Thursday, January 11, 2018

अंदमान डायरी - 4

देखावा करायचा म्हणून सांगत नाही, पण मी कुठेही जातो तेव्हा मी तिथला निखळ आनंद घेऊ शकत नाही. मी वर्तमानात रमतो खरा, पण मनाचा कोपरा कुठेतरी भूतकाळात रेंगाळत असतो. काश्मिरात 2012 मध्ये सहकुटुंब गेलो. तिथल्या बर्फाळ दर्‍याखोर्‍यांतून फिरताना, प्राचीन सुरेख मंदिरे पाहताना, अनेक ठिकाणी विखुरलेले अवशेष अनुभवताना मला तिथला प्राचीन भूतकाळ आठवतो, पाकिस्तान्यांनी, इस्लामी अतिरेक्यांनी केलेले काश्मिरी हिंदूंचे शिरकाण अस्वस्थ करते, 1989 मधील काश्मिर आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलो होतो तेव्हा विस्थापितांशी झालेली चर्चा आठवते. डोळे-सुराणा-फडणीस यांच्या समाजवादी विचाराच्या समितीने ‘काश्मिरात आलबेल आहे’चा व्ही. पी. सिंह सरकारला दिलेला अहवाल आठवतो आणि त्यानंतर सहाच महिन्यांत खोर्‍यात सुरू झालेला पाकिस्तान्यांचा, धर्मांधांचा रक्तपात आजही माझा रक्तदाब वाढवतो. आज एवढ्या वर्षांनंतरही काश्मीरची जखम भळभळती आहे. दोष कुणाकुणाला देणार?
गडकिल्ले भटकताना स्वकीयांनी केलेले विश्वासघात आठवतात, परक्यांचे हल्ले अस्वस्थ करतात, अफजुल्ल्याला जिथे धूळ चारली त्या जागेला विशेष संरक्षणात ठेवणे मला इतिहासाशी प्रतारणा वाटते. राजपुतांचे सुंदर किल्ले पाहताना त्यांनी त्यांच्या सुरक्षित स्वातंत्र्याच्या बदल्यात मुगलांच्या जनानखान्यात भरती केलेल्या आपल्या आयाबहिणींची केविलवाणी अवस्था दुःख देते. त्याच वेळी महाराणा प्रतापांची झुंजार वृत्ती आठवते आणि धर्माभिमान, देशभक्ती आणि ताठ कणा असल्यामुळे या राजावरही गवत खाऊन जगण्याची वेळ आली होती, हे वास्तव हृदयात कळ आणणारे ठरते. (देशभक्तांना प्रतिकूलतेत आणि अनुकुलतेतही जर्जर करणारा भारत हा एकमेव देश असावा!) दक्षिणेतली मंदिरे सुंदर राहिलीत खरी, पण तिथल्या जातीप्रथा बेचैन करतात. महाराष्ट्रात आलेले सुधारणांचे वारे तिथे व्यवस्थितपणे पोहोचले नाही, अगदी आजही जातींचे विटाळ तेथे पाळले जातात... त्रास होतो.
अंदमानला जाताना सुद्धा अशाच विविध संमिश्र भावना मनात होत्या. ब्रिटिशांनी गुलामीत ठेवलेल्या या देशातील जहाल क्रांतकारकांना समाजापासून तोडण्यासाठी त्यांनी स्थापन केलेला हा तळ. या भूमीत माझ्या पराक्रमी पूर्वजांचे रक्त, त्यांचा घाम सांडलेला आहे. दुर्दैव असे, की या कामात माझ्याच देशातील काही विशेष देशभक्तांनी त्यांना सहकार्य केलेले आहे. अंदमानच्या भूमीला पाय लावणेही मनाला अपराधीपणाचे वाटते. त्यामुळेच सेल्यूलर जेलमध्ये प्रवेश करताना पहिल्या पायरीला वाकून नमस्कार करण्यात, सावरकरांच्या कोठडीतील भिंतीला आलिंगन देताना मला तिथल्या रोमरोमांंशी तादात्म्य पावल्याचे समाधान मिळते.
सेल्यूलर जेलचे नाव काढताच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव अग्रक्रमाने ओठांवर येते. पण मागच्या काही वर्षांत आणखी एक नाव सुद्धा ओठांवर येते, पण ते घृणास्पद व्यक्तिमत्त्व म्हणून. मणीशंकर अय्यर हे ते नाव. वाजपेयी सरकारच्या काळात पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्या पुढाकारातून येथे क्रांतीज्योत चेतविण्यात आली. तिची उभारणी, देखभाल, सातत्याने होणारा गॅसचा पुरवठा हे सारे पेट्रोलियम मंत्रालय करते. या ज्योतीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चैतन्यमय ओळी अंकित केलेल्या पितळी प्लेट्स लावलेल्या होत्या. 2004 मध्ये मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात पेट्रोलियम मंत्री झालेल्या अय्यर महोदयांनी कारकीर्दीतील पहिला निर्णय घेत सावरकरांच्या त्या ओळी तेथून हटविल्या...! नेहरू परिवाराचा वैयक्तिक दात ज्यांच्यावर होता, स्वातंत्र्यानंतरही ज्यांची ब्रिटिशांनी जप्त केलेली मालमत्ता परत करण्यात आली नाही, जे सदैव उपेक्षेचेच धनी ठरले त्या सावरकरांच्या बद्दल अय्यर यांनी केलेली वर्तणूक अपेक्षितच होती.
सन 2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर नवे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी निर्णय घेतला आणि आधीच्या सारखीच आणखी एक क्रांतीज्योत आधीच्या शेजारीच, पण क्रांतीस्तंभाच्या चौथर्‍याच्या दुसर्‍या बाजूला उभारण्यात आली. पहिल्या ज्योतीवर अन्य प्रेरक व्यक्तिमत्त्वांच्या ओळी कोरण्यात आल्या आणि नव्या ज्योतीवर स्वातंत्र्यवीरांच्या ‘की घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने’चे हिंदी भाषांतर कोरण्यात आले. या ज्योतीचे उद्घाटन प्रधान यांच्या उपस्थितीत भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते 2016 मध्ये झाले. स्वातंत्र्यासाठी घरदार पणाला लावणार्‍या, मुलाबाळांना वार्‍यावर सोडणार्‍या स्वातंत्र्यवीरांच्या बाबतीत एका विशिष्ट परिवारातून व विचारधारेतून होणारा सातत्यपूर्ण, पिढीजात अंधविरोध वेदनादायी असतो... राष्ट्रभावनेतही असा भेदभाव करणारा परिवार निर्वंश झाला, तरच तो काळाचा न्याय म्हणता येईल. असे व्हावे, ही माझी परमेश्र्वर चरणी व्यक्तिगत प्रार्थना.
000
अंदमानच्या या दौर्‍यात खूप काही पाहिले. बरेच काही पाहायचे राहिले सुद्धा. भारताचा अविभाज्य भाग असलेला पण भारतभूमीपासून भर समुद्रात सुमारे 1700 किलोमीटर दूर असलेला हा भूभाग केंद्रशासित प्रदेश आहे. या बेटांवरून एक खासदार लोकसभेत निवडून जातो. सध्या येथून भाजपाचा खासदार निवडून गेलेला आहे. इथे राज्य विधानसभा नाही. केंद्रनियुक्त उपराज्यपाल इथे सर्व कारभार पाहतात. औष्णिक वा आण्विक वीज निर्मिती केंद्रे येथे नाहीत. इथे वीजनिर्मिती डिझेल जनरेटरवर होते आणि ती संपूर्ण बेटाला पुरविली जाते. मागणी वाढलेली आहे पण पुरवठा अपुरा. त्यामुळे लाईट जाण्याचे प्रमाण जास्त. त्यामुळे बहुतेकांनी आपापल्या जनरेटरची सोय केलेली आहे. पेट्रोल-डिझेल मूळ भारतीय भूमीतून समुद्रावाटे जाते. हा वाहतुकीचा खर्च मोठा आहे, तरी इंधनाचे तेथील दरही उर्वरित भारतासारखेच आहेत. भारतीय नागरिक म्हणून इथल्या नागरिकांनाही उर्वरित देशातील नागरिकांच्याच सोयी सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो.
जाण्यापूर्वीच कॅप्टन निलेश यांच्याशी बोलताना त्यांनीच प्रकाशित केलेले एक पुस्तक पाहिले, ती सगळी ठिकाणे पाहता येतील का, असेही विचारले. सारे काही पाहायचे तर कदाचित 8-10 दिवस लागले असते. काही मोजके टूर ऑपरेटर जास्त काळच्या सहलीही नेतात. ‘सावरकर अभिवादन यात्रे’च्या माध्यमातून पाहायला मिळालेल्या अंदमानावर मी समाधानी आहे. तो भाग पाहिला, या निमित्ताने नवे मित्र जोडता आले. यात्रेतील व्यवस्थाही समाधानकारक वाटल्या. बहुतेक टूर ऑपरेटर दुपारचे जेवण ज्याने त्याने आपापल्या खर्चाने करावे, असे सांगतात. कॅप्टन निलेश यांच्या सहलीत, वॉटर स्पोर्टची फी सोडता आम्हाला एकदाही खिशात हात घालण्याची गरज पडली नाही. वेळच्या वेळी मिळालेले रुचकर पदार्थ सहलीची लज्जत वाढविणारे ठरले. चोख आयोजनाबद्दल मला त्या टीमचे अभिनंदन करावेसे वाटते.
या सहलीने देशाचे शेवटचे टोक पाहता आले, अनुभवता आले. माझा हा देश इतका विराट आहे आणि इथे इतके वैविध्य आहे की पर्यटनासाठी परदेशात गेलेच पाहिजे, याची गरज मला वाटतच नाही. आधी आपला देश तर पाहू या. तो पाहून वेळ आणि आयुष्य उरले तर परदेशात जाऊ..! बर्फ, डोंगर, दर्‍या, अरण्य, नद्या, समुद्र, रम्य किनारे... सारे काही इथे आहे. पाहू या.. काय काय पाहता येते ते...!
पाहीन तेव्हा सांगेनच.
(समाप्त)

No comments: