Thursday, January 11, 2018

अंदमान डायरी - 2

अंदमान भेट म्हणजे माझ्यासाठी, आमच्यासाठी ‘ड्रीम्स कम ट्रू’...! या दौर्या चा जवळजवळ सर्व टूर ऑपरेटर्सचा मार्ग पुण्यातून जातो, पण औरंगाबादेतून दर सोमवारी चेन्नईला जाणारी नगरसोल-चेन्नई एक्स्प्रेस मला सोयीची वाटली. 26 तासांचा प्रवास करून चेन्नईत उतरलो तेव्हा ‘शिवसंघ प्रतिष्ठान’चे सहकारी चेन्नई सेंट्रलवर घेण्यासाठी आलेले. त्यांनी त्यांच्या वाहनातून जवळच्याच हॉटेलात पोहोचवले तेव्हा आमच्या 33 जणांच्या बॅचमधील आम्ही तिघे पहिले ठरलो. इतरांहून एक दिवस आधी गेल्याने पुढचा दिवस विश्रांती घेतली आणि 14 ला सकाळी चेन्नईच्या मीनाबक्कम एअरपोर्टवरून पोर्टब्लेअरकडे उड्डाण केले.
मध्यंतरी बऱ्याच एअरपोर्टवरील गर्दी अनुभवली पण मेट्रो सिटी असूनही इथल्या एअरपोर्टवर मुंबई, दिल्ली, बंगलोरच्या तुलनेत गर्दी कमी वाटली. टूर ग्रुप असल्यामुळे वेळेचा ‘लसावी’ कमीच ठेवला जातो. त्यामुळे चेक-इन तब्बल दोन तास आधीच केले आणि मग उरलेल्या वेळेत एसीतला टाईमपास झाला.
दुपारी पावणेतीनच्या सुमारास पोर्टब्लेअरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर विमानतळावर उतरताना साहजिकच मनःस्थिती भारावलेली होती. आगमन दुपारी उशीरा झाल्याने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमात हॉटेलमधील चेक इन आणि सेल्यूलर जेल मधील ‘लाईट अँड साऊंड शो’ इतकाच कार्यक्रम होता. अंदमान-निकोबार भारताचाच भाग असले तरी ‘टाईम झोन’चा विचार करता हा भूभाग ब्रह्मदेशच्या - म्यानमारच्या खाली येतो. त्यामुळे आपल्याकडे साडेसहाच्या सुमारास मावळणारा सूर्य इथे साडेचार - पावणेपाचलाच क्षितिजाआड गेलेला असतो. त्यामुळे इथल्या पर्यटनाला वेळेच्या मर्यादा असणार, हे निघण्यापूर्वीच लक्षात आलेले होते...!
सेल्यूलर जेलच्या दरवाजातील वटवृक्षाला साक्षीदार व सूत्रधार कल्पून मांडलेला ‘लाईट अँड साऊंड’ शो पहिल्या दिवसाच्या आकर्षणाचे केंद्र होता खरा, पण ओम पुरीच्या खर्जातील आवाजातून मांडला गेलेला इतिहास मनामनांतील पौरूष, क्षात्रवृत्ती जागृत करण्याऐवजी हतबल वार्धक्याची केविलवाणी अनूभूती देणारा वाटला. शब्दांशब्दांतून स्फुल्लिंग चेतविण्याऐवजी पेटत्या निखार्यां वर पाण्याचा शिडकावा करणारा वाटला. आपल्या जहाल कृत्यांनी ब्रिटिशांना जेरीला आणणार्याव स्वातंत्र्यवीरांच्या पराक्रमांची गाथा सांगण्यापेक्षा भाकड अहिंसेच्या पुजार्यांंचेच गुणगाण करणारा वाटला. या संहितेची प्रेरणा स्फूर्तीतून आली की औपचारिकतेतून, हा मला संशोधनाचा विषय वाटतो. हा खेळ नव्याने मांडायला हवा. ही संहिता बदलायला हवी. इथून जाताना प्रेक्षकांच्या मनातील देशभक्ती उचंबळून यावयास हवी... देशासाठी काही करण्याची प्रेरणा जागवायला हवी. ही निव्वळ भूतकाळाची जंत्री नकोय, त्याला उज्ज्वल भवितव्याचा जोड द्यायला हवा...
000
रात्री झोपताना सूचना मिळाली, ‘पहाटे दोनला उठायचे, 3 वाजता चहा मिळेल आणि साडेतीनला बसमध्ये बसायचे.’ स्थानिक वेळेचा पहिला फटका पहिल्याच रात्री! इतक्या पहाटे निघण्याचे कारण? पहिली भेट होती बारतांगला. इथे निसर्गाच्या चमत्कारातून अवतरलेली चुनखडींची लेणी अप्रतिम आहेत. इथे पोहोचायचे तर सुमारे 125 किलोमीटरचा प्रवास बसने करायचा, त्यानंतर 15 मिनिटांचे ट्रोलरचा जलप्रवास आणि त्यानंतर पुढे अर्ध्या तासाचा स्पीडबोटने गाठायचा पल्ला. परतीचा क्रम पुन्हा तसाच...!
शिवाय, हा रस्ता जोरवा या वनवासी भागातून जाणारा. त्यांना त्रास नको म्हणून दिवसातून फक्त 4 वेळा वाहनांना त्या परिसरातून जाण्याची परवानगी. सकाळी 6, 9, दुपारी 12 आणि 3. परतीची परवानगीही तशीच...! हा सगळाच अजब प्रकार. एकीकडे पर्यटनाचा चालना देण्याची भूमिका जाहीर करायची आणि दुसरीकडे हा आडमुठा सरकारी प्रकार. सकाळी 6 च्या बॅचमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी साडेचार-पाचपासून शेकडोच्या संख्येने रांगा लागलेल्या.
पण या गैरसोयीतून गेल्यानंतर पाहता आलेला निसर्गाचा चमत्कार मंत्रमुग्ध करणारा ठरला. काही अतिउत्साही मंडळींनी हात लावून केलेले काही शिल्पांचे नुकसान सोडले तर एका घळीत साकारलेला हा खजिना अप्रतिमच. पण एक गोष्ट जाणवली. या कलाकृतींमागचे विज्ञान समजावून देण्यापेक्षा कुठल्या दगडात हत्ती दिसतोय आणि कुठे गणपती यांचाच तपशील गाईड जास्त सांगत होते! या ठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे अर्धा तास स्पीडबोडमधून प्रवास केल्यानंतर सुमारे सव्वा किलोमीटर जंगलातून चालावे लागते. हा मार्गही छान विकसित केलेला. या बेटांवरील वनसंपदा किती संपन्न आहे याच्या पुढील तीन-चार दिवसांत येणार्याा प्रत्यंतराचीच जणू ही झलक!
000
पुढचा दिवस होता हॅवलॉक बेटांवर जाण्याचा. इथले राधानगर बीच हे देशातील सर्वांगसुंदर समुद्रकिनार्यां पैकी एक. पोर्ट ब्लेअरमधून क्रूझने सुमारे अडीच तासांचा जलप्रवास आणि तेथे उतरून बसने साधारण अर्ध्या तासाची रपेट. हे केले की एका सुंदर समुद्र किनार्या वर आपण पोहोचतो. या दिवशी पहाटे मात्र चार पर्यंत झोपता आले. सव्वा पाचला जेट्टीवर पोहोचून सकाळी साडेआठच्या सुमारास हॅवलॉक बेटांवर पोहोचलो तेव्हा सूर्य चांगलाच वर आलेला होता. आपल्याकडे दहा-साडेदहाला येतो तसा!
बीचवर पोहोचण्याचा रस्ताही डोंगरातून, झाडा-झुडपांतून...
‘मंझिल’इतकाच ‘रास्ता’ही सुंदर! रस्ते मात्र अरुंद. खड्ड्यांनी भरलेले. समोरून रिक्षाही आला तरी दोन्हीपैकी एका वाहनाला रस्ता सोडून खाली उतरावे लागेल, असा. काही टूर ऑपरेटर या ठिकाणी मुक्कामाचीही सोय करतात. तसे झाले तर बीचसाठी जास्त वेळ देता येणे शक्य असते. पण ती सोय ‘हनिमुन कपल’साठी अधिक उपयोगाची...! फार तर सेकंड हनिमुनच्या लाभार्थ्यांसाठीही ते ठीक...!
छान सोनेरी वाळू, शांत पहुडलेला नीतळ पाणपसारा, अर्धचंद्राकार हिरव्याकंच डोंगरांची लाभलेली झालर आणि वाळू-पाण्यात पहुडलेले सुखलोलुप जीव... राधानगरचा हा किनारा खरेच रमणीय. राधानगरचा हा रस्ता शामनगरातून जातो हे ही गमतीचे! राधा-श्यामाची प्रीत फुलावी, असेच इथले रम्य वातावरण. पाण्यात उतरायचे त्यांनी पाण्यात उतरावे, वाळूत पहुडणार्यांलना त्याचे स्वातंत्र्य, किनार्याावर बसायचे तर बाकांची सोय आणि थोडा उंचीवरून नजारा पाहायचा तर लाकडी मनोरे उभारलेले... जो जे वांच्छिल तो ते लाहो...! दोन-तीन तास पाण्यात खेळून आलेला थकवा घालवायचा तर थोडा पोटोबा करावा लागणार. पण काकडीसारखी फळे बाहेरून आणावी लागत असल्याने विक्रेत्यांना त्याची किंमत 40 रुपये ठेवावी लागते... साहजिकच दोन काकडींची भूक मग एकाच काकडीवर भागते!
000
इथे जाता-येतानाचा क्रूझचा प्रवास मात्र रम्य... समुद्राच्या मध्यम लाटा अंगावर खेळवत वेगाने पाणी कापणारी क्रूझ, डेकवर उभे राहून भन्नाट गार वारा अंगावर घेत, अधूनमधून उडणार्यार तुषारांनी किंचित ओलावत... अशा वातावरणात अनुभवण्याची चहा-कॉफीची चव (इच्छुकांसाठी जो जे वांच्छिलची सोय नाही. क्रूझवर मद्यपानास परवानगी नसते!)... सारा माहोल प्रसन्न करणारा. निघताना सूर्योदय बंदरातच होतो पण सूर्यास्त मात्र समुद्रातून पाहता येतो. अंधार पडता पडता आपण पोर्ट ब्लेअरच्या जेट्टीवर पोहोचतो आणि थकले भागले शरीर लवकरात लवकर बिछाना जवळ करू मागते...! (क्रमशः)

No comments: