Thursday, July 3, 2014

प्रोटीनयुक्त पशुखाद्याचा देशातील पहिला प्लांट जालन्यात आशिष मंत्री यांचा!


मुंबईतील 'आयसीटी' (जुने नाव युडीसीटी) ही एक नामवंत संस्था. इथे प्रवेश मिळणे ही कसोटीची बाब. इथून बाहेर पडणारा केमिकल इंजिनियर काही तरी वेगळे करण्याची उमेद बाळगणारा... जालना येथील आशिष मंत्री त्यापैकीच एक. 
'तुम्ही १० लाखात एक आहात, त्यामुळे १० लाखांची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे', हे आपल्या सरांचे आवाहन आशिष यांनी मनावर घेतले. बालपणापासूनच मनावर झालेले उद्योगाचे संस्कार केमिकल इंजिनियर झाल्यावर प्रत्यक्षात उतरू लागले. सरकीपासून तेल काढण्याची प्रक्रिया जुनीच आहे. पण त्यातूनच उच्च दर्जाचे प्रोटीनयुक्त पशुखाद्य निर्माण करण्याचा प्लांट टाकायचे त्यांनी ठरविले.
हे तंत्रज्ञान भारतात तेव्हा उपलब्ध नव्हते. अमेरिका-जर्मनी ते देण्यास तयार नव्हते. भारतात १९८८ मध्ये असा झालेला प्रयोग अयशस्वी झालेला. यातील केमिकल रीअक्शन इतक्या गुंतागुंतीच्या आणि अत्युच्च तापमानाच्या असतात की स्फोट झाला तर परिसर बेचिराख होण्याची भीती...!
२५ कोटींचा हा प्रकल्प २००८ मध्ये उभा राहू लागला आणि त्यासाठी लागणारी यंत्र सामग्री अमेरिका, जर्मनी, चीन आणि थायलंड मधून आली. २००९ मध्ये 'अभय कोटेक्स' कार्यान्वित झाले. हा देशातील अशा तंत्रज्ञानाचा पहिला प्लांट ठरला. या प्रकल्पाद्वारे त्यांनी ३ प्रोसेस पेटंट आणि १ प्रोडक्ट पेटंट मिळविले आहे.
भारताची सर्की उत्पादनातील क्षमता पहिली, तर त्याच्यावर या पद्धतीने १०० टक्के प्रक्रिया झाली तर आपण १० हजार कोटींचे परकीय चलन वाचवू शकू, असा आशिष यांचा अंदाज आहे. त्यामुळे असेच प्लांट त्यांनी धुळे आणि यवतमाळ येथे उभारले आहेत.
बुद्धिमत्ता, जिद्द, मेहनत आणि प्रतिकूलतेवर मात करून आशिष मंत्री यांनी जालना येथे उभारलेले हे साम्राज्य नक्कीच आशादाई आहे...

दीपक संघवी - आठ वर्षांत ८ कोटीवरून २७५ कोटी!


लोणचे-मसाल्याचा एखादा उद्योग साधारण ७ ते ८ वर्षांत किती पटीने वाढावा ? दुप्पट, तिप्पट, चौपट.. दहा पट...? Nilons या ब्रांडनेम ने बाजारपेठेत असलेला उद्योग ३४ पटींनी वाढला! आठ-सव्वाआठ कोटींची असलेली उलाढाल या काळात थेट २७५ कोटींवर पोहचली. हा उद्योग जळगावचा आणि याचे नेतृत्व करीत आहेत दीपक संघवी...!
वडिलांच्या आकस्मिक निधनामुळे वयाच्या २३ व्या वर्षी उद्योगाची धुरा खांद्यावर येऊन पडल्यानंतर त्यांनी नेटाने पसारा सावरला. मुळात १९४० मध्ये सुरु झालेला हा उद्योग खूप हळू हळू वाढत होता. साधारण ६०-६१ वर्षांच्या प्रवासात, २००१ पर्यंत तो सव्वा आठ कोटींच्या उलाढालीवर पोहचला. 
दीपक संघवी यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर धोरणात्मक बदल केले. बहुराष्ट्रीय कंपनीतील अनुभव असलेल्या राजीव अगरवाल यांची त्यांना साथ मिळाली. दोघांनी आपापले फोकस ठरवून घेतले. २०१३-१४ या आर्थिक वर्षाच्या शेवटी ही उलाढाल २७५ कोटींच्या पुढे गेली...! त्यांच्या धोरणातील पहिले सूत्र होते `Nilons चे हित.
हा brand आज देशभर जातो. 'भारत की आखिरी दुकान` अशी पाटी असलेल्या हिमालयातील दुकानापासून कन्याकुमारीपर्यंत आणि पूर्वांचलातील अखेरच्या टोकापासून गुजरातेतील दुसर्या टोकापर्यंत Nilons ची उत्पादने उपलब्ध आहेत. त्यांनी वितरणाची सारी व्यवस्था बदलून टाकली. आपली उत्पादने प्राधान्याने विकली जावीत या साठी मार्केट रिसर्च केलाच पण कोणती नवी उत्पादने बाजारपेठेत चालू शकतील हे शोधण्यासाठी असंख्य प्रकारे आदमास
 घेतला...! 
हा प्रवास विस्ताराने आणि तपशीलाने समजून घ्यायचा तर 'जळगाव आयकॉन्स' वाचायला हवे...!
http://www.nilons.com/