Monday, January 23, 2012

औरंगाबादची वाटचाल : छोटे खेडे ते मोठे खेडे...!

'दैनिक सामना'ने बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने दि. २३ जानेवारी २०१२ रोजी प्रकाशित केलेल्या विशेष पुरवणीत 'मराठवाड्याचा सुवर्णकाळ' या विषयावर लिहिण्यास मला निमंत्रित केले होते. असा काही सुवर्णकाळ कधी उगवलाच नाही, असा माझा युक्तिवाद होता... तरीही, माझ्या दृष्टीतून लिहिण्याचे स्वातंत्र्य देत त्यांनी माझा लेख प्रकाशित केला. मी त्यांना दिलेला हा मूळ लेख...
.............................................................

काही शहरे शापित असतात. अशा शहरांच्या वाटचालीत कधी सुवर्णकाळाचा स्पर्शच झालेला दिसत नाही. ही शहरे काळाच्या रेट्यानुसार वाढत जातात; बदलत जातात; आपली ओळख पुन्हा पुन्हा बनवत जातात आणि त्यांचा दिवस ‘मागील पानावरून पुढे’ असा उलटत जातो. औरंगाबाद शहराचेही असेच आहे...

शालीवाहनाच्या काळात राजधानी असलेल्या पैठण शहरापासून साधारण 50 किलोमीटर आणि राजे रामदेवराय यांची राजधानी असलेल्या देवगिरीपासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर त्या काळपासून वसलेले ‘खडकी’ हे खेडे आता मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखले जाते. भौगोलिक व काही प्रमाणात राजकीय दृष्ट्या असलेले हे स्थान सोडले, तर या शहराची खूप काही वेगळी ओळख सांगता येत नाही. तशा अर्थाने हे शहर बिनचेहर्‍याचे आहे. वेगवेगळ्या कालखंडात वाट्याला आलेली भूमिका बिनबोभाटपणे पार पाडत हे शहर सुस्तपणे वाढत आणि पसरत राहिले. सुवर्णकाळ म्हणावा असा कालखंड या शहराने कधी पाहिल्याचे दिसत नाही. गरीबाघरी एखाद्या दिवशी पुरणपोळीचे गोडधोड व्हावे आणि तीच त्यांची दिवाळी म्हणावी, असाच काहीसा हा प्रकार!

एकेकाळच्या ‘सिल्क रुट’वरील एक छोटे खेडे हे या शहराचे मूळ रुप. ही ओळख औरंगजेबाच्या काळापर्यंत कायम राहिली. निजामशहाचा एक सेनापती आणि शहाजीराजे भोसले यांचा समकालीन असलेल्या मलीक अंबर याने ‘खडकी’चे स्वरुप बदलण्याचा प्रयत्न केला. शहराला तटबंदी आली, पाणचक्की यांची निर्मिती झाली, नवा चेहरा - नवे रुप मिळाले. पुढे औरंगजेबाच्या मुलाने मकबर्‍याची उभारणी केली. आज असलेल्या ‘विभागीय राजधानी’ची पाळेमुळे अशा रितीने मलीक अंबरच्या प्रयत्नांत गुंतली आहेत.

त्यानंतर थेट स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत या भागात फारसे काही घडले नाही. भारत स्वतंत्र झाला तेव्हा हा भाग पारतंत्र्यातच होता. हैदराबादच्या निजामाच्या आधिपत्याखाली असलेला हा भाग उशिराने भारतात सामील झाला. निजामाच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी जनतेने मोठा लढा उभारलेला होता. सरदार पटेलांनी ‘पोलिस ऍक्शन’द्वारे जनतेच्या उठावाला पाठिंबा दिला. या सार्‍या चळवळीत हैदराबादपासून जालन्यापर्यंत भरपूर हालचाली झाल्या. सशस्त्र लढे उभारले गेले. चैतन्याची, स्वातंत्र्यलालसेची सळसळ सर्वत्र दिसत होती. या लढ्याला गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा यांच्यासारखे नेते या शहराने दिले पण य शहराच्या मातीत कधी ही चळवळ रुजलेली दिसली नाही. निजामाच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी सर्वत्र उठाव सुरू असताना हे शहर तुलनेत शांत होते.

स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्यांदा या शहराचे भौगोलिक महत्व ओळखले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी! मराठवाडा तेव्हाही शैक्षणिक दृष्ट्या मागास होता. पदवी मिळवायची, तर विद्यार्थी हैदराबादला जात किंवा नागपूरला. ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’च्या रुपाने डॉ. आंबेडकर यांनी या शहरात शिक्षणाची गंगा आणली. अत्यंत व्यापक दूरदृष्टीचा परिचय देत नागसेनवनातील खूप मोठा परिसर त्यांनी या संस्थेसाठी खरेदी केला होता. साधारण 1950 च्या दशकात त्यांनी घेतलेला हा निर्णय नक्कीच या शहराच्या इतिहासात अतिशय महत्वाचे पान ठरणारा आहे. पुढे इथे विद्यापीठ रुजले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आले पण या शैक्षणिक विस्तारातील पहिले पाऊल डॉ. आंबेडकर यांनी टाकले, हा शैक्षणिक वाटचालीतील महत्वाचा निर्णय म्हणता येईल.

स्वातंत्र्यपूर्व काळातील साधारण एक दशक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील साधारण दोन दशके असा एकंदर तीन-चार दशकांचा काळ या शहराच्या सांस्कृतिक वाटचालीत महत्वाचा मानता येईल. ‘मेळे’ हे या काळातील एक महत्वाचे वैशिष्ट्य होते. विशेषत्वाने गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक जागृतीसाठी या चळवळीचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. समाजाच्या मनात विविध सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करण्याच्या कामी मेळ्यांनी बजावलेली भूमिका महत्वाची ठरली. वाद्यवृंद, गायक, नर्तक आदींचा समुच्चय म्हणजे ‘मेळा’. ही पथके शहराबरोबरच परिसरातील गावोगावी जाऊन मनोरंजनातून जनजागृतीची महत्वाची भूमिका पार पाडत. सांस्कृतिक अंगाने जाणारी ही सामाजिक आणि राजकीय चळवळ म्हणता येऊ शकेल. यातून अनेक नवे कलाकार घडले.

‘मराठवाडा विद्यापीठा’च्या नामांतराच्या मुद्‌द्यावरून एक खूप मोठे वादळ मराठवाड्याने अनुभवले. या वादळाचे केंद्रस्थान साहजिकच हे शहर राहिले. राजकीय स्वार्थापोटी सामाजिक सौहार्दाचा बळी कसा दिला जातो, याचे हे उत्तम उदाहरण. गांधीवधानंतर समाजात ब्राह्मणांच्या बद्दल ज्या पद्धतीने पद्धतशीरपणे द्वेषाची पेरणी करण्यात आली, त्याच पद्धतीने नामांतराच्या मुद्‌द्यावरून दलित आणि दलितेतर समाजात दुहीचे बीज तत्कालीन सत्ताधार्‍यांनी मोठ्या चालाखीने पेरले. मुळातच पुण्या-मुंबईच्या मानाने सामाजिक पातळीवर जो भाग काही दशके मागे होता, त्या भागाला आणखी खूप मोठा काळ मागे ढकलण्याचे काम या निर्णयातील हडेलहप्पीने केले. जो मुद्दा समाजाच्या जाणीवजागृतीतून सामोपचाराने, समजूतदारपणे अंमलात आणता आला असता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलच्या लोकजागृतीतून, त्यांनी या परिसरात आणलेल्या शिक्षणाच्या गंगेच्या निर्णयाचे महत्व अधोरखित करून करता आला असता, त्या विषयात राजकीय नेत्यांनी आणि काही विशिष्ट जातीच्या नेत्यांनी केलेली विषपेरणी या परिसराचे मोठे सामाजिक नुकसान करणारी ठरली. 1993 मध्ये ‘नामांतरा’चे रुपांतर ‘नामविस्तारा’त झाले आणि याच मंडळींनी त्याचे श्रेयही पद्धतशीरपणे उपटले.

जिथेतिथे मतांच्याच राजकारणाचा विचार करणार्‍या प्रवृत्तींनी या परिसरात मोठी जातीय तेढ जन्माला घातली. हा राजकीय अध्याय मात्र काळाकुट्ट म्हणता येईल असा आहे. यातून आक्रमक स्थानिक दलित नेतृत्व या परिसरात जन्माला आले, ही काळ्या ढगांची रुपेरी किनार ठरली, पण या नेतृत्वात वैचारिक परिपक्वतेचा अभाव होता, हे ही तितकेच खरे. मराठवाड्याबाहेरील अनेक दलित नेते या मुद्द्यावरून राज्यात प्रस्थापित झाले, पण या विभागातून राज्य पातळीवरील नेतृत्व उभे करण्यात ही चळवळ अपयशी ठरली.

नामांतरावरून सामाजिक पातळीवर मोठी घुसळण सुरू असतानाच साधारण 1980 च्या दशकात या शहराच्या औद्योगिक इतिहासाचा नवा अध्याय लिहिण्यास सुरवात झाली. शहरातील रेल्वेस्थानकालगत असलेल्या औद्योगिक क्षेत्रात आणि चिकलठाणा परिसरातील औद्योगिक क्षेत्रात काही उद्योग नक्कीच उभे होते. पण वाळुज औद्योगिक परिसरात आलेल्या ‘बजाज’ने या परिसराचे रुपडे बदलले. शहराच्या औद्योगिक आणि पर्यायाने आर्थिक उन्नतीचा हा सोपान ठरला. ‘बजाज’च्या माध्यमातून परस्परपूरक उत्पादने निर्माण करणार्‍या उद्योगांचे (ऍन्सिलरीज) इथे विणले गेले. वाळुज औद्योगिक वसाहतीमधील साधारण 70 ते 80 टक्के कंपन्यांमध्ये आजही ‘बजाज’साठी लागणार्‍या सुट्या भागांचे उत्पादन होते ही वस्तुस्थिती लक्षणीय मानता येईल. एक नवे स्थित्यंतर या उद्योगमुळे परिसरात आले. शहराची ओळख बदलणारा हा कालखंड ठरला. ‘विभागीय राजधानी’ हे बिरूद खर्‍या अर्थाने मानता येईल अशा घडामोडी याच काळात शहरात घडू लागल्या.

या घडामोडींतील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आजूबाजूच्या जिल्हे - शहर - गावांतून नोकरीच्या आशेने लोकांचे लोंढे औरंगाबादकडे वळू लागले. कामधंदा शोधण्यासाठी येणार्‍या या समाजघटकांनी या शहराच्या अर्थव्यवस्थेत आपापल्या परीने भर घातली. ‘बजाज’चा बोनस आल्याशिवाय दिवाळीतील इथली बाजारपेठ फुलत नाही, ही वस्तुस्थिती आजही कायम आहे. ‘बजाज’च्या पाठोपाठ आलेल्या ‘व्हिडिओकॉन’नेही इथल्या अर्थव्यवस्थेत महत्वाचे योगदान दिले. मात्र या कंपनीने ‘ऍन्सिलरी’चे जाळे विणले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे निर्माण झालेले रोजगार हेच त्यांचे अर्थव्यवस्थेतील योगदान ठरले. या उलट ‘बजाज’ने असंख्य उद्योजक उभे केले आणि हजारो हातांना काम मिळवून दिले.

या औद्योगिक भरभराटीबरोबरच इथे कामगार चळवळींचाही जन्म झाला. कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा उभारण्याचा मूळ उद्देश असतानाच या चळवळींतून काही विकृती जन्माला आल्या आणि यातून शहराचे नाव मात्र बदनाम झाले. आंधळा वैयक्तिक स्वार्थ समाजाचे कसे नुकसान करतो हे नामांतराच्या चळवळीने दाखवून दिले तसेच प्रत्यंतर कामगार चळवळीने औद्योगिक क्षेत्रात आले. शहराच्या प्रगतीला मारक ठरणारे अनेक निर्णय कामगारांचे नेते म्हणविणार्‍या अदूरदृष्टीच्या अहंमन्य नेत्यांनी घेतले. त्याची परिणिती कुठे एखाद्या कंपनीच्या व्यवस्थापकाला जिवंत जाळण्यात झाली (पैठण औद्योगिक वसाहत) तर कुठे कारखान्यावरच हल्लाबोल करण्यात झाली (बजाज). यातून खूप चुकीचे संदेश औद्योगिक जगतात गेले आणि परिणामी नवे उद्योग या शहरात येण्याची संधी हातची गेली. एवढेच नव्हे, तर ‘बजाज’च्या नेतृत्वानेही एकेकाळी आपला औरंगाबादेतील ‘सेटअप’ गुंडाळण्याचा विचार जाहीरपणे बोलून दाखविला होता. हे पाऊल उचलले गेले असते, तर ती स्थिती शहराच्या दृष्टीने अतिशय लाजीरवाणी ठरली असती.

शहराच्या विकासात सर्वात मोलाचे योगदान असलेला एखादा महत्वाचा उद्योग अशा प्रकारे आपला गाशा गुंडाळण्याचा विचार करतो, ही बाबच खूप धक्कादायक होती. ‘सामना’नेच हा मुद्दा सर्वप्रथम उजेडात आणला. त्यानंतर वेगवान हालचाली घडल्या. औद्योगिक व प्रशासकीय स्तरांवर अनेक बैठका झाल्या, तशाच कामगार संघटनांमध्येही हालचाली झाल्या. या निर्णयाचे गांभीर्य सर्वांच्याच लक्षात आले आणि त्या नंतर मात्र शहरातील कामगार संघटना बर्‍यापैकी शहाण्यासारख्या वागू लागल्या. काही अपवाद सोडले, तर या आघाडीवर आता बर्‍यापैकी शांतता आहे. कामगारांनीच आपल्या संभाव्य बेकारीपोटी आपल्या नेत्यांवर आणलेला दबाव नेत्यांना शहाणपण शिकवून गेला! ‘बजाज’ नंतर बर्‍याच काळाने शहरात नव्याने आलेले ‘स्कोडा’, ‘फोक्सवॅगन’सारखे उद्योग नावालाच या शहरात आहेत. या उद्योगांनी या शहराच्या आर्थिक विकासात कसलीही भर घातलेली नाही. ‘परदेशातून आलेले सुटे भाग जोडणारे केंद्र’ एवढेच या उद्योगांचे स्वरुप आहे. मर्यादित कामगार आणि मोजके अधिकारी एवढीच रोजगारनिर्मिती यातून झाली.

या शहराच्या क्रयशक्ती आणि आर्थिक क्षमतेच्या विपरीत काही गोष्टी मागील पाच-सात वर्षांत घडत आहेत. यातून काही नकारात्मक संदेश प्रसृत होत आहेत. हे विषय मुख्यत्वे आर्थिक उलाढालीशी संबंधित आहेत. सध्या जगभरात चाललेला व्यापारी चकचकाट या शहरातही दिसतो आहे, पण त्याच वेळी त्यामागील आर्थिक गणिते चुकल्यामुळे तो उघडाही पडतो आहे आणि काहींना गाशाही गुंडाळावा लागत आहे...! ‘मॉल संस्कृती’ आता मोठ्या शहरांतून रुजते आहे. मुंबई-पुणे-नाशिक पाठोपाठ ती या शहरातही आली. पण या संकृतीमागील खरी ताकदच इथे नाही. ही ताकद अर्थातच ‘पैसा’ ही आहे. दीडशे मर्सिडीझ खरेदी करणारे शहर म्हणून या शहराचे नाव जगभर झाले, पण हा खोटा देखावा होता. हे दीडशे लोक म्हणजे हे शहर नव्हे. मुठभर धनिकांकडे असलेली श्रीमंती ही त्या शहराची अथवा परिसराची श्रीमंती असत नाही. काही अतिउत्साही तरुणांनी पुढाकार घेऊन उचललेले हे पाऊल होते. त्याला प्रतिसाद चांगला मिळाला. वरिष्ठ शासकीय अधिकारी, काही बिल्डर आणि काही व्यापारी यांनी प्रामुख्याने ही वाहने खरेदी केली. काही उद्योजकांचाही त्यात समावेश होता. पण ही या शहराची श्रीमंती नाही. या शहरातील सामान्य वर्ग अजूनही भरपूर पैसा बाळगणारा नाही.

इथल्या ‘मल्टिप्लेक्स’ची तिकीटे अजूनची शंभर रुपयांच्या आतबाहेरच आहेत. ती पुण्यामुंबईसारखी तीनशे -चारशे रुपयांवर जाऊ शकलेली नाहीत, कारण इथल्या समाजाची ती आर्थिक तयारी आणि क्षमताही नाही. या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत अनेक बड्या कंपन्यांनी इथे मॉल्सची उभारणी केली, पण ही गुंतवणूक केल्याचे ‘रिझल्ट्‌स’ त्यांना मिळताना दिसत नाहीत. उलट अनेक मॉल्स बंद होत चालले आहेत. मॉल्सच्या चकचकाटाला इथल्या रहिवाशांनी प्रतिसाद तर दिला, पण तो फक्त पाहण्यापुरता. लोकांचे लोंढेच्या लोंढे नव्याने उघडलेल्या मॉल्समध्ये जाऊन आले, पण त्यांनी केलेली खरेदी नगण्य होती. हे शहर मुळातच फार मोठे नाही. त्यामुळे लोकांकडे वेळ भरपूर आहे. आपल्या शेजारच्या गल्लीतील दुकानात अडीचशे रुपयांना मिळणारी वस्तू मॉलमध्ये जाऊन पाचशे रुपयांना खरेदी करण्यात या माणसाला स्वारस्य नाही. मॉलचा झगमगाट पाहण्यासाठी तो तेथे जातो आणि आपल्या घराशेजारच्या दुकानात जाऊन हवी ती खरेदी करतो!

‘शहरे पाणवठ्याशेजारी वसतात’ हा सिंधू संस्कृतीपासूनचा इतिहास आहे. महाराष्ट्रातील अनेक मोठी शहरे पाणवठ्याशेजारी, नदीकिनारी वसलेली आहेत. काही शहरे नदीपासून - तलावांपासून दूर आहेत, पण नैसर्गिक उतारावर असल्याने तेथे पाण्याचे स्त्रोत भरपूर आहेत. औरंगाबादचे मात्र तसे नाही. एकेकाळी अशलेल्या इथल्या पाच-दहा हजाराच्या लोकसंख्येला पुरणारे पाणी मलीक अंबरने आणले होते. थत्ते हौदाच्या रुपाने त्याचे अवशेष आजही पाहावयास मिळतात. पण औरंगाबादच्या आजच्या विस्ताराला आवश्यक असलेला पाण्याचा पुरवठा नैसर्गिक रितीने होत नाही. पैठणच्या नाथ सागरातून सुमारे 50 किलोमीटरचा प्रवास करीत हे पाणी औरंगाबादेत येते. भौगोलिकदृष्ट्या ही स्थितीही नैसर्गिक उताराच्या विपरीत आहे. नाथसागरातील पाणी पंपाद्वारे उपसून औरंगाबादला पुरवावे लागते. या साठीची जुनी पाईपलाईन अकार्यक्षम ठरत आहे. त्यामुळे मागील चार-पाच वर्षांपासून शहरात सदासर्वकाळ एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो. सिडकोसारख्या काही भागांत तर उन्हाळ्यात दोन-तीन दिवसांआड पाणी येते.

नाथसागरातून समांतर जलवाहिनीचाही प्रस्ताव होता. पण त्यात इतके अडथळे आलेले आहेत, की हा प्रकल्प कुठेच दृष्टापथात येत नाही. या साठी मंजूर होऊन आलेला पैसाही एव्हाना इतरच कामांमध्ये संपल्याची चर्चा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, मराठवाड्याच्या शेतीसाठी बांधलेल्या जायकवाडी धरणातील पाण्याचा उपयोग फक्त औरंगाबाद शहर आणि औरंगाबादेतील उद्योग जगविण्यासाठी होत आहे. पाणी आणण्याचा हा उद्योगही खर्चिक आहेच आणि हे पाणी आणण्यासाठीच्या विजेचे कोट्यवधीचे बिल महापालिकेकडे अजूनही थकित आहे. असे हे कर्मदारिद्‌जएय! परिपक्व राजकीय नेतृत्वाचाही कायमस्वरुपी अभाव या शहर व परिसरात राहिला आहे. विशेषत्वाने पश्चिम महाराष्ट्रात दिसणारी राजकीय नेत्यांची विकासाची दृष्टी आणि त्या साठी ते करीत असलेली धडपड पाहिली, तर इथले हे न्यून ठळकपणाने जाणवते.

याच शहराने ‘वर्‍हाड निघालंय लंडनला’ हा जगप्रसिद्ध एकपात्री प्रयोग दिला. डॉ. लक्ष्मण देशपांडे याच शहरात विकसित झाले. पण आता सांस्कृतिक दृष्ट्या राज्याच्या पातळीवर पोहोचणारी सक्षम व्यक्तिमत्वांची फळी या शहराने दिलेली नाही. ज्या नाट्यशास्त्र विभागात ते कार्यरत होते, तो विद्यापीठाचा नाट्यशास्त्र विभागही नावारुपाला आला नाही. काही नामवंत अभिनेते, दिग्दर्शक या विभागातून बाहेर पडले खरे, पण पुण्याची ‘एनएफटीआय’ किंवा दिल्लीची ‘एनएसडी’ यांच्याप्रमाणे या विभागाचे नाव कुठे घेतले जात नाही. हे सांस्कृतिक मागासलेपण या शहराला प्रदीर्घ काळपासून सतावते आहे. हाच प्रकार शिक्षणाच्या क्षेत्रातही आहे. या विद्यापीठाने घाणेरड्या राजकारणाशिवाय इतर कोणत्याही संदर्भात आपले अस्तित्व सिद्ध केले नाही. सांस्कृतिक जडणघडणीत स्थानिक कलावंतांबरोबरच आश्रयदातेही लाभावे लागतात. पण शहरातील उद्योगांनी या दृष्टीने आपले योगदान कधीही दिले नाही. ही चळवळ त्या मुळे कधी रुजू शकली नाही. त्यामुळे समाजातही या विषयीची जाणीवजागृती झाली नाही.

सहाव्या वेतन आयोगामुळे सरकारने शासकीय कर्मचार्‍यांच्या हाती दिलेला पैसा बिल्डर लॉबीने त्यांच्या हातून अलगद काढून
घेतला! राज्याच्या राजकारणातून आलेला काळा पैसा, त्याच सुमारास आलेला सहावा वेतनआयोग यांची सांगड घातली तर याच काळात राज्यभरातील जमिनींचे भाव वाढल्याचे दिसतील. साधारण मागील तीन वर्षांत या शहरातील प्रॉपर्टींचे भाव तिप्पट ते चौपट झाले आहेत. मोठ्या टाऊनशिप आकाराला येत आहेत आणि पन्नास लाखांचा फ्लॅट - एक कोटीचा बंगला हे एकेकाळी पुण्या-मुंबईतील असलेले वास्तव आज औरंगाबादच्या परिसरातही दिसते आहे. जमीन आणि बांधकाम व्यवसायात इथे मोठ्या प्रमाणात पैसा गुंतला आणि त्याच प्रमाणात तो वाढला सुद्धा. पण ही वाढ निकोप म्हणावी अशी नाही.

असे हे शहर आणि अशी ही परिस्थिती. एका अर्थाने या परिसराला ‘शापित भूमी’ म्हणावे लागेल. औद्योगिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय अशा कोणत्याही आघाडीवर या परिसरात कधी सुवर्णकाळ झळाळलाच नाही. ‘आहे मनोहर परि गमते उदास’ अशी स्थिती वर्षानुवर्षे दिसते आहे. आजवरच्या वाटचालीत प्रकाशाचे काही पुंजके नक्कीच दिसले, पण त्याच्या पुढे-मागे मात्र काळोखच होता. त्या अर्थाने ही सारी वाटचाल काळोखातून काळोखाकडे अशीच आहे, असे मला वाटते. एकेकाळचे ‘सिल्क रुटवरील छोटेसे खेडे’ ते ‘आधुनिक युगातील मोठे खेडे’ असे हे या शहराचे स्थित्यंतर! या स्थितीतून पुढे येत काही नवे घडावे अशा अपेक्षेपेक्षा अधिक काही हाती नाही.

- दत्ता जोशी
9225 309010

मला आवडलेली 'शाळा'

काल रात्री ‘शाळा’ पहिला. आवडला. खूप वर्षांपूर्वी बोकिलांची ‘शाळा’ वाचली होती. ती ही त्या वेळी आवडली होती. पौगंडवयात जवळ जवळ सर्वच जण ज्या मनस्थितीतून जातात, त्याचे संयत पण यथार्थ चित्रण बोकिलांच्या भाषेतून उतरले होते. कमी अधिक फरकाने ते वातावरण सगळ्याच गावांतून- शाळांतून दिसत होते. ते कादंबरीत चांगल्या प्रकारे उतरले. ही कादंबरी खूप काळ डोक्यात रेंगाळत राहिली होती. त्यामुळे, यावर चित्रपट निघतोय हे ऐकून उत्सुकता चाळवत होती. काल ती पूर्ण झाली.

पुस्तकावर आधारित चित्रपट म्हटले की नेहेमीच मी विचारात पडतो. कादंबरी वाचताना आपल्या मनात काही प्रतिमा उभ्या राहत असतात. बहुतेक वेळा त्या आपल्या भोवतीच्या स्थळ-काळाशी सुसंगत असतात. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम असते. त्याचा विचार, त्याची उमज, त्याचे दृष्टीकोन त्यात नक्कीच उतरत असतात. ते आपल्या विचारांशी सुसंगत असावेत, असा विचार सुद्धा अयोग्य आहे. त्याने जे मांडले ते आपल्याला भावले की नाही, एवढाच प्रश्न उरतो. ‘शाळा’ने यां अपेक्षा बऱ्यापैकी पूर्ण केल्या.

लोकेशन आणि कास्टिंग या दोन गोष्टी यात खूप महत्वाच्या होत्या. त्यात सुजय डहाके यशस्वी ठरले. दिग्दर्शन आणि संकलन या दोन्ही गोष्टी त्यानीच सांभाळल्याने त्यांना हवा असलेला इफेक्ट बरोबर उतरला असावा. गाव, परीसर, गल्ली, शाळा, वर्ग, पोरं, घर, चाळ यां सगळ्या गोष्टी जमून आल्या. हा विषय १९७५-७६ च्या पार्श्वभूमीवर बेतलेला. त्यामुळे ते वातावरण पकडणे महत्वाचे होते. डहाके यांनी तो बरोबर पकडला.

अंशुमन जोशी आणि केतकी माटेगावकर यांनी आपापली कामे सुरेख निभावली आहेत. दोघांच्याही नजरेतील निरागसपणा, त्यांची परस्परांकडे पाहण्याची ‘नजर’, त्या अल्लड वयातील विभ्रम हे सारे बोकिलांनी शब्दांतून मांडणे एकवेळ सोपे, पण ते पडद्यावर उतरविणे अवघड...! ते काम या दोघांनी उत्तम प्रकारे केले. विशेषतः केतकी या आधी कॅमेरयाला सामोरी गेली होती ती एक बाल-गायिका म्हणून. या वेगळ्या रोल मध्ये तिने स्वःताला सिद्ध केले आहे. दिलीप प्रभावळकर, नंदू माधव, जितेंद्र जोशी... शाळेतील पोरं-पोरी... सगळं छान उतरलं आहे. त्यामूळे मला चित्रपट बऱ्यापैकी आवडला.

पण जाता जाता दोन-तीन चिमटे घेतल्याशिवाय मी ‘पत्रकार’ कसा ठरणार? दाखवायचेच म्हणून दोन-तीन गोष्टी मांडाव्यात म्हणतो...!

१)     - हा काळ १९७५-७६ चा होता... चित्रपटात काही ठिकाणी वृत्तपत्रांचे वाचन चाललेले दाखविले आहे. त्यांची मांडणी-निर्मिती-आकार हे सारे आजचे दिसते. जुना पेपर दाखविला असता तर छान झाले असते. अर्थात हा फरक ९९ टक्के प्रेक्षकांना कळत नाही.

२)      - क्रांतिकारक 'चे गव्हेरा'चे चित्र असलेला कप दोन-तीन वेळा दाखविलेला आहे. त्या काळात कपांचा हा आकार आणि छपाईचे हे तंत्र विकसित झाले होते का? बहुदा नव्हते...

३)      - जितेंद्र जोशी आपल्या वाग्दत्त वधूचा फोटो दाखवितो. तो चक्क रंगीत आहे. तेव्हा रंगीत फोटोग्राफी भारतातील ग्रामीण भागात उपलब्ध होणे कसे शक्य होते? कारण तो काल कृष्ण-धवल होता...

असो, पण या कडे दुर्लक्ष्य करून चित्रपट पहा... शक्य झाले तर चित्रपटगृहात पाउल ठेवण्याआधी मनाने बालपणात जा... आपल्या वर्गात जाऊन बसा... मजा येईल!

Saturday, January 21, 2012

‘सृजन’क्षणांचा आरंभबिंदू

नगर येथील ‘ज्ञानसंपदा स्कूल’ या इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देणार्‍या विद्यालयाने ‘सृजन’ या पुस्तकाची निर्मिती केली आहे. ‘पॅरेंटिंग’ या विषयाला वाहिलेल्या या पुस्तकात मराठीतील अनेक नामवंतांचे लेखन समाविष्ट आहे. या पुस्तकाचे संपादन करण्याची संधी मला मिळाली. पुस्तकाची संकल्पना मांडण्यापासून नियोजन आणि निर्मितीपर्यंत सर्व जबाबदार्‍या सांभाळताना एका उत्तम पुस्तकाच्या निर्मितीचा आनंद मला मिळाला. नगर येथे 31 जानेवारी 2012 रोजी या पुस्तकाचे प्रकाशन आहे. या पुस्तकाला मी लिहिलेली प्रस्तावना...
......................................
नगर येथील ‘ज्ञानसंपदा स्कूल’च्या वतीने हे ‘सृजन’ आपल्या हाती देताना आम्हाला मनःपूर्वक आनंद होत आहे. ही स्मरणिका खर्‍या अर्थाने ‘स्मरणिका’ व्हावी, ती दीर्घकाळपर्यंत स्मरणात राहावी, या दृष्टीने आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आहे. तो किती यशस्वी ठरला, हे काळच सांगेल. आपल्या संग्रहात हे पुस्तक आणखी 10-15 वर्षांनंतरही दिसले, तर हा हेतू पूर्ण झाला, असे म्हणता येईल.

खरे तर ही रूढ अर्थाने स्मरणिका नाही. स्मरणिका म्हटले की सर्वसाधारणपणे डोळ्यांसमोर येते ते पानभर जाहिरातींचा प्रचंड मारा असलेले आणि जुजबी लेख असलेले जाडसर पुस्तक. ही परंपरा तोडण्याचा आणि रचनात्मक काही करण्याचा धाडसी निर्णय ‘ज्ञानसंपदा’च्या संचालकांनी घेतला आणि नवी दृष्टी देण्याची क्षमता असलेल्या या आगळ्या स्मरणिकेच्या कल्पनेचा जन्म झाला. नियोजन आणि रचनेच्या पातळीवर घेतलेली सुमारे सहा महिन्यांची मेहनत, मान्यवर लेखकांचे सहकार्य आणि संचालकांनी दिलेले स्वातंत्र्य याचे फळ म्हणजे हे संग्राह्य पुस्तक. वास्तविक ‘ज्ञानसंपदा’ ही इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणारी शाळा आहे. मात्र शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असले तरी इथले संस्कार भारतीय आहेत आणि वातावरण मातीशी नाळ जोडणारे आहे. या विद्यालयाचा वैश्विक दृष्टिकोन यातून स्पष्ट व्हावा.

झपाट्याने बदलत चाललेल्या समाजव्यवस्थेत आता शाळेची भूमिका सर्वात महत्वाची ठरणार आहे. त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबात आई आणि वडील हे दोघेही नोकरी - व्यवसाय करणारे असतील, तर मूल सर्वाधिक वेळ असते ते त्यांच्या शाळेच्या आणि शिक्षकांच्या संपर्कात. त्यामुळे या मुलांच्या वाढीत शाळेची भूमिका महत्वाची असते. ‘ज्ञानसंपदा स्कूल’ या दृष्टिकोनातून अनेक रचनात्मक उपक्रम अमलात आणत असते. मुलांना शिक्षण देत असतानाच त्यांच्यावर अशा माध्यमातून होणारे संस्कार त्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ठरतात. 
मात्र शाळेची भूमिका कितीही महत्वाची ठरली, तरी मुलांच्या विकसनात पालकांची भूमिका सर्वात महत्वाची आहे. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीत ही भूमिका आजी-आजोबा, काका-मामा बजावत. या सार्‍या भूमिका आज फक्त आई-बाबांना बजावाव्या लागत आहेत. ‘आम्ही जे करतो ते मुलांसाठीच’ असे छातीठोकपणे सांगणारे हे आई-बाबा आपल्या मुलांसाठी किती ‘क्वालिटी टाईम’ देतात, त्यांच्या विकसनात कोणती भूमिका बजावतात, हा संशोधनाचा विषय आहे. 

इथे आर्य चाणक्य या द्रष्ट्या महापुरुषाचा एक श्लोक आठवतो -
अदाता वंशदोषेण कर्मदोषाम्‌ दरिद्रता ।
उन्मादो मातृदोषेण पितृदोषात्‌ अपंडितः ।।
पहिल्या ओळीचा अर्थ - ‘दानधर्म न करण्याच्या वृत्तीचा दोष वंशाकडे जातो, तर सदोष कर्मांमुळे दारिद्य्र येते’ असा आहे. दुसरी ओळ येथे महत्वाची आहे. उन्मादपूर्ण वर्तणूक म्हणजे मनमानी, असंस्कृत वागणे, आपल्या वागण्याचा इतरांवर काय परिणाम होतो आहे, याचा विचार न करणे अशा वृत्तीचा दोष मातेने केलेल्या संस्कारांकडे जातो, तर मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष, त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद न करणे याचा दोष पित्याकडे जातो. आर्य चाणक्य यांनी सुमारे 2500 वर्षांपूर्वी सांगून ठेवलेल्या ‘चाणक्यनीती’ची सूत्रे आजही अशी लक्षणीय आहेत आणि ती मूल्येही शाश्वत आहेत. आपल्या मुलांच्या वाटचालीकडे, त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाकडे पाहताना आर्य चाणक्यांनी सांगून ठेवलेल्या या सूत्रात आपण बसतो का, याचा विचार तटस्थपणे झाला पाहिजे. हे पुस्तक यासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो. 

या पुस्तकाच्या निमित्ताने थोडेसे आत्मचिंतन झाले पाहिजे. सध्या प्रत्येक घरात एक जिवंत भूत आहे. त्याला ‘दूरचित्रवाणी संच’ म्हणतात. हे भूत अलाउद्दीनच्या दिव्याप्रमाणे इच्छापूर्ती करणारे आहे. रिमोटच्या माध्यमातून या पडद्यावरून जे काही पाहता येऊ शकते त्याचे नियंत्रण केवळ मनच करू शकते. हे मन किती सुदृढ आहे, त्यावर त्या घराचे आणि मुलांचे भवितव्य अवलंबून असते. वाट्टेल ते दाखविणे हा वाहिन्यांचा व्यावसायिक धर्म असला, तरी हवे तेवढेच पाहणे हे पालकांचे कर्तव्य ठरते; कारण मुलं (कोवळ्या वयात तरी) फक्त पालकांनाच आपले आदर्श मानतात. स्वैराचार, विवाहबाह्य संबंध, अनैतिक संबंध (हे लोण आता हिंदीतून मराठी मालिकांमध्येही आले आहे), सामाजिक प्रतिष्ठेच्या चुकीच्या कल्पना, मद्यपान, धूम्रपान, पैशाची उधळपट्टी या सार्‍यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारीच जणूू या वाहिन्यांनी घेतली आहे. त्यामुळे अशा मालिकांपासून किंवा दृश्यांपासून स्वतःला दूर ठेवत असतानाच आपल्या वर्तनातून मुलांसमोर आदर्श निर्माण करणे ही खरी गरज आहे. ‘बेस्ट वे टू टीच चिल्ड्रन इज टू डेमॉन्स्ट्रेट’ अर्थात आपल्या मुलांना शिकविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना त्याचे प्रात्यक्षिक दाखवा. चांगले वागण्याचे प्रात्यक्षिक, वडीलधार्‍यांना - गुरुजनांना आदर देण्याचे प्रात्यक्षिक, भावंडांशी - मित्रांशी शेअर करण्याचे प्रात्यक्षिक... ही यादी बरीच मोठी होऊ शकते. ऑफिसमधील बॉसबाबत एकेरी बोलणे, ऑफिसातील वस्तू घरी आणणे यातून मुलं योग्य तो अर्थ घेतात. ती गुरुजनांबद्दल एकेरी बोलू लागली, मित्रांच्या बॅगमधील वस्तू घरी येऊ लागल्या तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असण्याची शक्यता जास्त असते. 

मुलांना शिकविण्याची जबाबदारी पालकांची असते. त्याचप्रमाणे मुलेही पालकांना खूप काही शिकवून जातात. आपलं मन फक्त तेवढं संवेदनशील आणि शिकण्यासाठी खुलं असावं लागतं. माझ्याच मुलाचे उदाहरण मला आठवते. वर्दळीच्या रस्त्यांवर वाहतूक नियंत्रक आपले काम करीत असतात. लाल दिवा लागला की थांबायचे आणि हिरवा दिवा लागला की पुढे निघायचे, असा प्रघात. एके दिवशी माझ्या मुलाने एका सिग्नलवर थांबलेलो असताना दिव्यांचा अर्थ सांगितला - ‘रेड सिग्नल ः स्टॉप, ग्रीन सिग्नल ः गो, ऑरेंज सिग्नल ः गो फास्ट’. माझे डोळे खाड्‌कन उघडले. हिरवा दिवा बंद होऊन तांबडा दिवा लागला की तो लाल होण्याच्या आत सिग्नल ओलांडण्याच्या मोहापायी मी अनेकदा गाडीचा वेग वाढवीत असे. वाहनाचा वेग कमी करून पादचारी मार्गाच्या अलीकडे आपले वाहन थांबविण्याचा संदेश देणार्‍या तांबड्या दिव्याच्या हेतूचा मी कृतीतून करीत असलेला विपर्यास माझ्या मुलाने निरागसपणे माझ्यासमोर मांडला. त्या दिवसापासून ‘ऑरेंज सिग्नल ः गो फास्ट’ऐवजी ‘कीप स्लो अँड स्टॉप’ ही सुधारणा मी माझ्या वर्तनात केली आणि मग मुलालाही ती समजावून सांगितली. आता त्याला आयुष्यभर हा विषय शिकविण्याची गरज नाही!

शिस्त म्हणजे हाती छडी घेणे नव्हे. रात्री वेळेत झोपणे, सकाळी लवकर उठणे, प्रातर्विधी, मुखमार्जन, स्नान, न्याहारी, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, योगाभ्यास - व्यायाम या गोष्टी स्वतःच्या आचरणातून दाखवून दिल्या तर मुलांना सहज उमगतात. संतुलित आहाराची सवय लावत असतानाच ताटात घेतलेले अन्न टाकू नये, हा संस्कार पालकांनी मुलांवर आपल्या कृतीतून केला पाहिजे. मोहाचे क्षण आधी आपल्याला ओळखता आले पाहिजेत आणि ते टाळता आले पाहिजेत म्हणजे मुले ते संस्कार आचरणात आणू शकतात. 

मध्यंतरी एका संस्कार कार्यशाळेत उपस्थित राहण्याचा योग आला. कार्यक्रमानंतर प्रश्नोत्तरांच्या फैरी सुरू झाल्या. पालक - पाल्य या नात्याचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखविणार्‍या या प्रश्नांमधील एक प्रश्न माझ्या मनात कायमचा कोरून राहिला. ‘‘आम्ही लहान होतो तेव्हा आमचे आई-बाबा म्हणायचे ः तुला काही कळत नाही. आता आम्ही मोठे झालो. आम्हाला मुलं झाली. त्यांना आम्ही वाढवतो आहोत. आता तुम्ही सांगताय ः मुलांना कसं वाढवायचं हे तुम्हाला कळत नाही. दोन्हीकडून आम्हालाच थापडा खाव्या लागतात, असे का?’’ या रोकड्या सवालाचा जबाब देणं मोठं अवघड आहे. हा कदाचित पिढीचा फरक आहे. आपली पिढी या संक्रमणाची साक्षीदार आहे. संक्रमणात हा त्रास सहन करावाच लागतो. आपल्या आधीची पिढी आपल्या तुलनेत कमी मुक्त विचारांची होती. आपल्या पुढच्या पिढीची क्षितिजं आपल्या आकलनाच्या किती तरी पुढची आहेत. ही पिढी घडवताना वरील प्रश्नाचं उत्तर आपल्याचाच शोधावं लागणार आहे. हे उत्तर शोधत आपली पुढची पिढी घडविण्यासाठी हे पुस्तक नक्कीच महत्वाचा आधार ठरणार आहे.

विषयप्रवेश करण्याआधी एक खुलासा करणे मला आवश्यक वाटते - हे मुलं घडविण्याचं गाईड नाही, ही मार्गदर्शिका नाही. हा एक सुसंवाद आहे. यातील अनेक विषय याआधीही आपल्या मनात येऊन गेले असतील. अनेक शंकांची उत्तरं पुढील पानांतून तुम्हाला मिळतील. त्यापासून प्रेरणा घेणं महत्वाचं. हा पालकांशी साधलेला सुसंवाद आहे. विविध तज्ज्ञांनी आपल्या अनुभवातून आणि अभ्यासातून मांडलेली भूमिका आपल्याला आपली मुलं घडवताना आधार म्हणून वापरता येईल. त्यापुढची वाट मात्र आपली आपणच चालायची आहे.
संस्कारांचे महत्व आपण जाणतोच पण हे संस्कार करताना संवेदनशीलता जपणे आवश्यक आहे. या संस्कारांचे महत्व आणि बालमनाच्या जडणघडणीचा ऊहापोह विख्यात लेखिका, बालसाहित्यिक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड यांनी केला आहे. पालकांनी आपले शाळा - कॉलेज सोडल्यानंतर त्यांचा अभ्यास बंद पडलेला असतो. मुलांचे मानसशास्त्र समजावून घेण्यासाठी तो पुन्हा एकदा सुरू करणे आवश्यक बनते. मुलांकडून अपेक्षांची जंत्री करण्याआधी स्वतः आरशात पाहण्याची गरज असते. या दृष्टिकोनातून प्रसिद्ध लेखक आणि वक्ते डॉ. राजीव तांबे यांचे विचार आपल्याला प्रेरक ठरतील. पुण्याच्या ‘गरवारे बालभवन’च्या माध्यमातून विविध संस्कारक्षम उपक्रम राबविणार्‍या आणि हे उपक्रम आपल्या सिद्धहस्त लेखणीतून वाचकांपर्यंत पोचविणार्‍या शोभा भागवत यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून खेळ आणि खेळण्यांचा मांडलेला विषय सर्वांना उद्बोधक ठरणारा आहे. मुलांची चौथीपर्यंतची ज्ञानग्रहण क्षमता सर्वात जास्त असते. याच काळात ते नवनवीन भाषा उत्तम प्रकारे शिकू शकतात. मातृभाषा, राष्ट्रभाषा व इंग्रजी यांच्याबरोबरच आणि किमान दोन भाषा याच वयात शिकणे सहज शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत असते. अष्टपैलू व्यक्तिमत्व बनविण्यासाठी करावयाच्या प्रयोगांविषयी या विषयावरील अभ्यासक आणि अंबाजोगाईत ‘ज्ञानप्रबोधिनी’ची स्थापना करणारे प्रसाद चिक्षे यांचा लेख खरोखरच मार्गदर्शक ठरणारा आहे. बालवयात केलेले संस्कार आणि आरोग्याला दिलेले वळण आयुष्यभर उपयोगाचे असते. आहाराबरोबरच योगाभ्यास आणि आरोग्य संवर्धन या संकल्पनेतून डॉ. वर्षा जोशी आणि  वैद्य संतोष नेवपूरकर यांनी मांडलेले विचार मुलांबरोबरच पालकांसाठीही मार्गदर्शक ठरणारे आहेत. प्रत्येक मूल बुद्धिमानच असतं. त्याच्या बुद्धीला पैलू पाडणे महत्वाचे असते. केवळ घोकंपट्टीपेक्षा स्वयंअध्ययन आणि छंदांच्या जोपासनेतून मुलांच्या बुद्धिमत्तेचा विकास शक्य असतो. 

सध्या प्रत्येक ठिकाणचा शिक्षणाचा खर्च वाढत चाललेला आहे. मुलांचा कल आणि स्वतःची शैक्षणिक व आर्थिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन मुलांच्या भविष्यातील वाटचालीसाठी आतापासूनच योग्य योजनांद्वारे बचतीची आवश्यकता निर्माण झालेली आहे. बचतीच्या या मोहिमेत मुलांनाही सहभागी करून घेतल्यास त्यांच्या व्यवहाराचा पायाही पक्का होऊ शकतो. हा हिशेबशीर विषय या विषयावरील अभ्यासक शशिकांत एकलारे यांनी मांडला आहे. सुमारे 20 वर्षे पत्रकारिता आणि 25 वर्षे बालमानसिकतेच्या क्षेत्रात काम करणारे श्रीकांत काशीकर या विषयातील ‘अधिकारी’ व्यक्ती आहेत. ‘मंगलमूर्ती संस्कार केंद्र’, ‘स्व-विकास व्याख्यानमाला’ आदींच्या माध्यमातून त्यांनी केलेले काम मोलाचे आहे. मुलांचा कल ओळखून त्याच्या बौद्धिक विकसनाचे टप्पे आखले पाहिजेत आणि मुलांशी संवाद साधत त्यांच्या भविष्याची पायाभरणी केली पाहिजे, असे मत मांडणारे त्यांचे अनुभवकथन प्रेरक ठरणारे आहे.

मुलं वयात येतानाचा काळ अधिक नाजूक असतो. पौगंडावस्थेतील मुला-मुलींना समजावून घेणे त्यांच्या पुढील आयुष्यासाठी अतिशय महत्वाचे ठरते. मुलांच्या जडणघडणीतील हा खर्‍या अर्थाने ‘टर्निंग पॉइंट’ असतो. या विषयावर ज्येष्ठ पत्रकार व ललित लेखक मल्हार अरणकल्ले, पुण्यात ज्ञानप्रबोधिनी संस्थेत विविध प्रयोग करणार्‍या अनघा लवळेकर आणि सोलापूर येथे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ऍड. अपर्णा रामतीर्थकर यांचे लेखन या पुस्तकात वाचायला मिळेल. करइरची जडणघडण करताना ठोकळेबद्ध पद्धतीने विचार करता येत नाही, त्यासाठी मुलांचा कल आणि भविष्याचा वेध घेण्याची क्षमता असावी, असा विषय मांडणारे डॉ. श्रीराम गीत यांचे लेखन मार्गदर्शक ठरणारे आहे. अपंगांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका नसीमा हुरजुक यांनी अशा मुला-मुलींच्या पालकांशी केलेले हितगुज सर्वांचेच डोळे उघडणारे ठरेल, असा विश्वास वाटतो. 

‘ज्ञानसंपदा’ चार भिंतीत कोंडली जाऊ नये, ती सर्वव्यापी व्हावी, या उदात्त हेतूने ‘ज्ञानसंपदा स्कूल’च्या संचालक मंडळाने या आगळ्यावेगळ्या स्मरणिकेची निर्मिती केली. सर्व लेखकांच्या सहकार्याने हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरला. आपल्या हाती असलेल्या या पुस्तकातील जे जे उत्तम आहे त्याचे श्रेय या लेखक मंडळींचे आणि संचालक आणि संपादक मंडळाचे. काही न्यून राहिले असल्यास त्याची जबाबदारी या प्रकल्पाचा संपादक या नात्याने माझी.

चला, सृजनक्षणांचे साक्षीदार होऊ या...!

- दत्ता जोशी

(रु. १५०/- मूल्याचे हे पुस्तक हवे असल्यास १ फेब्रु. २०१२ नंतर ज्ञानसंपदा स्कूल (इंग्रजी माध्यम), तपोवन रोड, सावेडी, अहमदनगर. (दूरध्वनी ः 0241-2411134, ई मेल : sampadaschool1@gmail.com) येथे संपर्क साधता येईल.

Wednesday, January 11, 2012

'तू गेल्यावर' आणि 'तू असतिस तर'... एक भावस्पर्शी प्रवास

हा लेख लिहून खूप दिवस झाले... एका दैनिकासाठी लिहिला होता, तो तसाच राहून गेला. आज कॉम्पुटरवर जुन्या फाईल्स चाळताना सापडला... वाटले, आपणाशी शेयर करावा... पहा, कसा वाटतो...
 ...................................................................................
संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी या कवी-गायक अशा कलावंत जोडीचे एक गाणे मध्यंतरी बरेच गाजले. नसतेस घरी तू जेव्हा, जिव तुटका तुटका होतो, हृदयाचे विरती धागे, संसार फाटका होतो...असे काहिसे ते शब्द होते. अशी काही गाणी रसिकांच्या हृदयाला हात घालणारी असतात. दैनंदिन जीवनातील बोथटलेल्या भावभावनांना हलकासा स्पर्श करणार्‍या या शब्दांतून मना-मनांना कुरवाळण्याचा हेतू सफल होऊन जातो. त्यातही, जेव्हा शब्दांना सुरांची जोड मिळते आणि रंगमंचाचा स्पर्श होतो तेव्हा रसिकांपर्यंत पोहोचण्याच्या वाटा अनेक पटींनी खुल्या होतात. कवीला गायकाची (किंवा गायकाला कवीची) अशी जोड क्वचितच मिळते. त्यातून रसिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याचा मार्ग खुला होतो.
अनेकदा असेही होते, की ज्येष्ठांची अनेक काव्ये काहिशी दुर्लक्षित राहतात. ओथंबलेल्या भावनांची कसोटी लावा की काव्यप्रतिभेची, प्रत्येक कसोटीवर अशी काव्ये सरस असतात तरीही दुर्लक्षित राहतात. मराठी काव्यविश्र्वात अशा भावना आजवर अनेकदा मांडल्या गेल्या. नसतेस घरी तू जेव्हाहे गाणं मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा एकेकाळी डोळ्यांखालून गेलेली बा. भ. बोरकरांची तू गेल्यावरही कविता मनात रुंजी घालून गेली. कवितेच्या पहिल्या दोनच ओळी तेव्हा आठवत होत्या -

तू गेल्यावर फिके चांदणे
घर परसूही सुने - सुके
मुले मांजरापरी मुकी अन्‌ 
दर दोघांच्या मध्ये धुके...
परवा कॉम्प्यूटरवरील जुन्या पेजमेकर फाईल्स उघडून पाहत होतो, तेव्हा ही कविता पुन्हा एकदा समोर आली. (मराठीतील विविध कवींच्या निवडक कविता एकत्र करून काव्यवाचनाचा अनौपचारिक कार्यक्रम करण्याचे मी आणि माझ्या पत्नीने पाच-सहा वर्षांपुर्वी ठरविले होते. तेव्हा सुमारे 500 कविता आम्ही संकलित केल्या होत्या. भाकरीचा चंद्र शोधण्याच्या नादात हा कार्यक्रम राहून गेला!)
या कवितेची एकेक ओळ पुढे जात होती आणि मनातील त्या प्रतिमा उलगडत होत्या. तीघरात नसेल, तर त्याची होणारी केविलवाणी अवस्था, त्याच्या आयुष्यातील अपरिहार्यताच दाखविणारी...!
तू गेल्यावर घरांतदेखिल 
पाउल माझे अडखळते
आणि आटुनी हवा भवतिची 
श्वासास्तव मन तडफडते

तू गेल्यावर या वाटेने 
चिमणी देखिल नच फिरके
कसे अचानक झाले नकळे 
सगळे जग परके परके
बाकिबावअर्थात बोरकर हे मराठी कवितेतील एक सुंदर स्वप्नच ठरले. मराठी आणि कोकणीतून उत्तमोत्तम कविता देताना श्रृंगार आणि तत्वज्ञान यांचा सुरेख संगम त्यांनी अनेकवेळा घडवून आणला. भावनांना हात घालणार्‍या याच कवितेच्या शेवटच्या दोन ओळी मात्र सारे वातावरण कशा पूर्णपणे बदलून टाकतात ते पाहा -
तू गेल्यावर दो दिवसांस्तव
जर ही माझी अशी स्थिती...
खरीच माझ्या आधी गेलिस 
तर मग माझी कशी गती?

विरहाग्नीत होरपळणार्‍या पतीची ही व्यथा वाचून भावनावश होतानाच माझे कवि मित्र दासू वैद्य यांची एक वेगळीच कविता डोळ्यांसमोर आली -आई गेल्यानंतरचे वडिल’.पत्नीच्या नजरेतून पती’ - ‘पतीच्या नजरेतून पत्नीया रुढ नात्यांच्या पलिकडे जात मुलाच्या नजरेतून टिपले गेलेले आई गेल्यानंतरचे वडिलवाचकांना वेगळ्याच भावविश्र्वात नेतात... 
आई गेल्यानंतरचे वडिल
अबोल झाले.
पूर्वीसारखेच स्वयंपाकघरातल्या कोपर्‍यात
देवांना न्हाऊ-जेऊ घालतात
पण आरती करताना
त्यांचा हात थरथरतो
आईने लावलेल्या बदामाच्या झाडाभोवती
कचरा साफ करण्याच्या निमित्ताने रेंगाळतात...

आणि ही खिन्नपणाची भावना दूर करायची, तर पाडगावकरांना पर्याय नाही! मंगेश पाडगावकरांनी प्रेमगाणी जितकी भरभरून लिहिली, तितकी कदाचित कोणी लिहिली नसावीत. त्यात भावना आहेत, उत्कटता आहे, बिनधास्तपणा आहे आणि थोडा इब्लिसपणाही मिसळलेला आहे. मात्र जोडीदाराच्या अस्तित्वाचे स्वप्नरंजन करताना पाडगावकर वेगळेच भासतात. तू नसलीस तरच्या निराशेतून बाहेर काढताना... तू असतीस तरया कवितेत ते म्हणतात -
तू असतिस तर झाले असते
गडे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातुन
एक दिवाणे नवथर गाणे!
मौनातील हे गाणे गायचे तर ती कातरवेळच असायला हवी ना! आणि त्या कातरवेळेनंतर चमचमणारा शुक्रतारा आणि त्या अंधारातून जन्मणारी नवी स्वप्ने पाडगावकर हळूवारपणे व्यक्त करतात -
पसरियली असती छायांनी
चरणतळी मृदु शामल मखमल
अन्‌ शुक्राने केले असते
स्वागत अपुले हसून मिश्किल

तू असतिस तर झाले असते
आहे त्याहुन जग हे सुंदर
चांदण्यात विरघळले असते
गगन धरेतिल धूसर अंतर
जर तरच्या या भावनांना वास्तव जगात स्थान नसते. रुक्ष वास्तव जगताना त्यामुळेच या सार्‍या कवींचा मोठा आधार मिळतो. दुःख इतकेच असते, की काळाच्या कसोटीवर टिकणारे साहित्यिक आता फारसे निपजत नाहीत.

- दत्ता जोशी