Monday, June 25, 2012

सेंद्रीय शेतीकडे चला...


अभिनेता अमीर खान यांच्या ‘सत्यमेव जयते’च्या 24 जून 2012 च्या भागात सेंद्रीय शेतीविषयी प्रभावी जनजागृती करण्यात आली. हा खरोखरच अतिशय जिव्हाळ्याचा विषय. यावर ठिकठिकाणी उत्तम प्रयोग सुरू आहेत. दुर्दैवाने या प्रयोगांना अद्यापही राजमान्यता मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचेही त्याकडे दुर्लक्ष होते.
माझ्या ‘आयकॉन्स’ सिरीजमध्ये अशी माणसे शोधण्याचा माझा प्रयत्न आहे. 1 एप्रिल 2012 रोजी प्रकाशित झालेल्या ‘लातूर आयकॉन्स’मध्ये निष्ठावंत शेतकरी संदीपान बडगिरे यांच्या प्रयोगांचा वेध मी घेतला. हा लेख आपणा सर्वांसाठी...

------------------------------------------------------------------------------
‘‘गोमुत्र ही शेतकर्‍यांसाठी आणि समाजासाठीही खूप तारक गोष्ट आहे. माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आम्ही ‘गोशक्ती’ बनवितो आणि पिकांतील रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आणि कीटकांचा नाश करण्यासाठी ‘गोबाण’. यासाठी आम्ही गोमुत्र जमिनीवर पडण्याआधीच संकलित करतो. त्यावर विविध प्रक्रिया करतो. यासाठी फक्त सेंद्रीय पदार्थांचाच वापर होतो. साधारण 21 दिवसांच्या मेहनतीनंतर ‘गोबाण’ तयार होतो. हा पिकांसाठी रामबाण उपाय आहे, असे मी स्वानुभवाने सांगतो. आम्ही हे प्रॉडक्ट विक्रीसाठी बाजारात आणले. पण शेतकर्‍यांना फवारणी केल्याबरोबर अळी मरायला हवी असते. सेंद्रीय पद्धतीत ते अपेक्षित नसते. सेंद्रीय खतांतून आणि कीटकनाशकांमधून पिकांना हवी ती जीवनमूल्येही मिळतात आणि कीटक - अळ्यांना हे पदार्थ वेगळ्या प्रक्रियेने नष्ट करतात. आधी किटकांना भोवळ येते. त्यांच्यातील प्रजननक्षमता नष्ट होते. त्यानंतर त्यांची अन्नावरील वासना उडते आणि ते पिकांतील द्रव्ये खाणे बंद करतात. साधारण तीन ते चार दिवसांत ते मरून पडतात. इतकी वाट पाहण्याची अनेकांची इच्छा नसते. मग ते रासायनिक कीटकनाशकांच्या मागे लागतात. दहा वर्षांपुर्वी वापरली जाणारी कीटकनाशके आता चालत नाहीत. कारण ते पचविण्याची कीटकांची क्षमता वाढली आहे. त्याच्या अनेक पटीने क्षमता असलेली कीटकनाशके वापरावी लागतात. त्यामुळे जमिनीतील ‘मायक्रोऑरगॅनिझम’ नष्ट होतो आहे. माणसांवरही त्याचे दुष्परिणाम होत आहेत. पण हे लोकांना कळत नाही आणि सरकारला त्या बाबतीत काहीच करायचे नाही. त्यांना शेतकर्‍यांना अज्ञानातच ठेवायचे आहे... ही सारी देशाचा विनाश घडविणारी चिन्हे आहेत...’’ संदिपान बडगिरे मनस्वीपणे बोलत होते. त्यांच्या शब्दाशब्दांतून तळमळ व्यक्त होती. एकेकाळी ‘युक्रांद’च्या झेंड्याखाली झुंज देत आणीबाणीतील तुरुंगवास हसतहसत भोगणार्‍या बडगिरे यांनी आता स्वबळावर सेंद्रीय शेतीचे प्रयोग हाती घेतले आहेत. 1993 पासून ते या मध्ये मग्न आहेत. आपले अनुभव सर्वांना वाटण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.

लातूरहून बाभळगावकडे निघालो की बाभळगाव गावात शिरण्याआधीच डाव्या हाताला सोनवतीला जाणारा रस्ता लागतो. सोनवती गावातून डावीकडे वळले की साधारण एक किलोमीटर अंतरावर बडगिरे यांचा अकुजा सेंद्रीय फार्म लागतो. वयाची साठी ओलांडलेले पण पन्नाशीचे दिसणारे संदिपान बडगिरे तेथे असतात. त्यांच्या शब्दांब्दांतून त्यांचे कार्यकर्तेपण डोकावत असते. फक्त फरक एवढाच असतो, की या ‘कार्यकर्ते’पणाला ‘कार्या’ची जोड मिळालेली असते. हवेतील गप्पागोष्टी बडगिरेंना मान्यच नाहीत!

संदिपान निवृत्ती बडगिरे मूळचे सोनवतीचेच. 3 मे 1952 ही त्यांची जन्मतारीख. चौथीपर्यंतचे शिक्षण याच गावात झाल्यानंतर पाचवीपासून पुढे शिकण्यासाठी ते लातूरमध्ये दाखल झाले. त्या वेळच्या ‘पीयूसी’नंतर त्यांनी जून 1975 मध्ये बी. ए.च्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला. जुलै 1975 मध्ये आणीबाणी लागू झाली आणि त्यांची रवानगी तुरुंगात! 1977च्या जानेवारीत ते तुरुंगातून सुटले आणि शिक्षणाला रामराम ठोकून ते ‘युवक क्रांती दला’चे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून बाहेर पडले. 1986 पर्यंत त्यांनी स्वतःला याच कार्यात झोकून दिले. पुढे आयुष्याच्या एका वळणावर ते आपल्या गावी परतले आणि शेती करण्यास सुरवात केली. पहिली पाच-सहा वर्षे रासायनिक शेतीचे मार्ग चाचपडल्यानंतर 1993 पासून त्यांनी सेंद्रीय शेतीच्या प्रयोगांना सुरवात केली. त्यांच्या आजोबांची शंभर एकर जमीन होती. पुढील दोन पिढ्यांमध्ये विभागणी होत आता संदिपानजींच्या वाट्याला 12 एकरांची जमीन आली आहे. 1993 पासून ही जमीन ते स्वतः कसतात. त्यांच्या शेतीत 100 टक्के सेंद्रीय खत व कीटकनाशकांचाच उपयोग होतो. कोणतेही रासायनिक घटक येथे वापरले जात नाहीत.

या विषयाची सुरवात 1993 मध्ये झाली. लौकीक शिक्षण बी. ए.च्या पहिल्या वर्षात थांबले असले तरी जीवनाच्या शिक्षणात त्यांनी उच्चशिक्षण प्राप्त केले होते. त्यांच्या कार्याला चिंतनाची, वाचनाची जोड होती. यातूनच शेतीतील पारंपरिक मार्गांची ओळख त्यांना झाली. भारतीय परंपरेत गोधन हे शेतीतील महत्वाचे साधन आहे. गोमुत्र पवित्र मानले जाते खरे, पण या पावित्र्याचा झापडबंद अर्थ न घेता त्यांनी त्यातील सारतत्व शोधण्याचा प्रयत्न केला आणि डोळसपणे त्याचे पावित्र्य तपासले. त्यातील पिकांना आणि माणसांना उपयुक्त असलेले गुणधर्म लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यावर शास्त्रीय प्रयोग केले आणि त्यातून माणसांसाठी आणि पिकांसाठी उपयुक्त ठरणारे ‘गोशक्ती’ आणि ‘गोबाण’ यांची निर्मिती त्यांनी सुरू केली.

ते म्हणतात, ‘‘गावरान गायींच्या मुत्रात नायट्रोजन, सल्फर, अमोनिया, कॉपर, आयर्न, युरिक ऍसिड, फॉस्फेट, सोडियम असे विविध मौल्यवान घटक आहेत. अशा परिपूर्ण घटकांचा समावेश असलेल्या गोमुत्रावर विविध आयुर्वेदिक प्रक्रिया करून आम्ही गोशक्ती बनवितो. माणसांचे शरीर रोगमुक्त राहण्यासाठी याचा उत्तम उपयोग होतो. ‘गोबाण’मध्ये याच गोमुत्रावर काही वेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. त्यात आणखी काही वनस्पतींचा अर्क मिसळला जातो. साधारण 21 दिवसांच्या प्रक्रियेनंतर ‘गोबाण’ विक्रीसाठी तयार होतो.’’
केवळ ही निर्मिती करून ते शांत बसले नाहीत. हा त्यांच्या कार्याचा एक छोटासा भाग आहे. त्यांनी हाती घेतलेले मुख्य कार्य आहे ते सेंद्रीय शेतीच्या व्यापक प्रचाराचे. या साठी त्यांनी अनेक पुस्तिका लिहिल्या आहेत. पत्रके काढली आहेत. अनेक ठिकाणी जाऊन व्याख्याने दिली आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या स्वतःच्या 12 एकर शेतात ते स्वतः याच पद्धतीने शेती कसत आहेत. समर्थ रामदासांनी सांगितलेल्या ‘मूर्ख लक्षणां’मध्ये ’स्वतः न कसे, दुसर्‍यास कसाया न देई, शेती पाडून ठेवी, तो एक मूर्ख’ असे वर्णन आहे. तो आधार घेत ते शेतकर्‍यांची आगळी चळवळ उभी करण्याच्या प्रयत्नात आहेत.

त्यांच्या मते सरकार प्रोत्साहन देत असलेली ‘व्यापारी शेती’ शेतकर्‍यांसाठी आणि देशासाठीही घातक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश पार्लमेंटमध्ये लॉर्ड मेकॉलेने 2 फेब्रुवारी 1835 रोजी केलेल्या भाषणात म्हटले होते, ‘‘भारत हा देश इतका समृद्ध आहे, तिथली नैतिक मूल्ये इतकी उच्च आहेत आणि लोक इतके सक्षम योग्यतेचे आहेत की आपण हा देश कधी जिंकू शकू असे मला वाटत नाही. या देशाची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा हा या देशाचा कणा आहे. आणि आपल्याला हा देश जिंकायचा असेल, तर तोच कणा मोडायला हवा. त्यासाठी त्यांची प्राचीन श्रमाधारित शिक्षणपद्धती आणि त्यांची संस्कृती बदलावी लागेल.’’ पुढचा इतिहास आपल्याला ठावूकच आहे. ब्रिटिशांनी शिक्षण आणि श्रमाची फारकत केली. ब्रिटिशांचे आदेश पाळणार्‍या गुलामांच्या फौजा त्यांनी निर्माण केल्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही यात बदल झाला नाही. आता या फौजा सरकारचे ऐकतात. सरकारला हे चित्र बदलण्याची इच्छा नाही. पण हेच चित्र कायम राहिले तर हा देश नष्ट होईल, असे संदीपानजी सांगतात. या साठी सर्वात आधी शेतकरी शहाणा झाला पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे आणि सरकार शेतकर्‍याला शहाणा होऊच देत नाही, असा त्यांचा आरोप आहे. यावर उत्तर म्हणून ते स्वतःच ‘सेंद्रीय शेती जनआंदोलन’ चालवीत आहेत. साध्या जीवनपद्धतीचा स्वीकार, श्रमसंस्कृतीची जोपासना, व्यापारी व रासायनिक शेतीपद्धतीचा त्याग आणि शेतकर्‍यांचे संघटन या चतुःसुत्रीवर त्यांचे काम चालू आहे.

ते म्हणतात, ‘‘निसर्गालाच एक पीक पद्धत मान्य नाही. एकाच शेतात मिश्रपद्धतीने एकदल- द्विदल प्रकारची अनेक पिके आपण घेतली तर जमिनीतील अन्नघटक आणि ओलावा घेण्याची पिकांत स्पर्धा होत नाही. ही पिके कमी-जास्त उंचीची असल्याने आणि वेगवेगळ्या काळात वाढत असल्याने त्यांना सूर्यप्रकाशही भरपूर मिळतो. जमिनीवर सेंद्रीय पदार्थही भरपूर पडतात. त्यामुळे त्यावर जगणारे जिवाणूही योग्य प्रमाणात वाढतात. जमीनीवर सेंद्रीय पदार्थांचे अच्छादन निर्माण झाल्याने पावसाच्या पाण्याची ओल उडून जात नाही आणि वाफसाही लवकर येतो. त्यामुळे पिकांबरोबरच जमिनीचा पोतही सुधारतो.’’

या संदर्भात ते एक मॉडेलही शेतकर्‍यांसमोर ठेवू इच्छितात. ‘‘तीन फणांच्या औजाराने दक्षिण-उत्तर पेरणी करणार असाल, तर उत्तरेकडे पेरत जाताना बाजूच्या दोन नळ्याने तूर पेरून मधल्या नळ्याने हिरवळीचे पीक (ताग, धेंचा, बाजरी इ. द्विदल बियाणे) 1:2 या प्रमाणात मिसळून पेरावे आणि परत दक्षिणेकडे पेरत जाताना बाजूच्या दोन नळ्यांनी मूग पेरावे आणि मधल्या नळीने पिवळी ज्वारी किंवा आपल्या परिसरातील कोणतीही गावरान ज्वारी पेरावी. या पद्धतीने शेतात आपण दर 20 फुटांवर मुगाच्या ठिकाणी बदल करून उडीद, तीळ व सोयाबीन पेरू शकतो. या पद्धतीने एका शेतात आपण सात-आठ पिके पेरू शकतो. या पद्धतीत हिरवळीच्या लाईनमधील पिकाच्या दीड महिन्यांच्या अंतराने दोन छाटण्या करून तुरीच्या ओळीच्या शेजारी टाकल्याने जमिनीला सेंद्रीय पदार्थ मिळतात व त्यावर जिवाणू वाढतात. तसेच हिरवळीच्या (द्विदल) पिकाच्या व तूर, मूग, उडीद, सोयाबीन पिकांच्या मुळ्यावरील नत्राच्या गाठींमुळे जमिनीतील सेंद्रीय नत्राचे प्रमाण वाढते. तूर व पिवळा उंच वाढण्यापुर्वी मूग, तीळ, उडीद व सोयाबीन निघून जाते. तूर वाढण्यापुर्वी पिवळी ज्वारी निघून जाते आणि तुरीच्या वाढीला जागा मोकळी होते. पिवळ्या ज्वारीच्या मुळ्या जमीनीच्या वरच्या थरात वाढत जात असल्याने त्या मूग, उडीद व तीळ यांच्याशी स्पर्धा करीत नाहीत. तुरीच्या मुळ्या या सर्वांपेक्षा खोल जात असल्याने सर्वच पिकांची जोमदार वाढ होते. ही बहुविध पीक पद्धत असल्याने कोणत्याही पिकावरील अळीला सक्रीय होऊन वाढण्यात अडथळा येतो. ही पीकपद्धत दरवर्षी वेगळ्या जमिनीत घेतल्याने अळीची अंडी मातीत सुप्त अवस्थेत जास्त दिवस राहात नाहीत. या पद्धतीत रासायनिक फवारणी अजिबात केली जात नसल्याने सर्व मित्र किडी, पक्षी सुरक्षित राहतात. त्यामुळे या पद्धतीत पीक कोणत्याही रोगाला बळी पडत नाही. अशा पद्धतीने एकदल-द्विदल पिकांच्या अनेक जोड्या लावून खरीप व रब्बी हंगामात शेतकर्‍यांना कोणतीही पिके पेरता येतील. या पद्धतीतून कोरडवाहू आणि बागायत जमिनीतून कमी पाण्यात, मातीचा पोत वाढवत हमखास उत्पन्न तर मिळेलच पण त्याच बरोबर कुटुंबाला लागेल ते सर्व प्रकारचे धान्य व भाज्या विषमुक्त, सकस, चवदार व टिकावू मिळतील तसेच जनावरांसाठी वैरणही मिळेल आणि हळूहळू उत्पादनखर्च शून्यावर येईल.’’

स्वबळावर हे सारे उपक्रम करणार्‍या संदिपानजींचा विविध चळवळींवरील विश्र्वास आता कमी झाला आहे. आपला विचार त्यांनी विविध व्यासपीठांवरून मांडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना तेथे यश मिळाले नाही. म्हणून त्यांनी आता आपला मार्ग स्वतःच बनविण्याचा निर्धार केला आहे. वयाच्या साठीमध्ये हा ‘युवक’ पुन्हा एकदा ‘क्रांती’ची हाक देत शेतकर्‍यांच्या ‘दला’च्या पुनर्स्थापनेची ललकारी घुमवीत आहे. या चळवळीत त्यांच्या पाठीशी आहे गांधीजींचे तत्वज्ञान...!
ंं
संदिपान बडगिरे
अकुजा सेंद्रीय फार्म, सोनवती, ता. जि. लातूर

Saturday, April 21, 2012

‘निर्लेप’ यशकथा...


मराठवाड्यातील पहिला उद्योग ‘उमासन्स’... ही आजच्या ‘निर्लेप’ची मूळ संस्था. नानासाहेब भोगले यांनी रोवलेली मराठवाड्यातील उद्योगाची मुहुर्तमेढ आता ‘पन्नाशी’त पोहोचली आहे. या पहिल्या पावलाविषयी विस्ताराने... हा लेख दैनिक दिव्य मराठी ने दि. २१ एप्रिल २०१२ रोजी त्यांच्या 'उद्योग भरारी' या पुरवणीच्या मुख्य पृष्ठावर प्रकाशित केला...
माझ्या २००६ मध्ये प्रकाशित  'झेप' या पहिल्या पिढीतील उद्योजकांचा परिचय करून देणाऱ्या  उद्योजकीय पुस्तकात हा लेख प्रथम प्रकाशित झाला होता.
...........................................................................................

मुंबईत 1955 च्या दरम्यान एका व्यवसायाने चांगलेच मूळ धरले होते. हा व्यवसाय होता वैद्यकीय व्यवसायाला लागणार्‍या विविध उपकरणे व वस्तूंच्या पुरवठ्याचा. ही सारी उपकरणे तोवर आयात करावी लागत. आयातीऐवजी ही उपकरणे भारतातच बनविली तर चांगला फायदा होऊ शकेल, असे त्यांच्या लक्षात आले. त्या दृष्टीने चाचपणी सुरू झाली आणि ‘एक्स रे फिल्म प्रोसेसिंग’ व ‘स्टर्लायझर’ हे तोडगे त्यावर निघाले. मुंबईत रे रोडवर सुरू झालेल्या या कामाचा विस्तार वेगाने झाला. मागणी-पुरवठ्याचे गणित सांभाळण्यासाठी कामाचा विस्तार करणे आवश्यक होते आणि हा विस्तार सामावून घेण्यासाठी लागणारी जागा मुंबईत मिळणे खूप कठीण जाऊ लागले, तसा या उद्योगाच्या प्रमुखांनी मुंबईबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि ते थेट औरंगाबादेत पोचले. औरंगाबादच्या औरंगपुरा परिसरात 35 बाय 25 फुटांच्या शेडमध्ये त्यांनी आपले युनिट थाटले. 12 जानेवारी 1962 रोजी ‘उमासन्स इक्विपमेंट्‌स अँड ऍक्सेसरीज्‌’ या उद्योगाचा शुभारंभ झाला आणि हा उद्योग आणणारी व्यक्ती होती नीलकंठ गोपाळ भोगले ऊर्फ नानासाहेब भोगले. औरंगाबाद शहराच्या आणि पर्यायाने मराठवाडा विभागाच्या औद्योगिकीकरणाच्या वाटचालीतील हे पहिले पाऊल ठरले. हीच ‘निर्लेप’ उद्योगसमूहाची सुरवात होती आणि मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाचीही !

नानासाहेब मुंबईतून औरंगाबादेत आले असले, तरी त्यांना मराठवाड्याची पार्श्वभूमी होतीच. त्यांचे आजोबा रामराव भोगले त्या काळात अंबड, जालना, वैजापूर आदी ठिकाणी पेशकार म्हणून कार्यरत होते. नानासाहेबांचे वडील गोपाळराव यांनी पुण्यातून ओव्हरसइरचा डिप्लोमा घेतला आणि ते वर्‍हाडात स्थायीक झाले. त्यांची चार मुले नोकरी-उद्योगानिमित्त मुंबईत स्थिरावली होती. पुढे झालेल्या व्यवसायविस्तारानंतर त्यातील दोघे औरंगाबादेत आले.

नानासाहेब भोगले यांचे व्यक्तिमत्त्व उद्योगानुकूल होते. त्यातूनच नोकरीच्या मळवाटेऐवजी त्यांनी वैद्यकीय व्यवसायाला लागणार्‍या केमिकल्सच्या मार्केटिंगचा मार्ग सर्वप्रथम अनुसरला. याच दरम्यान एका डॉक्टरकडे ‘एक्स रे फिल्म प्रोसेसिंग’साठी लागणारे उपकरण पडून असलेले त्यांना दिसले. ते इंपोर्टेड होते आणि त्याची दुरुस्ती होत नव्हती. नानासाहेबांनी ते दुरुस्त केले. काही दिवसांनंतर मूळ जर्मन कंपनीच्या माणसाने नानासाहेबांची ही कामगिरी पाहिली आणि या मशिन्स भारतातच बनविण्याविषयी सुचविले. हे आव्हान त्यांनी स्वीकारले. अशा पद्धतीने ‘इंपोर्ट सब्स्टिट्यूट’ यंत्र भारतात प्रथमच बनविण्याचा मानही त्यांच्याकडे चालत आला. उत्तम गुणवत्तेमुळे ‘सीमेन्स’ आणि ‘अग्फा गेव्हर्ट’ या दोन जर्मन कंपन्यांनी त्याचे मार्केटिंग करण्यास सुरवात केली. हा व्यवसाय चांगला चालू होता. भोगले कुटुंबाने उचललेले हे धाडसी पाऊल यशस्वी ठरले होते. कुटुंबाने म्हणण्याचे कारण म्हणजे आरंभीचा उल्लेख नानासाहेब भोगले यांच्या नावाचा असला तरी त्यांना प्रेरणा होती त्यांचे ज्येष्ठ बंधू विष्णू भोगले यांची आणि त्यांचे छोटे भाऊ श्रीकांत त्यांच्या मदतीला होते. यामध्ये त्यांच्या बहिणीही मागे नव्हत्या. या भावंडांच्या आईंचे नाव ‘उमा’. म्हणून उद्योगाचे नाव ‘उमासन्स’.

‘उमासन्स’ची वाटचाल चांगल्या पद्धतीने सुरू होती. हा व्यवसाय स्टेनलेस स्टीलवर अवलंबून होता. याच दरम्यान 1968 मध्ये स्टेनलेस स्टीलच्या आयातीवर सरकार बंदी घालणार, अशी जबरदस्त अफवा पसरली. त्याची शहानिशा करणेही अवघड जाऊ लागले. व्यवसाय पुढे सुरू ठेवायचा, तर पर्यायी व्यवस्था हवी. त्यातच एका तज्ज्ञाने उपाय सुचविला. ‘पॉलीटेट्रा फ्लोरो इथिलीन’ (फ्लुऑन) या लिक्विडचे कोटिंग स्टीलवर केले, तर तो स्टेनलेस स्टीलला पर्याय होऊ शकतो. नानासाहेबांनी तातडीने ते लिक्विड मागविले. त्यासाठीचा खर्च होता 20 हजार रुपये. ही तयारी झाली असतानाच सरकारने जाहीर केले, ‘स्टेनलेस स्टीलच्या आयातीवर बंदी घालण्याचा कोणताही विचार नाही.’ या फ्लुऑनचे काय करायचे? नानासाहेबांचे एक डॉक्टर मित्र नुकतेच इंग्लंडहून परत आले होते. ‘तिकडे फ्लुऑनचे कोटिंग असलेली भांडी वापरली जातात. विशेष म्हणजे अशी भांडी नॉनस्टिक असतात’, अशी माहिती त्यांनी दिली. हीच माहिती पक्की करून त्यांनी भारतात हा प्रयोग करण्याचे ठरविले. यासाठी परदेशातून शास्त्रीय माहिती मिळविण्याचा प्रयत्नही त्यांनी केला, मात्र अशा माहितीस परदेशातून नकार मिळाल्यांतर त्यांनी स्वतःच प्रयोग केले आणि पहिल्या प्रयोगानंतर त्यांनी अशी भांडी आपल्या परिवारातच वापरून पाहिली. गुणवत्तेची खात्री पटल्यानंतर अशा ‘नॉनस्टिक’ भांड्यांचे उत्पादन करण्याचा निर्णय झाला. ‘फ्लुऑन कोटिंग’च्या प्रयोगांतून ‘नॉनस्टिक कुकवेअर’ विकसित करण्यात त्यांना यश आले आणि ‘पहिला नॉनस्टिक पॅन’ आणि ‘निर्लेप’ ब्रँड या दोन्हींचाही जन्म झाला ! या ‘ब्रँड’चे नाव ठेवले ‘निर्लेप’. निर्लेप म्हणजे कोणतीही लिप्तता नसलेले. हे संस्कृत नाव ! असे नाव ठेवण्याचे धाडसही त्यांनी केले.

‘नॉनस्टिक’चा भारतातील हा पहिलाच प्रयोग होता. सुरवातीला हे कोटिंग पारदर्शक होते. काही काळानंतर भारतीय स्वयंपाकघरांतील वातावरणाचा विचार करून त्याचा रंग काळा करण्यात आला. 1968 ते 1975 या काळात या पॅन्सची निर्यात युरोपातील अनेक देशांत झाली. युरोपात नॉनस्टिक कुकवेअरची तयार बाजारपेठ उपलब्ध होती पण भारतात मात्र या प्रकाराची फारशी जाणीवही कोणालाच नव्हती. त्यामुळे ‘निर्लेप’च्या बाबतीत एक आगळा विक्रम नोंदविला गेला. तयार झालेल्या उत्पादनाला आधी आपल्या परिसरातील बाजारपेठेत स्थान मिळवून देऊन त्यानंतरच्या टप्प्यात निर्यातीसाठी धडपड करण्याऐवजी थेट निर्यातीलाच सुरवात झाली. भारतीय बाजारपेठेत आणि ग्राहकांतही या विषयीची जाणीवजागृती नसल्याने तेव्हा फक्त दिल्ली, मुंबई, मद्रास, कलकत्ता, बेंगलोर यांसारख्या महानगरांपर्यंतच नॉनस्टिक पॅन्स पोचू शकले. 

1972 मध्ये भारतीय बाजारपेठ काबीज करण्याच्या दृष्टीने प्रयत्नांना सुरवात झाली. इथे काही प्रमुख अडथळे होते. उत्पादनाबद्दल भारतात जागरुकता नव्हती. त्यामुळे मागणी नव्हती. मोठ्या प्रमाणावर आपल्या ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठीचे प्रभावी माध्यमही हाताशी नव्हते. कंपनीचा टर्नओव्हर लक्षात घेता जाहिरातींच्या बजेटवर मर्यादा होत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 1968 मध्ये या पॅन्सचे उत्पादन सुरू झाले, तेव्हा साधा तवा बाजारात आठ रुपयांत मिळत होता, तर ‘निर्लेप’ची किंमत 30 रुपये होती. हा फरक तब्बल 22 रुपयांचा होता. या अडचणीच्या स्थितीत नानासाहेबांचे बंधू यशवंत भोगले यांनी या मोहिमेचे नेतृत्व स्वीकारले. देशभरात फिरून सुमारे चार हजार ‘लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन्स’मधून त्यांनी ‘नॉनस्टिक कुकवेअर’ ही संकल्पना प्रसृत केली. तव्यावरून अलगदपणे निघणारा डोसा पाहून सारे जण अचंबित होत. यातून ही बाजारपेठ रुजण्यास आरंभ झाला. यासाठी 1972 मध्ये ‘सिल्व्हरलाईट निर्लेपवेअर इंडस्ट्रिज प्रा. लि.’ ही स्वतंत्र कंपनी सुरू झाली. या दरम्यानच भारतात दूरचित्रवाणीचे आगमन झाले होते. 1976 मध्ये ‘निर्लेप’ची पहिली जाहिरात ‘दूरदर्शन’वर झळकली आणि तिसर्‍या जाहिरातीनंतर फरक दिसू लागला. त्यानंतर मागणीचा वेग इतका प्रचंड वाढला, की उत्पादन वाढविण्यासाठीच्या हालचालींना वेगाने सुरवात झाली. 

साधारण 1970 च्या दशकातच भोगले परिवाराने केलेल्या अथक प्रयत्नांना यश मिळाले. उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळत असतानाच अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. उपराष्ट्रपती बी. डी. जत्ती यांच्या हस्ते नवी दिल्लीत नानासाहेबांना ‘स्वयंसिद्ध उद्योगपती’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्याच्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे नवउद्योजकांना दिला जाणारा ‘पारखे पुरस्कार’ही त्यांना प्रदान करण्यात आला. याच काळात ‘आयएसआय’ आणि ‘आयसीआय’ ही मानांकनचिन्हे वापरण्याची परवानगी मिळाल्याने त्यांच्या उत्पादनांची विश्वासार्हताही वाढली.

‘उमासन्स’ने 1970 च्याच दशकात डेअरी उद्योगासाठी लागणार्‍या उपकरणांचीही निर्मिती सुरू केली. या कामात श्रीकांत भोगले यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली हा व्यवसाय चांगल्या प्रकारे उभा राहिला. 1979 मध्ये राज्य सरकारने जालना येथील औद्योगिक वसाहतीची स्थापना केली आणि ‘निर्लेप’ने 1980 मध्ये या ‘एमआयडीसी’त जागा घेऊन ‘निर्लेप’चा दुसरा प्लांट तेथे सुरू केला. ‘नॉनस्टिक कुकवेअर’ला मिळणार्‍या मोठ्या प्रतिसादाचेच हे द्योतक होते. असाच प्रतिसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत होता. 1980 मध्ये निर्लेप तंत्रज्ञानावर आधारित ‘ड्युरावेअर’ (केनिया)ची सुरवात नैरोबी येथे करण्यात आली.

मेडिकल इक्विपमेंटस्‌ आणि नॉनस्टिक कुकवेअर यांच्या पाठोपाठ एका नव्या प्रवाहात या ग्रुपने 1987 मध्ये प्रवेश केला. हे होते ‘ऑटोमॅटिक कोटिंग लाईन’चे काम. कोटिंगमध्ये ऑटोमॅटिक मशीनचा प्रयोगही याच ग्रुपने देशात सर्वप्रथम केला. कुकवेअरमध्येही ऑटोमॅटिक मशिन्सचा प्रयोग पहिल्यांदाच करीत ‘निर्लेप’ने 1987 मध्येच दुबईतील ‘जाबेल अली फ्री ट्रेड सेंटर’मध्ये ‘व्हीनस इंडस्ट्रीज लि.’ या नावाने ‘टर्न की प्रोजेक्ट’ उभारून दिला. 

हा सारा प्रवास वेगवान होता. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी लढत या उद्योगसमूहाने चांगले यश मिळविले. नानासाहेब आणि त्यांचे सर्व बंधू या भरारीत आघाडीवर होते. या दरम्यान सुमारे तीस वर्षे उलटली. याच दरम्यान 1982 मध्ये नानासाहेबांचे निधन झाले. भोगले कुटुंबावर झालेला हा मोठा आघात होता. हा आघात पचवून नव्या जोमाने उभे राहणे हे मोठे आव्हान होते. पुढे 1990-91 दरम्यान नव्या मुक्त अर्थव्यवस्थेचे पडघम वाजू लागले. या नव्या स्पर्धेत ‘फिटेस्ट विल सर्व्हाईव्ह’ अशी स्थिती राहणार होती. हाच काळ या ग्रुपसाठी कसोटीचा ठरणार होता. समूहासाठी हा टर्निंग पॉइंट ठरणार होता. या कसोटीच्या काळात भोगले कुटुंबातील पुढच्या पिढीने, राम, मुकुंद आणि नित्यानंद या बंधूंनी उद्योगाची सूत्रे आपल्या हाती घेतली. व्यावसायिक दृष्टिकोन रक्तातच भिनलेला होता, त्यामुळे व्यवसायाचा जुना आलेख ‘स्टेडी’ ठेवणे त्यांच्यासाठी सोपे होते पण जागतिकीकरणाचे आव्हान खूप मोठे होते. हे आव्हान स्वीकारण्याचे त्यांनी ठरवले आणि तिघेही झडझडून कामाला लागले.

त्यांच्यासमोर दोन-तीन पर्याय होते. पहिला होता आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहकार्य कराराचा. दुसरा-मोठ्या डायव्हर्सिफिकेशनचा. या दोन्हींवरही त्यांचे वर्किंग सुरू झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर नॉनस्टिक क्षेत्रात दबदबा असलेल्या ‘टेफाल’ या फ्रेंच मल्टिनॅशनल कंपनीचा जॉइंट व्हेंचरचा प्रस्ताव योगायोगाने याच काळात-1993 मध्ये त्यांच्यासमोर आला. ‘निर्लेप’च्या दृष्टीने हे पाऊल खूप महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे ठरणार होते. पण या करारातील मसुदा उलगडू लागला, तशा त्यातील अनेक बाबी खटकणार्‍या आहेत, असे त्यांच्या लक्षात येऊ लागले. काही मुद्दे ‘निर्लेप’च्या दृष्टीने तर काही देशाच्या प्रतिमेच्या दृष्टीने अप्रतिष्ठेचे ठरू शकले असते. ‘जॉइंट व्हेंचर’च्या दृष्टीने असलेली ही ‘सुवणसंधी’ नाकारण्याचा कठोर निर्णय त्यांनी घेतला. या पार्श्वभूमीवर ‘निर्लेप नॉनस्टिक कुकवेअर’च्या उत्पादनांचा आणि त्यांच्या पॅकिंगचा चेहरामोहराही त्यांनी याच काळात पूर्णतः बदलून टाकला. कालांतराने यामध्येच कुकर, गॅस स्टोव्ह, गॅस लायटर, हार्ड ऍनोडाईज्ड कुकवेअर असे अनेक प्रयोग त्यांनी केले.

याच काळात विस्तारीकरणाचा प्रकल्पही हाती घेण्यात आला होता. ‘बॅकवर्ड इंटिग्रेशन’च्या रूपाने ‘ऍम्युलेट इंडस्ट्रीज’ या नावाने ऍल्युमिनियम रोलिंग मिलला त्यांनी सुरवात केली होती. काळाप्रमाणे बदलताना ऑटोमोबाईल इंडस्ट्रीतील संधी त्यांना ठळकपणे जाणवू लागल्या. उमासन्स स्टील फॅबच्या माध्यमातून काही प्रमाणात हे काम सुरू झालेच होते पण ‘मराठवाडा ऑटो कॉम्पो’ आणि ‘उमासन्स ऑटो काम्पो’ (अधिक माहितीसाठी याच पुस्तकातील ‘दो और दो पॉंच’ हा लेख पाहावा) या दोन कंपन्यांच्या माध्यमातून या क्षेत्रात त्यांनी मोठी आघाडी घेतली. ऑटोकाम्पोनंटस्‌ ही वेगळी स्ट्रीम अशा प्रकारे डेव्हलप झाली. कोटिंग आणि पेंटिंग ही क्षेत्रेही त्यांनी अशाच प्रकारे विकसित केली. ऑटो कॉम्पोनंट्‌स्‌ आणि कोटिंग या दोन्ही क्षेत्रांत मराठवाड्याच्या बाहेरून त्यांनी कामे मिळविली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही ते पोचले. 

‘निर्लेप ग्रुप’ म्हणून ओळखता येईल अशा सात कंपन्या आज कार्यरत आहेत. ‘ड्युरावेअर प्रा. लि.’ आणि ‘सिल्व्हरलाईट प्रा. लि.’ या दोन नावांनी सुरू असलेले काम आता ‘निर्लेप अप्लायन्सेस लि.’ या नावाने सुरू आहे. याशिवाय ‘उमासन्स स्टील फॅब प्रा. लि.’, ‘मराठवाडा ऑटो कॉम्पो’, ‘उमासन्स ऑटो काम्पो’, ‘भोगले कोटिंग्ज अँड पेन्टस्‌’, ‘ऍम्युलेट इंडस्ट्रीज’ आणि ‘ऍम्युलेट कोटिंग’ या इतर कंपन्या ग्रुपमध्ये कार्यरत आहेत. किचन अप्लायन्सेस, ऑटो काम्पोनन्टस्‌, ऍल्युमिनियम रोलिंग, स्पेशालिटी पेंन्टस्‌ आणि कोटिंग्ज, केमिकल प्रोसेस इक्विपमेंटस्‌ आणि फार्मास्युटिकल मशीन्स या विविध क्षेत्रांसाठी ते काम करतात. ‘निर्लेप’च्या विशाल छताखाली होत असलेल्या या विस्तारात साधारण सन 2000 पासून श्रीकांत भोगले यांच्या कन्या स्वाती आणि त्यांचे पती रवि पाध्ये हेही सहभागी झाले. ‘उमासन्स स्टील फॅब’साठीची नवी क्षितिजे विस्तारण्यात त्यांची भूमिका महत्वाची ठरली.

एका मराठी कुटुंबाच्या धाडसाचा आणि जिद्दीचा सुमारे 45 वर्षांच्या औद्योगिक प्रवासात विस्तारलेला हा आलेख. त्यांनी विकसित केलेली सर्व उत्पादने भारतात प्रथमच तयार झाली ! ती सर्व ‘इम्पोर्ट सब्स्टिट्यूट’ होती. जो काळ ‘इंपोर्टेड’ वस्तू आणि तंत्रज्ञानाच्या चलतीचा होता त्या काळात भोगले कुटुंबीयांनी निर्यातीचा विक्रम नोंदविला ! गुणवत्तेच्या बळावर आपण परकीय बाजारपेठेत उभे राहू शकतो, टिकू शकतो हा विश्वास या उदाहरणाने सर्व भारतीयांनाच त्यांनी दिला. स्वाभिमानी भारतीय उद्योजकतेची ही पायाभरणी होती. ‘निर्लेप’ नावाने चालणार्‍या सर्व ऍक्टिव्हिटीज ‘इनहाऊस’ चालतात. मराठवाड्याचा औद्योगिक विकास आणि ‘निर्लेप’ची वाटचाल साधारणपणे एकाच ट्रॅकवर, एकाच गतीने होत आली आहे. उत्पादनांबरोबरच विचारांतीलही इनोव्हेशन आणि काळाप्रमाणे कात टाकण्याची भूमिका हे या ग्रुपचे वेगळेपण... 

या वाटचालीत ‘निर्लेप’ने स्वतःचे एक तत्वज्ञानही विकसित झाले. ‘कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत राहूनच उद्योग व्यवसाय केला, तर तो दीर्घकाळपर्यंत सक्षमपणे चालू शकतो’, ‘प्रत्येकाशी सन्मानपूर्ण व्यवहार असेल तर ती व्यक्ती कंपनीच्या भरभराटीसाठी मनःपूर्वक प्रयत्न करते,’ आणि ‘निष्ठा आणि विश्वासार्हता यांच्याशी तडजोड न करता यश मिळविण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो,’ यावर त्यांचा विश्वास आहे आणि ही तत्त्वं ते अंमलात आणतात. या सर्वांहून महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ग्राहक हाच व्यवसायाचा केंंद्रबिंदू समजून व्यवसायाची आखणी करणं.

कामगार-कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती सर्व काळजी घेत असतानाच चांगली कार्यसंस्कृती जोपासण्याचे काम येथे होते. नव्या कल्पना, नवी माहिती, नवे प्रयोग यासाठी वरिष्ठांनी आपले दरवाजे सदैव खुले ठेवले आहेत. यातूनच त्यांच्या विस्ताराचे क्षितिज अधिक व्यापक होत गेले. क्षितिज विस्तारणार्‍या या प्रयत्नांनाही एक संपन्न परंपरा आहे. मराठवाड्याचं औद्योगिक हित जपण्यासाठी नानासाहेब सतत अग्रेसर होते. रेल्वेस्टेशन परिसरात उभ्या असलेल्या मराठवाड्यातील पहिल्याच औद्योगिक वसाहतीच्या निर्मितीचे श्रेय त्यांच्याकडे जाते. त्याच बरोबर उद्योजकांसाठी स्थापन केलेल्या आजच्या ‘चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर’ (सीएमआयए)चेही ते एक संस्थापक व प्रमुख आधारस्तंभ होते.


- दत्ता जोशी

Sunday, April 8, 2012

उस्मानाबादेत प्रवेश करताना

माझे सहावे पुस्तक ‘उस्मानाबाद आयकॉन्स’ रविवार दि. 8 एप्रिल रोजी उस्मानाबाद येथे आयोजित सुंदर सोहळ्यात प्रकाशित झाले. मागील वर्षभराच्या मेहनतीतून ‘जालना आयकॉन्स’, ‘नांदेड आयकॉन्स’, ‘लातूर आयकॉन्स’ आणि ‘उस्मानाबाद आयकॉन्स’ ही प्रेरक पुस्तके आकारास आली. या निमित्ताने हजारो किलोमीटरचा प्रवास झाला आणि 148 जणांच्या मुलाखती घेऊन झाल्या. ही नावे मिळविण्यासाठी शेकडोंच्या भेटी झाल्या. जालना येथील ‘पोलाद’ ब्रँडच्या भक्कम पाठबळामुळेच हे सारे शक्य होऊन प्रत्यक्षात उतरते आहे, हे मी इथे आवर्जून नमूद करू इच्छितो. ‘उस्मानाबाद आयकॉन्स’मागील माझी भूमिका मांडणारे हे मनोगत...
...............................................................................................

‘उस्मानाबाद आयकॉन्स’ हे पुस्तक आपल्या हाती ठेवताना मला मनापासून आनंद होत आहे. राज्यातील पर्जन्यछायेच्या प्रदेशात ज्या भूभागाचा समावेश होतो, त्यापैकी हा एक भाग. पावसाच्या दृष्टीने दुष्काळी असला तरी सांस्कृतिक परंपरेच्या दृष्टीने हा परिसर प्राचीन काळपासून अतिशय संपन्न. ‘धाराशीव लेणी’ हा या संपन्नतेचा एक महत्वाचा भाग. एकेकाळी उस्मानाबाद हे गाव ‘धाराशीव’ याच नावाने प्रचलित होते. आजही अनेक जण या गावाला ‘धाराशीव’ नावाने संबोधतात. धाराशीव लेणी ही शैव आणि जैन या दोन्ही संप्रदायाच्या परंपरेतील महत्वाची लेणी मानली जातात. हा वास्तविक लेण्यांचा समूह आहे. शहरापासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर काही लेणी आहेत तर ईशान्येला साधारण 18 किलोमीटर अंतरावर इतर. काळाच्या ओघात कडे कोसळून या लेण्यांचे बरेच नुकसान झाले असले तरी संपन्नतेचा वारसा ही लेणी अजूनही मिरवतात. ही लेणी इसवीसन पूर्व 650 ते 500 या काळात कोरली गेली असावीत, असे मानले जाते. ‘करकंडचरिउ’ या जैन ग्रंथात या लेणींचे वर्णन आहे. जैन परंपरेत ‘करकंड’ हा राजा पार्श्वनाथ यांचा समकालीन मानला जातो. त्यामुळे ही लेणी इसवीसनपूर्व नवव्या शतकातीलही असावीत असाही एक मतप्रवाह आहे. (संदर्भ ः भारतीय संस्कृती कोश, खंड ७ ) असा हा ‘धाराशीव’ नावाचा इतिहास...

या जिल्ह्यात अशा अनेक ‘युनिक’ गोष्टी सापडतात... परांडा तालुक्यातील डोमगाव येथे समर्थ रामदास स्वामींचे शिष्य कल्याणस्वामी यांच्या हस्ताक्षरातील दासबोधाची मूळ प्रत अद्याप जतन करून ठेवण्यात आलेली आहे. कोट्यवधींची कुलस्वामिनी ‘तुळजाभवानी’ याच जिल्ह्यात आहे. मध्य प्रदेशातील उज्जैननंतर पवित्र समजले जाणारे काळभैरवाचे भैरवनाथ मंदिर परांडा तालुक्यातील सोनारी येथे आहे. दक्षिण भारतातील हे असे एकमेव मंदिर! कुंथलगिरी हे जैनपंथीयांचे पवित्र तीर्थक्षेत्र. सन 1630-31 मध्ये बांधल्या गेलेल्या परांडा किल्ल्याशी छत्रपती शिवरायांचे पिताश्री शहाजीराजांच्या स्मृती निगडीत आहेत. नळदुर्गचा प्रसिद्ध किल्ला इतिहासापासून स्वातंत्र्यलढ्यापर्यंत महत्वाचे ठिकाण राहिलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1942 मध्ये कसबे तडवळ्याला भेट दिली होती. त्या वेळी त्यांची ज्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली होती, ती बैलगाडी तेथील ग्रामपंचायतीत आजही सुरक्षितपणे जतन करून ठेवण्यात आलेली आहे. तेरचे संग्रहालय हा तर जागतिक वारशाचाच भाग मानावा लागेल. प्राचीन भारतीय संस्कृतीची संपन्नता सिद्ध करणारे असंख्य पुराणवस्तुंचे हे संग्रहालय या जिल्ह्यातील फार मोठा ठेवा आहे. या ठेव्यांचे जतन करीत असतानाच नव्या पिढीसमोर हे सारे पद्धतशीरपणे मांडण्याची यंत्रणा उभी करणे महत्वाचे ठरणार आहे.

या पार्श्वभूमीवर हे पुस्तक प्रकाशित होत आहे. हे पुस्तक कोणासाठी आहे? प्रत्येक पिढी आपल्या पूर्वासुरींची परंपरा सांगते आणि आपला वारसा पुढील पिढीसाठी सोडून जाते. आजच्या पिढीने पुढील पिढीसाठी सोडलेला अनुकरणीय वारसा शोधण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न. या पुस्तकातील प्रत्येक नाव ‘मेरिट’वर निवडण्यात आले आहे. ‘आयकॉन्स’ ची व्याख्या काय? जिल्ह्यातील ही माणसे शोधताना निकष कोणते लावायचे? माणसे कशी निवडायची? इथे क्षेत्राचे बंधन नव्हते की उलाढालींच्या डोंगरांच्या अपेक्षा नव्हत्या. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात उत्तम रितीने कार्यरत असणारी व्यक्ती, हा आमचा पहिला निकष होता. त्या व्यक्तिचे चारित्र्य, व्यवहारातील सचोटी हा दुसरा निकष होता आणि त्याची समाजाभिमुखता हा तिसरा. आर्थिक उलाढालीच्या आकड्यांना आमच्या लेखी महत्व नव्हते. कामातील ‘इनोव्हेशन’, त्यातील क्षमता हा भाग त्या दृष्टीने सर्वात महत्वाचा ठरणारा होता. समाज हा चांगल्या माणसांनी समृद्ध आहे. त्यातून काही निकष लावून निवड करायची, तरी ही यादी खूप मोठी होऊ शकते. उस्मानाबाद जिल्ह्याच्या शोधमोहिमेत अशी 80 हून अधिक नावे हाती आली. यातील काही माणसं आधीपासून प्रकाशझोतात आलेली होती, तर काही जणांपर्यंत पहिल्यांदाच कोणी पोहोचत होते. त्यानंतर विविध क्षेत्रांतील निवडीचे निकष लावत ही यादी 20 पर्यंत पोहोचली. या पुस्तकात आलीच पाहिजेत, अशी काही नावे समाविष्ट होऊ शकली नाहीत. यापैकी काही जणांनी स्वतःहून नकार दिला. प्रसिद्धीपराङ्‌मुख राहून कार्यरत राहण्याच्या त्यांच्या इच्छेला आम्हीही मान दिला. काही ठिकाणी परस्परांना उपलब्ध असलेल्या वेळांचे अथवा या पुस्तकात उपलब्ध जागेचे गणित जमले नाही. 
नावे निवडताना ‘उद्योग’ हे क्षेत्र प्रामुख्याने डोळ्यासमोर ठेवले होते. एक उद्योग उभा राहिला तर अनेक कुटुंबं उभी राहतात आणि त्यातूनच परिसराच्या विकासाला चालना मिळते. त्यामुळे या विषयाकडे अधिक प्राधान्याने लक्ष! त्याच बरोबर शेती, सामाजिक, प्रशासन, व्यापार, सांस्कृतिक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सैन्यदले. अशा सर्वच क्षेत्रांचा धांडोळा घेऊन नावांची निवड करण्यात आली. या पुस्तकात समाविष्ट करावयासाठीची नावे शोधताना अनेकांशी भेटून चर्चा केली. यामध्ये पत्रकारिता, सामाजिक कार्य, उद्योग अशा विविध क्षेत्रांचा समावेश होता. जिल्हा उद्योग केंद्रासारख्या संस्थांतूनही अनेक उद्योजकांची नावे मिळाली. उद्योग केंद्रातील अधिकार्‍यांनी त्यात मोठी मदत केली. अशा विविध भेटींतून समोर आलेल्या नावांतून ही 20 नावे निवडण्यात आली. या पुस्तकाच्या दृष्टीने ‘आयकॉन्स’ची शोधमोहीम जुलै 2011 मध्येच सुरू झाली. अशी माणसे शोधणे हे काम म्हटले तर सोपे आणि म्हटले तर कठिण असते. ही माणसे शोधण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागली.

मराठवाड्यातील पहिल्या पिढीतील उद्योजकांवर आधारित ‘झेप’ हे पुस्तक मी 2 ऑक्टोबर 2006 रोजी प्रकाशित केले होते. त्याच धर्तीवर पण फक्त औद्योगिक विश्वापुरतेच मर्यादित न राहता सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींचा परिचय नव्या पिढीला करून देणारे ‘जालना आयकॉन्स’ हे पुस्तक ऑक्टोबर 2011 मध्ये प्रकाशित झाले. त्याच धर्तीवर नांदेड जिल्ह्यातील लक्षणीय कामगिरी बजावणार्‍या व्यक्तींवरील पुस्तक 11 मार्च 2012 रोजी नांदेड येथे तर ‘लातूर आयकॉन्स’ हे पुस्तक 1 एप्रिल 2012 रोजी लातूर येथे प्रकाशित झाले. ‘पोलाद’ या ब्रँडनेमने बाजारपेठेत उपलब्ध सळईचे निर्माते; जालना येथील ‘भाग्यलक्ष्मी स्टील’चे संचालक सुनील गोयल यांनी या कामी पुढाकार घेतला. असाच प्रयोग आता उस्मानाबाद जिल्ह्यात होतो आहे. या पुस्तकाची भाषा हा एक वेगळा विषय आहे. अनेक ठिकाणी रूढ व्यवहारात वापरले जाणारे शब्द आपण वाचाल. शुद्ध मराठीचा अतिरेकी आग्रह धरीत जडजंबाल मराठी शब्द वापरण्याऐवजी रूढ व्यवहारातील इतरभाषक शब्द या पुस्तकात जसेच्या तसे वापरले आहेत. काळाबरोबर जाताना भाषेचा नवा प्रवाह स्वीकारण्याचा हा प्रयत्न !

उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यातील विविध गावांबरोबरच येथून दूरवर राहत असलेल्या त्यांच्या गावापर्यंत, पुण्यामुंबईपर्यंत सर्व शहरांमध्ये या निमित्ताने एकंदर साधारण एक ते दीड हजार किलोमीटर प्रवास केला. हे ‘आयकॉन्स’ कार्यरत असलेल्या भागाला प्रत्यक्ष भेटी दिल्या. उस्मानाबाद जिल्ह्याच्या विविध भागांत फिरतानच पुणे - मुंबई - औरंगाबादेतील व्यक्तींनाही भेटून त्यांच्या प्रवासकथा ऐकल्या आणि त्यांनी गाठलेली यशाची शिखरे शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला. या सर्व कथा आपण या पुढील पानांतून वाचाल. 

संरक्षणदल, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, वैद्यक व्यवसाय, साहित्य, सामाजिक कार्य अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांतून निवडलेली ही माणसं आपापल्या ठिकाणी राहून आपले महत्वपूर्ण योगदान देत आहेत. यातील प्रत्येकाच्या मनात सामाजिक भावना रुजलेली आहे. आपण या समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून जेव्हा कोणी आपल्या व्यवसायात किंवा जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात उतरतो, तेव्हा त्याच्या कार्यक्षमता व कार्यकुशलतेला एक आगळे परिमाण लाभते. या पुस्तकातील सर्व 20 जण अशाच प्रकारे आपापल्या क्षेत्रात उत्तम रितीने कार्यरत आहेत. वेगळ्या वाटा चोखाळत त्यांची वाटचाल सुरू आहे. या 20 जणांत सैन्यदलातील एका व्यक्तिमत्वांचा आम्ही आवर्जुन समावेश केला आहे. सैन्यदल हा ‘करइर’चा एक उत्तम मार्ग आहे. भ्रष्टाचाराने बजबजलेल्या या वातावरणात आजही या एका क्षेत्राबाबत सामान्य माणून आशावादी आहे. त्यांच्याकडे सर्व जण अजूनही आदराने पाहतात. मग या क्षेत्रात जाण्यासाठी प्रेरणा का मिळू नये? 

‘आयकॉन्स’वर लिहिल्या जाणार्‍या विविध जिल्ह्यांतील पुस्तकांत किमान एक तरी ‘आयकॉन’ सैन्यदलातील हवा, हा आमचा आग्रह आहे. त्या दृष्टीने जाणीवपूर्वक हे ‘वीर’ शोधले जातात. कोणा एका व्यक्तीऐवजी एका कार्यशील समूहालाच आपणासमोर मांडणारे यमगरवाडीतील प्रकल्पाचे कार्यही असेच वेगळेपण स्पष्ट करणारे आहे. समाजात आजवर उपेक्षित राहिलेल्या घटकांच्या पुढच्या पिढ्या सुसंस्कारित करणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हे अतिशय महत्वाचे कार्य येथे होते आहे. कौतुक वाटते ते इथे शिकण्यासाठी आलेल्या मुलांचे. तशा अर्थाने कसलीही शैक्षणिक पार्श्वभूमीच काय पण साधी अक्षरओळखही नसलेल्या आई-बापाच्या पोटी जन्माला आलेली ही मुले ज्या सहजतेने संगणक हाताळतात, विज्ञानाच्या प्रयोगशाळेत वावरतात आणि पुस्तकी ज्ञानाला आपल्या प्रयोगशीलतेची जोड देतात, तेव्हा उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे जात असल्याचे मन भारून टाकणारे समाधान मिळते.

एक बाब येथे आवर्जून स्पष्ट करावीशी वाटते, की या पुस्तकात मांडलेले 20 जण म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्याचा परिपूर्ण परिचय नव्हे. ही नावे केवळ प्रातिनिधिक अशी आहेत. वास्तविक ही बरीच मोठी यादी होऊ शकेल. कदाचित, या पुस्तकाचा दुसरा भाग भविष्यात प्रकाशित करावयाचे ठरल्यास ही नावेही त्यात समाविष्ट करणे शक्य होईल.

या निर्मितीसाठी लाभलेल्या ‘पोलाद’च्या निरपेक्ष सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.

उस्मानाबादच्या प्रेरणादायी विश्वात आपणा सर्वांचे स्वागत!

- दत्ता जोशी

Wednesday, March 28, 2012

लातूरमध्ये प्रवेश करताना

माझे पाचवे पुस्तक ‘लातूर आयकॉन्स’ 1 एप्रिल 2012 रोजी प्रकाशित होत आहे. ‘जालना’ आणि ‘नांदेड’ पाठोपाठ आता हे पुस्तक येते आहे. जगात खूप चांगुलपणा आहे, तो शोधून समाजासमोर मांडायचा, या हेतूने मी हे काम करतो आहे. शेकडो किलोमीटरचा प्रवास, असंख्य माणसांच्या भेटी आणि लक्षपूर्वक केलेले निरीक्षण यांच्या आधारावर ही पुस्तके तयार होतात. ‘लातूर आयकॉन्स’ 288 पानांचे झाले असून त्याचे मूल्य 250 रुपये आहे. ‘पोलाद’ या कंपनीच्या सामाजिक उपक्रमांतर्गत हे पुस्तक प्रकाशित होत आहे.
....................................................................
'लातूर आयकॉन्स' हे पुस्तक आपल्या हाती ठेवताना मला मनापासून आनंद होत आहे. राज्यातील पर्जन्यछायेच्या प्रदेशात ज्या भूभागाचा समावेश होतो, त्यापैकी हा एक भाग. हा जिल्हा माझ्या हृदयाच्या सर्वात जवळचा, कारण माझा जन्म याच जिल्ह्यातील देवणी इथला. अर्थात त्या काळी हा जिल्हा उस्मानाबाद होता आणि देवणी हे साडेआठहजार लोकवस्तीचे तेव्हाचे खेडे उदगीर तालुक्यात येत असे. बदलत्या काळाप्राणे जिल्ह्याच्या - तालुक्याच्या रचना बदलल्या पण माणसांचा स्थायीभाव तोच राहिला. हा दुष्काळी भाग. मेहनतीशिवाय इथं काही पिकत नाही. त्यामुळं सातत्यानं मेहनत करीत राहणं ही या परिसरातील माणसांची सवयच बनली. ते कोणत्याही क्षेत्रात गेले तरी रक्तात मुरलेली ही सवय मात्र मोडत नाही... जातील तेथे शंभर टक्के योगदान देतील असा हा बाणा. त्यातूनच सर्वांच्या प्रगतीच्या वाटा फुलल्या. 

हे पुस्तक कोणासाठी आहे? प्रत्येक पिढी आपल्या पूर्वासुरींची परंपरा सांगते आणि आपला वारसा पुढील पिढीसाठी सोडून जाते. आजच्या पिढीने पुढील पिढीसाठी सोडलेला अनुकरणीय वारसा शोधण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न. या पुस्तकातील प्रत्येक नाव ‘मेरिट’वर निवडण्यात आले आहे. ‘आयकॉन्स’ची व्याख्या काय? जिल्ह्यातील ही माणसे शोधताना निकष कोणते लावायचे? माणसे कशी निवडायची? इथे क्षेत्राचे बंधन नव्हते. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात उत्तम रितीने कार्यरत असणारी व्यक्ती, हा आमचा पहिला निकष होता. त्या व्यक्तिचे चारित्र्य, व्यवहारातील सचोटी हा दुसरा निकष होता आणि त्याची समाजाभिमुखता हा तिसरा. आर्थिक उलाढालीच्या आकड्यांना आमच्या लेखी महत्व नव्हते. कामातील ‘इनोव्हेशन’, त्यातील क्षमता हा भाग त्या दृष्टीने सर्वात महत्वाचा ठरणारा होता. 

समाज हा चांगल्या माणसांनी समृद्ध आहे. त्यातून काही निकष लावून निवड करायची, तरी ही यादी खूप मोठी होऊ शकते. लातूर जिल्ह्याच्या शोधमोहिमेत अशी 100 हून अधिक नावे हाती आली. यातील काही माणसं आधीपासून प्रकाशझोतात आलेली होती, तर काही जणांपर्यंत पहिल्यांदाच कोणी पोहोचत होते. त्यानंतर विविध क्षेत्रांतील निवडीचे निकष लावत ही यादी 38 पर्यंत पोहोचली. या पुस्तकात आलीच पाहिजेत, अशी काही नावे समाविष्ट होऊ शकली नाहीत. यापैकी काही जणांनी स्वतःहून नकार दिला. प्रसिद्धीपराङ्‌मुख राहून कार्यरत राहण्याच्या त्यांच्या इच्छेला आम्हीही मान दिला. काही ठिकाणी परस्परांना उपलब्ध असलेया वेळांचे अथवा या पुस्तकात उपलब्ध जागेचे गणित जमले नाही.

नावे निवडताना ‘उद्योग’ हे क्षेत्र प्रामुख्याने डोळ्यासमोर ठेवले होते. एक उद्योग उभा राहिला तर अनेक कुटुंबं उभी राहतात आणि त्यातूनच परिसराच्या विकासाला चालना मिळते. त्यामुळे या विषयाकडे अधिक प्राधान्याने लक्ष! त्याच बरोबर शेती, सामाजिक, प्रशासन, व्यापार, सांस्कृतिक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सैन्यदले. अशा सर्वच क्षेत्रांचा धांडोळा घेऊन नावांची निवड करण्यात आली. या पुस्तकात समाविष्ट करावयासाठीची नावे शोधताना अनेकांशी भेटून चर्चा केली. यामध्ये पत्रकारिता, सामाजिक कार्य, उद्योग अशा विविध क्षेत्रांचा समावेश होता. जिल्हा उद्योग केंद्रासारख्या संस्थांतूनही अनेक उद्योजकांची नावे मिळाली. उद्योग केंद्रातील अधिकार्‍यांनी त्यात मोठी मदत केली. अशा विविध भेटींतून समोर आलेल्या नावांतून ही 38 नावे निवडण्यात आली. 

या पुस्तकाच्या दृष्टीने ‘आयकॉन्स’ची शोधमोहीम जुलै 2011 मध्येच सुरू झाली. अशी माणसे शोधणे हे काम म्हटले तर सोपे आणि म्हटले तर कठिण असते. ही माणसे शोधण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागली. मराठवाड्यातील पहिल्या पिढीतील उद्योजकांवर आधारित ‘झेप’ हे पुस्तक मी 2 ऑक्टोबर 2006 रोजी प्रकाशित केले होते. त्याच धर्तीवर पण फक्त औद्योगिक विश्वापुरतेच मर्यादित न राहता सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींचा परिचय नव्या पिढीला करून देणारे ‘जालना आयकॉन्स’ हे पुस्तक ऑक्टोबर 2011 मध्ये प्रकाशित झाले. त्याच धर्तीवर नांदेड जिल्ह्यातील लक्षणीय कामगिरी बजावणार्‍या व्यक्तींवरील पुस्तक 11 मार्च 2012 रोजी नांदेड येथे प्रकाशित झाले. ‘पोलाद’ या ब्रँडनेमने बाजारपेठेत उपलब्ध सळईचे निर्माते; जालना येथील ‘भाग्यलक्ष्मी स्टील’चे संचालक सुनील गोयल यांनी या कामी पुढाकार घेतला. असाच प्रयोग
आता लातूर जिल्ह्यात होतो आहे. या पुस्तकाची भाषा हा एक वेगळा विषय आहे. अनेक ठिकाणी रूढ व्यवहारात वापरले जाणारे शब्द आपण वाचाल. शुद्ध मराठीचा अतिरेकी आग्रह धरीत जडजंबाल मराठी शब्द वापरण्याऐवजी रूढ व्यवहारातील इतरभाषक शब्द या पुस्तकात जसेच्या तसे वापरले आहेत. काळाबरोबर जात भाषेचा नवा प्रवाह स्वीकारण्याचा हा प्रयत्न !

लातूर शहर आणि जिल्ह्यातील विविध गावांमध्ये - शहरांमध्ये या निमित्ताने एकंदर एक - दीड हजार किलोमीटर प्रवास केला. हे ‘आयकॉन्स’ कार्यरत असलेल्या भागाला प्रत्यक्ष भेटी दिल्या. लातूर जिल्ह्याच्या विविध भागांत फिरतानाच पुणे - मुंबई - औरंगाबादेतील व्यक्तींनाही भेटून त्यांच्या प्रवासकथा ऐकल्या आणि त्यांनी गाठलेली यशाची शिखरे शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला. या सर्व कथा आपण या पुढील पानांतून वाचालच. पण काही कथा मला यामध्ये अपरिहार्य कारणांमुळे समाविष्ट करता आल्या नाहीत. त्यापैकी एक नाव आहे कमांडर कैलास गिरवलकर. एकेकाळी भारतीय नौदलात ‘कमांडर’ पदापर्यंत पोहोचलेल्या श्री. गिरवलकर यांनी 1971च्या भारत-पाक युद्धात महत्वाची कामगिरी बजावली. याबद्दल त्यांना ‘नौसेना पदका’ने सन्मानित करण्यात आले. निवृत्तीनंतर आपल्या गावी परतून विविध सामाजिक कार्यांना प्रारंभ केला. आपल्या स्वतःच्या इमारतीचा बराचसा भाग त्यांनी ‘नॅब’ या अंधांसाठी कार्यरत संस्थेला विनामूल्य वापरण्यास दिला आहे. स्वतःच्या परिवाराच्या नावाने
24 डिसेंबर 2007 रोजी ‘मिरागि प्रतिष्ठान’ (मित्रविंदा रामलिंगप्पा गिरवलकर) हा ट्रस्ट स्थापन करून त्यांनी विविध सामाजिक कामांतील व्यक्तींना त्यातून आधार देण्याची महत्वाची कामगिरी बजावली आहे. या सर्वांपेक्षा अधिक महत्वाचे काम त्यांनी विकसीत केले आहे लातूरपासून जेमतेम 10-12 किलोमीटरवर असलेल्या गंगापूर या गावी. समाजातील दुर्लक्षित घटक असणार्‍या, वेश्याव्यवसाय करणार्‍या महिलांच्या मुला-मुलींसाठी त्यांनी अरुणोदय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अंकुर बालसदन विकसित केले आहे. वास्तविक हे काम आधीपासून सुरू होते. तेथील व्यवस्थापन 2004 पासून कमांडर गिरवलकर यांच्याकडे आले. काही परदेशी संस्थांकडून देणगी मिळवून आणि उरलेली रक्कम स्वतःच्या ट्रस्टमधून घालून, अक्षरशः खडकाळ मारानावर उभ्या असलेल्या या संस्थेत त्यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी अक्षरशः नंदनवन फुलविले आहे. सध्या संस्थेत 47 मुले - मुली असून त्यातील अनेक जणांनी आपल्या बुद्धीमत्तेची चमक दाखवीत उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतले आहेत. वयाच्या 18 वर्षांपर्यंतच्या मुलांचा सांभाळ येथे होतो. हे एक आगळेवेगळे कार्य. देहविक्रयाच्या बाजारात अनिच्छेने जगताना पोटी जन्मलेल्या मुलांना चांगले दिवस दाखविण्याची या मातांची इच्छा अशा संस्थांच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरते. इथे लातूर परिसरापासून मुंबईपर्यंत विविध भागांतून मुले - मुली वास्तव्यास आहेत. त्यांना शाळेत प्रवेश मिळविताना प्रारंभीच्या काळात कमांडर गिरवलकर यांना बराच संघर्ष करावा लागला. पण आता वातावरण निवळले आहे. ही मुले शाळेत रुळली आहेत. अनेक जण वर्गात पहिले असतात. दुर्दैवाच्या फेर्‍यात अडकलेल्या आईंची ही मुले आता उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने पाहू शकतात.

दोन व्यक्तींबद्दल मला इथे आवर्जुन लिहिणे आवश्यक वाटते. त्यातील पहिले आहेत ‘शहीद’ कॅप्टन कृष्णकांत चंद्रकांत कुलकर्णी. कारगिलमध्ये पाकिस्तान्यांना धूळ चारताना दि. 7 जुलै 1999 रोजी त्यांनी रणांगणावर हौतात्म्य पत्करले. त्यांची वीरकथा रोमांचित करणारी आहे. सातारा सैनिकी शाळेतून प्रशिक्षित होत त्यांनी खडकवासला येथील ‘एनडीए’मध्ये प्रवेश मिळविला आणि अंगभूत गुणवत्तेला कठोर परिश्रमांची जोड देत भारतीय सैन्यदलात ते दाखल झाले. कारगिलमध्ये पाकिस्तानने केलेले आक्रमण मोडून काढण्यासाठी तैनात केलेल्या तुकड्यांमध्ये त्यांच्याही बटालियनचा समावेश होता. रणांगणावर शत्रूशी चार हात करताना ते जबर जखमी झाले. आपल्या जखमा प्राणघातक आहेत, हे त्यांना जाणवले असावे, त्यामुळे स्वतःला झालेल्या जखमांची पर्वा न करता त्यांनी युद्धभूमीवरच आपल्या सोबतच्या कमी जखमी सहकार्‍यांना वाचविण्याचा आग्रह धरला. ‘ते वाचू शकतात, तर त्यांना वाचवा... मी कदाचित वाचू शकणार नाही, माझ्याकडे लक्ष देऊ नका...’ अशा त्यांच्या आग्रहातून दिसला तो मातृभूमीसाठी सर्वोच्च समर्पण करण्याचा करारी बाणा.

कारगिलच्या युद्धभूमीवर एक जुलै 1999 पासून कॅप्टन कृष्णकांत यांच्या पथकावर शत्रूच्या तळांवर गनिमी काव्याने हल्ले चढविण्याची कामगिरी सोपविण्यात आली होती. सलग पाच दिवसांच्या या हल्ल्यांमध्ये त्यांच्या तुकडीने शत्रूला त्यांच्याच ठिकाणी रोखून धरले होते. सात जुलैला सकाळी आठच्या सुमारास झालेल्या बॉम्बहल्ल्यात बॉम्बचे ‘स्पिंटर’ छातीतून आरपार गेल्याने त्यांचा अंत झाला. मृत्यू समोर दिसत असतानाही, त्यांच्या सोबतच्या जखमी सत्तारची काळजी त्यांना अधिक होती. ‘सत्तारको ज्यादा लगा है. उसे फर्स्ट एड करो...’ असे सांगत त्यांनी सहकार्‍याचे प्राण वाचविले. छातीतून रक्त भळाभळा वाहत असतानाही ते स्वतः चालत, शत्रूचा मारा चुकवीत पुढे निघाले. शत्रूच्या मार्‍यामुळे तेथे हेलिकॉप्टर उतरविणे शक्य नव्हते. साधारण दोन किलोमीटर अंतरापर्यंत ते स्वतः धावत गेले आणि एका डोंगराआड हेलिकॉप्टर उतरवून तेथे त्यांना वर चढविण्यात आले. तेथेही त्यांनी स्वतःआधी जखमी जवान सत्तार यांना हेलिकॉप्टमध्ये चढविले! हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधी हेलिकॉप्टरमध्येच त्यांचा अंत झाला.

कृष्णकांत माझ्याच गावचे. उदगीरचे. वयाने ते माझ्याहून दोन - चार वर्षांनी लहान पण कर्तृत्वाने कैकपटीने महान. हे संपूर्ण कुटुंबच माझ्या परिचयाचे, कारण त्यांचे वडील माझे शिक्षक. आपल्या अतुलनीय शौर्याने कॅप्टन कृष्णकांत अजरामर झाले. त्यांच्या हौतात्म्याची बातमी कळताच माझ्या शरीरावर सरारून उमटलेला काटा मला अजूनही आठवतो. लक्षावधी पाणावल्या डोळ्यांनी त्यांना दिलेला अखेरचा निरोप अजून डोळ्यासमोर येतो. कृष्णकांत यांच्या हौतात्म्यानंतर त्यांच्या वडिलांनी उदगीरमध्ये काही उपक्रम सुरू केले. त्यातील काही अजून चालू आहेत. सामान्य कुटुंबातील मुलगा आपल्या कर्तृत्वाने असामान्य होत कसा अजरामर होतो, हे त्यांनी स्वतःच्या बलिदानातून दाखवून दिले. 7 जून 1997 रोजी कृष्णकांत यांना सैन्यदलात कमिशन मिळाले. 7 जून 98 रोजी ते लेफ्टनंट झाले. 7 जून 99 रोजी ते कॅप्टन बनले आणि 7 जुलै 1999 रोजी त्यांनी मातृभूमीसाठी हौतात्म्य पत्करले.

दुसरे नाव आहे दिवंगत फ्लाईट कॅप्टन प्रसाद रमाकांत शेंडगे. 19 एप्रिल 1994 रोजी बिदरच्या विमानतळावरून त्यांचे मिग अवकाशात झेपावले. हवाई दलाच्या प्रशिक्षणातील त्यांचे ते शेवटचे उड्डाण होते. दुर्दैवाने त्यांच्या आयुष्यातीलही ते शेवटचेचे उड्डाण ठरले. पक्ष्याच्या धडकेचे निमित्त झाले आणि हे मिग कोसळले. त्यात या उमद्या, उदयोन्मुख हवाईदल अधिकार्‍याचा धक्कादायक अंत झाला. 15 सप्टेंबर 1972 रोजी सोलापुरात जन्मलेले प्रसाद वयाच्या जेमतेम 21-22व्या वर्षी हे जग सोडून गेले. सातारा सैनिकी शाळा आणि ‘एनडीए’या दोन्ही संस्थांतील प्रशिक्षणादरम्यान त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची आणि नैपुण्याची चमक दाखविलेली होती. विशेषतः मराठवाड्यातून बाहेर पडलेल्या तरुणांमध्ये बव्हंशी दिसणारा न्यूनगंड त्यांच्यात अजिबात नव्हता. बुद्धिमत्तेला सभाधीटपणाची मिळालेली जोड त्यांना हवाई दलाच्या सेवेपर्यंत घेऊन गेली. अमोघ वक्तृत्व, उत्तम चित्रकला, चांगली फोटोग्राफी आणि अपार देशभक्ती ही त्यांची वैशिष्ट्ये. डॉ. रमाकांत शेंडगे आणि सौ. विजया शेंडगे हे त्यांचे आईवडील शासकीय सेवेत कार्यरत होते. (दोघेही आता निवृत्त आहेत) त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी. हा एकुलता एक मुलगा हवाईदलात दाखल झाला तो कुटुंबाच्या पाठिंब्यानेच. या दोघांनीही आपल्या मुलाला सैन्यदलात जाण्यासाठी प्रोत्साहनच दिले. हा विेशास सार्थ ठरवीत अंगभूत गुणवत्तेच्या आधारावर ते हवाई दलातही ‘बॉम्बफेकी’ लढाऊ विमान चालविणार्‍या पथकात (बॉम्बर पायलट) सामील झाले. सर्वोच्च गुणवत्ता असलेल्या निवडक अधिकार्‍यांनाच ही संधी मिळते. अशी उच्च गुणवत्ता असणारा अधिकारी एका अपघातात कालवश होतो, हा दैवदुर्विलासच...

पण आपल्या पुत्राच्या निधनाने खचून न जाता या दाम्पत्याने त्यांच्या नावे ‘फ्लाईट कॅप्टन प्रसाद शेंडगे मेमोरियल ट्रस्ट’च्या माध्यमातून एक चांगला उपक्रम 1998 पासून चालू केला. प्रसाद यांच्या जन्मदिनी 15 सप्टेंबर रोजी शाहू महाविद्यालयाच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू झाला. दरवर्षी तीन दिवसांची व्याख्यानमाला या उपक्रमांतर्गत आयोजित केली जाते. 15 सप्टेंबर रोजी सैन्यदलातील करइरबद्दल मार्गदर्शन मिळते, 16 रोजी स्पर्धापरीक्षांबद्दल मार्गदर्शन केले जाते तर 17 रोजी सर्वसाधारण करइरविषयक प्रेरक व्याख्यानाचे आयोजन करण्यात येत असते. सैनिकी अधिकारी ‘सिव्हिलियन्स’च्या कार्यक्रमांना उपस्थित राहात नाहीत, असा संकेत आहे. पण प्रसाद यांच्या नावाने सुरू झालेल्या या उपक्रमात एअर मार्शल के. एन. नायर उपस्थित राहिले. हा उपक्रम अद्यापही सुरू आहे आणि दरवर्षी त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो. प्रसाद यांची स्मृती हैदराबादच्या वायूसेना अकादमीतही जपली आहे. तेथे त्यांच्या समृतिप्रित्यर्थ स्मृतिस्तंभ उभारण्यात आला आहे तर त्यांच्या नावाची एक ‘ट्रॉफी’ दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्याला दिली जाते.

याशिवाय; पती-पत्नी अशा दोघांनीही सैन्यदलात रुजू होण्याचा आगळा विक्रमही लातुरात पाहण्यास मिळाला. अभिजित भास्कर पाटील आणि सौम्यता अभिजित पाटील हे दाम्पत्य सध्या अनुक्रमे भूदल आणि हवाईदलात कार्यरत आहे. सन 2006 मध्ये अभिजित ‘एनडीए’च्या माध्यमातून सैन्यदलात रुजू झाले. सौम्यता सन 2010 मध्ये हवाईदलात रुजू झाल्या. सौम्यता मूळच्या उत्तर भारतीय. त्यांच्या कुटुंबातही सैन्यदलातील अधिकारपदाची परंपरा. त्यांचे वडील आणि काका सैन्यात ब्रिगेडियर आहेत! अभिजित यांच्या घरी जाऊन त्यांच्या माता-पित्यांना भेटण्याचा योग आला. अभिजित यांचा पत्रव्यवहार वाचता आला. एका पत्रात ते लिहितात, "In the Army, I have learnt to appreciate the beauty of life, the immense pleasure of sleep, the taste of water which is irreplaceble, the matchless value of willpower & all the wonderful things a man can do if he only wants to do...` आणखी एका पत्रात त्यांचा दृष्टीकोन अधिक स्पष्ट होतो - ‘आपण मध्यमवर्गीय आहोत हे आपलं नशीबच म्हणावं लागेल. जगात जे चांगलं आहे त्यावर आपला विश्र्वास आहे कारण आपण मध्यमवर्गीय आहोत. माणसाला पैशाची गरज असावी पण चटक असू नये...’ सैन्यदलातील ही सर्व उदाहरणे आपणासाठी नक्कीच प्रेरक ठरतील.

या पुस्तकातील सर्व 38 जण अशाच प्रकारे आपापल्या क्षेत्रात उत्तम रितीने कार्यरत आहेत. वेगळ्या वाटा चोखाळत त्यांची वाटचाल सुरू आहे. या38 जणांत सैन्यदलातील दोन व्यक्तिमत्वांचा आम्ही आवर्जुन समावेश केला आहे. सैन्यदल हा ‘करइर’चा एक उत्तम मार्ग आहे. भ्रष्टाचाराने बजबजलेल्या या वातावरणात आजही या एका क्षेत्राबाबत सामान्य माणूस आशावादी आहे. त्यांच्याकडे सर्व जण अजूनही आदराने पाहतात. मग या क्षेत्रात जाण्यासाठी प्रेरणा का मिळू नये? ‘आयकॉन्स’वर लिहिल्या जाणार्‍या विविध जिल्ह्यांतील पुस्तकांत किमान एक तरी ‘आयकॉन’ सैन्यदलातील हवा, हा आमचा आग्रह आहे. त्या दृष्टीने जाणीवपूर्वक हे ‘वीर’ शोधले जातात.

एक बाब येथे आवर्जून स्पष्ट करावीशी वाटते, की या पुस्तकात मांडलेले 38 जण म्हणजे लातूर जिल्ह्याचा परिपूर्ण परिचय नव्हे. ही नावे केवळ प्रातिनिधिक अशी आहेत. जिल्ह्यातील अनेक नावे अत्यंत जड अंतःकरणाने आम्हाला बाजूला ठेवावी लागली. ही बरीच मोठी यादी होऊ शकेल. कदाचित, या पुस्तकाचा दुसरा भाग भविष्यात प्रकाशित करावयाचे ठरल्यास ही नावेही त्यात समाविष्ट करणे शक्य होईल.

या निर्मितीसाठी लाभलेल्या ‘पोलाद’च्या निरपेक्ष सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.

लातूरच्या प्रेरणादायी विश्वात आपणा सर्वांचे स्वागत!

- दत्ता जोशी