Sunday, November 13, 2011

चेतन भगत आणि त्याचे ‘REVOLUTION 2020’

चेतन भगत या सध्या आघाडीचे नाव असलेल्या लेखकाबद्दल बरेच ऐकून होतो. हा भारतातील बेस्ट-सेलर! त्याची ‘REVOLUTION 2020 ही कादंबरी नुकतीच बाजारात आली आणि त्याविषयी बरीच चर्चा सुरु झाली. चेतन यांच्या बद्दल बरेच ऐकून होतो, पण त्यांचे पुस्तक वाचण्याचा योग आला नव्हता. माझे जालना येथील स्नेही श्री. नितीन काबरा यांच्यामुळे तो आला. या पुस्तकाची एक प्रत त्यांनी मला दिवाळीआधी भेट दिली. बराच काळ ती वाचण्याचा मुहूर्त लागत नव्हता. (मी इंग्रजी वाचन शक्यतो टाळत असतो... माझा इंग्रजी वाचनाचा वेग खुपच कमी आहे, हे त्याचे खरे कारण !) परवा धुळे- जळगाव या परिसरात केलेल्या दोन दिवसांच्या प्रवासात वाचण्यास सुरवात केली आणि काल रात्री तीन वाजता ही कादंबरी वाचून पूर्ण झाली. काहीतरी वेगळे वाचल्याची जाणीव मला झाली. या लेखकाने नव्या पिढीवर आपल्या लेखनाने कसे गारुड केले असावे, या उत्सुकतेपोटी खरे तर मला हे वाचायचे होते. वाचून झाल्यावर मीही त्यांचा चाहता बनलो. पण मनात काही प्रश्न सुद्धा निर्माण झाले.

REVOLUTION 2020 ही एका प्रेम-त्रिकोणाची कथा आहे. याचे कथानक वाराणसीमध्ये जन्मते, कोटा येथे रेंगाळते आणि वाराणसीमध्येच संपते. कादंबरीचा नायक गोपाल, त्याचा बालमित्र राघव आणि बालमैत्रीण आरती या तिघांभोवती कथेचा पट फिरतो. गोपाल हा गरीब घरचा... बऱ्यापैकी बुद्धी असलेला तर राघव हा तुलनेत चांगल्या घरचा आणि कुशाग्र बुद्धीचा. बारावीनंतर राघव आयआयटीत सहज दाखल होतो. गोपाल पहिल्या प्रयत्नात असफल होतो. त्याचे वृद्ध वडील कर्ज काढून त्याला कोटा इथे एआय-ट्रिपलईच्या तयारीसाठी पाठवतात. त्याला आरती आपली जीवनसाथी म्हणून हवी असते. पण ती फक्त मैत्रीसाठी तयार असते. तो कोट्याला गेल्यानंतर आरती राघवचे प्रेम स्वीकारते. यामुळे गोपाल संतापतो. अभ्यासात मागे पडतो. त्याची दुसरी संधी हुकते. तो वाराणसीला परत येतो. त्याच्या अपयशाने त्याचे वडील खचतात. त्यातच त्यांचे निधन होते. एखाद्या सामान्य इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याच्या प्रयत्नात असताना एका मध्यस्ताच्या मदतीने तो स्थानिक आमदाराच्या संपर्कात येतो आणि त्याच्या सहकार्याने चक्क इंजिनियरिंग कॉलेज सुरु करून त्याचा संचालक होतो. राघव आयआयटी करून पत्रकार होतो. त्याच्या बातम्यांमुळे आमदाराला जेलची हवा खावी लागते. पण त्या दरम्यान त्याची आर्थिक घडी विस्कटते. आरती संभ्रमात पडते. याच काळात गोपाल आरतीला प्रभावित करतो. ती लग्नाला नकार देतानाच शरीराने मात्र त्याच्या जवळ येते. ती अखेरीस त्याच्याशी लग्नाला तयार होते पण त्याच वेळी तो राघवला पुढे करतो, त्याला आधार देतो आणि आरतीपासून स्वतः दूर जातो... ही तशी ढोबळ कथा आहे.

कादंबरी प्रत्यक्षात वाचताना मात्र मी लेखकाच्या शैलीने प्रभावित झालो. साधी-सोपी वाक्यरचना हे त्यांचे बलस्थान. त्याच बरोबर सुक्ष्म निरीक्षणशक्ती आणि त्याची सुरेख मांडणी हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे असे मला वाटले. वाराणसी – कोटा इथली परिसराची वर्णने, विविध पात्रांचा परस्पर संवाद, मानवी स्वभावाचे कंगोरे, तत्व आणि व्यवहारांतील तफावत, स्त्री मानसिकता हे सारे खूप सुंदर पद्धतीने वठले आहे. लेखक ‘फेकतो’ आहे, असे कुठे जाणवत नाही. त्यांच्या वर्णनातून तो प्रसंग, परिसर आपल्या डोळ्यांसमोर उभा राहत जातो.

कथाबीज तरुण पिढीला आपलेसे वाटणारे आहे. ‘विनर’ एकच असतो. `रनर’ अनेक असतात. मात्र शिक्षण पद्धतीमधील ‘रनर’ आयुष्यात ‘विनर’ ठरू शकतो. अशा असंख्य ‘रनर’ना हे कथानक ‘अपील’ होते. जगात अशी अनेक उदाहरणे सापडतात. हा मोठा वर्ग आपली प्रतिमा या कथानकामध्ये शोधू लागतो आणि स्वतःला त्या जागी कल्पून पुढे जातो. या कादंबरीमध्ये प्रेम आहे, मैत्री आहे, इर्षा, मत्सर, द्वेष, राजकारण, सेक्स हे सारे आहे... हा सारा मसाला असेल तर विषय ‘हिट’ होणारच!

पण या बरोबरच काही प्रश्न मनात उपस्थित होतात. कादंबरीची नायिका आरती हिच्याबाबत आधी लिहितो... आरती ही एका कलेक्टरची मुलगी. गोपाल गरीबीत जगणारा. अभ्यासात सुद्धा राघव पेक्षा मागे... पण तो आरती वरून जीव ओवाळून टाकत असतो. ती त्याला दाद देत नाही, पण तो कोट्याला गेल्यानंतर राघवला मात्र होकार देते... त्याच बरोबर गोपाल बरोबर मैत्रीचे संबंध कायम ठेवते... हीच आरती पुढे राघव खूप अडचणीत आल्यावर त्याच्यापासून आधी शरीराने आणि मग मनाने दूर जाऊ लागते... त्या काळात उच्च स्थानाला पोहोचलेला गोपाल तिला जवळचा वाटतो... एवढे दिवस त्याच्यापासून जपून ठेवलेले आपले शरीर ती त्याला अर्पण करते... ही स्त्री ची मानसिकता एक वेळ समजू शकते... कारण स्त्री चे मन ही अगम्य गोष्ट आहे, हे मी मान्य करतो. पण जेव्हा ती लग्नाला तयार असते, तेव्हा तिच्या शरीराचा उपभोग घेणारा गोपाल वेगळ्याच मार्गाने जातो. तो आरती आणि राघव एकत्र यावेत यासाठी स्वतःकडे वाईटपणा घेतो. पुरुषी मनाचा हा कुठला प्रकार? हा त्याग असेल तर उपभोग का घेतला आणि या पद्धतीने सूड घ्यायचा तर त्याची पार्श्वभूमी कथानकात नाही. हा वैचारिक गोंधळ आहे का? हा anty-climax मनाला पटत नाही.

बाकी, काही तांत्रिक त्रुटी आहेत. उदाहरणार्थ – आरतीचे वडील जिल्हाधिकारी असतात. पण ते सलग १२ वर्षे एकाच शहरात कसे नियुक्त असतील? पेचप्रसंगाच्या वेळी मुख्यमंत्री एका आमदाराच्या घरी कसे जातील?.... पण असे तपशील डोळ्याआड केले, तर सामान्यपणे ही कादंबरी काही वेगळे वाचल्याचे समाधान देते.

Friday, November 4, 2011

आदर्शांच्या शोधात...

अकोला येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक देशोन्नती च्या 'दिवाळी अंक २०११' मध्ये प्रकाशित झालेला लेख. राज्याच्या विविध भागांतील आदर्श मांडणाऱ्या या लेखातून नक्कीच आत्मविश्वास वाढू शकेल...
...........................................................
डोळे उघडे ठेवून शोध घेतला तर ज्यांचा आदर्श घ्यावा अशी लक्षावधी माणसे आपल्याच राज्यात आपल्याला सापडतील. कोणतेही गाव निवडा, तेथे आदर्श घेण्याजोगी माणसे नक्कीच सापडतील. ज्यांचा आदर्श अजिबात घेऊ नये अशी काही माणसे संसद, विधानसभा, न्यायालये, शासकीय कार्यालये आणि समाजात नक्कीच सापडतील. पण ही संख्या किती आहे? 120 कोटींच्या भारतात हे लोक जास्तीत जास्त 1 कोटींपर्यंत असू शकतील. हे प्रमाण 1 टक्क्यांपेक्षाही कमी भरते...

दत्ता जोशी (औरंगाबाद) 
.........................................................................................................

महाराष्ट्रात सध्या ‘आदर्श’ या शब्दाचा अर्थ वेगळाच घेतला जातो. नैतिकतेची सारी परिमाणेच बदलणार्‍या या नव्या अर्थाने राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात बरेच बदल घडवून आणले. बर्‍याच उलथापालथी झाल्या. पण मूळ प्रश्न कायम राहिला. हा क्रम मागील पाच-सहा दशकांपासून सुरूच आहे. शिळोप्याच्या गप्पांपासून उच्चस्तरीय चर्चांपर्यंत भ्रष्टाचार, लाचखोरी, बजबजपुरी, लालफितशाही, अनैतिकता याच विषयांचा उहापोह होताना दिसतो. समाजात काही चांगले उरले आहे की नाही, अशी शंका येत एक प्रकारचे वैफल्य मनात निर्माण होते.  याला कोणतेही क्षेत्र अपवाद दिसत नाही. शिक्षणापासून न्यायदानापर्यंत आणि दुग्धव्यवसायापासून संरक्षणखात्यापर्यंत सर्वत्र या रोगाची लागण झालेली दिसते. दुर्दैवाने कोणतेही क्षेत्र  याला अपवाद राहिलेले दिसत नाही. हे सारे सार्वत्रिक अनुभव असले, तरी माझा अनुभव मात्र वेगळा आहे. मला आता असे वैफल्य वगैरे येत नाही. याचा अर्थ, आता मीही या व्यवस्थेला निर्ढावलो आहे किंवा मी प्रवाहपतीत झालो आहे, असे नाही. मी फक्त माझी दृष्टी बदलली आणि खूप काही चांगले दिसायला लागले. या ‘चांगले’पणाला आदर्श म्हणायचे की नाही असा प्रश्न निश्चित समोर येईल. पण हा सुद्धा ज्याच्या त्याच्या दृष्टीचाच भाग आहे. पण माझ्या मनात एक विश्र्वास नक्की आहे. आपली सद्सद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून विचार केला तर प्रत्येक जण नक्कीच सुखावेल. मला या विषयाची तत्विक चर्चा करायची नाही. तशा अर्थाने मी तत्वज्ञ किंवा विचारवंत नाही. हवेतल्या गप्पा मारण्यावर माझा विश्र्वास नाही. ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’ अशी भूमिका घेऊन मी विषयाला हात घालत असतो. भारदस्त शब्दांचे पांडित्य दाखवून वाचकांचे डोळे दिपवत आपले मुद्दे समोरच्यांच्या गळी उतरविण्यात मला रस नाही. सामाजिक दृष्टी आणि जाणीव जागृत ठेवणार्‍या, प्रकाशाची बेटं शोधणार्‍या एका पत्रकाराच्या नजरेतून हे सारे टिपण्याचा माझा हा प्रयत्न आहे. अशी विविध उदाहरणे घेऊन मी हा विषय मांडू इच्छितो.

अण्णा हजारे यांनी 16 ऑगस्ट 2011 पासून नवी दिल्लीत भ्रष्टाचाराविरुद्धचा संघर्ष पुकारला आणि अनपेक्षितरित्या लक्षावधी लोक देशभरात रस्त्यावर उतरले. पूर्वांचलातील राज्ये अनेकदा देशभरातील अनेक घडामोडींपासून अलिप्त राहताना दिसतात. या आंदोलनात असे झाले नाही. देशातील प्रत्येक जिल्ह्यात लोक रस्त्यावर उतरलेले देशाने पाहिले. भ्रष्टाचाराला आळा घालण्यात ‘लोकपाल’ किती यशस्वी होईल, या विषयी असंख्य शंका मनात घोंघावत असतानाही, या विषयावर देशाच्या भावना किती तीव्र आहेत, हेच सर्वांनी दाखवून दिले. या आंदोलनादरम्यान तर देशातील काळोख अतिशय तीव्रपणे जाणवत होता. 

या स्थितीतही मी वैफल्यग्रस्त झालो नाही. कारण मागील पाच-सहा महिन्यांपासून मी एका वेगळ्याच विश्र्वात वावरत आहे. हे विश्र्व उद्योगी माणसांचे आहे. उद्योगी म्हणजे रूढ अर्थाने फक्त ‘इंडस्ट्रियल’ नव्हे. जीवनाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत राहून आपापल्या कामांमध्ये मनःपूर्वक रममाण झालेल्या या माणसांचे विश्र्व माझी दृष्टी बदलणारे ठरले. ‘अंधार फार झाला’च्या वातावरणात आपापली पणती तेवत ठेवणार्‍यांचे हे विश्र्व आहे. यामध्ये कोणी उद्योजक तर कोणी लेखक आहेत, कोणी व्यावसायिक तर कोणी शिक्षक आहेत. कोणी सामाजिक कामांमध्ये स्वतःला झोकून दिलेले आहे तर कोणी पर्यावरणाच्या क्षेत्रात आपले योगदान देतो आहे. हे सारे अनुभवताना आणखी एक गोष्ट स्पष्ट होत जाते, की समाजात काळोख नक्कीच आहे पण जागोजागी असलेली प्रकाशाची ही बेटं या काळोखाला नक्कीच दूर सारणारी आहेत. ही संख्या जसजशी वाढत जाईल, तसा अंधःकार नक्कीच दूर होऊ शकेल. 

या विषयात पुढे जात असताना आधी ‘आदर्शा’ची सर्वमान्य व्याख्या करता येईल का? ज्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी अशी व्यक्तिमत्वे - कार्ये म्हणजे आदर्श, असे आपण म्हणू शकू? नक्कीच असे म्हणता येईल. आदर्शाचा संदर्भ सामाजिकतेशी लावण्याचा, त्यांनी सामाजिक कार्यासाठी वेळ किंवा पैसा दिलाच पाहिजे असा हट्टही मी नाकारतो. आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्यरत राहणार्‍यांनाही आदर्श मानले पाहिजे, असे मला वाटते. 
पंढरपूर तालुक्यात मेंढापूर नावाचे एक छोटेसे खेडे आहे. इथे राजेंद्र पवार नावाचा एक तरुण वेगळीच बुद्धिमत्ता घेऊन जन्माला आला. ज्याच्या घरात तीन जण एकत्र आले, तर बसायला जागा पुरणार नाही अशा घरात वाढलेला हा शेतमजुराचा मुलगा भौतिकशास्त्रात जागतिक स्तरावर महत्वाचे योगदान देतो आहे. ‘झिंक ऑक्साईडचे अतिसूक्ष्म कणांत रुपांतर करून त्याचा सौरघट तयार करण्यासाठी वापर’ या विषयावर ‘पीएच. डी.’ करण्यासाठी त्याला दक्षिण कोरियातील हनियंग विद्यापीठाने फेलोशिप दिली आहे. सध्या तो दक्षिण कोरियात अभ्यास करतो आहे. ज्याच्या घरात कोणी मॅट्रिकची पायरी ओलांडली नव्हती, त्या घरातून राजेंद्रने घेतलेली ही भरारी प्रतिकूलतेत शिकणार्‍यांचे मन उजळविणारी ठरेल?

असाच आणखी एक पवार विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील पिंपळगावचा. घरची अत्यंत गरीबी. ही गरीबी इतकी, की रोजच्या गरजा भागविण्यासाठी अगदी बालपणापासून त्याला मजुरी करावी लागली, पण ‘फाईन आर्ट’कडे त्याचा ओढा. मोठ्या जिद्दीने उभा राहत, स्वबळावर मदत मिळवीत त्याने मुंबईच्या ‘जेजे’ मध्ये प्रवेश मिळविला. शिल्पकृतींमध्ये त्याने आज आपले स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. परवाच 5 ते 15 सप्टेंबरदरम्यान अत्यंत मानाच्या असलेल्या मुंबईच्या ‘जहॉंगीर आर्ट गॅलरी’त त्याच्या शिल्पकृतींचे प्रदर्शनही पार पडले. अक्षरशः हॉटेलात कपबशा विसळण्याचे काम करत पुढे आलेला, आज जेमतेम पंचविशीत असलेला हा तरुण नव्या पिढीसाठी प्रेरणा ठरू शकेल? 

आंध्रप्रदेशातील हिंदुपूर येथील विद्या कुरकुंबी तेथे साखर कारखाना चालवितात. पतीच्या निधनानंतर मुलाला सांभाळत त्यांनी हा कारखाना वाढविला. मुलाला उच्चशिक्षित करतानाच त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार सुरू केला. या बाईंचे आज आंध्रप्रदेशबरोबरच महाराष्ट्रात सांगलीमध्ये साखर कारखाना आहे इतकेच नव्हे तर त्यांच्या व्यवसायाचा विस्तार आता ब्राझीलमध्येही झालेला आहे. तोट्यातील साखर कारखाने खरेदी करून ते नफ्यात आणायचे, असे त्यांचे कर्तृत्व आहे. जगप्रसिद्ध ‘फोर्बस्‌’च्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश झाला आहे. ‘अबला’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या महिलांच्या विश्र्वात त्या आदर्श ठरू शकतील?

मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातील भूकंपग्रस्त सास्तूर गावातून एकेकाळी फक्त अंगावरच्या कपड्यांनिशी आणि मनात मोठी जिद्द घेऊन फुलचंद जैन औरंगाबादेत आले. प्रारंभी छोटी-मोठी नोकरी करीत आणि नंतर खडेमीठ दळून त्याचे पुडे बनवून विकण्यापासून त्यांनी आपल्या उद्योगाला सुरवात केली. सुमारे 25 वर्षांच्या वाटचालीनंतर आजघडीला त्यांची ‘रवि मसाले’ हा उद्योग संपूर्ण मराठवाड्याबरोबरच आजूबाजूच्या जिल्ह्यांतही विस्तारला आहे. सर्वप्रकारच्या लोणच्यांसोबतच तिखट, हळद, विविध प्रकारची ‘रेडी टू कुक मिक्स’ असा प्रचंड विस्तार त्यांनी या काळात केला. आजमितीला काही कोटींची ही आर्थिक उलाढाल करणारे फुलचंद जैन जेमतेम मॅट्रिक आहेत. अल्पशिक्षितांसाठी ते आदर्श ठरू शकतील?

‘एका रानवेड्याची शोधयात्रा’ हे कृष्णमेघ कुंटे याचे पुस्तक अनेकांनी वाचले असेल. रानाच्या प्रेमात असलेल्या सांगलीच्या शरद आपटे यांचे काम आणखी वेगळे आहे. ते जंगलांत हिंडतात आणि विविध पक्ष्यांचे आवाज ‘रेकॉर्ड’ करतात. त्यांनी ध्वनिमुद्रित केलेले पक्ष्यांचे आवाज आपण त्यांच्या लळीवलरश्रश्री.ळपषे या वेबसाईटवर जाऊन ऐकू शकतो. आपटे यांनी केलेले हे काम या विषयातील शास्त्रीय अभ्यास करणार्‍या अभ्यासकांसाठी किती मोलाचे ठरेल?

जालना येथे परेश रुणवाल नावाचे जेमतेम पस्तिशीत असलेले गृहस्थ आहेत. शिक्षणाने सीए आणि व्यवसायाने ‘ब्रोकर’ असलेल्या परेश यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर जालन्यातील पहिली ‘कलर फोटो प्रोसेसिंग लॅब’ सुरू केली होती. हा व्यवसाय मार्गी लावल्यानंतर  ते शेअर बाजाराकडे वळले. भारतात ‘कमोडिटी मार्केट’ सुरू होण्याआधीपासून ते या विषयात आग्रही होते. कमोडिटी मार्केटची भारतात सुरवात झाल्यानंतर या विषयाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांना मुंबईत पाचारण करण्यात आले होते. बीएसई, एनएसईसह सर्व प्रकारच्या गुंतवणूक सेवा जालन्यासारख्या शहरात एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे परेश रुणवाल आजमितीला वार्षिक साडेआठ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे मध्यस्थ आहेत! मुंबईच्या बाहेर  राहून शेअर बाजारातील एवढी उलाढाल करणारे आणि ही उलाढाल करताना गुंतवणूकदारांचा एवढा विश्र्वास जिंकणारे परेश आजच्या तरुणांचा आदर्श ठरू शकतील?

नांदेडच्या गुजराती हायस्कूलमधून शिक्षक म्हणून निवृत्त झालेल्या एल. के. कुलकर्णी यांनी जवळजवळ 12 वर्षांच्या परिश्रमातून मराठीतील पहिला भूगोलकोश तयार केला. एल. के. हे एक अजब रसायन आहे. एम. एस्सी. (बॉटनी) असलेल्या एल. के. यांना त्या काळात प्राध्यापकी करण्याची ऑफर आलेली होती. पण त्या ऐवजी ते दहावीखालील वर्गांच्या शिक्षकी पेशात रमले. ‘प्रयोगातून विज्ञान’ची ज्या काळात नुसतीच चर्चा होत असे तेव्हा त्यांनी विद्यार्थ्यांना खरेखुरे प्रयोग करण्यास प्रवृत्त केले. असंख्य अडचणींतून त्यांनी भूगोलकोश सिद्ध केला तेव्हा तो मराठीतील एक अद्वितीय कोश ठरला. शास्त्रीय माहितीबरोबरच लालित्यपूर्ण शब्दसौष्ठवाने हा कोश वाङ्‌मयजगतातही नावाजला गेला. आपले वेगळे स्थान निर्माण करणारे एल. के. कुलकर्णी शिक्षकी पेशात आदर्श ठरतील?

कोकणात वेळास येथे कासव महोत्सव आयोजित करणारे भाऊ काटदरे आज जगभर प्रसिद्ध झाले आहेत. या परिसरात ‘ऑलीव्ह रिडले’ जातीच्या कासवांची नैसर्गिक पैदास होते. एकेकाळी या कासवांची तस्करी होत असे किंवा त्यांचा खाद्य म्हणून वापर केला जात असे. काटदरे यांनी या विषयात लक्ष घालून कासवांच्या रक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी उचलली. कासवे नष्ट होऊ नयेत, साठी चळवळ उभारली. आज त्यांचे काम जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणार्‍या काटदरेंचा आदर्श आपण घेऊ शकतो? 

धुळे जिल्ह्यातील वारसा परिसरात डॉ. आनंद फाटक 1990च्या सुमारास पोहोचले तेव्हा इकडे कसल्याही वैद्यकीय सुविधांचा लवलेशही नव्हता. डॉ. फाटक यांनी ‘मेडिसीन’ विषयात ‘एम.डी.’ पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर आदीवासी भागात जाऊन काम करण्याचे ठरविले. रा. स्व. संघ आणि वनवासी कल्याण आश्रमाच्या प्रेरणेतून या क्षेत्रात काम करण्याचा त्यांनी निर्धार केला. वारसा हा आदिवासी पाड्यांचा भाग. इथे आयुष्यातील उमेदीची जवळजवळ नऊ वर्षे घालवून डॉ. फाटक यांनी वैद्यकीय सेवा दिली, त्याच बरोबर आदीवासींच्या सर्वांगीण विकासासाठी शेती, पाणीनियोजन, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी दीर्घकालीन कार्य उभे केले. परिपूर्ण ग्रामविकासाचा हा आदर्श ठरेल का?

असाच प्रकार किनवटमधील डॉ. अशोक बेलखोडे यांचा. ते मूळचे नागपूर जिल्ह्यातील. अत्यंत गरिबीतून, प्रसंगी भाजी वगैरे विकून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. शासकीय वसतीगृहाच्या सुविधा उपलब्ध असल्याने त्यांना वैद्यकीय शिक्षण घेता आले. अशा स्थितीत त्यांनी एम. एस. (सर्जरी)चे शिक्षण पूर्ण केले. याच काळात त्यांना ‘सामाजिक कामां’चे व्यसन लागले. बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून त्यांनी किनवट परिसरात आरोग्यसेवा देण्याचा प्रकल्प उभारला. साने गुरुजी रुग्णालयाच्या माध्यमातून 1993 पासून ते इथे कार्यरत आहेत. आयुष्यभरासाठी त्यांनी हे कार्य पत्करले आहे. ‘सर्जरी’त एम.एस. केल्यानंतर खोर्‍याने पैसा ओढण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांनी स्वतःला आदीवासींच्या भल्यासाठी झोकून दिले. त्यांचा आदर्श एन्टर्नशिपसाठीही खेड्यांमध्ये जाऊ न इच्छिणार्‍या तरुणांना घेता येईल?

नांदेडच्या स्वाती ठक्कर-चव्हाण यांनी एल.एल.एम. नंतर प्राध्यापकी सोडून न्याययंत्रणेत सहभागी झाल्या. वयाच्या जेमतेम चाळीशीत त्या मुंबईतील अनैतिक वाहतुक (प्रतिबंध) विशेष न्यायालया न्यायाधीश बनल्या. मानवी देहव्यापार आणि तस्करीच्या विरुद्ध विशेष कायद्यान्वये स्थापन झालेल्या या न्यायालयाच्या त्या पहिल्या न्यायमूर्ती आहेत. शासनव्यवस्थेने त्यांच्यावर टाकलेला विश्र्वास त्यांनी आपल्या कार्यातून सार्थ ठरविला. या कामाची दखल अमेरिकी प्रशासनानेही घेतली आणि त्यांची  ‘ट्राफिकिंग इन पर्सन्स हीरो 2011 ऍवार्ड’ या 2011च्या पुरस्कारासाठीनिवड केली. मराठी तरुणींसाठी स्वाती ठक्कर-चव्हाण या आदर्श ठरू शकतील?

शून्यातून आपले उद्योगविश्र्व उभारणारे असंख्य उद्योजक महाराष्ट्रभर कार्यरत आहेत. जालन्यात ‘विनोदराय इंजिनइरर्स’ ही कंपनी ‘स्टोअरेज टँक्स’ बनविण्यासाठी लागणारी यंत्रणा तयार करते. महाराष्ट्रातील अशा प्रकारची ही एकमेव कंपनी आहे. साधारण 2001 पर्यंतची या कंपनीची वाटचाल जेमतेम म्हणावी अशी होती, पण त्या वर्षी दिल्लीतील एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी झाल्यानंतर या कंपनीने घेतलेली झेप थक्क करणारी आहे. मेकॅनिकल इंजिनइर असलेल्या सुनील रायठठ्ठा यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी आज जगभरात सुमारे 40 देशांमध्ये ही यंत्रे निर्यात करते! त्यांच्या कामातून एक नवाच पैलू समोर येतो, तो भारताला मागास देश म्हणणार्‍यांचा. भलेही अमेरिकेसारख्या काही मोजक्या प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत भारत भलेही मागास असेल, पण उरलेल्या शंभरहून अधिक देशांसाठी आपण पुढारलेले आहोत, मग येथील निर्यातीच्या संधी आपण का शोधू नयेत, या विचारातून त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार वाढविला आणि आता तर ते फ्रान्समध्येही निर्यात करतात! क्षमता असूनही स्वतःला कमी लेखणार्‍यांसाठी सुनील रायठठ्ठा आदर्श ठरू शकतात?

नांदेडजवळ लिंबगाव येथे शेतकरी संघटनेचे एक कार्यकर्ते आर. पी. कदम राहतात. त्यांनी शेतीउत्पादनांवर प्रक्रिया करणारा प्रकल्प 10 वर्षांपुर्वी सुरू केला. शेतीमाल जसा आहे तसा न विकता त्यावर प्रक्रिया करून विकल्यास उत्पादकाला अधिक किंमत मिळते, असा त्यांचा विश्र्वास आहे. फळप्रक्रिया करणारे राज्यातील पहिले युनिट त्यांनी उभारले. आपल्या मुलांनाही त्यांनी या व्यवसायात येण्यास प्रेरणा दिली. आयुर्वेद क्षेत्रात डॉक्टर झालेल्या आपल्या मुलास त्यांनी हेल्थ टुरिझमची प्रेरणा दिली. आता लिंबगाव परिसरात एकाच ठिकाणी त्यांची वनोषधी, फळप्रक्रियाउद्योग आणि आरोग्यकेंद्र अशी विविध कामे सुरू आहेत. आर. पी. कदम यांचा आदर्श शेतकर्‍यांना घेता येईल?

जालन्यालगत सिंधी काळेगाव येथे सीताबाई मोहिते - घोडेगावकर यांचा फळप्रक्रिया उद्योग आहे. एकेकाळी जालन्याच्या कृषिविज्ञान केंद्रातील शेतीवर सालदार म्हणून काम केलेल्या सीताबाई आज याच केंद्राच्या सल्लागार मंडळावर कार्यरत आहेत. त्या अशिक्षित आहेत, तरीही राज्य शासनाने घेतलेल्या स्पर्धेतून त्यांनी महाराष्ट्र आणि गोवा या भागातील उद्योजिकांमधून प्रथम पारितोषिक जिंकले आणि त्याच बळावर त्या परदेशातही जाऊन आल्या. तेथे त्यांनी आपल्या वक्तृत्वाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्या मराठीतून बोलायच्या आणि भाषांतरकार त्याचे इंग्रजीत रुपांतर करायचा. आपल्या अभिनव संकल्पनांच्या जोरावर शेती आणि फळप्रक्रियेत स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणार्‍या सीताबाई यांचा आदर्श अशिक्षित महिलांबरोबरच सुशिक्षित तरुणींना घेता येईल?

संजय केदार नावाचा जालन्यातील 12वी नापास झालेला आणि सध्या ‘रिक्षावाला’ असणारा तरुण आदर्श होऊ शकेल का? एका कारखान्यात मजुरी करताना संजय यांनी एक लोडिंग रिक्षा कर्ज काढून विकत घेतला. मेहनतीमुळे चांगला प्रतिसाद मिळाल्याने वर्षभराच्या आतच त्यांनी दुसरा रिक्षा घेऊन आपल्या धाकट्या भावाला कामाला लावले. उद्योगांची मागणी लक्षात घेऊन पुढच्या वर्षात त्यांनी एक जीप विकत घेतली आणि मराठवाड्यात विविध ठिकाणी कंपन्यांचा माल पोहचविण्यास सुरवात केली. आणखी एक-दीड वर्षात त्यांनी एक ट्रक विकत घेतला आणि राज्यभरात व्यवसाय करू लागले. एव्हाना - या दिवाळीत त्यांनी दहा चाकी ट्रक विकत घेतलेला असेल. मागील 5-6 वर्षांतील हाच वेग कायम राहिला, तर पुढील 7-8 वर्षांत ते एक मोठे वाहतुकदार झालेले असतील, यात शंका नाही. बारावी नापास झाल्यामुळे आत्महत्या करणार्‍यांनी त्या आधी संजय केदार यांना आवर्जुन भेटायला हवे?

पाणी नियोजनातील सरकारी खात्यांत होणारा भ्रष्टाचार ही बाब आता कोणासाठीच नवी नाही. पण सरकारी मदत न घेता अतिशय कमी खर्चात अत्यंत परिणामकारक जलसंधारणाचा पर्याय सुचविणार्‍या विजय केडिया यांच्या ‘केडिया पॅटर्न’ने अनेकांचे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्राबाहेरही अनेक ठिकाणी त्यांनी अभिनव पद्धतीने उभारलेल्या भूमिगत तलावांच्या प्रकल्पांनी कोट्यवधी लिटर पाण्याचे फेरभरण जमिनीचे कोणतेही नुकसान न होता केले जात आहे. ‘बिट्‌स पिलानी’ येथील मेकॅनिकल इंजिनइर असलेल्या केडिया यांनी स्वतःची शेती फुलविण्यासाठी केलेले प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्याचा फायदा सर्वांना करून देण्यासाठी कंबर कसली आणि एकांड्या शिलेदाराप्रमाणे आज ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचा आदर्श शेती आणि पाण्याच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरुणांना घेता येईल?

शेवटी आणखी एक महत्वाचे नाव विचारात घेता येईल. ‘महिको’चे संस्थापक बद्रीनारायण बारवाले यांचे नाव आपण ऐकले असेलच. संकरीत बियाण्यांच्या क्षेत्रात भारतातील पायाभूत कर्तृत्व गाजविणारी ही व्यक्ती साधी मॅट्रिक पास आहे, हे आपल्याला ठावूक आहे? स्वातंत्र्यानंतरही पारतंत्र्यात असलेल्या मराठवाड्याला रझाकाराच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी पुकारलेल्या लढ्यामुळे त्यांनी शिक्षण सोडले. या लढ्यात त्यांनी बंदुक चालविली आणि बॉम्बस्फोटाने पूलही उडवून दिला. त्यानंतर शिक्षणाऐवजी त्यांनी व्यवसायावरल चक्ष केंद्रित केले आणि त्यातून टप्प्याटप्प्याने बियाणेउत्पादकाची भूमिका त्यांनी यशस्वीपणे वठविली! आज ऐंशीव्या वर्षीही ते कार्यरत आहेत. स्वतः एखाद्या विषयात शिकलेले नसतानाही निरीक्षणशक्ती, अचूक आकलन आणि गुणग्राहकतेच्या जोरावर त्यांनी आपले साम्राज्य उभे केले. त्यांचा आदर्श तर सर्वांनाच घेता येईल.

अशी किती नावे घ्यायची? आपल्या हे ही लक्षात आले असेल, की यातील कोणतेही नाव जगप्रसिद्ध नाही. कदाचित यातील एकही नाव या आधी आपल्या कानावर आलेले नसेल. डोळे उघडे ठेवून शोध घेतला तर ज्यांचा आदर्श घ्यावा अशी लक्षावधी माणसे आपल्याच राज्यात आपल्याला सापडतील. कोणतेही गाव निवडा, तेथे आदर्श घेण्याजोगी माणसे नक्कीच सापडतील. ज्यांचा आदर्श अजिबात घेऊ नये अशी काही माणसे संसद, विधानसभा, न्यायालये, शासकीय कार्यालये आणि समाजात नक्कीच सापडतील. पण ही संख्या किती आहे? 120 कोटींच्या भारतात हे लोक जास्तीत जास्त 1 कोटींपर्यंत असू शकतील. हे प्रमाण 1 टक्क्यांपेक्षाही कमी भरते. एक नासका आंबा अख्खी आढी नासवतो हे खरेच, पण एक अगरबत्ती सारा आसमंत सुगंधित करते, हे ही तितकेच खरे. 

समाजात अधःपतीत झालेली माणसे सर्व युगात झाली. अगदी सत्ययुगातही परस्त्रीवर वाईट नजर ठेवणारा रावण झालाच की! त्या दृष्टीने हे कलियुग म्हणजे अधःपतनाची मर्यादाच! अशा युगात ही प्रकाशाची बेटं जागोजागी सापडतात. असं एक बेट त्याचा परिसर उजळविणारे ठरते. काळोखात हरवून न जाता असा बेटांची शोधयात्रा हाती घेतली, तर परिसरातील आणि मनातीलही अंधःकार नक्कीच दूर होऊ शकेल. त्यामुळेच मी वैफल्यग्रस्त होत नाही. अशी माणसे शोधून ती समाजाच्या सर्व स्तरांत पोहोचविणे, हेच माझे काम आहे.
अशी उदाहरणे आपल्याही परिसरात नक्कीच असतील. मी अशा उदाहरणांच्या शोधात आहे. अशी प्रकाशाची बेटं आपल्या माहितीत असतील, तर ती जाणून घ्यायला मलाही नक्कीच आवडेल. चला, सारेच मिळून ‘आदर्शा’चा शोध घेऊ...

दत्ता जोशी, औरंगाबाद
9225 309010

(दत्ता जोशी हे मुक्त पत्रकार असून 21 वर्षांपासून ते जनसंवादाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. औरंगाबाद येथे ते ‘ब्रँडिग व इमेज बिल्डिंग’ क्षेत्रातील ‘द कॅटालिस्ट’ ही संस्था चालवितात.)



Sunday, October 30, 2011

हो कहीं भी आग लेकीन आग जलनी चाहिये...

नांदेड येथून प्रकाशित होत असलेल्या 'उद्याचा मराठवाडा' या दैनिकाच्या दिवाळी अंकासाठी 'अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची अकरावी दिशा' या कल्पनेभोवती गुंफलेला हा लेख...
............................................






एक बूढा आदमी है
मुल्क में, या यूँ कहो
इस अंधेरी कोठरी में
एक रोशनदान है।
(दुष्यंतकुमार) 
**
भारत पूजास्तोम माजविणारा देश आहे. इथे पूजेला देवापासून माणसापर्यंत कोणीही चालते! एका चमत्काराचे दर्शन घडले की लोक रांगा लावतात आणि लोटांगणे घालत शरण जातात. अशा चमत्कारांच्या नजरबंदीवर अनेकांची दुकाने देशभर यथास्थित चालू आहेत. हवेतून उदी काढणे, मूल होणे, मुलगाच होणे, नोकरी लागणे, बदली होणे, कॉन्ट्रॅक्ट मिळणे... ही यादी न संपणारी आहे. ‘मागणी तसा पुरवठा’ हा बाजारपेठेचा नियम आहे. समाजाची डोके टेकण्याची गरज अशी अनेक मार्गांनी पूर्ण होते आणि माणसे निष्क्रिय बनण्यास मोकळी राहतात. सध्या अशीच काहिशी स्थिती अण्णा हजारे यांच्या संदर्भात होताना दिसते आहे. मूळ फरक एवढाच आहे की वर उल्लेख केलेली ‘चमत्काराची दुकाने’ संबंधित बाबा-दादा-भगत-महंताने थाटलेले असते, तर अण्णांचे दुकान देशानेच मोठा गाजावाजा करून थाटून दिलेले आहे. ही भाषा कदाचित थोडीशी खटकणारी वाटेल, पण हा विषय समजून घ्यायचा तर व्यवहाराची भाषा वापरणेच योग्य ठरेल!

अण्णा हजारे यांची ओळख मराठी माणसाला करून देण्याची गरज उरलेली नाही. साधारणपणे मागील दोन दशकांपासून हे नाव महाराष्ट्रात गाजते आहे. ‘राळेगण-शिंदी’चे स्थित्यंतर ‘राळेगण-सिद्धी’मध्ये करण्याच्या त्यांच्या यशस्वी प्रयोगाने प्रारंभी सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. अत्यंत सत्शील, चारित्र्यवान, समर्पित अशा या माणसाकडे समाज आकर्षित झाला. ‘माहितीच्या अधिकारा’सारखे शस्त्र सर्वसामान्यांच्या हाती मिळवून देण्याच्या त्यांच्या आंदोलनाने त्यांच्याभोवतीचे वलय फाकले. राज्य पातळीवरील हाच विषय अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय पातळीवर नेला आणि त्या आधारावर त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘मॅगसेसे पुरस्कार’ पटकावला. शेतीमध्ये नगदी पिके असतात, तशी सरकारात ‘नगदी खाती’ असतात. अशा खात्यांचे मंत्री कायमच अण्णांच्या रडारवर राहिले. याला कोणतेही मंत्रिमंडळ अपवाद राहिले नाही. शिवसेना-भाजपा युतीच्या काळात तर राज्य सरकार इतके वैतागले होते, की अण्णांच्या उपोषणाचे वर्णन ते ‘अन्ना’चे उपोषण असे करीत! उपोषण करूनही अण्णा टुणटुणित कसे हा परवा लालू प्रसाद यादव यांना लोकसभेतील चर्चेदरम्यान पडलेला प्रश्न तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पडलेला होता! असो. मुख्य मुद्दा आहे तो अण्णांच्या ‘देवत्वा’चा.

नवी दिल्लीत जंतर मंतरवर एप्रिल-मे 2011 मध्ये अण्णांनी पुकारलेल्या उपोषणाला अनपेक्षितरित्या उदंड प्रतिसाद मिळाला. देशभरात खदखदणारा भ्रष्टाचाराविरुद्धचा जनआक्रोश, अण्णांची निष्कलंक प्रतिमा आणि प्रसारमाध्यमांचे उदंड सहकार्य यांच्या परिणामस्वरुप दिल्ली दरबार अल्पकाळातच झुकला आणि ‘तुम्ही आम्ही मिळून प्रकरण मिटवून टाकू’च्या अविर्भावात अण्णा आणि सरकार यांनी मिळून आंदोलन संपवून टाकले. देश चालविणारे आणि सरकार झुकविणारे असे दोनच पक्ष देशात अस्तित्वात आहेत अशा अविर्भावात, संसदीय लोकशाहीत महत्वाची भूमिका बजावणार्‍या विरोधी पक्षांना गृहितही न धरता हे निर्णय झाले. पुढे व्हायचे तेच झाले. सरकारने अण्णांना फसवले. त्यानंतर ‘सरकारी लोकपाल’ आणि ‘जन लोकपाल’ या मुद्‌द्यावरून ऑगस्टमध्ये पेटलेले देशव्यापी आंदोलन आपण अनुभवले. पण या दोन्ही आंदोलनाचे फलित, एका हिंदी गाण्यात म्हटल्याप्रमाणे ‘जाना था जापान, पहुंच गये चीन’ असे काहीतरी दिसले. नेत्यांची असहिष्णु वृत्ती, राजकीय पक्षांच्या कोलांटउड्या, संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये भरकटलेल्या चर्चा आणि सभागृहाबाहेर स्थापन झालेले अप्रत्यक्ष सत्ताकेंद्र अशा घडामोडींचा सारा देश साक्षीदार बनला. लालूप्रसाद यादव यांच्याकडून गांभीर्याची अपेक्षाच करणे व्यर्थ आहे पण शरद यादव यांच्यासारख्या नेत्याने लोकसभेतील चर्चेदरम्यान केलेली अनेक विधाने आणि उल्लेख त्यांच्याबद्दलचा आदरभाव कमी करणारे ठरले. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे चाललेले ‘तळ्यात-मळ्यात’ तर अनाकलनीय वाटले. हे सारे वातावरण संमिश्र होते. लोकशाहीची हतबलता आणि त्याच लोकशाहीची ताकद या दोन्ही बाबींचे प्रत्यंतर या कालखंडात आले. आता इथून पुढची वाट ‘बिकटवाट’ असणार आहे कारण प्रत्येक मुद्‌द्यामध्ये परस्परविरोध ठासून भरलेला आहे. संभ्रमित भारताचे दर्शन यातून होत आहे.
**
कल नुमाईश मे मिला वो
चिथडे पहने हुये
मैने पूछा हाल तो
बोला के हिंन्दोस्तान है।
**
लेखाच्या प्रारंभी म्हटल्याप्रमाणे सध्या अण्णांना देव बनविण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. ‘टीम अण्णा’पासून सामान्य माणसापर्यंत प्रत्येक जण अण्णांसाठी मखर तयार करण्यात गुंतलेला आहे. या मुद्‌द्याला हात घालण्याआधी अण्णांची बलस्थाने आणि त्यांच्या मर्यादा जाणून घ्यायला हव्यात. अण्णा हजारे हे देशभक्तीने ओतप्रोत भारलेले व्यक्तिमत्व आहे. सैन्यदलात वाहकाची नोकरी करणार्‍या अण्णांनी आपल्या गावी परतल्यानंतर गावाच्या परिवर्तनाचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात आणून दाखविले. त्यांची निष्कलंक आणि निरिच्छ वृत्तीच गावकर्‍यांचे प्रेरणास्थान बनली. गाव सुधारताना त्यांनी राज्याच्या सुधारणेचे प्रयोग सुरू केले. राजकारण्यांना अशा प्रकारचे ‘कार्यकर्ते’ हवेच असतात. त्यांच्या मदतीने राजकारण्यांनाही स्वतःला मिरविण्याचे निमित्त मिळते. जोवर अण्णा त्यांना पूरक ठरले तोवर त्यांना ते हवेहवेसे होते. पण अण्णांनी प्रहार सुरू करताच ते सत्ताधार्‍यांचे नावडते ठरले. असे असले तरीही ते तोवर राज्य पातळीवरच होते. त्यांची उपोषणाची क्षमता अफाट आहे आणि उपोषणाचे शस्त्र गांधीजींनी देशात प्रतिष्ठेचे करून ठेवले आहे. त्या आधारावर ते भल्याभल्यांना वाकवण्यात यशस्वी होतात. छोटे छोटे कार्यक्रम हाती घेऊन ते यशस्वी करणे ही त्यांची कार्यशैली, पण संपूर्ण देशाचा विचार करून दूरगामी धोरण ठरविण्याचे कौशल्य आणि क्षमता त्यांच्याठायी नाही. अशा गोष्टींसाठी लागणारी मुत्सद्देगिरी त्यांच्याकडे कधीही दिसली नाही. तटस्थपणे पाहिले, तर ‘भाबडे आजोबा’ ही त्यांची ओळख ठरू शकेल. धोती-कुर्ता-टोपी परिधान करणारा हा भाबडेपणा देशभरात आकर्षणाचा विषय ठरला. भारत वरकरणी कितीही चकाचक होत गेला तरी अंतर्यामी तो खूप साधा आहे आणि साधेपणाची ही नाळच अण्णांना देशाशी जोडणारी ठरली आणि यातून एक उत्स्फुर्त जनआंदोलन उभे राहिले. या आंदोलनाचीही एक खासियत होती. आजवर मी अनेक आंदोलनांचा साक्षीदार राहिलो आहे. काही आंदोलनांत स्वतः सहभागीही झालो आहे. सर्वसाधारणपणे आंदोलनाची दिशा ठरल्यानंतर त्यांच्या प्रत्येक टप्प्यांवर संबंधित आंदोलनाच्या सूत्रधारांचे नियंत्रण असते. मुळात संपूर्ण देशभर एकाच वेळी पेटलेले आंदोलन देशाने स्वातंत्र्यानंतर प्रथमच पाहिले. (मध्यंतरी अयोध्या प्रकरणी संघ परिवाराने पुकारलेले आंदोलन बर्‍यापैकी विस्तारलेले होते पण त्याला देशव्यापी स्वरुप कधीही आलेले नव्हते आणि या आंदोलनाची सर्वसमावेशकता तर अजिबातच नव्हती.) जवळजवळ प्रत्येक राज्यात या आंदोलनाचे लोण अल्पकाळात पोहोचले आणि जवळजवळ प्रत्येक गावात या आंदोलनाची किमान एक तरी प्रतिक्रिया उमटली. हे या आंदोलनाचे अभूतपूर्व यश नक्कीच होते. नवी दिल्लीतील हालचालींना कदाचित केजरीवाल यांच्या संस्थेचे मार्गदर्शन असेल, पण गावोगावी लोक स्वतःच कार्यक्रम ठरवीत होते आणि रस्त्यावर उतरत होते. यात अनेक ठिकाणी हुल्लडबाजी झाली. पण ही हुल्लडबाजी सर्व प्रकारच्या संस्था - संघटना - पक्षांच्या कार्यक्रमात होतच असते. ती तात्कालीक असते. त्यामुळेच दुर्लक्षिण्यायोग्य असते. या यशस्वितेनंतर मात्र अण्णांच्या भोवतीचे वलय ‘झेड’ दर्जाचे बनले!

संसदीय लोकशाहीचे स्तोम आणि संसदेचे सार्वभौमत्व यांचा भंपकपणा भारतापेक्षा कोठे पाहावयास मिळणार? एका मिनिटात 12 विधेयके एका फटक्यात पारित करणारी ही संसद ‘लोकपाला’साठी मात्र संसदेच्या स्थायी समितीचे कारण पुढे करताना दिसली. हा निव्वळ वेळकाढूपणा आहे, असाच सर्वांचा समज होणे साहजिक आहे. कारण या देशाने एकदा आपले खासदार निवडून दिले की त्यांच्या व्यवहाराकडे कधीही लक्ष दिलेले नव्हते. पण संसदीय लोकशीहीची (बहुतेक वेळा स्वार्थीपणामुळे पाळली जात नसली तरी) एक विशिष्ट प्रक्रिया असते. टी. एन. शेषन निवडणूक आयुक्त होईपर्यंत देशाला मुख्य निवडणूक आयुक्त असतात, हेच मुळी देशाला ठावूक नव्हते! अण्णांच्या ‘जनलोकपाला’मुळे संसदेची स्थायी समिती असते आणि ती विविध विधेयकांवर (गंभीरपणे) चर्चा करीत असते अशी माहिती देशाला कळाली. यातील उपरोधाचा भाग सोडला, तरी जो विषय कायद्याच्या रुपाने संसदेसमोर यावयाचा असतो त्यावर सर्वपक्षीय तज्ज्ञ प्रतिनिधींनी साधकबाधक चर्चा करावी आणि भेदभावरहित कायदा देशासमोर यावा असा यामागचा उदात्त हेतू. पाशवी बहुमत किंवा विरोधी पक्षांशी मतलबी साटेलोटे या कारणांमुळे असंख्य कायदे आजपर्यंत सुरळीपणे पारित होत गेले पण ‘लोकपाला’ला मात्र त्यात अडकविण्यात आले. कोणत्या यंत्रणेला स्वतःवर अंकुश लावून घेणे आवडेल? त्यामुळे भाजपासह कोणत्याही राजकीय पक्षाकडून या विधेयकाला निःसंदिग्ध पाठिंबा मिळणे अशक्यच होते पण त्याच वेळी अण्णांचा सत्याग्रह - नव्हे हट्टाग्रह - मिटविणे ही राजकीय व्यवस्थेची सर्वात महत्वाची गरज होती. ती भागविल्यानंतर कोणतीही अंतिम समयमर्यादा निश्चित न करता संसदेने हा विषय थांबविला. अण्णाही गावी परतले. आता त्यांनी राज्य सरकारकडे विशिष्ट मुदतीत लोकपालाचे अधिकार वाढवून देण्याची मागणी केली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हा विषय केंद्राच्या कोर्टात ढकलत आपल्या सरकारला त्यातून अलगद बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. 
**
खाने को कुछ नहीं है
फटे हाल है मगर
झोले मे उसके पास
कोई संविधान है।
**
हा सारा घटनाक्रम काय सांगतो? एका बाजूला आत्ममग्न पण निष्क्रिय सरकार आणि दुसरीकडेही आत्ममग्नच पण अतिसक्रिय अण्णा. झुंडशाहीला सारासार विवेक नसतो. व्यक्तीला तो असणे अपेक्षित असते. आपल्याभोवती जमत आहेत ते पाठीराखे आहेत की झुंड, याचाही सारासार विवेक व्यक्तीला हवा. इथे मात्र अण्णांच्या आंदोलनावर मतभेदांची सुरवात होते. एकेकाळी आणि आजही न्यायालयांची सक्रियता हा देशाच्या चिंतेचा मुद्दा होता. न्यायालये ही लोकशाही व्यवस्थेची स्तंभ आहेत आणि संसद हा लोकशाहीचा कणा आहे. पण हा कणाच कमकुवत झाला तर उरलेल्या स्तंभांना आपोआपच महत्व येऊ लागते. भांडणारे दोघे तिसर्‍याकडे न्यायासाठी गेले की आपोआपच तिसर्‍याचे महत्व वाढते. न्यायालयांच्या पाठोपाठ माध्यमांची सक्रियताही खूप वाढली. मिसरुडही न फुटलेली पोरंटोरं कॅमेरा आणि माईक घेऊन कोणाचाही पिच्छा पुरविणे हा आपला हक्क समजू लागली. घटना आठवली म्हणून सांगण्याचा मोह आवरत नाही ः ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचे पुत्र अभिषेक यांच्या विवाहप्रसंगी त्यांनी अगदी मोजक्या पाहुण्यांना निमंत्रित केले होते आणि माध्यमांना कटाक्षाने दूर ठेवले होते. असे असतानाही या ‘बिन बुलाया मेहमानां’नी त्यांच्या घरासमोर जाऊन तमाशा केला. या जमावाच्या अगोचरपणामुळे सुरक्षा रक्षकांनी त्यांच्याशी हडेलहप्पी केली तेव्हा सार्‍या वाहिन्यांनी आकाश कोसळल्याच्या अविर्भावात गदारोळ सुरू केला. सार्‍या वाहिन्यांवर त्या काळात दुसरा विषयच नव्हता. अखेर अमिताभ बच्चन यांना येऊन माफी मागावी लागली आणि ‘जितं मया’च्या अविर्भावात ही मिडियावाली मंडळी तेथून परतली. हा काय प्रकार आहे? माध्यमांमध्ये परिपक्वता का असू नये? अशीच अपरिपक्वता विविध आंदोलनांत जशी दिसते तशीच विविध राजकीय घडामोडींमध्येही. अशा सक्रियतेमुळे काही जण अकारण आयुष्यातून उठतात तर काहींना ‘जॅकपॉट’ लागतो. अण्णा अशाच ‘जॅकपॉट’चे लाभार्थी ठरले! जनभावनेचा भ्रष्टाचाराविरोधातील उद्रेक आणि माध्यमांची सक्रीयता यातून वातावरणनिर्मितीने कळस गाठला आणि अण्णा ‘लार्जर दॅन लाईफ’ ठरले.

हे आंदोलन वगैरे थंडावल्यानंतर आता मागे वळून पाहताना असे लक्षात येते की असंख्य चुका झालेल्या आहेत. सरकारच्या चुका अक्षम्य आहेत, कारण या सरकारने आतापर्यंतच्या कार्यकाळात फक्त चुकाच केल्या आहेत. खरे तर ‘टू जी’सारखे महाघोटाळे याच सरकारच्या मागील कार्यकाळातील आहेत. पंतप्रधान तेव्हापासूनच गप्प आहेत. पण त्या वेळी भाजप नेते अडवानी यांनी मनमोहनसिंगांवर केलेला निष्क्रियतेचा आरोप खोडून काढताना कॉंग्रेस पक्ष आणि प्रसारमाध्यमांनीही अडवानी यांना अक्षरशः धारेवर धरत मनमोहनसिंगांच्या स्वच्छ प्रतिमेची भलावण केली होती. आजही तेच मुद्दे जिवंत आहेत. परिस्थिती मात्र पूर्ण बदलली आहे. विरोधी पक्ष, जनता आणि माध्यमे आता सरकारच्या आणि मनमोहनसिंगांच्या विरोधात आहेत. एवढा केवीलवाणा पंतप्रधान देशात आजवर झाला नाही! इथे मूळ मुद्दा आहे तो असंसदीय मार्गांना सक्रीय होण्यास कारण मिळण्याचा. ही कारणे सरकारने खूप मोठ्या संख्येने पुरविली आणि अण्णा या असंतोषाच्या भडक्यासाठी कारणीभूत ठरले. वास्तविक, बाबा रामदेव यांनीही असा भडका उडविण्याचा प्रयत्न केला होता. पण सरकारातील चाणक्यांनी त्यांचे पाय त्यांच्याच गळ्यात यशस्वीपणे अडकविण्यात यश मिळविले. अण्णा त्या सापळ्यात अडकले नाहीत, हे त्यांचे यश.

हे सारे प्रकार होत असताना आपण संसदीय लोकशाही खिळखिळी करीत आहोत, याचे भान ठेवायला हवे. संसदेच्या दोन्ही सभागृहांतील या विधेयकांसंदर्भातील भाषणे कितीही बेगडी वाटली, तरी अंतिमतः हीच संसद सर्वोच्च आहे, हे लक्षात ठेवणे आपल्याच पुढील पिढ्यांसाठी महत्वाचे ठरणार आहे. आज आपल्या लोकशाहीला कोणी कितीही नावे ठेवो, याच लोकशाहीमुळे अण्णा किंवा बाबांना आवाज उठवता आला, लोकांना रस्त्यावर उतरता आले आणि अंतिमतः संसदेलाही हा विषय विशेष बाब म्हणून विचारात घेणे भाग पडले. लोकशाहीचे नियंत्रण नसते तर पी. चिदंबरम यांच्यासारख्या अहंमन्य गृहमंत्र्याला ‘रामलीला मैदाना’चा ‘तियानमेन चौक’ करणे अशक्य नव्हते. नव्हे, रामदेवबाबांच्या आंदोलनात त्यांनी तसा प्रयत्नही केला होता. पण याच लोकशाहीने त्या हजारो निरपराधांना तारले. 
**
मेरे सीनेमे नहीं 
तेरे सीने में सही
हो कहीं भी आग लेकीन 
आग जलनी चाहिये
**
लोकशाहीत ही ‘अकाउंटिबिलिटी’ असते. हा आधार अण्णांच्या आंदोलनाला होता का? अजिबातच नव्हता. सरकारी लोकपाल हा दात पडलेला सिंह आहे, हे मान्य. पण अण्णांचा लोकपाल तोंडाला रक्त लागलेला सिंह असल्याचे लक्षात आल्यानंतर काय? त्याची जबाबदारी कोण घेणार? ‘लोकपाल’ ही दीर्घकालीन निर्णयप्रक्रिया आहे. ‘30 ऑगस्टपर्यंत कायदा झाला पाहिजे’ हा हट्टाग्रह कधीच योग्य नसतो. याला होणारा अमर्याद विलंब जितका धोकादायक तितकीच यातील घाईगर्दीही तेवढीच आत्मघाती असू शकते. कायद्याच्या निर्मितीच्या आग्रहापेक्षाही यामध्ये स्थायी समितीच्या कामकाजाच्या थेट प्रक्षेपणाचा आग्रह जास्त महत्वाचा ठरू शकला असता. सरकार आणि विरोधक हे दोघेही या विषयावर किती गंभीर आहेत, हे यातून स्पष्ट झाले असते. या पारदर्शीपणातून भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई अधिक परिणामकारकपणे समाजापर्यंत पोहचविणे शक्य होऊ शकते.

अण्णा हजारे हे एक भाबडे गृहस्थ आहेत. ‘हे जग सुंदर व्हावे’ असे वाटणे आणि त्या साठी आवश्यक असलेली कौशल्ये अंगी असणे यात महदंतर आहे. देश भाबड्या कल्पनांवर चालत नसतो. तेथे कठोर वास्तव अपेक्षित असते. उपोषणानंतर परतल्यानंतर अण्णांनी एका मुलाखतीदरम्यान ‘भ्रष्टाचार्‍यांना फासावर चढवा’ असे विधान केले होते. दुसर्‍याच दिवशी त्यांनी ते विधान मागे घेतले. त्यांचे हे वागणे राजकीय नेत्यांनाही वरताण होते. मुदलात, अशा गुन्ह्यांना मृत्यूदंड हाच भंपकपणा आहे. आणि मुद्दा मांडायचाच, तर मग त्याला चिकटून राहायला हवे. तिथे अण्णांनी कोलांटउडी मारली. मग राजकीय नेत्यांना आपण कोणत्या तोंडाने नावे ठेवणार? किरण बेदी यांचे कार्यकर्तृत्व नक्कीच प्रेरणादायी आहे पण या आंदोलनात त्यांची भूमिका कशी होती? त्या ज्या पद्धतीने मंचावर वागल्या, ज्या वल्गना त्यांनी केल्या आणि टीकास्त्र सोडले, ते लोकशाहीला धरून होते की लोकशाहीचा गैरवापर करणारे? अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल, त्यांच्या त्यागाबद्दल मनात पूर्णतः आदर ठेवून त्यांच्याबद्दलही मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात. सरकारशी चर्चेदरम्यान त्यांच्या अभिनिवेशाच्या अनेक बातम्या बाहेर आल्या. त्या खर्‍या असतील, तर ती चिंतेची बाब आहे.

या दोन किंवा तीन व्यक्तींना आपण सातत्याने टीव्हीवर पाहिले. याशिवाय टीव्हीवर कधीही न दिसलेले हजारो जण अण्णांच्या आंदोलनाचा भाग होते. त्यांना मी ‘गावगन्ना अण्णा’ असा शब्द वापरेन. अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्याला धार आल्यानंतर गावोगावी ‘भ्रष्टाचार निर्मुलन समित्या’ स्थापन झाल्या. आतापर्यंत जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात अशा समितीचा किमान एक तरी अध्यक्ष खंडणी उकळताना पकडला गेला आहे. ‘पकडले न गेलेले ते साव’ असा नियम लावला, तर ही कीड संपूर्ण राज्यभर पसरलेली दिसते. चळवळीत सहभागी होणार्‍या प्रत्येकावर नियंत्रण अशक्य असते, हे खरे असले तरी किमान प्रमुख पदाधिकार्‍यांची निवड तरी पारखून केली पाहिजे. अण्णांच्या लढ्यादरम्यान गावोगावी मोर्चे निघाले आणि आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार आदींना निवेदने देण्यात आली. ही निवेदने देणारे चेहरे बारकाईने न्याहाळलेत? इथेही ‘नेहेमीच प्रकाशात’ असणारेच चेहरे दिसले. अण्णांना अपेक्षित असलेला सामान्य माणूस ‘जय’च्या घोषणाच देताना दिसला, त्याला ‘नेहेमीच्या यशस्वी’ नेतेमंडळींनी येथेही पिछाडीवरच टाकले. अण्णांचे आंदोलन कुणाच्या हातात जाणार, याची ही चुणुक होती. यात अनेक ठिकाणी  माजी मंत्री, माजी आमदार, नगरसेवक, कामगार पुढारी अशांचा समावेश होता. मी सार्वत्रिक आरोप नक्कीच करणार नाही, पण वृत्तपत्रांमध्ये आलेले ठिकठिकाणचे फोटो आणि बातम्या वाचून त्यातील नावे मला कळाली आणि दुर्दैवाने बहुतांश नावे ‘स्वच्छ’ वर्गातील नव्हती. अण्णांचे आंदोलन अशी माणसे पुढे चालवणार? अशा आंदोलकांवर नियंत्रण कोण आणि कसे ठेवणार? 

चळवळीने सरकारवर स्वार होणे चुकीचे आहे. त्यांनी दबावगट म्हणून काम केले पाहिजे. हा दबाव आणतानाही तारतम्याने भूमिका ठरविली पाहिजे. सरकार ही व्यक्ती नसते. ती यंत्रणा असते. ही अजस्त्र यंत्रणा हलविणे ही सोपी बाब नाही. पण अण्णांनी ती हलविली. सर्वोच्च म्हणविणार्‍या संसदेनेही अनिच्छेने का होईना अण्णांच्या आग्रहासाठी वेळ दिला आणि त्यांच्यासाठी अप्रिय असलेल्या विषयावर चर्चा केली. या विषयावरील कायदाही अशाच चर्चेतून झाला पाहिजे. ‘मी म्हणेन तोच कायदा’ हा आग्रह सरकारकडूनही योग्य नाही आणि अण्णांकडूनही. उलट सरकार कोणते असावे, यामध्ये अण्णांची भूमिका महत्वाची ठरली, तर ते उपयोगाचे ठरेल. अण्णांचा लोकपाल कॉंग्रेसने आधीच धिक्कारला आहे. भाजपाने या विषयावर मारलेल्या कोलांटउड्या फक्त तोच पक्ष मारू शकतो. इतर प्रमुख पक्षांनी आपल्या भूमिका किती प्रमाणात स्पष्टपणे मांडल्या, या वर साशंकता आहे.

अशा स्थितीत अण्णांकडून संयमितपणाची, नेमकेपणाची आणि तटस्थपणाची अपेक्षा आहे. दुर्दैवाने ती पूर्ण होताना दिसत नाही. भ्रष्टाचाराविरुद्धची त्यांची दिशा मध्येच बदलते आणि निवडणूक सुधारणांकडे वळते. कधी ते क्रांतीची भाषा करतात. अहिंसात्मक मार्गाचे तत्व त्यांनी आरंभीपासून पाळलेले आहे ही एक बाब सोडली तर त्यांचा धरसोडपणा सतत चालू राहिला आहे. या धरसोडीतून देशाचे उज्ज्वल भवितव्य त्यांच्या हातून सुटू नये.
**
कैसे कैसे मंझर सामने आने लगे है
लोग गाते गाते चिल्लाने लगे है
बदल डालो इस तालाब का पानी
कमल के फूल मुरझाने लगे हैं।
**

- दत्ता जोशी, औरंगाबाद

(लेखक मुक्त पत्रकार आहेत)
dattajoshis@gmail.com / 9225 30 90 10

(या लेखात उद्धृत केलेल्या सर्व काव्यपंक्ती ज्येष्ठ शायर दुष्यंतकुमार यांच्या आहेत. त्यांनी आणीबाणीच्या काळात लिहिलेल्या या कव्यपंक्ती आजच्या राजकीय स्थितीतही तितक्याच ताज्या वाटतात, हेच त्यांचे थोरपण आहे.)


Sunday, September 25, 2011

जालन्यात प्रवेश करताना

'जालना आयकॉन्स' या माझ्या २५६ पानी पुस्तकाचे प्रकाशन २६ सप्टेंबर २०११ रोजी आहे. या पुस्तकाच्या प्रारंभी मी लिहिलेले प्रास्ताविक येथे देत आहे. या विषयाकडे पाहण्याची दृष्टी यातून स्पष्ट होईल.
.................................................
फेब्रुवारी 2011 चा पहिला आठवडा... साधारण सकाळचीच वेळ... मी माझ्या औरंगाबादच्या ऑफिसमध्ये रुटीन काम करीत होतो, तेवढ्यात मोबाईल खणाणला... जालना येथील विख्यात उद्योजक श्री. सुनील रायठठ्ठा यांचे नाव स्क्रीनवर झळकत होते. त्यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच कौतुकमिश्रित आदर राहिलेला आहे. त्यांच्याशी होणारा संवाद माझ्यासाठी नेहेमीच आनंददायी ठरलेला आहे. याच आनंदी वृत्तीने मी त्यांच्याशी संवाद सुरू केला आणि प्राथमिक वास्तपुस्त झाल्यानंतर त्यांनी एक कल्पना मांडली, तेव्हा मी खूपच आनंदलो. साधारण तीन वर्षांपूर्वी मी ‘झेप’ हे पहिल्या पिढीतील उद्योजकांवर आधारित पुस्तक लिहिलेले होते. त्यामध्ये श्री. रायठठ्ठा यांचाही परिचय मी करून दिलेला होता. शून्यातून उभी राहिलेली अनेक माणसे आपण पाहतो. श्री. रायठठ्ठा यांनी तर आपले कार्य ‘मायनस’मधून उभे केलेले आहे! स्वतःच्या उद्योजकीय घोडदौडीबरोबरच जालन्याच्या भावी पिढीच्या विकासासाठी ते करीत असलेल्या प्रयत्नांविषयी मी ऐकून होतो. याच दृष्टीतून त्यांनी त्यांच्या मनातील ही कल्पना माझ्याशी ‘शेअर’ केली होती. ‘झेप’च्याच धर्तीवर पण फक्त औद्योगिक विश्वापुरतेच मर्यादित न राहता सर्व क्षेत्रांमध्ये जालन्याची ओळख असलेल्या व्यक्तींचा परिचय नव्या पिढीला करून देणारे एक पुस्तक प्रकाशित करावे, असा त्यांचा मनोदय होता आणि या पुस्तकाच्या लेखनाची जबाबदारी मी उचलावी, अशी त्यांची मनःपूर्वक इच्छा होती. मी अंतर्बाह्य थरारलो. त्यांनी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी माझी निवड केली होती हा जसा माझ्यासाठी सन्मानाचा आणि भाग्याचा भाग होता तसाच अशाप्रकारचे चाकोरीबाहेरचे काम हा माझ्या आवडीचा विषय होता. मी तातडीने त्यांना होकार दिला आणि दुसर्‍याच दिवशी सकाळी जालन्यानजीकच्या दावलवाडी येथील त्यांच्या प्रसन्न कार्यालयात प्राथमिक चर्चेसाठी दाखल झालो.

जालन्यातील भाग्यलक्ष्मी स्टीलचे श्री. सुनील गोयल आणि विख्यात सीए श्री. कुमार देशपांडे थोड्याच वेळात या चर्चेत सहभागी झाले. साधारण 20 व्यक्तींचा परिचय करून देणारे हे पुस्तक प्रकाशित करायचे आणि त्यासाठी तातडीने कामाला प्रारंभ करायचा असे ठरवून ही पहिली बैठक संपली. पुढील साधारण 15 दिवसांत त्यांनी नावांची अंतिम यादी तयार केली तेव्हा ही संख्या साधारण 30 पर्यंत पोहोचेल, असे लक्षात आले. पहिली पाच नावे निवडून मुलाखती घेण्यास सुरवात करायची असे ठरले आणि 28 फेब्रुवारी 2011 रोजी मी जालन्यात दाखल झालो. ज्यांचा परिचय करून द्यावयाचा, अशा व्यक्तींच्या नावांची यादी तयार होती आणि त्यातील जवळजवळ प्रत्येक जण माझ्यासाठी अनोळखी होता. काही मोजकी दोन-तीन नावे थोड्याबहुत परिचयाची होती, इतकेच!

तयार करण्यात आलेल्या यादीतील नावांपैकी पहिली भेट ठरली होती श्री. परेश रुणवाल यांच्याशी. जालन्यात त्यांचा शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय आहे, एवढीच प्राथमिक माहिती मला मिळालेली होती. जुना मोंढा भागातील एका अत्यंत अनाकर्षक इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पाठीमागच्या भागात थाटलेल्या एका हॉलमध्ये आम्ही पोहोचलो तेव्हा तेथे शेअर ट्रेडिंगचे काही काम चालत असावे, असे वाटणार्‍या काही खाणाखुणा दिसल्या. जेमतेम पस्तिशीत असलेल्या श्री. रुणवाल यांच्याशी चर्चा सुरू झाली आणि साधारण अडीच तासांच्या अवधीच्या चर्चेनंतर लक्षात आले, की मी साधारणतः वार्षिक आठ हजार कोटींची उलाढाल करणार्‍या तरुणाशी चर्चा केली आहे! माझ्यासाठी हा आपादमस्तक शहारण्याचा क्षण होता. (औरंगाबादच्या तुलनेत) जालन्यासारख्या छोट्या शहरात शेअर मार्केट हा विषय कितीसा मोठा असेल, अगदी हे शहर मोठी व्यापारपेठ असतानाही हे काम किती मोठे असू शकेल, याचा पुसटसाही अंदाज मी बांधू शकलो नव्हतो. हा माझा पराभव होता पण तो आनंददायी होता. बहुदा शेअर आणि वायदेबाजाराच्या क्षेत्रात एकाच छताखाली सर्व सेवा मिळणारे आपल्या राज्यातील मुंबईखालोखाल हे एकमेव केंद्र असावे...!

या खणखणीत सलामीनंतर मी सावध झालो. हे काम करण्याचे ठरवताना झालेल्या आनंदाला आता एका जबाबदारीची जाणीव प्रकर्षाने होत होती. ‘जालन्यासारख्या शहरात काय असणार?’ अशा मनःस्थितीत सुरू केलेले काम ‘जालन्यासारख्या भागात आणखी काय काय पाहायला मिळणार बरे?’ या उत्सुकतेपर्यंत पोहोचले. यानंतर पुढील महिनाभरात एक - एक करीत मुलाखती पुढे सरकत गेल्या. प्रारंभी 20 जणांचा समावेश 30 पर्यंत पोहोचला होता पण जालन्याच्या विकासात लक्षणीय योगदान देणार्‍यांची नवनवी नावे समोर येतच होती. तेव्हा 40 नावांवर थांबायचे असे सर्वांनी मिळून ठरविले. ही सर्व नावे विविध प्रकारच्या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींची होती. यातील काही उद्योजक आहेत तर काही व्यावसायिक, काही सामाजिक क्षेत्रांत काम करणारे आहेत, तर काही शैक्षणिक... यातील एक बाब एकसमान आहे - त्या त्या क्षेत्रात काम करण्याची त्यांची ‘पॅशन’.

‘जालना- सोनेका पालना’ ही म्हण खूप वर्षांपासून कानावर येते आहे, पण हा ‘सोने का पालना’ कसा ठरला? या परिसराच्या माती-पाण्यात आणि माणसांच्या रक्तात कोणते गुण आहेत, याचाही शोध घेण्याचा प्रयत्न या निमित्ताने मी केला. ही प्रातिनिधिक नावे निवडताना निवड समितीने ही निवड अतिशय काळजीपूर्वक केलेली होती, याचे प्रत्यंतर पावलापावलावर येत होते. एकेकाळी असलेली जालना शहराची ‘व्यापार्‍यांचे शहर’ ही ओळख बदलणारी नवी पिढी या निमित्ताने जवळून पाहता आली तसेच विविध क्षेत्रांमध्ये अतिशय महत्वाचे योगदान देणार्‍या जुन्या पिढीतील खंबीर माणसांचा परिचयही या निमित्ताने झाला. अत्यंत प्रतिकूल स्थितीत शिक्षण घेत 1950 मध्ये हैदराबादेत इंजिनइरिंगसाठी गेलेले आणि 20 वर्षांच्या नोकरीनंतर वयाच्या पन्नाशीत ‘कॅबसन’ हा स्वतंत्र उद्योग सुरू करणारे श्री. जी. के. काबरा आणि पुण्यातील ‘बजाज टेम्पो’च्या जवळजवळ प्रत्येक वाहनाच्या डिझाईनमध्ये महत्वाची भूमिका असणारे श्री. विनयकुमार मुंदडा ही दोन्ही व्यक्तिमत्वे साठीच्या पुढची आहेत. तिसरे, साठीत पोहोचलेले व्यक्तिमत्व आहे रमेशभाई पटेल यांचे. 1975च्या सुमारास सुटा चहा विकण्यासाठी जालन्यात आलेल्या रमेशभाईंनी आपल्या प्रचंड मेहनतीने ‘विक्रम चहा’चे साम्राज्य जालन्यात उभारले. या वयातही या तिघांचाही उत्साह तरुणांना सुद्धा लाजविणारा आहे. ‘स्टील इंडस्ट्री’ उभी करणे, त्यात अभिनव प्रयोग करणे ही खासीयत असलेले श्री. नितीन काबरा आणि केवळ पैसा कमावण्यासाठी नव्हे, तर समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून उद्योगाचा विस्तार करणारा त्यांचा ‘भाग्यलक्ष्मी स्टील’ हा ग्रुप आजच्या जगात स्वतःची वेगळी ओळख सिद्ध करणारा आहे. ‘स्टील सिटी’ जालन्यात कारखाने तर अनेक आहेत पण प्रचंड आर्थिक उलाढाल असलेल्या अशा उद्योगात पार्टनरशिप यशस्वी होण्याची किमया ‘राजुरी स्टील’ने घडविली. या ‘किमयागारां’मध्ये ‘फर्स्ट अमंग इक्वल’ असलेले श्री. द्वारकाप्रसाद सोनी यांची वाटचालही प्रेरणादायी आहे.

बालवयातच चांगले संस्कार करण्यासाठी मागील दोन दशकांपासून नर्सरी चालविणार्‍या सौ. विशाखा देशपांडे आणि ‘इंटरनॅशनल स्कूल’च्या स्पर्धेत उतरून जालन्यात एक उत्तम शाळा उभी करणार्‍या सौ. मनीषा पुरी यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान जेवढे महत्वाचे आहे, तितकाच महत्वाचा भाग श्री. संजय टिकारिया यांच्या ‘लॅब असिस्टंट’च्या माध्यमातून सीटीएमके गुजराती विद्यालयात ते बजावत असलेल्या कामगिरीचा आहे. अनेक राज्य पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या श्री. टिकारिया यांनी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानवृत्ती जागविण्यासाठी घेतलेली मेहनत आणि त्यांची प्रयोगशीलता एखाद्या शास्त्रज्ञालाही अचंबित करणारी आहे. सांस्कृतिक क्षेत्रात नृत्य-गायनाचे योगदान देणार्‍या सौ. विद्या राव जालन्यात एखाद्या ‘ओऍसिस’प्रमाणे कार्यरत आहेत. सौ. रेखा बैजल हे साहित्य क्षेत्रात तळपणारे नावही जालन्यातीलच. एक लेखिका म्हणून विकसित झालेले त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या साहित्यकृतींच्या निर्मितीमागील प्रेरणा अभ्यासणे हा ही आनंदाचा भाग असतो. स्त्री शक्तीतील जिद्दीचे  जालन्यातील उत्तम उदाहरण म्हणजे ‘जैन बंधू पावभाजी’च्या सौ. बसंती चोरडिया - उने. आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या पावभाजीच्या गाड्याचे रूपांतर त्यांनी आज एका प्रशस्त फास्ट फुड सेंटरमध्ये केले आहे. ‘रुची प्रॉडक्टस्‌’च्या माध्यमातून जालनेकरांच्या जिभेचे चोचले पुरविणार्‍या प्रिया जोशी यांचा उद्योगही हळूहळू विस्तारत आहे. ‘सील्स’च्या उद्योगात कार्यरत असलेल्या सौ. मीनाक्षी मेहुणकर यांनी आपल्या पतीच्या मदतीने घेतलेली व्यवसायातील झेपही अतुलनीय आहे. एकेकाळी दाल मिलला लागणारी यंत्रे दुरुस्त करणार्‍या श्री. नरोत्तम हंसोरा यांनी मोठ्या हिमतीने अशा प्रकारच्या मिल उभ्या करण्यासाठी लागणारी यंत्रणा तयार करण्याचा कारखाना सुरू केला आणि काळानुरूप त्यात बदल करीत दाल मिलच्या व्याप्तीमध्ये अनेक बदल केले. त्यांचे व त्यांना मदत करणार्‍या त्यांच्या दोन्ही मुलांचे उदाहरण सर्वच दृष्टीने अनुकरणीय आहे.
शालेय शिक्षणात अजिबात गती नसणार्‍या आणि एकेकाळी ‘एसटीडी-पीसीओ’वर नोकरी करणार्‍या श्री. नारायण सोनुने यांनी आपल्या असामान्य जिद्द, चिकाटी व प्रयोगशीलतेच्या बळावर स्टेशनरीच्या बाजारपेठेत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी तयार केलेल्या फाईल्स आज जालना जिल्ह्याच्या बाहेरही जात आहेत. सतत काठावर पास होणार्‍या किंवा नापास होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी स्वतःचे विश्व निर्माण करणारे हे एक उत्तम उदाहरण आहे. एकेकाळी खरपुडीच्या कृषि विज्ञान केंद्रात सालदार म्हणून काम करणार्‍या सौ. सीताबाई मोहिते आज या केंद्राच्या सल्लागार संचालिका आहेत. त्यांनी आपल्या व्यावसायिक कुशाग्रतेच्या बळावर आवळ्यासह विविध फळांवर प्रक्रियांचा उद्योग सुरू केला. विविध पुरस्कार मिळवीत परदेशात जाऊनही आपली छाप पाडली. विशेष म्हणजे त्या अशिक्षित आहेत...! केळीच्या चिप्स तयार करणारे डोंगरगावचे श्री. ईश्वरदास घनगाव यांचे उदाहरणही ग्रामीण भागात राहून वेगळ्या वाटा चोखाळणार्‍यांसाठी मागदर्शक आहे. मंठासारख्या ग्रामीण भागातून पुढे आलेले आणि आज पुण्यात स्वतःची ‘आयटी कंपनी’ चालविणारे जेमतेम 25 वर्षीय राहुल बन्सल हे इंजिनइरिंगनंतर परदेशात जाऊन पैसा कमावण्याऐवजी देशातच राहून स्वतःच्या मेहनतीने काम उभे करण्यातील एक महत्वाचे उदाहरण आहे. वेब डिझायनिंगच्या क्षेत्रात आज त्यांची स्वतःची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध झालेली आहे.

मुंबईच्या ‘यूडीसीटी’तून केमिकल इंजिनइर झालेले आणि याच विषयात काही अलौकिक काम उभे करणारे श्री. आशीष मंत्री यांच्याबद्दल काय बोलणार? रसायनांच्या जगात विरघळून गेलेले हे एक अजब रसायन आहे. अतिशय कमी वयात अनिश्चित आर्थिक चढ-उतार पाहिलेल्या या माणसाने अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाने युक्त, पशुखाद्यासाठी वापरले जाणारे अतिशय उच्च दर्जाचे प्रोटिन निर्माण करणारा ‘रिस्की’ उद्योग जालन्यात उभारला. अशा प्रकारचा यशस्वीपणे कार्यरत असलेला हा भारतातील पहिलाच उद्योग आहे आणि याची दोन पेटंट या उद्योगाच्या नावावर आहेत, यातच सगळे आले...!

जालन्यात सुसज्ज रक्तपेढी उभी करण्याच्या ध्यासाने झपाटलेले पूसाराम मुंदडा, पुण्या-मुंबईची ‘सुपर मार्केट’ची संकल्पना जालन्यात राबविणारे मो. युसूफ हाजी अहमदभाई व त्यांचा संपूर्ण ‘परिवार’, पेटीकोटसारख्या व्यवसायात उतरून नवी बाजारपेठ निर्माण करतानाच निराधार महिलांना काम देऊन त्यांच्या संसाराला आधार देणारे रामेश्वर व ज्ञानेश्वर संदूपटला बंधू, ‘लॅपटॉप क्लिनिक’ या संकल्पनेचे जाळे सार्‍या महाराष्ट्रभर विणण्यास निघालेले मनीष राठी, कोरुगेटेड बॉक्स आणि ‘एसी’ उपकरणांमध्ये लागणारे तांब्याचे सुटे भाग तयार करणारे जितेंद्र राठी यांच्याबरोबरच एका लोडिंग रिक्षापासून सुरू झालेला व्यवसाय दहा चाकी ट्रकच्या खरेदीपर्यंत नेणारे हिकमती श्री. संजय केदार यांची कहाणीही मुळातूनच वाचण्यासारखी आहे.

ही आणि अशी एकंदर 42 व्यक्तिमत्वे आपणास या पुस्तकात वाचण्यास मिळतील. 40 जणांविषयीच या पुस्तकात लिहिण्याचे ठरल्यानंतर शेवटच्या क्षणी 2 नवी नावे नाव यामध्ये समाविष्ट करणे भाग पडले. हा अपवाद आवश्यक होता, कारण एका वेगळ्याच विश्वात रमलेल्या श्री. राहुल लाहोटी यांचे नाव समोर आले आणि योगायोगाने ते याच काळात सुटीवर जालन्यात आले होते. ‘बिट्‌स, पिलानी’ येथून कॉम्प्युटर इंजिनइर झालेल्या श्री. राहुल यांनी आपली मायक्रोसॉफ्टमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून ‘पब्लिक पॉलिसी’ या विषयात उच्च शिक्षण घेतले आणि सध्या ते ‘पॉलिसी मेकिंंग’च्या क्षेत्रात रिसर्चर म्हणून बेंगलोरच्या ‘आयआयएम’मध्ये कार्यरत आहेत. आपल्या ‘पॅशन’ला ‘प्रोफेशन’मध्ये बदलण्याचे त्यांचे धाडस नव्या पिढीसाठी अतिशय अनुकरणीय आहे. दुसरे नाव होते मनोज पटवारी यांचे. मूकबधिर असून त्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात केलेले काम आणि मूकबधिरांसाठी ते घेत असलेले कष्ट हे असे व्यंग असणार्‍यांसाठी प्रेरक ठरतील.

‘बजाज’चे प्लांट इंचार्ज श्री. कैलास झांझरी, विख्यात सर्जन डॉ. संजय राख, होमिओपथी तज्ज्ञ डॉ. सतीश मोरे, ‘गणपती छाप मेहंदी’चे श्री. सूरजमल मुथा, डॉ. हेडगेवार हॉस्पिटलच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावणारे डॉ. अनंत पंढरे, ‘स्पर्म प्रोसेसर’ या आपल्या अभिनव क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरी बजावणारे डॉ. प्रमोद बजाज, खरपुडीच्या कृषिविज्ञान केंद्राद्वारे शेतकर्‍यांच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावणारे श्री. विजयअण्णा बोराडे, इंडस्ट्रियल सप्लायमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बजावणारे श्री. दिनेश छाजेड, जालन्यात इन्व्हर्टर - यूपीएस तयार करणारे श्री. विजयकुमार अग्रवाल, साधे डिप्लोमा इंजिनइर असूनही उत्तम कामगिरीच्या आधारावर बहुराष्ट्रीय कंपनीत झेप घेणारे श्री. कैलाश मालोदे, अतिशय छोट्या पातळीवर केटरिंगचा व्यवसाय सुरू करून आज आपले स्वतःचे स्थान निर्माण करणार्‍या सौ. कल्पना शाह, आपल्या विक्रमी रांगोळीद्वारे गिनिज बुकात नाव नोंदविणारे श्री. रवी कोंका, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ‘बर्फ गोळ्या’ने जालनेकरांना थंडावा देणारे श्री. मोहन खोडवे... ही या पुस्तकातील नावे अशीच उल्लेखनीय आहेत. ही प्रत्येक कथा आपणास नक्कीच काहीतरी विचार देऊन जाईल, हे निश्चित.

आणि  सर्वात महत्वाचे नाव - बद्रीनारायणजी बारवाले. जालना म्हटले की जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात ‘महिको’ची ओळख सांगितली जाते आणि ‘महिको’ म्हटले की बद्रीनारायणजी समोर येतात. रूढ अर्थाने साधे पदवीधरही नसलेल्या बद्रीनारायणजींनी आपली हिंमत, मेहनत आणि दूरदृष्टीच्या जोरावर उभारलेले बियाण्यांचे साम्राज्य वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहेच, पण त्याच बरोबर आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून त्यांनी उभ्या केलेल्या संस्था त्यांचे मोठेपण सांगून जातात. त्यांची ओळख सांगायला या पुस्तकाची सगळी पानेही कमी पडावीत...!

असा माझा हा जालना जिल्ह्याचा प्रवास! एखादी टेकडी चढून जाण्याचं ठरवावं आणि चढायला लागल्यानंतर लक्षात यावं, की तो पर्वत आहे, असं काहीसं माझं झालं. पण पर्वताची अवघड चढण चढताना वाटेत फुलांचे छानसे ताटवे लागावेत, मध्येच सुंदर जलाशय असावेत, पुढे जाणार्‍या पायवाटांच्या दोन्ही बाजूंनी ताजीतवानी फुले डोकावत असावीत आणि चढण्याचे कष्ट वाटूच नयेत, असाच काहीसा हा अनुभव होता. प्रसन्न आणि अनुभवसंपन्न करणारा...!

हा अनुभव मला आणि हे पुस्तक वाचणार्‍या सर्वांनाच ज्यांच्यामुळे घेता आला, त्या श्री. सुनील रायठठ्ठा यांच्याबद्दल चार शब्द सांगितले नाहीत, तर मी अपराधी ठरेन. हे पुस्तक प्रत्यक्षात येण्यासाठी श्री. रायठठ्ठा यांनी घेतलेले परिश्रम अतुलनीय आहेत. ते स्वतःही एक यशस्वी उद्योजक आहेत. आज 40 हून अधिक देशांमध्ये त्यांची उत्पादने निर्यात होतात. मात्र आजचे हे यश सहजपणे आलेले नाही. श्री. रायठठ्ठा यांच्या घोडदौडीची कहाणी खूपच वेगळी आहे. ही कहाणी आहे एका जिद्दीची, शून्यातून विश्व निर्माण करणार्‍या फिनिक्स पक्ष्याची. 1977 मध्ये औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी आरंभीच्या काळात ‘एल ऍँड टी’मध्ये नोकरी केली. 1981 मध्ये त्यांनी नोकरी सोडून स्वतःच्या व्यवसायास सुरवात केली. आज त्यांनी आपल्या व्यवसायातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. छोट्या देशांपासून सुरवात करून आपल्या निर्यातीचेे क्षेत्र त्यांनी आता फ्रान्ससारख्या देशापर्यंत विस्तारले आहे. आपल्या माणसांवर विश्वास कसा आणि किती टाकावा, हे रायठठ्ठा यांच्याकडूनच शिकावे ! परदेशातील बाजारपेठ मिळवताना आणि वाढवताना ते स्वतः जेवढ्या वेळा परदेशात गेले नसतील, त्याहून अधिक वेळा त्यांच्याकडील कामगार परदेशी जाऊन आलेला आहे ! उद्योगाच्या क्षेत्रात ही नवी संकल्पना रुजविताना त्यांनी माणसं उभी केली, जोडली आणि सर्वांना घेऊन ते पुढे जात आहेत...!

श्री. रायठठ्ठा यांच्या ‘विनोदराय इंजिनइरिंग प्रा. लि.’मध्ये पाण्याच्या टाक्यांच्या उत्पादकांना लागणारी यंत्रे तयार होतात. बाजारपेठेत शे-दोनशे लिटर्सपासून पाण्याच्या टाक्या उपलब्ध आहेत. या टाक्या बनविण्याचे तंत्रज्ञान आणि यंत्रे श्री. रायठठ्ठा तयार करतात. या व्यवसायाला त्यांनी साधारणपणे सन 1991 मध्ये सुरवात केली. सन 2000 मध्ये दिल्लीत ‘प्लास्ट इंडिया’ नावाच्या औद्योगिक प्रदर्शनात त्यांनी भाग घेतला आणि तेथून सारे चित्र पालटले. त्याच प्रदर्शनातून त्यांना निर्यातीची पहिली ऑर्डर मिळाली. श्री. रायठठ्ठा सांगतात, ‘‘या प्रदर्शनात आम्ही सर्वात लहान स्टॉल बुक केला होता. स्टॉलचे पैसेही हप्त्याहप्त्याने भरले. यंत्रे घेऊन जाण्याइतका पैसा नव्हता, म्हणून त्याचे फोटो आणि माहितीचे तक्ते आम्ही सोबत नेले होते. मशिन्सची डायमेन्शन्स काय, याचे उत्तर देण्याइतकीही आमची तयारी नव्हती. तेथे आम्ही जागतिक बाजारपेठेचे चित्र पाहिले. आमच्यातील त्रुटी आमच्या लक्षात आल्या. तेथूनच आमच्या प्रगतीला वेग आला.’’ सध्या ते सौदी अरेबिया, कुवेत, टांझानिया, मलेशिया, हैती, नायजेरिया, फिजी, लिबिया, येमेन, मलेशिया, ट्युनिशिया, सुदान, मादागास्कर, झांबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती आदी देशांना यंत्रे निर्यात करतात. त्यांच्या उत्पादनांचा दर्जा पाहून नुकतीच त्यांच्याकडे फ्रान्समधूनही ऑर्डर आली. निर्यातीबाबत असलेल्या अनेक शंकांचे ते समाधान करतात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो भाषेच्या अडथळ्याचा. पण हा मुद्दा गैर आहे, असे सांगताना ते म्हणतात - आपले प्रॉडक्ट दर्जेदार असेल आणि किंमत वाजवी असेल, तर तेथे व्यवहार जुळण्यासाठी भाषेचा अडथळा अजिबात येत नाही. तिथं अर्थकारण महत्त्वाचं असतं, कारण फायद्याची भाषा प्रत्येकाला समजते !

मागील दोन वर्षांपासून त्यांनी जालन्यात ‘यंग इनोव्हेटर्स’ ही चळवळ उभारली आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या सहकार्याने ते विद्यार्थ्यांतील अभिनव कल्पनांना खतपाणी घालण्याचे व त्या फुलविण्याचे काम करतात. यंत्रमानव निर्मितीची कार्यशाळा, फोटोग्राफी कार्यशाळा यांच्यासह अनेक उपक्रम ते जालन्यात राबवितात. स्वतः दीड-दोन लाख रुपयांचा खर्च करून त्यांनी खास विद्यार्थ्यांसाठी जालन्यात एक संपन्न ग्रंथालय उभारले आहे. जालन्यातील पुढची पिढी अधिक सक्षम आणि परिपूर्ण होण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न सुरू आहे. हे पुस्तकही या प्रयत्नांचाच एक भाग आहे.

आज कॉर्पोरेट जगतात ‘सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज’ हा स्वतंत्र विभाग कार्यरत असतो. या द्वारे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी काही निधी राखून ठेवलेला असतो. अनेकदा यातून फक्त देखावे उभारले जात असल्याची टीका होत असते. मात्र, अशा प्रकारचे कसलेही बंधन नसताना श्री. रायठठ्ठा यांनी जालन्याच्या भावी पिढीसाठी उभारलेला ‘यंग इनोव्हेटर्स’ हा महायज्ञ आणि त्यातील या पुस्तकाच्या रूपाची समिधा सर्वांसाठीच अनुकरणीय ठरावी.

एक बाब येथे आवर्जून स्पष्ट करावीशी वाटते, की हे 42 जण म्हणजे जालना जिल्ह्याचा परिपूर्ण परिचय नव्हे. ही नावे केवळ प्रातिनिधिक अशी आहेत. यात समाविष्ट करता न आलेली अनेक नावे अत्यंत जड अंतःकरणाने आम्हाला बाजूला ठेवावी लागली. यामागे पुस्तकाच्या पानांची मर्यादा, एवढे एकच कारण आहे. कदाचित, या पुस्तकाचा दुसरा भाग भविष्यात प्रकाशित करावयाचे ठरल्यास ही नावेही त्यात समाविष्ट करणे शक्य होईल.
हेच पुस्तक इंग्रजीतूनही प्रकाशित व्हावे असा आग्रह श्री. आशीष मंत्री यांनी धरला. प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारलेल्या श्री. रायठठ्ठा यांनीही त्यावर लक्ष केंद्रित केले. लवकरच हे पुस्तक इंग्रजीतूनही प्रकाशित होईल. या 42 व्यक्तींच्या प्रत्यक्ष भेटींसाठी मी जालना, हैदराबाद, पुणे इथे प्रवास केला. हैदराबादेतील भेटीसाठी श्री. सत्यनारायण सोनी यांची मदत झाली. अतिशय उमद्या मनाच्या या गृहस्थांनी आपल्या व्यवसायात अनेक प्रयोग केले आहेत. त्यांची भेट हाही आनंददायी अनुभव होता. जालना आणि पुण्याच्या भेटीगाठींमध्ये ‘विनोदराय’मधील श्री. श्रीकांत देशपांडे यांनी केलेले सहकार्य आभाराच्याही पलीकडचे आहे. पहिल्या दिवशीच्या पहिल्या भेटीपासून अगदी अखेरच्या भेटीपर्यंत प्रत्येक ठिकाणी ते माझ्यासोबत होते. सर्व व्यक्तींशी सुसंवाद प्रस्थापित करणे, त्यांच्यातील समन्वय, बहुतेक वेळा तेथील फोटोग्राफी आणि अनेकदा ड्रायव्हिंगमध्येही ते माझे वाटेकरी झाले. त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे माझा भार खूपच हलका झाला. त्यांचे आभार मानणे हा निव्वळ देखावा ठरेल. आणखी एक नाव घेतल्याशिवाय हे लेखन अपूर्ण राहील. श्री. सुनील गोयल यांनी अगदी पहिल्या बैठकीत या लेखनाविषयी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. या लेखनादरम्यान त्या मार्गदर्शक ठरल्या. अनेक लेखांमध्ये त्यांनी केलेल्या सूचनांमुळे हे लेख अधिक परिपूर्ण होण्यास मदत झाली. आभाराचे हे प्रदर्शन कदाचित त्यांना आवडणार नाही! आणि सर्वात महत्वाचे... श्री. सुनील रायठठ्ठा. आपली सामाजिक जाणीव प्रत्यक्ष कृतीतून ते व्यक्त करतात. त्यांच्या संकल्पना आणि पुढाकारामुळेच हे पुस्तक आज आपल्या हाती आहे. त्यांच्या कायम ऋणातच राहणे मला आवडेल.

जालन्याच्या प्रेरणादायी विश्वात आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत!

- दत्ता जोशी

Saturday, September 17, 2011

एका ‘जिंदादिला’च्या ‘एक्झिट’चे एक वर्ष...

उदय दंताळे यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने त्यांच्या मित्रपरिवाराने औरंगाबादेत आजपासून तीन दिवस विविध कार्यक्रम आयोजित करून त्यांना आगळी श्रद्धांजली वाहण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. काही माणसं आपल्या आठवणी चिरंतन काळासाठी सोडून अकालीच परलोकी जातात. दंताळे त्यापैकीच एक. त्यांचे मित्र दत्ता जोशी यांनी या निमित्ताने त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा...
....................................................
दैनिक सामनाच्या औरंगाबाद आवृत्तीमध्ये दि. १७ -९ - २०११ रोजी प्रकाशित झालेला लेख.
....................................................

‘त्या’ पहाटे मनोज टिकारिया यांचा आलेला ‘एसएमएस’ मन घायाळ करून गेला. अर्थ कळूनही तो मेसेज मी तीन वेळा वाचला. या आशेने, की आधी कळलेला अर्थ चुकीचा असेल...! पण ते होणार नव्हते. एक जिंदादिल माणूस या जगातून निघून गेला होता. मृत्यूही असा, की काळजाचा थरकाप व्हावा. अशा वेळी जगन्नियंत्याचा राग येतो. सर्वांच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे असणारा हा माणूस एक्झिट घेताना सर्वांच्याच असंख्य पावले पुढे निघून गेला. खरे तर या गोष्टी आपल्या हातात नसतात, एक अदृष्य शक्ती हे सारे घडवत असते. आपण त्या शक्तीला निमूटपणे शरण जायचे असते, हेच खरे.

उदय दंताळे यांची आणि माझी पहिली भेट कुठे, केव्हा, कधी झाली हे खरेच मला आठवत नाही. बुद्धीला खूप ताण देऊन पाहतोय, मागच्या वर्षभरात असंख्य वेळा स्मृतीच्या नोंदी असंख्य वेळा चाळून झाल्या. पण पहिल्या भेटीचा क्षण काही हाती लागत नाही. कदाचित ती ओळख औपचारिकपणे झाली नसावी. तसे, उदय कधीच औपचारिक नव्हते. आपल्याच धुंदीत मग्न होऊन रस्त्याने चालत निघावे आणि जाता जाता समानशील सुहृदांची पावले परस्परांशी जुळावीत, हात हाती गुंफले जावेत आणि त्याला कोणत्याही पूर्वपरिचयाची अट नसावी, इतके हे सारे अकृत्रिम... निरागस! अशाच कुठल्यातरी वळणावर हात गुंफले गेले, इतकीच स्मृती. मग इतर आठवणी आहेत त्या विविध कार्यक्रमांतून असलेल्या त्यांच्या विद्युत्‌गती वावराच्या. चेहर्‍यावरील हास्य मावळू न देता सगळ्या अडचणी सहज सोडविणारे दंताळे मनात खोलवर उतरत गेले.

काही आठवणी मात्र मनात नक्कीच घर करून आहेत. त्यांच्याशी झालेली पहिली ‘व्यवस्थित’ भेट मात्र पक्की आठवते. तेव्हा मी नोकरी करीत असलेल्या वृत्तपत्रात ‘झेप’ नावाचा स्तंभ लिहीत असे. पहिल्या पिढीतील उद्योजकांचा, त्यांच्या वाटचालीचा आणि संघर्षाचा परिचय तरुणांना करून देणार्‍या या स्तंभातून त्यांचा परिचय करून देण्यासाठी 2003 मध्ये केव्हा तरी ही भेट झाली. त्यांच्या घरात पहिल्या मजल्यावरील स्टुडिओत झालेल्या या तीन-साडेतीन तासांच्या गप्पांमध्ये उदय दंताळे हे ‘रसायन’ मला व्यवस्थित समजून घेता आलं. 1982 मध्ये मुंबईत जाऊन टीव्ही रिपेअरिंगचा कोर्स करून आलेल्या उदय यांनी त्यानंतर 10 वर्षे हेच काम केले आणि 1994 दरम्यान ‘साईड बिझनेस’ म्हणून सुरू केलेल्या ‘साउंड सिस्टिम’च्या व्यवसायात ते असे गुरफटत गेले की आधीचा व्यवसाय त्यांना बंदच करावा लागला. साधारण सन 2000 मध्ये त्यांनी ‘स्टुडिओ’ सुरू केला. मराठवाड्यातील हा पहिला अद्ययावत स्टुडिओ. पुढे काळाप्रमाणे बदलत आपल्या व्यवसायात त्यांनी असंख्य बदल केले. नव्या तंत्रज्ञानाचा सहज स्वीकार केला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे असंख्य माणसे जोडली! 

माझ्या व्यवसायिक वाटचालीत त्यांच्याशी अनेकदा संपर्क येत असे. मी केलेल्या ‘आर्य चाणक्य विद्याधाम’ या विद्यालयाच्या ‘टीव्ही जाहिराती’च्या जिंगलचे रेकॉर्डिंग त्यांच्याच स्टुडिओत झाले. मी लिहिलेल्या शब्दांना मनोज टिकारिया यांनी सुरांमध्ये गुंफले आणि त्याच विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या आवाजात ही जिंगल रेकॉर्ड झाली. 30 सेकंदांच्या जिंगलसाठी जवळजवळ अर्धा दिवस मेहनत झाली. शेवटच्या एका गद्य ‘पंचलाईन’साठी त्यांनी स्वतःचा आवाज दिला. इतर सर्व व्यवहार पूर्ण करून मी उदय यांना त्यांचे मानधन विचारले, तेव्हा त्यांच्या खास शैलीत मिश्किल हसत, हात हवेत फेकत ते उत्तरले, ‘‘सगळी आपलीच माणसं आहेत. शाळा आपलीच आहे. काम तुम्ही करताय. आपल्याच माणसांकडून काय घ्यायचे?’’ आणि खरेच, त्यांनी एकही पैसा घेतला नाही. मात्र त्यानंतर त्यांच्याकडे कामाचा प्रसंग पडला, तेव्हा आधी त्यांचे मानधन कबुल करून घेतले, ते नक्की स्वीकारणार याची खात्री करून घेतली आणि मगच काम सुरू केले...! अशा माणसाशी असेच वागायला पाहिजे, नाही का? 

माझ्या एका कार्यक्रमात ऐनवेळी काही समस्या उद्भवली आणि मी व्यक्तीशः इतर नियोजनात गुंतलो, तेव्हा पुण्याहून आलेल्या वाद्यवृंदाचा आणि राज्यातील विविध भागांतून आलेल्या गायकांचा समन्वय साधण्यासाठी उदय यांंनी या सर्वांना स्वतःच्या घरी नेले. सराव करून घेतला. सर्वाच्या नाश्तापाण्याची व्यवस्थाही केली आणि आपण काहीच विशेष केले नाही, अशा अविर्भावात सर्वांना कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊनही आले! 
आठवणी किती सांगायच्या? हा माणूस कधी दुर्मुखलेला दिसला नाही. इतरांना दूषणे देत स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या भानगडीत पडला नाही. एखादे आयोजन सोपवले की तिकडे पुन्हा पाहायची गरज नाही, असा विश्र्वास त्यांनी निर्माण केला होता. रुढ अर्थाने आम्ही ‘दोस्त’ नव्हतो. आम्ही कधी मिळून जेवायला गेल्याचे मला आठवत नाही की दोघांपैकी कोणीही दुसर्‍याला प्रचंड बिझनेस दिला, असेही झाले नाही. तरीही परस्परआदराचा स्नेहभाव आमच्या ठायी राहिला. 

मृत्यू हे अटळ सत्य आहे, हे उमगल्यानंतर मन सुख-दुःखाच्या पलिकडे जाते. मागील अनेक वर्षे अनेकांना अखेरचा निरोप दिला पण डोळ्यात पाणी तरळावे असा प्रसंग अलिकडच्या काळात फक्त मागच्याच वर्षी आला. ही आंतरिक ओढ होती का? मी अंधश्रद्ध नाही, पण एप्रिलमध्ये रामनवमीला मी आयोजलेल्या ‘गीत रामायण’ या कार्यक्रमाच्या आधीच्या रात्री उदय यांनी स्वप्नात येऊन या कार्यक्रमाच्या तयारीची आस्थेवाईकपणे चौकशी केली, हे आठवून मी आजही थरारतो. हे कोणते नाते म्हणायचे? या नात्याला मी नाव देऊ शकत नाही. 

सरतेशेवटी एक इच्छा मात्र मनात आहे. मृत्यूनंतरचे जग अस्तित्वात असेल तर उदय तेथे नक्की असतील. मी जेव्हा कधी तेथे पोहोचेन, तेव्हा त्यांची भेट नक्की व्हावी एवढीच इच्छा...! तिथेही ते एक ‘ठेवणीतला’ ज्योक सांगतील आणि मिश्किल हसत टाळीसाठी हात पुढे करतील...!

- दत्ता जोशी 9225 30 90 10


Friday, September 16, 2011

गणपतीबाप्पा, पुढच्या वर्षी थोडा उशीरा ये रे बाबा...

हे गणनायका, दुःखहारका, तू दरवर्षीप्रमाणे या वर्षी ठरल्या वेळी आलास आणि ठरल्याप्रमाणे दीड दिवस, सात दिवस, नऊ दिवस, अकरा दिवस असा वेळ घेत परत गेलासही. पण आता तू येताना आमच्या काळजाचा ठोका चुकू लागतो. तू विघ्नविनाशक, पण तुझ्या येण्याने जेवढी विघ्ने येतात ती पाहता आता हळूहळू तू जरासा उशीरानेच येण्याचे पाहा... कालांतराने येणे बंद केलेस तरी चालेल...
.............................................................................
 पाक्षिक `शेतकरी संघटक`च्या २२ सप्टेंबर २०११ च्या अंकात प्रकाशित झालेला लेख
.............................................................................. 


आदरणीय गणेशदेवा,
आपणास साष्टांग प्रणिपात. आपण ठरल्याप्रमाणे चतुर्थीला आलात आणि चतुर्दशीला मार्गस्थ झालात. तुमचं रुपलावण्य किती नेत्रसुखद. आम्हाला जेव्हापासून कळायला लागलं, त्या वयापासून आम्ही सारे तुमच्या प्रेमात पडलेलो आहोत. खरं सांगायचं, तर देवा हे तुमचं भाग्य! तुम्ही सर्वज्ञ ना? मग तुम्हीच सांगा किती जणांनी आपल्या बालपणी मातीचे - शाडूचे गणपती बनविले? किती मुलांनी आपल्या चित्रकलेच्या तयारीत कागदावर आपली छबी चितारण्याचा प्रयत्न केला. एवढे प्रमाण ब्रह्मा-विष्णुपासून पार अलिकडे संतोषीमातेपर्यंत कोणत्या देवतामध्ये आढळते?

आम्हाला आठवते, ‘गणपती येत आहेत’ याची चाहूल आम्हाला लागायची ती श्रावणातील शिडकाव्यानंतर घराशेजारच्या उंचवट्यावर आघाडा-दुर्वा उगवू लागल्यावर...! मग नदीकाठच्या ओल्या चिकणमातीचे छोटेछोटे गोळे आमच्या घरासमोरील अंगणात आणत असू. कधी मिळालाच तर शाडूही आणता येई आणि मग गणराया, तुला  साकारण्यासाछी आमची इवली बोटे झटू लागत. तुझं रुपडं साकारताना आमचं रुपडं मात्र पार काळवंडून जात असे. मग आमची झटापट सुरू होई रंग आणि ब्रशशी. अशा प्रकारे दोन-तीन दिवसांच्या मेहनतीनंतर तुझी मूर्ती साकारत असे. मूर्ती विकत आणावी लागणार नाही, या आनंदात घरातील मोठ्या माणसांचा आमच्या मूर्तीला पाठिंबा मिळे. विसर्जनापर्यंत दररोज सकाळ संध्याकाळची आरती मात्र अनेकदा आम्ही विसरत असू. मग घरात कोणाला तरी आठवण येई आणि आरती म्हटली जाई.

विसर्जनाच्या वेळी मूर्ती पाटावर ठेवून हा पाट डोक्यावर घेऊन तोल सांभाळत नदीपर्यंत जाऊन नदीत तुझे विसर्जन करताना आपल्या आयुष्यातील एक महान कलाकृती आपल्याकडून हिरावली जात असल्याचे दुःख मात्र अंतःकरणात सलत असे. या विसर्जनानंतर गावातील मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत आम्ही सहभागी होत असू. तुझ्यापुढे नाचताना वय, जात, धर्म विसरला जात असे. बैलगाडीच्या कठड्यांवर फळ्या आडव्या टाकून तयार केलेल्या प्लॅटफॉर्मवर तुझी विशालकाय मूर्ती ठेवलेली असे. नारळाच्या झावळ्या किंवा केळीचे खुंट यांच्या हिरव्यागार कमानींमध्ये तुझी गोजिरी मूर्ती शोभत असे. समोर गावातील ब्रॉसबँड वाजत असे. क्वचित एखाद्या मंडळाला कर्णे लावून गाणी वाजविण्याचा मोह आवरत नसे. पण सारे वातावरण चैतन्याने मुसमुसलेले... प्रसन्नतेचा अर्थ तेव्हा आकळत असे...

मधली काही वर्षे अशीच गेली. आमच्या वडिलांची जागा आम्ही घेतली आणि आमची जागा आमच्या मुलाने... पण त्याने कधी मातीत हात मळविलेले आम्ही पाहिले नाही. शिस्तशीरपणे बाजारातून तुझी मूर्ती मखरासह घरात येई. या वर्षी पर्यावरणाच्या रक्षणासाठी शाडूची मूर्ती आणायचे मुलाने ठरविले तेव्हा मला आनंद वाटला. माझं वर्तुळ थोडे तुटकपणे का होईना जुळत होतं... पण शाडूची मध्यम आकाराची मूर्ती आणण्यासाठी त्याने तब्बल पाचशे रुपये खर्ची घातल्याचे कळले, तेव्हा, देवा खरं सांगतो, वाईट वाटलं...

असे वाईट वाटण्याचे दिवस आजकाल बरेच येत आहेत. बाप्पा, तुम्ही विघ्नहर्ता ना? मग हे असं का होतं? की आमच्या प्रार्थनेतील आर्तता कमी झालीय... की तुमचा प्रभाव कमी होतोय? लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य आंदोलनातील जनजागरणाचे साधन म्हणून आपल्याला विराट स्वरुपात सादर केले. आम्ही लोकमान्यांना पाहिले नाही आणि स्वातंत्र्यलढाही अनुभवला नाही. आम्ही एका वेगळ्याच लढ्यात अडकलो आहोत. हा लढा आमच्याच अस्तित्वाचा आहे. नाक्यानाक्यांवरील ‘लोकमान्य’ खंडणीला वर्गणी समजतात. रस्ते अडवणे, कर्णकर्कश्श संगीत वाजविणे हा त्यांचा हक्क आणि समाजाची अडवणूक हे कर्तव्य! आम्ही या चक्रव्यूहात अडकलो आहोत.

हा भाग तर खूपच छोटा. आता तू खराखुरा ‘व्हीआयपी’ झाला आहेस. तुझ्या रक्षणासाठी पोलिसांच्या फौजा तैनात असतात! तू खरा विघ्नहर्ता, पण आम्ही तुझी क्षमताही निष्प्रभ बनविली! परवाचीच गोष्ट... दिल्लीत साक्षात हायकोर्टासमोर स्फोट झाला. अजूनही त्याचे धागेदोरे शोधले जात आहेत. पंतप्रधानांनी हा भ्याड हल्ला असल्याचे म्हटले आहे. गृहमंत्री नेहेमीप्रमाणेच या स्फोटात कोणकोणत्या स्फोटकांचा वापर झाला असावा, या विषयी अंदाज वर्तवित आहेत. या हल्ल्याची पूर्वसूचना गुप्तचर खात्याने दिली होती, असा दावाही त्यांनी केला. दरवेळी परदेशातील अतिरेक्यांनाच अशा हल्ल्यांना जबाबदार धरून चालणार नाही, या हल्ल्यामागे देशातच प्रशिक्षित झालेले दहशतवादी असू शकतात, असेही त्यांनी सुचविले आहे. त्यांचे ‘बिटवीन द लाईन्स’ कळण्याएवढे आता लोक जागृत झाले असावेत. जखमींना भेटायला गेलेल्या राहूल गांधींची हुर्‍यो उडवीत लोकांनी त्यांना रुग्णालयापासून परत पाठविले. प्रणव मुखर्जी, कपिल सिब्बल आणि --- यांनी या वेळी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. ही बुद्धी त्यांना आपणच दिली बाप्पा?

या हल्ल्यापाठोपाठ देशात इतरत्र हल्ले चढवण्याचे ई मेल आले आणि संसदेवरील हल्ल्याचा गुन्हेगार अफजल गुरूला सोडण्याची मागणीही अतिरेकी गटांनी केली. आता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हायकोर्टासमोर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. गजानना, तू बुद्धीची देवता ना? मग राज्यकर्त्यांना तू बुद्धी का देत नाहीस? निर्बुद्धपणाचे सारे विक्रम तोडण्याच्या जिद्दीने यांचा राज्यकारभार सध्या चालू आहे. यांचा गृहमंत्री स्फोट घडून गेल्यानंतर त्यात कोणती स्फोटके वापरली असावीत, याचे विश्र्लेषण करतो. यांचा परराष्ट्रमंत्री युनोत जाऊन भलत्याच देशाच्या मंत्र्याचे भाषण वाचू लागतो आणि चूक लक्षात आल्यानंतर त्याचे निर्लज्ज समर्थनही करतो. यांचा भावी पंतप्रधान दहशतवाद आटोक्यात आणणे अशक्य असल्याचे जाहीर विधान करतो. अशा स्थितीत गणराया आम्हाला तुझ्याशिवाय कोण बरे आधार आहे?

बाप्पा तू युद्धकलेतही पारंगत. सार्‍या गुणांचा तुझ्यात समुच्चय. तू राज्यकर्त्यांना बुद्धी देऊ शकत नसशील तर किमान युद्धकला तरी शिकव. पाकिस्तान हा भारताचा शत्रू आहे, हे सत्य त्यांना उमगू दे. पाकिस्तानच नव्हे तर चीन हा भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे, याचे भान त्यांना येऊ दे. हे भान सरकारपेक्षाही कम्युनिस्ट पक्षाला लवकर येऊ दे. वाजपेयी सरकारच्या काळात तत्कालीन परराष्ट्रमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी चीन हा भारतासाठी सर्वात धोकादायक शेजारी असल्याचे विधान केले होते तेव्हा हेच पक्ष त्यांच्यावर चवताळून उठले होते. आता चीनने काश्मीरचे डोके गिळंकृत केले आहे. तिबेट बळकावला आहे. अरुणाचलात तो आत शिरला आहे. तो ब्रह्मपुत्रेचे पाणी रोखतो आहे. सीमेवर शस्त्रास्त्रांची जमवाजमव करतो आहे. भारताच्या हद्दीत घुसतो आहे. तरीही येथील कम्युनिस्टांना तो भारताचा मित्रच वाटतो आहे. देवा, काय करशील?

गणराया, 11 सप्टेंबर 2001 नंतर अमेरिकेवर एकही हल्ला झाला नाही. त्यांनी आपली सुरक्षाव्यवस्था सीमेवरच आवळली. ‘पंछी भी पर नही मार सकता’ हे एकेकाळी मुलायमसिंह यादव यांनी कॉपीराईट करून ठेवलेले विधान आता अमेरिकेने पळविले आहे. व्हायरसेस शरीरात शिरण्याआधीच रोखले तर अँटीबायोटीक्सचे दुष्परिणाम होण्याची शक्यताच मावळते, हे सांगायला कोणाची गरज पडावी? इथे समुद्र किनार्‍यावर महिनाभरात दोन महाकाय जहाजे वाहत येतात आणि कोणत्याही यंत्रणेला त्याचा थांगपत्ता नसतो. उलट, ही जबाबदारी आपली नसल्याचे खुलासे या यंत्रणा करतात. या विषयावर संसदेत चर्चाही होत नाही. गुजरातेत लोकपाल नेमल्याच्या मुद्‌द्यावरून विरोधी पक्ष संसदेचे कामकाज रोखतात पण जहाजांशी कोणाचे देणेघेणे नसते. देशावरील अलिकडचा सर्वात मोठा हल्ला याच मार्गाने घुसखोरी करून झाला, हा इतिहास ताजा असताना सुद्धा हा निष्काळजीपणा हा देश करू शकतो. इतिहासातील चुकांपासून धडा घेत नाही त्या देशाला भविष्यकाळ नसतो, असे एक विधान आम्ही वाचले होते. या देशापुरते तरी हे विधान खोटे ठरो, अशी विनंती आम्ही आपल्याजवळ करतो.

पण देवा, हे सारे काय चालले आहे? नागरिक असुरक्षित आणि अतिरेकी मुक्त आहेत. रामदेवबाबांवर दिल्लीत प्रवेशाची बंदी लादली जाते आणि अतिरेकी बिनधास्त येऊन स्फोट घडवून जातात. अण्णा हजारे यांना गोळ्या घालण्याची खास सरकारी भाषेतील धमकी दिली जाते. ज्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत असे समाजकंटक सरकारच्या नजरेत येत नाहीत. असे का होते देवा? केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकताच आपल्या संपत्तीचा तपशील जाहिर केला. देवा, खूप आश्चर्य वाटले. दरमहा 50 हजार - एक लाखाचे वेतन आणि भत्ते घेणार्‍या नेत्यांच्या मालमत्ता कोट्यवधींच्या आहेत, तरीही अनेकांच्या नावावर घर नाही, वाहन नाही... काय हा लोकशाहीचा चमत्कार! तिकडे आंध्रात जगनमोहन रेड्डींची मालमत्ता वर्षभरात दुप्पट होते. ते गोडीत होते तोपर्यंत सारे काही आलबेल होते. ते विरोधात जाताच त्यांची संपत्ती आक्षेपार्ह ठरली. तिकडे कर्नाटकात दुसरे रेड्डी डबल रोलमध्ये कार्यरत होते. इकडे भाजपाला मदत आणि तिकडे राजशेखर रेड्डी आणि जगनमोहन रेड्डी यांच्या रुपाने कॉंग्रेसला मदत. ही रसद चालू होती तोवर सारे आलबेल पण रसद तोडताच ते खलनायक? हे काय चालले आहे गणपतीबाप्पा?

इकडे अण्णा भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फुंकतात आणि तिकडे या तापलेल्या तव्यावर शेकण्यासाठी भाजपा आपल्या भाकरी थापून तयार राहते? निष्कलंक वैयक्तिच चारित्र्याच्या विषयावर अडवाणींबद्दल नक्कीच आदर वाटतो पण भ्रष्टाचाराने बरबटलेल्या त्यांच्या पक्षातील इतर काही नेत्यांचे काय? अण्णा हजारे यांनी ‘त्यांच्या राज्यांत आधी लोकपाल नेमून दाखवावेत’ या आव्हानाला या पक्षाने अद्यापपर्यंत कोणतेही उत्तर दिलेले नाही. पुढचे सरकार बनविण्याची मनस्वी इच्छा असलेल्या या पक्षाला अद्यापही ही सद्बुद्धी आपण का देत नाही देवा?
देवा, प्रत्येक युगाच्या अंति महाप्रलय येत असतो म्हणतात. सार्‍या व्यवस्था सडल्या, कुजल्या, निकामी झाल्या की देश एका मोठ्या अराजकाकडे वेगाने वाटचाल करू लागतो. आजची या देशाची अवस्था पाहून आम्ही सारे जण एका खूप मोठ्या अराजकाकडे निघालो आहोत, असे तुम्हाला वाटते का? हीच महाप्रलयाची सुरवात आहे का देवा?

खरे तर तुझ्या येण्याने एकेकाळी मोठा आनंद होत असे. मातीत हात घालण्याआधी तेव्हा घरची परवानगी लागत नसे. तुझी सुबक मूर्ती घडविण्याचा विचार फक्त विचारच राहायचा. प्रत्यक्षात बनलेल्या तुझ्या मूर्तीकडे तू स्वतः पाहिले असतेस, तर फक्त सोंड आहे म्हणून ती तुझीच मूर्ती आहे, एवढीच ओळखीची खूण पटली असती. तरीही तू प्रसन्न वाटायचास. आता सर्वोत्तम दर्जाच्या मूर्तीकारांनी तयार केलेली मूर्तीही मनाला प्रसन्न करत नाही. आता तुझ्या येण्याने मनावर दडपण येते. तू येणार म्हटले की आता तुझ्या आधी वर्गणीवाले गुंड येतात. मग कर्कश्श ‘डीजे’वाले गोंधळकर्ते येतात. त्या पाठोपाठ बंदोबस्ताच्या नावाखाली पोलिस येतात. मग आम्ही अतिरेकी येण्याची वाट पाहतो. ते आले नाहीत तर हुश्श म्हणतो आणि बिचार्‍या पोलिसांना सारे श्रेय देऊन मोकळे होतो.

पण आता ही सहनशक्ती कुठपर्यंत टिकवणार देवा? आणि तू ही आजकाल निष्क्रीय होतो आहेस. योग्यता नसलेले लोक राज्यकर्ते आहेत. रक्षण करणार्‍यांच्या हाती दंडुके आहेत आणि भक्षकांच्या हाती अद्ययावत शस्त्रे...! राज्यकर्ते बदलावेत, तर चांगला पर्याय कुठे आहे? असा स्थितीत आता तुझी सरबराई करणे आम्हाला जड जाते आहे बाप्पा... आपण सर्वज्ञ, आपणालाच हे कळायला हवे. आम्ही पुढच्या वर्षी लवकर येण्याच्या घोषणा तर दिल्या, पण तू जरा उशिरानेच आलास आणि लवकर गेलास तर आमची तेवढीच लवकर मुक्तता...! हळू हळू तुझे आगमन लांबवत जा आणि मुक्काम कमी करत जा. खात्रीने सांगतो, काही वर्षातच आम्ही तुला विसरून जाऊ... हे नको असेल तर मग नाही तर एकच कर, सर्वांना सद्सद्विवेकबुद्धी दे. देशाचे हित सर्वोच्च असल्याची जाणीव सर्वांच्या मनात पुन्हा एकदा जागृत कर... ही जबाबदारी आता तुझीच!

दत्ता जोशी
मो. 9225309010

Friday, September 2, 2011

सिंगापूरचे तिसरे अ. भा. 'अदखलपात्र' विश्व मराठी साहित्य संमेलन!


`दैनिक लोकमत` च्या `हेलो औरंगाबाद` मध्ये दर शुक्रवारी प्रकाशित होत असलेल्या 'संस्कृती, साहित्य वगैरे' या स्तंभात 2-9-2011 रोजी प्रकाशित झालेला हा लेख. 
...................................................................................
एका सिंगापूर डॉलरची किंमत साधारण 25 भारतीय रुपये आहे. अर्थात अमेरिकी डॉलरच्या साधारण निम्मी! अशा अर्थाने अमेरिकेच्या निम्म्या वारीचे पुण्य पदरी बांधून मराठी सारस्वतातील काही-शे फुकट फौजदार मागील आठवड्यात केव्हातरी आपापल्या घरी परतले. त्यांच्या घरच्या मंडळींना वगळता इतर कोणालाही त्याची गंधवार्ता नव्हती. स्वारीवर जाताना ‘कुंकुमतीलक’ आणि (झेंडे गाडून) येताना ‘हारतुरे - औक्षण’ ही खरी भारतीय संस्कृती. पण तमाम मराठी साहित्यरसिकांना याचा बहुदा विसर पडला आणि सिंगापुरी ‘झेंडे गाडून’ परतलेल्या साहित्यमार्तंडांना पुसण्यास (दोन्ही अर्थांनी) कोणीही गेले नाही. (आजकाल लोकांना साहित्याची काही तळमळच राहिली नाही, हे खरे!)

सध्या असेच चालू आहे. साहित्यिकांकडे कुणाचे फारसे लक्षच राहिले नाही हो ऽऽऽ! सिंगापुरी भरलेल्या साहित्यमेळ्यात जागतिक दर्जाच्या तब्बल साडेचारशे रसिकांची उपस्थिती होती म्हणे. या विराट उपस्थितीत भरलेल्या ‘विश्र्व’ मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. महेश एलकुंचवार यांनी समारोपप्रसंगी ‘काही रंजक आणि काही वैचारिक ऐवज घेऊन मी परत जातोय’ असे उद्गार काढल्याचे कळले. यावरून हे साहित्य संमेलन ‘काहीसे रंजक’ झाले असावे अशी दाट शक्यता माझ्या मनात येत आहे. एरव्ही रटाळ होणारे संमेलन रंजक होण्यामागे कोणत्या शक्तीचा हात आहे, हे तपासून पाहायला हवे. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा मा. कौतिकराव ठालेपाटील यांचा संपन्न वारसा समर्थपणे चालविणार्‍या विद्यमान अध्यक्षा मा. उषा तांबे यांनी ‘रसिकाश्रय आहे तोपर्यंत विश्र्व साहित्य संमेलन घेण्यात येईल’ असे जाहिर केले म्हणे. साहित्याच्या प्रांगणात हे विधानही सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखे आहे. (पण ‘रसिकाश्रय’चा अर्थ काय असावा बरे?) तिसर्‍याच संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी मूळ आयोजकांनी झटकल्यानंतर ऐनवेळी सिंगापूरकरांच्या गळी पडून आयोजित करून घेतले गेलेले हे संमेलन तशा अर्थाने निव्वळ उपचारच ठरले की काय अशी शंका मनात येत असतानाच हे विधान कानावर आल्यामुळे पुढील संमेलनासाठी बहुदा अद्याप कोणी ‘स्पॉन्सरर’ मिळाला नसावा, अशी शक्यता मनात येते आहे. ‘अ.भा.’ साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी झटकण्यासाठी संभाव्य आयोजकांना साठ वर्षे लागली, ‘विश्र्व’ संमेलनाची झटकाझटकी तीनच वर्षात सुरू झाली हे चित्र मोठे प्रासादिक दिसते आहे. 

सर्व अर्थांनी विश्र्व साहित्य संमेलन अदखलपात्र ठरताना दिसते आहे. आयोजकांच्या खर्चाने (मलेशियाच्या साईट सिईंगचा खर्च चक्क ज्याचा त्याचा स्वतःचा! आठवते, की पहिल्या संमेलनाच्या वेळी सर्व आदरणीय साहित्यिकांचा लाखोंचा सर्व खर्च करूनही - ‘त्यांनी व्हिसाचे साडेपाच हजार घेतले हो’ - असा दरिद्री गळा अनेकांनी काढला होता!) साहित्य संमेलनाची ऐश पदरात पाडून घेऊन परतल्यानंतर एकाही साहित्यिकाला तेथे काय घडले हे सांगण्याची गरज वाटली नाही, यातच सारे आले. थोडक्यात, मराठी साहित्याच्या कर्मदारिदऱ्याला आता वैश्विक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, इतकेच! मात्र, पुढच्या वर्षी कोण, हा प्रश्न आता गंभीर बनला आहे. बहुदा स्वतःच्या खर्चाने साहित्यिकांची इच्छा पूर्ण करण्याचा परदेशी मर्‍हाटमोळ्या मंडळींना कंटाळा आला असावा. ‘दुरून साहित्यिक साजरे’चे प्रत्यंतर त्यांना आल्यामुळेच ही टोलवाटोलवी सुरू झाली असावी, असे दिसते आहे. एक गोष्ट मात्र ठळकपणे जाणवते, की तेथून परतलेल्या एकाही साहित्यिकाने तक्रारीचा सूर लावलेला नाही, याचा अर्थ स्वच्छतागृहांची व्यवस्था सिंगापूरकरांनी चोख ठेवलेली असावी! 

संमेलन 13 आणि 14 ऑगस्टला झाले. त्यानंतर दोन तीन दिवसांच्या हवापालटीच्या सहलीनंतर सारस्वतांचे आगमन मुंबईच्या विमानतळावर झाले. (आगमनाचे फोटो मात्र कुठे दिसले नाहीत. पण ते विमानानेच आले असावेत असा माझा ठाम समज आहे. कारण तिकिटे सिंगापूरकरांनी काढलेली होती) आज 2 सप्टेंबर आहे. आजपर्यंत टीव्ही, रेडिओ, पेपर, वेबसाईट, चर्चासत्रे, कार्यक्रम, उपक्रम अशा कुठल्याही माध्यमातून हे संमेलन कसे झाले याची फारशी चर्चा झाली नाही. याचा अर्थ माध्यमांनी, रसिकांनी आणि अखेर साहित्यिकांनीही हे संमेलन ‘अदखलपात्र’ ठरविले की काय अशी शंका माझ्या मनात बर्‍याच दिवसांपासून येते आहे. (एरव्हीही संमेलनाच्या चर्चेपेक्षा त्या निमित्ताने इतरच चर्चा अधिक होतात, ही बाब अलहिदा. )

ता. क. ः आता अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची चर्चा सुरू झाली आहे. उंडणगावचा पत्ता काटण्यात संबंधितांना आधीच यश आले आहे. आता चंद्रपूर किंवा सासवड परिसरात संमेलन घेण्याचे ठरत आहे. स्थाननिश्चितीच्या आधी मराठवाडा साहित्य परिषदेतील वरिष्ठाची एकसदस्यीय समिती गठित करून संबंधित ठिकाणचा दौरा (संभाव्य आयोजकांच्या खर्चाने) आखण्यात यावा आणि तेथे पुरेशी स्वच्छतागृहे - पुरुषांसाठी आणि महिलांसाठी - आहेत की नाही, याची खातरजमा या समितीतर्फे करून त्या नंतरच साहित्य महामंडळाने यजमानपद देण्याचा निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती. 

- दत्ता जोशी
9225309010