Sunday, September 9, 2018

पाेळा म्हटले, की मला हे सगळे आठवते...

(दत्ता जाेशी, आैरंगाबाद)

माणसांसाठी कष्टणार्‍या प्राणीमात्राविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा सण... पोळा. लहानपणी शाळेत कवी यशवंतांची कविता अभ्यासाला होती. ती आठवते... आठवत राहते...

पोळ्याच्या दिवशी आठवतेच आणि एरव्हीही सजून धजून चाललेले बैल दिसले की आवर्जून आठवते...


शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली
चढविल्या झुली, ऐनेदार ॥

राजा परधान्या,  रतन दिवाण
वजीर पठाण, तुस्त मस्त ॥

वाजंत्री वाजती, लेझिम खेळती
मिरवीत नेती, बैलाला गे ॥

डुल-डुलतात, कुणाची वशींडे
काही बांड खोंडे, अवखळ ॥

कुणाच्या शिंगाना, बांधियले गोंडे
पिवळे तांबडे, शोभिवंत ॥

वाजती गळ्यात, घुंगरांच्या माळा
सण बैल पोळा, ऐसा चाले ॥

जरी मिरवीती, परि धन्या हाती
वेसणी असती, घट्ट पट्टा ॥

झुलीच्या खालती, काय नसतील
आसूडांचे वळ, उठलेले ॥

आणि फुटतील, उद्याही कडाड
ऐसेच आसूड, पाठीवर ॥

सण एक दिन, बाकी वर्षभर
ओझे मर मर, ओढायाचे ॥

का, कोण जाणे पण शेवची तीन-चार कडवी तेव्हा आवडायची नाहीत. छान चित्रावर कुणीतरी शिंतोडे उडवल्यासारखे वाटायचे... जगातले वास्तव कळण्याचे ते वय नव्हते. जे दिसायचे त्यावरच विश्वास टाकायचा... अन् आजूबाजूला दिसायचे ते छान, सुंदरच असायचे.

आमच्या देवणीत असे सगळे सण-उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होत. घरोघरी बैल-गायी... त्यांचे गोठे. पोळ्याला सारा गाव आपापल्या पशुधनासह नटून थटून घराबाहेर पडायचा.

पोळ्याची खरी सुरुवात असायची त्याच्या आदल्या दिवशी. त्याला आमच्याकडे खळमळणी म्हणायचे. (नागर भाषेत खांदेमळणी असाही एक शब्द आहे.) पोळ्याच्या या आदल्या दिवशी सकाळपासूनच बैलांचे लाड होत असत. एरव्ही गायींवर उगारलेला चाबूक मी कधी फारसा पाहिला नाही, पण बैलांच्या वाट्याला तो सतत यायचा. देवणीत आम्ही बापूराव कारभार्‍यांच्या घरात दीर्घकाळ भाड्याने राहिलो. त्यामुळे आमच्यात वेगळेच नाते तयार झाले. त्यामुळे विशेषतः शेतातले सगळे सणवार आम्ही त्यांच्याकडेच जात असू. ‘येळवशी’ (वेळा अमावस्या) असो की खळं पडल्यानंतर होणारं ‘ढवारं’... म्हणजे रात्रीच्या चांदण्यातलं वनभोजन, आम्ही त्यांच्याच शेतात.

खूप लहान होतो तेव्हा दोन्ही घरांतील बायकांसोबत आम्ही सगळे बैलगाडीत बसून जात असू. मग त्यातही अगदी समोर बसून कासरा धरायचा माझा अट्टाहास. पण गाडी रेणूची, म्हणजे रेणुकादासची... शेतमालकाची. तो कसा मला बसू देईल? मग जानकामावशींच्या, रेणूच्या आईच्या मागे लागून, थोडा वेळ रेणूला बाजूला बसवून मी कासरा हाती घेत असे. कासरा हातात आला, की तो ओढून पाहायचा मोह... ओढला की बैलाच्या नाकातील वेसण ओढली जायची आणि ते त्रासायचे. ते लक्षात आले की तुकाराम मामा, म्हणजे कारभार्‍यांचे सालगडी आमच्यावर ओरडायचे. बैलाला हात लावलेला, त्रास दिलेला त्यांना खपायचा नाही. या मुक्या जनावरांवर त्यांची खूप माया...

खळमळणीला बैल शेतावर जायचे. दिवसभर त्यांना ना नांगराला जुंपले जायचे ना त्यांच्यावर चाबूक उगारला जायचा. दुपारची भाकरी खाऊन झाली बैलांची पूजा व्हायची. मग सार्‍या शेतकर्‍यांचे बैल शेतातून गावाकडे परत निघायचे. आधी ते नदीवर जायचे. तिथे त्यांना धुवून पुसून काढले जाई. नदीला पाणी असायचे त्यामुळे बैल पोहोणीही करायचे. तिन्हीसांजेला ते आपापल्या घरी परतायचे. रात्री त्यांना गोडेतेल पाजले जायचे. झोपण्याआधी त्यांना, म्हणजे बैलांना निमंत्रण दिले जायचे - ‘पोळ्यादिवशी घरी पोळी खायला या...’
000

पोळ्याचा दिवस उजडायचा तो अतीव उत्साहात. सकाळीच बैलांना ‘डिकमल’ पाजले जायचे. जसे आपण पादेलोण असलेले पाणी पाचक म्हणून पितो, तसे ते बैलांचे पाचक. खडेमिठासह काही विशिष्ट पदार्थ, पीठ कालवून घरधणीन ते तयार करीत असे...! कालचा आणि आजचा दिवस बैलांचा. या दोन दिवसांत त्यांना कामावर जुंपले जायचे नाही की त्यांच्यावर हात उगारला जायचा नाही. न्हाऊ माखू घालणे, अंगावर रंगांचे शिक्के... शिंगांना वॉर्निश, शिंगांच्या टोकाला पितळेच्या शिंगोळ्या... गोंडे... सगळी धमाल. आम्ही छोटी पोंरं तुकाराम मामांना मदतीच्या नावाखाली आपापले हात साफ करून घेत असू. ते ओरडत, आम्ही दूर पळत असू... सगळी धमाल.

त्याच दिवशी अंबाड्याच्या सुताचे छोटे छोटे चाबूक विकायला येत असत. आम्ही ते घेत असू. ते घ्यायचे, बैलांना लावलेल्या रंगातून उरलेल्या रंगात रंगवायचे आणि ते हवेत भिरकावून ‘चट्’ असा आवाज करीत वाजवत गल्लीभर फिरायचे हा आमचा आवडता प्रकार. कधी गंमत म्हणून एखाद्या बैलाच्या अंगावर चाबूक मारायचा अगावूपणाही करण्याचा प्रयत्न आम्ही करत असू पण कुणा मोठ्या माणसाच्या लक्षात आले तर मग आमच्या पाठी मात्र रंगायच्या...! खरे तर त्या इवल्या चाबकाचा मार बसणार तरी किती आणि कसा? पण त्या दिवशी बैलांना ते सुद्धा चालणार नाही म्हणजे नाही...!

पोळ्याच्या दिवशी काही बैल शेतावर जात, काही घरीच राहात. तिन्हीसांजेला सगळे गावाबाहेर पश्चिमेला महादेवाच्या मंदिराजवळ जमत. अंगावर झूल, गळ्यात घागरमाळा (त्याला काही जण घुंगुरमाळा म्हणतात), उत्तम साज चढवून बैल आणि त्यांचे मालक - गडी सार्‍यांचा एकच गदारोळ असे. मग सुरू होई मिरवणूक... बँडबाजा लावून ही मिरवणूक निघे. गावचे पाटील आणि मानकर्‍यांचे मानाचे बैल पुढे आणि बाकी सारे त्या मागोमाग. काही अंतर चालत जात गढीच्या शेजारी, बालवाडीजवळच्या छोट्या चौकात पोहोचून ही मिरवणूक संपत असे. मानकर्‍यांचे बैल आधी आपापल्या मालकांच्या घरी निघत, पाठोपाठ सार्‍या गावाचे...

घरी आले की घरची स्वामिनी बैलांच्या औक्षणासाठी समोर यायची. ‘व्हलग्या व्हलग्या - चालंग पलग्या’चा गजर करीत बैलांना पुरणपोळी प्रेमाने भरवायची. मोठ्या मानाने बैल वाड्यात घेतले जायचे, गोठ्यात जायचे. हिरवा चारा तर मिळायचाच... एरव्हीही प्रेमभराने मस्तकावरून फिरणारा आणि गळ्याखालचे पोळे खाजवणारा हात आज अधिक जिव्हाळ्याचा व्हायचा...

आज शहरात राहताना ही सगळी चित्रं नजरेसमोरून सरकताहेत... कालमानाप्रमाणे धूसर होताहेत... त्या धूसर पडद्याआडून जे काही स्मरणात राहिलं ते मांडलं...

- दत्ता जाेशी
आैरंगाबाद
(विशेष सहकार्य - रेणुकादास कुलकर्णी, देवणी)

Thursday, August 30, 2018

खरकटे मौल्यवान आहे...



(दत्ता जोशी, औरंगाबाद)
काही माणसं चक्रम असतात. अशीच माणसं काहीतरी आगळं, समाजोपयोगी, आश्वासक असं घडवू शकतात. परवा अशाच एका माणसाशी परिचय झाला. गप्पा झाल्या. चक्रमपणाची खात्री पटली आणि मग त्यांच्याबद्दल लिहावेसेच वाटले. दीपक कान्हेरे हे त्यांचे नाव आणि अत्यल्प किमतीत आणि दीर्घकाळ टिकणार्‍या बायोगॅस संयंत्रांची उभारणी हे त्यांचे वैशिष्ट्य...! ते इंजिनिअर आहेत... पण वेगळ्या वाटेवरचे...!
परवा संध्याकाळी बीड बायपासच्या परिसरात कामानिमित्त गेलो असताना औरंगाबादच्या ‘एमआयटी’चे संस्थापक आणि अखंड ऊर्जेचे प्रेरणास्त्रोत असलेल्या डॉ. यज्ञवीर कवडे सरांना भेटण्याची इच्छा झाली. माझ्या उस्मानाबाद जिल्ह्यावरील पुस्तकात मी 2012 मध्ये त्यांच्याविषयी लिहिले होते. त्या वेळी त्यांच्यातील वेगळेपण लक्षात येत गेले. मग अथूनमधून भेटायला सुरुवात केली. परवा फोन केला, तर म्हणाले ‘या. पन्नालालजीही आलेले आहेत. भेट होईल.’ ‘एमआयटी’च्याच परिसरात असलेल्या त्यांच्या घरी पोहोचलो तर ज्येष्ठ समाजसेवी पन्नालालजी सुराणा तेथे होते. त्यांच्याशीही अल्पसंवाद झाला. ते गेल्यानंतर कवडे सरांशी गप्पा मारताना त्यांनी ‘एमआयटी’च्या होस्टेलमध्ये सुरू असलेल्या उपक्रमाबद्दल सांगितले. होस्टेल मेसमधील ‘फुड वेस्ट’वर चालणार्‍या बायोगॅस संयंत्राची उभारणी तेथे सुरू आहे. अर्थात ती पूर्णत्वाला गेली आहे. कार्यरत झालीय. दीपक कान्हेरे नावाचे गृहस्थ ते काम करताहेत. त्यांच्या सोबतीला चार इंजिनिअर आहेत, जे स्वतः प्रत्यक्ष अंगमेहनतीचे काम करताहेत... हे सारे ऐकल्यानंतर थांबणे शक्यच नव्हते. हे सगळे प्रत्यक्ष पाहण्यासारखे होते आणि कवडे सरांनीही प्रत्यक्ष भेट घालून देण्याची उत्सुकता दाखविली. आम्ही काही मिनिटांतच त्या साईटवर पोहोचलो आणि मग तासभर तिथेच रमलो.
मुळात कवडे सर म्हणजे नवनव्या तांत्रिक प्रयोगांत रमणारे, प्रत्येक गोष्टीतील शास्त्र शोधणारे आणि नव्या पिढीपर्यंत तांत्रिक शिक्षण पोहोचविण्यासाठी सतत आग्रही असलेले व्यक्तिमत्त्व. शिक्षणाच्या क्षेत्रात संपूर्ण आयुष्य काढल्यानंतर त्या मेहनतीला आलेले फळ म्हणजे ‘एमआयटी’. ‘शिक्षण महर्षी’ म्हटले तर आजकाल वेगळा वास येतो. पण ते खर्‍या अर्थाने शिक्षणमहर्षी. 1960 च्या दशकात रोटेगावच्या संस्थेत त्यांनी बायोगॅसचा पहिला प्रयोग मोठ्या जिद्दीने उभा केला होता. कदाचित औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागात उभारलेला तो त्या प्रकारचा पहिलाच प्रयोग असावा. तांत्रिक कारणांमुळे तो तीन-चार वर्षांत बंद पडला. पण विषय मनात ताजा होता. परवा काही महिन्यांपूर्वी दीपक कान्हेरे यांच्या भेटीनंतर त्या विचाराने पुन्हा उचल खाल्ली आणि ‘एमआयटी’ परिसरात बायोगॅसचा प्रकल्प अवतरला.
या प्रकल्पाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. आधी तांत्रिक विषय समजावून घेऊ. या संयंत्राची क्षमता 36 हजार लिटरची आहे. त्यात दररोज 150 ते 180 किलो ‘फुड वेस्ट’वर प्रक्रिया होऊ शकते आणि त्याद्वारे दररोज 18 घनमीटर गॅस तयार होतो. ढोबळ विचार करायचा तर आपला घरगुती सिलिंडर सुमारे 15 किलोंचा असतो. या द्वारे दररोज निम्मा सिलिंडर गॅस उपलब्ध होतो. होस्टेलच्या मेसमध्ये कमर्शियल सिलिंडर वापरला जातो. तो 20 किलोंचा असतो. कॉलेज वर्षभरात साधारण 200 दिवस चालते. रोजचा 7 किलो गॅस उपलब्ध होतो असे मानले तर वर्षभरात साधारण 1400 किलो गॅस निर्माण होतो. अर्थात, वर्षभरात कमर्शियल सिलिंडरच्या आकारातील 70 सिलिंडर निर्माण होतात. या सिलिंडरचा दर साधारण 1350 रुपये आहे. असे साधारण 95 हजार रुपये वाचवण्यात संस्थेला यश आले. हा एक पैलू झाला.
‘कॉस्ट इफेक्टिव्हिटी’ हा या प्रकल्पाचा दुसरा पैलू. तो कसा? हे संयंत्र फेरोसिमेंट तंत्रज्ञानाने उभारले गेले आहे. 6 एमएम लोखंडी सळया, कबुतरजाळी, वाळू आणि सिमेंट वापरून डोमसह पूर्ण काम झाले. 36 हजार लिटर क्षमतेचा डोमही याच तंत्राने साकारला. शून्य लिकेजसह...! विटांचा वापर कुठेही झाला नाही. केवळ तुलना म्हणून सांगायचे झाले तर औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (सरकारी यंत्रणेद्वारे) काही दिवसांपूर्वी 4 घनमीटर क्षमतेचा बायोगॅस प्लँट उभारण्यात आला. त्याला 2 लाख 20 हजार रुपये खर्च आला. इथे त्यापेक्षा साडेचारपट मोठा म्हणजे 18 घनमीटरचा प्लँट उभा राहिला तो केवळ 3 लाख 70 हजारात. म्हणजे साधारण दीड पट मूल्यात...!
पण हे वैशिष्ट्य इथेच संपत नाही. आणखी तीन गोष्टी इथे घडतात.
दोन दिवसांत संयंत्रातील घटक कुजल्यानंतर त्यातून काळसर द्रवरूप स्लरी बाहेर येऊ लागते. ते उत्तम सेंद्रीय खत असते. ते बागेत, शेतात वापरले जाऊ शकते. त्यामुळे अन्य खतांच्या वापराच्या खर्चात बचत होते. ही स्लरी सगळ्याच संयंत्रातून येते. तो प्रकल्पाचा अंगभूत भाग असतो. मात्र ‘एमआयटी’मधले पुढचे वैशिष्ट्य हे आहे की इथे वायू विलगीकरणाची यंत्रणा बसवण्यात आली आहे. हे नेमके काय असते? शास्त्रीय भाषेत त्याला ‘स्क्रबिंग’ म्हणतात. बायोगॅस संयंत्रातून 2 वायू बाहेर पडतात. मिथेन (होय, तोच. नरेंद्र मोदी फेम!) आणि कार्बनडायऑक्साईड. मिथेन ज्वलनशील आहे आणि कार्बनडायऑक्साईड आगीला शांत करणारा. त्यामुळे बायोगॅसमधून बाहेर पडणारा वायू गॅस शेगडीद्वारे जाळण्याआधी त्यातील कार्बनडायऑक्साईड बाजूला केला तर गॅसचे औष्णिक मूल्य वाढते. (सोबतच्या छायाचित्रात पिवळ्या-निळ्या रंगाचे पाईप दिसतात, ते त्याच प्रक्रियेतले आहेत...)
याशिवाय तिसरी गोष्ट इथे वेगळेपणाने केलेली आहे. तयार होणारा मिथेन ‘कॉम्प्रेस’ करून सिलिंडरमध्ये भरण्यासाठीची यंत्रणाही इथे उभारण्यात आलेली आहे. त्यामुळे तयार झालेला वायू दीर्घकाळ, कुठेही घेऊ जाऊन वापरता येऊ शकतो. तो अकारण वाया जात नाही.
मग प्रश्न पडतो, हा प्रकल्प होस्टेलची इंधनाची गरज 100 टक्के वाचवतो का? उत्तर आहे - 100 टक्के नव्हे तर 30 टक्के गरज पूर्ण करतो. पण उष्टे-खरकटे उघड्यावर फेकण्याची गरज मात्र 100 टक्के वाचवतो. इथल्या अन्नाचा एक कणही उघड्यावर टाकावा लागत नाही. औरंगाबादेतील कचर्‍याचा विषय लक्षात घेता हा गुण अतिशय मोलाचा... श्री. कान्हेेरे सांगतात, “दत्ता जोशी, इथली 30 टक्के गरज भागवणे हीच सायुज्जता आहे. ‘त्याज्यात सायुज्यं साध्यते’... सोप्या भाषेत सांगायचे तर टाकाऊतून टिकावू निर्माण झाले पाहिजे. आम्ही वाया जाणारे खरकटे कुठे टाकायचे याचे शाश्वत उत्तर शोधले, विकसित केले आणि समाजासमोर खुले केले.” म्हणूनच त्यांच्या उद्योगाचे नाव ‘सायुज्य ऊर्जा’ असे आहे.
‘एमआयटी’ने हा उपक्रम करताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट केली. या प्रकल्पाला आणि विद्यार्थ्यांना परस्परांशी जोडले. कॉलेजचे उपप्राचार्य श्री. किशोर कुलकर्णी यांच्या माध्यमातून विद्यार्थी या कामाशी जोडले गेले. प्रत्यक्ष काम करून त्यांनी हे तंत्र अवगत केले. उद्या शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते आपापल्या गावी जातील तर तेथे स्थानिक प्रश्नावर आवश्यक असलेले उत्तर त्यांच्याजवळ तयार असेल. आयुष्यात कुठेही हा विषय समोर आला तर किफायतशीर, परिणामकारक आणि प्रभावी मॉडेल त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेले असेल.
तुम्हा कुणालाही हा प्रकल्प पाहायचा असेल तर, समजून घ्यायचा असेल तर तो शक्य आहे. कुलकर्णी सरांशी 9568453678 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधून पूर्वपरवानगीने भेट देता येईल, शास्त्र समजून घेता येईल. या आठवडाभरात गेलात तर कदाचिक श्री. कान्हेरे नावाच्या अवलियाशी आणि थेट सिमेंट वाळूत हात घालून काम करणार्‍या त्यांच्या इंजिनियर सहकार्‍यांशीही भेट होऊ शकते...!

Saturday, June 16, 2018

‘निर्लेप’ आणि ‘बजाज’च्या निमित्ताने...


‘निर्लेप’चे 80 टक्के शेअर्स ‘बजाज इलेक्ट्रिकल्स’ला विकले जात असल्याच्या बातमीने मोठी खळबळ उडाली. अनेकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. एका मराठी ब्रँडचा अस्त, वगैरे शब्दप्रयोगही कानावर आले. यातील ममत्वाची भावना तेवढीच महत्त्वाची होती. या पार्श्वभूमीवर ‘बजाज’शी हातमिळवणीचा ‘निर्लेप’चा निर्णय महत्त्वाचा म्हणावा असाच आहे. एक तर हा भारतीय ब्रँड आहे. घरोघरी पोहोचलेला आहे आणि केवळ ‘किचन अप्लायन्सेस’मध्ये काम न करता घराला लागणार्‍या सर्व प्रकारच्या उपकरणांमध्ये काम करणारा आहे. पंखे, गॅस शेगड्या, ओव्हन, मिक्सरपासून बल्ब - ट्यूबपर्यंत अनेक उत्पादने या उद्योगाने भारतभर रुजविली आहेत. त्यांच्या याच बळाचा वापर ‘निर्लेप’चा ब्रँड अधिक ताकदीने वाढण्यासाठी होणार आहे. मुळात ‘निर्लेप’ हा ‘बजाज’चा स्पर्धक ब्रँड नव्हता. त्यामुळे मार्केटमध्ये अतिशय चांगले गुडविल असलेला नवा ब्रँड मिळवून ‘बजाज’ने नव्या मार्केटची पायाभरणी केली आहे, असेच म्हणावे लागेल. हा ब्रँड अधिक ताकदीने विस्तारण्याची क्षमता त्यांच्यात आहे, त्यामुळे हा ब्रँड केवळ जिवंतच राहणार नाही तर खूप मोठा होईल याची शाश्वती नक्कीच आहे. या कंपनीचा ‘मार्केट अ‍ॅक्सेस’ निर्लेपपेक्षा मोठा असल्याने त्यांचा फायदा या ब्रँडच्या विस्तारासाठीच होणार आहे. भारतातील ‘नॉनस्टिक’चे मार्केट साधारण 400 कोटी रुपयांचे आहे. निर्लेपची आजची विक्री 50 कोटींची असली तरी त्याचे ‘मार्केट व्हॅल्यूएशन’ 90 कोटींचे आहे. त्या आधारावर विचार केला तर चार वर्षांपूर्वीची 100 कोटींची निर्लेपची उलाढाल ताज्या आर्थिक वर्षात 50 कोटींवर आली असली तरी आजही निर्लेपकडे सुमारे 25 टक्क्यांचा मार्केट शेअर आहेच. भारतीय बाजारपेठेत आजही कुठल्याही ‘नॉनस्टिक’ला ‘निर्लेप’ म्हणूनच ओळखले जाते... ही या ब्रँडची खरी ताकद आहे. त्याचा उपयोग ‘बजाज’ला करून घेता येणार आहे...
--------------------

(दत्ता जोशी, औरंगाबाद)

साधारण फेब्रुवारीतील गोष्ट. माझ्या ‘गोईंग ग्लोकल’मधील लेखासाठी मी भोगले उद्योगसमूहाचे अध्यर्यू श्री. रामचंद्र भोगले यांच्याशी चर्चा करीत होतो. चर्चा या उद्योगसमूहातील अन्य उद्योगांबरोबरच ‘निर्लेप’बद्दलही सुरू होती. या आधीही, 2005-06 मध्ये माझ्या ‘झेप’च्या तयारीच्या वेळी ‘निर्लेप’ची संपूर्ण वाटचाल मी शब्दबद्ध केली होती. पण या वेळी चर्चा करताना काहीतरी ‘मिसिंग’ वाटत होते. पाठोपाठ, मे मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत ‘निर्लेप’चा सुवर्णमहोत्सव साजरा झाला, तेव्हाही त्या आनंदोत्सवात सहभागी होताना पाचेक वर्षांपूर्वी साजर्‍या झालेल्या भोगले परिवाराच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीच्या आणि त्याच वेळी मराठवाड्याच्या औद्योगिकरणाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याची आठवण मनात ताजी होती. हा सोहळा ‘निर्लेप’चा ‘निरोप समारंभ’ असावा, अशी शंकाही मनात आली नव्हती, पण काहीतरी वेगळे घडते आहे याची जाणीव अंतर्मन देत होते.

काल सर्वत्र ‘निर्लेप’चे समभाग ‘बजाज इलेक्ट्रिकल्स’कडे जात असल्याची बातमी वाचली आणि माझ्याच अंतर्मनाला साक्षी ठेवत मी स्मृतींचे सारे जुने तुकडे जोडू लागलो. मी आणि सारा मराठवाडाच भोगले परिवाराकडे आदर्श उद्योजक म्हणून पाहतो. त्यांची वाटचाल, त्यांचे निर्णय, व्यवहारातील पारदर्शकतेचा - सचोटीचा आग्रह, काळाप्रमाणे त्यांनी केलेले व्यवसायाचे डायव्हर्सिफिकेशन या सार्‍याच गोष्टी अभ्यासण्याजोग्या आहेत. सामाजिक क्षेत्रातही त्यांनी मिळविलेला मान आणि विश्वासार्हता देवदुर्लभ आहे. या पार्श्वभूमीवर ‘परिवाराची ओळख’ असलेल्या उद्योगातून 80 टक्के समभाग अन्य उद्योगाला विकणे ही गोष्ट धक्कादायक पण तरीही काहीशी अपेक्षित वाटावी अशीच ठरली.

या निर्णयाकडे मी थोडा वेगळ्या नजरेतून पाहतो. आपल्या घरात कुपोषित होत असलेल्या मुलाला मरणासन्न सोडायचे की संपन्न घरात दत्तक देऊन त्याच्या भरभराटीत आनंद मानायचा, हा ज्याच्या त्याच्या मानसिकतेचा प्रश्न असतो. उद्योगाच्या बाबतीत हा संदर्भ आणखी वेगळा असतो. विशेषतः मेंदूपेक्षा हृदयाच्या आदेशानुसार चालणार्‍या मराठी उद्योजकांच्या बाबतीत तर तो खूपच वेगळा असतो. पण अशा कुठल्याही भावनिक गुंत्यात न अडकता भोगले परिवाराने घेतलेला ही निर्णय मला त्यामुळेच दिशादर्शक वाटतो. भोगले आणि निर्लेप हे अद्वैत आहे. अशा स्थितीत हा निर्णय घेताना हे लोक कोणत्या मानसिक संघर्षातून गेले असावेत, याची कल्पना आपण कदाचित करू शकणार नाही. पण हा निर्णय ‘निर्लेप’च्या भरभराटीसाठी अतिशय पूरक ठरू शकेल, असे मात्र निश्चितपणे सांगता येईल.

000
बरोबर 50 वर्षांपूर्वी रुजुवात झालेल्या ‘निर्लेप’वरील मालकी ‘बजाज इलेक्ट्रिकल्स’कडे पुढील 2 वर्षांत टप्प्याटप्प्याने हस्तांतरीत होत आहे. ढोबळ विचार करायचा तर ‘निर्लेप’चे 80 टक्के शेअर्स ‘बजाज’ने विकत घेतलेले आहेत. 20 टक्के शेअर्स भोगले परिवाराकडे आहेत. ‘बजाज’ची उलाढाल साधारण 3 हजार 800 कोटींची आहे तर ‘निर्लेप’ साधारण 100 कोटी रुपये उलाढालीची कंपनी आहे. अर्थात मागील 3 वर्षांत उलाढालीचा हा आकडा उतरता आहे. ही कंपनी हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया साधारणपणे पुढील 2 वर्षे चालणार आहे. या काळात सध्या या कंपनीची जबाबदारी सांभाळणारे श्री. मुकुंद भोगले हेच कंपनीचे कामकाज सांभाळतील. पुढे गरजेप्रमाणे उर्वरित 20 टक्के शेअर्सबाबतचा निर्णय घेण्यात येईल.

‘एका मराठी उद्योगाचा अस्त’ वगैरे चर्चा काही ठिकाणी रंगते आहे. मला या चर्चेत फारसा अर्थ वाटत नाही. औद्योगिकरणाच्या प्रक्रियेत तो उद्योग जिवंत राहणे, त्यांचे मार्केटमधील अस्तित्व वर्धिष्णु असणे आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांचे रोजगार सुरक्षित राहणे महत्त्वाचे ठरते. मागील तीन ते चार वर्षे सातत्याने घसरता आलेख असणार्‍या उद्योगाला प्रतिष्ठेचा विषय करत बुडविण्याऐवजी गुंतवणुकीची योग्य संधी शोधत तो ब्रँड जिवंत ठेवण्याचा व्यावसायिक विचार गरजेचा होता. श्री. राम भोगले यांच्या नेतृत्वाखालील या उद्योगसमूहाने तोच विचार केला आणि भोंगळ मराठी मानसिकतेत न अडकता संपूर्णतः व्यावहारिक विचार करीत त्यांनी परिस्थितीवर मार्ग काढला.

यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘भोगले ग्रुप’मध्ये ‘निर्लेप अप्लायन्सेस’वगळता इतर कंपन्यांची मिळून उलाढाल ‘निर्लेप’च्या किमान 10 पट आहे. म्हणजेच, सुमारे 600 कोटींची उलाढाल नोंदविणार्‍या उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी नुकसानीत जाऊ लागलेल्या उद्योगाबाबत भोगले परिवाराने परिस्थितीसापेक्ष व्यावहारिक विचार केला आणि एक उद्योग जिवंत ठेवण्यात यश मिळविले.

000
ही आव्हाने नेमकी कोणती? श्री. राम भोगले यांनी या बाबत 3 मुद्दे स्पष्ट केले.

1) ‘निर्लेप’ज्या विषयात काम करते आहे त्या क्षेत्रात मागील 5 ते 6 वर्षांत अनेक मोठे उद्योग आले. त्यांची गुंतवणूक हजार कोटींपेक्षा अधिक आहे. अशा कंपन्यांच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तशाच सक्षम कंपनीशी युती करणे गरजेचे होते.

2) चिनी बाजारपेठेच्या आव्हानांची चर्चा आपण ऐकत असतो. भारतातील काही उत्पादक तिकडून अत्यंत कमी किमतीत ही सामुग्री बनवून आणून भारतात विकत आहेत. त्याला तोंड देण्याची ताकद मिळवायची तर तुमच्यात मोठी गुंतवणूक क्षमता हवी. ती ‘निर्लेप’मध्ये नव्हती.

3) भोगले परिवारातील तिसरी पिढी या उत्पादनात फारसा रस घेण्यास उत्सुक नव्हती. त्यांनी आपले संपूर्ण लक्ष ‘एआयटीजी’अंतर्गत उद्योगांवर केंद्रित केले आहे.

मागील दोन वर्षांत कंपनीची स्थिती अधिक बिकट झाली त्याला परदेशातील उत्पादनांचा बाजारपेठेतील मोठा व तुलनेत स्वस्तात उत्पादने देण्याचा विषय जसा कारणीभूत होता तसाच व्यापारी वर्गाच्या ‘जीएसटी’नंतरच्या अडचणींचा विषयही कारणीभूत ठरला. अर्थात ‘जीएसटी’चा विषय तात्कालीक होता आणि त्या धक्क्यातून हा उद्योग सावरत होताच. पण परकीय आव्हान पेलणे अवघड दिसत होते. मागील 5 वर्षे यावर विचारमंथन सुरू होते. त्यातून पूर्णतः भारतीय कंपनीलाच हा ब्रँड हस्तांतरीत करण्याचा निर्णय भोगले परिवाराने घेतला. हा व्यवहार पार पडलेला असला तरी हा उद्योग, यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ औरंगाबादेतच राहणार आहे.

000
चांगले मूल्य पदरात पाडून घेण्यासाठी कुठल्याही बहुराष्ट्रीय कंपनीला आपले समभाग विकण्याऐवजी ‘निर्लेप’ने घेतलेला ‘बजाज’शी हातमिळवणीचा निर्णय महत्त्वाचा म्हणावा असाच आहे. एक तर हा पूर्णतः भारतीय ब्रँड आहे. घरोघरी पोहोचलेला आहे आणि केवळ ‘किचन अप्लायन्सेस’मध्ये काम न करता घराला लागणार्‍या सर्व प्रकारच्या उपकरणांमध्ये काम करणारा आहे. पंखे, गॅस शेगड्या, ओव्हन, मिक्सरपासून बल्ब - ट्यूबपर्यंत अनेक उत्पादने या उद्योगाने भारतभर रुजविली आहेत. त्यांच्या याच बळाचा वापर ‘निर्लेप’चा ब्रँड अधिक ताकदीने वाढण्यासाठी होणार आहे. मुळात ‘निर्लेप’ हा ‘बजाज’चा स्पर्धक ब्रँड नव्हता. त्यामुळे मार्केटमध्ये अतिशय चांगले गुडविल असलेला नवा ब्रँड मिळवून ‘बजाज’ने नव्या मार्केटची पायाभरणी केली आहे, असेच म्हणावे लागेल. हा ब्रँड अधिक ताकदीने विस्तारण्याची क्षमता त्यांच्यात आहे, त्यामुळे हा ब्रँड केवळ जिवंतच राहणार नाही तर खूप मोठा होईल याची शाश्वती नक्कीच आहे. या कंपनीचा ‘मार्केट अ‍ॅक्सेस’ निर्लेपपेक्षा मोठा असल्याने त्यांचा फायदा या ब्रँडच्या विस्तारासाठीच होणार आहे. भारतातील ‘नॉनस्टिक’चे मार्केट साधारण 400 कोटी रुपयांचे आहे. निर्लेपची आजची विक्री 50 कोटींची असली तरी त्याचे ‘मार्केट व्हॅल्यूएशन’ 90 कोटींचे आहे. त्या आधारावर विचार केला तर चार वर्षांपूर्वीची 100 कोटींची निर्लेपची उलाढाल ताज्या आर्थिक वर्षात 50 कोटींवर आली असली तरी आजही निर्लेपकडे सुमारे 25 टक्क्यांचा मार्केट शेअर आहेच. भारतीय बाजारपेठेत आजही कुठल्याही ‘नॉनस्टिक’ला ‘निर्लेप’ म्हणूनच ओळखले जाते... ही या ब्रँडची खरी ताकद आहे. त्याचा उपयोग ‘बजाज’ला करून घेता येणार आहे.

000
या पार्श्वभूमीवर ‘भोगले परिवारा’चे पुढे काय होणार, याची चिंता अनेकांना लागली आहे! अर्थात यातील कुणीही या उद्योगसमूहाला जवळून ओळखत नाही, त्यांना या उद्योगविश्वाचा विस्तार माहिती नाही पण मराठी उद्योजकांविषयीच्या ममत्वातून त्यांना ही चिंता लागली असावी, हे स्पष्ट आहे. वरच नमूद केल्याप्रमाणे हा ग्रुप आज सुमारे 600 कोटी रुपयांची उलाढाल करतो. ‘भोगले ग्रुप’ म्हणून ओळखता येईल अशा सात कंपन्या आज कार्यरत आहेत. ‘ड्युरावेअर प्रा. लि.’ आणि ‘सिल्व्हरलाईट प्रा. लि.’ या दोन नावांनी सुरू असलेले काम आता एकत्रितपणे ‘निर्लेप अप्लायन्सेस प्रा. लि.’ या नावाने सुरू झाले आहे. त्याच बरोबर ‘उमासन्स स्टील फॅब प्रा. लि.’ ‘भोगले कोटिंग्ज अँड पेन्टस् प्रा. लि,’ अशा कंपन्या ‘निर्लेप ग्रुप’मध्ये काम करतात, तर ‘मराठवाडा ऑटो कॉम्पो’, ‘उमासन्स ऑटो काम्पो’, ‘भोगले ऑटोमोटिव्ह प्रा. लि.’ या ऑटोमोटिव्ह आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील कंपन्या ‘एआयटीजी’च्या छत्राखाली एकत्र आल्या आहेत. त्यामध्ये विविध ऑटोमोबाईल कंपन्यांना कौशल्यपूर्ण व दर्जेदार सुटे भाग बनवून देण्यापासून ‘ओरोबोरस’ हा स्वतःचा सायकल ब्रँड आणि बॅटरी संचालित विविध कृषिपूरक उत्पादने ही निकट भविष्यातील या ग्रुपची प्रमुख बलस्थाने ठरणार आहेत.

थोडे विस्ताराने सांगायचे तर 2016 मधील एक प्रसंग सांगता येईल. सन 2016 च्या डिसेंबरमध्ये औरंगाबादेत एका कृषि प्रदर्शनाला भेट देण्याचा योग आला. एक एक स्टॉल पाहत पुढे जात असताना एका स्टॉलवर श्री. राम भोगले त्यांच्या सहकार्‍यांसह दिसले. त्यांची ओळख ‘निर्लेप’ अशी, पण या वेळी सर्वांच्या शर्टवर ‘एआयटीजी’चा लोगो... मी उत्सुकतेने तिकडे खेचला गेलो तर स्टॉलवर वेगळेच उत्पादन. माहिती घेतली तेव्हा लक्षात आले की ते ‘कापूस वेचणी यंत्र’ आहे...! श्री. भोगले म्हणाले - ‘हे आमचे नवे प्रॉडक्ट’.

कपाशी वेचणीत शेतकर्‍यांना होत असलेल्या त्रासाबद्दल ऐकून होतो. आजकाल शेतीत मजूरच मिळत नाहीत, ही परिस्थिती आहे. शिवाय, कपाशी वेचताना कडक बोंडामुळे बोटे रक्ताळतात, ही मजुरांची तक्रार जुनीच आहे. हे काम सहजतेने होण्यासाठी त्यांनी केलेले हे सुंदर संशोधन...! ‘श्रीजय 380 कापूस वेचणी यंत्र’ या नावाने 2018 मध्ये ते बाजारातही आले आहे. जेमतेम 1100 ग्रॅम वजनाचे, केवळ 12 व्होल्ट डीसीवर चालणारे हे छोटेखानी यंत्र एका छोट्या बॅटरीवर चालते. कापूस बोंडातून अलगद बाहेर ओढला जातो, तो या यंत्रातून मागे खेचला जातो. पाठीवर लावलेल्या पिशवीत तो जमा होत राहतो. पिशवी भरली की मोकळी करायची, काम पुढे चालू. एकदा बॅटरी चार्ज केली की 7 ते 8 तास काम चालू राहते. कुणी डोकेबाज शेतकरी असेल तर तो सोलर पॅनल लावूनही काम करू शकेल...!  8 तासांत एक यंत्र 60 ते 80 किलो कापूस वेचू शकते. महत्त्वाचे म्हणजे त्यात इतर पालापाचोळा खेचला जात नाही. कापूस स्वच्छ राहतो. जेमतेम 6 ते 7 हजारांत हे यंत्र त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे. मग माहिती मिळविण्याचा माझा प्रयत्न सुरू झाला. ‘अप्लाईड इनोव्हेशन टेक्नॉॅलोजी ग्रुप’च्या (एआयटीजी) अंतर्गत ‘उमासन्स ऑटो कॉम्पो’ची ही निर्मिती. ऑटो कॉम्पोनंट क्षेत्रातील कामे करत असतानाच संशोधनात्मक उत्पादनांची निर्मिती करून स्वतःचे ब्रँड प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने ‘एआयटीजी’ची स्थापना झाली.

000
श्री. राम भोगले सांगतात, “इंजिनिअरिंग उत्पादनात आम्ही अन्य उद्योगांना गुणवत्तापूर्ण उत्पादने पुरवीत आमचे वैशिष्ट्य जपले. पण त्याशिवाय थेट समाजापर्यंत पोहोचणारे इंजिनिअरिंग उत्पादन असले पाहिजे, या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू होते. त्यातूनच ‘कापूस वेचणी यंत्रा’ची निर्मिती झाली. आमच्या नव्या नावातच ‘इनोव्हेशन’ला ‘अप्लाईड’ या विशेषणाची जोड दिलेली आहे. या क्षेत्रात आम्हाला फक्त इनोव्हेशन सिद्ध करायचे नाही तर त्याची उपयोजितता, उपयुक्तताही प्रत्यक्षात उतरवायची आहे. त्या दृष्टीने हे उत्पादन आम्ही भारतात प्रथमच आणले...

“नवी दिशा ठरवताना आम्ही शेतीचा विचार डोळ्यांसमोर ठळकपणे ठेवलेला आहे. कृषिप्रधान मानल्या जाणार्‍या भारतात शेतीसमोर आज असलेली आव्हाने सोडविण्यात आम्ही आमचे योगदान दिलेच पाहिजे, या विचारातून आम्ही ही उत्पादने आणत आहोत. कापसाची वेचणी ही शेतकर्‍यांसमोर मोठी समस्या असते. ती सोडविण्याचा प्रयत्न आम्ही यशस्वीपणे केला. आता पुढील काळात शेतकर्‍यांना अत्यंत उपयुक्त ठरेल असे जमिनीचा पोत मोजणारे वेगळे यंत्र आम्ही बाजारपेठेत आणत आहोत. जमिनीतील ओल, त्यातील सामू (पीएच), त्यातील इतर घटक मोजणारे आणि त्याची आकडेवारी तात्काळ देणारे हे यंत्र शेतकर्‍यांच्या जीवनात क्रांती घडवून आणेल, असे आमचे भाकित आहे. त्या आधारावर पिकांना पाणी, खते व अन्य पूरक द्रव्ये कधी, कशी व केव्हा द्यायची हे ठरविणे शेतकर्‍याला सोपे जाईल. त्याची इतरांवरील अवलंबिता कमी होईल आणि तो वेगाने प्रगती करू शकेल असे आम्हाला अपेक्षित आहे...

“शेतकर्‍यांसाठीच आम्ही आणखी एका यंत्राची निर्मिती करीत आहोत. हे स्वयंचलित ‘ट्रिमिंग मशीन’ आहे. विशेषतः फळशेतीच्या क्षेत्रात, म्हणजे डाळिंब अथवा संत्र्यांच्या बागांमध्ये वा अशा प्रकारच्या अन्य शेतींमध्ये हे यंत्र उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येक मोसमाआधी अशा रोपांची छाटणी करणे गरजेचे असते. ही एक किचकट आणि कौशल्यपूर्ण प्रक्रिया असते. हाताने छाटणीत बर्‍याचदा एकसमानता नसते अथवा रोपांच्या फांद्या नीटपणे कापल्या जात नाहीत. रोपांची साल सोलवटली गेली किंवा त्यात योग्य प्रकारे छाटणी झाली नाही तर तेथे बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि फळबाग धोक्यात येते. हे सारे या यंत्रामुळे टळते आणि नेमकेपणाने छाटणी होऊन शेतकर्‍यांना त्याचा फायदा होतो...

“सन 2012-13 पासून शेतीपूरक उपकरणांवर आमचे संशोधन सुरू झाले आहे. 2015-16 मध्ये आम्ही चाचणीसाठीची यंत्रे विकसित केली आणि 2017 च्या उत्तरार्धात कापूस वेचणी यंत्र बाजारात आणले. आता अन्य यंत्रे क्रमाक्रमाने बाजारात येतील. या उत्पादनांच्या डिझाईन-डेव्हलपमेंटसाठी आम्ही ‘आय इन्व्हेंट लॅब्ज’ ही स्वतंत्र कंपनी स्थापन केली आहे.”

000
आंतरराष्ट्रीय क्षेत्रात शंभराहून अधिक वर्षांपासून उभे असलेल्या ‘फॅमिली बिझनेस’च्या यशकथा आपण वाचतो. भारतात त्या तुलनेत शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ टिकलेल्या उद्योगांची संख्या बरीच कमी. या पार्श्वभूमीवर ‘भोगलें’सारख्या उद्योजकीय कुटुंबाची काळानुरूप स्वतःत बदल घडवून सातत्यपूर्ण प्रगतीच्या पथावरील घोडदौड भारतीय मनाला नक्कीच समाधान देणारी असते. या परिवाराचे वैशिष्ट्य असे की तो केवळ उद्योगात रमला नाही आणि पैशाभोवती फिरला नाही. त्यांनी सामाजिक भान राखले.

आजही औरंगाबादच्या उद्योगजगताचा आणि समाजविश्वाचा निर्विवाद चेहरा म्हणून भोगले परिवाराला, या परिवाराचे प्रमुख म्हणून श्री. राम भोगले यांना समाजमान्यता आहे. हे लक्षणीय आहे. उद्योगविश्वातील मंदी, व्यावसायिक आव्हाने यांना तोंड देत हा समतोल राखणे ही कसोटीच असते. ती हा परिवार मागील अर्धशतकापासून पार करीत आला आहे.
प्रसंगपरत्वे, भावनेच्या गुंत्यात न अडकता योग्य वेळी योग्य निर्णय घेत जुन्या वाटा बदलत नव्या वाटा शोधणे हे खर्‍या उद्योजकाचे लक्षण असते. भोगले परिवार हेच करतो आहे. नव्या वाटा शोधताना, नवी, अभिनव, समाजाभिमुख उत्पादने बाजारपेठेत आणताना नजिक भविष्यात हा ग्रुप आणखी काही मोठी स्वप्ने प्रत्यक्षात उतरवणार आहे, मोठ्या सहकार्यातून मोठी उलाढाल मराठवाड्यात होणार आहे, हे माझे निरीक्षण.
या ग्रुपच्या वाटचालीला शुभेच्छा.

- दत्ता जोशी, औरंगाबाद

‘निर्लेप’बाबत अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा -
<http://dattajoshis.blogspot.com/2012/04/blog-post_21.html>

Wednesday, May 9, 2018

काश्मिरचे पर्यटन किमान 10 वर्षे विसरायला हवे...




(© दत्ता जोशी, औरंगाबाद)
भारतद्वेष या एकाच मुद्द्यावर सतत हैदोस घालणार्‍या काश्मिरातील धर्मांधांनी परवा एका निरपराध पर्यटकाला ठेचून मारले. श्रीनगरहून गुलमर्गकडे जाणार्‍या मार्गात श्रीनगरलगतच असलेल्या नारबल येथे या पर्यटकांच्या वाहनावर तुफान दगडफेक झाली. काश्मिरात सुरक्षादलांनी नुकत्याच केलेल्या कारवायांत अनेक पाकिस्तानी दहशतवादी ठार करण्यात आले. त्याचा विरोध म्हणून ही दगडफेक होती.
पोलिसांवर दगडफेक चालू होती, या गाडीवर चुकून दगड पडले, अशी भूमिका आता देशद्रोह्यांचा पुळका असलेले काही जण घेत आहेत. पण पर्यटकांची गाडी आहे, हे लक्षात येऊनही त्यावर तुफान दगडफेक झाली आणि त्यातील एक दगड लागून गंभीर जखमी झालेल्या आर. थिरुमणी सेल्वन या चेन्नईच्या युवकाला प्राण गमवावे लागले, हे सत्य दडवता येणार नाही.
‘पर्यटक आम्हाला प्राणापलिकडे प्रिय आहेत’, ‘आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सदैव तयार असतो’, ‘आम्हाला दहशतवाद मान्य नाही’, ‘भारतच आम्हाला प्रिय आहे’ असे अनेक सुविचार चार वर्षांपूर्वी माझ्या काश्मिरच्या सहलीत मी अनेकदा अनेकांकडून ऐकले होते. सगळ्या पर्यटनस्थळी काश्मिरी समाज चांगले आगत स्वागत करायचा, हेही खरे. पण हे ही तितकेच खरे, की मी माझ्या हाऊसबोटवाल्याच्या मागे लागून श्रीनगरच्या नागरी वस्तीत गेलो, तेव्हा त्याने मला माझा कॅमेरा बाहेर काढू दिला नाही की खाली उतरू दिले नाही. श्रीनगरच्या किल्ल्यावर लिहिलेल्या देशद्रोही घोषणा शहराच्या सर्व भागातून स्पष्ट दिसत होत्या. पर्यटकांच्या आर्थिक आधारावर तिथली अर्थव्यवस्था चालते, हे सगळ्यांनाच ठावूक आहे. या स्थितीत कदाचित स्थानिक पातळीवर अतिरेक्यांशी ‘सामंजस्याचे’ बोलणेही झालेले असू शकते. पण आता हे सामंजस्यही संपुष्टात आल्याचे दिसत आहे.
मला थेट 1988-89 ची आठवण येते. एखाद-दुसर्‍या काश्मिरी पंडिताचा बळी घेण्यापासूनच त्या काळ्याकुट्ट अध्यायाला प्रारंभ झाला होता. त्या वेळीही मानवतावादी, समाजवादी, साम्यवादी यांनी ‘तसे काही नाही’चाच सूर आळवलेला होता. त्यानंतर दोनच वर्षांत काश्मिर खोर्‍यातून साडेपाच लाखावर काश्मिरी पंडितांना सारे काही तिथेच सोडून विस्थापितांचे जीवन जगण्यासाठी पळ काढावा लागला होता. हजारोंचे बळी गेले होते. शेकडो बलात्कार झाले होते. या पार्श्वभूमीवर एका पर्यटकाच्या हत्येकडे वरवरच्या नजरेने पाहणे योग्य ठरणार नाही. काश्मिरच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेचा निषेध केला आहे, पण त्यांच्याच आदेशाने दगडफेक करणार्‍या हजारो जणांवरील खटले काढून घेण्यात आलेले होते. हा राजाश्रय गंभीर आहे.
इथे माझे उदारमतवादी मित्र लगेच ‘भाजप सत्तेत भागीदार असल्या’ची आठवण करून देणारी घाणेरड्या भाषेतील वाक्ये लिहितील. पण सत्तेत सहभागी असणे आणि मुख्यमंत्री असणे यात फरक असतो. भाजपा सत्तेत आहे म्हणूनच काश्मिरातील देशद्रोह्यांची अंडिपिल्ली बाहेर निघताहेत. फुटीरतावाद्यांचे आर्थिक हितसंबंध पुराव्यांनिशी हाती येताहेत. शेकडो अतिरेक्यांना जन्नतची सैर घडविली जात आहे. हे विसरता कामा नये.
सप्टेंबर 2017 मध्ये ‘जम्मू काश्मिर स्टडी सर्कल’च्या राष्ट्रीय परिषदेसाठी 3 दिवस जम्मूत होतो. जम्मूत असूनही कडेकोट बंदोबस्तात ही परिषद पार पडली. त्यात अनेक गोष्टींचा उहापोह झाला. सगळ्याच गोष्टी इथे मांडणार नाही. पण एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल. ती आहे जम्मू विभागाच्या वेगाने सुरू झालेल्या इस्लामीकरणाची. जम्मू-काश्मिर पुण्यभूमी मानली जाते. प्राचीन भारतीय परंपरेचा आरंभ इथूनच झाला. शेकडो-हजारो वर्षांची परंपरा सांगणारी असंख्य मंदिरे इथे उभी आहेत. अशा या राज्याचे तीन भाग पडतात. जम्मू, काश्मीर आणि लडाख. यातील लडाख बौद्धबहुल, काश्मिर मुस्लिम बहुल आणि जम्मू हिंदूबहुल असल्याचे सांगितले जाते.
काश्मिरचा जेमतेम चतकोर भाग भारतात शिल्लक आहे आणि पंडितांच्या विस्थापनानंतर तो पूर्णतः मुस्लिमव्याप्त झाला आहे. लडाखमध्ये बौद्ध आणि मुस्लिमांमधील विवाहसंबंध वेगाने वाढत आहेत आणि तेथे मुस्लिम लोकसंख्या 50 टक्क्यांवर पोहोचली आहे. जम्मू भागातही इस्लामीकरणाला वेग आला आहे. एकीकडे रोहिंग्या मुसलमानांची वस्ती वसवून जम्मूतील दहशतकेंद्राची जणू स्थापनाच तेथे झाली आहे. दुसरीकडे माहिती अशी येत आहे की जम्मू भागातील डोंगर-दर्‍यांमध्ये जिथे कुठे प्राचीन मंदिरे आहेत त्याला लागून जागोजागी नव्या मशिदी उभ्या राहात आहेत. काही ठिकाणी वापरात नसलेल्या मंदिरांचे रूपांतरही मशिदींत झालेले आहे. हा प्रकार गंभीर आहे.
आणखी एक निरीक्षण असे सांगते की ‘पोट भरण्यासाठी’ काश्मिरातील मुसलमान आता जम्मूमध्ये येतो आहे. जम्मू शहराचे विभाजन करणार्‍या तवी नदीच्या दुसर्‍या टोकाला, जिथे नवे जम्मू वसलेले आहे त्या भागात मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. भारतातील अन्य प्रांतातून तेथे जाऊन वास्तव्य करणार्‍या नागरिकांना कायद्याने मनाई आहे पण बांगलादेशी मुसलमान तेथे सुखेनैव राहतो आहे. त्यांना नागरी सुविधा मिळत आहेत. त्यांच्या हक्कांसाठी सर्वोच्च न्यायालयात कायदेपंडीत कायद्याचा कीस पाडत आहेत. त्याच वेळी काश्मिर खोर्‍यातून जम्मूत मुस्लिमांना आणून त्यांच्या वस्त्या उभविल्या जात आहेत. (अर्थात येथेही मानवतावादी - यामुळे काय होणार? हा तर नागरिकांचा हक्क आहे. असे तारे तोडू शकतात. पण त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की हे सारे जाणीवपूर्वक घडवून आणले जात आहे.)
या सार्‍या पार्श्वभूमीवर काश्मिरमधील या नव्या घटनेकडे पाहावे लागेल. भारतभरातून आणि जगभरातून काश्मिरात जाणार्‍या पर्यटकांवर तेथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्याच बरोबर केंद्रातून जाणार्‍या प्रचंड निधीवरही त्यांचे अस्तित्त्व अवलंबून आहे. पर्यटनातून अमाप पैसा कमावणार्‍यांकडून राज्याच्या महसुलात फारशी भर पडत नाही. कारण वीज नाममात्र किमतीत मिळते. पाण्याचेही तसेच. कुठल्याही रस्त्यावर टोल नाही. सारा पैसा केंद्र देते आणि स्थानिक नागरिक तो आपला हक्क समजतात.
हे सारे लाटूनही भारताशी एकनिष्ठ राहण्याची त्यांची नियत नाही. तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत ज्या सुरक्षा दलांनी त्यांना वाचविले त्यांच्यावरच दगडफेक करण्यात त्यांना शरम वाटत नाही. याचे कारण त्यांच्या धर्मांधतेत व फुटीर वृत्तीत दडले आहे. वाजपेयी सरकारने आणि आता मोदी सरकारनेही पूर्वांचलातील राज्ये आणि जम्मू-काश्मिरसाठी सढळ हाताने मदत केलेली आहे. दिल्लीत येऊन गेलेल्या अन्य सरकारांच्याा तुलनेत ही मदत अनेक पटींत आहे. याची कबुली स्थानिक नागरिकही देतात. पण तरीही ते भारताविरोधात, काश्मिरी पंडितांविरोधात आणि आता भारतीय पर्यटकांविरोधात हाती दगड घेतात. याच दगडांचे रूपांतर उद्या शस्त्रांत होऊ शकते.
आणि आता थोडे मानवतावादी, समाजवादी, साम्यवादी, पाकिस्तानवादी मंडळींबद्दलही लिहिले पाहिजे.
यांच्या ‘सलेक्टीव्ह विज्डम’ला माझा सलाम. 
मुद्दाम ‘सलाम’ करतोय, नमस्कार नाही.
मी देशाच्या अन्य भागात बळी गेलेल्या विविध निरपराधांची नावे घेणार नाही. विविध हत्यांवर या मंडळींनी केलेल्या मातमबद्दल बोलणार नाही. कारण बोलून उपयोग होणार नाही. कारण हे बुद्धीवादी म्हणवतात आणि आपल्या बुद्धीचा उपयोग विकृत युक्तिवादासाठी करतात.
त्यांचे शहाणपण केवळ निवडक विषय, व्यक्ती, प्रसंग आणि समाजांपुरतेच मर्यादित असते. त्यामुळेच ‘मुस्लिम दहशतवादी’ वृत्तींनी ‘काश्मिरा’त एका ‘हिंदू’च्या दगडाने ठेचून केलेल्या हत्येबद्दल बोलण्यात ते त्यांचा वेळ वाया घालणार नाहीत. टीव्हीवर चर्चा झडणार नाहीत. पेपरांत बातम्या येणार नाहीत. फेसबुकवर फोटो काळा होणार नाही. निषेधाच्या कॉमेंट येणार नाहीत. मेणबत्ती संप्रदाय अज्ञातवासात गेलेला असेल.
त्यांना बाजूला ठेवू. या देशाचे सामान्य नागरिक म्हणून एक काम करू... पुढची किमान 10 वर्षे काश्मिरच्या पर्यटनाचा विचार मनातून दूर ठेवू. मी हे लेखन करण्याआधी काही टूर ऑपरेटरांशी अनौपचारिक चर्चा केली. माहिती मिळविली. काही बड्या टूर कंपन्यांकडे पर्यटकांनी केलेल्या बुकिंगपैकी 75 टक्के बुकिंग मागील 2-3 दिवसांत रद्द झाले आहेत. बर्‍याच छोट्या टूर ऑपरेटरकडील निम्म्याहून अधिक ग्रुप अन्यत्र डायव्हर्ट होताहेत. त्यांनी हिमाचल, सिक्कीम-दार्जिलिंग, केरळ आदी पर्याय स्वीकारले आहेत. हे प्रमाण वाढते आहे. 1988-90दरम्यानच्या दहशतवादी उद्रेकानंतर तेथील पर्यटनाचा व्यवसाय थंडावला होता. पुढे सारे हिंदू खोर्‍याबाहेर गेल्याची खातरजमा झाल्यावर तेथील पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थानिक लॉबीने अनेक नाटके केली आणि अखेर भारतीय पर्यटक तिकडे पुन्हा वळला. मागची काही वर्षे थोड्याफार चढउतारांसह निभावली गेली.
मागच्या वर्षी अमरनाथच्या यात्रेकरूवर गोळीबार झाला. त्यात काहीजणांना हौतात्म्य पत्करावे लागले. आता या निरपराध तरुणाचा बळी. काश्मिरच्या या धुमसत्या बर्फाला आणखी किती बळी द्यायचे? कशासाठी? मोदी सरकार पाकिस्तानातून येणार्‍या अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात तर यशस्वी ठरतेय पण सीमेआतल्या या दहशतवाद्यांशी लढायचे तर आर्थिक रसद बंद करणे गरजेचे वाटते.
जोवर कुठल्याही बंदोबस्ताशिवाय 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला श्रीनगरच्या लाल चौकात ध्वजवंदन होणार नाही, सुरक्षा दलांवर दगडफेकीची शेवटची घटना घडल्याला किमान 3 वर्षे होणार नाहीत, जोवर स्थानिक नागरिक दहशतवाद्यांना आश्रय देणे नाकारणार नाहीत तोवर काश्मिरचे सौंदर्य पाहणे टाळायला हवे. भारतीयांच्या पैशातून देशद्रोही पोसणे योग्य नव्हे. काश्मिरात जाण्यावाचून काही अडण्याचे कारण नाही. टूर आॅपरेटरनी सुद्धा या विषयात सकारात्मक भूमिका घ्यावी आणि पर्यटकांच्या जीविताची नैतिक जबाबदारी घेत तेथील टूर टाळाव्यात.
हा देश आपलाच आहे. देशाच्या सगळ्या भागात आपण गेलाेच पाहिजे. पण जिथे आपल्या जीविताची हमी नाही उलट आपल्या आर्थिक याेगदानातून उलट दहशतवादच फाेफावताेय, तिथे जाणे काही काळ तरी टाळायला हवे.
-दत्ता जोशी
औरंगाबाद

Friday, April 13, 2018

कथुआ... घृणास्पद गुन्हे आणि राष्ट्रविघातक वस्तुस्थितीचे तीन पैलू...


(दत्ता जोशी, औरंगाबाद)
----------------
हे लेखन जम्मूतील जबाबदार, माहितगार व्यक्तींकडून माहिती घेऊन केलेले आहे.
------------------
जम्मू-काश्मीरमधील कथुआ येथील एका अबोध बालिकेवर झालेल्या अत्याचारामुळे देश ढवळून निघाला. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजेच. कथुआ, उन्नाव ही ओठांवर असलेली नावे. पण एनएच 12 वर चार नराधमांनी एका बालिकेवर केलेला अत्याचार असो, उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये 28 मार्चला 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचे प्रेत कालव्यात फेकणारे गुन्हेगार असोत, आसामातील पाचव्या वर्गात शिकणार्‍या मुलीवर पाच नराधमांनी केलेला पाशवी अत्याचार असो, बिहारच्या सासराममध्ये झालेला अल्पवयीन मुलीवरील बलात्कार असो की औरंगाबादेत एका मदरशाच्या मुख्याध्यापकाने आपल्याच विद्यार्थीनीवर केलेला बलात्कार... या आधी झालेले अन्य बलात्कार असोत की या पुढे दुर्दैवाने होणारे बलात्कार... बलात्काराच्या गुन्हेगाराला क्रूरपणे ठेचून मारण्याचीच शिक्षा झाली पाहिजे. यात कसलाही संशय नाही.

इथे वैयक्तिक सांगायचे तर ही भूमिका मी मागील 20 वर्षांपासून मांडतो आहे. या गुन्ह्यात मानवाधिकाराला, गुन्हेगाराची मानसिकता समजून घेऊन त्याच्या सुधारणेला जागा ठेवण्यात येऊ नये. त्याला ठारच केले पाहिजे. त्यामुळे मेणबत्तीछाप आंदोलकांच्या भूमिकेला मी सातत्याने विरोधच केला आहे. या गुन्हेगारांना ठेचूनच ठार केले पाहिजे. ते कुणीही असोत, कुठल्याही जातीधर्मपंथाचे असोत, कुठल्याही राजकीय पक्षांचे, संघटनांचे असोत... त्यांना कुठलीही दयामाया दाखवता कामा नये. यासाठी कायद्यात जे काही बदल करावे लागतील, ते केले पाहिजेत. ऐनवेळी काहींना मानवतावादी पुळका येतो. कायद्यातील अशा बदलांना जे विरोध करतील त्यांनी यापुढे अशा प्रकरणांची जबाबदारी घेतली पाहिजे. त्यांना या गुन्ह्यात सहगुन्हेगार म्हणून ट्रीट केले पाहिजे.
000

एकीकडे अशा गुन्ह्याला कठोर शिक्षेची मागणी करत असतानाच या प्रकरणी आवाज उठविण्यामागील भूमिकेवरही थोडे लक्ष दिले पाहिजे असे मला वाटते. दुर्दैवाने भारतात अशा कुठल्याही सामाजिक विषयात आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्याची आणि कारण असो वा नसो इतरांना होरपळविण्याची अहमहमिका लागलेली असते. कुठलाही राजकीय पक्ष याला अपवाद नाही. मानवतावादी चेहरा पांघरलेल्या काही संघटना अनेकदा अशा संधींचा शोध घेत असतात आणि अशा जिव्हाळ्याच्या विषयावर समाजात तणाव आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. समाजाने यातील धोका ओळखला पाहिजे आणि असा रंग देणार्‍या कुणालाही दूर ठेवले पाहिजे.

कथुआच्या प्रकरणात जे घडते आहे ते अगदी सरळ साधे नाही. ज्या निष्पाप, निरागस मुलीवर बलात्कार झाला आहे ते सारेच्या सारे नराधम ठेचलेच गेले पाहिजेत. त्यांना एक क्षणही जिवंत राहण्याचा हक्क नाही. हे असे झाले तरच त्या मुलीला न्याय मिळेल. पण या गोष्टीच्या आडून जे भयानक राजकारण खेळले जात आहे ते देशासाठी घातक आहे. यातील एकही वाक्य मी भावनेच्या भरात लिहीत नाही. या विषयाचा अभ्यास करून, जम्मूतील जबाबदार माहितगार व्यक्तींकडून माहिती घेऊनच मी हे लेखन करीत आहे. याला कुठलाही संकुचित रंग नाही, याची खात्री बाळगावी.
000

कथुआत गुन्हा काय घडला, कसा घडला, त्याचे गुन्हेगार कोण यात मला जायचे नाही. ते सगळ्यांना ठावूक आहे. पण घडलेल्या या घृणास्पद गुन्ह्यानंतर त्याचा आधार घेऊन जे राजकारण पेटविले जात आहे ते त्याहून अधिक घृणास्पद आहे. त्याला जातीय, धार्मिक आणि आंतरराष्ट्रीय पैलू आहेत. त्यातील एक एक मुद्दा विचारात घेऊ.
000

1)
हे प्रकरण मुस्लिम मुलीवर हिंदूंनी केलेले अत्याचार आणि त्याला सार्‍या हिंदू समाजाचा पाठिंबा असे रंगविले जात आहे. वस्तुस्थिती अजिबात तशी नाही. यातील मूळ वृत्त - ‘मुलगी मुस्लिम समाजातील आहे व गुन्हेगार हिंदू समाजातील आहेत’, हे सत्य आहे. पण त्यानंतरचे रंगवले जाणारे चित्र कपोलकल्पित आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे आहे.

या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी जे प्रत्यक्ष लढताहेत त्यांचा परिचय आपण आधी करून घेऊ. त्यातील पहिल्या आहेत अ‍ॅड. दीपिका सिंग राजावत. त्या अत्याचारित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी कंबर कसून मैदानात उतरल्या आहेत. समाजकंटकांकडून मिळणार्‍या धमक्यांना न जुमनता त्यांनी या प्रकरणात आपले अस्तित्त्व कायम ठेवले आहे.

जम्मू काश्मिर पोलिसच्या क्राईम ब्रांचचे एसएसपी रमेशकुमार जाला हे अत्यंत स्वच्छ व कर्तबगार इतिहास असलेले वरिष्ठ पोलिस अधिकारी या प्रकरणाचा तपास करीत आहेत आणि अतिशय विक्रमी वेळेत परिणामकारकपणे कामगिरी बजावत त्यानी दोषींना गजाआड केले आहे. हे प्रकरण मजबुतपणे उभे राहिल आणि गुन्हेगारांना शिक्षा होईल या साठी ते प्रयत्नशील आहेत. जम्मू काश्मिर पोलिस दलाचे एसपी श्री. वेद यांनी अत्यंत समतोल भूमिका घेत या प्रकरणी प्रारंभापासून लक्ष घातलेले आहे. गुन्हेगार कोणीही असोत, ते मोकाट सुटता कामा नयेत असे स्पष्ट आदेश त्यांनी दिलेले आहेत. जम्मू चेंबर ऑफ कॉमर्सने या सर्व प्रकरणात अत्याचारित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. त्यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन या मुद्द्याला दुजोरा दिला आणि काही जणांनी जातीय भूमिकेतून पुकारलेल्या जम्मू बंदला विरोधही केला. राहूल पंडित नावाच्या लेखक व पत्रकाराने पहिल्या दिवसापासून या विषयी जनजागृती केली, आपली भूमिका लावून धरली. योगायोग असा की वर उल्लेख केलेले सगळेच जण हिंदू आहेत. ते एका ‘मुस्लिम’ मुलीवरील अत्याचार्‍यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हा विषय हिंदू - मुस्लिम नाही, अबोध बालिका आणि नरपशू असाच आहे. सगळ्यांनीच कुठलाही अभिनिवेष न आणता हा मुद्दा महत्त्वाचा मानला पाहिजे.
000

2)
या गुन्ह्यात ज्या निरागस मुलीवर अत्याचार झाले, ती मुस्लिम समाजातील होती. पण त्यातही थोडे खोलवर पाहायचे तर ती गुज्जर मुसलमान होती. जम्मू काश्मिरातील मागील काही दशकांच्या दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर, मुस्लिम समाजातील जे मोजके समुदाय भारताशी एकनिष्ठ राहिले, त्यातील गुज्जर समाज हा महत्त्वाचा. कथुआ जिल्ह्यात या समाजाची संख्या लक्षणीय आहे. राजस्थानातून काही शतकांपूर्वी स्थलांतरीत झालेला हा मूळचा हिंदू गुज्जर, कालौघात अपरिहार्यतेत त्यांनी तलवारीच्या धाकाने इस्लाम स्वीकारला पण त्यांच्या घरांतून आजही पांरपरिक देवतांची पूजा होत असते. त्यामुळेच जम्मू काश्मिर व भारताशी या समाजाची बांधिलकी अविचल आहे. या राज्यात डोगरा आणि पंडित हे दोन समाज प्रबळ समजले जातात. गुज्जरांचे या समाजांशी चांगले नाते आहे. जम्मू काश्मिरातील दहशतवादाचे उच्चाटन करून तेथील विस्कळीत जनजीवन सांभाळण्याचे प्रयत्न करण्यात मुस्लिमांतील जे गट भारताला मदत करतात त्यात तेथील शिया समाज आणि गुज्जर समाज यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सौहार्दाची ही वीण उसवण्याचा आणि त्या द्वारे आजवर शांत राहिलेल्या जम्मू भागातही असंतोष पसरवून हा भागही काश्मिर खोर्‍याप्रमाणेच भारतापासून तोडण्याचा प्रयत्न या घटनेद्वारे केला जात आहे.
000

3)
या प्रकरणाला एक पदर रोहिंग्या मुसलमानांचाही आहे. म्यानमारमधून पळ काढलेले क्रूर आणि रानटी रोहिंगे आधी बांगलादेशच्या आणि नंतर भारताच्या भूमीत आले. म्यानमार आणि भारत यांची सीमा पूर्वांचलात आहे. तेथून जम्मू काश्मिरचे अंतर सुमारे 3 हजार किलोमीटर आहे. हे अंतर पार करून काही हजार रोहिंगे मुसलमान 2013-14 पासून जम्मूजवळ पोहोचले. हे कसे आले, त्यांना कोणी आणले, त्यांना कोणी वसवले याची उत्तरे तर्काने शोधता येऊ शकतात.

गंभीर बाब ही आहे की क्रूर रोहिंग्या मुसलमानांची ही वस्ती जम्मूलगत, जम्मू-श्रीनगर महामार्गालगत छन्नी परिसरात आहे. गंभीर बाब ही आहे, की या भागात भारतीय लष्कराचा जम्मूतील सर्वात मोठा तळ आहे आणि त्या तळाच्या कुंपणाला लागूनच ही वस्ती उभारण्यात आलेली आहे. हे रोहिंगे मुसलमान भारतात शांतीदूत म्हणून तर आलेले नाहीत. म्यानमारमधील शांतताप्रिय, अहिंसक बौद्धांनाही यांच्या क्रौर्यामुळे हाती शस्त्र घेण्याची वेळ आली त्यामुळे हे तेथून बाहेर पळाले. जेथे जातील तेथे दहशत माजवणे आणि इस्लामचा प्रसार करणे हा त्यांचा उद्देश आहे. त्याच उद्देशाने त्यांना जम्मूत वसवण्यात आले आहे. तेही लष्करी तळाजवळ.

त्याचे परिणाम समोर आले आहेत. नुकताच झालेला लष्करी तळावरील हल्ला आठवत असेलच. हा हल्ला करणारे पाकिस्तानी दहशतवाद्यांना याच वस्तीत आठवडाभर आश्रय देण्यात आला होता आणि त्याच भागातून त्यांनी लष्करी तळावर हल्ला चढविला. इतकेच नाही तर नुकतीच जम्मू भागात लष्करी जवानांवर दगडफेकीची पहिली घटना घडली ती ही याच भागात. आजवर काश्मिर खोर्‍यात होत असलेला हा घाणेरडा प्रकार आता जम्मूत सुरू झाला आहे. तो रोहिंग्या मुसलमानांच्या तळावरून. त्यातही महत्त्वाची बाब ही आहे की काश्मीर खोर्‍यातून विस्थापित झालेल्या पंडितांची छावणी याच परिसरात असून तेथे हजारो काश्मिरी पंडित परिवार वास्तव्याला आहेत. त्यांच्या मनात दहशत माजविण्याचे काम हे रोहिंगे मुसलमान करीत आहेत. या घुसखोरांविरूद्ध जम्मूत जनआक्रोश आहे. तो वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर पडतो आहे. जम्मूतील वकिलांच्या आंदोलनाला हाही एक पदर आहे.
000

हा सारा विषय समोर येऊ लागल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी काँग्रेस आणि डावे प्रणित आघाडी सक्रीय झाली. त्यांच्या हाती कथुआ प्रकरणाने आयते कोलित मिळाले. त्या आधारावर अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने राळ उडविण्यात आली. मिडिया सक्रीय झाला. सोशल मिडियातून चक्रे फिरू लागली. हिंदू समाज मुळातच सोशीक आणि नैतिकतेची चाड बाळगणारा आहे. त्यांच्या भावनांना आवाहन करून हवी तशी प्रतिक्रिया नोंदवून घेण्यात या धुरिणांना यश आले. आरोपीला दगड़ाने ठेचुन मारा असे पवित्र कुरआन मधे म्हटले आहे. हिंदूंमध्ये परस्त्री मातेसमान आणि तिच्या शीलावर आक्रमण हे आक्षेपार्ह मानले गेले आहे. त्यामुळेच विष्णुची पूजा फारशी होत नाही. अनैतिक वर्तनामुळे प्रत्यक्ष परमेश्वरालाही वाळित टाकणार्‍या हिंदू समाजात बलात्कार्‍यांना मान मिळत नाही. हा समाज सगळे गुन्हे क्षम्य मानतो, पण परस्त्रीची विटंबना करणार्‍याला क्षमा करत नाही. ही दुखरी नस पकडून धर्माशीच खेळ मांडण्यात आला.
000

हे सारे समजावून घेतल्यानंतर आता एका घातक आंतरराष्ट्रीय कारस्थानाबद्दल समजून घेतले पाहिजे. हा सारा ‘ऑपरेशन स्मियर’चा भाग आहे.
000

भारत एकेकाळी जागतिक बाजारपेठेत अग्रणी होता. ब्रिटिशकाळात येथील प्रक्रिया उद्योग बंद पाडून कच्च्या मालाच्या निर्यातीतून इंग्रजांनी भारतीय उद्योग - व्यापाराची कंबर तोडली. जागतिक बाजारपेठ काबीज करण्याची भारताची क्षमता नक्कीच आहे. भौगोलिक स्थिती, नैसर्गिक साधनसंपत्ती, उत्तम मनुष्यबळ, अपार बुद्धिमत्ता यांनी हा देश नटलेला आहे. हे सारे देशभावनेने प्रेरित होऊन उभे राहिले तर जगात पुन्हा एकदा अग्रमानांकन मिळविणे भारताला अवघड नाही. हीच भीती असलेल्या प्रगत म्हणवणार्‍या देशांनी जेथे शक्य असेल तेथे भारताला ठेचण्याचा प्रयत्न नव्याने सुरू केला आहे. विविधतेत असलेली एकता ही भारताची खरी शक्ती आहे. त्यालाच सुरूंग लावण्याचे कारस्थान शिजलेले आहे. आज केंद्रात सत्तेवर असलेले सरकार भ्रष्टाराचापासून दूर आहे, अनेक दूरगामी योजना देशाचे चित्रच बदलण्याती ताकद असलेल्या आहेत, काही मोजके निर्णय चुकले असले तरी समाज सर्वसाधारणपणे या सरकारच्या पाठीशी आहे हे चित्र या विघातक शक्तींना अस्वस्थ करणारे आहे.
अशा स्थितीत देशात अराजक पसरविण्याचे षड्यंत्र या शक्तींनी रचले आहे. कोट्यवधी डॉलर या कामी खर्च होत आहेत. गुडघ्याला बांशिंग बांधून बसलेल्या सत्तातुरांना हाताशी धरून या सार्‍या शक्ती एकवटत आहेत. यात साम्यवादी आहेत, काँग्रेस आहे अगदी चर्चही आहे... भारतातील सहिष्णुता धोक्यात आणणे, भारत असुरक्षित आणि अस्थिर देश आहे, अशी बदनामी करणे, भारताच्या मानचिन्हांना कलंकित करणारे म्हणजे रामाऐवजी रावणाचे पूजन वगैरे उपक्रम आयोजणे, जेएनयू सारख्या ठिकाणाहून भारतविरोधी कारवाया चालवणे याला वेग येत आहे.

गुजरातच्या निवडणुकीत जातीय विभाजनाचा प्रयोग झाला. एकीकडे राहूल गांधींच्या बेजबाबदार साथीदारांनी जातीय विषपेरणी केली आणि दुसरीकडे राहूल स्वतः मोदींना विकासाच्या अजेंड्याचा जाब विचारत राहिले. हा दुटप्पीपणा सर्व स्तरांवर सुरू आहे. महाराष्ट्रातील भीमा कोरेगावची घटना त्याचेच प्रतीक. त्यातूनच कर्नाटकात लिंगायत पंथाला वेगळ्या धर्माची मान्यता देण्याचा घातक खेळ करण्यात आला. हे सारे देश तोडणारे षड्यंत्र आहे. हे प्रकार वाढत जात आहेत. ‘भारत तेरे टुकडे होंगे-इन्शाअल्ला’ च्या घोषणा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि ‘भारत माता की जय’ म्हणजे जबरदस्ती असे घातक युक्तीवाद करण्यात येऊ लागले आणि सर्वोच्च न्यायालयातील चांडाळ चौकडी म्हणता येईल असे उच्चपदस्थ अशा प्रकरणांना तात्विक मुलामा देत देशद्रोह्यांना साथ देऊ लागले. हा योगायोग नसतो. हा न्यायही नसतो. इथे पैसा बोलतो...!

बलात्काराच्या काही घटनांची यादी मी वर दिली आहे. कथुआ आणि उन्नाव वगळता इतर सर्व ठिकाणी अत्याचाराची बळी ठरलेली व्यक्ती हिंदू आहे आणि बलात्कारी मुसलमान. औरंगाबादेत तर अत्याचारित मुलगी आणि बलात्कारी मौलवी हे दोघेही मुसलमान आहेत. येथे या प्रकरणी हल्लागुल्ला होत नाही. असे का? धार्मिक स्थळातील अत्याचाराचा दाखला दिला जातो, त्या मंदिरात सतत आठ दिवस बलात्कार कसा केला जाऊ शकतो, तिथे लोक दर्शनासाठी येत नव्हते का, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. असे कसे?

अत्याचारी कुठलाही असो, तो अत्याचारीच असतो आणि त्याची लायकी ठेचून मारण्याचीच असते. असे असताना हा ‘सलेक्टीव्ह विज्डम’ कशासाठी? त्यामुळे या भारतमातेच्या कुठल्याही लेकरावर झालेला अत्याचार हा भारतमातेवरच झालेला अत्याचार आहे असेच मानले पाहिजे आणि प्रत्येक गुन्हेगाराला ठेचूनच मारले पाहिजे. यात जातीय, धार्मिक रंग येऊ देता कामा नये.

पण आता मनाचा भडका उडविणार्‍या प्रसंगांत प्रतिक्रिया देण्याआधी आपण ‘ऑपरेशन स्मियर’चे बळी ठरत नाहीयत ना, याची खात्री प्रत्येक भारतीयाने करून घेतली पाहिजे. कोट्यवधी डॉलर्स खर्च करून अशा मोहिमा आखल्या जात आहेत. एक कर्तबगार सरकार पाडून बालिश व्यक्तीच्या हाती देशाची सूत्रे द्यावीत या साठी प्रयत्न होत आहेत. कठोर आर्थिक धोरणांमुळे दुखावलेले अनेक जण सरकारच्या विरोधात जात आहेत. पण जोवर समाज या सरकारबद्दल समाधानी आहे, तोवर त्यांना यश येणार नाही हे पक्के झाल्याने आता समाजाची दिशाभूल करण्याचा, त्यांच्यात असंतोष पेटवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. ही सावध राहण्याची, सावध करण्याची वेळ आहे.

आज इथे इतकेच.
भारत माता की जय.

Saturday, February 24, 2018

तेलुगु-मराठी सांस्कृतिक सेतू...

तेलुगु-मराठी या भाषाभगिनींच्या संवादसेतूच्या रुपाने लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी बजावलेली भूमिका अमूल्य आहे. पिढीजात उद्योजक असलेल्या बोल्ली यांनी आपला उद्योग सांभाळतानाच सहित्याच्या प्रांगणात वेगळे अस्तित्त्व सिद्ध केले. भाषांवरून भेद निर्माण करणार्‍या प्रादेशिकवादावर सांस्कृतिक एकात्मता, भाषिक सौहार्द हेच उत्तर ठरू शकते. याच संदर्भातील श्री. बोल्ली यांच्या प्रयत्नांबद्दल...
-------------------------------------

मागे रहो नको मजू बाप म्हणता 
भागवते वटे भक्त ते म्हणता
चरलिंग गुरुलिंग शंभु तु म्हणता
पुरवर कितिदूर हर हो ते म्हणता
मग मरहाटाचा महादेवु आमचा
गगनराणा आमचा, सुखदेवु आमचा

मराठी भाषेला साक्षात महादेवाची उपमा देत, गगनराणा म्हणत, एवढेच नव्हे, तर सुखदेव - अर्थात सुखकर्ता म्हणत ‘पालकुर्कि सोमनाथ’ या प्राचीन काळी होऊन गेलेल्या तेलुगू कवीने मराठीची पताका उंचावली आहे. तेलुगू-मराठीच्या आदानप्रदानाचा हा शुभारंभ होता?

मराठीतील आद्यकवी म्हणून मुकुंदराज यांचा उल्लेख होतो. आद्यकवी मुकुंदराज यांनी सन 1160 मध्ये ‘विवेकसिंधू’ची रचना केली. ती मराठीतील / प्राकृतातील पहिली रचना मानली जाते. पण सन 1130 मध्ये पालकुर्की सोमनाथ या तेलुगू कवीने ‘पंडिताराध्य चरित्र’ या ग्रंथातील पर्वत प्रकरणात 220 व्या पानावर 22 ओळींची ही रचना मांडली आहे. हे लेखन तेलुगू लिपीत आहे पण भाषा प्राकृत आहे. तेलुगूंना ते उच्चार कळत नसत, त्यामुळे अर्थ लागत नसे. लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी हे वाचले आणि त्यांच्या असे लक्षात आले, की भाषिक एकात्मतेचा हा आगळा आविष्कार आहे. त्याच बरोबर ‘विवेकसिंधू’च्याही आधी मराठीत आलेली ही रचना ऐतिहासिक ठरणारी आहे. हा विषय त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्यासमोर ठेवला. 1988 मध्ये ठाण्याच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या  जागतिक मराठी परिषदेत पुलंनी लक्ष्मीनारायण बोल्ली यांची याच विषयावर मुलाखत घेतली. मराठी- तेलुगू या दोन भाषाभगिनींतील दुवे बोल्ली यांच्यामुळे जगासमोर येण्यास प्रारंभ झाला. सहित्य जगाला जोडते, याची प्रचिती या दोन भाषांत येऊ लागली ती त्यांच्याच मुळे...!

प्रासादिक मराठी काव्यरचना करणार्‍या, तेलुगुची मराठीत भाषांतरे करणार्‍या आणि मराठीतून तेलुगू भाषांतर करण्याचा अनुभव असलेल्या लक्ष्मीनारायण बोल्ली त्यांच्या वयाच्या 18 व्या वर्षापयर्यंत नीटपणे मराठी भाषा बोलता येत नव्हती आणि तेलुगू सुद्धा ते पुढे वाचून वाचून शिकले, असे सांगितले तर आश्चर्य वाटते. आंध्रप्रदेशातून सोलापुरात आलेल्या असंख्य विणकरांपैकी हा एक परिवार. त्यांच्या आजोबांनी मेहनतीने स्वतःचा छोटा कारखाना टाकला, वडिलांनी त्याचा विस्तार केला. ती परंपरा जोपासतानाच लक्ष्मीनारायण यांच्यात भाषेचे बीज पेरले गेेले. त्यातून पुढचा प्रवास उलगडत गेला.

इतिहासाचा धावता आढावा घेताना ते सांगतात, “रझाकाराच्या छळाला कंटाळून आंध्रप्रदेशातील (तेव्हाच्या हैदराबाद संस्थानातून) मोठ्या संख्येने हिंदू विणकर तेथून बाहेर पडू लागले. या छळात तेथील रेड्डी किंवा भूस्वामी यांनीही आपापला वाटा उचलला होता! आजच्या कर्नाटकचा सुद्धा काही भाग त्या संस्थानात होता. अशा प्रकारे कन्नड आणि तेलुगू भाषक लोकांचा ओघ त्या काळात इंग्रजांची राजवट असलेल्या सोलापुरात वाढला. कारण हे अंतर त्यांच्या गावांपासून मजल दरमजल करत चालत गाठण्यासारखे होते. साधारणपणे 1890-1900 च्या दरम्यान हे स्थलांतर सुरू झाले. हा समाजातील आर्थिक दुर्बल घटक होता. अज्ञानी होता. पण त्यांच्या हातात कला होती. विणकामाच्या काठ्या, धोटे घेऊन हे लोक सोलापूरच्या हद्दीत आले. अगदी सुरवातीला आलेल्या गटाला त्या वेळी पोलिसांनी अडवले. हातात काठ्या असल्यामुळे त्यांचा गैरसमज झाला होता. पण हे निरुपद्रवी विणकर असल्याचे लक्षात येताच तेव्हाच्या कलेक्टरनी त्यांची सुटका केली. पुढे कुठे जाणार हा प्रश्नच होता. त्यांनी कलेक्टरकडेच आसरा देण्याची विनंती केली. तेव्हा वेशींच्या आतील सोलापूर गच्च भरलेले होते. शहराच्या पूर्वेला त्यांनी या समाजाला जागा दिली आणि सारा समाज तेथे एकवटला. अन्य कोठेही नसलेले विणकर एकत्र राहण्याचे चित्र सोलापुरात दिसते ते त्यामुळे. याच कारणामुळे त्यांनी आपली भाषा, संस्कृती जोपासली. जिवंत ठेवली.”

“तेव्हा सोलापुरात कापड मिल चालू होती. काही काळाने तोट्यात गेलेली ही मिल त्याच्या मालकाने तोडली. तेव्हा या विणकरांपैकी काहींनी त्यांना विनंती करून तेथील यंत्रसामुग्री मिळविली. त्या काळात खड्डामाग चालत. त्यावर विमकाम सुरू झाले. पुढे खड्डामागांची रुपांतरे पायडल मागात झाली आणि त्यानंतर फ्रेमलूम आल्या. प्रत्येक स्थित्यंतरात उत्पादनात सुधारणा होत गेल्या. विणकर सहकार तत्वावर एकत्र आले...

“पुढे सरकारने त्याला उद्योगाचा दर्जा दिला त्याच वेळी परवाने पद्धतीचा फासही आवळला. अशिक्षित विणकरांना त्यातील कायदेशीर तरतुदी ठावूकच नव्हत्या. अधिकार्‍यांनी त्या काळात या विणकरांना खूप नाडल्याच्या तक्रारी आल्या. तंत्र सुधारत होते. उत्पादन अधिकाधिक चकचकीत होऊ लागले होते. पण आता कामगारांचा प्रश्न निर्माण होऊ लागला होता. कामगारांच्या दुर्लक्षामुळे मालाचा दर्जा घसरणीला लागला. परिणामी सोलापुरातील वस्त्रोद्योग डबघाईला आला. आज जे उद्योग चालू आहेत, त्या प्रत्येक उद्योगाबाहेर कामगार हवे असल्याच्या पाट्या सदोदित लावलेल्या असतात. कामगार हवे आहेत. पण ते मिळत नाहीत. या उद्योगातील नवी पिढी यात उतरण्यास तयार नाही...”

अशा पार्श्वभूमीवर नरसय्या बोल्ली आंध्र प्रदेशातून सोलापुरात सुमारे 100 वर्षांपुर्वी आले. ते कष्टाळू आणि दूरदृष्टीचे होते. त्यांनी वैयक्तिक काम करताकरता हळूहळू स्वतःची मिल उभी करण्यास सुरवात केली. लोकांना एकत्र करणे, एकत्र ठेवणे, त्यांच्याकडून कामे करून घेणे, ही कौशल्ये नरसय्या बोल्ली यांच्याकडे होती. त्यांच्या पुढच्या पिढीत इरय्या बोल्ली जन्माला आले. त्यांच्यात वडिलांपेक्षा अधिक चांगले गुण होते. त्यांनी आपल्या कारखान्याबरोबरच शहरातील जनजीवनावरही प्रभाव टाकला. त्यामुळे सोलापूरचे पहिले महापौर म्हणून ते निवडून आले. लक्ष्मीनारायण त्यांचे पुत्र. यांनीही वस्त्रोद्योग सांभाळलाच, पण त्यांची रुची साहित्यात निर्माण झाली. ती सुद्धा वेगळीच कथा आहे.

सोलापुरात राहायचे, तर मराठी आले पाहिजे, या प्रेरणेतून इरय्या बोल्ली यांनी मराठी शिकून घेतली. लक्ष्मीनारायण यांचीही मराठीशी तोंडओळख झाली. पण शाळेत त्यांचा पाय टिकत नसे. प्रगती ठीक नव्हती. त्यातच, त्यांच्या वडिलांचा शिक्षणाला विरोध होता. शिकलेली पोरे वाया जातात, असा त्यांचा पक्का समज होता. त्यामुळे ते मुलाला शाळेत जाण्यापासून रोखत. मुलाने शिकून ‘ब्राह्मण पंडित’ व्हायची गरज नाही, असे सांगत; त्यांनी थेट मिलमध्ये जाऊन कामाला लागावे, असे त्यांना वाटत असे.

15 एप्रिल 1944 रोजी जन्माला आलेल्या लक्ष्मीनारायणने 1962 मध्ये वयाच्या अठराव्या वर्षी मॅट्रिकचा उंबरठा ओलांडला. त्या आधी दोन वेळा त्याची शाळा सुटली होती. वडिलांनी त्याला कामालाही लावले होते. ही समाजातील प्रथाच होती. पण शरीरप्रकृती अतिशय क्षीण असल्याने जेथे कामाला लागला, त्यांनी या मुलाला घरी परत पाठवले. अशा स्थितीतून अभ्यास करत या मुलाने मॅट्रिकची परीक्षा दिली व उत्तीर्णही झाला.
आता मात्र त्याने नोकरी करणे आवश्यक आहे, असे वडिलांना वाटत होते. कमी कष्टाची नोकरी मिळविण्याच्या दृष्टीने त्यांनी शब्द टाकला आणि इंडस्ट्रियल बँकेत लक्ष्मीनारायण यांना नोकरी मिळाली. ही खरे तर अगदी सामान्य, म्हणजे एका ‘पोर्‍या’ची नोकरी होती. बँकेत अधिकारी, कर्मचारी होते, वेगवेगळे वरिष्ठ तेथे येत. हे वेगळेच वातावरण या मुलाला अनुभवण्यास मिळत गेले. एक चुणचुणीत पोरगा आपल्याकडे कामाला आहे, याचे त्यांनाही कौतुक होते. या परस्पर पूरक वातावरणातून लक्ष्मीनारायण यांच्यासमोर वेगळे विश्व उलगडत गेले.
तेथे असलेली सारी मंडळी तेलुगू नव्हती. त्यात बहुसंख्य मराठी लोक होते. ते मराठीतून बोलत आणि लक्ष्मीनारायण यांच्या मराठीला हसत. कारण ती मराठी नव्हती...! वेगळीच भाषा होती! बँकेत 80 जणांचा स्टाफ होता. या सर्वांसोबत राहायचे तर आपले मराठी सुधारले पाहिजे, असे त्यांना वाटू लागले आणि त्यांनी पुढाकार घेत बँकेत वाचनालय सुरू केले. बँकेकडे त्यासाठी थोडे बजेटही असे पण जबाबदारी कोण सांभाळणार, असे म्हणत ते दुर्लक्ष करीत. हा मुलगा ते करतोय म्हटल्यानंतर सगळेच तयार झाले. ही गोष्ट साधारण 1963 ची. लायब्ररीतून पुस्तके नेऊन वाचणे, जाणीवपूर्वक चांगले मराठी बोलणे, सर्वांसोबत संवाद वाढविणे अशा पद्धतीने त्यांनी मराठी शिकण्यास प्रारंभ केला. त्यांची जिद्द पाहून बँकेनेही साथ दिली. सर्व जण त्यांना सहकार्य करीत.

आपल्या धडपडीतून सर्वांचा विश्वास जिंकत त्यांनी 1966 मध्ये मराठी व्याख्यानमाला सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. (तेव्हा सुरू झालेली उद्योग बँक व्याख्यानमाला आजही सुरळीत सुरू आहे...!) गणेशोत्सव बँकेतही होत असे. याच निमित्ताने दहा दिवस दहा व्याख्याने आयोजण्याची त्यांची कल्पना सर्वांनीच उचलून धरली आणि व्याख्यानमालेला प्रारंभ झाला. हा लक्ष्मीनारायण यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा होता. मराठी साहित्यातील अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ व्यक्तींचा संपर्क त्यांना या निमित्ताने मिळाला. हा अनुभव त्यांचे आयुष्य समृद्ध करणारा ठरला. ते सांगतात, ‘शरीर दुर्बळ असले तरी लोकांना एकत्र आणण्याचा वडिलांचा गुण मात्र माझ्यात आलेला होता.’
प्रारंभी सोलापूरातील स्थानिक लोक आणि नंतर हळूहळू बाहेरचे निमंत्रित आणण्यास प्रारंभ झाला आणि व्याख्यानमाला प्रतिष्ठा पावू लागली. तेथे त्यांची बोलण्याची हौसही फिटू लागली. त्यांचा व्यासपीठावरील वावर सहजपणे होऊ लागला. मराठी प्रमाण पद्धतीने बोलली जाऊ लागली.

व्याख्यानमालेपाठोपाठ त्यांनी बँकेत नाटके बसविण्याच्या चळवळीलाही जन्म दिला. ते स्वतः लक्ष घालून नाटके - एकांकिका निवडत, त्या बसवून घेत, स्वतः त्यात भूमिका करत. वेगवेगळ्या स्पर्धांत सहभागी होऊन त्यांच्या टीमने बरीच बक्षिसेही मिळविली. शिक्षण बेताचे असले, तरी या ‘एक्स्पोजर’मुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलत गेले. पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, शिवाजी सावंत, वपु काळे अशी साहित्यातील मोठी मंडळी पाहायला-अनुभवायला मिळाली. त्यांच्याशी संवाद वाढला.

असेच दिवस जात होते. बँकेच्या वाचनालयातील पुस्तके आणून वाचन चालू होते. भाषेचा तो संस्कार मनावर होत होता. असेच एकदा रवींद्र भट यांनी लिहिलेले ‘इंद्रायणी काठी’ हे पुस्तक त्यांनी आणले आणि ती रात्र त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडविणारी रात्र ठरली. बँकेतून घरी आल्यानंतर वडिलांनी त्यांना त्या रात्री मिलमध्ये जाऊन लक्ष ठेवण्यास सांगितले. ते पुस्तक घेऊन मिलमध्ये पोहोचले. रात्री गेट बंद करून तेथेच ते पुस्तक घेऊन वाचायला बसले आणि संत ज्ञानेश्वर व त्यांच्या परिवारावर कोसळलेल्या संकटांची मालिका वाचून त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. सारे पुस्तक त्यांनी रात्रीतून तन्मयतेने वाचून काढले. पहाटे चार-साडेचारलाच ते घरी परतले. पाच-साडेपाचला तयार होऊन घराबाहेर पडले. वडिलांनी विचारले, ‘कुठे निघालास?’ त्यांनी सांगितले ‘आळंदी’ आणि ते पुण्याच्या बसमध्ये बसले.
पुण्यातून ते आळंदीत आले. संजीवन समाधीवर डोके टेकले. अश्वत्थवृक्षाचे दर्शन घेतले. एकटेच दिवसभर त्या परिसरात फिरत-भटकत राहिले. ‘ही जागा मला आईप्रमाणे बोलावत होती,’ असे ते सांगतात. सारा दिवस तेथे घालवून ते संध्याकाळी बसमध्ये बसले आणि पुण्याला निघाले. त्यांच्या मनात काहीतरी दाटून आले. सोबतचा कागद पेन काढून ते लिहू लागले

माझ्या मराठीचे बोल । चाखिले अमृताचे फळ
त्याहुनि रसाळ । ऐसे बोल मराठीचे
माझ्या मराठीची अक्षरे । उडती संध्येची पाखरे
घेऊनिया कण चोचीत । ज्ञान अमृताचे
माझ्या मराठीची चाल । जाई जुईची वेल
अक्षर फुलांचे पाऊल । वाजे सकाळ संध्याकाळ
माझ्या मराठीची माया । पुष्ट कामधेनुची छाया
सस्नेहे चोखिता तान्हा । वाग्र्साचा फुटे पान्हा
माझ्या मराठीची जादू । कैसी मी मुखे वदू?
अमृताचा की चंद्रू । सांडी अक्षरे भूवनी
ऐसी माय मराठी माझी । देखिली मी कधी न दुजी

ही कविता त्यांनी तेव्हा ‘स्वराज्य’ या साप्ताहिकाकडे पाठविली आणि त्यांनी ती मुखपृष्ठावर प्रकाशित केली. ‘कवी’ लक्ष्मीनारायण बोल्ली यांचा जन्म अशा प्रकारे ज्ञानदेवांचे आशीर्वाद घेऊन आळंदीहून परतताना आला. तेथून त्यांची मराठी सारस्वतातील सेवा सुरू झाली. वयाच्या विसाव्या वर्षी लक्ष्मीनारायण यांनी पहिला लेख लिहिला. तेथून हा लिहिता झाला. त्या काळात पुण्यात ‘सकाळ’ची धुरा ना. भि. परुळेकर सांभाळत. त्यांना या मुलाचे भारी कौतुक. तेलुगू भाषक हा मुलगा उत्तम मराठी लिहितो, त्यामुळे तेव्हा इतरांना लेखासाठी 10 रुपये आणि कवितेसाठी पाच रुपये मानधन ठरलेले असताना या मुलाला त्याच्या दुप्पट मानधन देण्याचा आदेशच तेव्हा परुळेकरांनी देऊन ठेवलेला होता!

एकीकडे मराठीवर प्रभुत्त्व मिळविलेले असतानाच त्यांचा तेलुगूचा अभ्यासही एव्हाना सुरू झाला होता. घरातील संवादामुळे ते तेलुगू भाषा बोलू शकत पण ती अक्षरे त्यांनी कधी गिरविलेली नव्हती. एक एक अक्षर जुळवून वाचत त्यांनी साधारण 1980 च्या सुमारास तेलुगू लिहिण्या-वाचण्यास प्रारंभ केला. वृत्तपत्रांपासून पुस्तकांपर्यंत सारेच काही ते वाचत गेले. एव्हाना त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘मैफल’ तयार झाला होता. मराठीतील ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकरांची प्रस्तावना त्याला लाभली होती. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत थाटात साजरे झाले.

हा काव्यसंग्रह पु. ल. देशपांडे यांना त्यांनी दिला. त्यावर पु.लं.नी प्रतिक्रिया दिली, “तू कविता लिहितो आहेस, पण अशाच कविता अनेक जण लिहितात. तुझे वेगळेपण काय? तू तेलुगू परंपरेतून आलेला आहेस. तुला दोन्ही भाषा येतात. मराठी आणि तेलुगूतील उत्तम साहित्य तू वाचून काढ. तिकडचे इकडे आण, इकडचे तिकडे ने. झाड तुझ्याकडे आहे, सावली सगळ्यांना दे.” पुलंच्या या सांगण्यातून त्यांच्या आयुष्याची दिशा ठरली. त्यांनी तेलुगू वाचनावर लक्ष केंद्रित केले आणि त्यातून ‘पालबुर्की सोमनाथ’ त्यांच्या हाती लागले.

सन 1130 च्या दरम्यान होऊन गेलेल्या पालकुर्की सोमनाथ या तेलुगू कवीने रचलेला ‘पंडिताराध्य चरित्र’ हा काव्यग्रंथ बोल्ली यांनी वाचला. त्यातील पर्वत प्रकरणात 220 व्या पानावर असलेली 22 ओळींची रचना सर्व तेलुगू अभ्यासकांसाठी गूढ ठरलेली होती. ती वाचल्यानंतर बोल्ली यांच्या ध्यानात आले, की ही तेलुगू लिपित शब्दबद्ध केलेली मराठी काव्यरचना आहे. त्या काळी संत हे समाज जोडण्याचे साधन होते. ते विविध क्षेत्रांतून प्रवास करीत आणि आध्यात्मिक पायावर आधारित भाषिक संवाद कौशल्यांतून समाज जोडत. जशा संत नामदेवांनी पंजाबमध्ये जाऊन पंजाबी रचना केल्या आणि त्यांचा अंतर्भाव पवित्र ‘गुरुग्रंथ साहीब’मध्ये करण्यात आला, तशाच पद्धतीने पालबुर्की सोमनाथांनी तेलुगू-मराठीतील दुवा सांधला होता.

बोल्ली यांनी पुलंशी संपर्क साधून हा विषय कळविला. योगायोगाने त्या वर्षी, म्हणजे 1988 मध्ये ठाणे येथे षण्मुखानंद सभागृहात जागतिक मराठी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील एका सत्रात पुलंनी बोल्ली यांची मुलाखत घेतली आणि दोन भाषाभगिनींतील हा दुवा समाजासमोर आला. तेथून त्यांच्या मराठी-तेलुगू संदर्भातील लेखनाला वेग आला. दोन्ही भाषांतील तुलनात्मक अभ्यास सुरू झाला. हे प्रमाण पुढे वाढत गेले. गोदावरीला आंध्रप्रदेशात ‘तल्ली गोदावरी’ म्हटले जाते.... म्हणजे ‘आई गोदावरी’. महाराष्ट्रात जन्मलेल्या कृष्णा-गोदावरीने आंध्रप्रदेशला सुजलाम सुफलाम केले. हा संदर्भ तेलुगू साहित्यातही प्रतिबिंबित झाला आहे. भाषा, साहित्य, संस्कृती, सण, व्रतवैकल्ये, लोकगीते, कला, संतसाहित्य अशा विविध पैलूंतून हा ठेवा शोधून उजेडात आणण्याचे कार्य पुलंच्या प्रेरणेतून बोल्ली यांनी केले.

बोल्ली यांची साहित्यसाधना सुरू होती. तेलुगू-मराठी संवाद शोधताना हाती लागलेल्या साहित्याचा आढावा घेणारे ‘तेलुगू फुलांचा मराठी सुगंध’ हे त्यांचे पुस्तक पुलंच्या प्रस्तावनेसह प्रकाशित झाले. याची अर्पणपत्रिका बोल्ली यांनी काव्यस्वरुपातच लिहिली आहे -

तेलुगूच्या वेली। मराठी फुलली।
ओंजळ भरली। कवितांनी॥
कवितांचा लळा। लागला आगळा।
म्हणोनिया केला। हा प्रयत्न॥
प्रयत्नांचा भाव। प्रज्ञेचा अभाव।
यत्नाचा स्वभाव। दावियला॥
दाविता कविता। चुका ज्या होता।
पोटी त्या घेता। सांभाळिजे॥

मराठी-तेलुगू या भाषांतील सांस्कृतिक दुवा ठरलेल्या लक्ष्मीनारायण बोल्ली यांचा याच कार्यासाठी पोट्टीश्रीरामलु विद्यापीठातर्फे ‘डी. लिट.’ देऊन गौरव करण्यात आला. ते सांगतात, ‘दहावी पास झालेला माझ्यासारखा माणूस या अभ्यासामुळे ‘डॉक्टर’ म्हणून ओळखला जाऊ लागला...!

ते सांगतात, “मी ज्ञानदेवांचा भक्त आहे. मी हे विनम्रपणे सांगतो. बोरकर सांगत, ‘माझा एक मुलगा सोलापुरात राहतो.’ त्यांनी मला मानसपुत्र मानले होते. ते मृत्यूशय्येवर असताना मला म्हणाले, ‘ज्ञानेश्वरी सतत तुझ्याजवळ ठेव, त्यातून मी बोलेन, तू ऐकत जा.”

त्यांच्या लेखनाची अनेक ठिकाणांहून मागणी होते. त्यांनी साहित्य अकादमीसाठी चार पुस्तके अनुवादित केली आहेत. त्यापैकी तीन पुस्तके ही अकादमी पुरस्कार प्राप्त मूळ तेलुगू पुस्तकांचा मराठी अनुवाद आहेत तर एक अकादमी पुरस्कार प्राप्त मराठी पुस्तकाचा तेलुगूत केलेला अनुवाद आहे. अशा पद्धतीने त्यांच्या नावावर तेलुगूतीलही एक पुस्तक नोंदविले गेले. आजवर त्यांची एकंदर 21 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते साहित्य अकादमीच्या पुरस्कार समितीचे सदस्यही आहेत.

‘एका साळियाने’ या त्यांच्या आत्मचरित्राला महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा न. चिं. केळकर पुरस्कार, स्मिता पाटील पुरस्कार आणि हिंगोली येथील साहित्य संस्थेचा वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. ज्याला वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत धड मराठी बोलता येत नव्हते, त्याला हे पुरस्कार मिळणे हा चमत्कारच आहे, असे ते सांगतात. एका तेलुगू भाषकाने मराठीतून केलेली साहित्यसेवा अनेकांना आश्चर्यचकित करते. त्यालाही त्यांचा आक्षेप नसतो. ते सांगतात, “एकेकाळी ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदविले होते. सातशे वर्षांनी तोच चमत्कार करण्याचे त्यांनी ठरविले आणि रेड्याऐवजी माझ्यासारख्या ‘वेड्या’ची निवड केली. माझ्या लेखनाबद्दल माझा एवढाच विनम्रभाव आहे.”

या प्रवासात अनेक टप्पे आले. कधी धक्के बसले. काही पारिवारिक होते. त्यातील एक त्यांच्या वडिलांनीच दिला! महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट लेखन पुरस्काराच्या निवड समितीत गंगाधरपंत कुचन यांच्या शिफारसीवरून बोल्ली यांची निवड करण्यात आली होती. या पुरस्कारासाठी पुस्तके वाचून अभिप्राय द्यायचा असतो. असाच एकदा पुस्तकाचा एक भलामोठा गठ्ठा घरी येऊन पडला. त्यांच्या वडिलांनी चौकशी केली ‘हे काय आहे?’ बोल्ली यांनी सारे काही सांगितले. वडिलांचा प्रश्न होता, ‘या कामाचे पैसे किती मिळणार?’ तेव्हा एका पुस्तकाच्या वाचन-अभिप्रायासाठी शासन 17 रुपये मानधन देत असे. तो आकडा त्यांनी सांगताच वडील खवळले. ‘आपल्याकडे लेबरला किती पगार आहे हे माहिती आहे का?’ असा प्रश्न त्यांनी विचारला. बोल्ली यांच्यावर त्यांच्या रागाचा परिणाम होत नाही, हे दिसताच त्यांनी चक्क घर सोडण्यास सांगितले...! लक्ष्मीनारायण बोल्ली अनेक वर्षे घर सोडून राहात होते. पुढे, काळाच्या ओघात वडिलांनी मुलाला घरी परत बोलावले...!

नाट्य आणि साहित्य क्षेत्रातच कार्यरत असलेल्या शोभा यांच्याशी ते विवाहबद्ध झाले. सौ. शोभा बोल्ली यांचेही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांविषयीचे पुस्तक प्रसिद्ध आहे. या जोडप्याचे गुण रक्तातच घेऊन आलेल्या ममता हिनेही नाट्यक्षेत्रातच करिअरला प्रारंभ केला आहे. तिनेही अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

मॅट्रिकनंतर बँकेत हरकाम्याची नोकरी पत्करलेल्या लक्ष्मीनाराण बोल्ली यांनी पुढे आपल्या कर्तृत्त्वाने व्यवस्थापक पदापर्यंत मजल मारली. आपल्या वडिलांच्या व्यवसायात ते प्रारंभीच्या काळात सहभागी झाले नाहीत. नंतर ते नोकरी सोडून व्यवसायात उतरले व वडिलांचा व्यवसाय सांभाळू लागले.

त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही चढउतार आले. त्यांचा विवाह वयाच्या 16 व्या वर्षी 12 वर्षीय भूलक्ष्मी यांच्याशी झाला होता. ते सांगतात, “सुरवातीची काही वर्षे ठीक गेली, पण त्यानंतर काही पेच सुरू झाले. रात्री-अपरात्री घरकामे करणे, विक्षिप्तपणे वागणे वाढत गेल्याने आम्ही मीरज, हैदराबाद येथील हॉस्पिटलमध्ये उपचारही केले. पण उपयोग झाला नाही. माझी दहा वर्षे अशा अवस्थेत गेली. त्यानंतर 1988 च्या दरम्यान काही काळ मी एकटाच मद्रासमध्ये वास्तव्यास होतो. तो काळ शांततेचा गेला. मात्र या काळात माझ्या आणि शोभा कल्याणी यांच्या संबंधांबाबत सोलापुरात चर्चा होती. नाट्यक्षेत्रातील माझी सहकारी असलेल्या शोभा हिच्याशी माझे सूर जुळत होते. पुढे एका क्षणी मी मागील आयुष्य बाजूला ठेवून शोभाशी विवाहबद्ध झालो. त्यासाठी वडिलांचे घर आणि मालमत्ता सोडली. मेघदूत इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान चालविले. त्यातून संसार उभा केला. पुढे, माझ्या वडिलांच्याच आग्रहावरून मी मिलचे काम सांभाळण्यास सुरवात केली. मी पहिल्या कुटुंबाची जबाबदारी विसरलोे नाही. काही मिळवायचे तर काही गमवावे लागते, हेच खरे.”

Monday, January 22, 2018

उद्यम संस्कृती

परिसराच्या संस्कृतीचा आढावा घेण्याच्या यादीत ‘उद्यम संस्कृती’ हा विषय परंपरेत न बसणारा, पण तेवढाच महत्त्वाचा. कुठल्याही संस्कृतीच्या विकसनासाठी उद्यम संस्कृतीचा विकास सर्वाधिक महत्त्वाचा. नागर संस्कृती एकेकाळी नद्यांच्या काठी वसायची, त्यामागे महत्त्व होते ते कृषिसंस्कृतीचे... तिचा पाया आर्थिक. आता नागर संस्कृती ‘हायवे’काठी विकसित होतेय. तिचाही पाया आर्थिक. आर्थिक सुबत्तेचा मार्ग उद्यम संस्कृतीतूनच विकसित होतो. या दृष्टीतून हा आढावा...

(दै. सामनाच्या २३ जानेवारी २०१८ च्या विशेषांकात प्रकाशित लेख)

आशियातील सर्वाधिक वेगाने वाढणार्‍या शहराचा मान आैरंगाबादने मिळविला, त्याला आता बराच काळ लोटला आहे. तो वेगही पुढे मंदावला. ते नैसर्गिकही होते. कुठलाही वेग असा शाश्वत टिकत नसतो. पण त्या निमित्ताने या परिसरात विकसित झालेली उद्यमसंस्कृती पुढील काळात या परिसराच्या विकासासाठी कारणीभूत ठरली. या प्रवासात अनेक टप्पे आले. विविध आव्हाने समोर उभी रहिली. पण त्या सर्वांतून मार्ग काढत आजवरची ही वाटचाल सुरू आहे. सुमारे अर्धशतकापूर्वी ‘निर्लेप’च्या स्थापनेतून इथल्या उद्यम संस्कृतीचा पाया घातला गेला. या संस्कृतीच्या विकासाला काही बड्या उद्योगांच्या आगमनाने चालन मिळाली. विविध पूरक उद्योगांच्या उभारणीतून ही संंस्कृती इथे विकसित झाली आणि आता हळू हळू हे शहर आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकतेत अग्रेसर होताना दिसत आहे. उद्यम संस्कृतीच्या विकासाचे हे टप्पे रंजक आहेत, त्याच वेळी भविष्यातील विकसनासाठी दिशादर्शक ठरणारे सुद्धा आहेत.

एकेकाळी, वाळूज आणि चिकलठाणा औद्योगिक वसाहतील मोठे उद्योग आले आणि त्या पाठोपाठ काही कुप्रवृत्तींचाही शिरकाव झाला. सुदैव असे, की काही मोजक्या हिंसक प्रकारांनंतर इथला कामगार सावध झाला आणि खूप अल्पकाळात ही कुप्रवृत्ती हद्दपार झाली. महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर संभाजीनगरातील उद्योगक्षेत्र हे तुलनेत सर्वाधिक शांत असलेले उद्योगक्षेत्र मानता येते. औद्योगिक विकास साधायचा तर औद्योगिक विश्वातील शांतता सर्वाधिक महत्त्वाची असते, आपले घर उद्योग चालवतात, स्वार्थी नेते नाही, हे भान इथल्या ‘ब्लू कॉलर’ला आधी आले आणि हे वास्तव स्वीकारत त्यांनी आपल्या भूमिका मर्यादित केला. हक्कासाठी लढा देणे आणि सर्वनाशाकडे लोटणे या दोन वेगळ्या संकल्पना आहेत, हे या सर्वांनी ठसठशीतपणे जाणवून दिले. हाती हात घेऊन पुढे जाता येऊ शकते याचा आदर्श वस्तुपाठ याच औद्योगिक वसाहतींनी जगासमोर ठेवला. उद्यम संस्कृतीच्या पायाभरणीत या जाणिवेचा भाग अतिशय महत्त्वाचा.

वेरूळची लेणी असोत, अजिंठ्याची शिल्पकला... नालंदा - तक्षशीलेची बुद्धिप्रधान ग्रंथसंपदा असो की हडप्पा-मोहनजोदारोची संस्कृती, या प्रत्येक ठिकाणच्या आविष्कारामागे भक्कम आर्थिक आधार होता. सैन्य उपाशीपोटी लढू शकत नसतेच. हेे सैन्य रणांगणावरचे असो की कलेच्या क्षेत्रातले... किमान दोन वेळच्या जेवणाची आणि मूलभूत सोयींची पूर्तता करणारा आर्थिक आधार कुणीतरी उपलब्ध करून दिलेला होता, म्हणून कुठल्याही कलाकृती उभ्या राहिल्या. हा आधार हवेतून येत नसतो. तो जमिनीवर साकारला जात असतो. हा आधार देणारे हात आणि त्या मागचा मेंदू जितका सकस, सकारात्मक आणि सशक्त, तितकी अन्य संस्कृतींची जोपासना बलशाली... हेच सूत्र जगभर दिसते. संभाजीनगरही त्याला अपवाद असण्याचे कारण नाही.

उद्यमिता ही सुद्धा एक संस्कृती आहे. ‘कामगारांची पिळवणूक करणारा भांडवलदार’ ही संकल्पना कधीच लयाला गेली आहे. कामगार आणि मालक ही दरी बुजविण्यात या उद्यम संस्कतीचा वाटा अतिशय मोलाचा. ही प्रेरणा दिली जपानी आणि जर्मन उद्योगांनी आणि तिथल्या कार्यसंस्कृतीने. नव्या नव्हाळीच्या विवाहितेला किंवा पहिलटकरणीला अनुभवी पिढीने केलेले मार्गदर्शन जितके मोलाचे तेवढेच या जपान-जर्मनीच्या कार्यसंस्कृतीचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. ‘फाईव्ह एस’, ‘कायझेन’, ‘झीरो डिफेक्ट’, ‘पीपीएम’ ... विविध संकल्पना जगभरातील उद्योगक्षेत्रात रुजत गेल्या आणि त्यातून सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेतलेली नवी कार्यसंस्कृती विकसित होत गेली.

या नव्या प्रवाहात आणखी दोन नव्या संकल्पना उद्योग क्षेत्राची परिमाणे बदलत चालल्या आहेत. ‘लीन मॅनेजमेंट’ आणि ‘आयओटी’ अर्थात इंटरनेट ऑफ थिंग्ज. लीन मॅनेजमेंट ही मुळात जर्मन संकल्पना. भारतात आता ती येऊ घातली आहे. काही मोजक्या ठिकाणी ती अंमलातही आली आहे. लीन मॅनेजमेंट एखाद्या अँटीव्हायरससारखे काम करते. तुमच्या यंत्रणेतील, व्यवस्थापनातील त्रुटी ते दूर करते आणि तुम्हाला तुमची संस्था नव्या उंचीवर नेण्यास मदत करते. जिथे कुठे व्यवस्थापन आहे त्या प्रत्येक ठिकाणी याचा उपयोग आहे. ‘आयओटी’ने मात्र आता भारतात चांगलेच हातपाय पसरले आहेत. विविध कंपन्यांचा विस्तार वाढतो आहे, प्रत्येक युनिटवर लक्ष ठेवणे शक्य होत नाही. अशा स्थितीत संचालकांना एकाच वेळी एकाच प्लॅटफॉर्मवर त्यांच्या उद्योगसमूहाचा डेटाबेस उपलब्ध करून देणारे साधन म्हणून ‘इंटिग्रेटेड रिमोट मॅन्यूफॅक्चरिंग मॅनेजमेंट’ आली. त्याचा मुलाधार म्हणजे इंटरनेट.

इंटरनेटचा वापर करून उद्योगातील प्रत्येक पायरीवर लक्ष ठेवणारी, नियंत्रण आणणारी संकल्पना म्हणजे ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’. आज झालेल्या चुकांवर उद्या चर्चा करण्याऐवजी मुळात आजच चुका न होऊ देणारी ही पद्धती. यातून उत्पादनक्षमता वाढते, अचूकता निर्माण होते, वेस्टेज नियंत्रणात येते आणि या शिवाय संबंधित संचालकाला जे काही नियंत्रित करायचे आहे, ते इथे करता येते. मोठी क्षमता असणारी ही प्रक्रिया आहे. या प्रत्येक गोष्टींमुळे उद्योग क्षेत्र अधिकाधिक सक्षम होत चालले आहे. नवनव्या संस्कृतींना आत्मसात करून ही नवी आंतरराष्ट्रीय उद्यम संस्कृती बाळसे धरू लागली आहे.

एकेकाळी असलेले ‘सेलर्स मार्केट’ आता ‘बायर्स मार्केट’ झाले आहे. एकेकाळी स्कूटरसाठी सहा-आठ वर्षांची वाट पाहावी लागायची, तिथे ठरवल्यानंतर सहा तासांत स्कूटर घरी येऊ लागली. हा बदल सगळीकडेच झाला. भौतिक सुबत्तेच्या सार्‍या वस्तू तेवढ्याच वेगाने बाजारपेठेतून घरापर्यंत पोहोचल्या. ही प्रक्रिया फक्त बाजारपेठेत आणि कर्जपुरवठा करणार्‍या वित्तीय संस्थांपुरती मर्यादित नसते. ती उद्योगक्षेत्रातही झिरपावी लागते. बाजारपेठेत झालेला हा बदल स्वीकारल्याशिवाय उद्योगक्षेत्राला तरणोपाय नव्हता. हा बदल किती सहजतेने स्वीकारला जातो त्यावर त्या त्या उद्योगांचे भविष्य ठरणार होते. संभाजीनगरची उद्यमसंस्कृती या संकटावर मात करण्यात यशस्वी ठरली. उत्पादन यंत्रणेतील आधुनिकीकरण, जागतिक स्तरावरील नव्या ग्राहकांचा शोध, तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कामगारवर्गाचे कौशल्यविकसन... प्रत्येक आघाडीवर एकेक पाऊल पुढे टाकत उद्योजक आणि कामगारांनी हातात हात घेऊन प्रगतीकडे वाटचाल सुरू ठेवली आणि त्यातून इथली उद्यमसंस्कृती बहरली. आज उद्योगांच्या नफ्यामध्ये महत्त्वाचा वाटा गुणवत्ता नियंत्रणाचा आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आणि बड्या उद्योगांकडून अधिक स्पर्धात्मक दरात काम करावे लागले, अशा स्थितीत टिकून राहणे आणि प्रगती करणे यात गुणवत्ता नियंत्रण, उपलब्ध यंत्रणेचा पुरेपूर वापर, उपलब्ध कामगारांचा कौशल्यपूर्ण वापर या बाबी खूप महत्त्वाच्या ठरल्या.

 तंत्रज्ञान, भांडवल आणि कुशल मनुष्यबळ या त्रिसुत्रीवर उद्योगाची प्रगती अवलंबून असते. तंत्रज्ञान आणि भांडवल उभे करणे आज तुलनेत सोपे झाले आहे. मुद्दा उरतो तो कुशल मनुष्यबळाचा. औद्योगिक प्रशिक्षण, कामगारांसाठी कल्याणकारी योजना, त्यांच्या आत्मप्रतिष्ठेत वाढ करण्यासाठी उद्योजकांनी उचललेली पावले या आधारावर प्रगतीची पावले या मातीवर उमटली. त्यातून उद्यमसंस्कृती बहरत गेली. बडे उद्योग एकेकाळी आपल्या पुरवठादार कंपन्यांकडून सुटे भाग तयार करून घेत आणि आपल्या उद्योगात त्यांच्या जुळवणीतून अंतिम उत्पादन तयार होत. काळ बदलतोय, तसे या प्रक्रियेतही बदल होताहेत. सुट्या भागांऐवजी ‘असेंब्ली’चीच मागणी मोठ्या उद्योगांकडून होत असताना आपापल्या कौशल्यांत वाढ करण्याचा किंवा तो व्यवसाय सोडण्याचा असे दोनच पर्याय पुरवठादारांसमोर असतात. बहुतेकांनी ‘असेंब्ली’चा पर्याय निवडला, तेथे गरज होती मनुष्यबळाच्या कौशल्यविकासाची.

उद्यमसंस्कृतीचा विकास होताना या घटकावर विविध उद्योगांनी घेतलेली मेहनत विलक्षण आहे. काही उद्योजकांनी ‘राईट पर्सन इन राईट बस, राँग पर्सन आऊट ऑफ बस’ अशी कठोर भूमिका कुणी घेतली तर आपल्याकडील प्रत्येक कामगार-कर्मचार्‍याला योग्य प्रशिक्षण देत, त्यांना प्रगतीच्या वाटा खुल्या करून दिल्या. प्रगतीचा ब्लू प्रिंट प्रत्येक ठिकाणी एकसारखा नसतो... तो तसा वापरता येत नसतो. प्रत्येक ठिकाणची गरज, उपयुक्तता आणि उपलब्ध कौशल्ये यांच्या आधारावर तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा वापरावा लागतो. यात बहुतेकांनी यश मिळविले. या यशामुळेच जागतिक मंदीच्या या वातावरणातही इथल्या औद्योगिक वसाहतीत समाधानकारक उत्पादन चालू राहिले. बेकारीची कुर्‍हाड कोसळण्याचे प्रसंग तुलनेत कमी आले.
मुंबई, पुणे किंवा नाशिकच्या तुलनेत संभाजीनगरातील उद्योजकतेला, औद्योगिक वसाहतींना अधिक प्रतिकूलतेचा सामना करावा लागतो. त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग पाण्याचा. पर्जन्यछायेच्या प्रदेशात असलेल्या या शहर-परिसराला पाणीटंचाईचा सामना नेहेमीच करावा लागतो. त्यातही कधी कुणी न्यायालयात जाते आणि न्यायालयाच्या आदेशावरून कंपन्यांना आपल्या शिफ्ट बंद कराव्या लागतात. अशा सर्व प्रतिकूलतांशी झुंजत प्रगतीच्या वाटेवरील घोडदौड सुरू ठेवली आहे. म्हणूनच इथल्या उद्यम-संस्कृतीबद्दल आवर्जून निरीक्षणे नोंदविण्याची गरज भासली.

प्रत्येक भांडवलदार पिळवणूक करणारा नसतो, प्रत्येक कामगार कामचोर नसतो, कृषि आणि उद्योग ही दोन क्षेत्रे जशी विकसित होतील, तशी भारतासारख्या राष्ट्राची प्रगती होत राहील. दुर्दैवाने एकीकडे कृषिसंस्कृतीसंदर्भात अनेक खूप समाधानकारक वातावरण नाही. ते क्षेत्र रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या अतिवापरामुळे पोखरले गेले आहे आणि त्यातून बाहेर पडून सेंद्रीय शेतीकडे वळण्याचे त्राण अजून यायचे आहे. समतोल राखत प्रगतीची वाट चोखाळूनच त्या क्षेत्रातील भवितव्य घडेल. या तुलनेत उद्योगाच्या क्षेत्राने हे बदल जलदगतीने स्वीकारले आणि पचवले.

आैरंगाबादच्या औद्योगिक वसाहतींनी सुद्धा ते आव्हान स्वीकारले आणि पेलले सुद्धा.
अंतिमतः पहिला मुद्दा पुन्हा एकदा. उद्यमसंस्कृती आणि अन्य सर्व संस्कृतींचा परस्परसंबंध खूप महत्त्वाचा आहे. कला, साहित्य, क्रीडा... कुठल्याही संस्कृतीच्या विकासाला सर्वात महत्त्वाचा ठरतो तो आर्थिक आधार. म्हणूनच साहित्य संमेलनासाठी असो, कला महोत्सवासाठी असो की क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांसाठी... प्रत्येक ठिकाणी आवश्यक ठरते तो उद्यम संस्कृतीचा आधार. समाजभान जपणारी उद्यमसंस्कृती अन्य क्षेत्रांच्या प्रगतीसाठी, विकासासाठी पूरक ठरते. आैरंगाबादेतील उद्यमसंस्कृती त्याला अपवाद नाही.

- दत्ता जोशी
(मुक्त पत्रकार व उद्योजकतेचे अभ्यासक)
9422 25 25 50

Thursday, January 11, 2018

अंदमान डायरी - 1

अंदमान म्हणजे काळे पाणी. स्वातंत्र्यपूर्व काळात देशभक्त भारतीयांसाठी जणू एक दुःस्वप्न बनलेली भूमी. स्वातंत्र्योत्तर काळात दुःस्वप्न तर दूर झाले पण स्वर्गीय सौंदर्य असलेली ही लावण्यभूमी सहजप्राप्य राहिली नाही. 2004 मध्ये तमिळनाडूत निवडणूक कव्हर करण्यासाठी गेलो होतो, तेव्हा रेल्वेत एका सैनिकाची भेट झाली. अंदमानच्या तळावर नियुक्त असलेल्या त्या सैनिकाकडून तिथले प्रत्यक्ष वर्णन ऐकायला मिळाले. तेथे पोहोचण्याचा एक मार्ग कळला. चेन्नईच्या बंदरातून अंदमानला जाण्यासाठी जहाज निघते. त्या जहाजाद्वारे 3 दिवसांच्या प्रवासानंतर तिथे पोहोचता येते, ही मला मिळालेली पहिली प्रत्यक्ष माहिती. त्या वेळी त्या जहाजाचे ‘जनरल’ तिकीट बहुधा 300 रुपये होते. आता ते 700 ते 1000 असल्याचे वेबसाईटरून कळले. पण त्या वेळी तेवढा वेळ हाताशी नव्हता. नंतरच्या काळात रोजच्या आयुष्यातील व्यापातून वेळ काढणे शक्य होत नव्हते.
मला भटकायला आवडते. विद्यार्थी दशेत चळवळीच्या माध्यमातून देशाच्या अनेक भागांत भ्रमंती झाली. पुढे पत्रकारितेत असताना वार्तांकनासाठी फिरस्ती झाली. लग्नानंतर कौटुंबिक सहल म्हणून काही ठिकाणी फिरून आलो. काश्मीर ते कन्याकुमारी, अनेक ठिकाणी अनेक राज्यांत मी स्वतःच नियोजन करून भटकलो. इंटरनेट वेगवान झाल्यानंतर आणि वाहतुक आणि हॉटेलांच्या सुविधा वेबसाईटवर सोप्या झाल्यानंतर ही भटकंती काहिशी सोपी झाली. योगायोग असा की प्रत्येक ठिकाण कुणीतरी मित्र-सुहृद असायचे, त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरायचे. अंदमानसाठी तसाच प्रयत्न मागची 3-4 वर्षे सुरू होता. पण योग जुळून येत नव्हता.
ही सहल इतर सहलींच्या मानाने अधिक वेळ घेणारी, अधिक खर्चिक... वातावरण वेगळे, स्थानिक पर्यटन वैशिष्ट्यांची पुरेशी माहिती हाती नाही, अंतर्गत वाहतुक सुविधांची स्थिती, हाती असलेले पर्याय, त्यासाठीचे नियोजन या विषयी फारसा तपशील हाताशी नाही, अशा स्थितीत अंदमानचा नंबर थोडासा मागे राहिला होता. अन्य ठिकाणी सारे नियोजन स्वतः करण्याची व स्वैरपणे भटकण्याची सवय लागलेली, त्यामुळे कुठल्या ग्रुपसोबत जाण्याचा विचार मनाला पटत नव्हता.
मुळात अंदमान-निकोबारला भेट देण्याचा मुख्य हेतू अर्थातच सेल्यूलर जेलला भेट आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करण्याचा होता. पर्यटन हा त्यात ओघाने येणारा दुय्यम भाग. साधारण 3 वर्षांपूर्वी थोडीशी जुळवाजुळव करून पाहिली. औरंगाबादेतून चेन्नईपर्यंत रेल्वेचा प्रवास आणि तिथून अंदमानचा जहाजाचा. पण या प्रवासातच एका बाजून साधारण 5 दिवस, असे एकूण 9 ते 10 दिवस मोडणार होते. शिवाय तिथल्या वास्तव्याचा काळ वेगळा. दुसरा पर्याय चेन्नईहून विमानाचा होता पण लोकल कॉन्टॅक्ट हाताशी नव्हते...
दिवस जात होते, उत्कंठा वाढत होती. योग जुळून येत नव्हता. मागच्या वर्षी एक मार्ग समोर आला. ‘सावरकर अभिवादन यात्रे’बद्दल काही ठिकाणी वाचले होते आणि त्याचे आयोजक कॅप्टन निलेश गायकवाड यांच्याशी फेसबुकवरून संपर्क झाला होता. त्यांच्याशी एकदा फोनवर बोललो. त्यांनी छान प्रतिसाद दिला. पण पुन्हा एकदा विविध कारणांमुळे दौरा मागे पडला. यंदा जानेवारीत पुण्यात निलेश यांची प्रत्यक्ष भेट झाली. या यात्रेबद्दल, त्यांच्या उपक्रमाबद्दल, हेतूंबद्दल विस्ताराने बोललो. मग वाटले, अपवाद म्हणून एकदा ग्रुपसोबत जाऊन पाहण्यास हरकत नाही. यंदाच्या वर्षातच जाण्याचा संकल्प केला. मुलाची इंजिनिअरिंगची टर्म एक्झाम साधारण कधी येईल ते पाहिले आणि डिसेंबरमध्ये जाण्याचे निश्चित केले. बुकिंग पुरेसे आधी करणे गरजेचे होते, त्यामुळे जुलै-ऑगस्टमध्येच पैसे भरले आणि आम्हा तिघांचे नाव निश्चित केले. एवढे केले आणि हा विषय मी विसरून गेलो. आठवण झाली ती थेट डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात.
अंदमानच्या आमच्या दौऱ्याबद्दल पुढे सांगण्याआधी मला थोडेसे निलेश गायकवाड यांच्याविषयी लिहिले पाहिजे असे वाटते. निलेश आणि प्रमोद गायकवाड हे नाशिक जिल्ह्यातील बंधूद्वय. शिक्षक आईवडिलांची ही मुले बालपणापासूनच सावरकरभक्त. त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेली. सटाणा इथे शालेय शिक्षण पूर्ण करत असतानाच आईवडीलांच्या संस्कारांमुळे त्यांच्या मनात भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारकांविषयी आत्मीयता निर्माण झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे तर क्रांतीकारकांचे मुकुटमणीच. त्यांच्याविषयीचा अपार आदर, आत्मीयता या दोघांही बंधूंच्या मनात आहे. या आत्मीयतेतूनच सावरकरांची ओळख समाजापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने निलेश गायकवाड यांनी ‘शिवसंघ प्रतिष्ठान’ची स्थापना केली. त्यातूनच संकल्पना पुढे आली ‘सावरकर साहित्य संमेलना’ची.
सन 2005-06 मध्ये त्यांनी सर्वप्रथम ही संकल्पना मांडली. एक देशभक्त, क्रांतीकारक म्हणून सावरकरांचे नाव जगाला माहिती आहेच, पण एक साहित्यिक म्हणूनही हे नाव प्रभावीपणे पोहोचावे, या दृष्टीने त्यांनी सावरकर साहित्य संमेलनाची संकल्पना मांडली. पहिल्या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी भूषविले आणि या संमेलनाचे आयोजन झाले तेे थेट अंदमानमध्ये...! 2009 या वर्षी...!
‘सावरकर’ हे नाव घेतल्यानंतर जे काही नजरेसमोर उभे राहते त्यात अंदमानची ती काळकोठडी सर्वात आधी येते. याच ठिकाणी सावरकरांच्या साहित्यातील ‘कमला’ या महाकाव्याचे लेखनही झालेले आहे. लेखन कसले? ते भिंतीवर लिहायचे... मुखोद्गत करायचे आणि पुसून टाकून परत लिहायचे. सावरकरांचे आयुष्य आणि त्या आयुष्यातील असे असंख्य प्रसंग एक चमत्कारच आहेत...! या चमत्कारांना नमन करण्याची संधी समस्त सावरकर भक्तांना मिळवून देण्याचा निलेश यांचा हेतू होता.
समाजात चांगल्या गोष्टींना नावे ठेवणार्यांतची कमी नाही. कुणी एखादा पुढाकार घेेऊन काही करीत असेल तर त्याला मदत करण्याऐवजी त्याची टर उडविणारे, तो कसा अपयशी ठरेल या विषयी भाकिते करणारेच अधिक असतात. निलेश यांच्या बाबतीतही असेच झाले. ‘पुण्यात सावरकरांचा कार्यक्रम घेतला तर 15-20 च्या वर लोक येत नाहीत, मग अंदमानला किती येतील?’ हा या मंडळींचा आवडता प्रश्न होता. त्याला उत्तर देण्याच्या फंदात न पडता निलेश यांनी प्रयत्न करण्यास प्रारंभ केला. स्वतः अंदमानला जाऊन आले, तेथील व्यावसायिकांशी चर्चा करून ‘पॅकेज’ ठरविले गेले.
प्रवासासाठी एअर इंडियाशी संपर्क झाला आणि किफायतशीर दरामध्ये अंदमान प्रवासाची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संमेलन जाहीर झाल्यानंतर पहिल्या आठच दिवसांत 500 हून अधिक जणांनी अंदमानसाठी नोंदणी केली. हे संमेलन अपेक्षेहून अधिक यशस्वी ठरले.
एकीकडे हा प्रवास चालू असताना अंदमानच्या संमेलनाला येऊ न शकलेल्या काही जणांचा पाठपुरावा सुरू झाला. त्यात अनेक ज्येष्ठांचाही सहभाग होता. आयुष्यात एकदा तरी ‘त्या’ महामानवाच्या वास्तव्याने पूनित झालेल्या कोठडीला भेट देण्याची आणि त्यासाठी अंदमानला जाण्याची त्या सर्वांची इच्छा होती. ‘शिवसंघ प्रतिष्ठान’ने ज्या बजेटमध्ये ज्या प्रकारची व्यवस्था केलेली होती त्याची माहिती मिळाल्याने तशीच व्यवस्था पुन्हा करता येेईल का, अशी विचारणा होऊ लागली. त्यातून निलेश यांच्या मनात नवी कल्पना सुचली.
पर्यटनाच्या क्षेत्रात काम करणार्या. कंपन्यांचा या टूरचा खर्च बराच जास्त. अशा स्थितीत किफायतशीर दरात सेवेची ही संधी निलेश यांनी पाहिली. त्यांनी परत एकदा अंदमानचा प्रवास केला. तेथे यंत्रणा उभारली आणि मग त्यांनी अंदमान सहलीची उद्घोषणा केली. त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे. ‘एक लाख सावरकर प्रेमींनी अंदमानमध्ये नेण्याचा संकल्प’ त्यांनी केलेला आहे. मागील 6-7 वर्षांत त्यांनी सुमारे 35 हजार जणांना अंदमान वारी करविली आहे.
निलेश सांगतात, ‘‘हा आमचा व्यवसाय नाही. सामाजिक जाणिवेतून आम्ही अंदमान सहलींचे आयोजन करीत आहोत. सर्व खर्च निघतील इतकेच शुल्क आम्ही घेतो. त्यामुळे इतर कुठल्याही टुरिझम कंपनीच्या तुलनेत ‘शिवसंघ प्रतिष्ठान’ आकारत असलेले शुल्क कमी आहे. इतकेच नव्हे, तर कुणी स्वतः तिकिटे बुक करून ही सहल प्लान करीत असेल तर कदाचित त्या पेक्षाही स्वस्तात आमचे पॅकेज मिळते. कारण आम्ही विमान वाहतुकीसाठी करार केलेला आहे आणि निवास व्यवस्थाही आमची आहे. तेथे थेट खर्च जास्त होऊ शकतात...
‘‘संमेलनाच्या निमित्ताने आम्हाला लोकांच्या अपेक्षा कळल्या. आम्ही केलेल्या व्यवस्था त्यांना आवडलेल्या होत्या. पुण्यातील लोकांना आवडले तर इतरांनाही ते नक्कीच आवडले असते...! आम्ही सहली म्हणून गणित मांडण्यास सुरुवात केली. स्थानिक हॉटेलांशी चर्चा करून ‘रेट बार्गेन’ केले, विमान कंपन्यांशी चर्चा केली. आम्ही ज्या संख्येने अंदमानला पर्यटक नेतो तेवढे कुणीही नेत नाही.’’
हा अनुभव मीही प्रत्यक्षात घेतला आहे. स्वतंत्रपणे बुकिंगचा मी मागच्यावर्षी केलेला प्रयत्नच त्याला साक्ष आहे...! हे सारे अनुभव पदरी घेऊन मी अंदमानच्या दौऱ्यासाठी सिद्ध झालो.
(क्रमशः)

अंदमान डायरी - 2

अंदमान भेट म्हणजे माझ्यासाठी, आमच्यासाठी ‘ड्रीम्स कम ट्रू’...! या दौर्या चा जवळजवळ सर्व टूर ऑपरेटर्सचा मार्ग पुण्यातून जातो, पण औरंगाबादेतून दर सोमवारी चेन्नईला जाणारी नगरसोल-चेन्नई एक्स्प्रेस मला सोयीची वाटली. 26 तासांचा प्रवास करून चेन्नईत उतरलो तेव्हा ‘शिवसंघ प्रतिष्ठान’चे सहकारी चेन्नई सेंट्रलवर घेण्यासाठी आलेले. त्यांनी त्यांच्या वाहनातून जवळच्याच हॉटेलात पोहोचवले तेव्हा आमच्या 33 जणांच्या बॅचमधील आम्ही तिघे पहिले ठरलो. इतरांहून एक दिवस आधी गेल्याने पुढचा दिवस विश्रांती घेतली आणि 14 ला सकाळी चेन्नईच्या मीनाबक्कम एअरपोर्टवरून पोर्टब्लेअरकडे उड्डाण केले.
मध्यंतरी बऱ्याच एअरपोर्टवरील गर्दी अनुभवली पण मेट्रो सिटी असूनही इथल्या एअरपोर्टवर मुंबई, दिल्ली, बंगलोरच्या तुलनेत गर्दी कमी वाटली. टूर ग्रुप असल्यामुळे वेळेचा ‘लसावी’ कमीच ठेवला जातो. त्यामुळे चेक-इन तब्बल दोन तास आधीच केले आणि मग उरलेल्या वेळेत एसीतला टाईमपास झाला.
दुपारी पावणेतीनच्या सुमारास पोर्टब्लेअरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर विमानतळावर उतरताना साहजिकच मनःस्थिती भारावलेली होती. आगमन दुपारी उशीरा झाल्याने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमात हॉटेलमधील चेक इन आणि सेल्यूलर जेल मधील ‘लाईट अँड साऊंड शो’ इतकाच कार्यक्रम होता. अंदमान-निकोबार भारताचाच भाग असले तरी ‘टाईम झोन’चा विचार करता हा भूभाग ब्रह्मदेशच्या - म्यानमारच्या खाली येतो. त्यामुळे आपल्याकडे साडेसहाच्या सुमारास मावळणारा सूर्य इथे साडेचार - पावणेपाचलाच क्षितिजाआड गेलेला असतो. त्यामुळे इथल्या पर्यटनाला वेळेच्या मर्यादा असणार, हे निघण्यापूर्वीच लक्षात आलेले होते...!
सेल्यूलर जेलच्या दरवाजातील वटवृक्षाला साक्षीदार व सूत्रधार कल्पून मांडलेला ‘लाईट अँड साऊंड’ शो पहिल्या दिवसाच्या आकर्षणाचे केंद्र होता खरा, पण ओम पुरीच्या खर्जातील आवाजातून मांडला गेलेला इतिहास मनामनांतील पौरूष, क्षात्रवृत्ती जागृत करण्याऐवजी हतबल वार्धक्याची केविलवाणी अनूभूती देणारा वाटला. शब्दांशब्दांतून स्फुल्लिंग चेतविण्याऐवजी पेटत्या निखार्यां वर पाण्याचा शिडकावा करणारा वाटला. आपल्या जहाल कृत्यांनी ब्रिटिशांना जेरीला आणणार्याव स्वातंत्र्यवीरांच्या पराक्रमांची गाथा सांगण्यापेक्षा भाकड अहिंसेच्या पुजार्यांंचेच गुणगाण करणारा वाटला. या संहितेची प्रेरणा स्फूर्तीतून आली की औपचारिकतेतून, हा मला संशोधनाचा विषय वाटतो. हा खेळ नव्याने मांडायला हवा. ही संहिता बदलायला हवी. इथून जाताना प्रेक्षकांच्या मनातील देशभक्ती उचंबळून यावयास हवी... देशासाठी काही करण्याची प्रेरणा जागवायला हवी. ही निव्वळ भूतकाळाची जंत्री नकोय, त्याला उज्ज्वल भवितव्याचा जोड द्यायला हवा...
000
रात्री झोपताना सूचना मिळाली, ‘पहाटे दोनला उठायचे, 3 वाजता चहा मिळेल आणि साडेतीनला बसमध्ये बसायचे.’ स्थानिक वेळेचा पहिला फटका पहिल्याच रात्री! इतक्या पहाटे निघण्याचे कारण? पहिली भेट होती बारतांगला. इथे निसर्गाच्या चमत्कारातून अवतरलेली चुनखडींची लेणी अप्रतिम आहेत. इथे पोहोचायचे तर सुमारे 125 किलोमीटरचा प्रवास बसने करायचा, त्यानंतर 15 मिनिटांचे ट्रोलरचा जलप्रवास आणि त्यानंतर पुढे अर्ध्या तासाचा स्पीडबोटने गाठायचा पल्ला. परतीचा क्रम पुन्हा तसाच...!
शिवाय, हा रस्ता जोरवा या वनवासी भागातून जाणारा. त्यांना त्रास नको म्हणून दिवसातून फक्त 4 वेळा वाहनांना त्या परिसरातून जाण्याची परवानगी. सकाळी 6, 9, दुपारी 12 आणि 3. परतीची परवानगीही तशीच...! हा सगळाच अजब प्रकार. एकीकडे पर्यटनाचा चालना देण्याची भूमिका जाहीर करायची आणि दुसरीकडे हा आडमुठा सरकारी प्रकार. सकाळी 6 च्या बॅचमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी साडेचार-पाचपासून शेकडोच्या संख्येने रांगा लागलेल्या.
पण या गैरसोयीतून गेल्यानंतर पाहता आलेला निसर्गाचा चमत्कार मंत्रमुग्ध करणारा ठरला. काही अतिउत्साही मंडळींनी हात लावून केलेले काही शिल्पांचे नुकसान सोडले तर एका घळीत साकारलेला हा खजिना अप्रतिमच. पण एक गोष्ट जाणवली. या कलाकृतींमागचे विज्ञान समजावून देण्यापेक्षा कुठल्या दगडात हत्ती दिसतोय आणि कुठे गणपती यांचाच तपशील गाईड जास्त सांगत होते! या ठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे अर्धा तास स्पीडबोडमधून प्रवास केल्यानंतर सुमारे सव्वा किलोमीटर जंगलातून चालावे लागते. हा मार्गही छान विकसित केलेला. या बेटांवरील वनसंपदा किती संपन्न आहे याच्या पुढील तीन-चार दिवसांत येणार्याा प्रत्यंतराचीच जणू ही झलक!
000
पुढचा दिवस होता हॅवलॉक बेटांवर जाण्याचा. इथले राधानगर बीच हे देशातील सर्वांगसुंदर समुद्रकिनार्यां पैकी एक. पोर्ट ब्लेअरमधून क्रूझने सुमारे अडीच तासांचा जलप्रवास आणि तेथे उतरून बसने साधारण अर्ध्या तासाची रपेट. हे केले की एका सुंदर समुद्र किनार्या वर आपण पोहोचतो. या दिवशी पहाटे मात्र चार पर्यंत झोपता आले. सव्वा पाचला जेट्टीवर पोहोचून सकाळी साडेआठच्या सुमारास हॅवलॉक बेटांवर पोहोचलो तेव्हा सूर्य चांगलाच वर आलेला होता. आपल्याकडे दहा-साडेदहाला येतो तसा!
बीचवर पोहोचण्याचा रस्ताही डोंगरातून, झाडा-झुडपांतून...
‘मंझिल’इतकाच ‘रास्ता’ही सुंदर! रस्ते मात्र अरुंद. खड्ड्यांनी भरलेले. समोरून रिक्षाही आला तरी दोन्हीपैकी एका वाहनाला रस्ता सोडून खाली उतरावे लागेल, असा. काही टूर ऑपरेटर या ठिकाणी मुक्कामाचीही सोय करतात. तसे झाले तर बीचसाठी जास्त वेळ देता येणे शक्य असते. पण ती सोय ‘हनिमुन कपल’साठी अधिक उपयोगाची...! फार तर सेकंड हनिमुनच्या लाभार्थ्यांसाठीही ते ठीक...!
छान सोनेरी वाळू, शांत पहुडलेला नीतळ पाणपसारा, अर्धचंद्राकार हिरव्याकंच डोंगरांची लाभलेली झालर आणि वाळू-पाण्यात पहुडलेले सुखलोलुप जीव... राधानगरचा हा किनारा खरेच रमणीय. राधानगरचा हा रस्ता शामनगरातून जातो हे ही गमतीचे! राधा-श्यामाची प्रीत फुलावी, असेच इथले रम्य वातावरण. पाण्यात उतरायचे त्यांनी पाण्यात उतरावे, वाळूत पहुडणार्यांलना त्याचे स्वातंत्र्य, किनार्याावर बसायचे तर बाकांची सोय आणि थोडा उंचीवरून नजारा पाहायचा तर लाकडी मनोरे उभारलेले... जो जे वांच्छिल तो ते लाहो...! दोन-तीन तास पाण्यात खेळून आलेला थकवा घालवायचा तर थोडा पोटोबा करावा लागणार. पण काकडीसारखी फळे बाहेरून आणावी लागत असल्याने विक्रेत्यांना त्याची किंमत 40 रुपये ठेवावी लागते... साहजिकच दोन काकडींची भूक मग एकाच काकडीवर भागते!
000
इथे जाता-येतानाचा क्रूझचा प्रवास मात्र रम्य... समुद्राच्या मध्यम लाटा अंगावर खेळवत वेगाने पाणी कापणारी क्रूझ, डेकवर उभे राहून भन्नाट गार वारा अंगावर घेत, अधूनमधून उडणार्यार तुषारांनी किंचित ओलावत... अशा वातावरणात अनुभवण्याची चहा-कॉफीची चव (इच्छुकांसाठी जो जे वांच्छिलची सोय नाही. क्रूझवर मद्यपानास परवानगी नसते!)... सारा माहोल प्रसन्न करणारा. निघताना सूर्योदय बंदरातच होतो पण सूर्यास्त मात्र समुद्रातून पाहता येतो. अंधार पडता पडता आपण पोर्ट ब्लेअरच्या जेट्टीवर पोहोचतो आणि थकले भागले शरीर लवकरात लवकर बिछाना जवळ करू मागते...! (क्रमशः)