Tuesday, March 28, 2017

गोविंदराव व नागनाथराव ः व्यावसायिक सचोटीतील आदर्श

औरंगाबादच्या जाहिरात विश्वातील पहिल्या पिढीचे उद्यमी आणि ‘गरूड अ‍ॅड्स’चे संस्थापक (कै.) गोविंद देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रदान करण्यात येणारा ‘गोविंद सन्मान’ औरंगाबादच्या पहिल्या पिढीतील ज्येष्ठ पत्रकार नागनाथराव फटाले यांना आज (28 मार्च) प्रदान होत आहे. व्यावसायिक सचोटीच्या निकषावर 100 टक्के निष्कलंक म्हणावीत, अशा या दोन्ही व्यक्तिमत्त्वांचा हा आगळा संयोग. पुरस्कार प्रदानाच्या निमित्ताने दोघांच्याही व्यक्तिमत्त्वांचा हा धावता आढावा -

- दत्ता जोशी, औरंगाबाद
--------------------------------------------------------

काही व्यक्तिमत्त्वांच्या पहिल्या भेटीत सुद्धा काही वेगळे घडत असते. अशी माणसे मनाला स्पर्शून जातात. त्यांचे-आपले काहीतरी अंतरंग नाते आहे, असे जाणवू लागते. गोविंद देशपांडे आणि नागनाथ फटाले या दोघांच्याही बाबतीत असेच आहे. निष्कलंक वैयक्तिक आणि व्यावहारिक चारित्र्य, सर्वोच्च व्यावसायिक सचोटी आणि पराकोटीची सामाजिक बांधिलकी जपणारी ही दोन माणसे. आज एकाच्या नावाचा सन्मान दुसर्‍या व्यक्तीला प्रदान होताना हा योग नक्कीच लक्ष्यवेधी ठरतो.

गोविंदराव औरंगाबाद शहरातील जाहिरात विश्वाचेे आदरणीय नाव. औरंगाबादेत स्थापन झालेली ‘गरूड अ‍ॅड्स’ ही दुसरी जाहिरात संस्था. साधारण 1980 च्या दशकात गोविंद देशपांडे आणि विलास कुलकर्णी या रा. स्व. संघाच्या संस्कारात वाढलेल्या दोन मित्रांनी ‘गरूड’ची स्थापना केली. संघाचा संस्कार व्यवसायात जसाच्या तसा उतरवताना ‘गरूड’ने सचोटीचे मानदंड निर्माण केले. ग्राहकांप्रती असलेली पारदर्शी व्यवहारांची बाब असो की दैनिकांप्रती असलेला चोख व्यवहार, प्रत्येक आघाडीवर ‘गरूड’ने आपली प्रतिमा उजळवून ठेवली. दुर्दैवाने हे दोघेही भागीदार अल्पायुषी ठरले. पण त्यांच्या सचोटीच्या उदाहरणांना आता आदर्श वस्तुपाठांचे मोल प्राप्त झालेले आहे.

हेच मोल नागनाथराव फटाले यांच्या पत्रकारितेला सुद्धा प्राप्त आहे. पत्रकारितेच्या बदलत्या स्वरुपात सुद्धा आपली प्रतिमा राखण्यात त्यांना यश आले. आज वयाच्या 80 व्या वर्षीही (जन्म 23 जून 1937) सक्रीय असलेले नागनाथराव मराठवाड्यातील पत्रकारितेच्या पहिल्या पिढीशी आजच्या पिढीचा उपलब्ध असलेला बहुधा एकमेव दुवा आहेत. त्यांच्या आयुष्याचे सिंहावलोकन हा जणू मराठवाड्याच्या पत्रकारितेचा इतिहास मानता यावा!

श्री. फटाले यांचे मूळ गाव पूर्वीच्या निझाम संस्थानातील मुधोळी (जिल्हा गुलबर्गा) पण रझाकारांच्या  छळामुळे त्यांचे कुटुंब सोलापुरात स्थलांतरीत झाले. तेथेच नागनाथराव जन्मले. पुणे विद्यापीठाच्या इंटर कॉमर्स परीक्षेत अर्थशास्त्राचे ते 1959 चे सुवर्णपदकाचे मानकरी. 1962 ते 64 दरम्यान त्यांनी सोलापूरच्या संचारसाठी बातमीदारी केली. सन 1967 मध्ये ‘भूज’ पाकिस्तानला देऊ नये म्हणून दीर्घकालीन सत्याग्रह सीमेनजकीच्या खावडा येथे झाला. त्या काळात सत्याग्रहींची व्यवस्था करणे, तेथील बातम्या पाठविणे ही कामे केली. शेवटच्या तुकडीत ते सामील झाले. त्याचा परिणाम म्हणून त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. भूज तुरुंगातून सुटल्यानंतर ते 1968 साली औरंगाबादला आले आणि त्यांनी ‘मराठवाडा’ दैनिकात पूर्ण वेळ बातमीदार म्हणून कामाला सुरूवात केली. 1978 ते 1987 पर्यंत ते ‘टाईम्स ऑफ इंडिया (मुंबई) या इंग्रजी दैनिकाचे तसेच पुण्याहून प्रकाशित होणार्‍या ‘दै. सकाळ’चे अर्धवेळ बातमीदार म्हणून कार्य केले. 1987 पासून ‘दैनिक सकाळ’ चे पूर्णवेळ बातमीदार म्हणून काम पाहू लागले. जून 2004 पर्यंत ते ‘सकाळ’समवेत कार्यरत होते. सन 1978 पासून विद्यापीठ पत्रकारितेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मानद प्राध्यापक म्हणून त्यांनी वृत्तलेखन आणि विकास पत्रकारिता या विषयाचे अध्यापनही उत्कृष्टपणे केले. 

सार्वजनिक जीवनात श्री. फटाले यांचा मोठा सहभाग राहिला. मराठवाड्यातील पहिली ग्राहक चळवळ सुरू (1972-74) करण्याचा मान त्यांच्याकडे जातो. 1977 च्या आसपास फटाले यांनी कामगार क्षेत्रात प्रत्यक्ष कार्य सुरू केले. एस. टी. हमालांची त्यांनी राज्यस्तरीय संघटना बांधली. साधारण 1968 च्या नंतरचा काळ लक्षात घेता म्हणावे लागते की, त्याकाळी वृत्तपत्रात पाऊसपाणी, पिके यासंबंधी फारच कमी बातम्या येत असत. त्याही काळात शेतीसंबंधी घटना, घडामोडी याही बातमीचे विषय आहेत, हे श्री. फटाले यांनी सातत्याने दाखवून दिले. सन 1985 च्या आसपास दुष्काळाच्या संदर्भातील लेखमालिका लिहिली. त्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय विकास पत्रकारितेबद्दल प्रथम क्रमांक पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठवाड्यातील जनजीवन, प्रश्न, सांस्कृतिक- शैक्षणिक प्रगती, विशेषतः दलितांच्या आकांक्षा, मागासलेपणातून निर्माण झालेल्या भावना, गरिबांचे  प्रश्न, बेकारांचे प्रश्न, कलावंत, ऐतिहासिक स्थळे, पैठणी उत्पादन यांचा परिचय श्री. फटाले यांच्या बातम्या व वार्तापत्रांतून मराठवाड्यातील वाचकांना झाला. त्यांची ही कामगिरी नोंद घेण्याजोगी होय.

श्री. नागनाथ फटाले यांचे कार्य फक्त पत्रकारिता व शिक्षण एवढ्यापुरतेच मर्यादित नव्हते तर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम केले. कामगारांच्या संघटना बांधल्या, उभारल्या, ग्राहक चळवळ उभी केली. याचबरोबर ज्योतिषशास्त्र व परामानसशास्त्र अकादमी, औरंगाबाद येथे उभारली. त्याचे त्यांनी संस्थापक अध्यक्ष म्हणूनही कार्य केले. तसेच ग्रंथालय चळवळीत अनेक वर्षे काम केले. औरंगाबादेतील सिटीझन फोरमचे ते सदस्य आहेत. आरंभीच्या काळात फटाले यांनी काही शासकीय समित्यांवर काम केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटवर ते पदवीधर मतदारसंघातून निवडून आले. 

विधायक बदलाची नोंद घेण्याबरोबरच विधायक कार्य करण्याला समाजाला प्रवृत्त करण्याची क्षमता विकास पत्रकारितेमध्ये असते. सामान्य जनांना विकासाची प्रेरणा मिळावी आणि विकासकार्यात त्यांचा सहभाग वाढावा आणि त्यातून सामान्य माणसाचा जीवनस्तर उंचवावा ही पत्रकारितेकडन अपेक्षा केली जाते. मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार श्री. नागनथ फटाले यांनी आयुष्यभर अशा विधायक बदलांची नोंद घेतली. त्यांनी लिहिलेली विकासविषयक वार्तापत्रे  याची साक्ष देतात...
त्यांच्या या कार्यप्रवासाचा गौरव आज ‘गोविंद सन्माना’ने होतो आहे यात श्री. फटाले यांचा सन्मान आहे आणि या पुरस्काराचाही तो आगळा गौरव आहे.

- दत्ता जोशी, औरंगाबाद

Tuesday, March 14, 2017

कैरीची चटणी... माझा ‘वीक पॉइंट’...!

(© दत्ता जोशी, औरंगाबाद)
उन्हाळ्याची चाहूल वेगवेगळ्या मार्गांनी सर्वांना लागत असेल, पण मला लागते ती झाडांवर लगडलेल्या हिरव्यागार कैऱ्यानी. या कैऱ्यानी माझे बालपण समृद्ध केले आहे. देवणी, उदगीर सोडून सुमारे 26-27 वर्षांपुर्वी औरंगाबादेत आलो तेव्हा बसलेल्या अनेक ‘सांस्कृतिक धक्क्यां’मध्ये ‘कैरी विकत घेणे’ हा एक मोठा धक्का होता. जगात काही गोष्टी अशाच जाता-येता घेऊन यायच्या असतात, या मध्ये कैरी ही एक महत्त्वाची गोष्ट असे. ती विकत घ्यायची असते, हे वास्तव पचायला बराच काळ लागला.
कुठलीही गोष्ट माझ्या गावाशी, देवणीशी जोडण्याची माझी सवय काही जात नाही. माझ्या आयुष्यात घडणार्या प्रत्येक गोष्टीत देवणीच्या आठवणी सामावलेल्या असतात. अर्थात, उदगीरच्या आठवणींचा स्पर्शही त्यांना असतो पण मुळात संबंध देवणीचा!
देवणीत बैलबाजाराच्या पलिकडे, नदीच्या काठालगत आमराई आहे. तिथे आंब्यांची दाट झाली. तिथे कुणी राखणदार असायचा. त्याची नजर चुकवून कैऱ्या पाडायच्या आणि पळवायच्या, हा आमचा नित्यक्रम. वर्गातील, गल्लीतील दोस्तांची शेती होती. त्यांच्यासोबत शेतावर जायचे आणि झाडावरील कैऱ्या मनसोक्त पाडून आणायच्या, ही त्यातल्या त्यात सहज-साधी-सोपी गोष्ट. शिवाय, शेतावर जाता येता रस्त्यात लागणार्यार झाडांवरील कैर्यान तोडणे हा एक विशेष कौशल्याचा भाग.
पण या पाडलेल्या कैऱ्याचे काय करायचे?
त्याचे दोन-तीन पर्याय असत. एक तर त्या कच्च्या खायच्या किंवा मग त्याची चटणी करायची किंवा मग कैरी भाजून किंवा उकडून पन्हे तयार करायचे. यातील पहिला मार्ग अधिक आवडीचा. देवणीच्या शाळेत असताना शेजारच्या गावातून दोस्त मंडळी माझ्या वर्गात शिकायला येत. हंचनाळ, संगम, अजनी, विळेगाव ही ती गावे. ही सगळी शेतकर्यानची मुले. त्यांच्या पिशवीत चटणी-भाकरीबरोबर ‘सिझनल’ फळे असत. कैर्याा, बोरं, सीताफळं, बिबे...! त्यांच्यातील काही जणांचे माझ्यावर भारी प्रेम. मला ते या रानमेव्यात वाटेकरी करून घेत.
कैऱ्यांच्या दिवसात आंबट-चिंबट कैऱ्या खाणे हा एक महत्त्वाचा सोहळा. कैरी पडली की आधी देठाजवळचा चीक गाळून टाकावा लागत असे. तो गाळला नाही, तर ओठांच्या कडेला लागून राहायचा आणि तो उतला की जखमा व्हायच्या. आमच्या चोरून कैरी खाण्याचा हा उघड कबुलीजबाब...! पण कैर्यार खाणे थांबायचे नाही. त्या काळात माझ्या खिशात एक खास पुडी असायची. कैरी नुसती खायची नसते... त्याला मीठ लावले की चव वाढते. काही जण मिठात तिखट टाकून आणत. मी त्यात एक व्हॅल्यू अॅरडिशन करीत असे. मीठ आणि लाल तिखटात काळा मसाला, जिरेपूड अशा गोष्टी टाकत असे. त्याची भन्नाट चव अजूनही जिभेवर रेंगाळते. काही कैर्या अतिशय आंबट. काही खोबऱ्यासारख्या गोड. पाडाला आलेल्या पिवळसर गाभा असलेल्या कैर्यांनची चव तर शहरात कधी मिळणारच नाही! ती कैरी थेट झाडावरून तोडूनच खायला हवी...!
देवणीहून उदगीरला आलो. आमचे घर (तेव्हा) गावाबाहेर होते. आजूबाजूला शेती. रस्त्यातत ‘ख्रिश्चन बंगला’ नावाचा एक भलामोठा परिसर. त्याला काटेरी कुंपण घातलेले. त्या कुंपणालगत आंब्यांची झाडे. तिथला रखवालदार मात्र सजग असे. अशा वेळी त्याची नजर चुकवून काही विशिष्ट झाडांवरील कैर्याघ पाडणे ही कौशल्याची गोष्ट असायची. काही विशिष्ट झाडे या साठी की त्या झाडाच्या कैर्याू ‘ओळखी’च्या झालेल्या. काही खूप आंबट तर काही कमी. त्या त्या दिवसाच्या मूडप्रमाणे कैर्याश पाडायच्या. खिशातल्या खास ‘मसाल्या’सह गट्टम करायच्या. कधी दप्तरात टाकून शाळेत न्यायच्या...!
कैरीचे पन्हे करायची कामगिरी आईकडे असे पण कैरीची चटणी ही मात्र माझी खासियत. देवणीत असताना अगदी पहिल्यांदा अशी चटणी आत्यांनी केल्याचे आठवते. आत्या - म्हणजे माझ्या वडिलांच्या आत्या. मैनाआत्या... आम्हीही त्यांना आत्याच म्हणत असू. त्या परभणी जिल्ह्यातील धारासूरच्या. कधीमधी त्या आमच्याकडे येत, आम्ही त्यांच्याकडे जात असू. त्यांच्या हाताला छान गोडी. घरात आलेल्या कैर्यांधची त्यांनी केलेली चटणी वेगळीच होती. सालं काढलेली आणि कोय बाहेर काढून टाकलेली कैरी खलबत्त्यात टाकून वाटायची आणि त्यात वरून तिखट मीठ टाकायचे. ती वाटून एकजीव झाली की त्यावर मस्त फोडणी टाकायची. नंतर केव्हातरी असे लक्षात आले की ही चटणी थोडी तुरट – कडवट लागतेय. शोध घेतल्यावर लक्षात आले की हिरवी साल न काढता चटणी वाटून घेतली की तशी चव येते...! मग कटाक्षाने साले काढून चटणी करणे सुरू झाले.
चटणीचा दुसरा आणि माझा अधिक आवडता प्रकार म्हणजे कैरी किसून घेणे. इथेही हिरवी साल आधी पूर्णतः काढायची. शक्यतो कैरीचे दोन काप करून आतील कोय काढून टाकायची. कोय धरलेली असेल तर की काढून न टाकता तिच्या काठाकाठाने जात ती किसणीने किसून घ्यायची. मग कांदाही किसायचा. कांदा किसताना खरी कसोटी. गोड कांदा असेल तर ठीक, पण तिखट असेल तर डोळ्यांना धारा लागायच्या. तशा स्थितीत हाताला जखम होऊ न देता कांदा किसणे हे ही कौशल्याचेच.
कैरी खूप आंबट असेल तर कांद्याचे प्रमाण वाढवायचे. पण मग चटणी खूप वाढायची. ते नको असेल तर मग दुसरा एक गोड मार्ग... किसलेली कैरी एका पातेल्यात घ्यायची, त्यात पाणी टाकायचे आणि कैरीचा कीस घट्ट पिळून काढायचा. किसाची चटणी आणि अर्क उतरलेल्या पाण्यात आणखी थोडे पाणी वाढवून आणि साखर, मीठ टाकून छान सरबत...!
दुसरीकडे, कीस आणि कांदा एकत्र करायचा, त्यावर तिखट-मिठ टाकायचे. हे मिश्रण हाताने कालवायचे. थोडी चव पाहायची. जे काही कमी असेल ते वाढवायचे. हे सारे झाले की लोखंडी पळीत तेल घ्यायचे, फोडणी टाकायची आणि मोहरी-जिरे फोडणीत फुटले की ‘चर्र’ आवाजाचा आनंद घेत ती फोडणी चटणीवर पसरायची...! चटणीच्या ज्या भागाला थेट फोडणीचा स्पर्श झाला तिची चव खरपूस लागायची. हा खरपूसपणा वाढावा म्हणून मग मी नवी शक्कल लढविली. चटणीत बोटे घुसवून छिद्रे तयार करायची आणि मग फोडणी पसरायची. सपाट पृष्ठभागापेक्षा अधिक भागात चटणी पसरली जात असे...! फोडणीची चव तेवढ्याच जास्त भागात...!
हे सगळे झाले की मग आस्वादाची तयारी. सर्वसाधारणपणे उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या दोन-अडीच महिन्यांत मला वरण-भाजी वगैरे काहीही नसले तरी चालायचे. चटणी पोळी, चटणी भाकरी आणि चटणी भात... कुणाला राक्षसी वाटेल पण भाजीसारखा चटणीचा डोंगर ताटात घ्यायचा आणि तो संपवायचा. एकदा केलेली चटणी फार तर दोन दिवस टिकायची. तेव्हा घरी फ्रिज नव्हता आणि बाहेर ठेवलेले अन्न उन्हामुळे लवकर विटायचे. म्हणून मग संपविण्याचा हा असा मार्ग...!
उदगीर सुटले आणि औरंगाबादच्या मेसच्या जेवणात चटणी दिसेनाशी झाली. वर्षभरातच मेसला वैतागलो आणि खोलीवरच खिचडी - सँडविच - ऑम्लेट सुरू केले. तेव्हाही चटणी बंद होती. लग्नानंतर काही काळ पुण्यात होतो, तेथे चटणीची आठवण यायची. योगायोगाने सिंहगड रोडवर आनंद नगर भागात घराशेजारीच आंब्याची झाडे होती. पण कॅनॉलच्या दुसर्या टोकाला. बेत राहून गेला. चार-दोन वेळा कैऱ्या विकत आणून चटणी करून खाल्ली.
2001 च्या प्रारंभी औरंगाबादेत परतलो आणि चटणीचा सिलसिला कमी प्रमाणात का होईना नव्याने सुरू झाला. अर्थात, कैऱ्या ‘विकत आणलेल्या’ असतात. तयार करण्याची पद्धत तीच.. पारंपरिक. इतर सारा स्वयंपाक पत्नी करते पण चटणीचा विभाग माझ्याकडेच. तिला आणि मुलालाही ही चटणी फारशी आवडत नाही. ताटात वाढलेली चटणी ते फार तर उष्टावतात... मला वाईट वाटू नये म्हणून...!
मला मात्र आजही ही चटणी आवडते. मनसोक्त खाण्याची इच्छा असते. पण मागच्या सात-आठ वर्षांत थोडा त्रास होतोय. तिखट सहन होत नाही. (खाताना अर्थातच छान वाटते पण दुसर्याे दिवशी त्रास होतो!) म्हणून तिखटाचे प्रमाण कमी केलेय. आधी लालभडक होणारी चटणी आता फिकटली आहे. साहजिकच मिठाचे प्रमाणही कमी झालेय आणि तेलाचेही. पण चटणीचा हा किल्ला मी एकहाती लढवीत असतो.
ही चटणी असेल तर आजही मला भाजी-वरणाची गरज वाटत नाही...!
०००