Tuesday, March 14, 2017

कैरीची चटणी... माझा ‘वीक पॉइंट’...!

(© दत्ता जोशी, औरंगाबाद)
उन्हाळ्याची चाहूल वेगवेगळ्या मार्गांनी सर्वांना लागत असेल, पण मला लागते ती झाडांवर लगडलेल्या हिरव्यागार कैऱ्यानी. या कैऱ्यानी माझे बालपण समृद्ध केले आहे. देवणी, उदगीर सोडून सुमारे 26-27 वर्षांपुर्वी औरंगाबादेत आलो तेव्हा बसलेल्या अनेक ‘सांस्कृतिक धक्क्यां’मध्ये ‘कैरी विकत घेणे’ हा एक मोठा धक्का होता. जगात काही गोष्टी अशाच जाता-येता घेऊन यायच्या असतात, या मध्ये कैरी ही एक महत्त्वाची गोष्ट असे. ती विकत घ्यायची असते, हे वास्तव पचायला बराच काळ लागला.
कुठलीही गोष्ट माझ्या गावाशी, देवणीशी जोडण्याची माझी सवय काही जात नाही. माझ्या आयुष्यात घडणार्या प्रत्येक गोष्टीत देवणीच्या आठवणी सामावलेल्या असतात. अर्थात, उदगीरच्या आठवणींचा स्पर्शही त्यांना असतो पण मुळात संबंध देवणीचा!
देवणीत बैलबाजाराच्या पलिकडे, नदीच्या काठालगत आमराई आहे. तिथे आंब्यांची दाट झाली. तिथे कुणी राखणदार असायचा. त्याची नजर चुकवून कैऱ्या पाडायच्या आणि पळवायच्या, हा आमचा नित्यक्रम. वर्गातील, गल्लीतील दोस्तांची शेती होती. त्यांच्यासोबत शेतावर जायचे आणि झाडावरील कैऱ्या मनसोक्त पाडून आणायच्या, ही त्यातल्या त्यात सहज-साधी-सोपी गोष्ट. शिवाय, शेतावर जाता येता रस्त्यात लागणार्यार झाडांवरील कैर्यान तोडणे हा एक विशेष कौशल्याचा भाग.
पण या पाडलेल्या कैऱ्याचे काय करायचे?
त्याचे दोन-तीन पर्याय असत. एक तर त्या कच्च्या खायच्या किंवा मग त्याची चटणी करायची किंवा मग कैरी भाजून किंवा उकडून पन्हे तयार करायचे. यातील पहिला मार्ग अधिक आवडीचा. देवणीच्या शाळेत असताना शेजारच्या गावातून दोस्त मंडळी माझ्या वर्गात शिकायला येत. हंचनाळ, संगम, अजनी, विळेगाव ही ती गावे. ही सगळी शेतकर्यानची मुले. त्यांच्या पिशवीत चटणी-भाकरीबरोबर ‘सिझनल’ फळे असत. कैर्याा, बोरं, सीताफळं, बिबे...! त्यांच्यातील काही जणांचे माझ्यावर भारी प्रेम. मला ते या रानमेव्यात वाटेकरी करून घेत.
कैऱ्यांच्या दिवसात आंबट-चिंबट कैऱ्या खाणे हा एक महत्त्वाचा सोहळा. कैरी पडली की आधी देठाजवळचा चीक गाळून टाकावा लागत असे. तो गाळला नाही, तर ओठांच्या कडेला लागून राहायचा आणि तो उतला की जखमा व्हायच्या. आमच्या चोरून कैरी खाण्याचा हा उघड कबुलीजबाब...! पण कैर्यार खाणे थांबायचे नाही. त्या काळात माझ्या खिशात एक खास पुडी असायची. कैरी नुसती खायची नसते... त्याला मीठ लावले की चव वाढते. काही जण मिठात तिखट टाकून आणत. मी त्यात एक व्हॅल्यू अॅरडिशन करीत असे. मीठ आणि लाल तिखटात काळा मसाला, जिरेपूड अशा गोष्टी टाकत असे. त्याची भन्नाट चव अजूनही जिभेवर रेंगाळते. काही कैर्या अतिशय आंबट. काही खोबऱ्यासारख्या गोड. पाडाला आलेल्या पिवळसर गाभा असलेल्या कैर्यांनची चव तर शहरात कधी मिळणारच नाही! ती कैरी थेट झाडावरून तोडूनच खायला हवी...!
देवणीहून उदगीरला आलो. आमचे घर (तेव्हा) गावाबाहेर होते. आजूबाजूला शेती. रस्त्यातत ‘ख्रिश्चन बंगला’ नावाचा एक भलामोठा परिसर. त्याला काटेरी कुंपण घातलेले. त्या कुंपणालगत आंब्यांची झाडे. तिथला रखवालदार मात्र सजग असे. अशा वेळी त्याची नजर चुकवून काही विशिष्ट झाडांवरील कैर्याघ पाडणे ही कौशल्याची गोष्ट असायची. काही विशिष्ट झाडे या साठी की त्या झाडाच्या कैर्याू ‘ओळखी’च्या झालेल्या. काही खूप आंबट तर काही कमी. त्या त्या दिवसाच्या मूडप्रमाणे कैर्याश पाडायच्या. खिशातल्या खास ‘मसाल्या’सह गट्टम करायच्या. कधी दप्तरात टाकून शाळेत न्यायच्या...!
कैरीचे पन्हे करायची कामगिरी आईकडे असे पण कैरीची चटणी ही मात्र माझी खासियत. देवणीत असताना अगदी पहिल्यांदा अशी चटणी आत्यांनी केल्याचे आठवते. आत्या - म्हणजे माझ्या वडिलांच्या आत्या. मैनाआत्या... आम्हीही त्यांना आत्याच म्हणत असू. त्या परभणी जिल्ह्यातील धारासूरच्या. कधीमधी त्या आमच्याकडे येत, आम्ही त्यांच्याकडे जात असू. त्यांच्या हाताला छान गोडी. घरात आलेल्या कैर्यांधची त्यांनी केलेली चटणी वेगळीच होती. सालं काढलेली आणि कोय बाहेर काढून टाकलेली कैरी खलबत्त्यात टाकून वाटायची आणि त्यात वरून तिखट मीठ टाकायचे. ती वाटून एकजीव झाली की त्यावर मस्त फोडणी टाकायची. नंतर केव्हातरी असे लक्षात आले की ही चटणी थोडी तुरट – कडवट लागतेय. शोध घेतल्यावर लक्षात आले की हिरवी साल न काढता चटणी वाटून घेतली की तशी चव येते...! मग कटाक्षाने साले काढून चटणी करणे सुरू झाले.
चटणीचा दुसरा आणि माझा अधिक आवडता प्रकार म्हणजे कैरी किसून घेणे. इथेही हिरवी साल आधी पूर्णतः काढायची. शक्यतो कैरीचे दोन काप करून आतील कोय काढून टाकायची. कोय धरलेली असेल तर की काढून न टाकता तिच्या काठाकाठाने जात ती किसणीने किसून घ्यायची. मग कांदाही किसायचा. कांदा किसताना खरी कसोटी. गोड कांदा असेल तर ठीक, पण तिखट असेल तर डोळ्यांना धारा लागायच्या. तशा स्थितीत हाताला जखम होऊ न देता कांदा किसणे हे ही कौशल्याचेच.
कैरी खूप आंबट असेल तर कांद्याचे प्रमाण वाढवायचे. पण मग चटणी खूप वाढायची. ते नको असेल तर मग दुसरा एक गोड मार्ग... किसलेली कैरी एका पातेल्यात घ्यायची, त्यात पाणी टाकायचे आणि कैरीचा कीस घट्ट पिळून काढायचा. किसाची चटणी आणि अर्क उतरलेल्या पाण्यात आणखी थोडे पाणी वाढवून आणि साखर, मीठ टाकून छान सरबत...!
दुसरीकडे, कीस आणि कांदा एकत्र करायचा, त्यावर तिखट-मिठ टाकायचे. हे मिश्रण हाताने कालवायचे. थोडी चव पाहायची. जे काही कमी असेल ते वाढवायचे. हे सारे झाले की लोखंडी पळीत तेल घ्यायचे, फोडणी टाकायची आणि मोहरी-जिरे फोडणीत फुटले की ‘चर्र’ आवाजाचा आनंद घेत ती फोडणी चटणीवर पसरायची...! चटणीच्या ज्या भागाला थेट फोडणीचा स्पर्श झाला तिची चव खरपूस लागायची. हा खरपूसपणा वाढावा म्हणून मग मी नवी शक्कल लढविली. चटणीत बोटे घुसवून छिद्रे तयार करायची आणि मग फोडणी पसरायची. सपाट पृष्ठभागापेक्षा अधिक भागात चटणी पसरली जात असे...! फोडणीची चव तेवढ्याच जास्त भागात...!
हे सगळे झाले की मग आस्वादाची तयारी. सर्वसाधारणपणे उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या दोन-अडीच महिन्यांत मला वरण-भाजी वगैरे काहीही नसले तरी चालायचे. चटणी पोळी, चटणी भाकरी आणि चटणी भात... कुणाला राक्षसी वाटेल पण भाजीसारखा चटणीचा डोंगर ताटात घ्यायचा आणि तो संपवायचा. एकदा केलेली चटणी फार तर दोन दिवस टिकायची. तेव्हा घरी फ्रिज नव्हता आणि बाहेर ठेवलेले अन्न उन्हामुळे लवकर विटायचे. म्हणून मग संपविण्याचा हा असा मार्ग...!
उदगीर सुटले आणि औरंगाबादच्या मेसच्या जेवणात चटणी दिसेनाशी झाली. वर्षभरातच मेसला वैतागलो आणि खोलीवरच खिचडी - सँडविच - ऑम्लेट सुरू केले. तेव्हाही चटणी बंद होती. लग्नानंतर काही काळ पुण्यात होतो, तेथे चटणीची आठवण यायची. योगायोगाने सिंहगड रोडवर आनंद नगर भागात घराशेजारीच आंब्याची झाडे होती. पण कॅनॉलच्या दुसर्या टोकाला. बेत राहून गेला. चार-दोन वेळा कैऱ्या विकत आणून चटणी करून खाल्ली.
2001 च्या प्रारंभी औरंगाबादेत परतलो आणि चटणीचा सिलसिला कमी प्रमाणात का होईना नव्याने सुरू झाला. अर्थात, कैऱ्या ‘विकत आणलेल्या’ असतात. तयार करण्याची पद्धत तीच.. पारंपरिक. इतर सारा स्वयंपाक पत्नी करते पण चटणीचा विभाग माझ्याकडेच. तिला आणि मुलालाही ही चटणी फारशी आवडत नाही. ताटात वाढलेली चटणी ते फार तर उष्टावतात... मला वाईट वाटू नये म्हणून...!
मला मात्र आजही ही चटणी आवडते. मनसोक्त खाण्याची इच्छा असते. पण मागच्या सात-आठ वर्षांत थोडा त्रास होतोय. तिखट सहन होत नाही. (खाताना अर्थातच छान वाटते पण दुसर्याे दिवशी त्रास होतो!) म्हणून तिखटाचे प्रमाण कमी केलेय. आधी लालभडक होणारी चटणी आता फिकटली आहे. साहजिकच मिठाचे प्रमाणही कमी झालेय आणि तेलाचेही. पण चटणीचा हा किल्ला मी एकहाती लढवीत असतो.
ही चटणी असेल तर आजही मला भाजी-वरणाची गरज वाटत नाही...!
०००

No comments: