Saturday, October 26, 2013

एका षंढ नागरिकाचे मनोगत...

नमस्कार
औरंगाबाद या थंड शहराचा एक षंढ नागरिक म्हणून आपणाशी संवाद साधताना मला आनंद होत आहे.

या शहरातील एक जागरूक नागरिक श्री. श्रीकांत उमरीकर यांनी शहरातील खड्डयाविरुद्ध आवाज उठविला आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. सध्या ते हर्सूलच्या तुरुंगात आहेत. वास्तविक, ते माझे मित्र आहेत, पण आज मी `माझे मित्र` अशी त्यांची ओळख सांगणार नाही. मी उगाच काही नेत्यांच्या, अधिकाऱ्यांच्या नजरेत येईन, मग मला त्रास होऊ शकेल. मी बालबच्चेवाला आदमी. उमरीकराना सुद्धा बायका-पोरे आहेत, पण मला काय त्याचे? मी सुरक्षित राहिलो पाहिजे. `मी, माझे कुटुंब, माझा टीव्ही, माझे घर सुरक्षित तर देश सुरक्षित`, असा माझा नारा आहे...!

उमरीकराना काय पडले होते? कशाला त्यांनी आंदोलन केले? आम्ही या शहरात राहत नाही का? आम्ही खड्डे सहन करतोच ना? आमच्यातीलसुद्धा काही जणांना मणक्यांचे त्रास झाले, अपघात झाले, घराबाहेर पडण्याची भीती वाटते, पण आम्ही काही म्हणालो का? रस्त्यात खड्डे पडतच असतात. खड्डे नसतील तर रस्ते कसे? रस्ते नसतील तर कामे कशी? कामे नसतील तर कंत्राटे कशी? कंत्राटे नसतील तर पैसा कसा? पैसे नसतील तर राजकारण काय कामाचे? राजकारण नसेल तर अधिकारी काय कामाचे? काहीच नसेल तर महापालिका काय कामाची? तशी आमची महापालिका जागरूक आहे. त्यांनी शहरात ठिकठिकाणी मोट्ठे बोर्ड लावले आहेत. `अमुक ठिकाणापासून तमुक ठिकाणापर्यंतचा रस्ता अमुक तमुक खात्याच्या आखत्यारीत आहे.` एवढे केले की त्यांची जबाबदारी संपली. इतर रस्ते कसेही असोत, ते तसे असावेत हा त्यांचा हक्कच आहे ना...!
आम्ही प्रातःस्मरणीय महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, सदस्य, नगरसेवक, आयुक्त, उपायुक्त, सर्व अधिकारी यांच्याबद्दल पूर्ण आदर बाळगून असे सांगू इच्छितो, की आम्ही उमरीकर यांना पाठींबा देत नाही. त्यामुळे, कृपया आमच्याबद्दल आकस ठेवू नये. सध्या असलेले रस्ते अतिशय उत्तम आहेत. त्याबद्दल आमची तक्रार नाही. आमची कशाबद्दलच तक्रार नाही. रस्त्यांवर पथदिवे नाहीत, त्याबद्दल तक्रार नाही. उड्डाणपुल अंधारात आहे, हे आम्हाला मंजूर आहे. सर्व नाल्या बुजलेल्या अवस्थेत आहेत, या कडे आम्ही दुर्लक्ष करतो. कचरा साठलेला असला, तो उचलला गेला नसला, तरी आमचे काही म्हणणे नाही. पाणीपुरवठा अपुरा होतो, तीन ते चार दिवसाआड होतो हे खरेच, पण तो `होतो` हे काय कमी आहे? समांतर जलवाहिनीचा विषय आम्ही मनातही आणत नाही. कारण त्यासाठी आजवर झालेला खर्च नेमका कुठे जिरला? या बद्दल आम्हाला खरेच काहीही माहिती नाही. रस्त्यात थोडेफार खड्डे आहेत, पण अनेक रस्ते सलग १५ फुटापर्यंत उत्तम अवस्थेत असल्याचे आम्ही अनुभवले आहे. कोणत्याही रस्त्यातील एकही खड्डा २ फुटांपेक्षा खोल नाही, हे आम्ही छातीठोकपणे सांगतो. योगायोगाने, तसे असेल तर त्याकडे दुर्लक्ष्य करावे.
आमची षंढपणाची खात्री आम्ही अनेकदा दिली आहे. क्रांतीचौकातील उड्डाणपूल किती वर्षे रखडला... आम्ही काही म्हणालो? सेवन हिल वरील उड्डाणपुलावरील डांबर पहिल्याच पावसात उखडले, आम्ही काही म्हणालो? त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली अनेक महिने पुलाची एक बाजू अडवून धरली, त्याकाळात आम्ही अपरिमित त्रास सहन केला... पण आम्ही काही म्हणालो? सध्या संग्रामनगर उड्डाणपुलाचा मुद्दा रखडला आहे. रेल्वेचे निर्लज्ज कंत्राटदार आणि बेमुर्वतखोर अधिकारी यांच्याबद्दल आम्ही काही भूमिका घेतली का? अजिबात नाही. त्रास नसेल तर जगण्यात रस काय? खरे आहे ना?
श्री. उमरीकर यांनी असे काही करावयास नको होते. एक जागरूक नागरिक या नात्याने त्यांनी खाजगीत चर्चा केली असती, तरी चालले असते. पण त्यांनी चक्क रास्ता-रोको केला, त्यांना ४००-५०० जणांनी साथ दिली. समृद्ध लोकशाहीच्या सबलीकरणासाठी हे घातक आहे. लोक आवाज उठवीत असतील, त्यातून असंतोष व्यक्त होत असेल, त्याचे लोण शहरभर पसरले, त्यातून जनआंदोलन झाले, तर सर्वांच्याच बुडाखाली दिवाळी आधी फटाके फुटतील, अशा भीतीपोटी आदरणीय लोकप्रतिनिधी वर्गाने पोलिस यंत्रणेला हात जोडून विनंती केली असावी. त्यातून २४ तासानंतर ही अटक झाली असावी. शहरातील भावी अशांतता टाळल्याबद्दल खरे तर सर्वांचे अभिनंदन करावयास हवे. त्यासाठी महापालिकेत ठराव आणायला हवा.
मी सर्व नागरिकांना विनंती करतो, की कुणीही या विषयावर प्रतिक्रिया देऊ नये. उगाच असंतोषाचे कारण ठरू नये. कारण, असे झाले तर तुम्हालाही `हर्सूल-दर्शन` होऊ शकेल. ज्या व्यवस्थेने अण्णा हजारे पचवले, त्यासमोर उमरीकर काय चीज? तुम्ही उगाच एखाददिवस उद्रेक कराल... पण त्याचा उपयोग नाही. षंढानी षंढाप्रमाणे राहावे. उगाच मर्दानगी दाखवू नये, असे माझे सर्व औरंगाबादकराना आवाहन आहे. दाखविली तर काय होते, याचे उदाहरण व्यवस्थेने दाखवून दिले आहे.
आपण विचार करावा. आपण समजदार आहात.धन्यवाद.
या शहरातील षंढ नागरिक
-    दत्ता जोशी, औरंगाबाद

-    ९४२२ २५ २५ ५० 

8 comments:

OCCASSIONS said...

dattaji, agreed .. bhiti vatate he sagla karayala !!

Anonymous said...

Khare aahe datta...Hemant

Nishikant said...

Lets unite be in touch we will do some concrete things on Civic amenities of City

bhartiya Kisan sangh varta said...

दत्ताजी,
तुमच्या शब्दात 'काळ'कुट विष आहे. ते षंढ जनतेला सहज पचेल. त्यासाठी शंकराची काय गरज. कारण असे अन्याय पाहण्याचे त्यांचे तप मोठे आहे. व्यवस्था सुधारायला पाहिजे. पण ती सुधारण्याच्या भानगडीत मी का पडावे? शिवाजी जन्मावा. पण शेजारी. आमच्याकडे नको. हेच सत्य आम्ही शतकानुशतके चिंतितो. म्हणूनच खड्यातून वाट काढणारे बहाद्दर जगात फक्त आम्हीच. तो... श्रीकांत! येडा कुठला! म्हणतो सत्यमेव जयते.

kulmpk said...

Dattaji, tumchya matashi mi purna sahmat aahe...he shahar bewaras, anath jhale aahe ase vatate...kunalach kahi vatat nahi...mulat ya shahratlya rajkarnyana laaj vatach nahi...shrikantne aandolan kele tya divshich ha vishya samjutdarine sampla aasta..parntu tyat rajkaran kele gele...atyant khedane he mhanvase vatate..

Yeshwant Karnik said...

श्री. दत्ताजी,
अप्रतिम ! मीही ८९ वर्षे जगलेला षंढ नागरिक आहे. ही व्यवस्था बदलेल या आशेवर मला वाटते मला आणखी २-३ तरी जन्म घ्यावे लागतील. षंढ म्हणून.
यशवंत कर्णिक.

Anonymous said...

“ मस्त झोपलाय देश, झोप त्याची मोडू नका “
गोळीबार बॉम्ब इथे फोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll

भ्रष्टाचार पसरतोय.. पसरु दे
रुपया घसरतोय.. घसरु दे
अंगावरचे पांघरुण उगाचच ओढू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll

लुटालूट, बलात्कार.. बघूच नका
रांगेमध्ये उभे रहा.. बोलूच नका
नेत्यांचेच पाय धरा बोल त्यांचे खोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll

त्यांचे सारेच चांगले.. बोलत रहा
आपले मत पैशाने.. तोलत रहा
कमरेवरचे सांभाळा ते मात्र सोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll

खायला नसले चालेल.. पुतळे बांधा
नाड्या हरवल्या तर.. सूतळे बांधा
असे हवे तसे नको उगाच चर्चा झोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll

तेच लिहिणार भाग्य.. वाईट काय
पीत रहा दिवस आणि.. नाईट काय
सारेच धुंदीत आहेत ग्लास त्यांचे फोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll

गांधी रस्ता खड्ड्यात.. चालूच नका
देशसेवा बाता आता.. बोलूच नका
मरणाचीच वाट पहा उगाच राष्ट्र जोडू नका
मस्त झोपलाय देश झोप त्याची मोडू नका ll ll....

PradeepAbhyankarJalnawala said...

dattaji kharach aapan shandha zaloy....
"Election mhanje election asat....
lokshahit he ek vilakshakan asat...
gundan madhun eka mahagundach
shandhanni kelel selection asat...."
Pradeep Abhyankar
Jalnekar
Sadhya mumbaikar...