Friday, March 11, 2016

हा रेडियो... माझ्याहून १ वर्षाने मोठा...!





























हा रेडियो... माझ्याहून १ वर्षाने मोठा...!

--------------------------------------------
(© दत्ता जोशी)
--------------------------------------------
परवा हा रेडियो मी दादांकडून मागून घेतला आणि औरंगाबादला आणला. या रेडियोकडे पहिले, तरी लक्षावधी आठवणींचा पट सर्रकन डोळ्यांसमोरून तरळून जातो. या रेडियोचा मी ऋणाईत आहे. दादांनी (माझ्या वडिलांनी) साधारण १९६९-७० च्या दरम्यान हा रेडियो खरेदी केला. माझा जन्म १९७१ चा. त्या नात्याने हा रेडियो माझ्याहून साधारण एका वर्षाने मोठा ! हे मोठेपण या रेडियोने नकळतपणे निभावले.
तेव्हा आम्ही देवणीत रहात असू. त्या काळच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात असलेले कर्नाटकच्या सीमेलगतचे हे छोटेसे खेडे. (आता देवणी हा लातूर जिल्ह्यातील एक तालुका आहे. निजामाच्या काळात सुद्धा तो तालुका होता.) देवणीसारख्या तेव्हाच्या साडेचार-पाच हजार लोकवस्तीच्या अर्ध-कानडी गावात माझ्यावर प्रमाण मराठी भाषेचे जे काही संस्कार झाले, त्यात (या) रेडियोचा वाटा अतिशय मोलाचा असावा, असे मला नेहेमीच वाटते. तेव्हा तर काही कळत नव्हते, पण नकळतपणे कानावर चांगले काही पडत गेले, त्याचा उपयोग नक्कीच झाला असावा.
या रेडियोबद्दलची पहिली आठवण आहे ती क्रिकेटच्या कॉमेंट्रीची...! माझे वडील क्रिकेटचे भलते शौकीन. त्या काळात अनेक सामन्यांच्या नोंदी त्यांच्या डायरीत ते नोंदवत. कुठल्या सामन्यात गावस्करने शतक काढले, त्यात किती चौकार होते, किंवा वेंगसरकर-कपिल यांची कामगिरी काय... सारे काही नोंदविलेले असे. परदेशातील सामन्यांची कॉमेंट्री रात्री-अपरात्री जागून ते ऐकत. एखाद्या दौऱ्यात महाराष्ट्रात मुंबई, पुणे किंवा नागपुरात कसोटी सामने होत. एरव्ही हिंदी आणि इंग्रजीतून असलेली कॉमेंट्री इथे मात्र मराठी आणि इंग्रजीतून ऐकवली जाई. मराठीतून कॉमेंट्री सुरु झाली, की दादा हाक मारत... रेडियो खिडकीत ठेवत, आवाज मोठा करत... बाळ पंडित, वि. वि. करमरकर यांची रसाळ, ओघवती वाणी त्याच काळात कानावर पडली, मनात रुजली.
बालवयातील आकर्षणाचा विषय म्हणजे `बालोद्यान`. दर रविवारी सकाळी ९.३० वाजता `छोट्या मित्रांसाठी कार्यक्रम` असे. काही संस्कारकथा, माहितीपर कार्यक्रम, बालगीते... धमाल असायची. `पुस्तक नंतर वाचा... आता खेळा नाचा...`, `सांग सांग भोलानाथ...`, `पप्पा सांगा कुणाचे... मम्मी सांगा कुणाची`, अशी काही गाणी अजूनही आठवतात. याच गाण्यांना जोडून येऊ लागली - `आपली आवड - श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम...` दर बुधवारी रात्री १० वाजता मुंबई केंद्रावर, रविवारी दुपारी १२ वाजता औरंगाबाद –परभणी (तेव्हा हे एकत्र केंद्र असे) तर साडेबाराला पुणे केंद्राची `आपली आवड` असे. दररोज सकाळी अकरा वाजून ५ मिनिटांनी `कामगार विश्व` असे. त्यातही बहुतेक वेळा गाणी वाजत.
त्या काळात `बिनाका गीत माला` गाजत असे. दर बुधवारी रात्री ८ वाजता आमची दोस्त मंडळी त्यांच्या त्यांच्या सोयीच्या ठिकाणी (तेव्हा घरोघर रेडियो नसत) अमीन सायानी यांचा कार्यक्रम ऐकत आणि `पहले पायदान पे आ रहा है ये गाना...` ची आठवण दुसऱ्या दिवशी सकाळी-दुपारी शाळेत काढत. या बाबतीत मात्र मी कमनशिबी... `हिंदी गाणी कशाला ऐकायची? जुनी मराठी गाणी चांगली. नव्या गाण्यांचा नाद वाईट...` अशी अशी माझ्या वडिलांची प्रामाणिक भावना! त्यामुळे या रेडियोवर कधी बिनाका गीतमाला ऐकल्याचे मला आठवत नाही. पण रात्री ८ च्या मराठी बातम्या आवर्जून ऐकण्याची सवय लागली. कारण त्या वेळी रेडियो लावला जाई. सकाळी सात वाजता `आकाशवाणी पुणे. सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत...` ही उद्घोषणा असो, साडेआठ वाजता किंवा दुपारी दीड अथवा रात्री आठ वाजता `आकाशवाणी... दत्ता कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहेत...` अशी दिल्ली केंद्रावरील उद्घोषणा असो... पुढच्या १० मिनिटात सारे जग आपल्या आवाजातून डोळ्यासमोर उभे करण्याचे कसब त्यांच्यात होते. `ईयम आकाशवाणी... संप्रति वार्ताः श्रुणीयन्ताम... प्रवाचकः बलदेवानंद सागराः...` अशा संस्कृत बातम्याही ऐकायला मिळत. ही नावे आणि त्यांचे आवाज मी आजही ओळखू शकेन..! त्यांच्या स्वरातील चढ-उतार, शब्दांना होणारा भावनांचा स्पर्श... प्रत्येक गोष्ट जिवंत करण्याची त्यांची हातोटी... हे सारे नकळतपणे रुजत गेले. पंडित, करमरकर यांचे धावते समालोचन असो की पुणे-मुंबई-दिल्ली केंद्रावरील मराठी बातम्या, सुयोग्य शब्दांची निवड आणि उच्चारशास्त्राचे संस्कार नकळतपणे मनावर घडत गेले.
असाच संस्कार `नभोनाट्य` या प्रकाराने दिला. विविध प्रसिद्ध किंवा अप्रसिद्ध नाटके रेडियोवर प्रसारित होत. निव्वळ संवादाच्या फेकीतून ते दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभे राहत असे. दिवाळीत पहाटे कीर्तन असे. त्याच काळात सकाळच्या वेळी विविध कार्यक्रमांची मेजवानी असे. आकाशवाणी पुणे केंद्रावर `प्रभात किरणे` नावाचा सुंदर कार्यक्रम असे. `माहिती, मनोरंजक घटना आणि संगीत यावर आधारित` या कार्यक्रमात अनेक छान किस्से असत आणि त्याला अनुसरून गाणीही. विषयांचे लिंकिंग कसे करायचे, याचा हा उत्तम धडा असे. `श्रुतीकां`च्या नर्मविनोदी कार्यक्रमातून वर्तमान घडामोडींवर केलेले भाष्य रंजक असे. हा सारा माझ्या मनाच्या जडण घडणीचा काळ होता.
पुढे, थोडा मोठा झाल्यावर थोडे अधिक स्वातंत्र्य मिळाले. वेगवेगळी स्टेशन्स ट्राय करता येऊ लागली. संध्याकाळी `युववाणी` तर ऐकतच असे पण सहा वाजता हुबळी-धारवाड केंद्रावर लागणारी मराठी गाणी, दुपारी जळगाव केंद्रावर दोनच्या सुमाराला लागणारी हिंदी गाणी, औरंगाबाद-परभणी केंद्रावरील `एकही फिल्मके गीत`, `विविध भारती`वरील जयमाला, `फौजी भाईयोंके लिये विशेष जयमाला`... एक ना दोन... अनेक कार्यक्रम सापडले. रात्री कुठल्या तरी स्टेशनवर `लहर लहर संगीत` नावाचा अंताक्षरी प्रकारचा कार्यक्रम तर खूपच आवडायचा. भारतातील प्रसारण रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी संपत असे, पण रात्री २ पर्यंत जगभरातील विविध ठिकाणची स्टेशन शोधून गाणी ऐकण्यातील मजा और होती.
अंतराळातून आपला देश कसा दिसतो, या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रश्नाला पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांनी दिलेले उत्तर - `सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा` याच रेडिओने ऐकवले. साधारण १९८० च्या दरम्यान प्रचंड गाजलेल्या sky lab च्या कोसळण्याचे update याच रेडिओतून ऐकायला मिळाले. कपिलने विश्वचषक जिंकला तेव्हा दादा कॉमेंट्री ऐकत होते, मी मात्र झोपलो होतो. सकाळी उठल्यावर मला ते शुभवर्तमान कळले! ऑपरेशन ब्लू स्टारच्या काळातील अस्वस्थ पंजाबचे दर्शन रेडीयोतूनच होत असे... इंदिरा गांधी यांच्या अन्त्ययात्रेचे प्रत्यक्ष वर्णनही याच रेडियोने ऐकवले. अशा प्रसंगाचीही `कॉमेंट्री` असते, हे त्या निमित्ताने प्रथमच कळले...! अमिताभ चित्रिकरणादरम्यान जखमी झाला, हे मी त्या दिवशी सकाळी ११ च्या बातम्यात ऐकले... अशा असंख्य आठवणी आहेत.
हा रेडीयो `फिलिप्स`चा आहे. अजूनही चालू आहे. त्याला ५ सेल लागतात. किंवा ७.५ व्होल्ट डीसी करंट दिला की तो चालतो. त्यासाठी एलीमिनेटर लागते. ते नसल्याने सध्या तो बंद आहे. मिडीयम वेव्हचा १ आणि short वेव्हचे ३ band आहेत. त्या बटनाच्या वरच्या बाजूला काळ्या रंगाचे एक पुश बटन आहे. ते दाबले की फ्रिक्वेन्सीचे आकडे असलेल्या पट्टीच्या आत लाईट लागतो. रात्रीच्या अंधारातही हवे ते स्टेशन अचूकपणे लावायला हे बटन उपयोगात येत असे. वर स्टीलची चौकट दिसते, ते त्याचे एरियल आहे. ते फोल्ड होऊन पाठीमागे बसते. short वेव्हचे स्टेशन लावायचे तर ते वर करावे लागते...! याला `फाईन ट्यून`ची सुद्धा कळ आहे. ती फिरवून आवाजातील खरखर कमी करता येत असे.
या रेडियोवर मी बरेच प्रयोग केले. वर्ग पाचवी ते आठवी या काळात मी हा रेडियो अनेकदा उकलला. बटणे काढून बघ, बाहेरून स्पीकर लावून बघ, एलीमिनेटर उघडून काहीतरी खटाटोप कर... आणि साहजिकच बिघाड झाला की बेदम मार खा...! पण कितीही मार बसला तरी असले उद्योग काही सुटले नाहीत...!
लातूरहून हा रेडियो आता मी औरंगाबादला आणला आहे. माझ्या बालवयातील असंख्य आठवणी त्याच्याशी जोडलेल्या आहेत. तो एक nostelgiaच आहे. रेडियोवर एखादी खूण दिसते आणि मग त्यामागची गोष्ट आठवू लागते... मन भूतकाळात विहरू लागते... आपोआपच डोळे चमकू लागतात... ओठावर स्मित येते... मनात हसू दाटू लागते... सगळीच गम्मत वाटते...
मग एक प्रश्न पडतो.... असे जुने जुने आठवू लागले याचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजे आपण आता प्रौढत्वाच्याही बरेच पुढे सरकलो की काय? smile emoticon

No comments: