह्याच्या मर्यादेत आहेत असा नाही. आपल्या जिल्ह्यातून बाहेर पडून कुणी पुण्या मुंबईत गेला तर कुणी परदेशात आपली चमक दाखवीत आहे. इंटेलचे उपाध्यक्ष उपेंद्र कुलकर्णी हे सांगलीतून तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरणात काम करणारे राजेंद्र शेंडे सातारा जिल्ह्यातून बाहेर गेले. भारतातील पहिली खाजगी अणुभट्टी उभारणारे दत्तप्रसाद दाभोलकर साताऱ्याचे...!  सोलापुरातील यतिन शहा यांचे कॅमशाफ्ट जगभरातील बलाढ्य वाहन कंपन्या वापरतात. त्यांनी इंग्लंडमधील मोठी कंपनी टेकओव्हर केली आणि चीनमध्ये स्वताची नवी कंपनी उभारली. उस्मानाबाद्च्ये डॉ. नितीन ढेपे यांनी त्वचारोगशास्त्रात स्वतःचे स्वतंत्र स्थान सिद्ध केले. लातूर जिल्ह्यातून बाहेर पडून उद्योग उभारणाऱ्या उदय चेरेकर यांच्या कंपनीत तयार झालेली यंत्रे `आयएसओ` प्रमाणपत्रे देणाऱ्या कंपन्या त्यांच्या कामासाठी वापरतात...! जळगाव तर असंख्य अभिनव उद्योगांचे आगार. रंग निर्मितीत लागणारे पिग्मेंट, औषधात लागणारे पेक्टिन, रेल्वेत लागणाऱ्या अवजड स्प्रिंग, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पाईप... हे सारे जळगाव जिल्ह्यात तयार होते. नंदुरबार जिल्ह्यातून जपानला लिम्बोली तेल निर्यात होते. धुळ्यातील तरुण शास्त्रज्ञ `शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराचा` मानकरी ठरला आहे. हा वैज्ञानिक क्षेत्रातील `भारत रत्न` समजला जातो...! आज भारतात प्रसिद्ध झालेला डिझायनर पेंट प्रथम नांदेडमध्ये बनला. जालन्यातील महिको सर्वांना ठावूक आहे. नगर येथे साऱ्या देशाला लागणारे कॅरामल तयार होते आणि शिवाय ३५ देशांत पोहचते. हिंगोलीतील तरुण आंतरराष्ट्रीय पातळीवरील HR ट्रेनर आहे. परभणीतील व्यक्ती भोपाळच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेची प्रमुख आहे. बीडमधील मकरंद अनासपुरे आज साऱ्या महाराष्ट्राला हसवतो.... एक ना दोन... जवळ जवळ ५०० संपन्न व्यक्तिमत्वे अनुभवताना मी ही संपन्न होत गेलो...!

मी स्वतःला भाग्यवान समजतो... मी सध्या जे काम करीत आहे ते सोपे नाही. हे काम करण्याची माझी क्षमता नाही. डॉ. हेडगेवार यांचे एक वचन आहे - `काम अवघड आहे, म्हणूनच ते करण्यालायक आहे. सोपी कामे तर कुणीही करतात...` हे वचन माझ्या डोळ्यासमोर सदैव असते. पण त्याच बरोबर मला हे सुद्धा भान असते, की हे काम मी करीत आहे, पण ती शक्ती माझी नाही. माझ्याकडून कुणी तरी अज्ञात शक्ती... हवे तर आपण नियती म्हणू... हे काम करवून घेत आहे. मी निव्वळ एक साधन आहे... हीच शक्ती मला मार्ग दाखविते. चुकीचा माणूस या पुस्तकात येऊ नये या साठी बुद्धी देते...
मी कृतज्ञ आहे. हाती घेतलेले काम अजून निम्मेही झालेले नाही. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. `पोलाद` आणि सुनीलजी बनारसीदास यांच्या भक्कम पाठबळाने ही वाटचाल सुरु आहे. आता `पोलाद उद्यमिता प्रतिष्ठान` स्थापन होत आहे. हे पुस्तक निव्वळ पुस्तक न राहता ही उद्यमिता चळवळ बनावी, अशी आमची अपेक्षा आहे...


`जाण्या`आधी काही तरी चांगले करायचे आहे...

- दत्ता जोशी 
9422 25 25 50 

Tuesday, February 10, 2015

माकडाच्या हाती शाम्पेन...

माकडाच्या हाती शाम्पेन... दिल्लीत हाउसफुल्ल...

अशी एक कॉमेंट मी फेसबुकवर केली. हे मी भावनेच्या भरात लिहिले, असा अनेकांचा समाज झालेला दिसतो. वास्तविक पूर्ण विचारांती मी मांडलेला हा निष्कर्ष होता. `एक्झिट पोल`च्या विश्वासार्ह तंत्रावर मी नेहेमीच विश्वास ठेवतो. या वेळीही मतदानोत्तर चाचण्यांतून जे निष्कर्ष हाती येत होते, त्यातून दिल्लीत केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकार येणार हे निश्चित झाले होते. माझ्या मनातील विचारचक्र तेव्हापासूनच फिरू लागले होते.

हे सारे संक्षिप्तपणे मांडताना त्याची विभागणी मी खालीलप्रमाणे करीन -

1)    मी स्वतः वर्षभरापूर्वी केजरीवाल समर्थक होतो. त्याच्या पुराव्यादाखल माझ्या FB account वरील ३ पोस्ट च्या लिंक मी देईन. kejriwal यांना त्याच वेळी पूर्ण बहुमत मिळायला हवे होते, असेही मी त्यात मांडले होते.
A)
<https://www.facebook.com/photo.php?fbid=806572552702042&set=a.171033762922594.47735.100000479132195&type=1>
B)
<https://www.facebook.com/dattjoshi/posts/805845189441445>
C) 
<https://www.facebook.com/dattjoshi/posts/807430365949594>

२)    मात्र केजरीवाल यांनी आपल्या ४९ दिवसांच्या सत्ताकाळात जे काही केले, ते माझ्या दृष्टीने बालिश आणि म्हणूनच अक्षम्य होते. विशेषतः वीज आणि पाणी या मुलभूत गरजा निम्म्या किमतीत उपलब्ध करण्याच्या संदर्भात त्यांनी अनुदान वाढविण्याचे जे निर्णय घेतले ते निव्वळ लोकानुनय करणारे होते. त्यात राज्याचे हित कुठेही नव्हते.
3)    ज्या पद्धतीने त्यांनी सत्ता सोडली, त्यातही गांभीर्याचा अभाव दिसला.

या नंतर केंद्रात मोदी सरकार आले. त्यांच्याकडूनही देशाला मोठ्या अपेक्षा होत्या आणि अजूनही आहेत. मात्र, सत्ताग्रहण केल्यानंतरच्या ९ महिन्यांत त्यांनी जे काही केले ते जनतेच्या गळी उतरविण्यात त्यांना सपशेल अपयश आले. त्याउलट, अनेक ठिकाणी त्यांची नकारात्मक प्रतिमा जनमानसात ठसत गेली. केवळ ९ महिन्यांत प्रस्थापित विरोधी लाट निर्माण होणे, ही त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह उमटविणारी गंभीर बाब आहे. याचा परिणाम दिल्लीत दिसला. त्यातही त्यांची हुकुमशाही वृत्ती आणि विशेषतः नाव गुंफलेला कोट यांची चर्चा समाजात मोठ्या प्रमाणावर झाली. या चर्चेचा प्रतिवाद करण्यात ते अपयशी ठरले.

महत्वाचा भाग भारतीय जनमानसाचा. मी अत्यंत जबाबदारीने हे मत मांडतो आहे, की बहुसंख्य भारतीय जनता फुकटी आहे. जे जे फुकटात मिळेल, ते लाटण्याकडे त्यांचा कल असतो. अशा वेळी तो तारतम्य विसरतो. उदाहरणार्थ – पेट्रोलचा tanker उलटल्यानंतर तेथे आग भडकू शकते हे पक्के ठावूक असूनही तेथे लोक भांडी घेवून गर्दी करतात आणि त्यातच एखादा अतिशहाणा विडी पेटवतो. शेकडो लोक जिवंत जळून जातात...!

जगात कुणीही काहीही फुकट देऊ शकत नाही, त्याची किंमत कुणाला तरी चुकवावी लागतेच, हे ठावूक असतानाही लोक अशा आश्वासनांवर विश्वास ठेवतात. दिल्लीत केजरीवाल आणि कंपनीने दिलेले मोफत वीज-पाण्याचे आश्वासन हे त्यापैकीच एक. त्याची प्रचंड भुरळ समाजाला पडली.

केंद्राविरुद्धाचा समाजाच्या मनात असलेला असंतोष, केजरीवाल यांनी दाखविलेले फुकट वीज-पाण्याचे आश्वासन आणि मोदी यांच्या विषयीची निर्माण झालेली नकारात्मक प्रतिमा यांचा तिहेरी परिणाम झाला आणि केजरीवाल यांनाही अनपेक्षित असलेले, मतदानोत्तर चाचण्यांतही समोर न आलेले पाशवी बहुमत `आप`ला मिळाले.
या पार्श्वभूमीवर `माकडाच्या हाती शाम्पेन...` ही कॉमेंट मला न्यायोचित वाटते. श्री. केजरीवाल स्वतःला अभिमानाने `असंतोषवादी` घोषित करतात. स्वतः कम्युनिस्ट विचाराचे असल्याची कबुलीही त्यांनी अनेकदा दिलेली आहे. त्यांचा वैयक्तिक विचार काय असावा, याच्याशी कुणाचे काही देणेघेणे असू नये. पण सत्ता हाती आल्यावर कुणी त्या विचारधारेला चिकटून राहील, त्याच्या कार्यकौशल्यावर नक्कीच परिणाम होईल. 

पंतप्रधान पदाच्या खुर्चीत बसल्यानंतर मोदी यांनी वैचारिक पातळीवर जी परिपक्वता आणि संयम यांचे प्रदर्शन केले आहे, ते निश्चितच लक्षणीय आहे. संघ परिवार आणि हिंदुत्ववादी संघटना यांना त्यांनी थेट अंगावर घेतले आहे.

ज्या साम्यवादाची भलावण श्री. केजरीवाल करतात त्या विचाराने कुठल्याही देशाचे भले झालेले नाही, हा उघड इतिहास आहे. उलट असे देश तुटले आहेत. चीन सारख्या देशाने हा विचार सोडला आणि त्यानंतरच त्यांची आजची प्रगती होऊ शकली, हे लक्षात घ्यावे लागेल. नेपाल मध्ये प्रचंड या साम्यवादी नेत्याने असेच बहुमत मिळवले, पण देशहितात ते अपयशी ठरले... मात्र त्या आधी त्यांनी तेथे केलेला रक्तपात अजूनही धडकी भरवतो.

या पार्श्वभूमीवर श्री. केजरीवाल राजकीय दृष्ट्या अपरिपक्व, बालिश आणि राजकीय तारतम्याचा अभाव असलेले नेते वाटतात. कोणताही सामाजिक आणि प्रशासकीय बदल चुटकीसरशी होत नसतो. ४९ दिवसांत पोलिसांच्या लाच घेण्यात नक्कीच कमी झाली असेल, पण हे बदल अशा स्वरूपाच्या उपायांनी कायम राहत नाही. त्याला वेगळे मार्ग निर्माण होऊ शकतात. केजरीवाल कदाचित आणखी वर्षभर टिकले असते, तर त्यानाही तेच पाहावे लागले असते... पोलिस असोत की सरकारी यंत्रणा... असे बदल घडावेत या साठी मुलभूत बदल गरजेचे असतात. त्याला रचनात्मक काम लागते. मनोवृत्ती बदलावी लागते. त्यासाठी प्रखर राष्ट्रभावनेची जोड द्यावी लागते. 

पंतप्रधानांनी केलेले स्वच्छता अभियानाचे आवाहन समाजाने कसे मनावर घेतलेले आहे, याची १-२ टक्के तरी उदाहरणे ठळकपणे दिसतील. हे लोक काही भाजपचे कार्यकर्ते नाहीत. तरीही हे होत आहे. कारण त्यांच्या अंतरात्म्याला हे आवाहन पटलेले आहे.

मोदी यांच्या कडून होत असलेल्या कामाच्या सक्तीमुळे नाराज झालेली नोकरशाही मोदींच्या विरोधात गेल्याचीही चर्चा आहे. असे असेल तर ते लाजिरवाणे आहे. हाच न्याय केजरीवाल यांच्या `लाचखोराना पकडण्याच्या` आवाहनाला सुद्धा लावायला हवा ना...! काम न करता पगार आणि वरकमाई अशी दुहेरी मिळकत असलेल्या नोकरदारांना खरे तर देशद्रोहाचे कलम लावायला हवे...

असो. मूळ विषयावर यायचे तर दिल्लीच्या जनतेने आपली नाराजी दाखवून देत केजरीवाल यांना मतदान केलेले आहे. यात नकारात्मक भाग अधिक आहे. दिल्लीला स्वतंत्र मोठे आर्थिक स्त्रोत नाहीत. त्यांना केंद्रावर अवलंबून राहावे लागत असते. केंद्राने न्याय्य वाटप केले तरी केजरीवाल त्यांच्या `अनार्किस्ट` स्वभावानुसार असंतोष माजवू शकतात. आता तर त्यांच्या दिमतीला ६० हून अधिक आमदार आहेत. एकेकाळी सत्ता सोडताना अर्थसंकल्प आणि आर्थिक तरतुदी करण्याचे भावनेच्या भरात जे विसरतात आणि दिल्लीच्या हजारो कर्मचार्यांना वाऱ्यावर सोडतात, त्यांच्या पुढील पगाराचीही ज्यांना चिंता वाटली नाही ते आता त्या राज्याचा उद्धार करण्यास निघाले आहेत...! हे चित्र भयावह ठरू शकते.

मी खोटा ठरलो, तर मला आनंद होईल. पण खरा ठरलो तर तो दुर्दैवी क्षण आणि तो पर्यंतचा काळ देशाच्या प्रगतीला मारक ठरेल. लोकशाहीची थट्टा ठरेल... एका व्यक्तीच्या हट्टासाठी एका राज्याला वेठीला धरणे, ते ही देशाच्या राजधानीला... हे परवडणारे नाही...




-   -  दत्ता जोशी