Sunday, September 25, 2011

जालन्यात प्रवेश करताना

'जालना आयकॉन्स' या माझ्या २५६ पानी पुस्तकाचे प्रकाशन २६ सप्टेंबर २०११ रोजी आहे. या पुस्तकाच्या प्रारंभी मी लिहिलेले प्रास्ताविक येथे देत आहे. या विषयाकडे पाहण्याची दृष्टी यातून स्पष्ट होईल.
.................................................
फेब्रुवारी 2011 चा पहिला आठवडा... साधारण सकाळचीच वेळ... मी माझ्या औरंगाबादच्या ऑफिसमध्ये रुटीन काम करीत होतो, तेवढ्यात मोबाईल खणाणला... जालना येथील विख्यात उद्योजक श्री. सुनील रायठठ्ठा यांचे नाव स्क्रीनवर झळकत होते. त्यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच कौतुकमिश्रित आदर राहिलेला आहे. त्यांच्याशी होणारा संवाद माझ्यासाठी नेहेमीच आनंददायी ठरलेला आहे. याच आनंदी वृत्तीने मी त्यांच्याशी संवाद सुरू केला आणि प्राथमिक वास्तपुस्त झाल्यानंतर त्यांनी एक कल्पना मांडली, तेव्हा मी खूपच आनंदलो. साधारण तीन वर्षांपूर्वी मी ‘झेप’ हे पहिल्या पिढीतील उद्योजकांवर आधारित पुस्तक लिहिलेले होते. त्यामध्ये श्री. रायठठ्ठा यांचाही परिचय मी करून दिलेला होता. शून्यातून उभी राहिलेली अनेक माणसे आपण पाहतो. श्री. रायठठ्ठा यांनी तर आपले कार्य ‘मायनस’मधून उभे केलेले आहे! स्वतःच्या उद्योजकीय घोडदौडीबरोबरच जालन्याच्या भावी पिढीच्या विकासासाठी ते करीत असलेल्या प्रयत्नांविषयी मी ऐकून होतो. याच दृष्टीतून त्यांनी त्यांच्या मनातील ही कल्पना माझ्याशी ‘शेअर’ केली होती. ‘झेप’च्याच धर्तीवर पण फक्त औद्योगिक विश्वापुरतेच मर्यादित न राहता सर्व क्षेत्रांमध्ये जालन्याची ओळख असलेल्या व्यक्तींचा परिचय नव्या पिढीला करून देणारे एक पुस्तक प्रकाशित करावे, असा त्यांचा मनोदय होता आणि या पुस्तकाच्या लेखनाची जबाबदारी मी उचलावी, अशी त्यांची मनःपूर्वक इच्छा होती. मी अंतर्बाह्य थरारलो. त्यांनी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी माझी निवड केली होती हा जसा माझ्यासाठी सन्मानाचा आणि भाग्याचा भाग होता तसाच अशाप्रकारचे चाकोरीबाहेरचे काम हा माझ्या आवडीचा विषय होता. मी तातडीने त्यांना होकार दिला आणि दुसर्‍याच दिवशी सकाळी जालन्यानजीकच्या दावलवाडी येथील त्यांच्या प्रसन्न कार्यालयात प्राथमिक चर्चेसाठी दाखल झालो.

जालन्यातील भाग्यलक्ष्मी स्टीलचे श्री. सुनील गोयल आणि विख्यात सीए श्री. कुमार देशपांडे थोड्याच वेळात या चर्चेत सहभागी झाले. साधारण 20 व्यक्तींचा परिचय करून देणारे हे पुस्तक प्रकाशित करायचे आणि त्यासाठी तातडीने कामाला प्रारंभ करायचा असे ठरवून ही पहिली बैठक संपली. पुढील साधारण 15 दिवसांत त्यांनी नावांची अंतिम यादी तयार केली तेव्हा ही संख्या साधारण 30 पर्यंत पोहोचेल, असे लक्षात आले. पहिली पाच नावे निवडून मुलाखती घेण्यास सुरवात करायची असे ठरले आणि 28 फेब्रुवारी 2011 रोजी मी जालन्यात दाखल झालो. ज्यांचा परिचय करून द्यावयाचा, अशा व्यक्तींच्या नावांची यादी तयार होती आणि त्यातील जवळजवळ प्रत्येक जण माझ्यासाठी अनोळखी होता. काही मोजकी दोन-तीन नावे थोड्याबहुत परिचयाची होती, इतकेच!

तयार करण्यात आलेल्या यादीतील नावांपैकी पहिली भेट ठरली होती श्री. परेश रुणवाल यांच्याशी. जालन्यात त्यांचा शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय आहे, एवढीच प्राथमिक माहिती मला मिळालेली होती. जुना मोंढा भागातील एका अत्यंत अनाकर्षक इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पाठीमागच्या भागात थाटलेल्या एका हॉलमध्ये आम्ही पोहोचलो तेव्हा तेथे शेअर ट्रेडिंगचे काही काम चालत असावे, असे वाटणार्‍या काही खाणाखुणा दिसल्या. जेमतेम पस्तिशीत असलेल्या श्री. रुणवाल यांच्याशी चर्चा सुरू झाली आणि साधारण अडीच तासांच्या अवधीच्या चर्चेनंतर लक्षात आले, की मी साधारणतः वार्षिक आठ हजार कोटींची उलाढाल करणार्‍या तरुणाशी चर्चा केली आहे! माझ्यासाठी हा आपादमस्तक शहारण्याचा क्षण होता. (औरंगाबादच्या तुलनेत) जालन्यासारख्या छोट्या शहरात शेअर मार्केट हा विषय कितीसा मोठा असेल, अगदी हे शहर मोठी व्यापारपेठ असतानाही हे काम किती मोठे असू शकेल, याचा पुसटसाही अंदाज मी बांधू शकलो नव्हतो. हा माझा पराभव होता पण तो आनंददायी होता. बहुदा शेअर आणि वायदेबाजाराच्या क्षेत्रात एकाच छताखाली सर्व सेवा मिळणारे आपल्या राज्यातील मुंबईखालोखाल हे एकमेव केंद्र असावे...!

या खणखणीत सलामीनंतर मी सावध झालो. हे काम करण्याचे ठरवताना झालेल्या आनंदाला आता एका जबाबदारीची जाणीव प्रकर्षाने होत होती. ‘जालन्यासारख्या शहरात काय असणार?’ अशा मनःस्थितीत सुरू केलेले काम ‘जालन्यासारख्या भागात आणखी काय काय पाहायला मिळणार बरे?’ या उत्सुकतेपर्यंत पोहोचले. यानंतर पुढील महिनाभरात एक - एक करीत मुलाखती पुढे सरकत गेल्या. प्रारंभी 20 जणांचा समावेश 30 पर्यंत पोहोचला होता पण जालन्याच्या विकासात लक्षणीय योगदान देणार्‍यांची नवनवी नावे समोर येतच होती. तेव्हा 40 नावांवर थांबायचे असे सर्वांनी मिळून ठरविले. ही सर्व नावे विविध प्रकारच्या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींची होती. यातील काही उद्योजक आहेत तर काही व्यावसायिक, काही सामाजिक क्षेत्रांत काम करणारे आहेत, तर काही शैक्षणिक... यातील एक बाब एकसमान आहे - त्या त्या क्षेत्रात काम करण्याची त्यांची ‘पॅशन’.

‘जालना- सोनेका पालना’ ही म्हण खूप वर्षांपासून कानावर येते आहे, पण हा ‘सोने का पालना’ कसा ठरला? या परिसराच्या माती-पाण्यात आणि माणसांच्या रक्तात कोणते गुण आहेत, याचाही शोध घेण्याचा प्रयत्न या निमित्ताने मी केला. ही प्रातिनिधिक नावे निवडताना निवड समितीने ही निवड अतिशय काळजीपूर्वक केलेली होती, याचे प्रत्यंतर पावलापावलावर येत होते. एकेकाळी असलेली जालना शहराची ‘व्यापार्‍यांचे शहर’ ही ओळख बदलणारी नवी पिढी या निमित्ताने जवळून पाहता आली तसेच विविध क्षेत्रांमध्ये अतिशय महत्वाचे योगदान देणार्‍या जुन्या पिढीतील खंबीर माणसांचा परिचयही या निमित्ताने झाला. अत्यंत प्रतिकूल स्थितीत शिक्षण घेत 1950 मध्ये हैदराबादेत इंजिनइरिंगसाठी गेलेले आणि 20 वर्षांच्या नोकरीनंतर वयाच्या पन्नाशीत ‘कॅबसन’ हा स्वतंत्र उद्योग सुरू करणारे श्री. जी. के. काबरा आणि पुण्यातील ‘बजाज टेम्पो’च्या जवळजवळ प्रत्येक वाहनाच्या डिझाईनमध्ये महत्वाची भूमिका असणारे श्री. विनयकुमार मुंदडा ही दोन्ही व्यक्तिमत्वे साठीच्या पुढची आहेत. तिसरे, साठीत पोहोचलेले व्यक्तिमत्व आहे रमेशभाई पटेल यांचे. 1975च्या सुमारास सुटा चहा विकण्यासाठी जालन्यात आलेल्या रमेशभाईंनी आपल्या प्रचंड मेहनतीने ‘विक्रम चहा’चे साम्राज्य जालन्यात उभारले. या वयातही या तिघांचाही उत्साह तरुणांना सुद्धा लाजविणारा आहे. ‘स्टील इंडस्ट्री’ उभी करणे, त्यात अभिनव प्रयोग करणे ही खासीयत असलेले श्री. नितीन काबरा आणि केवळ पैसा कमावण्यासाठी नव्हे, तर समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून उद्योगाचा विस्तार करणारा त्यांचा ‘भाग्यलक्ष्मी स्टील’ हा ग्रुप आजच्या जगात स्वतःची वेगळी ओळख सिद्ध करणारा आहे. ‘स्टील सिटी’ जालन्यात कारखाने तर अनेक आहेत पण प्रचंड आर्थिक उलाढाल असलेल्या अशा उद्योगात पार्टनरशिप यशस्वी होण्याची किमया ‘राजुरी स्टील’ने घडविली. या ‘किमयागारां’मध्ये ‘फर्स्ट अमंग इक्वल’ असलेले श्री. द्वारकाप्रसाद सोनी यांची वाटचालही प्रेरणादायी आहे.

बालवयातच चांगले संस्कार करण्यासाठी मागील दोन दशकांपासून नर्सरी चालविणार्‍या सौ. विशाखा देशपांडे आणि ‘इंटरनॅशनल स्कूल’च्या स्पर्धेत उतरून जालन्यात एक उत्तम शाळा उभी करणार्‍या सौ. मनीषा पुरी यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान जेवढे महत्वाचे आहे, तितकाच महत्वाचा भाग श्री. संजय टिकारिया यांच्या ‘लॅब असिस्टंट’च्या माध्यमातून सीटीएमके गुजराती विद्यालयात ते बजावत असलेल्या कामगिरीचा आहे. अनेक राज्य पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या श्री. टिकारिया यांनी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानवृत्ती जागविण्यासाठी घेतलेली मेहनत आणि त्यांची प्रयोगशीलता एखाद्या शास्त्रज्ञालाही अचंबित करणारी आहे. सांस्कृतिक क्षेत्रात नृत्य-गायनाचे योगदान देणार्‍या सौ. विद्या राव जालन्यात एखाद्या ‘ओऍसिस’प्रमाणे कार्यरत आहेत. सौ. रेखा बैजल हे साहित्य क्षेत्रात तळपणारे नावही जालन्यातीलच. एक लेखिका म्हणून विकसित झालेले त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या साहित्यकृतींच्या निर्मितीमागील प्रेरणा अभ्यासणे हा ही आनंदाचा भाग असतो. स्त्री शक्तीतील जिद्दीचे  जालन्यातील उत्तम उदाहरण म्हणजे ‘जैन बंधू पावभाजी’च्या सौ. बसंती चोरडिया - उने. आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या पावभाजीच्या गाड्याचे रूपांतर त्यांनी आज एका प्रशस्त फास्ट फुड सेंटरमध्ये केले आहे. ‘रुची प्रॉडक्टस्‌’च्या माध्यमातून जालनेकरांच्या जिभेचे चोचले पुरविणार्‍या प्रिया जोशी यांचा उद्योगही हळूहळू विस्तारत आहे. ‘सील्स’च्या उद्योगात कार्यरत असलेल्या सौ. मीनाक्षी मेहुणकर यांनी आपल्या पतीच्या मदतीने घेतलेली व्यवसायातील झेपही अतुलनीय आहे. एकेकाळी दाल मिलला लागणारी यंत्रे दुरुस्त करणार्‍या श्री. नरोत्तम हंसोरा यांनी मोठ्या हिमतीने अशा प्रकारच्या मिल उभ्या करण्यासाठी लागणारी यंत्रणा तयार करण्याचा कारखाना सुरू केला आणि काळानुरूप त्यात बदल करीत दाल मिलच्या व्याप्तीमध्ये अनेक बदल केले. त्यांचे व त्यांना मदत करणार्‍या त्यांच्या दोन्ही मुलांचे उदाहरण सर्वच दृष्टीने अनुकरणीय आहे.
शालेय शिक्षणात अजिबात गती नसणार्‍या आणि एकेकाळी ‘एसटीडी-पीसीओ’वर नोकरी करणार्‍या श्री. नारायण सोनुने यांनी आपल्या असामान्य जिद्द, चिकाटी व प्रयोगशीलतेच्या बळावर स्टेशनरीच्या बाजारपेठेत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी तयार केलेल्या फाईल्स आज जालना जिल्ह्याच्या बाहेरही जात आहेत. सतत काठावर पास होणार्‍या किंवा नापास होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी स्वतःचे विश्व निर्माण करणारे हे एक उत्तम उदाहरण आहे. एकेकाळी खरपुडीच्या कृषि विज्ञान केंद्रात सालदार म्हणून काम करणार्‍या सौ. सीताबाई मोहिते आज या केंद्राच्या सल्लागार संचालिका आहेत. त्यांनी आपल्या व्यावसायिक कुशाग्रतेच्या बळावर आवळ्यासह विविध फळांवर प्रक्रियांचा उद्योग सुरू केला. विविध पुरस्कार मिळवीत परदेशात जाऊनही आपली छाप पाडली. विशेष म्हणजे त्या अशिक्षित आहेत...! केळीच्या चिप्स तयार करणारे डोंगरगावचे श्री. ईश्वरदास घनगाव यांचे उदाहरणही ग्रामीण भागात राहून वेगळ्या वाटा चोखाळणार्‍यांसाठी मागदर्शक आहे. मंठासारख्या ग्रामीण भागातून पुढे आलेले आणि आज पुण्यात स्वतःची ‘आयटी कंपनी’ चालविणारे जेमतेम 25 वर्षीय राहुल बन्सल हे इंजिनइरिंगनंतर परदेशात जाऊन पैसा कमावण्याऐवजी देशातच राहून स्वतःच्या मेहनतीने काम उभे करण्यातील एक महत्वाचे उदाहरण आहे. वेब डिझायनिंगच्या क्षेत्रात आज त्यांची स्वतःची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध झालेली आहे.

मुंबईच्या ‘यूडीसीटी’तून केमिकल इंजिनइर झालेले आणि याच विषयात काही अलौकिक काम उभे करणारे श्री. आशीष मंत्री यांच्याबद्दल काय बोलणार? रसायनांच्या जगात विरघळून गेलेले हे एक अजब रसायन आहे. अतिशय कमी वयात अनिश्चित आर्थिक चढ-उतार पाहिलेल्या या माणसाने अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाने युक्त, पशुखाद्यासाठी वापरले जाणारे अतिशय उच्च दर्जाचे प्रोटिन निर्माण करणारा ‘रिस्की’ उद्योग जालन्यात उभारला. अशा प्रकारचा यशस्वीपणे कार्यरत असलेला हा भारतातील पहिलाच उद्योग आहे आणि याची दोन पेटंट या उद्योगाच्या नावावर आहेत, यातच सगळे आले...!

जालन्यात सुसज्ज रक्तपेढी उभी करण्याच्या ध्यासाने झपाटलेले पूसाराम मुंदडा, पुण्या-मुंबईची ‘सुपर मार्केट’ची संकल्पना जालन्यात राबविणारे मो. युसूफ हाजी अहमदभाई व त्यांचा संपूर्ण ‘परिवार’, पेटीकोटसारख्या व्यवसायात उतरून नवी बाजारपेठ निर्माण करतानाच निराधार महिलांना काम देऊन त्यांच्या संसाराला आधार देणारे रामेश्वर व ज्ञानेश्वर संदूपटला बंधू, ‘लॅपटॉप क्लिनिक’ या संकल्पनेचे जाळे सार्‍या महाराष्ट्रभर विणण्यास निघालेले मनीष राठी, कोरुगेटेड बॉक्स आणि ‘एसी’ उपकरणांमध्ये लागणारे तांब्याचे सुटे भाग तयार करणारे जितेंद्र राठी यांच्याबरोबरच एका लोडिंग रिक्षापासून सुरू झालेला व्यवसाय दहा चाकी ट्रकच्या खरेदीपर्यंत नेणारे हिकमती श्री. संजय केदार यांची कहाणीही मुळातूनच वाचण्यासारखी आहे.

ही आणि अशी एकंदर 42 व्यक्तिमत्वे आपणास या पुस्तकात वाचण्यास मिळतील. 40 जणांविषयीच या पुस्तकात लिहिण्याचे ठरल्यानंतर शेवटच्या क्षणी 2 नवी नावे नाव यामध्ये समाविष्ट करणे भाग पडले. हा अपवाद आवश्यक होता, कारण एका वेगळ्याच विश्वात रमलेल्या श्री. राहुल लाहोटी यांचे नाव समोर आले आणि योगायोगाने ते याच काळात सुटीवर जालन्यात आले होते. ‘बिट्‌स, पिलानी’ येथून कॉम्प्युटर इंजिनइर झालेल्या श्री. राहुल यांनी आपली मायक्रोसॉफ्टमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून ‘पब्लिक पॉलिसी’ या विषयात उच्च शिक्षण घेतले आणि सध्या ते ‘पॉलिसी मेकिंंग’च्या क्षेत्रात रिसर्चर म्हणून बेंगलोरच्या ‘आयआयएम’मध्ये कार्यरत आहेत. आपल्या ‘पॅशन’ला ‘प्रोफेशन’मध्ये बदलण्याचे त्यांचे धाडस नव्या पिढीसाठी अतिशय अनुकरणीय आहे. दुसरे नाव होते मनोज पटवारी यांचे. मूकबधिर असून त्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात केलेले काम आणि मूकबधिरांसाठी ते घेत असलेले कष्ट हे असे व्यंग असणार्‍यांसाठी प्रेरक ठरतील.

‘बजाज’चे प्लांट इंचार्ज श्री. कैलास झांझरी, विख्यात सर्जन डॉ. संजय राख, होमिओपथी तज्ज्ञ डॉ. सतीश मोरे, ‘गणपती छाप मेहंदी’चे श्री. सूरजमल मुथा, डॉ. हेडगेवार हॉस्पिटलच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावणारे डॉ. अनंत पंढरे, ‘स्पर्म प्रोसेसर’ या आपल्या अभिनव क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरी बजावणारे डॉ. प्रमोद बजाज, खरपुडीच्या कृषिविज्ञान केंद्राद्वारे शेतकर्‍यांच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावणारे श्री. विजयअण्णा बोराडे, इंडस्ट्रियल सप्लायमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बजावणारे श्री. दिनेश छाजेड, जालन्यात इन्व्हर्टर - यूपीएस तयार करणारे श्री. विजयकुमार अग्रवाल, साधे डिप्लोमा इंजिनइर असूनही उत्तम कामगिरीच्या आधारावर बहुराष्ट्रीय कंपनीत झेप घेणारे श्री. कैलाश मालोदे, अतिशय छोट्या पातळीवर केटरिंगचा व्यवसाय सुरू करून आज आपले स्वतःचे स्थान निर्माण करणार्‍या सौ. कल्पना शाह, आपल्या विक्रमी रांगोळीद्वारे गिनिज बुकात नाव नोंदविणारे श्री. रवी कोंका, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ‘बर्फ गोळ्या’ने जालनेकरांना थंडावा देणारे श्री. मोहन खोडवे... ही या पुस्तकातील नावे अशीच उल्लेखनीय आहेत. ही प्रत्येक कथा आपणास नक्कीच काहीतरी विचार देऊन जाईल, हे निश्चित.

आणि  सर्वात महत्वाचे नाव - बद्रीनारायणजी बारवाले. जालना म्हटले की जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात ‘महिको’ची ओळख सांगितली जाते आणि ‘महिको’ म्हटले की बद्रीनारायणजी समोर येतात. रूढ अर्थाने साधे पदवीधरही नसलेल्या बद्रीनारायणजींनी आपली हिंमत, मेहनत आणि दूरदृष्टीच्या जोरावर उभारलेले बियाण्यांचे साम्राज्य वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहेच, पण त्याच बरोबर आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून त्यांनी उभ्या केलेल्या संस्था त्यांचे मोठेपण सांगून जातात. त्यांची ओळख सांगायला या पुस्तकाची सगळी पानेही कमी पडावीत...!

असा माझा हा जालना जिल्ह्याचा प्रवास! एखादी टेकडी चढून जाण्याचं ठरवावं आणि चढायला लागल्यानंतर लक्षात यावं, की तो पर्वत आहे, असं काहीसं माझं झालं. पण पर्वताची अवघड चढण चढताना वाटेत फुलांचे छानसे ताटवे लागावेत, मध्येच सुंदर जलाशय असावेत, पुढे जाणार्‍या पायवाटांच्या दोन्ही बाजूंनी ताजीतवानी फुले डोकावत असावीत आणि चढण्याचे कष्ट वाटूच नयेत, असाच काहीसा हा अनुभव होता. प्रसन्न आणि अनुभवसंपन्न करणारा...!

हा अनुभव मला आणि हे पुस्तक वाचणार्‍या सर्वांनाच ज्यांच्यामुळे घेता आला, त्या श्री. सुनील रायठठ्ठा यांच्याबद्दल चार शब्द सांगितले नाहीत, तर मी अपराधी ठरेन. हे पुस्तक प्रत्यक्षात येण्यासाठी श्री. रायठठ्ठा यांनी घेतलेले परिश्रम अतुलनीय आहेत. ते स्वतःही एक यशस्वी उद्योजक आहेत. आज 40 हून अधिक देशांमध्ये त्यांची उत्पादने निर्यात होतात. मात्र आजचे हे यश सहजपणे आलेले नाही. श्री. रायठठ्ठा यांच्या घोडदौडीची कहाणी खूपच वेगळी आहे. ही कहाणी आहे एका जिद्दीची, शून्यातून विश्व निर्माण करणार्‍या फिनिक्स पक्ष्याची. 1977 मध्ये औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी आरंभीच्या काळात ‘एल ऍँड टी’मध्ये नोकरी केली. 1981 मध्ये त्यांनी नोकरी सोडून स्वतःच्या व्यवसायास सुरवात केली. आज त्यांनी आपल्या व्यवसायातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. छोट्या देशांपासून सुरवात करून आपल्या निर्यातीचेे क्षेत्र त्यांनी आता फ्रान्ससारख्या देशापर्यंत विस्तारले आहे. आपल्या माणसांवर विश्वास कसा आणि किती टाकावा, हे रायठठ्ठा यांच्याकडूनच शिकावे ! परदेशातील बाजारपेठ मिळवताना आणि वाढवताना ते स्वतः जेवढ्या वेळा परदेशात गेले नसतील, त्याहून अधिक वेळा त्यांच्याकडील कामगार परदेशी जाऊन आलेला आहे ! उद्योगाच्या क्षेत्रात ही नवी संकल्पना रुजविताना त्यांनी माणसं उभी केली, जोडली आणि सर्वांना घेऊन ते पुढे जात आहेत...!

श्री. रायठठ्ठा यांच्या ‘विनोदराय इंजिनइरिंग प्रा. लि.’मध्ये पाण्याच्या टाक्यांच्या उत्पादकांना लागणारी यंत्रे तयार होतात. बाजारपेठेत शे-दोनशे लिटर्सपासून पाण्याच्या टाक्या उपलब्ध आहेत. या टाक्या बनविण्याचे तंत्रज्ञान आणि यंत्रे श्री. रायठठ्ठा तयार करतात. या व्यवसायाला त्यांनी साधारणपणे सन 1991 मध्ये सुरवात केली. सन 2000 मध्ये दिल्लीत ‘प्लास्ट इंडिया’ नावाच्या औद्योगिक प्रदर्शनात त्यांनी भाग घेतला आणि तेथून सारे चित्र पालटले. त्याच प्रदर्शनातून त्यांना निर्यातीची पहिली ऑर्डर मिळाली. श्री. रायठठ्ठा सांगतात, ‘‘या प्रदर्शनात आम्ही सर्वात लहान स्टॉल बुक केला होता. स्टॉलचे पैसेही हप्त्याहप्त्याने भरले. यंत्रे घेऊन जाण्याइतका पैसा नव्हता, म्हणून त्याचे फोटो आणि माहितीचे तक्ते आम्ही सोबत नेले होते. मशिन्सची डायमेन्शन्स काय, याचे उत्तर देण्याइतकीही आमची तयारी नव्हती. तेथे आम्ही जागतिक बाजारपेठेचे चित्र पाहिले. आमच्यातील त्रुटी आमच्या लक्षात आल्या. तेथूनच आमच्या प्रगतीला वेग आला.’’ सध्या ते सौदी अरेबिया, कुवेत, टांझानिया, मलेशिया, हैती, नायजेरिया, फिजी, लिबिया, येमेन, मलेशिया, ट्युनिशिया, सुदान, मादागास्कर, झांबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती आदी देशांना यंत्रे निर्यात करतात. त्यांच्या उत्पादनांचा दर्जा पाहून नुकतीच त्यांच्याकडे फ्रान्समधूनही ऑर्डर आली. निर्यातीबाबत असलेल्या अनेक शंकांचे ते समाधान करतात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो भाषेच्या अडथळ्याचा. पण हा मुद्दा गैर आहे, असे सांगताना ते म्हणतात - आपले प्रॉडक्ट दर्जेदार असेल आणि किंमत वाजवी असेल, तर तेथे व्यवहार जुळण्यासाठी भाषेचा अडथळा अजिबात येत नाही. तिथं अर्थकारण महत्त्वाचं असतं, कारण फायद्याची भाषा प्रत्येकाला समजते !

मागील दोन वर्षांपासून त्यांनी जालन्यात ‘यंग इनोव्हेटर्स’ ही चळवळ उभारली आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या सहकार्याने ते विद्यार्थ्यांतील अभिनव कल्पनांना खतपाणी घालण्याचे व त्या फुलविण्याचे काम करतात. यंत्रमानव निर्मितीची कार्यशाळा, फोटोग्राफी कार्यशाळा यांच्यासह अनेक उपक्रम ते जालन्यात राबवितात. स्वतः दीड-दोन लाख रुपयांचा खर्च करून त्यांनी खास विद्यार्थ्यांसाठी जालन्यात एक संपन्न ग्रंथालय उभारले आहे. जालन्यातील पुढची पिढी अधिक सक्षम आणि परिपूर्ण होण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न सुरू आहे. हे पुस्तकही या प्रयत्नांचाच एक भाग आहे.

आज कॉर्पोरेट जगतात ‘सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज’ हा स्वतंत्र विभाग कार्यरत असतो. या द्वारे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी काही निधी राखून ठेवलेला असतो. अनेकदा यातून फक्त देखावे उभारले जात असल्याची टीका होत असते. मात्र, अशा प्रकारचे कसलेही बंधन नसताना श्री. रायठठ्ठा यांनी जालन्याच्या भावी पिढीसाठी उभारलेला ‘यंग इनोव्हेटर्स’ हा महायज्ञ आणि त्यातील या पुस्तकाच्या रूपाची समिधा सर्वांसाठीच अनुकरणीय ठरावी.

एक बाब येथे आवर्जून स्पष्ट करावीशी वाटते, की हे 42 जण म्हणजे जालना जिल्ह्याचा परिपूर्ण परिचय नव्हे. ही नावे केवळ प्रातिनिधिक अशी आहेत. यात समाविष्ट करता न आलेली अनेक नावे अत्यंत जड अंतःकरणाने आम्हाला बाजूला ठेवावी लागली. यामागे पुस्तकाच्या पानांची मर्यादा, एवढे एकच कारण आहे. कदाचित, या पुस्तकाचा दुसरा भाग भविष्यात प्रकाशित करावयाचे ठरल्यास ही नावेही त्यात समाविष्ट करणे शक्य होईल.
हेच पुस्तक इंग्रजीतूनही प्रकाशित व्हावे असा आग्रह श्री. आशीष मंत्री यांनी धरला. प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारलेल्या श्री. रायठठ्ठा यांनीही त्यावर लक्ष केंद्रित केले. लवकरच हे पुस्तक इंग्रजीतूनही प्रकाशित होईल. या 42 व्यक्तींच्या प्रत्यक्ष भेटींसाठी मी जालना, हैदराबाद, पुणे इथे प्रवास केला. हैदराबादेतील भेटीसाठी श्री. सत्यनारायण सोनी यांची मदत झाली. अतिशय उमद्या मनाच्या या गृहस्थांनी आपल्या व्यवसायात अनेक प्रयोग केले आहेत. त्यांची भेट हाही आनंददायी अनुभव होता. जालना आणि पुण्याच्या भेटीगाठींमध्ये ‘विनोदराय’मधील श्री. श्रीकांत देशपांडे यांनी केलेले सहकार्य आभाराच्याही पलीकडचे आहे. पहिल्या दिवशीच्या पहिल्या भेटीपासून अगदी अखेरच्या भेटीपर्यंत प्रत्येक ठिकाणी ते माझ्यासोबत होते. सर्व व्यक्तींशी सुसंवाद प्रस्थापित करणे, त्यांच्यातील समन्वय, बहुतेक वेळा तेथील फोटोग्राफी आणि अनेकदा ड्रायव्हिंगमध्येही ते माझे वाटेकरी झाले. त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे माझा भार खूपच हलका झाला. त्यांचे आभार मानणे हा निव्वळ देखावा ठरेल. आणखी एक नाव घेतल्याशिवाय हे लेखन अपूर्ण राहील. श्री. सुनील गोयल यांनी अगदी पहिल्या बैठकीत या लेखनाविषयी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. या लेखनादरम्यान त्या मार्गदर्शक ठरल्या. अनेक लेखांमध्ये त्यांनी केलेल्या सूचनांमुळे हे लेख अधिक परिपूर्ण होण्यास मदत झाली. आभाराचे हे प्रदर्शन कदाचित त्यांना आवडणार नाही! आणि सर्वात महत्वाचे... श्री. सुनील रायठठ्ठा. आपली सामाजिक जाणीव प्रत्यक्ष कृतीतून ते व्यक्त करतात. त्यांच्या संकल्पना आणि पुढाकारामुळेच हे पुस्तक आज आपल्या हाती आहे. त्यांच्या कायम ऋणातच राहणे मला आवडेल.

जालन्याच्या प्रेरणादायी विश्वात आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत!

- दत्ता जोशी

Saturday, September 17, 2011

एका ‘जिंदादिला’च्या ‘एक्झिट’चे एक वर्ष...

उदय दंताळे यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने त्यांच्या मित्रपरिवाराने औरंगाबादेत आजपासून तीन दिवस विविध कार्यक्रम आयोजित करून त्यांना आगळी श्रद्धांजली वाहण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. काही माणसं आपल्या आठवणी चिरंतन काळासाठी सोडून अकालीच परलोकी जातात. दंताळे त्यापैकीच एक. त्यांचे मित्र दत्ता जोशी यांनी या निमित्ताने त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा...
....................................................
दैनिक सामनाच्या औरंगाबाद आवृत्तीमध्ये दि. १७ -९ - २०११ रोजी प्रकाशित झालेला लेख.
....................................................

‘त्या’ पहाटे मनोज टिकारिया यांचा आलेला ‘एसएमएस’ मन घायाळ करून गेला. अर्थ कळूनही तो मेसेज मी तीन वेळा वाचला. या आशेने, की आधी कळलेला अर्थ चुकीचा असेल...! पण ते होणार नव्हते. एक जिंदादिल माणूस या जगातून निघून गेला होता. मृत्यूही असा, की काळजाचा थरकाप व्हावा. अशा वेळी जगन्नियंत्याचा राग येतो. सर्वांच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे असणारा हा माणूस एक्झिट घेताना सर्वांच्याच असंख्य पावले पुढे निघून गेला. खरे तर या गोष्टी आपल्या हातात नसतात, एक अदृष्य शक्ती हे सारे घडवत असते. आपण त्या शक्तीला निमूटपणे शरण जायचे असते, हेच खरे.

उदय दंताळे यांची आणि माझी पहिली भेट कुठे, केव्हा, कधी झाली हे खरेच मला आठवत नाही. बुद्धीला खूप ताण देऊन पाहतोय, मागच्या वर्षभरात असंख्य वेळा स्मृतीच्या नोंदी असंख्य वेळा चाळून झाल्या. पण पहिल्या भेटीचा क्षण काही हाती लागत नाही. कदाचित ती ओळख औपचारिकपणे झाली नसावी. तसे, उदय कधीच औपचारिक नव्हते. आपल्याच धुंदीत मग्न होऊन रस्त्याने चालत निघावे आणि जाता जाता समानशील सुहृदांची पावले परस्परांशी जुळावीत, हात हाती गुंफले जावेत आणि त्याला कोणत्याही पूर्वपरिचयाची अट नसावी, इतके हे सारे अकृत्रिम... निरागस! अशाच कुठल्यातरी वळणावर हात गुंफले गेले, इतकीच स्मृती. मग इतर आठवणी आहेत त्या विविध कार्यक्रमांतून असलेल्या त्यांच्या विद्युत्‌गती वावराच्या. चेहर्‍यावरील हास्य मावळू न देता सगळ्या अडचणी सहज सोडविणारे दंताळे मनात खोलवर उतरत गेले.

काही आठवणी मात्र मनात नक्कीच घर करून आहेत. त्यांच्याशी झालेली पहिली ‘व्यवस्थित’ भेट मात्र पक्की आठवते. तेव्हा मी नोकरी करीत असलेल्या वृत्तपत्रात ‘झेप’ नावाचा स्तंभ लिहीत असे. पहिल्या पिढीतील उद्योजकांचा, त्यांच्या वाटचालीचा आणि संघर्षाचा परिचय तरुणांना करून देणार्‍या या स्तंभातून त्यांचा परिचय करून देण्यासाठी 2003 मध्ये केव्हा तरी ही भेट झाली. त्यांच्या घरात पहिल्या मजल्यावरील स्टुडिओत झालेल्या या तीन-साडेतीन तासांच्या गप्पांमध्ये उदय दंताळे हे ‘रसायन’ मला व्यवस्थित समजून घेता आलं. 1982 मध्ये मुंबईत जाऊन टीव्ही रिपेअरिंगचा कोर्स करून आलेल्या उदय यांनी त्यानंतर 10 वर्षे हेच काम केले आणि 1994 दरम्यान ‘साईड बिझनेस’ म्हणून सुरू केलेल्या ‘साउंड सिस्टिम’च्या व्यवसायात ते असे गुरफटत गेले की आधीचा व्यवसाय त्यांना बंदच करावा लागला. साधारण सन 2000 मध्ये त्यांनी ‘स्टुडिओ’ सुरू केला. मराठवाड्यातील हा पहिला अद्ययावत स्टुडिओ. पुढे काळाप्रमाणे बदलत आपल्या व्यवसायात त्यांनी असंख्य बदल केले. नव्या तंत्रज्ञानाचा सहज स्वीकार केला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे असंख्य माणसे जोडली! 

माझ्या व्यवसायिक वाटचालीत त्यांच्याशी अनेकदा संपर्क येत असे. मी केलेल्या ‘आर्य चाणक्य विद्याधाम’ या विद्यालयाच्या ‘टीव्ही जाहिराती’च्या जिंगलचे रेकॉर्डिंग त्यांच्याच स्टुडिओत झाले. मी लिहिलेल्या शब्दांना मनोज टिकारिया यांनी सुरांमध्ये गुंफले आणि त्याच विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या आवाजात ही जिंगल रेकॉर्ड झाली. 30 सेकंदांच्या जिंगलसाठी जवळजवळ अर्धा दिवस मेहनत झाली. शेवटच्या एका गद्य ‘पंचलाईन’साठी त्यांनी स्वतःचा आवाज दिला. इतर सर्व व्यवहार पूर्ण करून मी उदय यांना त्यांचे मानधन विचारले, तेव्हा त्यांच्या खास शैलीत मिश्किल हसत, हात हवेत फेकत ते उत्तरले, ‘‘सगळी आपलीच माणसं आहेत. शाळा आपलीच आहे. काम तुम्ही करताय. आपल्याच माणसांकडून काय घ्यायचे?’’ आणि खरेच, त्यांनी एकही पैसा घेतला नाही. मात्र त्यानंतर त्यांच्याकडे कामाचा प्रसंग पडला, तेव्हा आधी त्यांचे मानधन कबुल करून घेतले, ते नक्की स्वीकारणार याची खात्री करून घेतली आणि मगच काम सुरू केले...! अशा माणसाशी असेच वागायला पाहिजे, नाही का? 

माझ्या एका कार्यक्रमात ऐनवेळी काही समस्या उद्भवली आणि मी व्यक्तीशः इतर नियोजनात गुंतलो, तेव्हा पुण्याहून आलेल्या वाद्यवृंदाचा आणि राज्यातील विविध भागांतून आलेल्या गायकांचा समन्वय साधण्यासाठी उदय यांंनी या सर्वांना स्वतःच्या घरी नेले. सराव करून घेतला. सर्वाच्या नाश्तापाण्याची व्यवस्थाही केली आणि आपण काहीच विशेष केले नाही, अशा अविर्भावात सर्वांना कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊनही आले! 
आठवणी किती सांगायच्या? हा माणूस कधी दुर्मुखलेला दिसला नाही. इतरांना दूषणे देत स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या भानगडीत पडला नाही. एखादे आयोजन सोपवले की तिकडे पुन्हा पाहायची गरज नाही, असा विश्र्वास त्यांनी निर्माण केला होता. रुढ अर्थाने आम्ही ‘दोस्त’ नव्हतो. आम्ही कधी मिळून जेवायला गेल्याचे मला आठवत नाही की दोघांपैकी कोणीही दुसर्‍याला प्रचंड बिझनेस दिला, असेही झाले नाही. तरीही परस्परआदराचा स्नेहभाव आमच्या ठायी राहिला. 

मृत्यू हे अटळ सत्य आहे, हे उमगल्यानंतर मन सुख-दुःखाच्या पलिकडे जाते. मागील अनेक वर्षे अनेकांना अखेरचा निरोप दिला पण डोळ्यात पाणी तरळावे असा प्रसंग अलिकडच्या काळात फक्त मागच्याच वर्षी आला. ही आंतरिक ओढ होती का? मी अंधश्रद्ध नाही, पण एप्रिलमध्ये रामनवमीला मी आयोजलेल्या ‘गीत रामायण’ या कार्यक्रमाच्या आधीच्या रात्री उदय यांनी स्वप्नात येऊन या कार्यक्रमाच्या तयारीची आस्थेवाईकपणे चौकशी केली, हे आठवून मी आजही थरारतो. हे कोणते नाते म्हणायचे? या नात्याला मी नाव देऊ शकत नाही. 

सरतेशेवटी एक इच्छा मात्र मनात आहे. मृत्यूनंतरचे जग अस्तित्वात असेल तर उदय तेथे नक्की असतील. मी जेव्हा कधी तेथे पोहोचेन, तेव्हा त्यांची भेट नक्की व्हावी एवढीच इच्छा...! तिथेही ते एक ‘ठेवणीतला’ ज्योक सांगतील आणि मिश्किल हसत टाळीसाठी हात पुढे करतील...!

- दत्ता जोशी 9225 30 90 10


Friday, September 16, 2011

गणपतीबाप्पा, पुढच्या वर्षी थोडा उशीरा ये रे बाबा...

हे गणनायका, दुःखहारका, तू दरवर्षीप्रमाणे या वर्षी ठरल्या वेळी आलास आणि ठरल्याप्रमाणे दीड दिवस, सात दिवस, नऊ दिवस, अकरा दिवस असा वेळ घेत परत गेलासही. पण आता तू येताना आमच्या काळजाचा ठोका चुकू लागतो. तू विघ्नविनाशक, पण तुझ्या येण्याने जेवढी विघ्ने येतात ती पाहता आता हळूहळू तू जरासा उशीरानेच येण्याचे पाहा... कालांतराने येणे बंद केलेस तरी चालेल...
.............................................................................
 पाक्षिक `शेतकरी संघटक`च्या २२ सप्टेंबर २०११ च्या अंकात प्रकाशित झालेला लेख
.............................................................................. 


आदरणीय गणेशदेवा,
आपणास साष्टांग प्रणिपात. आपण ठरल्याप्रमाणे चतुर्थीला आलात आणि चतुर्दशीला मार्गस्थ झालात. तुमचं रुपलावण्य किती नेत्रसुखद. आम्हाला जेव्हापासून कळायला लागलं, त्या वयापासून आम्ही सारे तुमच्या प्रेमात पडलेलो आहोत. खरं सांगायचं, तर देवा हे तुमचं भाग्य! तुम्ही सर्वज्ञ ना? मग तुम्हीच सांगा किती जणांनी आपल्या बालपणी मातीचे - शाडूचे गणपती बनविले? किती मुलांनी आपल्या चित्रकलेच्या तयारीत कागदावर आपली छबी चितारण्याचा प्रयत्न केला. एवढे प्रमाण ब्रह्मा-विष्णुपासून पार अलिकडे संतोषीमातेपर्यंत कोणत्या देवतामध्ये आढळते?

आम्हाला आठवते, ‘गणपती येत आहेत’ याची चाहूल आम्हाला लागायची ती श्रावणातील शिडकाव्यानंतर घराशेजारच्या उंचवट्यावर आघाडा-दुर्वा उगवू लागल्यावर...! मग नदीकाठच्या ओल्या चिकणमातीचे छोटेछोटे गोळे आमच्या घरासमोरील अंगणात आणत असू. कधी मिळालाच तर शाडूही आणता येई आणि मग गणराया, तुला  साकारण्यासाछी आमची इवली बोटे झटू लागत. तुझं रुपडं साकारताना आमचं रुपडं मात्र पार काळवंडून जात असे. मग आमची झटापट सुरू होई रंग आणि ब्रशशी. अशा प्रकारे दोन-तीन दिवसांच्या मेहनतीनंतर तुझी मूर्ती साकारत असे. मूर्ती विकत आणावी लागणार नाही, या आनंदात घरातील मोठ्या माणसांचा आमच्या मूर्तीला पाठिंबा मिळे. विसर्जनापर्यंत दररोज सकाळ संध्याकाळची आरती मात्र अनेकदा आम्ही विसरत असू. मग घरात कोणाला तरी आठवण येई आणि आरती म्हटली जाई.

विसर्जनाच्या वेळी मूर्ती पाटावर ठेवून हा पाट डोक्यावर घेऊन तोल सांभाळत नदीपर्यंत जाऊन नदीत तुझे विसर्जन करताना आपल्या आयुष्यातील एक महान कलाकृती आपल्याकडून हिरावली जात असल्याचे दुःख मात्र अंतःकरणात सलत असे. या विसर्जनानंतर गावातील मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत आम्ही सहभागी होत असू. तुझ्यापुढे नाचताना वय, जात, धर्म विसरला जात असे. बैलगाडीच्या कठड्यांवर फळ्या आडव्या टाकून तयार केलेल्या प्लॅटफॉर्मवर तुझी विशालकाय मूर्ती ठेवलेली असे. नारळाच्या झावळ्या किंवा केळीचे खुंट यांच्या हिरव्यागार कमानींमध्ये तुझी गोजिरी मूर्ती शोभत असे. समोर गावातील ब्रॉसबँड वाजत असे. क्वचित एखाद्या मंडळाला कर्णे लावून गाणी वाजविण्याचा मोह आवरत नसे. पण सारे वातावरण चैतन्याने मुसमुसलेले... प्रसन्नतेचा अर्थ तेव्हा आकळत असे...

मधली काही वर्षे अशीच गेली. आमच्या वडिलांची जागा आम्ही घेतली आणि आमची जागा आमच्या मुलाने... पण त्याने कधी मातीत हात मळविलेले आम्ही पाहिले नाही. शिस्तशीरपणे बाजारातून तुझी मूर्ती मखरासह घरात येई. या वर्षी पर्यावरणाच्या रक्षणासाठी शाडूची मूर्ती आणायचे मुलाने ठरविले तेव्हा मला आनंद वाटला. माझं वर्तुळ थोडे तुटकपणे का होईना जुळत होतं... पण शाडूची मध्यम आकाराची मूर्ती आणण्यासाठी त्याने तब्बल पाचशे रुपये खर्ची घातल्याचे कळले, तेव्हा, देवा खरं सांगतो, वाईट वाटलं...

असे वाईट वाटण्याचे दिवस आजकाल बरेच येत आहेत. बाप्पा, तुम्ही विघ्नहर्ता ना? मग हे असं का होतं? की आमच्या प्रार्थनेतील आर्तता कमी झालीय... की तुमचा प्रभाव कमी होतोय? लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य आंदोलनातील जनजागरणाचे साधन म्हणून आपल्याला विराट स्वरुपात सादर केले. आम्ही लोकमान्यांना पाहिले नाही आणि स्वातंत्र्यलढाही अनुभवला नाही. आम्ही एका वेगळ्याच लढ्यात अडकलो आहोत. हा लढा आमच्याच अस्तित्वाचा आहे. नाक्यानाक्यांवरील ‘लोकमान्य’ खंडणीला वर्गणी समजतात. रस्ते अडवणे, कर्णकर्कश्श संगीत वाजविणे हा त्यांचा हक्क आणि समाजाची अडवणूक हे कर्तव्य! आम्ही या चक्रव्यूहात अडकलो आहोत.

हा भाग तर खूपच छोटा. आता तू खराखुरा ‘व्हीआयपी’ झाला आहेस. तुझ्या रक्षणासाठी पोलिसांच्या फौजा तैनात असतात! तू खरा विघ्नहर्ता, पण आम्ही तुझी क्षमताही निष्प्रभ बनविली! परवाचीच गोष्ट... दिल्लीत साक्षात हायकोर्टासमोर स्फोट झाला. अजूनही त्याचे धागेदोरे शोधले जात आहेत. पंतप्रधानांनी हा भ्याड हल्ला असल्याचे म्हटले आहे. गृहमंत्री नेहेमीप्रमाणेच या स्फोटात कोणकोणत्या स्फोटकांचा वापर झाला असावा, या विषयी अंदाज वर्तवित आहेत. या हल्ल्याची पूर्वसूचना गुप्तचर खात्याने दिली होती, असा दावाही त्यांनी केला. दरवेळी परदेशातील अतिरेक्यांनाच अशा हल्ल्यांना जबाबदार धरून चालणार नाही, या हल्ल्यामागे देशातच प्रशिक्षित झालेले दहशतवादी असू शकतात, असेही त्यांनी सुचविले आहे. त्यांचे ‘बिटवीन द लाईन्स’ कळण्याएवढे आता लोक जागृत झाले असावेत. जखमींना भेटायला गेलेल्या राहूल गांधींची हुर्‍यो उडवीत लोकांनी त्यांना रुग्णालयापासून परत पाठविले. प्रणव मुखर्जी, कपिल सिब्बल आणि --- यांनी या वेळी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. ही बुद्धी त्यांना आपणच दिली बाप्पा?

या हल्ल्यापाठोपाठ देशात इतरत्र हल्ले चढवण्याचे ई मेल आले आणि संसदेवरील हल्ल्याचा गुन्हेगार अफजल गुरूला सोडण्याची मागणीही अतिरेकी गटांनी केली. आता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हायकोर्टासमोर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. गजानना, तू बुद्धीची देवता ना? मग राज्यकर्त्यांना तू बुद्धी का देत नाहीस? निर्बुद्धपणाचे सारे विक्रम तोडण्याच्या जिद्दीने यांचा राज्यकारभार सध्या चालू आहे. यांचा गृहमंत्री स्फोट घडून गेल्यानंतर त्यात कोणती स्फोटके वापरली असावीत, याचे विश्र्लेषण करतो. यांचा परराष्ट्रमंत्री युनोत जाऊन भलत्याच देशाच्या मंत्र्याचे भाषण वाचू लागतो आणि चूक लक्षात आल्यानंतर त्याचे निर्लज्ज समर्थनही करतो. यांचा भावी पंतप्रधान दहशतवाद आटोक्यात आणणे अशक्य असल्याचे जाहीर विधान करतो. अशा स्थितीत गणराया आम्हाला तुझ्याशिवाय कोण बरे आधार आहे?

बाप्पा तू युद्धकलेतही पारंगत. सार्‍या गुणांचा तुझ्यात समुच्चय. तू राज्यकर्त्यांना बुद्धी देऊ शकत नसशील तर किमान युद्धकला तरी शिकव. पाकिस्तान हा भारताचा शत्रू आहे, हे सत्य त्यांना उमगू दे. पाकिस्तानच नव्हे तर चीन हा भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे, याचे भान त्यांना येऊ दे. हे भान सरकारपेक्षाही कम्युनिस्ट पक्षाला लवकर येऊ दे. वाजपेयी सरकारच्या काळात तत्कालीन परराष्ट्रमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी चीन हा भारतासाठी सर्वात धोकादायक शेजारी असल्याचे विधान केले होते तेव्हा हेच पक्ष त्यांच्यावर चवताळून उठले होते. आता चीनने काश्मीरचे डोके गिळंकृत केले आहे. तिबेट बळकावला आहे. अरुणाचलात तो आत शिरला आहे. तो ब्रह्मपुत्रेचे पाणी रोखतो आहे. सीमेवर शस्त्रास्त्रांची जमवाजमव करतो आहे. भारताच्या हद्दीत घुसतो आहे. तरीही येथील कम्युनिस्टांना तो भारताचा मित्रच वाटतो आहे. देवा, काय करशील?

गणराया, 11 सप्टेंबर 2001 नंतर अमेरिकेवर एकही हल्ला झाला नाही. त्यांनी आपली सुरक्षाव्यवस्था सीमेवरच आवळली. ‘पंछी भी पर नही मार सकता’ हे एकेकाळी मुलायमसिंह यादव यांनी कॉपीराईट करून ठेवलेले विधान आता अमेरिकेने पळविले आहे. व्हायरसेस शरीरात शिरण्याआधीच रोखले तर अँटीबायोटीक्सचे दुष्परिणाम होण्याची शक्यताच मावळते, हे सांगायला कोणाची गरज पडावी? इथे समुद्र किनार्‍यावर महिनाभरात दोन महाकाय जहाजे वाहत येतात आणि कोणत्याही यंत्रणेला त्याचा थांगपत्ता नसतो. उलट, ही जबाबदारी आपली नसल्याचे खुलासे या यंत्रणा करतात. या विषयावर संसदेत चर्चाही होत नाही. गुजरातेत लोकपाल नेमल्याच्या मुद्‌द्यावरून विरोधी पक्ष संसदेचे कामकाज रोखतात पण जहाजांशी कोणाचे देणेघेणे नसते. देशावरील अलिकडचा सर्वात मोठा हल्ला याच मार्गाने घुसखोरी करून झाला, हा इतिहास ताजा असताना सुद्धा हा निष्काळजीपणा हा देश करू शकतो. इतिहासातील चुकांपासून धडा घेत नाही त्या देशाला भविष्यकाळ नसतो, असे एक विधान आम्ही वाचले होते. या देशापुरते तरी हे विधान खोटे ठरो, अशी विनंती आम्ही आपल्याजवळ करतो.

पण देवा, हे सारे काय चालले आहे? नागरिक असुरक्षित आणि अतिरेकी मुक्त आहेत. रामदेवबाबांवर दिल्लीत प्रवेशाची बंदी लादली जाते आणि अतिरेकी बिनधास्त येऊन स्फोट घडवून जातात. अण्णा हजारे यांना गोळ्या घालण्याची खास सरकारी भाषेतील धमकी दिली जाते. ज्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत असे समाजकंटक सरकारच्या नजरेत येत नाहीत. असे का होते देवा? केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकताच आपल्या संपत्तीचा तपशील जाहिर केला. देवा, खूप आश्चर्य वाटले. दरमहा 50 हजार - एक लाखाचे वेतन आणि भत्ते घेणार्‍या नेत्यांच्या मालमत्ता कोट्यवधींच्या आहेत, तरीही अनेकांच्या नावावर घर नाही, वाहन नाही... काय हा लोकशाहीचा चमत्कार! तिकडे आंध्रात जगनमोहन रेड्डींची मालमत्ता वर्षभरात दुप्पट होते. ते गोडीत होते तोपर्यंत सारे काही आलबेल होते. ते विरोधात जाताच त्यांची संपत्ती आक्षेपार्ह ठरली. तिकडे कर्नाटकात दुसरे रेड्डी डबल रोलमध्ये कार्यरत होते. इकडे भाजपाला मदत आणि तिकडे राजशेखर रेड्डी आणि जगनमोहन रेड्डी यांच्या रुपाने कॉंग्रेसला मदत. ही रसद चालू होती तोवर सारे आलबेल पण रसद तोडताच ते खलनायक? हे काय चालले आहे गणपतीबाप्पा?

इकडे अण्णा भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फुंकतात आणि तिकडे या तापलेल्या तव्यावर शेकण्यासाठी भाजपा आपल्या भाकरी थापून तयार राहते? निष्कलंक वैयक्तिच चारित्र्याच्या विषयावर अडवाणींबद्दल नक्कीच आदर वाटतो पण भ्रष्टाचाराने बरबटलेल्या त्यांच्या पक्षातील इतर काही नेत्यांचे काय? अण्णा हजारे यांनी ‘त्यांच्या राज्यांत आधी लोकपाल नेमून दाखवावेत’ या आव्हानाला या पक्षाने अद्यापपर्यंत कोणतेही उत्तर दिलेले नाही. पुढचे सरकार बनविण्याची मनस्वी इच्छा असलेल्या या पक्षाला अद्यापही ही सद्बुद्धी आपण का देत नाही देवा?
देवा, प्रत्येक युगाच्या अंति महाप्रलय येत असतो म्हणतात. सार्‍या व्यवस्था सडल्या, कुजल्या, निकामी झाल्या की देश एका मोठ्या अराजकाकडे वेगाने वाटचाल करू लागतो. आजची या देशाची अवस्था पाहून आम्ही सारे जण एका खूप मोठ्या अराजकाकडे निघालो आहोत, असे तुम्हाला वाटते का? हीच महाप्रलयाची सुरवात आहे का देवा?

खरे तर तुझ्या येण्याने एकेकाळी मोठा आनंद होत असे. मातीत हात घालण्याआधी तेव्हा घरची परवानगी लागत नसे. तुझी सुबक मूर्ती घडविण्याचा विचार फक्त विचारच राहायचा. प्रत्यक्षात बनलेल्या तुझ्या मूर्तीकडे तू स्वतः पाहिले असतेस, तर फक्त सोंड आहे म्हणून ती तुझीच मूर्ती आहे, एवढीच ओळखीची खूण पटली असती. तरीही तू प्रसन्न वाटायचास. आता सर्वोत्तम दर्जाच्या मूर्तीकारांनी तयार केलेली मूर्तीही मनाला प्रसन्न करत नाही. आता तुझ्या येण्याने मनावर दडपण येते. तू येणार म्हटले की आता तुझ्या आधी वर्गणीवाले गुंड येतात. मग कर्कश्श ‘डीजे’वाले गोंधळकर्ते येतात. त्या पाठोपाठ बंदोबस्ताच्या नावाखाली पोलिस येतात. मग आम्ही अतिरेकी येण्याची वाट पाहतो. ते आले नाहीत तर हुश्श म्हणतो आणि बिचार्‍या पोलिसांना सारे श्रेय देऊन मोकळे होतो.

पण आता ही सहनशक्ती कुठपर्यंत टिकवणार देवा? आणि तू ही आजकाल निष्क्रीय होतो आहेस. योग्यता नसलेले लोक राज्यकर्ते आहेत. रक्षण करणार्‍यांच्या हाती दंडुके आहेत आणि भक्षकांच्या हाती अद्ययावत शस्त्रे...! राज्यकर्ते बदलावेत, तर चांगला पर्याय कुठे आहे? असा स्थितीत आता तुझी सरबराई करणे आम्हाला जड जाते आहे बाप्पा... आपण सर्वज्ञ, आपणालाच हे कळायला हवे. आम्ही पुढच्या वर्षी लवकर येण्याच्या घोषणा तर दिल्या, पण तू जरा उशिरानेच आलास आणि लवकर गेलास तर आमची तेवढीच लवकर मुक्तता...! हळू हळू तुझे आगमन लांबवत जा आणि मुक्काम कमी करत जा. खात्रीने सांगतो, काही वर्षातच आम्ही तुला विसरून जाऊ... हे नको असेल तर मग नाही तर एकच कर, सर्वांना सद्सद्विवेकबुद्धी दे. देशाचे हित सर्वोच्च असल्याची जाणीव सर्वांच्या मनात पुन्हा एकदा जागृत कर... ही जबाबदारी आता तुझीच!

दत्ता जोशी
मो. 9225309010

Friday, September 2, 2011

सिंगापूरचे तिसरे अ. भा. 'अदखलपात्र' विश्व मराठी साहित्य संमेलन!


`दैनिक लोकमत` च्या `हेलो औरंगाबाद` मध्ये दर शुक्रवारी प्रकाशित होत असलेल्या 'संस्कृती, साहित्य वगैरे' या स्तंभात 2-9-2011 रोजी प्रकाशित झालेला हा लेख. 
...................................................................................
एका सिंगापूर डॉलरची किंमत साधारण 25 भारतीय रुपये आहे. अर्थात अमेरिकी डॉलरच्या साधारण निम्मी! अशा अर्थाने अमेरिकेच्या निम्म्या वारीचे पुण्य पदरी बांधून मराठी सारस्वतातील काही-शे फुकट फौजदार मागील आठवड्यात केव्हातरी आपापल्या घरी परतले. त्यांच्या घरच्या मंडळींना वगळता इतर कोणालाही त्याची गंधवार्ता नव्हती. स्वारीवर जाताना ‘कुंकुमतीलक’ आणि (झेंडे गाडून) येताना ‘हारतुरे - औक्षण’ ही खरी भारतीय संस्कृती. पण तमाम मराठी साहित्यरसिकांना याचा बहुदा विसर पडला आणि सिंगापुरी ‘झेंडे गाडून’ परतलेल्या साहित्यमार्तंडांना पुसण्यास (दोन्ही अर्थांनी) कोणीही गेले नाही. (आजकाल लोकांना साहित्याची काही तळमळच राहिली नाही, हे खरे!)

सध्या असेच चालू आहे. साहित्यिकांकडे कुणाचे फारसे लक्षच राहिले नाही हो ऽऽऽ! सिंगापुरी भरलेल्या साहित्यमेळ्यात जागतिक दर्जाच्या तब्बल साडेचारशे रसिकांची उपस्थिती होती म्हणे. या विराट उपस्थितीत भरलेल्या ‘विश्र्व’ मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. महेश एलकुंचवार यांनी समारोपप्रसंगी ‘काही रंजक आणि काही वैचारिक ऐवज घेऊन मी परत जातोय’ असे उद्गार काढल्याचे कळले. यावरून हे साहित्य संमेलन ‘काहीसे रंजक’ झाले असावे अशी दाट शक्यता माझ्या मनात येत आहे. एरव्ही रटाळ होणारे संमेलन रंजक होण्यामागे कोणत्या शक्तीचा हात आहे, हे तपासून पाहायला हवे. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाचा मा. कौतिकराव ठालेपाटील यांचा संपन्न वारसा समर्थपणे चालविणार्‍या विद्यमान अध्यक्षा मा. उषा तांबे यांनी ‘रसिकाश्रय आहे तोपर्यंत विश्र्व साहित्य संमेलन घेण्यात येईल’ असे जाहिर केले म्हणे. साहित्याच्या प्रांगणात हे विधानही सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखे आहे. (पण ‘रसिकाश्रय’चा अर्थ काय असावा बरे?) तिसर्‍याच संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी मूळ आयोजकांनी झटकल्यानंतर ऐनवेळी सिंगापूरकरांच्या गळी पडून आयोजित करून घेतले गेलेले हे संमेलन तशा अर्थाने निव्वळ उपचारच ठरले की काय अशी शंका मनात येत असतानाच हे विधान कानावर आल्यामुळे पुढील संमेलनासाठी बहुदा अद्याप कोणी ‘स्पॉन्सरर’ मिळाला नसावा, अशी शक्यता मनात येते आहे. ‘अ.भा.’ साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी झटकण्यासाठी संभाव्य आयोजकांना साठ वर्षे लागली, ‘विश्र्व’ संमेलनाची झटकाझटकी तीनच वर्षात सुरू झाली हे चित्र मोठे प्रासादिक दिसते आहे. 

सर्व अर्थांनी विश्र्व साहित्य संमेलन अदखलपात्र ठरताना दिसते आहे. आयोजकांच्या खर्चाने (मलेशियाच्या साईट सिईंगचा खर्च चक्क ज्याचा त्याचा स्वतःचा! आठवते, की पहिल्या संमेलनाच्या वेळी सर्व आदरणीय साहित्यिकांचा लाखोंचा सर्व खर्च करूनही - ‘त्यांनी व्हिसाचे साडेपाच हजार घेतले हो’ - असा दरिद्री गळा अनेकांनी काढला होता!) साहित्य संमेलनाची ऐश पदरात पाडून घेऊन परतल्यानंतर एकाही साहित्यिकाला तेथे काय घडले हे सांगण्याची गरज वाटली नाही, यातच सारे आले. थोडक्यात, मराठी साहित्याच्या कर्मदारिदऱ्याला आता वैश्विक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, इतकेच! मात्र, पुढच्या वर्षी कोण, हा प्रश्न आता गंभीर बनला आहे. बहुदा स्वतःच्या खर्चाने साहित्यिकांची इच्छा पूर्ण करण्याचा परदेशी मर्‍हाटमोळ्या मंडळींना कंटाळा आला असावा. ‘दुरून साहित्यिक साजरे’चे प्रत्यंतर त्यांना आल्यामुळेच ही टोलवाटोलवी सुरू झाली असावी, असे दिसते आहे. एक गोष्ट मात्र ठळकपणे जाणवते, की तेथून परतलेल्या एकाही साहित्यिकाने तक्रारीचा सूर लावलेला नाही, याचा अर्थ स्वच्छतागृहांची व्यवस्था सिंगापूरकरांनी चोख ठेवलेली असावी! 

संमेलन 13 आणि 14 ऑगस्टला झाले. त्यानंतर दोन तीन दिवसांच्या हवापालटीच्या सहलीनंतर सारस्वतांचे आगमन मुंबईच्या विमानतळावर झाले. (आगमनाचे फोटो मात्र कुठे दिसले नाहीत. पण ते विमानानेच आले असावेत असा माझा ठाम समज आहे. कारण तिकिटे सिंगापूरकरांनी काढलेली होती) आज 2 सप्टेंबर आहे. आजपर्यंत टीव्ही, रेडिओ, पेपर, वेबसाईट, चर्चासत्रे, कार्यक्रम, उपक्रम अशा कुठल्याही माध्यमातून हे संमेलन कसे झाले याची फारशी चर्चा झाली नाही. याचा अर्थ माध्यमांनी, रसिकांनी आणि अखेर साहित्यिकांनीही हे संमेलन ‘अदखलपात्र’ ठरविले की काय अशी शंका माझ्या मनात बर्‍याच दिवसांपासून येते आहे. (एरव्हीही संमेलनाच्या चर्चेपेक्षा त्या निमित्ताने इतरच चर्चा अधिक होतात, ही बाब अलहिदा. )

ता. क. ः आता अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची चर्चा सुरू झाली आहे. उंडणगावचा पत्ता काटण्यात संबंधितांना आधीच यश आले आहे. आता चंद्रपूर किंवा सासवड परिसरात संमेलन घेण्याचे ठरत आहे. स्थाननिश्चितीच्या आधी मराठवाडा साहित्य परिषदेतील वरिष्ठाची एकसदस्यीय समिती गठित करून संबंधित ठिकाणचा दौरा (संभाव्य आयोजकांच्या खर्चाने) आखण्यात यावा आणि तेथे पुरेशी स्वच्छतागृहे - पुरुषांसाठी आणि महिलांसाठी - आहेत की नाही, याची खातरजमा या समितीतर्फे करून त्या नंतरच साहित्य महामंडळाने यजमानपद देण्याचा निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती. 

- दत्ता जोशी
9225309010