Tuesday, July 1, 2014

सव्यसाचि प्राचार्य - रामदास डांगे

प्राचार्य रामदास डांगे हे परभणीच्या शैक्षणिक आणि आध्यात्मिक इतिहासातील अपरिहार्य नाव. शिवाजी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळणे असो की साहित्य संस्कृती मंडळाचे मराठी शब्दकोश प्रकल्पाचे प्रमुखपद असो... प्रत्येक जबाबदारी त्यांनी निष्ठेने सांभाळली. श्री ज्ञानेश्वरी मूलपाठ दीपिकेचे त्यांनी केलेले काम सुद्धा अलौकिक म्हणावे लागेल. प्रत्येक जबाबदारी निष्ठेने पार पाडणार्‍या प्राचार्य डांगे यांच्या सव्यसाचित्त्वाबद्दलच्या या आठवणी... आज १ जुलै रोजी पहाटे ते कालवश झाले...
 -------------------------------------------------------
तेया सर्वात्मका ईश्वरा। स्वकर्म कुसुमांची वीरा ।
पूजा केली होये अपारा । तोषालागि॥
‘‘तुम्ही करत असलेले काम हे ईश्वराचे काम आहे, भगवंताचे काम आहे... त्याची पूजा करायची तर ती स्वकर्माने करा... भगवंताला इतर कोणत्याही अवडंबराची गरज नाही...’’, ज्ञानेश्वरीचा दाखला देत डांगे सर सांगत असत.
समोर येईल ते प्रामाणिकपणे, सातत्याने, निष्ठापूर्वक करत जावे...’ , असे सांगताना ते आपले स्वतःचे आयुष्यच त्याच्या उदाहरणादाखल सादर करत..! प्राचार्य रामदास खुशालराव डांगे हे नाव म्हणजे परभणीच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक इतिहासातील एक अविभाज्य घटक. एक व्यक्ती किती प्रकारे, किती क्षेत्रांत आपले योगदान देऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे डांगे सर.
डांगे सर सन २००७ पासून पुणे मुक्कामी असत. मराठी शब्दकोश निर्मितीचे अनेक वर्षांपासून रेंगाळलेले काम त्यांनी सन 2007 ते २०१४ या काळात पूर्ण केले.  निवृत्तीनंतर केवळ उपजीविकेपुरते मानधन घेऊन पूर्ण समर्पित भावनेने या कामासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. सन 1970 मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले काम रेंगाळले. मागची 20 वर्षे हे काम सांभाळण्यासाठी कोणीही तयार नव्हते. मधु मंगेश कर्णिक यांनी पाठपुरावा केला आणि सन 2007 मध्ये डांगे सरांनी हे काम हाती घेतले. मराठी सारस्वताच्या प्रांगणातील एक महत्त्वाचे योगदान या निमित्ताने डांगे सरांनी दिले. त्यांच्या आजवरच्या वाटचालीत अशा अनेक नोंदी आहेत. त्यामुळेच त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात अपार आदरभाव आहे.
डांगे सर ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. ऋषीचं कूळ विचारू नये, असे म्हणतात. पण सरांसारख्या ऋषीचं कूळ-मूळ ठाऊक असण्याने त्यांच्या तपश्‍चर्येचे महत्त्व अधोरेखित होते. सरांचे सारे आयुष्य परभणीत गेलेले असले, तरी ते मूळचे परभणीचे नाहीत. विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील भालसी हे त्यांचे जन्मगाव. 12 जून 1936 हा त्यांचा कागदोपत्री जन्मदिनांक. खुशालराव आणि बिंदूबाई यांच्या परिवारातील 10 अपत्यांपैकी सर सर्वात धाकटे. त्यांचे वडील वारकरी. त्यामुळे घरात आध्यात्मिक परंपरा जुनीच. घरची परिस्थिती शिक्षणासाठी अतिशय प्रतिकूल. अशा परिस्थितीत त्यांच्यातील हुशारी जोखून मॅट्रिकपर्यंत नेणारे अमरावतीचे लेले मास्तर त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती ठरले. लेले मास्तरांनी सरांना शिकविले, अन्न-वस्त्राची सोय केली आणि फी सुद्धा भरली...! डांगे सर सांगतात, ‘लेले मास्तरांमुळे माझ्या आयुष्याचे सोने झाले.
सर्व प्रतिकूलतेतून मार्ग काढत ते इंटरपर्यंत पोहोचले. तेव्हा त्यांचा अभ्यासविषय गणित होता. त्यानंतर त्यांनी विषय बदलला. अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयातून ते 1958 मध्ये बी.ए. आणि 1960 मध्ये एम.ए. झाले. मराठी घेऊन पूर्ण केलेल्या या दोन्ही अभ्यासक्रमांत त्यांनी विद्यापीठात प्रथम येत सुवर्णपदके पटकावली. त्या वेळच्या रुढींप्रमाणे बी.ए. करतानाच 1957 मध्ये ते विजयाबाईंशी विवाहबद्ध झाले. त्यांचे लग्न जलीलभाई नावाच्या एका मुस्लिम गृहस्थाने जुळविले. विजयाबाई मूळच्या अकोल्याजवळील टाकळीच्या.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उपजीविकेसाठी नोकरीची गरज होती. अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालयात त्यांना शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी प्राध्यापकाची नोकरी दिली. 1960 ते 1961 या शैक्षणिक वर्षांदरम्यान ते या महाविद्यालयात कार्यरत होते. जून 1961 मध्ये त्यांच्यासमोर वेगळा पर्याय आला. शिशुपालवधया विषयावरील पहिले जुने हस्तलिखित मिळवून त्यावर डॉ. मा. गो. देशमुख अमरावतीत काम करीत होते. त्यांची बदली औरंगाबादला झाली. त्यांच्या भेटीसाठी डांगे सर औरंगाबादेत आले. ज्येष्ठ साहित्यिक ग.त्र्यं. माडखोलकर यांचे चिरंजीव तेव्हा औरंगाबादेत नोकरीत असल्याने ते सुद्धा तेथे आलेले होते. तेव्हा देवगिरी महाविद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्षपद विनायकराव पाटील यांच्याकडे होते. ते माडखोलकरांचे स्नेही. त्यातून डांगे सरांसमोर औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू होण्याचा प्रस्ताव आला. तो त्यांनी स्वीकारला आणि 15 जून 61 रोजी ते देवगिरीत रुजू झाले. दोन वर्षे देवगिरी महाविद्यालयात काम केल्यानंतर 15 जून 1963 रोजी त्यांना प्रोफेसरपदी बढतीही मिळाली. पण 15 दिवसांतच त्यांच्यासमोर परभणीत शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून रुजू होण्याची ऑफर ठेवण्यात आली. त्या काळातही औरंगाबाद सोडून परभणीत येण्याचा विचार धाडसीच होता. पण ते धाडस डांगे सरांनी केले आणि ते 1 जुलै 1963 रोजी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून परभणीत दाखल झाले. तेथे ते 12 वर्षे प्राचार्य होते. जनाबाई महाविद्यालयाचे 11 वर्षे आणि महिला महाविद्यालयाचे 10 वर्षे अशी तब्बल 33 वर्षे त्यांनी प्राचार्यपदांची जबाबदारी सांभाळली...! या काळात अनेक पिढ्या त्यांच्या हाताखाली घडल्या.
प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळताना सुद्धा त्यांच्यातील सामाजिक भान असणारा माणूस गप्प बसलेला नव्हता. प्राचार्यपदावर असतानाच सामाजिक कारणांसाठी ते तीन वेळा तुरुंगात गेले. पहिला प्रसंग 1972 मध्ये परभणीत कृषिविद्यापीठ स्थापन होण्याच्या मागणीचा. त्या साठी तेव्हा पुकारलेल्या आंदोलनात त्यांना अटक करण्यात आलेली होती. त्यानंतर, 1975 च्या दरम्यान आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांनी पुकारलेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. बराच काळ ते भूमिगत होते. 1992 मध्ये देशभर पेटलेल्या राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात सुद्धा ते सहभागी झाले होते. त्या काळातही त्यांना काही काळ तुरुंगात टाकण्यात आले होते. त्यांची वैयक्तिक मते त्यांनी प्रत्येक वेळी स्पष्टपणे मांडली असली, तरी परभणीतील अनेक मोठ्या मोठ्या लोकांच्या व्याख्यानांच्या - कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान भूषविण्याची विनंती विविध विचारधारांच्या संयोजकांनी डांगे सरांनाच केलेली होती. वैयक्तिक मते आणि सामाजिक आचरण यांचा समतोल त्यांनी नेहेमीच साधला. 
जून 1996 मध्ये सर निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर बहुतेक जण सुखाचे आयुष्य जगण्यासाठी घर बांधतात, एखाद्या ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य होतात आणि शिळोप्याच्या गप्पा मारण्यात वेळ घालवतात, हे सार्वत्रिक चित्र. पण डांगे सरांच्या बाबतीत नेमके उलट घडले. नोकरीच्या काळात वेळेअभावी, त्या त्या कामांना पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळे जी कामे शक्य झाली नाहीत, ती त्यांनी सेवानिवृत्तीच्या नंतर हाती घेतली...! त्यातील पहिले काम होते ज्ञानेश्वरीच्या मूळपाठांचे संशोधन.
संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ती त्यांच्या सच्चिदानंदबाबा या शिष्याने लिहून काढली. त्यानंतरच्या शेकडो वर्षांच्या प्रवासात या ज्ञानेश्वरीच्या असंख्य प्रती लिहिल्या गेल्या. त्यातून लिहिणार्‍याच्या योग्यतेप्रमाणे त्यात असंख्य पाठभेद निर्माण झाले. त्यावर संशोधन करून मूळ ज्ञानेश्वरी सिद्ध करण्याचे आव्हान उचलण्याचे डांगे सरांनी निवृत्तीनंतर ठरविले आणि 1996 ते 2007 या काळात एकट्याने मेहनत करून श्री ज्ञानदेवी मूलपाठ दीपिकालिहून काढली...! हे काम सोपे नव्हते.
वास्तविक हे काम 1962 मध्येच अनौपचारिकरित्या त्यांनी सुरू केले होते. मामासाहेब दांडेकर औरंगाबादेत आले होते तेव्हा त्यांच्याशी झालेल्या चर्चेत या विषयाचे सूतोवाच झालेले होते. तेव्हापासूनच हा विषय सरांच्या मनात घोळत होता. खरे तर त्या आधीही डांगे सरांनी या विषयावर लिहिले होते. 1958 मध्ये बी.ए. करत असतानाच त्यांनी ज्ञानेश्वरीच्या तिसर्‍या अध्यायावर एक टिपण प्रसिद्ध केले. त्यावर प्रा. भाऊ मांडवकर यांनी तेव्हा यवतमाळहून प्रकाशित होणार्‍या लोकमतमध्ये परीक्षण लिहिले होते. ज्ञानेश्वरीतील पाठभेदावरील विचार तेव्हापासून मनात कायम होता. त्यातही, वारकरी संप्रदायाची घरातील परंपरा त्यांना या विषयाकडे पुनःपुन्हा ओढून नेत होती.
ते सांगतात, ‘‘नक्कल उतरवताना लेखक चुका करतो. राम-रमा-रमी... साधारण एकसारखे वाटणारे शब्द... लेखक अशा चुका करू शकतात. त्यातून पाठभेद निर्माण होतात. हे दूर करण्यासाठी काय करायचे? सर्व भागांत प्रवास करून मी 40 प्रती निवडल्या. त्यांचा अभ्यास सुरू केला.’’
प्रती मिळविण्याचे हे काम खूप महत्त्वाचे होते, तसेच जबाबदारीचेही. अभ्यासासाठी नेमकी कोणती प्रत मिळवायची, याचे आडाखे महत्त्वाचे होते. त्या दृष्टीने विचार करून तशी पार्श्‍वभूमी असलेली हस्तलिखिते त्यांनी मिळविली. त्यांचा अभ्यास सुरू केला. 1996 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी या विषयात पूर्णांशाने लक्ष घातले. ते सांगतात, ‘‘ज्ञानेश्वरी हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. तो शुद्ध असलाच पाहिजे. या आधीही यामध्ये शुद्धीचे प्रयोग झाले, पण मूळ प्रतीच निवडताना त्या सदोष निवडल्या गेल्या. त्यामुळे प्रमाण प्रत समोर आली नाही. 1907 मध्ये मुंबईत माडगावकरांनी प्रसिद्ध केलेली प्रत महत्त्वाची होती. प्रा. हर्षे, प्रा. बनहट्टी यांनी केलेले काम अपूर्ण राहिले. पण ते चांगले काम होते. मीही काही हस्तलिखिते मिळविली. या पोथ्यांसाठी मी दोन वर्षे भारतभर प्रवास केला. एक प्रत तर मला अंदमानातून मिळाली!’’
हे काम सुरू केले, त्या आधी त्यांची पांडुरंगशास्त्री आठवले यांच्याशी भेट झाली. पांडुरंगशास्त्री म्हणाले, ‘‘या कामासाठी कुणाचे अनुदान घेऊ नकोस. ही माउलींची सेवा आहे.’’ आणि ते खरेच होते. डांगे सरांच्या मनातही हाच भाव होता. कारण, या कामी सरकारी अनुदानासाठी प्रयत्न केला असता, तर कदाचित 8-10 लाखाचे अनुदान पदरात पडले असते. एखादा सहाय्यकही मिळाला असता. पण डांगे सर त्या मोहात पडले नाहीत. चार माणसांचे हे काम त्यांनी एकट्यांनीच पुढे रेटले. कसे असते हे नेमके काम? चार जणांनी एकत्र बसून आपापल्याकडील मूळ प्रतींचे वाचन करायचे. त्यातील शब्दांची रचना शोधायची. त्यातून योग्य पाठ निवडायचा...! ज्ञानेश्वरीतील प्रत्येक अक्षर अशा पद्धतीने वाचायचे...!
डांगे सरांनी हे काम एकट्याने केले. ज्ञानेश्वरीत 9 हजार ओव्या आहेत. प्रत्येक ओवीत 10 शब्द. असे 90 हजार शब्द, त्यांची अक्षरे... अशी साडेतीन लाख अक्षरे... ती सुद्धा 40 पोथ्यांतून तुलना करून घ्यायची... हे काम खूप मोठे आणि कठीण होते. या कृतीला टेक्सच्युअल क्रिटिसिझमम्हणतात. मराठीत त्याला पाठचिकित्साम्हणता येते. पाठचिकित्सेमध्ये संहितानिश्‍चितीकिंवा संहितेचे मूलस्थापनअभिप्रेत असते. उपलब्ध प्रतींच्या आधाराने ग्रंथाच्या मूलरूपाचा शोध घेणे, संहितेची यथामूल पुनःस्थापना करणे हे अशा अभ्यासाचे उद्दिष्ट होय.’ 
प्रतिशुद्ध प्रतीचा इतिहास संत एकनाथांपासून सुरू होतो, असे सांगताना डांगे सर नाथांच्याच काही ओळी समोर ठेवतात -
श्रीशके पंधाराशे साहोत्तरी। तारण नाम संहोत्सरी। 
एका जनार्दनें अत्यादरी। गीताज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली॥
ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध। परि पाठांतरि शुद्धाबद्ध।
तो शोधुनियां एवंविध। प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी॥
या परंपरेत अनेक मान्यवरांनी हे काम केलेले आहे. डांगे सरांनी अलिकडच्या काळात केलेले हे काम त्यामुळेच महत्त्वाचे ठरते. आपली इतर सर्व कामे बंद ठेवून सरांनी 1996 ते 2003 या काळात हे काम पूर्ण केले. या द्विखंडात्मक ग्रंथाचा पहिला खंड पुण्याच्या श्री वामनराज प्रकाशनाने 23 मार्च 2003 रोजी प्रकाशित केला. दुसरा खंड प्रकाशित होण्यास मात्र बराच वेळ गेला. त्याचा अभ्यास 2007 मध्येच पूर्ण झाला, पण अशा ग्रंथांना आर्थिक दृष्टीने मांडलेली गणिते सोडविणे जमत नसते... अखेर डायमंड पब्लिकेशन्स यांनी 16 मार्च 2010 रोजी दुसरा खंड प्रकाशित केला. या दोन खंडांतून डांगे सरांनी आपल्या अभ्यासकौशल्याला पणाला लावून केलेले एकहाती काम अभ्यासकांसमोर आले.
या कामाबद्दलची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतात. डॉ. तुकाराम गरूड, डॉ. अरुण प्रभुणे सांगतात,  ‘‘सरांनी समीक्षित संहितापद्धतीची रूढ चाकोरी सोडून स्वतःची अशी एक व्यवहार्य रीत शोधली व वापरली. पाठभेदाचे अथवा संहिता चिकित्सेचे कार्य पारंपरिक पद्धतीत कागदावर रकाने पाडून व त्या प्रत्येक रकान्यामध्ये चरणातील एक एक अक्षर नोंदवून; ते प्रत्येक अक्षर तपासत जाणे, हे काम आजवर चालत आले आहे. डांगे सरांनी ही पद्धत स्वीकारली नाही. आधारप्रत पाहिजे, असा आग्रह न धरता त्यांनी एका मुद्रित प्रतीत पाठभेद नोंदविण्याचे काम केले. हस्तलिखितांचे दोन गट करून त्यातही पाठभेद त्या प्रतींत नोंदविले. मुद्रित प्रतींचा एक आणि हस्तलिखित प्रतींचे दोन असे तीन संच करून तर्कशुद्ध पाठसंहितभागी लिहून त्या खाली इतर प्रतीतील पाठांची नोंद केली. सरांचा हा नवा प्रयोग व्याप व पसारा कमी करणारा ठरलाच, शिवाय पूर्वीच्या पाठचिकित्सेत होणार्‍या चुका या पद्धतीत संपुष्टात आल्या. पाठचिकित्सा करण्यामागे सरांची भूमिका स्वच्छ दिसते. उगाच गरळ ओकण्यापेक्षा व कोणाची निंदानालस्ती करून संशोधनात कसा गोंधळ चालला आहे हे दाखविण्यापेक्षा विद्वानांच्या अभ्यासपूर्ण मतांचा परामर्श घेणे हा त्यांचा स्वच्छ हेतू दिसतो.’’ 
ही कामगिरी पूर्ण होत असतानाच त्यांच्यासमोर दुसरे आव्हान ठेवण्यात आले.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या प्रेरणेतून सन 1970 च्या सुमारास सुरू झालेले मराठी शब्दकोशाचे काम डांगे सरांकडे सोपविण्याचा निर्णय शासनाने घेतला. हे काम खूप मोठे आहे. साधारणपणे तीन हजार डबलडेमी पृष्ठांचे (म्हणजे या पुस्तकाच्या पृष्ठाच्या दुप्पट आकाराचे पृष्ठ), एक लाख 25 हजार शब्दांचा समावेश असलेले सहा खंडांतील हे काम खूप आधी पूर्ण होणे गरजेचे होते. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या वतीने हे काम होत असल्यामुळे त्याचा दर्जा, गुणवत्ता सर्वश्रेष्ठच असणे अपेक्षित होते. हे काम सुमारे 20 वर्षे ठप्प होते. ज्ञानेश्वरीच्या कामाच्या पूर्ततेनंतर मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ मराठी साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या पाठपुराव्यातून शासनाने हे काम डांगे सरांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आणि सन 2007 मध्ये सर पुण्यात डेरेदाखल झाले.
काही लाखांच्या कमाईची चांगली संधी असतानाही पतीपत्नीच्या उपजीविकेपुरते पैसेघेत डांगे सरांनी या कामाला प्रारंभ केला. दोन दशके बंद असलेले काम करताना ते पुन्हा पहिल्यापासूनच सुरू करावे लागते. काळानुरूप भाषा बदललेली असते, नव्या भाषेतील शब्द आपल्या भाषेत आलेले असतात. या सर्वांचा धांडोळा घेत हे काम पूर्ण करावे लागते. या कामासाठी सरांनी कंबर कसली. डोंगराएवढे हे काम सन 2007 ते 2014 या काळात सरांच्या नेतृत्त्वाखाली नेटाने पूर्ण करण्यात आले. ते मार्च 2014 मध्ये 6 खंडांत प्रकाशित झाले. पुरवणीचे कामही सन 2014-15 मध्ये पूर्ण होईल.
हे काम संपते न संपते तोच त्यांच्याकडे व्युत्पत्ती कोशाचे काम सोपविण्यात आले होते. मराठीतील विविध शब्दांची व्युत्पत्ती कशी झाली, याचा शोध यामध्ये घ्यावयाचा आहे. हे काम डिसेंबर 2014 मध्ये संपणे अपेक्षित होते. मराठीतील अनेक मूळ शब्द वेगवेगळ्या भाषांतून आले आणि मराठीत रूढ झाले. तमिळ, कानडी, तेलुगू, पोर्तुगिज, इंग्रजी, संस्कृत, हिंदी, उर्दू, फारसी, अरबी अशा विविध भाषांतून आलेले हे शब्द शोधून त्यांचे मूळरूप शोधून काढायचे.  अलीकडेच तिसरे एक काम प्राचार्य डांगे यांच्याकडे आले आहे. संतकवी दासोपंत विरचित गीतार्णवाच्या शब्दकोशाचे काम राज्य मराठी विकास संस्थेने त्यांच्याकडे सोपविले आहे. गीतार्णवहा मराठी भाषेतील पहिला आणि शेवटचा बृहद्ग्रंथ मानला जातो. या ग्रंथाची ओवीसंख्या आहे सव्वा लाख! संपूर्ण ग्रंथही प्रकाशित नाही. त्यामुळे हस्तलिखिताच्या आधारे हे काम करावे लागणार आहे. हस्तलिखित वाचण्याचा दांडगा अनुभव असल्याने हे काम 2-3 वर्षांत पूर्ण होईल व हे काम प्राचार्य डांगेच करू शकतील, असा संस्थेचा विश्वास होता.
 आपण सिद्ध केलेल्या प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरीचा सांप्रदायिकांत प्रसार व्हावा म्हणून सौ. डॉ. मीराबाई आणि डॉ. तुकाराम गरूड या दाम्पत्याच्या सहकार्याने प्रस्तुत ज्ञानेश्वरीची पारायण प्रतडांगे सरांनी कोल्हापूरच्या अजब प्रकाशनाच्या मदतीने अवघ्या 50 रुपयांत उपलब्ध करून दिली आहे.
ज्ञानेश्वरीचा सर्वसंग्राहक शब्दकोशहा त्यांचा आणखी एक संकल्प-प्रकल्प. ज्ञानेश्वरीच्या सर्वच कोशांचे एकत्रीकरण तर केलेच आहे. शिवाय ज्ञानेश्वरीचे काही जुने हस्तलिखितकोशही डांगे सरांना उपलब्ध झाले आहेत. तंजावर कोश आणि आरे मराठीचा कोश या मुळे काही नवीन अर्थ समोर येतात. निरंजन रघुनाथांचा कोशही अपूर्ण असाच आहे. त्याचाही उपयोग या कोशात केलेला आहे. ओम् नमोजी आद्याम्हणजे श्री विठ्ठलह्या नव्या अर्थाचे दर्शन मनोहर आहे... ही मोलाची कामे डांगे सरांच्या हातून होत होती !
प्राचार्य रामदास डांगे यांचा हा सारा प्रवास पाहताना हे व्यक्तिमत्त्व अतिशय गंभीर असल्याचे दिसते, पण त्याला हजरजबाबीपणा आणि विनोदाची झालरही असते. असे अनेक प्रसंग त्यांच्या मित्रमंडळीत चर्चेत असतात. प्राचार्य रा. रं. बोराडे सांगतात, ‘‘अमरावती विद्यापीठाच्या सिनेटवर नियुक्ती झाल्याबद्दल आम्ही डांगे सरांचे अभिनंदन केले व त्यांना पेढे मागितले. त्यावर ते उत्तरले एक तारखेला देतो.’ ‘पेढे एक तारखेलाच का?’ असा प्रश्‍न विचारताच ते उत्तरले एक तारखेला पे-डेअसतो...!’’
असाच एक अनोखा प्रसंग थेट विनोबा भावे यांच्यासमोरचा...! डांगे सर विनोबांना आपला आदर्श मानतात. त्यांची ज्ञानार्जन करण्याची वृत्ती आणि साधेपणा आपल्याला भावतो, असे ते आवर्जुन सांगतात. एकदा डांगे सर आचार्य कुलाच्या बैठकीसाठी नागपूर येथे गेले असताना परतीच्या प्रवासात ते पवनार येथे विनोबांना भेटण्यासाठी गेले. डांगे सरांच्या सोबत गोविंदराव देशपांडे होते. विनोबांना तेव्हा खूप कमी ऐकू येत असल्याने गोविंदरावांनी डांगे सरांचा परिचय करून देताना पाटीवर प्राचार्य रामदास डांगेअसे लिहून दाखविले. त्यावर विनोबा मिश्किलपणे हसले आणि ते म्हणाले, ‘शंकर, रामानुज, मध्व, निंबार्क (...आणि या परंपरेतील आणखी 13-14 नावे त्यांनी घेतली) हे सारे आचार्य आणि तुम्ही प्राचार्य... तुम्हाला नमस्कार’’.
साक्षात विनोबांनीच ही फिरकी घेतल्याने डांगे सर गोंधळले, पण लगेचच सावरले. त्यांनी पाटीवर लिहिले, ‘‘प्रशासनाय आचार्यः प्राचार्यः इति मे मतिः’’ अर्थात, ‘प्रशासन सांभाळणारा आचार्य तो प्राचार्य, असे माझे मत.त्यांचा हा खुलासा विनोबांना खूप आवडला. विनोबांना अशी एखादी गोष्ट आवडणे म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या बुद्धीची कसोटीच असे... त्या कसोटीला त्या काळात डांगे सर उतरले...!
वैयक्तिक मते कोणतीही असली, तरी सामाजिक भान राखत सर्वांशी मिळून मिसळून राहणारी, निगर्वी, ‘अजातशत्रूअसलेली त्यांची प्रतिमा त्यांच्या निवृत्तीनंतरही त्यांचा सन्मान करणारी ठरली. म्हणूनच, पदावरून निवृत्ती पत्करल्यानंतर सुमारे 15 वर्षांनी; परभणीतील या माजी प्राचार्याचा भव्य नागरी सत्कार 12 जून 2010 रोजी करण्यात आला. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्थितप्रज्ञहा गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आला. सरांच्या जीवनकार्याचा उत्तम परिचय करून देणार्‍या अनेक लेखांनी हा अंक सजला आहे. एखाद्या प्राचार्याच्या आयुष्यात असा प्रसंग महाराष्ट्रात खूप कमी वेळा येतो...!
सर सांगतात, ‘‘जे समोर येईल ते प्रामाणिकपणे, सातत्याने आणि निष्ठापूर्वक करत गेलो. एकदा एखाद्या कामाला होकार दिला, की मी ते काम करतो. मी कामालाच पूजा मानतो आणि ती मनोभावे करतो.’’ सारे आयुष्य अध्यापनात घालविलेल्या डांगे सर नव्या पिढीसाठी मात्र काहीही सांगण्याचे नाकारत. ते म्हणत, ‘‘प्रत्येक पिढीचे आकाश निराळे असते. स्वधर्मे निधनं श्रेयः, परधर्मो भयावहःएवढेच मी सांगेन आणि धर्मचा अर्थ इथे कर्मअसाच घ्यावा, असे आवर्जून सुचवेन...’’

-    दत्ता जोशी 

Tuesday, February 4, 2014

महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाने वाचावे असे...

दिव्य मराठी या दैनिकात आज दि. 5 फेब्रुवारी रोजी प्रकाशित झालेला हा लेख-
------------------------------------------
मराठी माणसांच्या नव्या पिढीत उद्योजकता आणि शेती-शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळावी, यासाठी जिल्ह्यजिल्ह्यांतून उद्योजक व शेतकरी शोधून ते पुस्तकरूपाने मांडण्याचा उपक्रम मुक्त पत्रकार दत्ता जोशी अणि पोलाद या उद्योगाने मिळून हाती घेतलाय. या मालिकेत आतापर्यंत सातारा आयकॉन्स, सांगली, लातूर, उस्मानाबाद, जालना, नांदेड, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नगर आयकॉन्स ही 10 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. भविष्यात राज्यभरात हा उपक्रम नेण्याचा त्यांचा मानस आहे. ही पुस्तक मालिका आणि त्यामागील प्रेरणांबद्दल... 
-------------------------------------------
सांस्कृतिक पर्यावरणातील साहित्य संमेलने, काव्यवाचन, एकांकिका महोत्सव आदी देखावे काही तरुणांची मने आकर्षित करतात. पण त्यांच्या एकंदर संख्येच्या मानाने सहभाग असणार्‍यांची संख्या नगण्य आहे. बहुसंख्य तरुणांना समाजाने घेतलेली गती भोवळ आणणारी वाटते. समाधानाच्या जागा दुर्मिळ होत चालल्या आहेत. प्रेरणास्रोत आटून जाताहेत. असे वाटत असतानाच समाजजीवनात सकारात्मक, दिलासा देणारे, प्रेरक असे काही घडतच असते. फक्त निराश न होता त्यांच्याकडे लक्षपूर्वक पाहिले पाहिजे. असा एक प्रकल्प मराठवाड्यातील औरंगाबाद-जालनासारख्या शहरातून आकार घेतो आहे.

दत्ता जोशी यांनी हा लक्षणीय प्रकल्प हाती घेतला आहे. 'आयकॉन्स' हे त्यांच्या प्रकल्पाचं नाव. जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या श्रमसातत्यातून, उपक्रमशीलतेतून, चिकाटी आणि कल्पकतेतून आपल्या कार्यावर व्यक्तित्व कोरले आहे. अशा व्यक्ती ग्रंथरूपात येणारी ही मालिका जिल्हानिहाय आहे. आयकॉन्सच्या निवडीसाठीचे काही निकष यासाठी आहेत. ते निकष परिपूर्ण आहेत वा निवड केलेल्या आयकॉन्सची यादी परिपूर्ण आहे, असा कोणताच दत्ता जोशी या लेखक-संपादकाचा नाही. कारण आयकॉन्सचा शोध आणि निवड हा ते शोध प्रक्रियेचा भाग मानत असावेत, असे त्यांच्या लेखनातून जाणवते. त्यांच्या या लेखनाच्या केंद्रवर्ती महाराष्ट्रातील आजची तरुण पिढी आहे. आयकॉन्सच्या या लेखकाने घेतलेल्या मुलाखती विलक्षण प्रत्यय देणार्‍या आहेत. त्या विलक्षण यासाठी वाटतात की, त्याच्या निवडीमागे त्यांची वस्तुनिष्ठ निकषांवर आधारलेली दृष्टी काम करताना दिसते.

पन्नाशीच्या आतील ती व्यक्ती चारित्र्यसंपन्न असावी, व्यावसायिक सचोटी आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा मिलाफ त्या व्यक्तिमत्त्वात झालेला असावा, प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत वर्धमान होण्यावर त्यांचा विश्वास असावा. र्शमसाधनेतून निर्माण झालेल्या उत्पादनाकडे समूहभावाने पाहण्याची दृष्टी असावी. या निकषासह उत्पादनक्षमता आणि निर्मितीक्षमता वा उपक्रमशीलता यांच्यामध्ये असलेले अंगभूत नाते लक्षात घेऊन. या निकषांचे सतत भान ठेवत दत्ता जोशी आयकॉन्सच्या शोधात असतात. पुस्तकात त्यांनी अनेक आयकॉन्सनी केलेल्या कार्याचे र्मम, त्याच्या र्शमाच्या प्रक्रियेत झालेला त्याच्या विचाराचा विकास, इतरांसोबत काम करण्यातून निर्माण झालेली समूहनिष्ठ जाणीव याचा एक आलेख वाचकासमोर ठेवला आहे. यातला प्रत्येक आयकॉन प्रेरणेची गंगोत्री होण्यासारखा आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रातल्या या आयकॉनविषयी वाचत असताना त्या प्रत्येकाचे र्शम, त्याच्या आई-वडिलानं खाल्लेल्या खस्ता वाचकांसमोर तरळत राहतात. नवा विचार-योजना-शोधाची दिशा-क्षितिज या गोष्टी दिसू लागतात आणि त्या नव्या साहसाला, नव्या आव्हानाला बळ पुरवत असतात. अशाच आयकॉन्सची निवड जोशी यांनी केली आहे.

ही निवड करताना वर म्हटल्याप्रमाणे त्यांनी जीवनाची विविध क्षेत्रे लक्षात घेतली आहेत. अगेन्स्ट ऑल ऑड्स, त्या त्या क्षेत्रामध्ये स्वत:ला रोवून, उद्यमशील राहून त्यांनी त्या क्षेत्राला विकसित केले. काही आयकॉनचे अनुभव सामाजिक जाणिवेच्या थेट गाभ्यापर्यंत नेणारे आहेत. काही उद्योजकीय कल्पकतेला हात घालणारे आहेत, काही कचरा डोपो ते आयआयटी पवईपर्यंतचा प्रवास करून र्शमाला प्रतिष्ठित करणारे, काही व्यवस्थेच्याअजगरी विळख्याचं वास्तव समोर ठेवणारे आहेत. या ग्रंथांमधला प्रत्येक आयकॉन जीवनावरचा विश्वास वाढवणारा आहे.

वानगीदाखल म्हणून लातूर आयकॉन्स या पुस्तकातील मिलिंद कांबळे यांचे कर्तृत्व नजरेखालून घालता येईल. (त्यांना 2013 मध्ये पद्र्मशी हा नागरी सन्मानही जाहीर झाला आहे.) आंबेडकरी आर्थिक विचारातील र्ममदृष्टी स्वीकारून तिला दृश्यरूपात विकसित करणारे ते एक अफलातून उद्योजक आहेत. त्यांनी 2005 मध्ये दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉर्मस अँड इंडस्ट्रीज (डिक्की) ची स्थापना केली. 2011 मध्ये त्यांनी दलित उद्योजकांची राष्र्ट्रीय परिषद आयोजिली. तीत दरवर्षी एक कोटीहून अधिक कर भरणार्‍या टॉप टेन दलित उद्योजकांचा सत्कार घडवून आणला. या संमेलनात 150 उद्योजकांचे स्टॉल्स होते. वयाच्या 17 व्या वर्षी चप्पल घालायला मिळालेला अशोक खाडे नावाचा उद्योजक आपल्या कंपन्यांमधून आज 4500 कर्मचार्‍यांना सामावून घेतो आहे. अशा सगळ्या उद्योजकांसाठी पुढाकार घेऊन मिलिंद कांबळे यांनी राष्ट्रीय स्वरूपाचं व्यासपीठ निर्माण केलं. त्यांच्या या राजकारण निरपेक्ष गुणवत्तेची प्रतिमा, हा लौकिक रतन टाटा यांच्यापर्यंत पोहोचल्याने ते स्वत: परिषदेस उपस्थित होते. त्यांनी जे आश्वासन दिले ते चैतन्य निर्माण करणारे होते. कारण टाटा उद्योगसमूहाला लागणार्‍या वस्तूंची दहा टक्के खरेदी दलित उद्योजकांकडून करण्याचे ते आश्वासन होते. दलित राजकीय नेतृत्वाने अस्मितेचा जागर सुरू ठेवला. तो आवश्यक होता, पण तो अर्थयुक्त नव्हता. मिलिंद कांबळे यांनी दलित इंडस्ट्री सुरू करून तो अर्थयुक्त ठेवला. आंबेडकरी आर्थिक विचाराचा हा गाभा आहे. एक इंडस्ट्री म्हणजे एक संबंधाचे जाळे. या सहसंबंधांना नव्या आर्थिक व्यवस्थेच्या दिशेने त्यांना वळवायचं आहे आणि त्याद्वारेच आजच्या व्यवस्थेत आमूलाग्र बदल
घडवता येतो ही त्यांची धारणा आहे.

एवढी मोठी पुस्तक मालिका सिद्ध करण्यासाठी मोठय़ा अर्थसाहाय्याची गरज असते. आर्थिक कणा आवश्यक असतो. जालन्याच्या पोलाद या लोखंडी सळई उत्पादक कंपनीचे संचालक सुनील गोयल आणि त्यांचे सहकारी यांनी ती केली. त्यांची ही भूमिका, प्रेरणा आणि पुढाकार महत्त्वाचा आहे. त्यांनी दत्ता जोशी यांना आर्थिक पाठबळ दिले आणि व्यवसायाला सामाजिक आणि सांस्कृतिक परिमाण असते हे त्या मदतीतून सूचित केले. या आयकॉन्सच्या चरित्रकार्यातून दोन टक्के युवापिढी विद्यार्थ्यांनी फायदा उचलण्याचे ठरवले तर सामाजिक संवेदन असणारी उद्योजकीय वृत्ती महाराष्ट्राचे चित्र पालटून टाकेल.

पुस्तकातील हे आयकॉन्स उद्योजकीय क्षेत्रातील संख्येने अधिक दिसतात. त्यात एक जाणीवपूर्वकता दिसते. कारण महाराष्ट्रातील मराठी भाषिकांनी उद्योग व्यवसायात जी एक रिस्क असते तिला सामोरे जाण्याचे धाडस कधी दाखवलेच नाही. काही तुरळक अपवाद आहेत. उद्योजकता मराठी भाषिकांच्या हाती नसल्यामुळे मराठी भाषेच्या विकासाचा एक महत्त्वाचा स्रोत निसटलेला दिसतो आणि म्हणून उद्यमशील आयकॉन्स या मालिकेत ते जास्त दिसतात. या सर्व जिल्हानिहाय आयकॉन्सची एक त्रैमासिक बैठक बोलावली पाहिजे, अनुभवाचे शेअरिंग व्हायला हवे, त्यात आवर्जून तरुणांना निमंत्रित करण्यात यावे. या आयकॉन्सच्या विचारांच्या देवाण-घेवाणीतून, उद्योजकीय अनुभवातून काही नवे परिप्रेक्ष्य (पस्र्पेक्टिव्ह) आकार घेण्याची शक्यता असते आणि महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातील निवडक आयकॉन्सचे वार्षिक मेळावे राष्ट्रस्तरावर झाले तर महाराष्ट्राचा उद्योजकीय इथॉस दृष्टिपथात येईल.
-------------------
प्रकाशित लेखाची लिंक -
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/05022014/0/1/

Wednesday, November 13, 2013

सचिनचे मनगट... आणि शारजाची अविस्मरणीय खेळी !

ते १९९८ चे वर्ष. मी तेव्हा पुण्यात `सकाळ`मध्ये नोकरी करीत असे. `त्या` दिवशी रात्र-पाळी नसल्याने संध्याकाळी लवकर घरी परतलो होतो. जेवण झाल्यावर साहजिक टीव्ही लावला. २२ एप्रिलची ती रात्र... शारजातील तिरंगी स्पर्धेतील भारत – ऑस्ट्रेलिया सामना चालू होता. ऑस्ट्रेलिया आधीच फायनलमध्ये पोहचला होता. भारत आणि न्यूझीलंड या पैकी ज्याचा रन-रेट जास्त, तो फायनलला जाणार... दिवसा ऑस्ट्रेलियाची फलंदाजी झाली होती आणि फ्लडलाईट मध्ये भारत खेळणार होता...

भारताची अवस्था वाईट होती. सामना तर हातातून गेल्यात जमा होता, पण फायनलला जाण्या इतकी सरासरी सुद्धा गाठणे अवघड दिसत होते. त्यातच शारजात कुप्रसिद्ध असलेले `डेझर्ट स्टोर्म` स्टेडीयमवर झेपावले. जवळ जवळ अर्धा तास वाया गेला... नव्याने रनरेट ठरविला गेला आणि फायनलमधील पात्रतेची शक्यता आणखीच दूर गेली...
ऑस्ट्रेलियाने २८४ धावा ठोकल्या होत्या. भारताला जिंकण्यासाठी २८५, तर फायनलला जाण्यासाठी किमान २५४ धावा हव्या होत्या. वादळानंतर हे लक्ष्य बदलले. ४ षटके कमी झाली आणि विजयासाठी २७४ धावांचे आव्हान उरले. त्याच वेळी, २३७ धावा केल्या तर भारत फायनलला जाऊ शकत होता. आता हे लक्ष्य अवघड दिसत होते. मी पलंगावर आडवा होऊन सामना पाहू लागलो. पाच-दहा मिनिटे पाहून झोपी जाण्याचा माझा विचार होता. कारणही तसेच होते. गांगुली १७, अझहर १४, नयन मोंगिया ३५ आणि अजय जडेजा १ धावा काढून परतले होते. शेन वार्न फॉर्मात होता.

वादळाच्या काळातही सचिनने आपले हेल्मेट उतरविलेले नव्हते... मैदानावर उतरण्यआधी त्याने नवे लक्ष्य समजावून घेतले आणि लक्ष्मणला जोडीला घेवून सचिनने नव्या धावांचे आव्हान स्वीकारले... एक अलौकिक निर्धार त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता... त्याने एक-दोन चेंडू सीमापार तडकावले आणि मी झोपलेला उठून बसलो. एक वादळ शमले होते, दुसरे साऱ्या स्टेडियमभर घोंघावत होते... त्या दिवशी मी सचिनचा रुद्रावतार पहिला... ९ चौकार आणि ५ षटकारांसह १३१ चेंडूत १४३ धावा काढून आणि भारताचा फायनलचा प्रवेश निश्चित करून तो बाद झाला... बादही झाला तो दुर्दैवी पद्धतीने... ती वेदना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती. याच सामन्यानंतर शेन वार्नला स्वप्नातही तेंडूलकर दिसू लागला होता...!


२४ तारीख उजाडली... शारजाच्या पद्धतीप्रमाणे शुक्रवारी फायनल... फायनलचा toss सुद्धा ऑस्ट्रेलियानेच जिंकला. स्टीव्ह वा च्या संघाने भारतासमोर २७२ धावांचे आव्हान ठेवले होते. सचिन फलंदाजीला आला, तो जणू सेमीफायनलचा डाव पुढे चालू ठेवतच...! ४४ चेंडूंतच त्याने ५० चा टप्पा ओलांडला. १२ चौकार आणि ३ षटकारांसह त्याने १३१ चेंडूत १३४ धावा फटकावल्या. तो बाद झाला, तोवर भारताच्या २४८ धावा फलकावर झळकलेल्या होत्या... अखेर भारताने ४९ व्या शतकातच सामना जिंकला आणि कोका-कोला कपही जिंकला...

त्या दिवसापर्यंत टीव्हीवर सामना पाहताना मी अनेकदा पलंगावर आडवा होत असे. मस्त लोळत सामना पाहण्याचे सुख काही औरच असे. पण, सचिनच्या या दोन्ही खेळी पाहताना मात्र मी उठून बसलो...!

या गोष्टीला आता १७ वर्षे उलटून गेली. सचिनच्या त्या दोन खेळी माझ्या हृदयावर कोरून राहिलेल्या आहेत... त्यानंतर त्याने असंख्य विक्रम नोंदविले... माझ्या मनाला खूप आनंद दिला... तो भारतासाठी खेळत होता की स्वतःसाठी...? असे अनेक कद्रू प्रश्न अनेकांना पडले. ते सगळे मी दूर सारतो. मी म्हणतो, `सचिन माझ्यासाठी खेळत होता. जगभरातील माझ्यासारख्या असंख्य क्रिकेटप्रेमींसाठी खेळत होता. त्याने आम्हाला निखळ आनंद दिला.`
त्याच्या या उपकारातून मुक्त होणे अवघड. त्याच्याबद्दलचा स्नेहार्द आदरभाव मनात कायम होता... राहील. 

म्हणूनच शारजातील `त्या` अविस्मरणीय खेळीनंतर मी कधीही सचिनची खेळी झोपून पाहिली नाही. तो फलंदाजीला आला, की मी झोपलेला असलो तरी उठून बसत असे... आजारी असलो तरी...! हीच माझी त्याला मानवंदना...!

१९९२ – ९३ मध्ये सचिन औरंगाबादला आला होता. औरंगाबादच्या `वेदांत` या नव्याने सुरु झालेल्या तारांकित हॉटेलच्या `हेल्थ क्लब`चे उद्घाटन करण्यासाठी तो आलेला. तेव्हा त्याचा आंतरराष्ट्रीय क्षितिजावर नुकताच उदय झालेला पण आपले पाणी त्याने जगाला दाखवून दिलेले. या कार्यक्रमाची प्रवेशिका `गरुड`च्या गोविंद देशपांडे अर्थात काकांनी मला दिलेली. मी कार्यक्रमाला जाऊन बसलो. मुद्दाम, सचिन ज्या मार्गिकेतून जाणार त्या मार्गीकेलगतच्या खुर्चीत. तो आला. पुढे निघाला. मी दुरून त्याचा चेहरा पहिला आणि जवळ आल्यावर माझे लक्ष त्याच्या रुंद – मजबूत – कणखर मनगटावर लागलेले...! पु.ल. म्हणाले तसे लताच्या सुस्वर गळ्याला हात लावून पाहावा, सुनीलचे मनगट चाचपून पाहावे, तसे मी सचिनचे मनगट पाहत होतो...! याच मनगटातील ताकदीने त्याने पुढे सारे क्रिकेटविश्व जिंकले...!

तो आता निवृत्त होतोय. १४ ते १८ नोव्हेंबर २०१३ दरम्यानचा सामना मी काही काळ तरी पाहीन पण सचिनची फलंदाजी मात्र नक्कीच पाहीन. पूर्ण वेळ... बिछान्यावर आडवा न होता...! आणि त्याने या सामन्यात दोन्ही डावांत शतके ठोकावीत, असे मला मनापासून वाटते...! पण असे वाटणे म्हणजे परत अपेक्षा...! या अखेरच्या सामन्यातही अपेक्षांचे ओझे? पण काय करणार? सचिनला जशी क्रिकेटची सवय तशी आम्हाला त्याच्याकडून अपेक्षांची...!



त्यासाठी माझ्या आणि साऱ्या सचिनप्रेमींच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!