Friday, July 10, 2015

होय, पत्रकार संरक्षण कायद्याला माझा विरोध आहे.

० मागील बराच काळपासून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र कायदा करा, अशी आग्रही मागणी काही गट करताना पाहत होतो. गेल्या महिनाभरात `सरकार अशा कायद्यावर सकारात्मक विचार करीत आहे` अशी विधाने काही जबाबदार मंत्र्यांनी केली. हा प्रकार अनाकलनीय आहे.

० प्रारंभीच स्पष्टपणे सांगतो, की अशा प्रकारच्या कायद्याचा मी स्वतः तीव्र विरोध करतो. १५ वर्षे औरंगाबाद - पुणे येथील दैनिकांत विविध जबाबदाऱ्या सांभाळत आणि मागील १०-११ वर्षांपासून मुक्त पत्रकारिता करणाऱ्या, साधारण २५ वर्षांपासून पत्रकारिता करणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला हा कायदा अनाठायी वाटतो.

० दैनिकांत काम करताना मी ही सुरक्षित पत्रकारिता केली नाही. अनेकांना अंगावर घेतले. सत्य कठोरपणे मांडले. त्यासाठी परगावी प्रवास केले. हत्येचा आरोप असलेल्या खासदाराच्या बंगल्यात बेडरपणे घुसून थेट प्रश्नांनी त्यांची झाडाझडती घेतली. काहींनी गुदरलेल्या कथित बदनामीच्या १०-१२ खटल्यांना सामोरा गेलो. कधी नैतिक भूमिका सोडली नाही. काही वेळा धमक्या आल्या, पण भीक घातली नाही.

० स्वतःची नैतिक भूमिका भक्कम असेल तर इतर कवच कुंडलांची आवश्यकता नसते. जे लोक पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांची उदाहरणे देतात, त्यांनी त्या पत्रकारांची समग्र कुंडली सुद्धा समाजासमोर मांडावी. झालेल्या हल्ल्यांपैकी किती हल्ले पत्रकार म्हणून आणि किती हल्ले `इतर अर्थपूर्ण` कारणांसाठी आहेत, ते त्यातून स्पष्ट होईल. दिली जाणारी आकडेवारी किमान महाराष्ट्रात तरी फसवी आहे. बिहार, उत्तर प्रदेश अशा काही राज्यांत ही परिस्थिती काही प्रमाणात चिंताजनक असेलही. पण तेथे सारा समाजच संकटात आहे.

० जेव्हा आपण एखाद्या समूहासाठी स्वतंत्र कायद्याची मागणी करतो, तेव्हा अस्तित्वात असलेला कायदा त्यांचे संरक्षण करण्यास समर्थ नाही, याची ती अप्रत्यक्ष कबुलीच असते. दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी केलेला कायदा हे त्याचेच उदाहरण. या कायद्याचा बराच दुरुपयोग सुद्धा झाला, पण व्यवस्था सुधारण्यासाठी हा कायदा गरजेचाच होता.

० पत्रकारांची बाब तशी नाही. आपापल्या ठिकाणी जबाबदारीने काम करणाऱ्या बहुसंख्य पत्रकारानाही या कायद्याची गरज वाटत नाही. मुळातच `मिडिया ट्रायल`च्या माध्यमातून अनेकांना वेठीला धरणाऱ्याना आणखी काही हाती असण्याची गरज नाहीच.

० सन्माननीय अपवाद सोडू, पण अनेक पत्रकारांच्या संदर्भात शंका घेण्यास खूप वाव आहे. मिळणारा पगार, त्यांचे दृश्य आर्थिक स्त्रोत यांच्या तुलनेत त्यांच्या मालमत्ता जुळत नाहीत. या विषयावर कोण प्रकाश टाकणार? उच्चरवाने अशा कायद्याची मागणी करणारे अशा विषयावर सोयीस्कर मौन का बाळगतात?

० हक्क आणि जबाबदारी यांचे भान एकसमान असायला हवे. स्वतंत्र कायद्याची मागणी करताना त्यांनी पत्रकारांसाठी आचारसंहितेची सुद्धा उद्घोषणा केली असते तर ते विश्वसनीय ठरले असते. कायदा जसा `हल्ला विरोधी` असायला हवा तसा `हप्ता विरोधी` सुद्धा असायला हवा. अशा कायद्याचे संरक्षण हवे तर पत्रकारांना RTI अंतर्गत आणायला हवे. माहितीच्या अधिकाराच्या कायद्यात त्यांचाही समावेश करायला हवा. हक्काची फळे भोगायची आणि जबाबदारीची साले भिरकावून द्यायची, हे अक्षम्य आहे.

० पत्रकारांवरील हल्ल्यांसाठी स्वतंत्र कायदा, अधिक कडक शिक्षा, स्वतंत्र यंत्रणा हवी तर पत्रकारितेतील गुन्हेगारानाही दुप्पट शिक्षेची तरतूद हवी. अशी मागणी कुणी केल्याचे ऐकिवात नाही...!

० ज्यांनी नैतिकतेचे आदर्शपाठ घालून द्यायचे त्यांनी अशा बेजबाबदार, अनैतिक, भ्रष्टाचारावर पांघरून घालणाऱ्या, blackmail ला प्रोत्साहन आणि त्याला सुरक्षा कवच देणाऱ्या कायद्याची भलावण करणे अयोग्य वाटते.

० असा कायदा झाला तर त्याला न्यायालयात आव्हान देणारा पहिला `पत्रकार` मी असेन.

Tuesday, May 12, 2015

माझी भूमिका संप्रेरकाची... Catalyst ची...!

आधी `आयकॉन्स` आणि आता `पोलादी माणसे` या पुस्तक मालिकेतून काय साध्य करायचे आहे, याचा उल्लेख मे फेसबुकवर अनेकदा केला आहे. पुस्तकात तर विस्ताराने भूमिका मांडली आहे. समाजातील कार्यशील, सकारात्मक, उद्यमी व्यक्तींचा समुच्चय आम्ही या पुस्तकातून मांडत आहोत. जिल्ह्या-जिल्ह्यातील ही `पोलादी माणसे` एकत्र यावीत, त्यातून समाजात काही नवे घडावे, नव्या पिढीला मार्गदर्शन मिळावे, हेच यातून अपेक्षित आहे.



या पोलादी माणसांनी पुढाकार घेवून काही उपक्रम हाती घ्यावेत, असेही यातून अपेक्षित आहे. मागील चार वर्षांत १५ जिल्ह्यांतून हा प्रवास पार पडला... १५ पुस्तके प्रकाशित झाली. या टप्प्यावर रविवारी, १० मे २०१५ रोजी औरंगाबादेत एक आशादायी आयोजन करण्यात आले.

औरंगाबादच्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रात मागील अनेक दशकांपासून कार्यरत असलेल्या `एमआयटी` या शिक्षण संस्थेचे अध्वर्यू श्री. यज्ञवीर कवडे यांनी पुढाकार घेत मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यातील `पोलादी माणसा`ना साद घातली. विशेषतः सामाजिक उपक्रमांत अग्रेसर असलेल्या उद्योजक-शेती उद्योजकांना त्यांनी हे आवाहन केले होते. अशा व्यक्तींचा परस्पर संवाद रविवारी दिवसभर रंगला. अशा एकत्रीकरणाचे हे पहिले पाउल ठरले.

श्री. कवडे सर एमआयटीचे संस्थापक. मराठवाड्यातील एका उत्तम संस्थेची उभारणी केल्यानंतर दैनंदिन व्यापाची सूत्रे प्रो, मुनीश शर्मा यांच्या हाती देऊन त्यांनी स्वतःला शेती आणि सामाजिक कार्यात गुंतविले आहे. कवडे सरांची संघर्षमय वाटचाल मी `उस्मानाबाद आयकॉन्स` या पुस्तकात मांडली आहे. त्यांनीच या उपक्रमाचे यजमानपद स्वीकारल्यामुळे मला आनंद झाला. एमआयटीचे महासंचालक प्रो. मुनीश शर्मा हे सध्या सी. एम. आय. ए. या उद्योजक संघटनेचे अध्यक्षही आहेत. त्यांचाही या आयोजनात पुढाकार होता.
एकेकाळी जालना येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रकल्पात सालदार असलेल्या आणि आता फळ प्रक्रिया उद्योगात अमीट छाप पडणाऱ्या उद्योजिका सीताबाई मोहिते, हिंगोली येथे संगणक प्रशिक्षण संस्था आणि मुक्त विद्यापीठाचे केंद्र चालविणारे विजयकुमार कांबळे, तेथीलच दाल मिल व्यावसायिक रमेश पंडित, किनवट येथे साने गुरुजी आरोग्य केंद्र चालविणारे नामांकित सर्जन डॉ. अशोक बेलखोडे, इंटरनेट च्या अभिनव उपयोगातून कोट्यवधींची उलाढाल करणारे `क्लियर कार रेंटल`चे सचिन काटे, जालना येथील प्रयोगशाळा सहायक आणि विज्ञान वस्तू निर्मिती उद्योग करणारे संजय टीकारिया, नांदेडच्या रयत रुग्णालयाचे डॉ. सुरेश खुरसाळे, परभणीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे डॉ. नितीन मार्कंडेय, समुद्र्वाणीसारख्या आडवळणी गावात उत्तम प्रतीच्या शेतीसाहीत्याची निर्मिती करणारे कुमार स्वामी, उमरगा येथील डॉ. दामोदर पतंगे, साऱ्या मराठवाड्याच्या जिभेला चव देणारे `रवी मसाले`चे फुलचंसेठ जैन, लातूरच्या चंद्रभानू सोनवणे महाविद्यालयाचे संस्थापक प्रा. संजीव सोनवणे, परभणी जिल्ह्यातील खंडेगावचे सरपंच आणि गावाच्या विकासाचे शिल्पकार सुरेश शृंगारपुतळे, यमगरवाडीच्या भटके विमुक्त केंद्राचे प्रमुख कार्यकर्ते उमाकांत मिटकर... अशी आपापल्या क्षेत्रात उत्तम योगदान देणारी मंडळी एकत्र आली. त्यांनी आपापल्या कामांच्या माहितीची देवाण घेवाण केली... हा या आयोजनाचा पूर्वार्ध होता...

खरी महत्वाची चर्चा होती ती विकासाच्या वाटांची. आपापल्या ठिकाणी राहून समाजासाठी आणखी काय करता येईल, यावर चर्चा झाली. अडचणी कशा सोडवता येतील यावर विचार झाला. सर्वात महत्वाचा ठरला तो क्लस्टर डेव्हलपमेंटचा मुद्दा. एका प्रकारच्या १० उद्योजकांना एकत्र आणून त्यांना केंद्राच्या योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल, हे याचे सूत्र होते आणि याच दृष्टीने कवडे सरांनी चक्क त्या क्षेत्रातील दोन सल्लागारांना या बैठकीस निमंत्रित केले होते...! शिरीष लोया आणि विवेकानंद कोरांगलेकर यांची उपस्थिती इथे खूप महत्वाची ठरली. त्याच प्रमाणे महत्वाचे होते ते सी. एम. आय. ए.चे दोन माजी अध्यक्ष सुनिलभाई रायठठ्ठा आणि मुकुंद कुलकर्णी. `

पोलादी माणसांच्या` अनुभव कथानानंतर या दोघांनी त्या विषयाचे विश्लेषण केले आणि क्लस्टर डेव्हलपमेंट अथवा इतर कोणत्या मार्गाने ही वाटचाल अधिक समृद्ध करता येईल यावर प्रकाश टाकला...! क्लस्टर डेव्हलपमेंट शेतीतही करता येते, ती केवळ उद्योगापुरती बाब नाही... गटशेती हे सुद्धा एक प्रकारे क्लस्टर डेव्हलपमेंटच!

एका वेगळ्या दिशेचा शोध घेण्याचा हा प्रयत्न... स्वतःपलीकडचे जग पाहणारी ही माणसे... यांच्या सहकार्याने पर्यावरण, पाणी, शिक्षण या क्षेत्रात सुद्धा पुढील काळात काही पावले उचलायचे ठरत आहे. ४ जुलै रोजी पुन्हा एकदा भेटायचे ठरवून रविवारची बैठक विसर्जित झाली. अनेक जण इच्छा असूनही काही अपरिहार्य कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. पुढच्या वेळी असे अनेक जण उपस्थित राहतील अशी आशा आहे.

कवडे पती-पत्नी एखाद्या घरगुती समारंभाच्या अविर्भावात सर्वांचे आदरातिथ्य करीत होते. या बैठकीचे खऱ्या अर्थाने यजमानपद भूषविताना त्यांनी सर्वांना केलेले विकासाचे आवाहन भावणारे ठरले. अशाच पद्धतीने एक एक टप्पा गाठत भविष्यात राज्यभरातील `पोलादी माणसां`ची बैठक आयोजण्यात पुढाकार घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

एमआयटीचा कर्मचारीवृंदसुद्धा अत्यंत आपुलकीने यात सहभागी झाला. एका चांगल्या उपक्रमाची पायाभरणी या निमित्ताने झाली.

या सर्वांना जोडणारा धागा एवढेच माझे अस्तित्व...! माझ्या संस्थेला मी `the Catalyst` असे नाव दिलेले आहे. माझी भूमिका संप्रेरकाची...! ठिणगी टाकणे, दोन घटकांना एकत्र आणून त्यांना संयोगाची प्रेरणा देणे हे माझे काम... हे करण्यात मला आनंद आहे. `पोलाद`च्या सहकार्याने चालू असलेली वाटचाल अशा प्रकारे फुलत राहील, हीच अपेक्षा...!

- दत्ता जोशी, औरंगाबाद 

Saturday, February 28, 2015

`झेप` ते `पोलादी माणसे` : एक सकारात्मक शोध-पत्रकारिता...

आज २८ फेब्रुवारी २०१५... संसदेत अर्थसंकल्प सादर होतोय...
बरोबर ४ वर्षांपूर्वी, २०११ मध्ये आजच्याच दिवशी, आजच्याच वेळी, तिकडे अर्थसंकल्पाचे वाचन सुरु झाले त्याच वेळी मी `जालना आयकॉन्स`ची पहिली मुलाखत घेत होतो. त्या नंतर एक एक करीत जिल्हे फिरत गेलो... उद्या १ मार्च २०१५ ला याच जिल्हावार प्रेरक पुस्तक मालिकेतील १५वे पुस्तक परभणी येथे प्रकाशित होतेय. ४ वर्षांतील ही वाटचाल. एकंदर १५ जिल्ह्यांतून झालेला सगळा मिळून सुमारे ७५ हजार किलोमीटरचा `सेल्फ-ड्रिव्हन` प्रवास...!

या १५ पैकी ५ पुस्तके मागच्या दोन महिन्यात आली! १४ डिसेंबर २०१४ ला बीड, १८ जानेवारी २०१५ ला सोलापूर, १ फेब्रुवारीला कोल्हापूर, ८ फेब्रुवारीला हिंगोली आणि आता १ मार्च २०१५ ला परभणीचे पुस्तक येत आहे. ही प्रकाशने जरी एकापाठोपाठ एक झाली असली तरी या जिल्ह्यातील शोधयात्रा २०१३ च्या उत्तरार्धात सुरु झाली होती. साधारण सप्टेंबर २०१३ मध्ये मी परभणीतील कामाला प्रारंभ केला होता. त्यानंतर क्रमाक्रमाने हा प्रवास झाला. त्याची पहिल्या टप्प्याची पूर्तता १ मार्च रोजी होत आहे...!

खरे तर, प्रेरक लेखनाचा हा प्रवास २००३ मध्येच सुरु झाला होता. तेव्हा मी `सकाळ`मध्ये नोकरीत होतो. तरुण भारत आणि सकाळ या वृत्तपत्रात काम करताना सकारात्मकतेचा संस्कार माझ्यावर होत गेला. त्यातूनच मी विकासात्मक पत्रकारिता स्वीकारली. त्यातूनच औद्योगिक यशकथांकडे मी वळलो. `झेप` या शीर्षकाने औरंगाबाद सकाळ मध्ये सदर चालले. पुढे त्याचे पुस्तक झाले. आधी लिहिलेली `आयकॉन्स` मालिकेतील पुस्तके आणि त्याचे आता बदललेले `पोलादी माणसे` हे शीर्षक हा सारा प्रेरक प्रवास आहे. आज तो आपल्यासमोर ठेवण्याची इच्छा आहे.

मी कधीही विघातक पत्रकारिता केली नाही. सनसनाटी लेखनाच्या मागे लागलो नाही. १९९० च्या सुमारास पत्रकारितेत आलो. २००५ मध्ये नोकरीतून बाहेर पडलो. त्यानंतर मागची १० वर्षे मुक्त-पत्रकारिता करतो आहे. या शिवाय मी `branding & image building`च्या सेवा देतो. जनसंपर्क आणि जनसंवादाचा माझा २५ वर्षांचा समृद्ध अनुभव मी माझ्या क्लायंटला देतो.

सन २००३-०४ दरम्यान मी औरंगाबाद सकाळ मध्ये `झेप` शीर्षकाखाली उद्योजकीय यशकथांची मालिका लिहिली. औरंगाबादेतील पहिल्या पिढीतील उद्योजकांचा परिचय नव्या पिढीला करून देण्याचा उद्देश या मागे होता. त्याचीही सुरुवात योगायोगानेच झाली. `करियरनामा` नावाने करियर मार्गदर्शनाचे एक पान दर बुधवारी देण्याचे ठरले. साखळी वृत्तपत्र असल्याने इतर सर्व आवृत्तींचे लेख तेथे उपलब्ध असत. ते लावून पहिल्या आठवड्यातील हे पान तयार झाले. मात्र त्यात मराठवाडा दिसेना... उद्योजकता दिसेना. मी ही भूमिका संपादकांसमोर मांडली. साहजिकच `तुम्ही करून दाखवा`चे आवाहन झाले. माहितीत असलेल्या, शून्यातून उभ्या असलेल्या एका उद्योजकाची, श्री. मिलिंद सेवलीकर यांची मुलाखत घेवून ती वाटचाल मी लिहून काढली. संपादकांनी या कल्पनेला मान्यता दिली. २००३ मध्ये दि. २६ नोव्हेंबर रोजी या मालिकेचा पहिला लेख प्रकाशित झाला. त्यानंतर साधारण ३५-३६ आठवडे मालिका चालली. निकषात बसणारी माणसे मिळणे कमी झाले तेव्हा आठवड्याआड लिहू लागलो आणि `आमचेही छापा... देणे-घेणे पाहून घेवू`ची प्रलोभने सुरु झाली तेव्हा सदर बंद करण्याचा कठोर निर्णय मी घेतला. ज्यांच्याबद्दल लिहिले, त्यापैकी ४-५ जणांशी माझा पूर्वपरिचय होता. बाकी अनोळखी होते. मी अभिमानाने सांगेन, की या पैकी एकाही व्यक्तीकडून साध्या चहाच्या कपाचीही अपेक्षा नव्हती. कुणाकडून काहीही घेतले नाही. लेखनातील तटस्थता पाळण्यासाठी मी माझ्यावर ते बंधन घालून घेतलेले होते. (अर्थात, सक्रीय पत्रकारितेच्या १५ वर्षांत कधी कुणाचे रुपयाचेही मिंधेपण स्वीकारले नाही आणि एकही डाग अंगावर पडू दिला नाही...! असो.)११ जानेवारी २००५ रोजी नोकरी सोडली. त्यानंतर याच सर्वांनी माझ्या मागे लागून पुस्तक तयार करण्यास भाग पाडले. दैनिकात छापताना काही चांगली नावे सुटली होती... संदर्भ मिळाले नव्हते... वेळ जुळली नव्हती... अशी काही नवी माणसे या पुस्तकात आली. हे पुस्तक सप्टेंबर २००६ मध्ये प्रकाशित झाले.

सांगण्यास खूप आनंद होतो, की या पुस्तकाचे प्रकाशन `सकाळ`चे व्यस्थापकीय संचालक मा. प्रतापराव पवार यांच्या हस्ते झाले. केवळ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ते औरंगाबादेत आले होते. माझ्यासारख्या एकेकाळच्या सामान्य कर्मचाऱ्यासाठी एवढा वेळ देणे, हा त्यांचा मोठेपणा. पण हे ही तितकेच खरे, की औरंगाबादेत मी लिहित असलेल्या मालिकेचे ते चाहते आणि पाठीराखे होते. अशी मालिका सर्व आवृत्त्यांमध्ये असावी, असे त्यांना वाटत असे. मी नागपूर आवृत्तीत मोठी जबाबदारी सांभाळावी या दृष्टीने त्यांच्याशी बैठकाही झालेली होती. तो विषय नंतर मागे पडला. `सकाळ` सोडला, तरी स्नेहबंध कायम राहिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी `निर्लेप`चे प्रमुख श्री. राम भोगले होते.

हे पुस्तक चांगले झाले. या नंतर मी `झेप – २`ची तयारी करावी असा अनेकांचा आग्रह होता. मराठवाड्यातून बाहेर पडून इतर शहरांत उद्योग उभा करणारे उद्योजक, असा त्याचा विषय होता. अनेकांची नावे पुढे आली होती. नगरच्या श्री. अरुण कुलकर्णी यांची मुलाखतही २००७ च्या पूर्वार्धात घेवून झाली होती. पण काही कारणांनी तो विषय मागे पडला.माझा व्यवसाय सुरु होता. नवी कामे मिळवणे आणि पूर्ण करणे सुरु होते. मी ज्यांच्याबद्दल लिहिले, त्यांच्या प्रमाणेच मीही शून्यातून सुरुवात केलेली होती. डिझाईन, पीआर ही कामे मी करतो. वाटचाल सुरु झाली तेव्हा गाठीशी फक्त एका महिन्याचा पगार (सारी कपात होऊन हाती येणारे साडेनऊ हजार रुपये!) होता...! त्याच वेळी पाठीशी होते परिवार आणि मित्रांचे मदतीचे हात. आई-वडील, धाकटा भाऊ कमलाकर, पत्नी पद्मजा यांचा भक्कम पाठिंबा होताच, पण शाळेपासून मित्र असलेले डॉ. प्रकाश गुडसूरकर, शशांक जेवळीकर, श्रीकांत उमरीकर आणि औरंगाबादेत स्नेह लाभलेले डॉ. सुभाष देवढे पाटील, आशीष गर्दे... या सर्वांचा आधार होता... हात हाती होते... निभावून गेले...!दिवस जात होते... सन २०११ च्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मी माझ्या कार्यालयात बसलो होतो, तेवढ्यात जालना येथील श्री. सुनिलभाई रायठठ्ठा यांचा फोन आला. नमस्कार-चमत्कार झाल्यावर त्यांनी विषय मांडला - `दत्ताजी, हमको जालना का `झेप` लिखना है...` आणि ही पुढील प्रवासाची सुरुवात ठरली.

प्रेरक लेखन हा माझा आवडीचा प्रांत. सुनिलभाई यांनी स्वतःचा उद्योग प्रचंड संघर्षातून उभा केला. आज ते ५० देशांत निर्यात करतात. त्यांनी जालना येथे `यंग इनोव्हेटर्स` अशी एक चळवळ सुरु केली होती. या पुस्तकातून नव्या पिढीसमोर आपल्या जिल्ह्यातील आदर्श ठेवण्याची ही कल्पना.

या कल्पनेमागेही आणखी एक कहाणी होती. सुनिलभाई रायठठ्ठा, सुनीलजी बनारसीदास आणि आणखीही काही मंडळी या उपक्रमांत सहभागी असे. हे पुस्तक ही या ग्रुपची इच्छा. सुनिलभाई रायठठ्ठा यांच्यामुळे मी तिथवर पोचलो. साधारण मार्च अखेरपर्यंत जालना येथील मुलाखती संपल्या. `महिको`चे बद्रीनारायण बारवाले हे `जालना आयकॉन्स`पैकी एक व्यक्तिमत्व...!
त्याच दरम्यान सुनीलजी बनारसीदास यांच्याशी चर्चा करताना आपण अन्य जिल्ह्यात हा प्रयोग करता येईल का, असा विषय निघाला. सुनीलजी म्हणजे खूप वेगळेच प्रकरण. हा माणूस स्वतःपेक्षा इतरांसाठीच अधिक जगतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. `पोलाद` या ब्रांडनेम ने बाजारपेठेत विक्री होणाऱ्या सळईचे ते निर्माते. जालना येथील `भाग्यलक्ष्मी स्टील`च्या संचालकांपैकी ते अग्रणी. समाजात उद्योजकता वाढावी, भारत बलशाली व्हावा, ही त्यांची भावना. समाजात असलेली विशेषतः पहिल्या पिढीतील उद्योजकता संकलित करून पुस्तकाच्या रूपाने मांडावी, ही त्यांची इच्छा. मीही प्रारंभापासून त्याच वाटेवरील प्रवासी.


माणसे जोडण्यात आनंद असलेला आणि उद्योजकतेला सकारात्मकतेने पाहणारा मी पत्रकार असल्याने हे केले पाहिजे, असे मला वाटले. असे काही करायचे तर प्रचंड भटकंती करावी लागेल, खूप दिवस परिवारापासून दूर राहायला लागेल हे नक्की होते. पण माझ्याही मनात एक `जिप्सी` दडलेलाच आहे. त्याने साद घातली आणि `लक्ष्मी` व `सरस्वती`ची हातात हात घालून वाटचाल सुरु झाली. १-२ जिल्हे म्हणता म्हणता जालन्यापाठोपाठ क्रमाक्रमाने नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, बीड, सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली आणि आता परभणी अशी १५ जिल्ह्यांची भटकंती झाली. दरम्यान ११व्या  पुस्तकापासून या पुस्तक मालिकेचे नामकरण `पोलादी माणसे` असे झाले...


ही झाली संक्षिप्त वाटचाल...
या प्रवासात मी खूप `श्रीमंत` झालो...! ही श्रीमंती शाश्वत टिकणारी आहे. आपण ज्या माणसांत राहतो, त्यांचे गुण आपल्याला चिकटत असतात. माझेही असेच होते आहे. माझ्याकडे साठलेली ही श्रीमंती याच गुणांची आहे...! `झेप`पासूनचा विचार केला तर आजवर साधारण पावणे पाचशे उद्यमशील व्यक्तींच्या मुलाखती घेण्याची संधी मला मिळाली. प्रत्येक जिल्ह्यात १०० ते २०० जणांची पहिली यादी होत असते. आम्ही ठरवलेले निकष लावत ती संख्या तेथील क्षमतेनुसार खाली येत असते. एखाद्या जिल्ह्यात १७-१८ जण पुस्तकात येतात तर एखाद्या जिल्ह्यात ३८ जण...! पण हे प्रत्येक जण पारखून घेतलेला असतो. वैयक्तिक, सामाजिक आणि आर्थिक चारित्र्य स्वच्छ हवे, सामाजिक उत्तरदायीत्व मानायला हवे... हे आमचे मुलभूत निकष. कुणाकडूनही कुठल्याच रूपाने आर्थिक अपेक्षा न ठेवता मेरिटवर निवड करायची, हे आम्ही मुळात ठरवलेले... सुनीलजी यांनी यात कुठेही हस्तक्षेप केला नाही... निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य मला दिले... त्यातून ही पुस्तके आकाराला आली.

राज्याच्या विविध भागांतून ही माणसे कार्यरत आहेत. ग्रामीण भागात आपापल्या क्षमता आणि इच्छाशक्तीवर ती आपापले उद्योग सांभाळत आहेत. कामांवर निष्ठा, सचोटीपूर्ण व्यवहार, संपूर्ण पारदर्शिता... प्रत्येकाची गुणवैशिष्ट्ये वेगवेगळी. कुणाच्या अंगावर घालायला एकेकाळी फाटके कपडे असत तर कुणी उपाशीपोटी झोपत. आज ते शेकडो कोटींच्या व्यवहाराचे धनी आहेत. असे असले तरी त्यांचे पाय जमिनीवर घट्ट रोवलेले...! हे खूप अवघड असते...! अशी माणसे भेटली की अल्प-स्वल्प यशाने आपल्या डोक्यात शिरलेली हवा आपोआप निघून जाते.

हा प्रत्येक माणूस म्हणजे स्वतंत्र विद्यापीठ. केवळ जिद्दीपोटी उद्योग-व्यवसायात शिरून यशाचे शिखर गाठणारी अनेक माणसे साधे दहावी पास नाहीत...! काही इंजिनियर झाली आणि वेगळ्याच उद्योगात शिरली. काही बी कॉम झाली आणि आज पाच-सातशे कोटींची उलाढाल करणारी कंपनी चालवितात...! सर्वात महत्वाचे म्हणजे या पैकी कुणीही लाखोपतीची मुले नाहीत...! ही सारी साम्राज्ये कष्टाने उभी राहिलेली आहेत.

ही पुस्तके जिल्हावार आहेत. याचा अर्थ ही माणसे जिल्ह्याच्या मर्यादेत आहेत असा नाही. आपल्या जिल्ह्यातून बाहेर पडून कुणी पुण्या मुंबईत गेला तर कुणी परदेशात आपली चमक दाखवीत आहे. इंटेलचे उपाध्यक्ष उपेंद्र कुलकर्णी हे सांगलीतून तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरणात काम करणारे राजेंद्र शेंडे सातारा जिल्ह्यातून बाहेर गेले. भारतातील पहिली खाजगी अणुभट्टी उभारणारे दत्तप्रसाद दाभोलकर साताऱ्याचे...!  सोलापुरातील यतिन शहा यांचे कॅमशाफ्ट जगभरातील बलाढ्य वाहन कंपन्या वापरतात. त्यांनी इंग्लंडमधील मोठी कंपनी टेकओव्हर केली आणि चीनमध्ये स्वताची नवी कंपनी उभारली. उस्मानाबाद्च्ये डॉ. नितीन ढेपे यांनी त्वचारोगशास्त्रात स्वतःचे स्वतंत्र स्थान सिद्ध केले. लातूर जिल्ह्यातून बाहेर पडून उद्योग उभारणाऱ्या उदय चेरेकर यांच्या कंपनीत तयार झालेली यंत्रे `आयएसओ` प्रमाणपत्रे देणाऱ्या कंपन्या त्यांच्या कामासाठी वापरतात...! जळगाव तर असंख्य अभिनव उद्योगांचे आगार. रंग निर्मितीत लागणारे पिग्मेंट, औषधात लागणारे पेक्टिन, रेल्वेत लागणाऱ्या अवजड स्प्रिंग, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पाईप... हे सारे जळगाव जिल्ह्यात तयार होते. नंदुरबार जिल्ह्यातून जपानला लिम्बोली तेल निर्यात होते. धुळ्यातील तरुण शास्त्रज्ञ `शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराचा` मानकरी ठरला आहे. हा वैज्ञानिक क्षेत्रातील `भारत रत्न` समजला जातो...! आज भारतात प्रसिद्ध झालेला डिझायनर पेंट प्रथम नांदेडमध्ये बनला. जालन्यातील महिको सर्वांना ठावूक आहे. नगर येथे साऱ्या देशाला लागणारे कॅरामल तयार होते आणि शिवाय ३५ देशांत पोहचते. हिंगोलीतील तरुण आंतरराष्ट्रीय पातळीवरील HR ट्रेनर आहे. परभणीतील व्यक्ती भोपाळच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेची प्रमुख आहे. बीडमधील मकरंद अनासपुरे आज साऱ्या महाराष्ट्राला हसवतो.... एक ना दोन... जवळ जवळ ५०० संपन्न व्यक्तिमत्वे अनुभवताना मी ही संपन्न होत गेलो...!

मी स्वतःला भाग्यवान समजतो... मी सध्या जे काम करीत आहे ते सोपे नाही. हे काम करण्याची माझी क्षमता नाही. डॉ. हेडगेवार यांचे एक वचन आहे - `काम अवघड आहे, म्हणूनच ते करण्यालायक आहे. सोपी कामे तर कुणीही करतात...` हे वचन माझ्या डोळ्यासमोर सदैव असते. पण त्याच बरोबर मला हे सुद्धा भान असते, की हे काम मी करीत आहे, पण ती शक्ती माझी नाही. माझ्याकडून कुणी तरी अज्ञात शक्ती... हवे तर आपण नियती म्हणू... हे काम करवून घेत आहे. मी निव्वळ एक साधन आहे... हीच शक्ती मला मार्ग दाखविते. चुकीचा माणूस या पुस्तकात येऊ नये या साठी बुद्धी देते...
मी कृतज्ञ आहे. हाती घेतलेले काम अजून निम्मेही झालेले नाही. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. `पोलाद` आणि सुनीलजी बनारसीदास यांच्या भक्कम पाठबळाने ही वाटचाल सुरु आहे. आता `पोलाद उद्यमिता प्रतिष्ठान` स्थापन होत आहे. हे पुस्तक निव्वळ पुस्तक न राहता ही उद्यमिता चळवळ बनावी, अशी आमची अपेक्षा आहे...


`जाण्या`आधी काही तरी चांगले करायचे आहे...

- दत्ता जोशी 
9422 25 25 50 

Tuesday, February 10, 2015

माकडाच्या हाती शाम्पेन...

माकडाच्या हाती शाम्पेन... दिल्लीत हाउसफुल्ल...

अशी एक कॉमेंट मी फेसबुकवर केली. हे मी भावनेच्या भरात लिहिले, असा अनेकांचा समाज झालेला दिसतो. वास्तविक पूर्ण विचारांती मी मांडलेला हा निष्कर्ष होता. `एक्झिट पोल`च्या विश्वासार्ह तंत्रावर मी नेहेमीच विश्वास ठेवतो. या वेळीही मतदानोत्तर चाचण्यांतून जे निष्कर्ष हाती येत होते, त्यातून दिल्लीत केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकार येणार हे निश्चित झाले होते. माझ्या मनातील विचारचक्र तेव्हापासूनच फिरू लागले होते.

हे सारे संक्षिप्तपणे मांडताना त्याची विभागणी मी खालीलप्रमाणे करीन -

1)    मी स्वतः वर्षभरापूर्वी केजरीवाल समर्थक होतो. त्याच्या पुराव्यादाखल माझ्या FB account वरील ३ पोस्ट च्या लिंक मी देईन. kejriwal यांना त्याच वेळी पूर्ण बहुमत मिळायला हवे होते, असेही मी त्यात मांडले होते.
A)
<https://www.facebook.com/photo.php?fbid=806572552702042&set=a.171033762922594.47735.100000479132195&type=1>
B)
<https://www.facebook.com/dattjoshi/posts/805845189441445>
C) 
<https://www.facebook.com/dattjoshi/posts/807430365949594>

२)    मात्र केजरीवाल यांनी आपल्या ४९ दिवसांच्या सत्ताकाळात जे काही केले, ते माझ्या दृष्टीने बालिश आणि म्हणूनच अक्षम्य होते. विशेषतः वीज आणि पाणी या मुलभूत गरजा निम्म्या किमतीत उपलब्ध करण्याच्या संदर्भात त्यांनी अनुदान वाढविण्याचे जे निर्णय घेतले ते निव्वळ लोकानुनय करणारे होते. त्यात राज्याचे हित कुठेही नव्हते.
3)    ज्या पद्धतीने त्यांनी सत्ता सोडली, त्यातही गांभीर्याचा अभाव दिसला.

या नंतर केंद्रात मोदी सरकार आले. त्यांच्याकडूनही देशाला मोठ्या अपेक्षा होत्या आणि अजूनही आहेत. मात्र, सत्ताग्रहण केल्यानंतरच्या ९ महिन्यांत त्यांनी जे काही केले ते जनतेच्या गळी उतरविण्यात त्यांना सपशेल अपयश आले. त्याउलट, अनेक ठिकाणी त्यांची नकारात्मक प्रतिमा जनमानसात ठसत गेली. केवळ ९ महिन्यांत प्रस्थापित विरोधी लाट निर्माण होणे, ही त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह उमटविणारी गंभीर बाब आहे. याचा परिणाम दिल्लीत दिसला. त्यातही त्यांची हुकुमशाही वृत्ती आणि विशेषतः नाव गुंफलेला कोट यांची चर्चा समाजात मोठ्या प्रमाणावर झाली. या चर्चेचा प्रतिवाद करण्यात ते अपयशी ठरले.

महत्वाचा भाग भारतीय जनमानसाचा. मी अत्यंत जबाबदारीने हे मत मांडतो आहे, की बहुसंख्य भारतीय जनता फुकटी आहे. जे जे फुकटात मिळेल, ते लाटण्याकडे त्यांचा कल असतो. अशा वेळी तो तारतम्य विसरतो. उदाहरणार्थ – पेट्रोलचा tanker उलटल्यानंतर तेथे आग भडकू शकते हे पक्के ठावूक असूनही तेथे लोक भांडी घेवून गर्दी करतात आणि त्यातच एखादा अतिशहाणा विडी पेटवतो. शेकडो लोक जिवंत जळून जातात...!

जगात कुणीही काहीही फुकट देऊ शकत नाही, त्याची किंमत कुणाला तरी चुकवावी लागतेच, हे ठावूक असतानाही लोक अशा आश्वासनांवर विश्वास ठेवतात. दिल्लीत केजरीवाल आणि कंपनीने दिलेले मोफत वीज-पाण्याचे आश्वासन हे त्यापैकीच एक. त्याची प्रचंड भुरळ समाजाला पडली.

केंद्राविरुद्धाचा समाजाच्या मनात असलेला असंतोष, केजरीवाल यांनी दाखविलेले फुकट वीज-पाण्याचे आश्वासन आणि मोदी यांच्या विषयीची निर्माण झालेली नकारात्मक प्रतिमा यांचा तिहेरी परिणाम झाला आणि केजरीवाल यांनाही अनपेक्षित असलेले, मतदानोत्तर चाचण्यांतही समोर न आलेले पाशवी बहुमत `आप`ला मिळाले.
या पार्श्वभूमीवर `माकडाच्या हाती शाम्पेन...` ही कॉमेंट मला न्यायोचित वाटते. श्री. केजरीवाल स्वतःला अभिमानाने `असंतोषवादी` घोषित करतात. स्वतः कम्युनिस्ट विचाराचे असल्याची कबुलीही त्यांनी अनेकदा दिलेली आहे. त्यांचा वैयक्तिक विचार काय असावा, याच्याशी कुणाचे काही देणेघेणे असू नये. पण सत्ता हाती आल्यावर कुणी त्या विचारधारेला चिकटून राहील, त्याच्या कार्यकौशल्यावर नक्कीच परिणाम होईल. 

पंतप्रधान पदाच्या खुर्चीत बसल्यानंतर मोदी यांनी वैचारिक पातळीवर जी परिपक्वता आणि संयम यांचे प्रदर्शन केले आहे, ते निश्चितच लक्षणीय आहे. संघ परिवार आणि हिंदुत्ववादी संघटना यांना त्यांनी थेट अंगावर घेतले आहे.

ज्या साम्यवादाची भलावण श्री. केजरीवाल करतात त्या विचाराने कुठल्याही देशाचे भले झालेले नाही, हा उघड इतिहास आहे. उलट असे देश तुटले आहेत. चीन सारख्या देशाने हा विचार सोडला आणि त्यानंतरच त्यांची आजची प्रगती होऊ शकली, हे लक्षात घ्यावे लागेल. नेपाल मध्ये प्रचंड या साम्यवादी नेत्याने असेच बहुमत मिळवले, पण देशहितात ते अपयशी ठरले... मात्र त्या आधी त्यांनी तेथे केलेला रक्तपात अजूनही धडकी भरवतो.

या पार्श्वभूमीवर श्री. केजरीवाल राजकीय दृष्ट्या अपरिपक्व, बालिश आणि राजकीय तारतम्याचा अभाव असलेले नेते वाटतात. कोणताही सामाजिक आणि प्रशासकीय बदल चुटकीसरशी होत नसतो. ४९ दिवसांत पोलिसांच्या लाच घेण्यात नक्कीच कमी झाली असेल, पण हे बदल अशा स्वरूपाच्या उपायांनी कायम राहत नाही. त्याला वेगळे मार्ग निर्माण होऊ शकतात. केजरीवाल कदाचित आणखी वर्षभर टिकले असते, तर त्यानाही तेच पाहावे लागले असते... पोलिस असोत की सरकारी यंत्रणा... असे बदल घडावेत या साठी मुलभूत बदल गरजेचे असतात. त्याला रचनात्मक काम लागते. मनोवृत्ती बदलावी लागते. त्यासाठी प्रखर राष्ट्रभावनेची जोड द्यावी लागते. 

पंतप्रधानांनी केलेले स्वच्छता अभियानाचे आवाहन समाजाने कसे मनावर घेतलेले आहे, याची १-२ टक्के तरी उदाहरणे ठळकपणे दिसतील. हे लोक काही भाजपचे कार्यकर्ते नाहीत. तरीही हे होत आहे. कारण त्यांच्या अंतरात्म्याला हे आवाहन पटलेले आहे.

मोदी यांच्या कडून होत असलेल्या कामाच्या सक्तीमुळे नाराज झालेली नोकरशाही मोदींच्या विरोधात गेल्याचीही चर्चा आहे. असे असेल तर ते लाजिरवाणे आहे. हाच न्याय केजरीवाल यांच्या `लाचखोराना पकडण्याच्या` आवाहनाला सुद्धा लावायला हवा ना...! काम न करता पगार आणि वरकमाई अशी दुहेरी मिळकत असलेल्या नोकरदारांना खरे तर देशद्रोहाचे कलम लावायला हवे...

असो. मूळ विषयावर यायचे तर दिल्लीच्या जनतेने आपली नाराजी दाखवून देत केजरीवाल यांना मतदान केलेले आहे. यात नकारात्मक भाग अधिक आहे. दिल्लीला स्वतंत्र मोठे आर्थिक स्त्रोत नाहीत. त्यांना केंद्रावर अवलंबून राहावे लागत असते. केंद्राने न्याय्य वाटप केले तरी केजरीवाल त्यांच्या `अनार्किस्ट` स्वभावानुसार असंतोष माजवू शकतात. आता तर त्यांच्या दिमतीला ६० हून अधिक आमदार आहेत. एकेकाळी सत्ता सोडताना अर्थसंकल्प आणि आर्थिक तरतुदी करण्याचे भावनेच्या भरात जे विसरतात आणि दिल्लीच्या हजारो कर्मचार्यांना वाऱ्यावर सोडतात, त्यांच्या पुढील पगाराचीही ज्यांना चिंता वाटली नाही ते आता त्या राज्याचा उद्धार करण्यास निघाले आहेत...! हे चित्र भयावह ठरू शकते.

मी खोटा ठरलो, तर मला आनंद होईल. पण खरा ठरलो तर तो दुर्दैवी क्षण आणि तो पर्यंतचा काळ देशाच्या प्रगतीला मारक ठरेल. लोकशाहीची थट्टा ठरेल... एका व्यक्तीच्या हट्टासाठी एका राज्याला वेठीला धरणे, ते ही देशाच्या राजधानीला... हे परवडणारे नाही...




-   -  दत्ता जोशी  

Saturday, January 3, 2015

आमच्या `गोवा ट्रेक` ची गोष्ट...


`गोवा ट्रेक`ची उद्घोषणा युथ होस्टेलच्या वेबसाईटवर झाली आणि लातूर येथील मित्रवर्य शिवदास मिटकरी यांनी पुढाकार घेत १० जणांचा ग्रुप तयार केला. गोव्यात `ट्रेक` करावा असे ठिकाण तरी कुठे असेल, असा विचार करीत आणि किनाऱ्यावरील भटकंतीचे इमले रचत आम्ही ४०+ क्लब (!) चे १० जण तयार झालो. नाव गोव्याचे असले तरी प्रत्यक्षात हा ट्रेक गोवा आणि कर्नाटकच्या जंगलांतून गेला. `ते` ९ दिवस मंतरलेले ठरले. आम्ही सर्व व्यावसायिक लोक आपापले व्यवहार बाजूला ठेवून ट्रेकला गेलो आणि ताजेतवाने होऊन परतलो. त्याची गोष्ट...

------------------------------------------------------------
शिवदास २०१४ च्या जुलै महिन्यात औरंगाबादेत माझ्या घरी आला तेव्हा त्याने त्या आधी केलेल्या डलहौसी ट्रेकची चर्चा निघाली. शिवदास आणि लातुरातील आमच्या काही मित्रांनी गतवर्षी डालहौसीचा ट्रेक युथ होस्टेल च्या माध्यमातून केलेला होता. त्याचे फोटो त्याने त्याच वेळी फेसबुक वर अपलोड केलेले होते. मी त्याला म्हणालो - `मलाही विचारले असते, तर मी सुद्धा आलो असतो.` त्यावर त्याने लगेचच गोवा ट्रेकची माहिती दिली. युथ होस्टेल ने नुकतीच त्यांच्या वेबसाईट वर त्याची उद्घोषणा केलेली होती. मी तयारी दाखविली. त्याने लगेचच युथ होस्टेलच्या वेबसाईट वर माझी मेंबरशिप रजिस्टर केली. लातुरातून ८ तर उस्मानाबादेतून १ असे ९ जण तयार होते. मी १० वा औरंगाबादेतून लातूर येथे जाऊन त्यांच्यात सहभागी होणार होतो. माझे आई-वडील लातुरात वास्तव्यास असल्याने मला ही गोष्ट सोपी होती...

२१ डिसेंबरची `वेळा-अमावस्या` लातुरातच साजरी करून करून २२ च्या batch मध्ये सहभागी होण्याचे आम्ही ठरविले. २२ ला पहाटे ५ ला निघण्याचे निश्चित केले आणि प्रत्यक्षात ६.४५ ला निघालो... निघण्याआधी आम्ही आपापले व्यावहारिक जगातील मुखवटे घरात काढून ठेवले... माझा आयुष्यातील पहिला ट्रेक सुरु झाला.
सर्वसाधारणपणे ट्रेकची मस्ती वीस-पंचविशीत ठीक...! माझ्या इतर मित्रांनी ४०+च्या वयात गतवर्षी डलहौसी सारखा अवघड ट्रेक केलेला होता. मी वयाच्या ४३-४४ व्या वर्षी प्रथमच या भानगडीत पडत होतो...! माझ्यासारखेच आणखी ३ `पाहिलटकर` आमच्यासोबत होते. शिवदास मिटकरी हे आमचे `नेते`. त्यांची प्लंबिंग मटेरियलची डीलरशिप आहे. त्यांच्या समवेत विश्व travel चे सुनील देशपांडे, एलआयसी चे सुनील पाटील, मातोश्री वृद्धाश्रमाचे संचालक धनाजी तोडकर, उस्मानाबादेतील ज्वेलरी व्यावसायिक प्रमोद खंडेलवाल, बांधकाम व्यावसायिक राजेश सुगरे हे डलहौसी ट्रेकचा अनुभव असलेले मित्र आणि मी दत्ता जोशी, एलआयसीचे विकास अधिकारी वाय डी कुलकर्णी, छायाचित्रकार शिरीष कुलकर्णी आणि औषधी व्यावसायिक वामन भूमकर असे चार पाहिलटकर. २२ ला सकाळी ६.३० ला २ कारमधून सुरु झालेला आमचा प्रवास सोलापूर, मिरज, चिकोडी, हातकणंगले, सावंतवाडी मार्गे रात्री १० वाजता पणजीत पोहचलो. कांपाल भागातील स्पोर्ट ऑथोरिटी ग्राउंडवर युथ होस्टेलचा बेस कॅम्प होता. तेथे नाव नोंदवून त्यांनी दिलेल्या तंबूत आम्ही विसावलो.

दुपारचे जेवण मिरजेलगतच्या एका शेतात झालेले. मोठ्या भाकरी, हिरव्या मिरच्यांचा ठेचा, दही, शेंगांची चटणी असा ऐवज मित्रांनी बांधून आणलेला. हिरव्या मिरचीच्या ठेच्याची `करामत` पहाटे २ वाजता मला जाणवू लागली आणि उलट्या-जुलाबानी मी हैराण झालो. शरीरातील पाणी कमी झाले, अशक्तपणा जाणवू लागला. मित्रमंडळी चिंतीत झाली. त्यांनी औषधे दिली. थोडे बरे वाटले.
२३ ला सकाळी ८ च्या सुमारास तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी रॉक क्लायंबिंग आणि मीरामार ते डोना पावला बीच असे ६ किलोमीटर चालणे असा कार्यक्रम ठरलेला होता. यात सहभागी झालो नाही तर कदाचित पुढे जाण्याची हिम्मत येणार नाही, असे लक्षात आले आणि तसाच उठलो. चहा-नाश्ता घेण्याचीही भीती वाटत होती... उलटून पडण्याची शक्यता... उपाशी पोटीच निघालो.
या साधारण ६ किमीच्या चालण्यात मी सर्वात मागे होतो. पण नेटाने हे अंतर पूर्ण केले. 

डोना पावला बीचवर मित्रांनी सरबत आणून दिले. जीवात जीव आला. तेथून बेसकॅम्पला बसने परतायचे होते. उभे राहण्याचेही त्राण राहिले नव्हते. शिवदासने खंडेलवाल यांना जागेवरून उठायला लावले... मला जागा रिकामी करून दिली...! त्या संध्याकाळी सर्व जण पणजीत गेले, मी झोपून होतो. रात्री ते परतले तेव्हा मी झोपलेला. `दत्ताला सोबत घेवून जाता येईल का?` यावर त्यांच्यात चर्चा झाली! अर्थात माझ्या माघारी.
२४ ची सकाळ मात्र छान उगवली. भरपूर विश्रांती आणि औषधांमुळे मला ताजेतवाने वाटत होते. `काहीही झाले तरी मी हा ट्रेक पूर्ण करणार` अशी घोषणा मी केली आणि सर्वानीच त्याला दाद दिली... 

आपापल्या पाठपिशव्या (sacks) घेवून आम्ही बाहेर पडलो. कॅम्प लीडर आणि इतरांनी युथ होस्टेल पद्धतीने दोन ओळींत उभे राहून टाळ्या वाजवीत आम्हाला निरोप आणि शुभेच्छा दिल्या. 

एका बसने आम्हाला गोव्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या मोबोर बीचवर सोडण्यात येणार होते. तेथून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या बेनालीयम बीचपर्यंत आम्हाला चालत यावयाचे होते. सकाळी भरून दिलेला pack lunch चा डबा पाठीवर होता.

या बीचवर वर्दळ होती ती प्रामुख्याने परदेशी पर्यटकांची. आमची एकूण ४६ जणांची batch तेथे दाखल झाली. तेथून रमत गमत चालणे सुरु झाले. दुपारी एका सावलीत डबे खाऊन झाले. सारे पुढे निघालो. या ४६ जणांत महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान आणि दिल्लीचे ट्रेकर होते. सर्वांचे आपापले ग्रुप... 

सर्वांमध्ये अंतर. ते दिवसभर कायम राहिले. ३ च्या सुमारास बेनालीयम बीचवरील कॅम्प वर एक एक करून पोहचण्यास सुरवात झाली. कॅम्प लीडरने थोड्या वेळाने समुद्र्स्नानाची परवानगी दिली आणि अख्खा ग्रुप बीच वर पोहचला...! चालण्यातील थोडा थकवा पण समुद्रस्नानाचा आनंद अशा दुहेरी मनःस्थितीत साऱ्यांनी आनंद लुटला.
सध्या मोबाईलशिवाय कुणाचे पान हालत नाही. दिवसभर फोटो काढून, फोनवर बोलून, गाणी ऐकून सर्वांच्याच battery डाऊन झाल्या होत्या. चार्जिंग point कमी. त्यातही आमच्या मंडळीनी डोके लावले होते.

शिवदासने लातूरहूनच extention box आणलेला होता. तंबूतील बल्बच्या वायरला छेद देऊन शिरीष  कुलकर्णी यांनी त्यात वीज प्रवाह आणला आणि १० जणांचे मोबाईल एकाच ठिकाणी चार्ज होऊ लागले... कुणी तरी म्हणाले – `हा extention box वर सामुहिक अत्याचार आहे...!`

ही रात्र अधिक देखणी ठरली ती भोजनोत्तर झालेल्या समुद्र-दर्शनाने. कॅम्प लीडरची खास परवानगी काढून आम्ही रात्रीच्या अंधारात बीचवर पोहचलो. समोरच्या अथांग सागराच्या काळोखात मावळतीला निघालेली चंद्रकोर, लाटांची गाज आणि किनाऱ्यावर पसरणाऱ्या फेसाळत्या लाटा... जणू कुणी चांदीच्या दागिन्यांची पखरणच करतोय... 

किनाऱ्यावरील हॉटेलांच्या गजबजाटापासून दूर जात आम्ही सर्व जण निःशब्द शांतता अनुभवत होतो. एक लाट आली... तिच्या पाठोपाठ दुसरी... ती विरण्याच्या आत तिसरी मोठी लाट पहिल्या दोघींना कवेत घेवून विखुरली... लाटांचे हे मंत्रमुग्ध करणारे विभ्रम आणि ते अनिमिषपणे पाहणारे, अंधारात बुडालेले २० डोळे... ते काही तास अविस्मरणीय ठरले...
बेनालीम बीच ते वेल्साव बीच हे १० किमी चे अंतर चालणे हा २५ डिसेंबरचा कार्यक्रम होता. आधीच्या दिवसाचा अनुभव असल्याने सकाळपासूनच अनेकांनी अनेक ठिकाणी समुद्र स्नानाचा कार्यक्रम सुरु केला. इथे काही युवक काही युवतींच्या भोवती रुंजी घालताना दिसू लागले... आधीच्या दिवसापेक्षा अंतर कमी असले तरी संध्याकाळी वेल्सावला पोहोचेपर्यंत सारेच जण थकलेले होते.
या वाटचालीतील एक भेट मात्र संस्मरणीय ठरली. 
इथे सचिन हंगे नावाचा एक हॉटेल मालक आम्हाला भेटला. हा बीड जवळील हंगेवाडीचा. सातवी नापास झाल्यावर त्याने घर सोडले आणि तो थेट गोव्यात आलं. हॉटेलात नोकरी करीत त्याने व्यवहार शिकून घेतला. हळू हळू स्वतःचे हॉटेल सुरु केले. आता तो हॉटेल चालवितो आणि भाड्यानेही देतो. लाखोने कमावतो. अस्खलित रशियन भाषा बोलतो...! महिनाभर आधी भेट झाली असती तर त्याची स्टोरी मला बीडच्या `पोलादी माणसे`मध्ये घेता आली असती!
वेल्सावचा मुक्काम हा मात्र अविस्मरणीय अनुभव ठरला. आम्ही त्या जागेला `भूत बंगला` असे नाव दिले होते. हा मोडका-पडका बंगला एकेकाळी या परिसराची शान असावा.
पण सध्या धुळीने माखलेला. चोहोबाजूने रान माजलेले. इथे एक रात्र काढावयाची होती. आजच्या रात्री कुणी बीचवर जाण्याचे नाव काढले नाही. पण काही मुली आणि (साहजिकच त्यांच्या पाठी असलेली मुले) खूप उशिरा कॅम्पवर पोहचली. तोवर लीडर, को-लीडर अस्वस्थ. काही जण त्यांना शोधण्यासाठी बीचवर पोहचले, तर ही बाळे तिथे मस्त बागडत होती...! मंझील से राह हसीन..! इथेच दिल्लीतील २ महिलांनी ट्रेक थांबविण्याचे ठरविले. त्यांना हा दिनक्रम झेपणारा नव्हता. त्यांच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. बीचवरील दोन्ही दिवस त्यांनी कोस्ट-गार्ड च्या जीप मधून प्रवास पूर्ण केला होता...! त्या परतल्या हे त्यांच्यासाठी बरे झाले. पुढे कुठूनही परतणे अधिक अवघड झाले असते...
२६ च्या पहाटे आम्हाला लवकर उठविण्यात आले. कॅम्पमधून सकाळी ६ ला निघून सातची रेल्वे पकडायची होती. वेल्सावजवळ असलेले कान्सोलीयम हे जवळचे रेल्वे स्टेशन होते. वेल्साव ते कोलेम हे  साधारण २ तासाचे अंतर पार करून सकाळी ९.३० च्या सुमारास आम्ही दुधसागर कॅम्पकडे जाणाऱ्या वाटेच्या तोंडाशी पोहचलो. गोव्यात असलेले दमट, खारवलेले वातावरण इथे अजिबात नव्हते. समुद्र सपाटीपासून सुमारे ७० मीटर उंचीवरील हे ठिकाण जंगलाच्या तोंडाशी होते. हवा थंड आणि आल्हाददायक... इथून पुढे ट्रेकची खरी सुरुवात होती. कोलेम ते दुधसागर कॅम्प हे अंतर ८ किमी. पर्यटकांसाठी या वाटेवर जीपची सोय होती. आम्हाला ती वाट चालत पूर्ण करायची होती.
काही पावले चालून गेलो आणि नदीचे पात्र आडवे आले. 
पायातील बूट हातात... शेवाळलेल्या गोट्यावरून तोल सावरत पाण्यातून पात्र पार केले... गाडीवाटेने सुरु झालेली वाटचाल एका वळणावर जंगलात शिरली. पायाखाली चिरडल्या जाणाऱ्या वाळक्या पानांचा चुर्र असा आवाज, भोवताली उडणाऱ्या पक्ष्यांच्या अधून मधून कानावर येणाऱ्या लकेरी, कोळ्यांनी विणलेले जाळे, अनेक ठिकाणी दिसणारी वारुळे... मधूनच आडवे येणारे पाण्याचे प्रवाह... पुन्हा पुन्हा बूट हाती घेवून तोल सावरत पाणी पार करण्याची कसरत... हळू हळू ट्रेकला रंग चढू लागला होता.
वाटेत एके ठिकाणी थोडे खोल, मोठे पात्र लागले आणि सर्वांचाच अंघोळीचा विचार प्रत्यक्षात आला. बहुतेक सगळे जण कपडे उतरवून थंड गार पाण्यात उतरले. उशिराने उतरणाऱ्याना अंगावर पाणी उडवून चिंब करण्याचा वात्रट प्रकारही काही जणांनी सुरु केला. भुका लागलेल्याच होत्या. आपापले डबे काढून जेवणे पार पडली. त्याच नदीचे पाणी पिवून झाले... पुढे निघताना काही जण पाण्यात घसरले... विशेषतः ज्यांना ऐटीत जाण्याचे वेध लागलेले होते, ते तर आधी आडवे झाले....!
आणखी २ वेळा बूट उतरवून आम्ही कॅम्पच्या जवळ पोहचलो. काय ते सुरम्य ठिकाण... आधीच्या ३ दिवसांचा शिणवटा क्षणार्धात दूर झाला... तीन बाजूनी उंचच उंच डोंगर... दाट झाडीची छाया असलेले छोटेखानी पटांगण, तेथे ठोकलेले तंबू... शेजारी असलेले गावकरी नावाच्या शेतकऱ्याचे बैठे घर... स्वच्छ सरावलेले प्रशस्त अंगण... उतारावर फुललेली बागायत आणि त्याच्या टोकाला ओढ्याचा खळाळ... इतके सुरम्य ठिकाण आधी कधी कुणी क्वचितच अनुभवले असेल.



आपापले सामान टाकून सारेच ओढ्याकाठी धावले... आम्हीही एका कडेला गेलो... बोलता बोलता सर्वांची तंद्री लागली... बेनेलीमच्या समुद्र किनाऱ्यावर अनुभवेलेले निःशब्द क्षण पुन्हा एकदा जिवंत झाले. तेथील गाजेची जागा इथे ओढ्याच्या खळाळाने घेतली होती... काही काळ सारेच मंत्रमुग्ध होते...
या कॅम्पवर लाईट नव्हते. इथे वीजच पोहोचलेली नाही. त्यामुळे सारे व्यवहार एक तर सौर दिव्यांच्या सौम्य प्रकाशात किंवा आमच्या जवळच्या torch वर. रात्री ८ वाजताच सारे काही सामसूम झाले. तरुण मंडळी `कॅम्प फायर` साठी बाहेर पडलेली होती. धनाजी तोडकर यांनी त्या तरुण रक्तात स्वतःची जागा तयार केली होती. इतकी, की ते नसतील तर मुले बोलवायला येत...! अशा वातावरणात चांदण्या रात्रीचा अनुभव अलौकिकच... तंबूबाहेर येऊन आकाशाकडे नजर टाकली की निरभ्र आकाशात असंख्य तारकापुंज लकाकताना दिसत... चन्द्रकोरही डोक्यावर होती... अनेक दशकांत अशी सुंदर रात्र अनुभवलेली नव्हती...
हे सारे रमणीय असले, तरी प्रत्यक्ष स्थिती चिंतेचीच होती. हा त्या जंगलाचा मध्यभाग. परिसरात अनेक हिंस्र श्वापदे... प्राणी... साप... त्यामुळे रात्री कुणीही एकटे तंबूबाहेर यायचे नाही, अशा स्पष्ट सूचना कॅम्प लीडरने दिलेल्या...
सकाळच्या शांत वातावरणात सर्वांना जाग आली. मला खळाळणाऱ्या पाण्याने मोहिनी घातली होती. एकटाच पात्रात गेलो. मोबाईलवर VDO मोड सुरु केला, एका खडकावर मोबाईल स्थिर ठेवला आणि काही मिनिटांचे ते रेकॉर्डिंग करून घेतले...
चहा-नाश्ता-pack lunch नंतर सकाळी ८ च्या सुमारास पुढील ट्रेक सुरु झाला. तासाभरातच आम्ही दुधसागर धबधब्याच्या पायाशी पोहचलो होतो. लहानपणी कादंबरीत वाचलेला (आणि मध्यंतरी चेन्नई एक्सप्रेस मध्ये पाहिलेला) दुधसागर प्रत्यक्ष डोळ्यासमोर साकारला... डोंगरमाथ्यावरून कोसळणाऱ्या सहस्र धारा जणू दुधाप्रमाणे शुभ्र दिसत होत्या... म्हणून हा `दूध सागर`. 
डोंगराच्या मध्यावरच कोकण रेल्वेचा मार्ग गेलेला. योगायोगाने त्याच वेळी एक गाडी तेथून पुढे जात होती... सृष्टीचे हे अलौकिक रूप डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवीत आम्ही पुढे जात होतो. (काहींच्या कॅमेऱ्यात `आणखीही` काही रूपे चित्रित झाली, ही गोष्ट वेगळी...!)
दुधसागर पर्यंत सारे काही ठीक होते. जमीन साधारणपणे समतल होती. फारशी दमणूक नव्हती. इथून पुढे कसा रस्ता आहे, याची चुणूक पहिल्या २००-३०० फुटांच्या चढण्यातच लागली आणि मी सर्वात आधी `नी-कॅप` गुडघ्यावर चढविली... आधी सर्व जण धबधब्याच्या मध्ये असलेल्या लोह्मर्गापर्यंत आलो. तेथून ३ बोगदे ओलांडून वरच्या डोंगराच्या पायथ्याशी आलो. तेथून सुरु झालेली चढण आधीची सारी `गमजा` उतरविणारी ठरली. ही चढण संपतच नव्हती...! पुढच्या वळणावर संपतेय असे वाटले की तेथून नवा चढ सुरु...! कुणी थांबतोय... कुणी पाणी पितोय... कुणी गोळ्या चघळतोय... कुणी धापा टाकतोय... कुणी परत जाण्याची धमकी देतोय... सारेच थकलेले... चढण काही संपत नव्हती...
मधेच एका वळणावर दोन ग्रामस्थ फळांच्या फोडी विकायला बसलेले दिसले आणि साऱ्यांचा मोर्चा तिकडे वळला. कलिंगडाची एक फोड १० रुपयांत...! पण तेथे किंमत फळांना नव्हती... ती तिथवर आणण्याच्या मेहनतीची ती किंमत होती! त्यांच्या कष्टाला दाद देत आम्ही खिसा रिकामा केला. पुढच्या टप्प्यावर ओढ्याकाठी डबे उघडले. काहींनी तेथे अंघोळीची हौस भागवून घेतली. त्या फळवाल्याच्या सांगण्यानुसार पुढचा रस्ता थोडासाच होता आणि तो सोपाही होता... तसेच झाले.. पुढच्या पाउण तासाच्या पायपिटीनंतर कॅम्प आला. आजची एकूण पायपीट १० किलोमीटरची झाली होती. आम्ही पोहचलो तो होता कर्नाटकातील कुवेशी गावाजवळचा नांद्राणचा भाग... उतारावर टप्प्याटप्प्याने केलेल्या भातशेतीच्या कोरड्या झालेल्या रानात तंबू ठोकलेले होते. इथेही लाईट नव्हते... काही खुश झाले, काही नाराज...

पुढच्या अर्ध्या तासात जवळ जवळ सर्व जण पोहचले पण ग्रुप लीडर शिरीष कुलकर्णी यांच्याकडे एक कार्ड कमी आलेले होते. कॅम्पवर पोहचल्यावर प्रत्येक ट्रेकर ने आपले कार्ड ग्रुप लीडरकडे द्यायचे आणि त्याने कॅम्प लीडरकडे तो गठ्ठा सहीसाठी पोचवायचा, हा युथ होस्टेलचा नियम... एक कार्ड कमी म्हणजे एक जण पोचलेला नाही... शोध घेतला तर दिल्लीचा दाउद खान गायब होता. खरे तर तो आम्हाला मागे टाकून पुढे आलेला होता. कुठे गेला, काही कळेना. कुठल्याच मोबाईलवर रेंज नाही... संध्याकाळचे ४ वाजलेले... ५ - ५ जणांची २ पथके तयार झाली आणि दाऊदला शोधण्यासाठी बाहेर पडली. तास-दीड तासाने सारे परतले पण त्याचा थांग लागेना... साऱ्यांच्याच मनात चिंता दाटून आली... कॅम्प लीडर अस्वस्थ झाले...
अंधारून येण्याच्या जेमतेम काही मिनिटे आधी एका मोटारसायकल वरून दाउद ची स्वारी उतरली आणि सर्वांना हायसे वाटले. हे गृहस्थ सर्वात पुढे होते आणि मार्किंगकडे दुर्लक्ष केल्याने थेट पुढच्या गावी पोहचले होते. तेथे चौकशी करून त्याने कॅम्प वर सोडण्याची विनंती एका गावकऱ्याला केली आणि तो परत आला. एक धडा सर्वांना मिळाला – जंगलात एकट्याने फिरायचे नसते. रस्ता चुकला तर शोधणे अशक्य असते आणि जंगलात काहीही घडू शकते...
लाईट नसल्याने अंधार लवकर जाणवू लागला आणि मोबाईल बंद असल्याने हाताला चाळा नव्हता. साडेसातला जेवणे झाली आणि ८ ला सारे जण तंबूत परतले. इथे गारठा जास्त होता. मग तंबूतील गप्पांना ऊत आला. झोपण्यापूर्वी एकमेकांची खेचायची सवय बेस कॅम्प पासूनच सर्वांना लागलेली होती. काहीही कारण काढायचे आणि खी-खी हसत सुटायचे... सारे जुने दिवस जागे झालेले होते...! इथे मात्र थोडा अतिरेक झाला आणि शिवदासला जास्तच टार्गेट करण्यात आले. मग मात्र त्याने जो रुद्रावतार धारण केला, त्यातून सारा तंबू चिडीचूप....! काही मिनिटांनी त्याची समजूत काढायला सुरवात झाली. आधी त्याची खेचण्याची चढाओढ लागलेली, आता खुश करण्याची... त्यानेही (नेहेमीप्रमाणे) समजूतदारपणा दाखविला आणि पुन्हा गप्पा रंगल्या...! बराच वेळ रंगल्या. उशीर झाला होता. कुणी तरी `गुड नाईट` म्हणाले... आमचे प्रमोद खंडेलवाल हे वेगळेच रसायन... ते म्हणाले `जय श्री कृष्ण`... मग `गुड नाईट` की `जय श्री कृष्ण` यावर वाद सुरु झाला... `आमच्याकडे असेच म्हणतात`, चे दाखले सुरु झाले... सर्वावर कडी केली वाय डी कुलकर्णीनी – ते म्हणाले `आमच्याकडे `इकडे सरक` म्हणतात...! क्षणभर कुणाला काही कळले नाही.. जेव्हा कळले, तेव्हा तंबूत हास्याचा स्फोट झाला...!
२८ ला थोडे जास्त चालायचे होते. नांद्रण हून निघून एक डोंगर चढून उतरायचे... मग कॅसलरॉक येणार... पुन्हा एक डोंगर चढून उतरायचे, मग अनमोड येणार... हा आमचा कॅम्प. हे अंतर १४ किलो मीटरचे... सकाळी ८ वाजताच चालायला सुरवात झाली. कालचे अनुभव गाठीशी असल्याने आणि कॅम्प लीडरने वहीत प्रतिकूल शेरे नोंदविल्याने आज सारे भानावर आले होते. सगळेच एका गटात व्यवस्थित चालत होते. ट्रेकमध्ये प्रथमच शिस्त पाळली जात होती. हे जंगल आधीपेक्षा अधिक घनदाट होते, हे त्या मागचे आणखी एक कारण...! ग्रुप लिडरच्या पुढे कुणी जायचे नाही आणि को-लिडरच्या मागे कुणी राहायचे नाही हा नियम तंतोतंत पाळला गेला. आज खऱ्या अर्थाने ट्रेक चालू झाला होता. कुणी घाई करत नव्हते. वाटेल तिथे बसत नव्हते. रमत-गमत पण विशिष्ट वेगाने चाल चालू होती. वाटेतील वनस्पती, मोकळी राने, ज्वालामुखीच्या लाव्ह्यातून तयार झालेले पठार आणि तेथील खडकाची विशिष्ट रचना... 
ओल्या लाकडावर आलेली वेगळ्या वेगळ्या रंग-आकारांची बुरशी... सगळे आज नजरेखालून जात होते. अगदी प्रारंभीपासून एक गोष्ट मात्र सर्वांनी पाळली होती – कुणीही निसर्गाला हात लावलेला नव्हता, त्याचे विद्रुपीकरण केलेले नव्हते. chocklate खावून त्याची वेष्टने प्रत्येक जण आपापल्या खिशात टाकत होता...
जंगल घनदाट होते. रस्त्यात पाणवठा नव्हता. भर दुपारी जंगलात संध्याकाळ झाल्याचे वातावरण होते... थोड्या पायपिटीनंतर जंगलाचा पहिला टप्पा संपला... कॅसलरॉक आले. गावातून जाताना एका मराठी शाळेचा फलक दिसला. गेटला कुलूप होते. ते गांजलेले होते. मैदानात गवत वाढलेले... 
सहज चौकशी केली, तेव्हा कळले, इथे शिकविणारे मराठी शिक्षक काही वर्षांआधी एक एक करून निवृत्त झाले. कर्नाटक सरकारने नंतर मराठी शिक्षकांची भरतीच केली नाही. आता तेथे मराठी शिकविले जात नाही. हे गाव कारवार जिल्ह्यात येते. ७० टक्के लोकवस्ती मराठी बोलते आणि त्या गावात मराठी शाळा बंद...! ही विचित्र कानडी मानसिकता... त्या उलट महाराष्ट्रात सीमावर्ती भागात त्या त्या भाषेच्या शाळा उत्तम प्रकारे चालू असतात... असो.
कॅसलरॉकच्या स्टेशनबाहेर झाडाखाली डबे उघडले. जेवण होण्याआधीच पुढील कॅम्पमधून एक व्यक्ती आम्हाला घेण्यासाठी आलेली होती. हे प्रथमच होत होते. आम्ही याचा एकाच अर्थ घेतला – `पुढची वाट आणखी खडतर आहे... आणि ते खरेच होते. घनदाट जंगल, भर दुपारी सुद्धा जमिनीपर्यंत पोहचू न शकणारे सूर्यकिरण... एक डोंगर चढायचा आणि एक उतरायचा... या चढ उतारात सारेच जण दमले... आजचे अंतर १४ किलोमीटर चे होते. ते पार करेपर्यंत संध्याकाळचे ५ वाजले. कॅम्प चिंतीत होता. इतका उशीर कुठल्याच गटाला तोवर झालेला नव्हता...
अनमोडचा हा कॅम्पही प्रसन्न होता. तंबूच्या मागून झुळूझुळू वाहणारा पाण्याचा पाट... आजूबाजूला असलेली प्रसन्न वनराई आणि महत्वाचे म्हणजे इथे लाईटची सोय होती... सर्वांनी आपापली आयुधे चार्जिंग साठी बाहेर काढली. आधीची पुनरावृत्ती झाली...! जंगलातील कॅम्पमधील ही शेवटची रात्र. आज आम्ही सर्वानीच कॅम्प फायर मध्ये सहभागी होण्याचे ठरविले. तरुणांची नाच-गाणी झाली, काहींची मनोगते झाली. मी सुद्धा थोडेसे बोललो. भान ठेवून बेभान होण्याचे जे आवाहन आम्ही ऐकत आलो, तेच या पुढच्या पिढीपर्यंत पोचविले. त्यानंतर मग तंबूतील गप्पांना रंग चढला...! थकवा होताच पण उद्याचा शेवटचा दिवस असल्याची रुखरुखही होती.
२९ डिसेंबरची सकाळ उजाडली... ट्रेक संपण्याचा आनंद आणि दुःख अशा संमिश्र भावना सर्वांच्या मनात होत्या. आज १५ किलोमीटर चालायचे होते. चढण कमी होती पण उतार खूप अंतराचा आणि तीव्र होता, असे आम्हाला सांगण्यात आले होते. अनमोड गाव संपेपर्यंत कॅम्प लीडर आम्हाला सोडण्यास आले आणि एक सहायक कर्नाटकाची सीमा संपेपर्यंत सोबत करण्यास आला. थोड्याच वेळात आम्ही ४-५ किलोमीटर चालून आलो. गोव्याची हद्द सुरु झाली, तसा तो सहायक परतला. घनदाट जंगल सुरु झाले. मार्किंग काळजीपूर्वक पाहत आम्ही पुढे निघालो. मागील ३ दिवसांत गाठलेली उंची आज एका दिवसात उतरायची होती! हळू हळू उतार तीव्र होऊ लागला...
डोंगर चढण्यापेक्षा उतरणे किती त्रासदायक असते याची अनुभूती सर्वांना होऊ लागली. पण थांबण्याची सोय नव्हती. पायवाट एका माणसाला जाण्याएवढीच होती. सारे एका रांगेत होते... एकत्र बसून जेवावे अशी जागा कुठे सापडत नव्हती. हळू हळू दुपार चढू लागली. दुपारी २ पर्यंत सर्वांनी तांबडी सुरला येथे पोहचायचे होते. तेथून बसने ७५ किलोमीटरचा पणजीचा प्रवास होता. त्या वेळेत पोहचण्याची सर्वांची धड्प्पद होती. त्यामुळे जेवणाचा विषय थोडा मागे पडला. एक एक गट थकून थांबत होता, मागचा गट आला की त्याला जागा करून देऊन पुढे सरकत होता... तीन-चार दिवसांआधी डोंगर चढताना जसे वाटायचे, तसेच आजही वाटत होते. पुढच्या वळणावर डोंगर उतार संपेल असे वाटत असतानाच नवा उतार सुरु... दुपारी साधारण १२.३० – १ च्या सुमारास थोडी सपाटी जाणवू लागली. ग्रुप लीडर शिरीष कुलकर्णी म्हणाले... `रस्त्याला लागल्यानंतर ३ किलोमीटर चालायचे आहे. त्या ऐवजी जंगल संपताच बस मिळाली तर...?` आणि त्या स्वप्न रंजनात आम्ही पुढे निघालो. साधारण अर्धा तास चालून झाले... 
झाडे विरळ झाली... खूप पुढे डांबरी रस्ता दिसू लागला आणि रस्त्यावर येताच चक्क आमची बस दिसली...! भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी दिसताच जी प्रतिक्रिया व्यक्त होऊ शकते ( या उदाहरणात प्रत्येक जण आपापल्या कल्पनाशक्तीप्रमाणे भर घालण्यास मोकळा आहे! ) ती आमची प्रतिक्रिया झाली... ट्रेक संपला होता...!
एव्हाना पोटात कावळे कोकलत होते. आम्ही जेथे रस्त्याला लागलो तेथेच डावीकडे एक ओढा वाहत होता आणि त्या पलीकडे तांबडीसुरलाचे पुरातन महादेव मंदिर उभे होते... भूक बाजूला ठेवून आम्ही आधी ओढ्यात उतरलो. दोन दिवस अंघोळ नव्हती. अंग घासून-पुसून ओढ्यात अंघोळी केल्या... कोरे कपडे चढविले आणि मंदिरात दर्शनाला गेलो....

सुंदर मंदिर. कदाचित शेकडो वर्षांपूर्वीचे... पुरातत्व खात्याच्या आखत्यारीत असलेल्या या मंदिराची शिल्पकला रमणीय होती. गाभाऱ्यातील महादेवाची पिंडी तर खूपच प्रसन्न... इतकी सुंदर, प्रसन्न आणि महत्वाचे म्हणजे स्वच्छ मंदिरे फारशी पाहायला मिळत नाहीत... सारा शिणवटा क्षणार्धात दूर झाला... प्रसन्न मनाने बाहेर आलो... झाडाखाली बसून जेवणे झाली... बसमध्ये बसून पणजीकडे निघालो...
दुपारी ४ च्या सुमाराला बेस कॅम्प ला पोहचलो. कॅम्प लीडर आणि त्यांच्या सहकारी – इतर ट्रेकर यांनी मिळून दोन रांगा करून टाळ्या वाजवीत आमचे स्वागत केले... 
आमचा ट्रेक आता अधिकृत रित्या पूर्ण झाला होता... त्या नंतर तासाभरातच सामान आवरून आमच्या गाड्या तेथून बाहेर पडल्या...


२२ ते २९ डिसेंबर हा काळ आमच्या आयुष्यात वेगळेच क्षण घेवून आलेला होता. साधारण २० -२५ वर्षांपूर्वी विद्यार्थी जीवनात आम्ही जे आयुष्य जगलो, ते पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. व्यवहाराच्या जगात २०-२५ वर्षे गेली... शरीर – मनावर बरीच पुटे चढली, सभ्यतेच्या, अहंकाराच्या बऱ्याच खोट्या कल्पना शरीराला चिकटल्या... `मला असे हवे, मला असेच लागते, मला ते चालत नाही...` असे अनेक पाढे सर्वांना पाठ झाले होते. ते या दिवसांत विसरले गेले... बाटलीबंद पाण्याची सवय लागलेली, पण इथे मिळेल ते पाणी पोटात गेले. कधी नळाचे, कधी नदीचे, कधी ओढ्याचे...! `माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही`, हा आग्रह अखेर `माझी अंडरवेअर सोडून काहीही वापर रे बाबा...` पर्यंत पोहचली. आपला डबा / ताट धुवायला लागू नये म्हणून दोस्ताला त्याच्या ताटात थोडी जास्ती भाजी घ्यायला लावायची आणि आपण हातातच पोळ्या घेवून जेवण करायचे... जेवण झाले की हात धुवून आपण मोकळे... ही जुनी क्लुप्ती पुन्हा एकदा अमलात आली... अर्थात सगळेच एका वरचढ एक... हे ताट सुद्धा पुढे आळीपाळीने धुवावे लागले! पण २ ताटांत १० जण गुण्यागोविंदाने जेवण करताहेत... हे दृश्य विसरता न येणारे...


आम्ही सर्व जण तरुण मुला-मुलींचे `अंकल` होतो...!  हा वयाचा मान की स्वतःपासून आम्हाला दूर ठेवण्याची त्यांची आयडिया?... आमची सगळीच डोकी पांढऱ्या केसांची आणि चेहऱ्यांवर सुरकुत्या दिसू लागलेल्या... त्यामुळे, त्यांची ही treetment आमच्या वयाचा मान म्हणून स्वीकारली!
माझ्यासोबतच्या ९ पैकी ३ जण माझ्यासाठी पूर्वपरिचित होते. एक जण नावाने ओळखीचा आणि ५ जणांना मी आयुष्यात प्रथमच भेटत होतो. पण बालपणी भेट झाली असती तर जशी घट्ट दोस्ती जमली असती तशी या वयातही जुळली... मजा आली...
या प्रवासात तंबूत कुणी कितीही `मोकळा` असला तरी बाहेर रस्त्यावर मात्र आम्ही तरुण रक्तालाच बागडण्याची संधी दिली... आमची भूमिका सांभाळण्याची होती... पण नसती बंधने आम्हीही पाळली नाहीत... टी शर्ट मळले, बर्म्युडा घाण झाल्या... काही फरक पडला नाही. मी तर या काळात दाढीही केली नाही...! कुणाचे पांघरून कुणाच्या अंगावर, कुणाची torch कुणाच्या हाती... सारे काही सुखेनैव चालू होते...
२९ ला संध्याकाळी पणजीत आलो... फ्रेश होऊन कपडे बदलले... दोन्ही गाड्या काढल्या... आपापले सामान डिकीत टाकले... रातोरात प्रवास करत पहाटे प्रमोद खंडेलवाल यांना उस्मानाबादेत सोडून आम्ही ३० च्या सकाळी लातूर गाठले... विश्रांती घेतली... अंघोळी केल्या आणि कपड्यांबरोबरच २२ तारखेला काढून ठेवलेले व्यवहारी जगाचे मुखवटे पुन्हा एकदा चेहेऱ्यावर चढवून आम्ही जगरहाटीला सुरुवात केली...!


-    - दत्ता जोशी
 औरंगाबाद

 ९४२२ २५ २५ ५०