Thursday, January 11, 2018

अंदमान डायरी - 1

अंदमान म्हणजे काळे पाणी. स्वातंत्र्यपूर्व काळात देशभक्त भारतीयांसाठी जणू एक दुःस्वप्न बनलेली भूमी. स्वातंत्र्योत्तर काळात दुःस्वप्न तर दूर झाले पण स्वर्गीय सौंदर्य असलेली ही लावण्यभूमी सहजप्राप्य राहिली नाही. 2004 मध्ये तमिळनाडूत निवडणूक कव्हर करण्यासाठी गेलो होतो, तेव्हा रेल्वेत एका सैनिकाची भेट झाली. अंदमानच्या तळावर नियुक्त असलेल्या त्या सैनिकाकडून तिथले प्रत्यक्ष वर्णन ऐकायला मिळाले. तेथे पोहोचण्याचा एक मार्ग कळला. चेन्नईच्या बंदरातून अंदमानला जाण्यासाठी जहाज निघते. त्या जहाजाद्वारे 3 दिवसांच्या प्रवासानंतर तिथे पोहोचता येते, ही मला मिळालेली पहिली प्रत्यक्ष माहिती. त्या वेळी त्या जहाजाचे ‘जनरल’ तिकीट बहुधा 300 रुपये होते. आता ते 700 ते 1000 असल्याचे वेबसाईटरून कळले. पण त्या वेळी तेवढा वेळ हाताशी नव्हता. नंतरच्या काळात रोजच्या आयुष्यातील व्यापातून वेळ काढणे शक्य होत नव्हते.
मला भटकायला आवडते. विद्यार्थी दशेत चळवळीच्या माध्यमातून देशाच्या अनेक भागांत भ्रमंती झाली. पुढे पत्रकारितेत असताना वार्तांकनासाठी फिरस्ती झाली. लग्नानंतर कौटुंबिक सहल म्हणून काही ठिकाणी फिरून आलो. काश्मीर ते कन्याकुमारी, अनेक ठिकाणी अनेक राज्यांत मी स्वतःच नियोजन करून भटकलो. इंटरनेट वेगवान झाल्यानंतर आणि वाहतुक आणि हॉटेलांच्या सुविधा वेबसाईटवर सोप्या झाल्यानंतर ही भटकंती काहिशी सोपी झाली. योगायोग असा की प्रत्येक ठिकाण कुणीतरी मित्र-सुहृद असायचे, त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरायचे. अंदमानसाठी तसाच प्रयत्न मागची 3-4 वर्षे सुरू होता. पण योग जुळून येत नव्हता.
ही सहल इतर सहलींच्या मानाने अधिक वेळ घेणारी, अधिक खर्चिक... वातावरण वेगळे, स्थानिक पर्यटन वैशिष्ट्यांची पुरेशी माहिती हाती नाही, अंतर्गत वाहतुक सुविधांची स्थिती, हाती असलेले पर्याय, त्यासाठीचे नियोजन या विषयी फारसा तपशील हाताशी नाही, अशा स्थितीत अंदमानचा नंबर थोडासा मागे राहिला होता. अन्य ठिकाणी सारे नियोजन स्वतः करण्याची व स्वैरपणे भटकण्याची सवय लागलेली, त्यामुळे कुठल्या ग्रुपसोबत जाण्याचा विचार मनाला पटत नव्हता.
मुळात अंदमान-निकोबारला भेट देण्याचा मुख्य हेतू अर्थातच सेल्यूलर जेलला भेट आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करण्याचा होता. पर्यटन हा त्यात ओघाने येणारा दुय्यम भाग. साधारण 3 वर्षांपूर्वी थोडीशी जुळवाजुळव करून पाहिली. औरंगाबादेतून चेन्नईपर्यंत रेल्वेचा प्रवास आणि तिथून अंदमानचा जहाजाचा. पण या प्रवासातच एका बाजून साधारण 5 दिवस, असे एकूण 9 ते 10 दिवस मोडणार होते. शिवाय तिथल्या वास्तव्याचा काळ वेगळा. दुसरा पर्याय चेन्नईहून विमानाचा होता पण लोकल कॉन्टॅक्ट हाताशी नव्हते...
दिवस जात होते, उत्कंठा वाढत होती. योग जुळून येत नव्हता. मागच्या वर्षी एक मार्ग समोर आला. ‘सावरकर अभिवादन यात्रे’बद्दल काही ठिकाणी वाचले होते आणि त्याचे आयोजक कॅप्टन निलेश गायकवाड यांच्याशी फेसबुकवरून संपर्क झाला होता. त्यांच्याशी एकदा फोनवर बोललो. त्यांनी छान प्रतिसाद दिला. पण पुन्हा एकदा विविध कारणांमुळे दौरा मागे पडला. यंदा जानेवारीत पुण्यात निलेश यांची प्रत्यक्ष भेट झाली. या यात्रेबद्दल, त्यांच्या उपक्रमाबद्दल, हेतूंबद्दल विस्ताराने बोललो. मग वाटले, अपवाद म्हणून एकदा ग्रुपसोबत जाऊन पाहण्यास हरकत नाही. यंदाच्या वर्षातच जाण्याचा संकल्प केला. मुलाची इंजिनिअरिंगची टर्म एक्झाम साधारण कधी येईल ते पाहिले आणि डिसेंबरमध्ये जाण्याचे निश्चित केले. बुकिंग पुरेसे आधी करणे गरजेचे होते, त्यामुळे जुलै-ऑगस्टमध्येच पैसे भरले आणि आम्हा तिघांचे नाव निश्चित केले. एवढे केले आणि हा विषय मी विसरून गेलो. आठवण झाली ती थेट डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात.
अंदमानच्या आमच्या दौऱ्याबद्दल पुढे सांगण्याआधी मला थोडेसे निलेश गायकवाड यांच्याविषयी लिहिले पाहिजे असे वाटते. निलेश आणि प्रमोद गायकवाड हे नाशिक जिल्ह्यातील बंधूद्वय. शिक्षक आईवडिलांची ही मुले बालपणापासूनच सावरकरभक्त. त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेली. सटाणा इथे शालेय शिक्षण पूर्ण करत असतानाच आईवडीलांच्या संस्कारांमुळे त्यांच्या मनात भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारकांविषयी आत्मीयता निर्माण झाली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे तर क्रांतीकारकांचे मुकुटमणीच. त्यांच्याविषयीचा अपार आदर, आत्मीयता या दोघांही बंधूंच्या मनात आहे. या आत्मीयतेतूनच सावरकरांची ओळख समाजापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने निलेश गायकवाड यांनी ‘शिवसंघ प्रतिष्ठान’ची स्थापना केली. त्यातूनच संकल्पना पुढे आली ‘सावरकर साहित्य संमेलना’ची.
सन 2005-06 मध्ये त्यांनी सर्वप्रथम ही संकल्पना मांडली. एक देशभक्त, क्रांतीकारक म्हणून सावरकरांचे नाव जगाला माहिती आहेच, पण एक साहित्यिक म्हणूनही हे नाव प्रभावीपणे पोहोचावे, या दृष्टीने त्यांनी सावरकर साहित्य संमेलनाची संकल्पना मांडली. पहिल्या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी भूषविले आणि या संमेलनाचे आयोजन झाले तेे थेट अंदमानमध्ये...! 2009 या वर्षी...!
‘सावरकर’ हे नाव घेतल्यानंतर जे काही नजरेसमोर उभे राहते त्यात अंदमानची ती काळकोठडी सर्वात आधी येते. याच ठिकाणी सावरकरांच्या साहित्यातील ‘कमला’ या महाकाव्याचे लेखनही झालेले आहे. लेखन कसले? ते भिंतीवर लिहायचे... मुखोद्गत करायचे आणि पुसून टाकून परत लिहायचे. सावरकरांचे आयुष्य आणि त्या आयुष्यातील असे असंख्य प्रसंग एक चमत्कारच आहेत...! या चमत्कारांना नमन करण्याची संधी समस्त सावरकर भक्तांना मिळवून देण्याचा निलेश यांचा हेतू होता.
समाजात चांगल्या गोष्टींना नावे ठेवणार्यांतची कमी नाही. कुणी एखादा पुढाकार घेेऊन काही करीत असेल तर त्याला मदत करण्याऐवजी त्याची टर उडविणारे, तो कसा अपयशी ठरेल या विषयी भाकिते करणारेच अधिक असतात. निलेश यांच्या बाबतीतही असेच झाले. ‘पुण्यात सावरकरांचा कार्यक्रम घेतला तर 15-20 च्या वर लोक येत नाहीत, मग अंदमानला किती येतील?’ हा या मंडळींचा आवडता प्रश्न होता. त्याला उत्तर देण्याच्या फंदात न पडता निलेश यांनी प्रयत्न करण्यास प्रारंभ केला. स्वतः अंदमानला जाऊन आले, तेथील व्यावसायिकांशी चर्चा करून ‘पॅकेज’ ठरविले गेले.
प्रवासासाठी एअर इंडियाशी संपर्क झाला आणि किफायतशीर दरामध्ये अंदमान प्रवासाची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संमेलन जाहीर झाल्यानंतर पहिल्या आठच दिवसांत 500 हून अधिक जणांनी अंदमानसाठी नोंदणी केली. हे संमेलन अपेक्षेहून अधिक यशस्वी ठरले.
एकीकडे हा प्रवास चालू असताना अंदमानच्या संमेलनाला येऊ न शकलेल्या काही जणांचा पाठपुरावा सुरू झाला. त्यात अनेक ज्येष्ठांचाही सहभाग होता. आयुष्यात एकदा तरी ‘त्या’ महामानवाच्या वास्तव्याने पूनित झालेल्या कोठडीला भेट देण्याची आणि त्यासाठी अंदमानला जाण्याची त्या सर्वांची इच्छा होती. ‘शिवसंघ प्रतिष्ठान’ने ज्या बजेटमध्ये ज्या प्रकारची व्यवस्था केलेली होती त्याची माहिती मिळाल्याने तशीच व्यवस्था पुन्हा करता येेईल का, अशी विचारणा होऊ लागली. त्यातून निलेश यांच्या मनात नवी कल्पना सुचली.
पर्यटनाच्या क्षेत्रात काम करणार्या. कंपन्यांचा या टूरचा खर्च बराच जास्त. अशा स्थितीत किफायतशीर दरात सेवेची ही संधी निलेश यांनी पाहिली. त्यांनी परत एकदा अंदमानचा प्रवास केला. तेथे यंत्रणा उभारली आणि मग त्यांनी अंदमान सहलीची उद्घोषणा केली. त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे. ‘एक लाख सावरकर प्रेमींनी अंदमानमध्ये नेण्याचा संकल्प’ त्यांनी केलेला आहे. मागील 6-7 वर्षांत त्यांनी सुमारे 35 हजार जणांना अंदमान वारी करविली आहे.
निलेश सांगतात, ‘‘हा आमचा व्यवसाय नाही. सामाजिक जाणिवेतून आम्ही अंदमान सहलींचे आयोजन करीत आहोत. सर्व खर्च निघतील इतकेच शुल्क आम्ही घेतो. त्यामुळे इतर कुठल्याही टुरिझम कंपनीच्या तुलनेत ‘शिवसंघ प्रतिष्ठान’ आकारत असलेले शुल्क कमी आहे. इतकेच नव्हे, तर कुणी स्वतः तिकिटे बुक करून ही सहल प्लान करीत असेल तर कदाचित त्या पेक्षाही स्वस्तात आमचे पॅकेज मिळते. कारण आम्ही विमान वाहतुकीसाठी करार केलेला आहे आणि निवास व्यवस्थाही आमची आहे. तेथे थेट खर्च जास्त होऊ शकतात...
‘‘संमेलनाच्या निमित्ताने आम्हाला लोकांच्या अपेक्षा कळल्या. आम्ही केलेल्या व्यवस्था त्यांना आवडलेल्या होत्या. पुण्यातील लोकांना आवडले तर इतरांनाही ते नक्कीच आवडले असते...! आम्ही सहली म्हणून गणित मांडण्यास सुरुवात केली. स्थानिक हॉटेलांशी चर्चा करून ‘रेट बार्गेन’ केले, विमान कंपन्यांशी चर्चा केली. आम्ही ज्या संख्येने अंदमानला पर्यटक नेतो तेवढे कुणीही नेत नाही.’’
हा अनुभव मीही प्रत्यक्षात घेतला आहे. स्वतंत्रपणे बुकिंगचा मी मागच्यावर्षी केलेला प्रयत्नच त्याला साक्ष आहे...! हे सारे अनुभव पदरी घेऊन मी अंदमानच्या दौऱ्यासाठी सिद्ध झालो.
(क्रमशः)

No comments: