Thursday, January 11, 2018

अंदमान डायरी - 3

अंदमान -निकोबार आपल्याला नकाशात पाहताना सलग रेषेसारखा वाटत असला तरी प्रत्यक्षात तो सुमारे 700 बेटांचा आणि उत्तर-दक्षिण सुमारे 700 किलोमीटर लांबीचा पट्टा आहे. उत्तरेला म्यानमारमधील रंगून आणि दक्षिणेला इंडेनेशिया-मलेशिया आदी देश या बेटांपासून भारत भूमीच्या तुलनेत खूप जवळ, अगदी काही शे-दीडशे किलोमीटर अंतरावर आहेत. (चेन्नई ते अंदमान हे अंतर सुमारे १७०० किलाेमीटर आहे.)
त्यातील बहुसंख्य बेटे निर्मनुष्य आहेत. काही बेटांवर वनवासींचेच वास्तव्य आहे, तेथे आपल्याला प्रवेश नाही. काही बेटांवर सैन्यदल तैनात आहे. भारतभूमीच्या संरक्षणासाठी अत्यंत मोलाचा असलेला हा टापू या सैनिकांमुळे सुरक्षित आहे. मानवी वस्ती असलेल्या मोजक्या बेटांपैकी काही मोजकीच बेटे या सहलीत आपण प्रत्यक्ष पाहू शकतो. त्यातील आम्ही भेट दिलेली दोन महत्त्वाची बेटे - रॉस आयलंड आणि नॉर्थ बे किंवा कोरल आयलंड.
रॉस आयलंड ही जुलमी ब्रिटिशांची अंदमान-निकोबार बेटांची राजधानी. सेल्यूलर जेलच्या गच्चीत उभे राहिलो तर पुढे रॉस आयलंड स्पष्ट दिसते. या जेमतेम एक चौरस किलोमीटरच्या बेटावर ब्रिटिशांनी आपली राजधानी उभारलेली होती. पोर्ट ब्लेअरमध्ये त्यांनी तुरुंग उभारला, पण या बेटांवरील कारभार हाकण्यासाठी लागणार्याल मुख्यालयासाठी त्यांनी हे सुरक्षित बेट निवडले. साऱ्या कैद्यांनी मिळून बंड पुकारले तर धाेका नकाे, इतकाच त्यांचा उद्देश! जेमतेम 500 ब्रिटिशांच्या वसतीसाठी येथे नगरी उभारण्यात आली. क्लब हाऊस, जलशुद्धिकरण केंद्र, भव्य बॅप्टिस्ट चर्च, सारे काही अतीव सुंदर. पण ते भारतीय कैद्यांच्या रक्त आणि घामातून उभारलेले.
सुनामीच्या तडाख्यात 2004 मध्ये या बेटाची बरीच नासधूस झाली. परवा ‘उखी’नेही तडाखा दिला. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा जमिनीत ओल होती आणि तडाख्याच्या काही खुणा ताज्याच होत्या. ग्रुप एकत्र आला आणि गाईड म्हणून सामोर्याज आल्या अनुराधा राव. नाव, चेहरा पाहिल्यासारखा वाटत होता, तेवढ्यात मला नगरच्या विक्रम एडके यांची एक जुनी पोस्ट आठवली. त्यांनी अनुराधाजींचे व्यक्तिचित्र छानसे शब्दबद्ध केलेले होते. ते वाचल्याचे आठवले आणि मी कान आणि डोळे टवकारले.
अनुराधा या बेटावरच्या रहिवाशी. ही त्यांची चौथी पिढी. आधीच्या तीनही पिढ्या याच बेटावर जन्मल्या, वाढल्या. 2004 च्या सुनामीने त्यांच्या परिवारातील सर्व 27 सदस्य देवाघरी गेले, पण त्या एकट्या वाचल्या. त्यांच्या बचावण्याचे श्रेय पक्ष्यांना आणि प्राण्यांना...! त्या मुक्या जिवांना सुनामीचा अंदाज आधीच आला आणि त्यांनीच अनुराधा यांना सुरक्षित ठिकाणपर्यंत नेले...! इथल्या मोर, हरणं, पक्ष्यांशी त्या छान गप्पा मारतात. त्यांना खाऊ देतात. त्यांच्या हाकेसरशी सगळे पक्षी त्यांच्याकडे झेपावतात. हरणे येऊन लगट करतात आणि मोरांचा केका सुरू होतो. ससे पायात रेंगाळू लागतात...! बेटाच्या रचनेची खडान्खडा माहिती देत असतानाच त्यांच्या या मुक्या जिवांशी गप्पाही सुरू असतात.
एकेकाळी ही प्राणी-पक्षी संपदा खूप कमी झालेली होती. बेटावरील सरकारी माणसे त्यांचा फन्ना उडवीत. अशा स्थितीत त्यांच्या रक्षणाची जबाबदारी या किरकोळ देहयष्टीच्या बाईंनी घेतली. त्या आता पोर्ट ब्लेअरमध्ये राहतात, पण सकाळपासून रात्रीपर्यंत रॉसवर थांबतात. प्राण्यांशी गप्पा मारतात, बुलबुलची काळजी घेतात, मोर - सशांमध्ये रमतात, खारुताईला दूध पाजतात आणि आलेल्या पर्यटकांना बेटाबद्दल, ब्रिटिशांच्या कामकाजाबद्दल, त्यांनी केलेल्या अत्याचारांबद्दल आणि सावरकरांच्या त्यागाबद्दल माहिती देतात. बाई बोलायला तडकफडक, स्पष्टवक्त्या. ज्यांनी तिथल्या सशस्त्र सैनिकांची, सरकारी अधिकार्यांोची पत्रास ठेवली नाही त्यांना बेशिस्तपणा करणाऱ्या पर्यटकांचे काय?
पण त्यांच्या सांगण्यातून या बेटाचा इतिहास जिवंत होतो. ब्रिटिशांनी आपल्या उपकारकर्त्यांवरही कसे अत्याचार केले, अंदमानच्या कैद्यांचा कसा छळ झाला, रॉसवरील प्रत्येक विटेवर या कैद्यांच्या घाम आणि रक्ताचे शिंतोडे कसे उडालेले आहेत, याचे शब्दचित्र अनुराधा राव आपल्या ओघवत्या भाषेत उभे करतात तेव्हा या बेटावरील सौदर्य शापित भासू लागले. ब्रिटिशांनी समुद्राचे पाणी गोड करण्याचा पहिला प्रकल्प इथे सुरू केला, वातानुकूलाची व्यवस्था इथे राबवली, भव्य चर्चची निर्मिती केली, पण त्या सर्वांचा हेतू अय्याशीचा, देखाव्यांचा होता आणि त्याचा पाया भारतीय कैद्यांच्या छळवणुकीचा. हे चित्र विसरणे कठीण.
000
कोरल बेटे अर्थात नॉर्थ बे आयलंड म्हणजे पारदर्शी, नीतळ, स्वच्छ पाणी असलेला समुद्रकिनारा. इथल्या उथळ समुद्रात असलेले प्रवाळ, रंगीबेरंगी मासे, पाण्याखालील जैवविविधता हे महत्त्वाचे आकर्षण. पण नॅशनल जिऑग्राफिकवरील रंगीत विश्व पाहून त्याची तुलना करत इथे पाहण्याचा प्रयत्न केला तर मात्र निराशाच पदरी पडते. 2004 च्या सुनामीत झालेल्या नुकसानींपैकी हे एक अत्यंत मोठे नुकसान. पाण्याखालचे हे रंगीबेरंगी विश्व त्यात बर्यारपैकी उध्वस्त झाले. आता उरले आहेत ते त्याचे अवशेष. त्यामुळे स्कूबा, सीवॉक सारख्या आकर्षणांपोटी केलेली इथली सहल खिसा रिकामा करते पण मन भरून समाधान देत नाही.
समुद्राखालचे विश्व दाखविणारे वेगवेगळे पर्याय इथे उपलब्ध आहेत. नवलाईपोटी आपण ते पाहतो. दिवसाउजेडी, म्हणजे साधारण साडेतीन-चारच्याच सुमाराला पोर्ट ब्लेअरकडे येण्यासाठी निघतो. या जाण्यायेण्याच्या प्रवासात वाटेत आणखी एक छोटेखानी बेट दिसते. भले मोठे लाकडी ओंडके भरलेली काही जहाजे या बेटाच्या आसपास दिसत असतात. चौकशी करतो तेव्हा कळते, ती भारतातील सर्वात मोठी सॉ मिल आहे. नाव - चॅथम सॉ मिल. पोर्ट ब्लेअरच्या बेटांशी आता हा भूभाग पुलाने जोडलेला आहे. पण एकेकाळी हे स्वतंत्र बेट होते. या बेटावर, मिलला भेट देण्यासाठी आम्हाला वेळेअभावी प्रत्यक्षात जाता आले नाही, पण त्या विषयी स्थानिक लोकांकडून माहिती मिळविली. वाचनातून काही माहिती हाती आली.
ही मिल आणि तेथील लाकडी वस्तूंचे प्रदर्शन पाहून अनेक जण भारावतात खरे, पण माझ्यासारख्या रोखठोक माणसाला हे भारावणे फार काळ टिकवता येत नाही. 1883 मध्ये ब्रिटिशांनी सुरु केलेली ही मिल म्हणजे जणू अंदमान-निकोबार बेटांवरील वनसंपत्तीचा कत्तखानाच! स्थानिक कामांची गरज भागविण्यासाठी ही मिल सुरू करण्यात आली असे सांगितले जात असले तरी स्थानिक गरजांच्या पूर्ततेसाठी आशियातील सर्वात मोठी मिल सुरू करण्याचे कारण काय? ब्रिटिशांनी चोहोबाजूने भारताची लूट केली, त्याचाच हा एक भाग होता. या सर्व बेटांवरील वनसंपदेचा बाजार मांडून ब्रिटिशांनी चांगली धनदौलत कमावली. लंडन, न्यूयॉर्कच्या बाजारपेठांमध्ये इथून लाकूड जात असे. त्या काळात इंग्लंडच्या राजपरिवाराने एकवेळ भारताला भेट दिली नाही, पण ते या बेटावर जाऊन आले, हा इतिहास आहे! त्या काळच्या आर्थिक महासत्तेला त्यांचे महत्त्वाचे आर्थिक कळलेले होते, एवढाच याचा अर्थ.
000
अंदमानचा निसर्ग मोठा लहरी. विमानतळावर हजेरी लावणारा पाऊस तुमच्या हॉटेल- रिसोर्ट परिसरात असेलच असे नाही. रॉस बेटांवर झोडपणारा पाऊस कोरल बेटांवर गायब असतो. सूर्य लवकर उगवतो, लवकर मावळतो. रात्री साडेसातनंतर तेथे बऱ्यापैकी सामसूम असते.
आता वाहनांची गर्दी वाढलेली आहे. रस्त्यांची रुंदी मात्र पूर्वीसारखीच कमी राहिलेली आहे. कधी तरी वाहतुक तुंबते. लोक सामोपचाराने मार्ग काढतात. दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करतात, चारचाकी चालक बेल्ट वापरतातच असे नाही. सिगारेट-गुटका-दारुची व्यसने चांगलीच हातपाय पसरून आहेत. पोर्ट ब्लेअरचा बहुतेक भाग स्वच्छ आहे. अजूनही बहुतेक चौकांतील वाहतुक नियोजन पांढरे हातमोजे घातलेला पोलिस करत असतो...!
अंदमानच्या दोन - तीन दिवसांच्या मुक्कामात दिसलेले हे चित्र. चार रात्री तेथे काढल्या. पाचव्या दिवशी सकाळी उठून सेल्यूलर जेलला भेट दिली आणि दुपारी तिथून निघून रात्री उशिरा चेन्नई-पुणे मार्गे पुढे टॅक्सीने औरंगाबादेत पोहोचलो. अंदमानला जाण्यापूर्वी आणि तेथून परतल्यानंतर वेगवेगळ्या भावनांचा कल्लोळ मनात दाटलेला होता. त्यातील एका मनस्वी भावनेला मी परवाच वाट काढून दिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतींनी माझ्यावर झालेला परिणाम शब्दबद्ध केला होता. उद्या अखेरच्या भागात पुन्हा एकदा ‘मन की बात.’
(क्रमशः)

No comments: