Thursday, July 28, 2011

चंगळवादात होतेय संस्कतीची ऐशी-तैशी !

`दैनिक लोकमत` च्या `हेलो औरंगाबाद` मध्ये दर शुक्रवारी प्रकाशित होत असलेल्या 'संस्कृती, साहित्य वगैरे' या स्तंभात 22-7-2011 रोजी प्रकाशित झालेला हा लेख. 
...................................................................................
काही दिवसांपुर्वी गोव्यातील धार्मिक स्थळांच्या बाबतीत एक बातमी वाचण्यात आली होती. तेथील विविध धार्मिक स्थळांमध्ये पर्यटकांकडून होत असलेल्या असभ्य वर्तनामुळे तोकड्या कपड्यांतील पर्यटकांना प्रवेशच नाकारण्याचा निर्णय तेथील काही पुरातन मंदिरांनी आणि चर्चेसनी घेतला असल्याचे त्या बातमीत म्हटले होते. ज्या कपड्यांमध्ये हे लोक समुद्रकिनारी मजा करीत हिंडत असत, त्याच वेशात मंदिरात - चर्चेमध्येही येत. अशा लोकांच्या झुंडी रोखण्यासाठी संबंधित धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनांनी हा निर्णय घेतला. एका चर्चने अशी बंदी न घालता तोकड्या कपड्यात आलेल्या व्यक्तींना अंगावर पांघरण्यासाठी 
तात्पुरते वस्त्र देण्याचा आणि हे वस्त्र पांघरूनच मंदिरात प्रवेशाची परवानगी देण्याचाही निर्णय घेतल्याचे यात म्हटले आहे.

हे सारे मुळातच धक्कादायक आहे. हा विषय फक्त गोव्यापुरता किंवा मंदिर - चर्चपुरता मर्यादित नाही. पर्यटनसंस्कृतीचा विकास होत असताना मानवी संस्कृतीची जागा विकृती घेत असल्याचे भय यातून डोकावते आहे. उच्छृंखलतेचा कळस गाठणार्‍या घटना मागील चार - पाच वर्षांत सगळीकडेच घडत आहेत. मध्यंतरी शनी शिंगणापूर येथे चोरी झाल्याची बातमी आली होती. विना कडी-कुलपाचे भारतातील हे एकमेव गाव होते. या गावात चोरी झाली तर चोरी करणारा मरतो अशी श्रद्धा - किंवा अंधश्रद्धा - या गावात होती. कदाचित मागील शतकापासून हे चालत आले असेल. त्यामुळे या गावातील पोलिस रेकॉर्ड साफ होते! अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ही ‘अंधश्रद्धा’ दूर करण्यासाठी ‘चला शनी शिंगणापूरला - चोरी करायला’ असे एक अभिनव आंदोलन केले. हे त्याचेच तर ‘यश’ नव्हे? त्या चोराबद्दल अद्याप ठावठिकाणा लागला नाही, त्यामुळे तो जिवंत आहे की मेला, याचा उलगडा झाला नाही. अशा स्थितीत देव-धर्माविषयीची अंधश्रद्धा समाजाच्या मनातून दूर होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करायचा की त्या निमित्ताने पुरातन काळापासून चालत आलेला नैतिकतेचा धाक संपल्याबद्दल खंत व्यक्त करायची, हेच आता समजेनासे झाले आहे. ईश्र्वर आपले काहीही वाकडे करू शकत नाही याची करून दिलेली जाणीव आणि पोलिस काहीच करू शकत नाहीत याची झालेली खात्री अशा दुहेरी बिनधास्तीतून काही जणांचे हे उद्योग चालू असतात. त्यामुळे समाजातील पापिभिरू मने मात्र भयभीत होतात.

सुरवातीला गोव्याचा विषय निघाला, म्हणून आठवले - गोव्याचे पहिले मुख्यमंत्री आणि तेथील जनमानसात परम आदराचे स्थान असलेल्या काकासाहेब बांदोडकरांचा बंगला मीरामार बीचलगत आहे. त्याला स्मारकाचा दर्जा दिला गेला आहे. तेथील कंडक्टेड टूरमध्ये त्याच्या शेजारचा, विख्यात चित्रकार मारिओ मिरांडाचा बंगला दाखविला जातो पण बांदोडकरांच्या बंगल्याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.

2004 मध्ये गोव्यात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट झाली होती. गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिल्यानंतरच्या काळात दिल्लीत प्रजासत्ताक दिनी सादर होणारा गोव्याचा चित्ररथ कायम समुद्रकिनारा, फेणी आणि पोर्तुगीज जीवनशैली यावर आधारित असायचा. हा विषय त्यांच्याशी छेडला तेव्हा ते सत्तेवर आल्यानंतर तेथील सामान्य लोकजीवन, कला यांना यामध्ये स्थान देण्यास सुरवात करीत असल्याचे ते म्हणाले होते. हे सारे विषय वरकरणी खूप छोटे छोटे आहेत, पण त्यातून ध्वनित होणारे परिणाम खूप महत्वाचे ठरणारे असतात.

देवाच्या दरबारातील वर्तनाबद्दलचा आणखी एक मुद्दा. तिरुपतीच्या मंदिरातही तोकडे कपडे घालून जाण्यास परवानगी नाही. म्हणजे, अगदी बर्म्यूडा आणि टी शर्ट असा वेष असेल, तरीही रांगेतून बाहेर काढले जाते. अशा स्थितीत मनात एक विचार डोकावला, ईश्र्वराला सर्वोच्च शक्ती मानले जाते, तर त्याच्या दरबारात जाताना काही औपचारिक संकेत पाळले जाऊ नयेत? आपापल्या कार्यालयात आपल्या ‘बॉस’समोर जाताना जे निकष - संकेत - प्रोटोकॉल सर्वसाधारणपणे पाळले जातात, त्यांचेच पालन त्या ‘सर्वोच्च बॉस’समोर का होऊ नये? आणि ईश्र्वराच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उमटवायचे असेल, तर मग तिथे कडमडायचेच कशाला?

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा जशी पुसट आहे, तशी संस्कृती आणि विकृतीतील सीमारेषा पुसट नाही. ती अगदी ठळक आहे. (परत, संस्कृती म्हटले की काही जणांना शेंडी जानवे आठवते!) वर्तन, आचार-विचार, खाद्य-पान, परस्पर सहिष्णुता ही सारी संस्कृतीचीच रुपे नाहीत का? भौतिक सुविधांचा अतिरेक चालू असताना त्याच्या मुळाशी हे अधिष्ठान असेल, तर वर उल्लेखलेले प्रकार घडणार नाहीत. हे प्रकार घडू नयेत, अशी काळजी सर्वांनीच घेतली तर समाजस्वास्थ्यही कायम राहू शकेल.

भक्ती, ईश्र्वर, श्रद्धा हे सर्व विषय बाजूला ठेवले तरी वाढती असहिष्णुता, बेदरकारी, सात्विकतेची कुचेष्टा हे प्रकार सध्या सगळीकडेच वाढत आहेत, हे सत्य नाकारता येत नाही. अशा प्रकारचे वर्तन हा संस्कृतीवरील बलात्कारच नव्हे का? 

- दत्ता जोशी
9225 309010


Thursday, July 21, 2011

महाराष्ट्र टुरिझम ’डिस्करेज्मेंट’ कार्पोरेशन!

`दैनिक लोकमत` च्या `हेलो औरंगाबाद` मध्ये दर शुक्रवारी प्रकाशित होत असलेल्या 'संस्कृती, साहित्य वगैरे' या स्तंभात 22-7-2011 रोजी प्रकाशित झालेला हा लेख. 
...................................................................................

‘एमटीडीसी’ या संस्थेच्या बृहद्रुपामध्ये (लॉंगफॉर्म) ‘महाराष्ट्र टूरिझम’ नंतरचा शब्द ‘डेव्हलपमेंट’ आहे की ‘डिस्‌करेजमेंट’ असा प्रश्न मला नेहेमीच पडतो. कागदोपत्री ते ‘डेव्हलपमेंट’ असेच आहे, पण वास्तवात मात्र त्याचे दर्शन ‘डिस्‌करेजमेंट’ असेच होते ! ज्यांनी ‘एमटीडीसी’चा खासा पाहुणचार अनुभवला आहे, त्यांना त्याची यथार्थता लक्षात येईल. पर्यटकांना महाराष्ट्रातील पर्यटनस्थळी येण्यापासून ‘परावृत्त’ करण्याकडेच या विभागाचा कल दिसतो. या विभागाच्या कार्यालयात गेल्यानंतरचे वातावरण पाहिले, तर ‘ही अवदसा कुठून इथे उपटली’ अशा नजरेने बहुतांश चेहरे तेथे जाणार्‍या व्यक्तीकडे पाहत असतात! आरक्षण मिळवून पर्यटनस्थळी गेल्यानंतर तेथील विश्रामगृहांमधील अजागळपणा, गैरसोयी यांची यादी तर न संपणारी. वसूल केले जाणारे दर तर प्रचंड असतात, पण ‘व्हॅल्यू फॉर मनी’चा विषय दूरदूरपर्यंत दिसत नसतो!

औरंगाबादेत सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचे पर्यटनमंत्री येत असल्याचे कळले. यात महाराष्ट्राचेही पर्यटनमंत्री असावेत, असा माझा अंदाज आहे!  त्यामुळे हा विषय आठवला! नाहीतर हा विषय विसरण्याकडेच जास्त कल असतो! आता आठवलाच आहे, तर थोडा आढावा घेऊ या.

1999 मध्ये राज्याचे पर्यटन धोरण ठरले. त्याची मुदत 2004 पर्यंत होती. या 5 वषार्र्ंत या धोरणानुसार काय काय झाले, याची माहिती कुठे मिळत नाही. 2004 ते 2006 या काळात राज्याला पर्यटन धोरणच नव्हते! 2006 मध्ये नवे पर्यटन धोरण आखण्यात आले. या वेळी मात्र परत एकदा नव्या धोरणाची डोकेदुखी नको, या भावनेने असेल, पण हे धोरण 10 वर्षांसाठी ठरविण्यात आले. म्हणजे आता 2016 पर्यंत पहायला नको! बाकी काहीही असो, पण हे धोरणही चांगले आहे. यानुसार राज्यातील कलाकारांचा शोध घेऊन त्यांच्या सहकार्याने एमटीडीसीतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे, स्थानिक कलाकारांना संधी मिळवून दिली पाहिजे, असे या धोरणात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्थानिक उत्सवांचे कॅलेंडर तयार करावे, पर्यटकांना स्थानिक खाद्यसंस्कृतीची ओळख करून देण्याच्या दृष्टीने एमटीडीसीने प्रयत्न करावेत, स्थानिक खाद्यसंस्कृतीचे महोत्सव भरवावेत असेही या धोरणात नमूद करण्यात आले आहे.

प्रत्यक्षात काय स्थिती आहे? असे किती महोत्सव आयोजित झाले? किती स्थानिक खाद्यपदार्थांचा शोध घेण्यात आला? उलट परिस्थिती अशी आहे, की ‘एमटीडीसी’ रिसॉर्टमध्ये चालविल्या जाणार्‍या उपाहारगृहांत मराठी खाद्यपदार्थ मिळत नाहीत ! कारण यातील बहुसंख्य उपहारगृहे अमराठी कंत्राटदारांना बहाल करण्यात आलेली आहेत. पोहे, उपमा, बटाटेवडा हे पदार्थ या उपहारगृहांतून बाद झालेले आहेत. मराठी जेवणाची स्थिती तर दयनीय आहे. हे जेवण ज्या दर्जाचे दिले जाते, ते पाहून मराठी भोजनाचा आस्वाद घेऊ इच्छिणार्‍या एखाद्याच्या मनात महाराष्ट्रविषयी अत्यंत तिरस्काराची भावना दाटून येऊ शकेल! पर्यटकाच्या खिशातून भरपूर पैसा उकळूनही असे ‘ड’ दर्जाचे अन्न का दिले जात असावे? की या पैशाला वाटा फुटत असतात? मग उरलेल्या पैशात असेच देणे परवडते? काय गुपित आहे?

या धोरणात ‘पिलग्रिम सर्किट’चा उल्लेख आहे. त्या त्या परिसरातील प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणारे ‘पिलग्रिम सर्किट’ तयार झाले पाहिजे असे यात म्हटले आहे. महाराष्ट्रातील दूर ठेवा, एकट्या मराठवाड्यात तीन ज्योतिर्लिंग आहेत. वेरूळ, परळी आणि औंढा. या तीन ज्योतिर्लिंगांना जोडणारी कोणती व्यवस्था उपलब्ध आहे? जेमतेम 250 किलोमीटरच्या परिघातील या तीन ठिकाणांना जोडणारी व्यवस्था रस्त्यांवर तर उपलब्ध नाहीच, पण ‘एमटीडीसी’च्या संकेतस्थळावर परळी आणि औंढ्याच्या ज्योतिर्लिंगांचा उल्लेखच नाही! तिथे फक्त भीमाशंकर, घृष्णेश्र्वर आणि त्र्यंबकेश्वराचा उल्लेख ‘ज्योतिर्लिंग’ म्हणून करण्यात आला आहे! हे सर्किट कधी जोडणार? याचा पाठपुरावा कोण करणार?

याच धोरणांनुसार एअरपोर्ट, एसटी स्टँड, रेल्वे स्टेशनवर ‘इन्फर्मेशन किऑस्क’ तयार करावेत व त्या द्वारे पर्यटकांना आकर्षित करावे, असे नमूद केले आहे. हे किऑस्क कोणकोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहेत? राज्यात या काळात 175 कोटींच्या गुंतवणुकीची आणि किमान 900 जणांना रोजगार देण्याची योजना याच धोरणात नमूद करण्यात आली आहे. या 10 वर्षांतील 5 वर्षे तर संपली. यातील किती गोष्टींची अंमलबजावणी झाली आहे?

वाचनीयतेच्या दृष्टीतून पाहायचे, तर 2006च्या पर्यटन धोरणाचे हे 25 पानी ‘डॉक्युमेंट’ अत्यंत वाचनीय व स्फुर्तीदायक आहे. पण पुढे काय? राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसिंचन विभाग आदींच्या ताब्यात असलेल्या चांगल्या लोकेशनवरील विश्रामगृहांचे रुपांतर पर्यटक विश्रामगृहांमध्ये करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. यात पर्यटन सचिव, सार्वजनिक बांधकाम सचिव, जलसिंचन सचिव, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि पर्यटन विभागाचे उपसचिव यांचा समावेश होता. या समितीची झोप अजून संपली नाही का? त्यांनी अशी किती ठिकाणे निश्चित केली आहेत? किती रेस्टहाऊसचे रुपांतर गेस्टहाऊसमध्ये करण्यात आले, याचे उत्तर देण्यास ही समिती बांधील नाही का? 


तसे पाहिले, तर सध्या कोणीच कुठल्या गोष्टीचे उत्तर देण्यास बांधील नाही, अशी स्थिती आहे. उत्तर मिळालेच, तर चुकल्याचुकल्यासारखे वाटेल!

- दत्ता जोशी
9225 30 90 10


Tuesday, July 19, 2011

भारताच्या रोजच्या मृत्यूचे सोयरसूतक कुणाला?


भारत रोज कणाकणाने मरतो आहे. कधी तो नेत्यांच्या भ्रष्टाचाराने मरतो तर कधी या नेत्यांना तुरुंगातही ‘व्हीआयपी’ ट्रीटमेंट दिल्याचे पाहून मरतो. रेल्वेच्या अपघातांमध्ये तर तो महिन्यातून किमान एकदा मरतो आणि बॉंम्बस्फोटांत तो (राहूलबाबाच्या भाषेत सांगायचे तर) एक टक्का तरी मरतोच मरतो...! या मरणाचे सोयरसुतक कुणाला आहे का?

......................................................
पाक्षिक `शेतकरी संघटक`च्या 21 जुलै 2011 च्या अंकात प्रकाशित झालेला लेख...
......................................................
जिल्हा कोर्टासमोरून जात होतो. पोलिस व्हॅनमधून कोणा व्यक्तीला पोलिस हातकड्या घालून उतरवीत होते. त्या माणसाची रया पूर्णतः गेली होती. अत्यंत मळलेले कपडे, गालावर वाढलेले दाढीचे खुंट, अस्ताव्यस्त पसरलेले केस आणि पाय अनवाणी, डोळ्यातील चमक नाहिशी झालेली... अशी अवस्था झालेल्या या माणसाने कोणता गुन्हा केला असेल, या उत्सुकतेपोटी बंदोबस्तावरील हवालदाराकडे मी सहज चौकशी केली. त्याने उत्तर दिले, ‘x x x x ने घरफोडी केली. नव्वद हजाराचा डल्ला मारला. पळून चालला होता, लोकांनी पकडून फोडून काढला आणि ठाण्यात आणला.’ मला सर्वांचीच कीव आली. पोलिसाची, लोकांची, ज्याच्या घरी चोरी झाली त्याची आणि या चोराचीही. पोलिसांची या साठी, की अशा ‘चिल्लर’ चोरांना पकडण्यात त्यांचा वेळ अकारण वाया जात आहे. लोकांची या साठी की ज्या चोरांना चामडी लोळेपर्यंत फोडून काढून भर चौकात फासावर चढवायला पाहिजे अशा महाचोरांना ते फोडून तर काढत नाहीत, उलट आपले प्रतिनिधी म्हणून निवडून देतात. ज्यांच्या घरी चोरी झाली त्यांची या साठी की आता कुणाच्याच घरी काहीही सुरक्षित राहिलेले नाही आणि चोराची या साठी की फक्त 90 हजारांच्या चोरीसाठी त्याची ही अवस्था झाली. लाखो कोटींचे दरोडे घालणारे पंचतारांकित तुरुंगात सरकारी पाहुणचार घेत आहेत...!


मला ए. राजा, कनिमोळी, सुरेश कलमाडी प्रभृतींचे पोलिसांच्या गराड्यात तुरुंगातून कोर्टात आणि कोर्टातून तुरुंगात जात असतानाचे हषोल्हासित चेहरे आठवले. यांच्या चेहर्‍यावरील आणि कपड्यांवरीलही घडी मोडलेली नव्हती. राजाचे वर्तन तर खरोखरच राजाप्रमाणे होते पण कनिमोळीसुद्धा नुकत्याच एकाद्या ब्युटीपार्लरमधून आल्यासारख्या प्रफुल्लित दिसत होत्या. सुरेश कलमाडी यांचे तर काय सांगावे? एखाद्या सम्राटालाही लाजवील असा त्यांचा अविर्भाव आहे. कोर्टाजवळ चपलेने मारण्याचा प्रयत्न झाल्यानतंरही त्यांच्या मुखकमलावर विलसणारे हास्य पाहून त्यांच्यात लज्जाभाव अस्तित्वात तरी आहे काय, याविषयी शंका निर्माण झाली. भुरट्या चोर्‍या करणाराची अत्यंत वाईट अवस्था पाहताना लाखो कोटींचा भुगा करणारे हे लोक अशा कडक इस्त्रीच्या कपड्यांनिशी कसे राहू शकतात? तुरुंगात डांबण्याचे आदेश असताना एखाद्या महालात असल्यासारखी त्यांची सरबराई कशी होते? हे सुद्धा संबंधित न्यायमूर्तींनी तुरुंगाला भेट दिल्यानंतर लक्षात यावे? याहूनही कळस म्हणजे संबंधित जेलरला अंदमानला पाठविण्यात आले. ज्यांना अंदमानला पाठवायचे ते जेलरच्या कक्षात चहापान करणार आणि बिचारा जेलर काळ्यापाण्यावर? त्याला कशाला बळीचा बकरा बनविण्यात आले? कलमाडींना चहा देण्याचा, तुरुंगाच्या कोठड्यांना कुलपे न घालण्याचा निर्णय घेण्याइतका अधिकार त्याच्याकडे खरेच आहे? असे अधिकार फक्त देशाच्या सरकारला आणि गृहमंत्र्यांना असतात. त्यांना जाब विचारण्याची कुणाची हिम्मत नाही... इथे भारत कणाकणाने मरतो आहे.
x x x
उत्तर भारतात एकाच दिवशी दोन रेल्वे अपघात झाले. त्यांची सांगण्यात येणारी कारणे वेगवेगळी असली तरी खरे कारण फक्त एकच आहे - बेपर्वाई. स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या रेल्वे अपघाताची जबाबदारी घेऊन तत्कालीन रेल्वेमंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिल्याची घटना आता दंतकथा वाटावी अशी स्थिती निर्माण झाली आहे. रेल्वेच्या अपघातावाचून एकही महिना जात नाही. मनमोहनसिंगांच्या सरकारात ज्या मंत्र्यांकडे जी जबाबदारी दिली आहे, त्यानी ती सांभाळाचीच नाही असा अलिखित नियम आहे की काय अशी शंका येते. ममता बॅनर्जी यांच्याकडे मागील अडिच-तीन वर्षे रेल्वे खाते होते. त्यातील अधिकांश काळ त्या कोकोत्यात तळ ठोकून होत्या. स्वतःला वेळ देता येत नसेल तर त्यांच्याच पक्षातील कुणा दुसर्‍या कडे हे खाते का दिले गेले नाही? कोणत्याही लालसा नसलेल्या या बाईंना लाल दिव्याची एवढी लालसा का होती? याचे उत्तर तर त्या ही देऊ शकणार नाहीत.
नुकत्याच झालेल्या या दोन अपघातांमध्ये नेमक्या किती जणांचा बळी गेला, हे 48 तासपर्यंत कळू शकले नव्हते. मदत आणि बचाव कार्याची ही अवस्था? हा यंत्रणेतील दोष की अनास्थेचा परिणाम? देशाचा रेल्वेमंत्री कोण, हे ही देशाला आता आठवत नाही. रेल्वेच्या यंत्रणेतील दोषांवर कशासाठी पांघरूण घातले जाते? दोषारोपांच्या फैरी एकमेकांवर टोलविण्याचा प्रयत्न कशासाठी होतो आहे? दोन - पाच लाखांच्या मदतीनंतर संबंधित कुटुंबांची आयुष्यभराची झालेली हानी भरून येणार आहे का? इथे माणसाचा जीव सर्वात स्वस्त झाला आहे... इथे भारत कणाकणाने मरतो आहे.
x x x 
मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाले. मृतांची संख्या मोजायचे तर मी आता बंदच केले आहे. मध्यंतरी एक व्यंगचित्र पाहण्यात आले होते. विज्ञानात तीन स्थिती शिकविण्यात येतात. इंग्रजीत त्याला ‘स्टेट’ म्हणतात. ‘सॉलिड’स्टेट, ‘लिक्विड’स्टेट आणि ‘गॅस’स्टेट. या व्यंगचित्रात या तीनही स्थिती लिहून त्यावर त्याच्या आकृती म्हणून त्या स्थिती दर्शविणारी चित्रे काढली होती. त्यात फक्त आणखी एका स्थितीची वाढ त्यांनी केली होती. ती होती ‘सॉफ्ट’स्टेट. आणि त्यावर चित्र म्हणून भारताचा नकाशा काढला होता. कोणीही यावे आणि हल्ले चढवून जावे, अशी भारताची ही स्थिती बनली आहे. ‘सॉफ्ट’ स्टेट. 
आणि दुर्दैवाची बाब म्हणजे दर वेळी अशा हल्ल्यांनंतर मुंबईकरांचे कौतिक करण्याची चढाओढ लागते. ‘मुंबईकर पुन्हा कामावर’, ‘मुंबईचे जनजीवन अल्पावधीतच पूर्ववत’, ‘मुंबईचा हल्लेखोरांना जबरदस्त जबाब’ वगैरे... पण खरोखरच ही स्थिती आहे का? मुंबईकर खरेच या बॉम्बहल्ल्यांना जबाब देत लगेचच आपले जीवन पूर्ववत करतात? त्यांना तर आपापल्या रोजीरोटीचे पडलेले असते. बाहेर पडले नाहीत तर त्यांचे मरण नक्की असते. कारण या स्पर्धेच्या वातावरणात ते बाहेर पडले नाहीत, तर त्यांची रोटी हिरावून घेण्यासाठी कोणीतरी टपून बसलेला असतो. बाहेर पडले तर मरणाची शक्यता तान वर्षांतून एकदा असते. घरातच बसला तर दुसर्‍याच दिवशी मरण नक्की ठरते... मुंबईकरांच्या जिद्दीला सलाम ठोकण्याच्या गप्पा करण्याआधी ही वस्तुस्थिती कोणी समजून घेईल?... इथे भारत कणाकणाने मरतो आहे.
x x x 
या स्फोटांनंतर सगळ्यात वाईट वाटले, ते भावी पंतप्रधान राहूल गांधी यांच्या वक्तव्याचे. त्यांच्या आजी आणि त्यांचे वडील अशाच भ्याड हल्ल्यांचे बळी ठरले. एखाद्या व्यक्तीच्या नात्यातील दोन व्यक्ती एकाच पद्धतीच्या हल्ल्यात मारल्या जाण्याचे कदाचित राहूल गांधी किंवा त्यांचा परिवार हे एकमेव उदाहरण असावे. कोर्टाच्या भाषेत ही ‘रेअरेस्ट रेअर’ अशी केस. अशी व्यक्ती ‘एक टक्का दहशतवादी हल्ले होतच राहणार’ असे या हल्ल्यांचे समर्थन करते? कोण काहीही म्हणो, राहूल गांधी हे या देशाचे भावी पंतप्रधान आहेत. कदाचित, पुढील निवडणुकीत कॉंग्रेस पक्षच बहुमताने सत्तेवर आला तर त्याच वेळी किंवा हरला तर पुढील निवडणुकीनंतर ते नक्कीच पंतप्रधान होणार आहेत. अशी व्यक्ती जेव्हा काही बोलते, तेव्हा या देशाच्या भविष्याची ती नांदी ठरत असते. ‘एक टक्क्या’ची थइरी अमेरिकेत का नाही दिसली? ब्रिटनमध्ये का नाही दिसली? ब्रिटनमध्ये अतिरेकी समजून निरपराध मुस्लिम व्यक्तीला ठार केल्यानंतर तिथे मानवतावाद्यांचे मोर्चे निघाले नाहीत की पाकिस्तानात घुसून ओसामाला आणि इराकमध्ये घुसून सद्दाम हुसेन यांना मारल्यानंतर अमेरिकेत मानवतावाद्यांनी आवाज केला नाही. अशा भंपकपणाला तेथे थारा नाही. भारतात मात्र हे बाजारबुणगे अशा वेळी पुढे सरसावतात. अशा मंडळींच्या मालमत्तेची कधी चौकशी होत नाही की त्यांच्या उत्पन्नाचे ज्ञान स्त्रोत आणि त्यांची प्रत्यक्षातील संपत्ती यांची मोजदाद होत नाही. त्याची मागणीही कोणी करीत नाही.
‘दहशतवाद असा चिरडावा लागतो’ असे सांगणारी अफजलखानाचे पोट फाडण्याची शिवरायांच्या कृतीची चित्रे दाखविण्यावर आक्षेप घेणार्‍यांनी आता याच मथळ्याखाली अमेरिकेने छिन्नविच्छिन्न केलेल्या ओसामा बिन लादेनचे चेहरे असलेली पोस्टर लावण्याची परवानगी द्यायला काय हरकत आहे? 
x x x 
स्फोटानंतर देशाचे गृहमंत्री लगबगीने मुंबईत आले आणि हा स्फोट कशामुळे झाला असावा, हे त्यांनी सांगितले. हे सांगण्यासाठी ते मुंबईत आले? हे काम तर संबंधित खात्याच्या दुय्यम अधिकार्‍याचे आहे. त्यासाठ गृहमंत्र्यांनी कशासाठी वेळ द्यावा? राज्यात तुमचे सरकार, केंद्रात तुमचे सरकार. तुमच्या घरात घुसून अतिरेकी मुडदे पाडतात आणि हे मुडदे पाडण्यासाठी त्यांनी काय तंत्रज्ञान वापरले, याचे विश्लेषण गृहमंत्री करतात! ‘सामना’कारांच्या भाषेबद्दल अनेक वेळा मनात उलटसुलट प्रतिक्रिया येत असतात, पण या गृहमंत्र्यांसाठी ते नेहेमी वापरत असलेले ‘लुंगीपुचाट’ हे विशेषण वापरण्याचा मोह मलाही येथे आवरत नाही.
या देशाची स्थिती मोठी विचित्र झाली आहे. ज्यांनी विश्रांती घेत निवृत्त जीवन जगावे, ते पंतप्रधान आहेत. ज्यांना स्वतःच्या ‘इगो’पलिकडे काहीही जपायचे नाही, ते देशाला जपणारे गृहखाते सांभाळत आहेत, ‘मिडविकेट’वर क्षेत्ररक्षक उभा करायचा म्हणजे नेमका कुठे हे ज्यांना कळत नाही, ते क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होत आहेत, एरव्ही प्रत्येक निर्णयावर लक्ष ठेवणार्‍या कॉंग्रेस अध्यक्षा घोटाळ्यांवर घोटाळे उघडकीस येताना तोंड उघडत नाहीत, ज्यांना तातडीने फासावर लटकवायला हवे, ते कसाब, अफजलगुरू याच्यासारखे नराधम तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट घेत सुरक्षितपणे जगत आहेत आणि ज्यांच्या सुरक्षित जीवनाचा मूलभूत हक्क घटनेने मंजूर केला आहे ते या देशाचे नागरिक किड्यामुंग्यांप्रमाणे मरत आहेत... इथे भारत कणाकणाने मरतो आहे.
x x x 
कणाकणाने मरणार्‍या भारतात सुखाने जगत आहेत ते फक्त राजकीय नेते. हे सुख पक्षनिरपेक्ष आहे. ज्या जीवनशैलीत ‘लोकसेवकां’ना ‘सेवकां’चा दर्जा द्यायचा, त्यांना सर्वोच्च मानाचा दर्जा दिल्यामुळे झालेला हा घोटाळा आहे. महात्मा गांधी ते राहूल गांधी या मालिकेत सर्वच नेते ‘लार्जर दॅन लाईफ’ बनले. ही दोन नावे आली म्हणून हा विषय फक्त कॉंग्रेसपुरता आहे असे मानायचे कारण नाही. सिग्नल तोडल्यानंतर अडवणार्‍या पोलिसाला आपल्या वार्डाच्या नगरसेवकाचा फोन लावून देण्यापासून या घोटाळ्याची सुरवात होते. शिक्षणसंस्थेचे उद्घाटन चारित्र्यहीन नेता करतो, मंत्र्यांच्या लाल दिव्याच्या गाड्या जाण्यासाठी अँब्युलन्सपासून सारी वाहने रोखली जातात, मंत्र्यांच्या सांगण्यावरून विमानाचे उड्डाणही लांबविले जाते... ही यादी पार मोठी होऊ शकते. 15 ऑगस्ट 1947 पासून भारत असा कणाकणाने मरतो आहे. पण तो सामान्य भारतीयांप्रमाणेच मोठा चिवट आहे. तो पूर्णतः निष्प्राण होत नाही. कधीतरी हातापायांत बळ येईल, असा त्याला विश्वास वाटत असतो.

दत्ता जोशी
मो. 9225309010

Monday, July 18, 2011

पाण्याच्या टाक्यांतून साधली प्रगती

जालना येथील आघाडीचे उद्योजक श्री. सुनील रायठठ्ठा यांच्याकडून नव्या पिढीने शिकण्यासारखे खूप काही आहे. किती अपयश पचविल्यानंतर यशाची चव चाखता येते, याचे जिते-जागते उदाहरण म्हणजे श्री. सुनील रायठठ्ठा. साप्ताहिक सकाळ च्या २३ जुलै २०११ च्या अंकात त्यांचा मी करून दिलेला परिचय...
......................................................................................
व्यवसाय उभारायचा, शेकडो जणांना काम देत ते संसार उभे करायचे आणि आपल्या कंपनीचा विस्तार जगभरात करायचा, हे काम करणे तसे अवघड. जालना शहरासारख्या आडवळणाच्या ठिकाणी राहन असा उद्योग उभारणे अधिकच आव्हानात्मक. व्यवसायात अनेक टक्केटोणपे खाऊन यशस्वी झालेल्या सुनील रायठठ्ठा यांचे व्यवसायाचे तत्त्वज्ञान खूप वेगळे आहे. जागतिक बाजारपेठेत उतरणे, टिकणे आणि वाढणे खूप सोपे असल्याचे सांगतानाच आपल्याकडील मनुष्यबळ कसे टिकवायचे आणि जोपासायचे, याच्या टिप्स ते देतात...
....................................................................................................
‘निर्यातीची भीती कशासाठी बाळगायची? जगात 196 देश आहेत. त्यात भारताचा क्रमांक साधारण 25 ते 30 च्या दरम्यान आहे. याचाच अर्थ त्यानंतरचे देश आपल्यापेक्षा मागासलेले आहेत. त्या देशांसाठी तर आपण निश्चितपणे पुढारलेले आहोत. या देशाची बाजारपेठ तर आपल्याकडे आशेने पाहते आहे. मग निर्यातीची चिंता कशासाठी करायची? आणि एकदा आपल्या उत्पादनांची गुणवत्ता लक्षात आली, की हे पुढारलेले देशही आपल्याकडे येतीलच ना ! आम्ही फिजीपासून निर्यातीला सुरवात केली आणि नुकतीच एक ऑर्डर आम्हाला ऑस्ट्रेलियासारख्या देशातून मिळाली. हे सारे आपोआप किंवा सहजपणे होत नसते. सतत प्रयत्न करणे आणि गुणवत्ता वाढविणे, हाच यासाठीचा मार्ग आहे...’ जालना येथील ‘विनोदराय इंजिनइर्स प्रा. लि.’चे श्री. सुनील रायठठ्ठा सांगत होते.

श्री. रायठठ्ठा यांच्या यशाची कमान वाढते आहे. नवनव्या देशांतून ऑर्डर्स मिळत आहेत. त्यांच्याकडे काम करणारी सारी मंडळीही खुशीत आहे. चांगला पगार आणि कामाची पूर्ण मोकळीक यामुळे प्रत्येकाला आपल्यातील कौशल्य दाखविणे सोपे जाते. मात्र आठ वर्षांपूवीची स्थिती अशी नव्हती. त्यापूर्वीच्या दहा वर्षांची स्थितीही याहून वेगळी नव्हती ! श्री. रायठठ्ठा यांच्या घोडदौडीची कहाणी खूपच वेगळी आहे. ही कहाणी आहे एका जिद्दीची, शून्यातून विश्व निर्माण करणार्‍या फिनिक्स पक्ष्याची. एकेकाळी, करइरच्या पहिल्या दशकात नोकरी आणि उद्योगांतील विविध अपयशांचे शिक्के माथ्यावर असणारे
श्री. रायठठ्ठा आज मात्र एक अत्यंत यशस्वी उद्योजक ठरले आहेत. ते तयार करीत असलेली यंत्रे सध्या 40 हून अधिक देशांत निर्यात होत आहेत. त्यात आता ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, रशिया यासारख्या देशांचाही समावेश झाला आहे.

‘विनोदराय इंजिनइर्स’मध्ये पाण्याच्या टाक्यांच्या उत्पादकांना लागणारी यंत्रे तयार होतात. बाजारपेठेत शे-दोनशे लिटर्सपासून हजारो लिटर्सपर्यंत उपलब्ध असलेल्या विविध कंपन्यांनी तयार केलेल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या टाक्या उपलब्ध आहेत. या टाक्या बनविण्याचे तंत्रज्ञान आणि त्यासाठी लागणारी मोल्डिंगची यंत्रे श्री. रायठठ्ठा तयार करतात. या व्यवसायाला त्यांनी साधारणपणे सन 1991 मध्ये सुरवात केली. खरे तर ‘रोटेशनल मोल्डिंग मशीन’चे पहिले उत्पादन त्यांनी 1986 मध्येच केले होते, पण ते प्रायोगिक तत्त्वावर होते. जालन्यातील मित्रपरिवाराला दाखविण्यासाठी आणि वापरण्यासाठी त्यांनी ते तयार करून दिले होते. त्याआधीही 1981 ते 1991 या दरम्यान त्यांनी अनेक उद्योगधंद्यांचा प्रयत्न केला.

काही व्यवसाय भागीदारीतही केले पण यश आले नाही. त्या काळात, एल अँड टी, मुंबईत नोकरी करीत असताना 1977 मध्ये ‘टाइम्स’मध्ये आलेली एक जाहिरात त्यांना पुन्हा पुन्हा आठवत होती. ही जाहिरात टाक्यांचे साचे तयार करण्याच्या संदर्भातील होती. हीच कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पण अडचण ही होती, की ती जाहिरात तर आता डोळ्यासमोर नव्हती आणि पत्ताही आठवत नव्हता. मात्र, एल अँड टी मध्ये नोकरी करीत असतानाच त्यांनी परदेशातील अनेक उद्योगांची माहिती मिळवून ठेवली होती. त्या पत्त्यांवर त्यांनी पत्रव्यवहार सुरू केला. त्यांचे कॅटलॉग्ज मागविले. इंटरनेटची सुविधा तर तेव्हा त्यांना उपलब्ध नव्हती. बराच काळच्या मेहनतीनंतर हा डेटाबेस उपलब्ध झाला आणि त्यांचा पुढचा मार्ग खुला झाला. आपल्या हाती असलेला छोटासा आणि अर्धप्रशिक्षित स्टाफ आणि स्वतःकडील तंत्रज्ञानाच्या संकल्पना यांच्या बळावर त्यांनी पहिली यंत्रणा 1991 मध्ये उभी केली. पण पाण्याच्या टाक्या तयार करण्याच्या व्यवसायाला त्या वेळी फार मोठे मार्केट नव्हते. हा व्यवसाय कसा करायचा, याचीच माहिती त्या वेळी जालन्यातील व्यावसायिक क्षेत्रात नव्हती. त्यामुळे हे यंत्र खरेदी करण्यास कोणी तयार नव्हते. अखेर, स्वतःच्या जबाबदारीवरच त्यांनी एका व्यक्तीला ही यंत्रणा दिली आणि त्याची भरभराट पाहून मग इतरांकडून चौकशी सुरू झाली. अशी यंत्रे तयार करण्याच्या ऑर्डर येऊ लागल्या पण तरीही व्यवसायाला पुरेसा वेग येत नव्हता. नऊ वर्षे अशीच गेली. सन 2000 मध्ये दिल्लीत ‘प्लास्ट इंडिया’ नावाच्या औद्योगिक प्रदर्शनात त्यांनी भाग घेतला आणि तेथून सारे चित्र पालटले. त्याच प्रदर्शनातून त्यांना निर्यातीची पहिली ऑर्डर मिळाली. श्री. रायठठ्ठा सांगतात, ‘‘या प्रदर्शनात आम्ही सर्वात लहान स्टॉल बुक केला होता. स्टॉलचे पैसेही हप्त्याहप्त्याने भरले. यंत्रे घेऊन जाण्याइतका पैसा नव्हता, म्हणून त्याचे फोटो आणि माहितीचे तक्ते आम्ही सोबत नेले होते. मशिन्सची डायमेन्शन्स काय, याचे उत्तर देण्याइतकीही आमची तयारी नव्हती. तेथे आम्ही जागतिक बाजारपेठेचे चित्र पाहिले. आमच्यातील त्रुटी आमच्या लक्षात आल्या. तेथूनच आमच्या प्रगतीला वेग आला.’’

या प्रकारच्या प्रदर्शनात सहभागी होण्यातील फायदे-तोटे सांगताना ते म्हणतात, आपण अशा प्रदर्शनांतून उतरताना खर्चाच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर ते उपयोगाचे ठरणार नाही. याउलट विचार करून, ही एक गुंतवणूक आहे असे गृहित धरले, तर अशा प्रदर्शनांचा फायदा मोठा होतो, असे ते सांगतातच आणि आपल्या प्रगतीचा राजमार्ग अशा प्रदर्शनातूनच उघडला, हेही नमूद करतात. पहिल्या प्रदर्शनात उतरल्यानंतर त्यांच्या भरभराटीला प्रारंभ झाला, हे तर वर सांगितले आहेच. मागील वर्षी त्यांनी चीनमधील प्रदर्शनात भाग घेतला. या विषयात त्यांचा विचार खूप वेगळा आहे. ते म्हणतात, ‘चीनमध्ये आमची यंत्रे
विकली जावीत या इच्छेने आम्ही त्या प्रदर्शनात गेलो नव्हतो. चीनमधील प्रदर्शनात सार्‍या जगातील उद्योजकांचा सहभाग असतो, याची आम्हाला कल्पना होती. हे मार्केट मिळविण्यासाठी आम्ही तेथे गेलो. त्याचा फायदाही झाला. जिथे ग्राहक असेल तिथे आपण पोहोचले पाहिजे.’’

जालना येथून ते जागतिक बाजारपेठेत आपली उत्पादने पोचवतात. याच संदर्भात बोलताना व्यवसायात उतरू इच्छिणार्‍या तरुणांसाठी ते चार कटू सत्ये सांगू इच्छितात. त्यांच्य मते आपण कोठे कार्यरत आहोत, हे महत्त्वाचे नसते. आपण काय बनवतो आहोत आणि आपण आपला ग्राहक कसा शोधतो, याला महत्त्व आहे. घरबसल्या आपले प्रॉडक्ट कोणीही विकत घेणार नाही. त्यासाठी आपल्याला नियोजनबद्ध मार्केटिंग करणे आवश्यक आहे. कँपेनिंग करणे आवश्यक आहे. विशेषतः परदेशात आपल्या उत्पादनांना स्कोप कसा मिळेल, यासाठी सर्वांनी चाचपणी केलीच पाहिजे, असे त्यांचे आग्रही सांगणे असते. परदेशातील बाजारपेठेत उभे राहण्यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेतली. पहिली ऑर्डर पाठवताना आलेले अडथळे त्यांना अजूनही व्यवस्थित आठवतात, आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी ‘निर्लेप’चे श्री. राम भोगले, औरंगाबादची देवगिरी नागरी सहकारी बँक आणि या बँकेचे तत्कालीन सरव्यवस्थापक श्री. महेश कवठेकर यांनी केलेली मदतही त्यांच्या चांगलीच स्मरणात आहे. सध्या ते रशिया, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया या बड्या देशांबरोबरच सौदी अरेबिया, कुवेत, टांझानिया, मलेशिया, हैती, नायजेरिया, फिजी, लिबिया, येमेन, मलेशिया, ट्युनिशिया, सुदान, मादागास्कर, झांबिया, कतार, संयुक्त
अरब अमिरात, अर्जेंटिना, थायलंड, इंडोनेशिया, व्हिएटनाम आदी देशांना निर्यात करतात. पूर्वी त्यांची यंत्रे ‘मॅन्युअल ऑपरेटेड’ असायची. हळू हळू ही स्थितीही बदलत गेली आणि ग्राहकांच्या मागणीनुसार सेमी ऑटोमॅटिक आणि पूर्णतः ऑटोमॅटिक प्रकारची यंत्रेही बनविण्यास त्यांनी प्रारंभ केला. आता टच स्क्रिन कंट्रोलसह असलेली यंत्रे ते तयार करतात.

परदेशातील व्यवसायाबद्दल अनेकांच्या मनात असलेल्या अनेक शंकांचे ते समाधान करतात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो भाषेच्या अडथळ्याचा. पण हा मुद्दा गैर आहे, असे सांगताना ते म्हणतात - आपले प्रॉडक्ट दर्जेदार असेल आणि किंमत वाजवी असेल, तर तेथे व्यवहार जुळण्यासाठी भाषेचा अडथळा अजिबात येत नाही. तिथं अर्थकारण महत्त्वाचं असतं, कारण फायद्याची भाषा प्रत्येकाला समजते ! परदेशात व्यवसाय वाढवू इच्छिणार्‍या नवउद्योजकांसाठी ते एक खूप महत्त्वाची टीप देतात. विशेषतः आखाती देशांतील निर्यातीच्या संदर्भात त्यांचे निरीक्षण असे आहे, की तेथील जवळजवळ सर्व प्रमुख उद्योगांमध्ये ‘मॅनेजरीयल केडर’ मुख्यत्वे भारतीय आणि विशेषतः दक्षिण भारतीय आहे. आपल्या व्यवसायवृद्धीत त्याचा खूप फायदा होऊ शकतो. या अधिकार्‍यांच्या मनात भारतातून आयात करण्याची तीव्र इच्छा असते. त्यांच्या मनातील देशभक्तीची भावना इथे प्रबळ असते, पण गुणवत्तेच्या हमीविषयी साशंकता आणि वेळ न पाळली जाण्याची भीतीही असते. ही साशंकता दूर करून उत्कृष्ट दर्जाविषयी त्यांची खात्री पटवून दिली, की तेथील दरवाजे आपल्याला सदासर्वदा उघडले जातात.

श्री. रायठठ्ठा यांच्या व्यवसायातील बारकाव्यांची माहिती सांगायची, तर ती खूप मोठी होईल. जाणून घ्यायचे असेल, तर त्यांची कार्यपद्धती आणि दृष्टिकोन जाणून घेणे तरुणांसाठी मार्गदर्शक ठरेल. 1977 मध्ये औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी आरंभीच्या काळात ‘एल ऍड टी’मध्ये नोकरी केली. 1981 मध्ये त्यांनी नोकरी सोडून स्वतःच्या व्यवसायास सुरवात केली. औरंगाबादेत सुरवातीच्या काळातील पार्टनरशिपचे व्यवसाय फारसे चालले नाहीत. त्यानंतर ते जालन्यात परत गेले. अनेक प्रकारच्या व्यवसायांचा प्रयत्न केला. अनेकदा असफल झाले. प्रयत्न मात्र चालूच राहिले... त्याचे फळ मिळाले आणि गेल्या साधारण आठ-नऊ वर्षांत सारे चित्र बदलले. आज त्यांनी आपल्या व्यवसायातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. छोट्या देशांपासून सुरवात करून आपल्या निर्यातीचे क्षेत्र त्यांनी आता फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, रशियासारख्या देशापर्यंत विस्तारले आहे.

हे करण्यासाठी त्यांनी काय केले? आश्चर्य वाटेल, पण स्वतःच्या छताखाली ते या यंत्रांचा एकही सुटा भाग बनवीत नाहीत. मात्र प्रत्येक भाग ते इतरांकडून बनवून घेतात. हे ‘इतर’ लोक जालन्यातीलच आहेत. हे सारे उच्चशिक्षित नाहीत, तर तशा अर्थाने सामान्य कामगार आहेत. मात्र त्यांना योग्य प्रशिक्षण दिले, तर आपल्याला हवे तशी गुणवत्ता ते देतात. श्री. रायठठ्ठा यांनी मागील काही वर्षांत तर एक अभिनव प्रयोगही केला आहे. समाजात दुर्लक्षित असलेल्या शिकलकरी समाजातील काही गुणवंत माणसे निवडून त्यांना प्रशिक्षित केले आणि त्यांच्याकडूनही काही कामे करून घेतली! अशी गुणवंत स्थानिक माणसं त्यांनी उभी केली. अगदी मुंबई आणि सुरत-अहमदाबादसारख्या शहरांतूनही ते सुटे भाग बनवून घेतात. असेंबल करतात आणि क्लायंटकडे पाठवून देतात! त्यांचे कौशल्य असते, ते अचूक ड्रॉइंगमध्ये.

आपल्या माणसांवर विश्वास कसा आणि किती टाकावा, हे रायठठ्ठा यांच्याकडूनच शिकावे ! परदेशातील बाजारपेठ मिळवताना आणि वाढवताना ते स्वतः जेवढ्या वेळा परदेशात गेले नसतील, त्याहून अधिक वेळा त्यांच्याकडील कामगार परदेशी जाऊन आलेला आहे ! 45 -50 लाखांचं मशीन तयार झाल्यानंतर ते वेगवेगळ्या पार्टमध्ये विभागून पॅक केलं जातं. ही डिलिव्हरी घेऊन हे कामगार परदेशी जातात. तेथे ही मशिनरी असेंबल करतात. त्याची यशस्वी चाचणी घेतात. कस्टमरचे पूर्ण समाधान करूनच ते आपल्या घरी परत येतात. या कामासाठी एक ते चार आठवडेही लागू शकतात. मात्र
परदेशी भूमीवरही ‘विनोदराय’चे हे प्रतिनिधी अत्यंत आत्मविश्वासाने वावरतात. तेथे गेल्यानंतर त्यांच्यात एक बदल होतो. जाताना ते ‘विनोदराय’चे प्रतिनिधी असतात, गेल्यानंतर मात्र ते भारताचे प्रतिनिधी होतात. आपल्यावर टाकलेली जबाबदारी हा त्यांच्यासाठी राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा होतो. ङ्गविनोदरायफच्या इतिहासात आजवर कस्टमरकडून अशा प्रकारच्या व्यक्तीबद्दल कधीही तक्रार आली नाही, उलट ते लोक या कामगारांचे मनापासून स्वागत करतात आणि भरघोस पाहुणचारही !

उद्योगाच्या क्षेत्रात ही नवी संकल्पना रुजविताना त्यांनी फक्त माणसं उभी केली, जोडली आणि सर्वांना घेऊन ते आता पुढे जात आहेत...! पुढे जाताना ते आता नव्या पिढीचा विचार करतात. विशेषतः जालना परिसरातील मागासलेपण त्यांना खटकते. येथील तरुण पिढीला योग्य दिशा आणि मार्गदर्शन देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. सन 2009 पासून त्यांनी जालन्यात ‘यंग इनोव्हेटर्स’ ही चळवळ उभारली आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या सहकार्याने ते विद्यार्थ्यांतील अभिनव कल्पनांना खतपाणी घालण्याचे व त्या फुलविण्याचे काम करतात. यंत्रमानव निर्मितीची कार्यशाळा, फोटोग्राफी कार्यशाळा यांच्यासह अनेक उपक्रम ते जालन्यात राबवितात. स्वतः दीड-दोन लाख रुपयांचा खर्च करून त्यांनी खास विद्यार्थ्यांसाठी जालन्यात एक संपन्न ग्रंथालय उभारले आहे. जालन्यातील पुढची पिढी अधिक सक्षम आणि परिपूर्ण होण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न सुरू आहे. अशाच प्रकारे जालना जिल्ह्यातील उद्योजकांची, त्यांच्या यशाच्या मार्गांची ओळख नव्या पिढीला व्हावी या साठी त्यांनी पुढाकार घेऊन ‘जालना आयकॉन्स’ या 40 यशकथांच्या संकलनाचे पुस्तकही तयार केले असून ते प्रकाशनाच्या मार्गावर आहे. ग्रामीण भागातील मुलांना चांगले तांत्रिक शिक्षण मिळावे या दृष्टीने त्यांनी महाराष्ट्र सरकारशी समन्वयाचा करार करून जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील ‘आयटीआय’ महाविद्यालयाचे व्यवस्थापन स्वतःकडे घेतले आहे. या महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे ते अध्यक्ष आहेत.

आज कॉर्पोरेट जगतात ’सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज’ हा स्वतंत्र विभाग कार्यरत असतो. या द्वारे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी काही निधी राखून ठेवलेला असतो. अनेकदा यातून फक्त देखावे उभारले जात असल्याची टीका होत असते. मात्र, अशा प्रकारचे कसलेही बंधन नसताना श्री. रायठठ्ठा यांनी जालन्याच्या भावी पिढीसाठी उभारलेला ‘यंग इनोव्हेटर्स’चा हा महायज्ञ सर्वांसाठीच अनुकरणीय ठरावा.

करिअर ग्राफ ः
सन 1973 - जालना येथून 12 वी उत्तीर्ण
सन 1977 - औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनइरिंग पूर्ण
सन 1977 ते 1981 - मुंबईत ‘एल अँड टी’ मध्ये नोकरी
सन 1981 ते 1986 - औरंगाबादमध्ये परत येऊन मित्रांसोबत विविध व्यवसायांचे प्रयोग.
त्यात अपयश.
सन 1986 ते 1991 - जालना येथे परत येऊन विविध व्यवसायांची चाचपणी. त्यात अपयश.
सन 1991 - पहिले रोटेशनल मोल्डिंग मशीन तयार करून मित्राला वापरण्यासाठी दिले.
यशाचा पहिला किरण.
सन 1991 ते 2000 - छोट्या पातळीवर मशीन्स तयार करण्याचा प्रयत्न. अल्प यश.
सन 2000 - दिल्लीत ‘प्लास्ट इंडिया’ प्रदर्शनात सहभाग. हा उपाय यशस्वी.
तेथून उद्योगाला चांगला वेग.
सन 2001 - पहिले यंत्र निर्यात
सध्या...
सुमारे 40 देशांत निर्यात.
भारतातील निम्म्यांहून अधिक राज्यांत पुरवठा
सन 2000-01 ची उलाढाल ः 46 लाख
सन 2010-11 ची उलाढाल ः 11 कोटी 16 लाख

करिअर  टिप्स
1) जिथे ग्राहक असेल तिथे आपण पोहोचले पाहिजे.
2) आपले प्रॉडक्ट दर्जेदार असेल आणि किंमत वाजवी असेल, तर तेथे व्यवहार
जुळण्यासाठी भाषेचा अडथळा अजिबात येत नाही कारण फायद्याची भाषा प्रत्येकाला
समजते !
3) आखाती देशांतील जवळजवळ सर्व प्रमुख उद्योगांमध्ये ‘मॅनेजरीयल केडर’ मुख्यत्वे
भारतीय आणि विशेषतः दक्षिण भारतीय आहे. आपल्या व्यवसायवृद्धीत त्याचा खूप
फायदा होऊ शकतो.
4) औद्योगिक प्रदर्शनांतून उतरताना खर्चाच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर ते उपयोगाचे
ठरणार नाही. याउलट विचार करून, ही एक गुंतवणूक आहे असे गृहित धरले, तर अशा
प्रदर्शनांचा फायदा मोठा होतो.

- दत्ता जोशी
9225 30 90 10

विनोदराय इंजिनइर्स प्रा. लि.
12 कि.मी. स्टोन, औरंगाबाद जालना रोड,
दावलवाडी, ता. बदनापूर, जि. जालना
संपर्क ः 02482-262000