Monday, August 12, 2013

किश्तवारचे `धर्म`संकट...

किश्तवारमध्ये ईदच्या नमाजानंतर मुसलमान जमावाने हिंदुंवर सशस्त्र हल्ला चढविला. संसदेत केलेल्या निवेदनात सुद्धा हाच उल्लेख आहे. आरंभी अनपेक्षित हल्ल्यामुळे गोंधळलेले हिंदू लवकरच प्रतिकारास सज्ज झाले आणि जम्मू भागात अनेक ठिकाणी त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. हिंदुनी प्रतिकार केला, की तो सर्वधर्मभावास धोका असतो, असा मानवतावाद्यांचा इतिहास सांगतो...!
बाकी चर्चा दूर ठेवून किश्तवारच्या धोक्याची माहिती इथे करून घेवू. ही केवळ एका गावापुरती दंगल नाही, याची नोंद इथे आधी घ्यावी लागेल. १९८८-८९ मध्ये सुमारे २० लाख हिंदुना काश्मीर खोर्यातून विस्थापित व्हावे लागले. लाखाहून अधिक हिंदू पुरुषांची हत्या झाली आणि हजारो हिंदू महिला-मुलींवर बलात्कार झाले. किश्तवार प्रकरण हे काश्मीरच्या दुसऱ्या अहिंदू-करणाची सुरवात आहे.
आपण एक एक मुद्दा समजून घेवू.
हा आहे काश्मीरचा नकाशा.


हा भारतात दाखविला जातो. यातील पाकिस्तानलागतचा आकाशी रंगाचा पट्टा आपण `पाकव्याप्त काश्मीर` म्हणून नोंदवतो. त्या भागातील गावे-जिल्हे सुद्धा भारतीय नकाशावर नोंदविलेले नसतात. नेहरू यांनी १९४७-४८ मध्येच हा भाग प्रत्यक्षात सोडून दिला. मात्र नकाशात तो दाखविला जातो. याला पाकिस्तानात `आजाद काश्मीर` म्हटले जाते.
हा दुसरा नकाशा.
यात जम्मू -काश्मीरचे ५ भाग दिसतात. पहिला कथित `आजाद काश्मीर`, दुसरा गील्गीत – बाल्टीस्तान, तिसरा अक्साई चीन – हा भाग १९६२ च्या `भाई भाई युद्धात` चीन ने आक्रमिला. अक्साई चीन आणि बाल्टीस्तान यांच्या मध्ये असलेला काश्मीरचा एक भाग पाकिस्तान ने चीन ला परस्पर भेट दिला. हा सगळा भाग वजा जाता भारताच्या ताब्यात जेमतेम निम्माच काश्मीर उरतो.


 आता हा नकाशा पाहू. 

या नकाशात भारताच्या ताब्यात असलेल्या काश्मीरच्या भूभागाची जिल्ह्यांच्या स्वरूपातील विभागणी आहे. कुपवाडा, श्रीनगर, बरामुला, बडगाम, बांदीपोर, गनदरबाल, पूंच, पुलवामा, कुलगाम, अनंतनाग, राजौरी, रेसि, रामबन हे भाग काश्मीर खोऱ्यात मोडतात. जम्मू, उधमपूर, दोडा, कथुआ, किश्तवार  हे भाग जम्मू विभागात येतात. कारगिल खोऱ्यातच मोडते पण इथे लोकवस्ती अत्यंत विरळ आहे. उजवीकडे लेह-लडाख आहे.

यापैकी काश्मीर खोऱ्यातून म्हणजे श्रीनगर, बरामुला, बडगाम, बांदीपोर, गनदरबाल, पूंच, पुलवामा, कुलगाम, अनंतनाग, राजौरी, रेसि, रामबन या जिल्ह्यातून १९८८ ते १९९१ या काळात सुमारे २० लाख हिंदुना अनन्वित अत्याचार करून बाहेर काढण्यात आले. तेथे ग्रामीण भागात एकही हिंदू सापडत नाही. शहरी भागात एखाद्या गुरुद्वाराच्या आडोशाला, मंदिरात क्वचित कुणीतरी सापडतो. पण लोकसंख्येचे प्रमाण पहिले तर हे प्रमाण पाव टक्का सुद्धा नाही.

हा सारा भाग भारतापासून तुटल्यात जमा आहे. काश्मीर टूरवर जाऊन आलेले भारतीय पर्यटक सांगतात – 'आता काश्मिरात दहशतवाद उरला नाही.' वस्तुस्थिती ही आहे, की आज काश्मिर भारतात आहे, त्याचे श्रेय जाते सीआरपीएफ ला. हा वेगळा विषय आहे. त्यावर नंतर विस्ताराने लिहीन. पर्यटक फक्त श्रीनगर आणि अनंतनाग जिल्ह्यात जाऊ शकतात. त्यातही केवळ पर्यटकांसाठी आकर्षण असलेल्या भागातच. श्रीनगर शहराच्या जुन्या भागात कोणीही फिरकू शकत नाही. तेथे भारतविरोधी राग धुमसत असतो. इतरत्रही भारतीयांचे स्वागत होते ते प्रामुख्याने पर्यटक म्हणून. तेथील अर्थव्यवस्था केवळ त्यावर अवलंबून आहे. हेच त्याचे कारण.

पुन्हा किश्तवारकडे येऊ. पुन्हा एकदा हा नकाशा पाहा.


किश्तवार जिल्हा हा काश्मीर खोरे आणि हिमाचल प्रदेश यांना थेट जोडतो. यातील निम्म्याहून अधिक भाग अतिरेक्यांनी ग्रासलेला आहे. किश्तवारचे भौगोलिक स्थान पहिले तर लक्षात येईल, की तेथून हिंदुना बाहेर काढले की उरतो फक्त जम्मू, उधमपूर, सांबा आणि कथुआ...

संसदेत अरुण जेटली यांनी किश्तवार हल्ल्यामागे मोठ्या कटकारस्थानाचा उल्लेख केला, ते हेच. आणि मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला हे सुद्धा `१९८८ प्रमाणे आता होणार नाही` चा राग आळवू लागले आहेत. अर्थात हा सारा अब्दुल्ला परिवाराचा पिढीजात दांभिकपणा आहे. ज्या परिवाराच्या कट-कारस्थानामुळे श्यामाप्रसाद मुकर्जी यांच्यासारख्या देशभक्ताला काश्मिरात तुरुंगवासात संशयास्पद स्थितीत मरण आले, तेथून दुसरी अपेक्षा काय करणार?

ही जागे राहण्याची वेळ आहे. किश्तवारमधील हिंदू सुरक्षित राहिले पाहिजेत आणि काश्मीर खोर्यातील प्रत्येक विस्थापिताला त्याच्या गावी परत जाता आले पाहिजे. तरच भारताचे मस्तक मानले जाणारे जम्मू काश्मीर भारतात राहील... अन्यथा लवकरच भारताचा शिरच्छेद होईल. ज्या भूभागातून हिंदू अल्पसंख्य झाले, तो भाग भारतापासून तुटला हे इतिहास लक्षात घ्यावा लागेल...
- दत्ता जोशी.

Wednesday, April 3, 2013

उदयगिरी... माझे ‘गुरुकुल’ !


मी उदगीरच्या उदयगिरी महाविद्यालयातून पदवी मिळविली. या महाविद्यालयाने मला खूप काही दिले. या महाविद्यालयाने सध्या एक स्मरणिका प्रकाशित करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी माझ्याकडे एक लेख मागितला गेला. मी तो आनंदाने लिहिला. या निमित्ताने जुन्या आठवणीना उजाळा देता आला. हा लेख आपणासमोर मांडत आहे...

---------------------------------------------------------------------------------------------
‘कर्माचे डोळे ज्ञान, ते निर्दोष होआवे’... महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या मोठ्या कमानीवरील ‘उदयगिरी’चा मोनोग्राम आणि त्यात असलेले हे ब्रिदवाक्य मी पहिल्यांदा वाचले साधारण 1984-85 मध्ये. शहरातील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात मी तेव्हा बहुदा आठव्या-नवव्या वर्गात शिकत असेन. ‘उदयगिरी’त तेव्हा ‘कॉम्प्यूटर विभाग’ सुरू झाला होता. उदगीरमधील हा बहुधा पहिलाच विभाग. हा कॉम्प्यूटर पाहण्यासाठी इथे आलो. सायकली गेटमधून आत वळविल्या, स्टँडवर लावल्या आणि कॉम्प्यूटर पाहण्याच्या बहाण्याने सगळेच जण उगाच कॉलेजातून भटकून आलो. संध्याकाळची वेळ होती. त्यामुळे कुणी अडविलेही नाही. तेव्हा कॉलेजचे कॅरिडॉर पूर्ण मोकळे होते. एखाद्या धिप्पाड माणसाने बाहू पसरून ‘या’ म्हणत कवेत घेण्यासाठी हाक द्यावी, असा या कॉलेजचा दर्शनी भाग... कॉलेज कॅरिडॉरच्या चारही कोपर्‍यांत असलेले पूर्ण उंचीचे चार आरसे आमच्यासाठी आश्‍चर्याची गोष्ट ठरले होते. ‘इथे कुणीतरी डोळे सर असतात. ते खूप कडक आहेत,’ अशी ऐकीव माहिती कानावर असे. आयुष्यात कधी या कॉलेजात यायचे आहे आणि इथली दोन वर्षे आयुष्यातील महत्वाची संचित ठरणार आहेत, हे त्या काळी ध्यानीमनीही नव्हते...! या कॉलेजमधील 1989-90 आणि 1990-91 ही दोन वर्षे माझ्या आयुष्याला वेगळा आकार देणारी ठरली... काळजावर कोरून राहिली. हे ऋण या जन्मी फिटणारे नाही.000

‘दहावीनंतर पुढे काय’, या प्रश्‍नाला माझ्यासमोर दोन उत्तरे होती. ‘उदयगिरी’तर ‘होम सायन्स’ किंवा ‘लाल बहादूर ज्युनिअर कॉलेज’मध्ये ‘इलेक्ट्रॉनिक्स’. तेव्हा ‘इलेक्ट्रॉनिक्स’चा निर्णय घेतला आणि ‘उदयगिरी’चे नाते लांबणीवर पडले. बारावीनंतर ‘शिवाजी’त ‘बी.एस्सी.’ला प्रवेश घेतला आणि त्याच वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात सहभागी झालो. पुढे पत्रकार व्हायचे, हा निश्‍चय तोवर झाला होता. त्या दृष्टीने वाचन, मनन सुरू झाले होते. त्या कामाला वेळ मिळावा, म्हणून सायन्स सोडून ‘बी.ए.’ घेतले. त्याच काळात पुन्हा एकदा ‘उदयगिरी’चे नाव माझ्या समोर आले. मध्यंतरीच्या काळात तेथील संपन्न ग्रंथालय पाहिले होते. या ग्रंथालयात आतपर्यंत जाऊन पुस्तके हाताळण्याची परवानगी होती. माझ्यासारख्याला ही पर्वणीच वाटली. ‘उदयगिरी’मधील इतर अनेक उपक्रमही मला आकर्षित करू लागले. सर्वात महत्वाची होती डोळे सरांची मोहिनी. मी स्वतः हिंदुत्ववादी विचारांचा अनुयायी असलो, तरी डॉ. ना. य. डोळे सरांबद्दल मनोमन आदर होता. ‘समाजवादी विचारवंत’ ही त्यांची ओळख. पण ‘विचारवंता’च्या परीघाबाहेर पडून त्यांनी अंमलात आणलेला ‘कृतीशील समाजवाद’ आकर्षणाचे केंद्र होता. त्यांच्या व्यक्तिमत्वाची त्या वेळी असलेली ही ढोबळ ओळख पुढे त्यांच्या ‘प्राचार्य’ या आत्मकथनातून घनिष्टतेत बदलली. (पुढे, माझ्या लग्नात सरांनी मला याच पुस्तकाची प्रत भेट म्हणून दिली. ती मी आजही जपून ठेवली आहे.) डोळे सरांबरोबरच इतरही काही नावे माझ्या डोळ्यासमोर होती. माझ्या आवडीच्या असलेल्या ‘मराठी’ विषयात प्रभुणे सर, साधू सरांचे नाव ऐकून होतो. ‘पॉलिटिक्स’साठी प्रा. पी. के. कुलकर्णी आणि प्रा. शेख, सोशियॉलॉजीसाठी प्रा. माकणीकर यांची नावे कामावर येत. ‘बी.ए.एफ.वाय.’ कसेबसे ‘शिवाजी’तून पूर्ण केले आणि 1989 मध्ये ‘सेकंड इअर’साठी ‘उदयगिरी’त प्रवेश घेतला. इथून माझ्यातील परिवर्तनाला प्रारंभ झाला.000

‘पत्रकार व्हायचे’ हा माझा ध्यास होता. त्या साठी मिळेल त्या मार्गाने ज्ञानकण मिळविण्याचा माझा प्रयत्न असे. उत्तम पत्रकारितेसाठी दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या... वाचन आणि लेखन. वाचनाचा प्रारंभ तसा पाचव्या वर्गात असतानाच झाला होता. पण त्याला निश्‍चित अशी दिशा नव्हती. डोळे सर, प्रभुणे सरांच्या संपर्कात आल्यावर ही दिशा मिळण्यास प्रारंभ झाला. त्यांची पहिली भेट हा सुद्धा संस्मरणीय प्रकार होता. ‘हेच ते प्रभुणे सर, ते मराठी शिकवतात आणि भित्तीपत्रक काढण्यातही त्यांचा पुढाकार असतो,’ असे मला कुणीतरी सांगितले. हे भित्तीपत्रक आपण काढले पाहिजे, हे माझ्या मनाने घेतले आणि एके दिवशी त्यांना पार्किंग स्टँडवरच गाठले. त्यांची जुन्या जमान्यातील लांब ‘लँब्रेटा’ लावून, हातात छोटीशी ब्रिफकेस घेऊन ते स्टाफरुमकडे निघाले, तेवढ्यात मी त्यांना गाठले. ते थोडेसे थबकतील, असे मला वाटले. पण चालता चालताच त्यांनी मला सांगितले, ‘चला, आपण स्टाफरुममध्ये जाता जाता बोलू. माझ्याकडे वेळ नाही.’ मी त्यांच्या मागोमाग निघालो. संवाद साधण्याचा हा असा प्रकार मी प्रथमच अनुभवत होतो! जाता जाताच ‘यंदा मला भित्तिपत्रक चालवू द्याल का?’ अशी विचारणा केली. त्यांनी नकार दिला. ‘मुले आधी उत्सुकता दाखवतात, पुढाकार घेतात आणि नंतर विसरून जातात,’ असा त्यांचा आक्षेप. तरीही मी चिकाटी सोडली नाही. ‘आधी काहीतरी लिहून आणून दाखवा’, या त्यांच्या ‘चाचणी’वर मी कुठला तरी विषय पानभर लिहून त्यांना दाखविला. त्यांनी त्यात ढिगाने चुका काढल्या. पण समाधानाची गोष्ट ही, की ‘तुम्ही सिरियसली करणार असाल, तर भित्तिपत्रक सुरू करू’, असे त्यांनी सांगितले. त्या आधीच्या वर्षी कुणीच पुढाकार घेतला नसल्याने भित्तिपत्रक बंद पडलेले होते. ती जबाबदारी 1989 मध्ये मी स्विकारली आणि ‘अक्षरे’ पुन्हा एकदा नोटीस बोर्डवर झळकले. पहिला अंक संत ज्ञानेश्वरांवर काढल्याचे मला आठवते.000‘अक्षरे’ काढणे हा एक सोहळा असायचा. आधी सरांशी बोलून विषय ठरवावा लागे. ‘हाच विषय का’, याचे समाधान करावे लागे. त्यांनी संमती दिल्यानंतर लायब्ररीत बसून संदर्भ काढायचे. मुद्दे लिहून काढायचे. मुख्य विषयाबरोबरच आणखी काही छोटे छोटे विषय मी त्यात हाताळत असे. हे सारे फुलस्केप कागदावर, कागदाच्या एकाच बाजूने लिहून काढायचे. सकाळी लवकर सरांच्या घरी जायचे. सर ते बारकाईने वाचून पाहात. माझी वाक्यरचना ठीक असे, पण शुद्धलेखनातील चुका हमखास असत. मग ते रागवायचे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार ते सारे दुरुस्त करून घ्यायचे. मग प्रत्यक्ष भित्तीपत्रकाची तयारी सुरू होत असे. बाजारातून ‘ए 1’ आकाराचे कार्डशीट खरेदी करायचे. सोबत स्केचपेन असायचे. त्या कागदावर पट्टीच्या साह्याने पेन्सिलीने रेघा मारून घ्यायच्या. सुवाच्य अक्षरांत (माझे अक्षर तेव्हा सुवाच्य होते!) तो लेख त्या शीटवर लिहून काढायचा. हे लिहितानाच जागेचा अंदाज घेत चित्रांसाठी जागा सोडायची आणि संबंधित विषयाची चित्रे मिळवून तेथे चिकटवायची. हा अंक तयार झाल्यावर पुन्हा एकदा तो अंक, पेन्सिल, खोडरबर, स्केचपेन आणि ब्लेड घेऊन आमची स्वारी सरांच्या घरी दाखल व्हायची. मग सर पुन्हा एकदा तो लेख तपासत. त्यात र्‍हस्व-दीर्घाच्या चुका शोधत. ती अक्षरे ब्लेडने मिटवून तेथे नव्याने ते शब्द लिहिले जात. संपूर्ण अंक अशा प्रकारे ‘शुद्ध’ झाल्यानंतर पेन्सिलने मारलेल्या रेघा खोडरबराने खोडून टाकल्या जात. त्यानंतर हा अंक डोळे सरांच्या सहीसाठी मी घेऊन जात असे. सर तो बारकाईने पाहात. कोपर्‍यात त्यांची सही करीत. बेल वाजवून शिपायाला बोलावत आणि ‘नोटीस बोर्ड’वर तो अंक लावण्यास सांगत... मी त्याच्या पाठोपाठ बोर्डाकडे येई. तो अंक लागल्यावर डोळे भरून पाहून घेई. मला आत्मिक समाधान वाटत असे.000

हे अंक काढणे, हा माझ्या पत्रकारितेचा पाया ठरला. विषय निवडणे, निवडलेल्या विषयाचे समर्थन करण्यासाठीचा आधार शोधणे, विषयाची मांडणी, विस्तार, निष्कर्ष, त्याचे शास्त्रशुद्ध लेखन, व्याकरण, जागेप्रमाणे शब्दांची मर्यादा पाळणे या सार्‍या गोष्टी ‘भित्तीपत्रका’च्या पाठशाळेने माझ्याकडून अक्षरशः घोटून घेतल्या. यात जशी माझी चिकाटी होती, तशीच प्रभुणे सरांचीही. चुका शोधणे, त्या दुरुस्त करून घेणे, हे भित्तिपत्रक नियमितपणे लागणे या पैकी कोणत्याही गोष्टीमुळे त्यांच्या पगारात एका रुपयाचीही वाढ होणार नव्हती, की प्रमोशनसाठी त्याचा फायदा होणार नव्हता. तरीही त्यांनी हे केले. माझी वृत्ती हे त्याचे एक कारण असले, तरी त्यांच्यातील ‘प्रयोगशील व्यक्ती’ हे त्यामागचे महत्वाचे कारण असावे, असे मला वाटते. त्यांनी माझ्यावर सातत्याने नवनवे प्रयोग केले. मी जसे ज्ञानदेव, तुकारामांवर अंक काढले तसाच अंक हिटलरवर काढला. योगायोगाने ते हिटलरचे जन्मशताब्दी वर्ष असल्याची माहिती मी कुठेतरी वाचली. सरांच्या मागे लागून या विषयाला मी मान्यता मिळविली. ‘डोळे सरांची परवानगी घेण्याची जबाबदारी तुमची’, या अटीवर प्रभुणे सरांनी मला परवानगी दिली. मी त्या विषयावर लेखन केले. ‘हिटलर वाईट’ एवढी एकच बाजू जगाला माहिती आहे. पण तो किती चांगला होता आणि शेवटच्या टप्प्यातील युद्धात झालेल्या पराभवऐवजी तो विजयी ठरला असता तर आज जगाने त्याचेच गोडवे गायिले असते. मी हा अंक तयार केला. प्रभुणे सरांनी ‘ओके’ केला आणि सहीसाठी मी तो डोळे सरांकडे नेला. मला सरांची प्रतिक्रिया आजमावयाची होती. सरांच्या समाजवादी विचार परंपरेत हिटलर हा खलनायक होता. या पार्श्वभूमीवर मी सरांसमोर तो अंक ठेवला. त्यांनी शांतपणे तो पाहिला. विचारले, ‘प्रभुणेेंनी पाहिलाय का?’ मी होकारलो. त्यांनी तेवढ्याच शांतपणे माझ्याकडे पाहिले. ते म्हणाले, ‘इथून पुढे असे काही विषय लिहायचे असतील तर आधी माझ्याशी बोलत चला.’ तितक्याच शांतपणे त्यांनी त्यावर सही केली आणि शिपायाला बोलावण्यासाठी ‘बेल’ वाजविली. वैचारिक मतभेद कितीही असोत, संपूर्ण सत्ता तुमच्याच हातात असो, तरीही दुसरी बाजू मांडणार्‍या विचाराला जागा मिळवून द्यायचीच असते, हा संस्कार सरांनी त्या एका कृतीतून मला दिला. तो मला माझ्या 15 वर्षांच्या सक्रीय पत्रकारितेत तटस्थपणे पाहताना, लिहिताना अतिशय मोलाचा ठरला.000

अशीच आणखी एक वेगळी आठवण डॉ. नेल्सन मंडेला यांच्या बाबतची. दक्षिण अफ्रिकेतील स्वातंत्र्याचे व लोकशाहीचे शिल्पकार असलेल्या नेल्सन मंडेला यांच्या कार्याबद्दल माझ्या मनात प्रारंभीपासूनच आदर आहे. सुमारे 22 वर्षांच्या तुरुंगवासानंतर 11 फेब्रुवारी 1990 रोजी त्यांची सुटका करण्यात आली. ही बातमी मी त्या रात्री दूरदर्शनवरील 8 च्या बातमीपत्रात पाहिली. (त्या काळी फक्त दूरदर्शन ही एकच वाहिनी होती. रात्रीचे हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र त्यावर येत असे. इंटरनेट वगैरे तर विषयच नव्हता!) त्यानंतर रात्री उशीरापर्यंतच्या बातम्या, दूरदर्शनने ऐनवेळी तयार करून दाखविलेला विशेष माहितीपट मी पाहिला. विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला. रात्रीतूनच कच्चा आराखडा लिहून काढला. 12 फेब्रुवारीला सकाळी लवकर उठून पेपर आणले. त्या आधारे मुद्दे काढले. दुकानातून कार्डशीट विकत आणले. सकाळी 11 वाजेपर्यंत माझा ‘अक्षरे’चा ‘नेल्सन मंडेला विशेषांक’ तयार होता! त्यावर सही घेण्यासाठी डोळे सरांकडे गेलो. सरांनी तो अंक पाहिला. वाचून काढला. त्यांच्या डोळ्यांत माझ्याबद्दल कौतुक होते. त्या दिवशी त्यांनी त्यांच्या ऑफिसात मला चहा पाजला...!
000

डोळे सरांनी माझ्यावर असंख्य संस्कार केले. हिंदुत्ववादी विचाराची (किंबहुना कोणत्याही विचाराचे टोक गाठलेली) मंडळी बहुतेक वेळा झापडबंद पद्धतीने विचार करतात. मी हिंदुत्ववादी होतो आणि आहे. तरीही, माझ्या डोळ्यावर झापड नाही. मी डोळसपणे सर्वत्र पाहतो. सर्व विचारांतून चांगले ते स्वीकारण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या विचारधारेतील मान्यवरांनी सांगितलेले चुकीचे ते टाळतो, शक्तीपरत्वे विरोधही करतो. सरांनी मला ‘अमृता प्रीतम’चे रसिदी तिकीट’ आवर्जुन वाचायला दिले होते. एक शिख विचारवंत महिला एका मुस्लिम व्यक्तीसोबत आयुष्यभर कशी राहिली, याचा तो वैचारिक आलेख होता. मला ती कथा भावली. विविध विचारप्रवाहांचा परिचय करून देणारी पुस्तके ते मला त्यांच्या खाजगी संग्रहातून वाचायला देत. त्यांच्या घरी हॉलमध्ये असलेले ना. ग. गोरे, एसेम जोशी, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासह काढलेले त्यांचे फोटो मी नेहेमी न्याहाळत असे. घरासमोरच्या ओसरीतील त्यांच्या झोपाळ्यावर बसायला मला नेहेमीच आवडत असे. ‘कमल, दत्ता आलाय, काहीतरी दे,’ असे ते आत वळून सांगत आणि कमलताई एखाद्या प्लेटमध्ये काहीतरी खायला आणून देत. पाणी-चहा होत असे. दोन-तीन तास गप्पा रंगत. ‘कार्यकर्त्या’ विद्यार्थ्यांबद्दल त्यांना आपुलकी असे. माझा देवणीचा बालमित्र अंकुश गायकवाड, उदगीरचा दिलीप वाघमारे हे छात्रभारतीचे काम करीत. त्यांचे सरांकडे नेहेमीच येणे-जाणे असे. हे समजण्यासारखे होते. पण मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता असूनही आठवड्यातून किमान एकदा तरी त्यांच्या भेटीसाठी घरी जायचो. उदय कॉलनीतील त्या असंख्य संध्याकाळ माझ्या आयुष्यात नवनव्या विचारप्रक्रियांचे दिवे चेतविणार्‍या ठरल्या.000

मी दोन वर्षे कॉलेजात होतो. पण वर्गात नव्हतो! विद्यार्थी परिषदेच्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी मी सतत भटकत असे. कधी शहरात, कधी शहराबाहेर. 1989 मध्ये काश्मीर प्रश्‍न पेटला होता. काश्मीर खोर्‍यातून हिंदूंना हाकलून लावण्याचे षड्यंत्र ‘ऑपरेशन टोपाझ’ नावाने जनरल झियांनी रचलेले होते. तेथील अनन्वित छळाच्या बातम्या वृत्तपत्रांतून येत असत. त्याच काळात डोळे सर, जगन फडणिस, पन्नालाल सुराणा आदी समाजवादी विचारवंतांच्या एका गटाने काश्मीरमध्ये प्रवास करून ‘हे सारे खोटे आहे. तेथील हिंदूंना कसल्याही प्रकारचा त्रास नाही. हिंदू विस्थापित होत नाहीत. सारे काही आलबेल आहे,’ असा एक अहवाल दिला होता. हा अहवाल वस्तुस्थितीच्या विपरित होता. पुढे नोव्हेंबर 1989 मध्ये विद्यार्थी परिषदेने ‘चलो काश्मीर’ची हाक दिली आणि मी उदगिरातील काही कार्यकर्त्यांना घेऊन त्यात सहभागी झालो. तेथून परतल्यानंतर त्या आंदोलनाचे, काश्मिरी हिंदू विस्थापितांचे फोटो असलेला ‘अक्षरे’चा एक विशेषांक तयार केला आणि तो नोटीस बोर्डवर लावण्यासाठी डोळे सरांकडे नेला. या वेळीही त्यांनी परवानगी दिली. त्यांच्याच अहवालाच्या विरोधातील पुरावे या फोटोतून दिसत होते. भविष्यात काश्मिरचे विदारक चित्र सार्‍या जगानेच पाहिले. पुढे, साधारण तीन-चार वर्षांनी, मी पत्रकारितेस प्रारंभ केल्यानंतर माझ्याशी गप्पा मारताना त्यांनी आपल्या अहवालाची चूक मान्य केली होती. पारदर्शी विचारप्रक्रियेचा हा परिपाक होता.000

ही सारी कामे करताना कॉलेजातील ‘इतर’ उपक्रमांतही मी सहभागी झालो. प्रभुणे सरांच्या आग्रहावरून 1989-90 या वर्षीच्या स्नेहसंमेलनात मी एका नाटकात ‘हीरो’ची भूमिका सुद्धा केली. ‘चोरआलेच पाहिजेत’ अशी ती एकांकिका होती. प्रीती पाटील ही या नाटकातील माझी पत्नी. सामाजिक मान्यता मिळविण्यासाठी आपल्या घरी चोरी झाली पाहिजे, असा या एकांकिकेतील नायकाचा आग्रह असतो. त्यातून फुललेला फार्स यात रंगवलेला होता. त्या आधी कधी मी तोंडाला रंग फासलेला नव्हता की नाटकात भूमिका केलेली नव्हती. त्यातही, एका मुलीसोबत काम करणे हा तर माझ्यासाठी अतिशय कसोटीचा क्षण! (आजही ती जुनी आठवण निघाल्यानंतर प्रीती माझ्यावर हसते! ती आता औरंगाबादेत वोखार्ड या बड्या कंपनीत उच्चपदावर कार्यरत आहे.) पण प्रभुणे सरांनी हे काम माझ्याकडून करून घेतले! या नाटकाच्या, त्यातील तयारीच्या असंख्य आठवणी आहेत. हा स्वतंत्र लेखाचा विषय ठरावा. 1990-91 या वर्षात गॅदरिंगमध्ये मी जिद्दीने पेटलो होतो. एका सरांसोबत माझा कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनावरून वाद झाला होता आणि ‘मी माझी योग्यता सिद्ध करून दाखवीन’ असे आव्हान मी त्यांना दिले होते. ही ‘योग्यता सिद्ध करण्या’च्या नादात मी विविध स्पर्धांतून सहभागी झालो. वादविवाद आणि वक्तृत्व या स्पर्धांत मला बक्षिसे मिळणे साहजिक होते. ती माझी ‘मास्टरी’च होती. पण त्या वर्षी मी ‘प्रेमपत्र स्पर्धा - सर्वप्रथम’, ‘पाककला स्पर्धा- सर्वप्रथम’, ‘रांगोळी स्पर्धा - सर्वप्रथम’ ही बक्षिसेही जिंकली! पाककला एकवेळ ठीक, पण प्रेमपत्र स्पर्धेत मला बक्षिस कसे काय मिळाले, हेच मला कळत नव्हते. या स्पर्धेचे परीक्षक असलेल्या संगेवार सरांच्या घरी मी दुसर्‍याच दिवशी जाऊन थडकलो आणि माझ्या बक्षिसाविषयी चर्चा करू लागलो. ‘मला बक्षिस कशामुळे मिळाले?’, अशा विषयावर मी करीत असलेली चर्चा संगेवार सरांसाठीही गमतीचीच होती. कारण या स्पर्धेत अनेक ‘प्रेमवीरां’नी भाग घेतला होता. त्यातील अनेकांनी त्यांना बक्षिस न मिळाल्याबद्दल सरांना ‘जाब’ विचारलेला होता! काही जणांनी तर ‘पुरवण्या’ जोडून प्रेमपत्र लिहिलेले होते, तरीही त्यांच्या पदरी अपयश पडले होते! या पार्श्‍वभूमीवर जेमतेम 15 वाक्यांचे माझे प्रेमपत्र ‘प्रथम पुरस्कार’ देण्याजोगे सरांनी ठरविले. त्यांनी सांगितले, ‘‘तुमच्या प्रेमपत्रातील वेगळेपणा हा बक्षिसासाठी महत्वाचा ठरला. तुमची शैली वेगळी होती, शब्दरचना आणि वातावण वेगळे होते. त्यात कल्पकता होती.’’ आणि खरेच, मी एका वेगळ्याच धुंदीच ते लिहिले होते. ग्रामीण वातावरण डोळ्यासमोर आणून शेत, शिवार, बैल, पिके यांच्या पार्श्‍वभमीवर मी माझ्या कथित ‘प्रेयसी’ला साद घातलेली होती. या वेगळेपणाने मला तेव्हा ते यश दिले. पुढे सन 2004 मध्ये; आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गुरू शिव खेरा यांच्या ‘ब्लू प्रिंट फॉर सक्सेस’ या तीन दिवसीय कार्यशाळेत ‘विनर्स डोन्ट डू डिफ्ट्रंट थिंग्ज. दे डू द थिंग्ज डिफ्रंटली’, चा विचार समोर आला आणि मला संगेवार सरांनी सांगितलेले शब्द आठवले...!000

साधारण 15 वर्षांची ‘सकाळ’ आणि ‘तरुण भारत’मध्ये केलेली विधायक पत्रकारिता संपवून मी सन 2005 पासून मुक्त पत्रकारितेला प्रारंभ केला. जगात जे चांगले आहे, विधायक आणि अनुकरणीय आहे ते सातत्याने समाजासमोर ठेवले पाहिजे, सज्जनपणाचा पुरस्कार केला पाहिजे या अर्थाच्या स्वामी समर्थ रामदास यांच्या ‘सज्जना परीस आळवावे। महत्व देउनी॥ या उक्तीनुसार समाजाचा शोध घेत ‘आयकॉन्स’ नावाने विविध जिल्ह्यांतील आदर्शांचा शोध घेत पुस्तकांची निर्मिती करीत आहे. या प्रत्येक पावलावर मला ‘उदयगिरी’चे संस्कार आठवतात. 1991 ते 2013 या वाटचालीत आयुष्यात बरेच फेरबदल झाले, अनेक प्रसंगांतून तावून-सुलाखून निघालो, गौरवाचे प्रसंग आले तसेच मला आयुष्यात उठविण्याचेही प्रयत्न झाले. खूप काही शिकत गेलो. मी यशस्वी आहे, की नाही हे मला ठावूक नाही, पण मी जे करतो आहे, जे जगतो आहे, त्यात समाधानी निश्‍चितच आहे. या सर्व गोष्टींचा पाया ‘उदयगिरी’तील मंतरलेल्या त्या दोन वर्षांत घातला गेला. माझ्या तारुण्यातील अनेक बर्‍यावाईट प्रसंगांची साक्षीदार ठरलेली ही वास्तू माझ्या दृष्टीने जिवंत आहे. इथला प्रत्येक दगड काहीतरी वेगळी कहाणी सांगतो आहे. अशीच वेगळी कहाणी इथल्या प्रत्येक माणसात होती, आहे.000

कॉलेजच्या गेटमधून आत पाऊल टाकताच सायकल स्टँडवर भेटणारे पांढरेमामा, उजवीकडे कँटीनमध्ये असणारा अण्णा, ऑफिसात असलेला क्लेरिकल स्टाफ, कॉलेजचे सेवक, लॅब असिस्टंट हे सारे मी पाहिलेल्या कॉलेजचे अविभाज्य अंग. मला शिकविणारे किंवा न शिकविणारे सर्व प्राध्यापक हे माझे गुरूच. अनेकांची नावे मला आज आठवत नाहीत, ही माझ्यातील त्रुटी. पण या सर्वांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संस्कार केले. अनेक चांगल्या आठवणी घेत मी कॉलेजचा निरोप घेतला. उदगीर सोडून आता दोन दशके उलटली आहेत. पण आजही उदगीर म्हटले की आधी माझ्या डोळ्यासमोर माझे (आता विकलेले) घर येते आणि त्यानंतर येते ‘महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय’... तेथील ब्रिदवाक्यासह - ‘कर्माचे डोळे ज्ञान, ते निर्दोष होआवे’...!

- दत्ता जोशी

Friday, March 1, 2013

रिक्षाचालकाच्या मुलीचे ‘सीए’तील यश आणि माझ्या मुलाखत कौशल्याची कसोटी...!


सी.ए. परीक्षेत देशात सर्व-प्रथम आलेल्या प्रेमा जयकुमार या मुंबई येथील विद्यार्थिनीशी जाहीर संवाद साधण्याची संधी मला जालना येथे रविवारी (दि. २४ फेब्रुवारी २०१३) आयोजित कार्यक्रमात मिळाली. हा संवाद साधण्यासाठी मला निमंत्रित करण्यात आले होते. मूळ तमिळ असलेल्या या युवतीचे सर्व शिक्षण मुंबईमध्ये झाले. २१ जानेवारी रोजी जाहीर झालेल्या सी.ए. अंतिम वर्षाच्या निकालात ती देशात प्रथम आली. तिच्याशी तिच्या यशाबद्दल गप्पा मारणे, तिला बोलते करणे, हा माझ्यासाठी आनंददायी अनुभव होता. अर्थात त्यासाठी मला बरीच मेहनत करावी लागली. सी.ए. अभ्यासक्रमाबद्दल बरीच माहिती मिळविली, त्यासाठी माझे सी.ए. श्री. वैभव दंडे यांच्याशी चर्चा केली. प्रेमा जयकुमार हिच्याबद्दल नेट वर  उपलब्ध फिल्म पहिल्या, बातम्या वाचल्या... बरीच पूर्वतयारी केली, तेव्हा या संवादास आकार आला. त्याबद्दल विस्ताराने...

प्रेमा जयकुमार पेरुमल... 22 जानेवारी 2013 रोजी सकाळपर्यंत हे नाव जगाच्या खिजगणतीत सुद्धा नव्हते. 21 जानेवारी रोजी ‘सी.ए. फायनल’चा जाहिर झालेला निकाल 22 रोजी दैनिकांतून प्रकाशित झाला आणि सार्‍या जगाचे लक्ष मुंबईच्या मालाड भागातील एका चाळीत राहणार्‍या प्रेमा जयकुमार हिच्याकडे वेधले गेले. एका सामान्य तमिळ रिक्षाचालकाची मुलगी असलेल्या प्रेमा जयकुमार हिने आपल्या कठोर आणि शिस्तबद्ध मेहनतीतून ‘सी.ए.’ फायनलच्या अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणार्‍या परीक्षेत 800 पैकी 607 गुण मिळवित प्रथम येण्याचा मान पटकावला. योगायोग हा, की याच परीक्षेत तिचा धाकटा भाऊ धनराज सुद्धा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला. या कुटुंबात एकाच दिवशी आनंदाची दोन कारंजी उसळली...!

प्रेमाचे वडील जयकुमार पेरुमल मूळचे तमिळनाडूतील वेलुपुरम जिल्ह्याच्या संकरापुरम या गावचे. 1990 च्या सुमारास पोट भरण्यासाठी ते आपल्या कुटुंबासह मुंबईत आले. पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा हा परिवार. प्रारंभी दोन-तीन वर्षे त्यांनी एका मिलमध्ये कामगार म्हणून नोकरी केली आणि त्यानंतर साधारण 1994 च्या सुमारास त्यांनी ‘एमएच 02 पी 6154’ या क्रमांकाचा रिक्षा खरेदी केला. त्या रिक्षाच्या आधारावरच त्यांनी आपल्या कुटुंबाचे भरणपोषण केले. या रिक्षाच्या आठवणीने प्रेमा भावविवश होते...! 280 चौरसफुटांच्या एकाच खोलीत राहून अत्यंत सामान्य आयुष्य जगणार्‍या या कुटुंबात असे काय घडले, की या कुटुंबातील एक मुलगी ‘सी.ए.’ परीक्षेत देशात प्रथम आली? तिने हे यश कसे मिळविले? मला सुद्धा ही उत्सुकता होतीच. योगायोगाने तिच्याशी थेट संवाद साधूनच ही उत्सुकता मला पूर्ण करता आली आणि याला साक्षीदार राहिली जालना शहरातील सुमारे 1000 तरुण मुले-मुली. जालन्यातील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात 24 फेब्रुवारी 2013 रोजी रोटरी परिवारातर्फे आयोजित या खास कार्यक्रमात मी प्रेमाशी संवाद साधला. आयोजकांनी या मुलाखतीसाठी मला निमंत्रित केले होते. विशेष म्हणजे, ही मुलाखत मी मराठीऐवजी हिंदीतून घेणे अपेक्षित होते! उपस्थितांपैकी अनेक जण हिंदी भाषक, हे एक कारण आणि प्रेमा हिला तमिळ आणि इंग्रजीव्यतिरिक्त फक्त हिंदीच बोलता येते, हे दुसरे...! 

मी सध्या ‘आयकॉन्स’ या शीर्षकाने जी पुस्तकमालिका लिहितो आहे, ती मुलाखतींवरच आधारित आहे. पण त्या मुलाखती वेगळ्या असतात. तो मंचावरील जाहिर कार्यक्रम नसतो. पण जेव्हा चार-चौघांत एखाद्या व्यक्तीला बोलते करायचे असते, तेव्हा त्या व्यक्तीचा आणि विषयाचा पुरेपूर अभ्यास आधीच होणे अपेक्षित आणि आवश्यक असते. माझ्या ‘जालना आयकॉन्स’ आणि इतर पुस्तकांच्या लेखनामुळे आयोजकांनी या मुलाखतीची जबाबदारी माझ्यावर टाकली. हा माझ्यासाठी जसा आनंदाचा भाग होता, तसाच जबाबदारीची जाणीव करून देणाराही...!

अर्थकारण - विशेषतः ‘कॉमर्स’ हा विषय माझ्यासाठी ‘दुरून डोंगर साजरे’ असा! आर्थिक व्यवहार, हिशेब वगैरे मला फारसा कळत नाही. माझ्या घरचा सारा व्यवहार माझी पत्नीच सांभाळते. ‘सी.ए.’ वगैरेचा माझा संबंध फक्त वर्षातून एकदा ‘आयटी रिटर्न’ भरण्यापुरताच...! त्यामुळे प्रेमा जयकुमारची मुलाखत घ्यायची जबाबदारी माझ्यावर आल्यानंतर खरे सांगायचे, तर मी चिंतित होतो. प्रेमा जयकुमार या व्यक्तीला तिच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलते करणे सोपे... पुस्तकासाठी मुलाखत घ्यायची, तर तिच्याकडूनच माहिती विचारून घेऊन नंतर ती व्यवस्थित लिहून काढणेही प्रसंगी शक्य, पण मंचावर जाहिर कार्यक्रमात वैयक्तिक आणि तांत्रिक अंगाने नेमके प्रश्‍न विचारून तिला बोलते करणे आणि समोर उपस्थित प्रामुख्याने विद्यार्थीवर्गाला उपयोगाचे ठरेल अशी माहिती तिच्याकडून वदवून घेणे, ही कौशल्याची बाब होती. त्यासाठी मला ‘सी.ए.’बद्दल पुरेसा अभ्यास करणे आवश्यक होते. आधी मी इंटरनेटवरून हा सारा अभ्यासक्रम डाऊनलोड केला. प्रेमा जयकुमार बद्दल नेटवर आलेल्या बातम्या वाचून घेतल्या. तिचे व्हिडिओ पाहिले. त्यातील मुद्दे काढले. या परीक्षेची आकडेवारी मिळविली. टक्केवारी काढली. परीक्षेत दुसर्‍या-तिसर्‍या आलेल्या विद्यार्थ्यांचे मार्क मिळविले. त्यानंतर माझे सी.ए. श्री. वैभव दंडे यांच्याशी मी विस्ताराने चर्चा केली.

‘सीए’ हा अभ्यासक्रम कसा असतो, त्यातील महत्वाचे विषय कोणते असतात, त्यात थिअरी आणि प्रॅक्टिकलला किती महत्व असते, हे आणि असे अनेक मुद्दे श्री. दंडे यांनी मला व्यवस्थित समजावून दिले. त्यामुळे या मुलाखतीची दिशा निश्‍चित झाली. मी एक कच्ची प्रश्‍नपत्रिका तयार केली. प्रेमा हिच्या मुलाखतीचा साधारण 20 टक्के भाग वैयक्तिक माहिती-तपशीलाबाबत आणि उरलेला 80 टक्के भाग तांत्रिक पद्धतीने अभ्यासक्रमाबाबत, असे प्रमाण ठरविलेले होते. त्यानुसार हा आराखडा तयार केला. मुलाखतीआधी तिच्याशी प्राथमिक चर्चा केली. मी विचारणार असलेल्या तपशीलाविषयी माहिती दिली... त्यावर मात्र ती आश्‍चर्यचकित झालेली दिसली. मागील महिनाभरात अनेकजण तिला भेटले, काही पत्रकार आणि वृत्तवाहिन्यांनी तिच्या मुलाखती घेतल्या, पण इतक्या खोलवर जाऊन कोणी तयारी केलेली नव्हती, अशी तिची प्रतिक्रिया! अर्थात याचे श्रेय माझे सी.ए. श्री. दंडे यांचे!

मुलाखतीत प्रारंभी वैयक्तिक माहिती विचारली. घरची स्थिती, भावाचा अभ्यास, वडिलांचा एमएच 02 पी 6154 या क्रमांकाचा रिक्षा, तिचे चाळीतील घर, तिचा बी.कॉम.चा अभ्यास, बी.कॉम. मध्ये मुंबई विद्यापीठात सर्वद्वितीय येण्याचा तिने मिळविलेला मान आणि त्यानंतर ‘सीए’ करण्याचा तिने घेतलेला निर्णय, हा प्रवास थोडक्यात उलगडल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष विषयाकडे वळलो.

‘सी.ए.’ अर्थात ‘चार्टर्ड अकाउंटंट’ हा सेल्फ लर्निंग कोसर्र् मानला जातो. ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ ही स्वायत्त संस्था हा विषय हाताळते. हीच संस्था अभ्यासक्रम निश्‍चित करते आणि परीक्षा घेते. प्रत्येक वर्षी परीक्षेआधी इन्स्टिट्यूटच्या वतीने रिव्हिजनल टेस्ट पेपर्स प्रकाशित होत असतात. आधीच्या वर्षीच्या प्रश्‍नपत्रिका आणि त्याची ‘सजेस्टेड ऍन्सर्स’ त्यात दिलेले असतात. ते अभ्यासून विद्यार्थ्यांनी तयारी करावी असे अपेक्षित असते. परीक्षांची सुरवात होते ती ‘सीपीटी’ अर्थात ‘कॉमन प्रोफेशिएन्सी टेस्ट’पासून. ही परीक्षा 1) फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग, 2) मर्कंटाईल लॉ, 3) जनरल इकॉनॉमिक्स आणि 4) क्वांन्टिटेटीव्ह ऍप्टिट्यूड या चार विषयांची असते. इथे उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील वर्षासाठी प्रवेश मिळतो. अकाउंटिंग हा प्रेमा हिचा ‘हँड सब्जेक्ट’.  ती म्हणाली, ‘उरलेल्या विषयांचा अभ्यासही मनापासून केला आणि त्यात मला यश मिळाले’. विशेष म्हणजे या परीक्षेसाठी तिने कोणताही ‘क्लास’ लावलेला नव्हता!

‘सीपीटी’नंतर ‘आयपीसीसी’ची पायरी असते. याचा लॉंगफॉर्म आहे - ‘इंटिग्रेटेड प्रोफेशनल कॉम्पिटन्स कोर्स’. आधी हा टप्पा ‘सीए इंटरमिजिएट’ नावाने ओळखला जात असे. या परीक्षेसाठी दोन ग्रुप असतात. ‘ग्रुप 1’ मध्ये 1) अकाउंटिंग, 2) बिझनेस लॉ-इथिक्स अँड कम्युनिकेशन्स, 3) कॉस्ट अकाउंटिंग अँड फिनान्शियल मॅनेजमेंट आणि 4) टॅक्सेशन हे 4 पेपर असतात तर ‘ग्रुप 2’मध्ये 1) ऍडव्हान्स अकाउंटिंग, 2) ऍडिटिंग अँड ऍश्युअरन्स और 3) इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हे 3 पेपर असतात. या टप्प्याची एक खासियत आहे. हे दोन्ही ग्रुप स्वतंत्रपणे ‘ऍपिअर’ करता येतात किंवा आधी पहिला ग्रुप ऍपिअर करून, त्यात उत्तीर्ण होऊन मग दुसरा ग्रुप ऍपिअर करता येतो. पण असे वेगवेगळे ऍपिअर झाले, तर ते मेरिट लिस्टमध्ये गृहित धरले जात नाहीत! ही आकडेवारीही लक्षणीय असते. गतवर्षीची ही आकडेवारी शोधली, तेव्हा असे लक्षात आले, की ग्रुप 1 मध्ये 48 हजार 320 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 13 जार 193 (27.30%) उत्तीर्ण झाले. ग्रुप 2 मध्ये 51 हजार 906 जणांनी परीक्षा दिली. यापैकी 11 हजार 341 (21.85%) उत्तीर्ण झाले, तर दोन्ही ग्रुप एकत्रित देणार्‍यांची संख्या 29 हजार 339 होती. त्यापैकी 3 हजार 804 जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण फक्त 12.97 टक्के आहे! अशा या चुरशीत प्रेमा हिचा गुणवत्तायादीतील त्या वेळचा क्रमांक होता 20वा!

ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर (किंवा त्यातील कोणताही एक ग्रुप उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याला साधारण साडेतीन वर्षांची ‘आर्टिकलशिप’ करावयाची असते. ही एक प्रकारची एन्टर्नशिपच असते. एक यशस्वी ‘सीए’ होण्यासाठीची पायाभरणी या साडेतीन वर्षांत होत असते. एखाद्या ज्येष्ठ सी.ए.च्या हाताखाली संबंधित विद्यार्थ्याने या काळात काम करावयाचे असते. अभ्यासक्रमाचे ‘ऍप्लिकेशन्स’ या काळात शिकून घेतल्यानंतर ‘सीए फायनल’च्या लेखी परीक्षेत त्याचे ‘थेरॉटिकल नॉलेज’ लिहावयाचे असते! आधी प्रॅक्टिकल मग थिअरी, असा हा प्रकार असतो. 

सी.ए. फायनल हा तसा अवघड प्रकार. साडेतीन वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर या परीक्षेतील यशापयशावर विद्यार्थ्याचे भवितव्य अवलंबून असते. इथेही दोन ग्रुप असतात. या वेळी पेपर मात्र 8 असतात. पहिल्या ग्रुप मध्ये 1) फिनान्शियल रिपोर्टिंग, 2) स्ट्रॅटेजिक फिनान्शियल मॅनेजमेंट, 3) ऍडव्हान्स्ड् ऑडिटिंग अँड प्रोफेशनल इथिक्स आणि 4) कार्पोरेट अँड अलाईड लॉज. तर दुसर्‍या ग्रुप मध्ये 1) ऍडव्हान्स मॅनेजमेंट अकाउंटिंग, 2) इन्फर्मेशन सिस्टिमस् कंट्रोल अँड ऑडिट, 3) डायरेक्ट टॅक्स लॉ और 4) इनडायरेक्ट टॅक्स लॉ... हा अभ्यासक्रम ‘हेवी’ असतो. त्याच्या परीक्षेसाठी साधारणपणे ‘सीए’कडून काही महिन्यांची रजा घेण्याचीही परवानगी असते. प्रेमा हिने परीक्षेआधी पाच महिने ही रजा मिळविली आणि हे अखेरचे पाच महिने तिच्यासाठी अतिशय महत्वाचे ठरले. ती म्हणते, ‘‘परीक्षेआधीचा हा काळ खूप महत्वाचा होता. मी आणि माझ्या भावाने मिळून प्रारंभी दररोज 8 ते 10 तास अभ्यास केला आणि अखेरचे दोन-अडिच महिने अक्षरशः 16-16 तासांचा अभ्यास केला. ‘आर्टिकलशिप’मध्ये पेपर लिहिण्याचा सराव मोडलेला असतो. परीक्षा डोळ्यासमोर ठेवून आम्ही ‘रट्टा’ मारण्यास सुरवात केली. त्यामुळे लिहिण्याची सवय पुन्हा एकदा जोडली गेली. तीन वर्षांचा अनुभव, चार-पाच महिन्यांचा अभ्यास यानंतर शेवटच्या क्षणी करावी लागणारी ‘रिव्हिजन’सुद्धा खूप महत्वाची होती. हे सारे ‘स्पेसिफाईड’ हवे असते. यात पाठांतर खूप महत्वाचे असते. ते आम्ही करून दाखविले.’’

प्रेमा आणि तिच्या भावाने ‘आयपीसीसी’पासून क्लास लावला. विशेष म्हणजे, बी.कॉम.मधील तिच्या यशामुळे तिला क्लासने फीमध्ये 100 टक्के सवलत दिली, एवढेच नव्हे, तर बी.कॉम.मध्ये विद्यापीठात द्वितीय आल्यामुळे तिला एकंदर 50 हजाराची पारितोषिके आणि काही स्कॉलरशिप मिळाल्या. त्या आर्थिक आधारावरच आपण ‘सीए’ होऊ शकलो, असे प्रेमा आवर्जुन सांगते!

इतर काही परीक्षांप्रमाणे सी.ए.मध्ये ‘टॉप’ येणे हा नशिबाचा खेळ नसतो, असे मानले जाते. इथे विद्यार्थ्याची निव्वळ मेहनतच उपयोगाला येते. प्रेमा प्रथम आली. तिला 800 पैकी 607 गुण मिळाले. दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या विद्यार्थ्याला तिच्यापेक्षा तबाबल 5 गुण कमी आहेत, तर तिसर्‍या क्रमांकावरील विद्यार्थी तिच्याहून 13 गुणांनी मागे आहे! हा निर्विवाद आघाडीचा भाग केवळ कठोर मेहनतीतूनच येऊ शकतो, असे मानले जाते. आपल्या या ‘विनिंग स्ट्रोक’बद्दल ती भरभरून बोलली. आपली अभ्यासाची पद्धती, लक्षात ठेवण्याच्या क्लृप्त्या, हे सारे तिने जालन्यातील विद्यार्थ्यांसमोर मनापासून शेअर केल्या. अशा प्रकारचा थेट संवाद ती सुद्धा प्रथमच अनुभवत होती!


तिच्याशी संवाद साधताना मला जाणवलेली एक महत्वाची बाब म्हणजे, दहावीपर्यंतचे तिचे शिक्षण तमिळ भाषेतून झाले. सातवीपासून तिने इंग्रजी भाषेची ओळख करून घेण्यास प्रारंभ केला. ती म्हणाली, तमिळपेक्षा इंग्रजीतून शिकणे मला जड जात होते. पण तरीही मी जिद्दीने ही भाषा शिकत गेले. मातृभाषेतून शिक्षणाविषयी भरपूर चर्चा चालू असताना, तमिळ या मातृभाषेतून शिकलेल्या या मुलीने आपल्या जिद्दीने सी.ए. सारख्या परीक्षेत इंग्रजीतून मिळविलेले यश मला खूप उल्लेखनीय आणि आनंददायी वाटले.

साधारण तासभर चाललेला हा संवाद खूपच रंगला. मला कौतुक वाटले ते जालन्यातील उत्साही विद्यार्थी आणि आयोजकांचे. मुंबईतील एका रिक्षाचालकाची मुलगी सीए परीक्षेत प्रथम येते, याचे जालनेकरांना कौतुक वाटण्याचे कारणच काय? पण जालन्यातील रोटरी क्लब, रोटरॅक्ट क्लब, रोटरी इनरव्हिल क्लब या संस्थांबरोबरच ‘लोटस बिझनेस स्कूल’, ‘नॉलेज प्रोफेशनल ऍकॅडमी’ या शिक्षणसंस्थांनी यात पुढाकार घेतला होता. ‘विक्रम चहा’ आणि ‘पोलाद स्टील’ या जालन्यातील दोन उद्योगांनी याचा आर्थिक भार उचलला होता! फुलंब्रीकर नाट्यगृहाची आसनक्षमता साधारण 1000 आहे. हे सभागृह खच्चून भरले होतेच, पण साधारण 400 ते 500 मुले-मुली उभी राहून या मुलाखतीचा आस्वाद घेत होती! जालन्यासारख्या शहरातील हा प्रतिसाद सुखावणारा होता! विशेष म्हणजे मुलांपेक्षा मुलींची संख्या यात जास्त होती! असा कार्यक्रम औरंगाबादेत व्हावा, असे कुणाला वाटले नाही, याचे मला वैषम्य नक्कीच वाटले.

वैषम्य आणखी एका गोष्टीचे वाटले. जालना हे औरंगाबादपासून जेमतेम 50 किलोमीटरवरील शहर. या शहरात एका ‘टॉपर’ मुलीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरू शकणार्‍या प्रकट मुलाखतीचा -हृद्य सत्काराचा कार्यक्रम निरपेक्ष भावनेने होतो, ही मराठवाड्याच्या दृष्टीनेच अभिमानाची बाब. या विषयीच्या बातम्या विविध दैनिकांच्या जालना आवृत्तीत प्रकाशित झाल्या खर्‍या, पण औरंबादेत मात्र एकाही दैनिकाने तिच्याबद्दल एका ओळीचीही बातमी प्रकाशित केली नाही...! ही मिडियाची उदासीनता की अज्ञान?

Tuesday, January 1, 2013

वजन कमी करण्याची माझी गोष्ट...

हा लेख माझ्या वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे. हा सल्ला अथवा मार्गदर्शन नाही. ज्यांना अशा प्रकारचे प्रयोग करायचे आहेत त्यांनी तज्ञांचा सल्ला घ्यावा अथवा स्वतःच्या जबाबदारीवर प्रयोग करावेत. 

हा माझ्या पट्ट्याचा फोटो. हळूहळू एक एक छिद्र आत  येत आहे...!

------------------------------------------------------------------------------------------------------

साधारणपणे 2012 च्या मे महिन्याचा शेवट. पोटातील अनेक व्याधी घेऊन डॉक्टरांकडे गेलो होतो. सततचे प्रवास सुरू होतेच. सतरा ठिकाणचे खाणे आणि पाणी पोटात जात होते... ते पचविण्याची माझ्या पोटाची ताकद उरली नव्हती. ऍन्टीबायोटिक्स पचणेही अशक्य झाले होते. अशा वेळी होमिओपथीचे उपचार सुरू केले. डॉक्टरांकडे वजन मोजले. ते 82.5 किलो भरले! अनियमित-अवेळी खाणे, कुपथ्यकारक आहार यामुळे मागची अनेक वर्षे वजनकाटा चढत्या क्रमानेच वजन दाखवीत होता. वाढते वय आणि वाढते वजन या दोन्हींचे एकत्रित परिणाम म्हणून पाठदुखी, गुडघेदुखी वाढली होती, हा प्रकार वेगळाच!

डॉक्टरांनी औषधे दिली. खाल्लेले काहीही पचत नव्हते आणि सतत महिनाभर जुलाबांचा त्रास सुरू होता, त्यामुळे अशक्तपणा जाणवत होताच. आहार नियंत्रित करणे, खाण्याच्या वेळा आणि पथ्ये पाळणे, वजन कमी करणे ही त्रिसुत्री डॉक्टरांनी सांगितली होती. त्यातील पहिल्या दोन्हींची अंमलबजावणी तातडीने सुरू केली. साधारणपणे सलग दीड ते दोन महिने मी केवळ साधे वरण आणि भाकरी, गरजेप्रमाणे भात या आहारावर होतो. पचवायला जड जाईल असे काहीही न खाण्याकडे कटाक्ष होता. तब्येत बरी वाटल्यानंतर पुन्हा प्रवासाला बाहेर पडलो आणि साधारण 20 दिवस बाहेरच राहिलो. या काळात सुद्धा योगायोगाने ‘साधे वरण - भाकरी’ देणारे हॉटेल सापडले. त्या शहरात असताना तो आहार आणि प्रवासात बाहेर पडलो की गाडीत सफरचंद, केळी, मोसंबी अशी फळे आणि राजगिर्‍याचे लाडू वगैरे खाद्यपदार्थ भरलेले. साखरेचा चहा बंद केला. परिणामी पोटाचा त्रास कमी झाला, सुमारे दीड महिना चाललेले जुलाब नियंत्रणात आले.

ही सारी कामे आटोपून 16 ऑगस्ट रोजी औरंगाबादेत परत आलो. डॉक्टरांच्याकडे भेट दिली. वजन मोजले. ते 80 पर्यंत उतरले होते. माझे वजन कमी होऊ शकते, हे मी पहिल्यांदाच पाहात होतो! त्या आधी अनेक वर्षांपासून मी अनेकदा प्रयत्न केले होते, पण वजन कमी झालेले नव्हते. हे वजन उतरलेले पाहून माझा मलाच विश्र्वास आला आणि पुन्हा एकदा वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे मी ठरविले. मी पद्मजासोबत - माझ्या पत्नीसोबत - चर्चा केली आणि 17 ऑगस्टच्या सकाळपासून फिरायला जाण्याचे ठरविले. 

सकाळी लवकर उठणे ही माझ्या दृष्टीने सर्वात मोठी शिक्षा होती. लहानपणापासून कधीही मला पहाटे उठून अभ्यास करणे शक्य झाले नव्हते. फिरणे तर नाहीच. ज्या व्यवसायात 16-16 वर्षे काम केले, त्या पत्रकारितेत रात्रीची जेवण्याची वेळ अनिश्चित आणि झोपेची वेळ पहाटे तीनच्या आसपास. त्यामुळे सकाळी लवकर उठणे अवघडच...! मधल्या काही वर्षांत रात्रीची झोपेची वेळ 10-11 पर्यंत नियंत्रणात आली होती आणि सकाळी 7 च्या सुमारास उठणे सुरू होते. ही जाग आणखी अलिकडे आणणे गरजेचे होते. सकाळी 6 वाजता उठण्याचा प्रयत्न सुरू केला आणि तो साध्यही झाला.

मी औरंगाबादेत सिडको एन-2 च्या परिसरात राहतो. पहिल्या दिवशी आम्ही दोघे घराबाहेर पडलो आणि साधारण दीड किलोमीटरचा फेरफटका मारत घरी परतलो. दुसर्‍या दिवशी हे अंतर थोडे वाढविले आणि कामगार चौकातून एडीसीएच्या स्टेडियमकडून घरी परतलो. तिसर्‍या दिवशी असा विचार आला की रस्त्यांवरून वाहनांपासून स्वतःला वाचवित फिरण्याऐवजी मैदानावरच गोल चकरा मारल्या तर? तिसर्‍या दिवशी मैदानाला दोन फेर्‍या मारल्या. तिसर्‍या दिवसापासून एक-एक फेरी वाढवायला सुरवात केली, सहा फेर्‍यांपर्यंत पोहोचलो. एका फेरीला साधारण 7 ते 8 मिनिटे लागत होती. हा पाऊण तासाचा दिनक्रम निश्चित झाला. 

नुसत्याच फिरण्याने मिळणार्‍या फायद्याबरोबर योगासनांचाही फायदा झाला पाहिजे असे मला वाटू लागले होते. योगायोगाने, साधारण एप्रिल-मे मध्ये मी ‘सातारा आयकॉन्स’साठी मुलाखती घेताना सातार्‍यात योग गुरू अरुण रायरीकरांची भेट झाली होती. अधूनमधून मी त्या वर्गालाही हजेरी लावत असे. तेथून निघताना तेथे दररोज केल्या जाणार्‍या आसनांच्या स्थितींचे फोटो मी मुद्दामहून काढून घेतले होते. श्री. बर्जे हे स्थानिक बांधकाम व्यावसायिक अतिशय उत्तम प्रकारे आणि लवचिकपणे योगासने करीत. त्यांचे फोटोसेशनच केले. त्याचा उपयोग करण्याची वेळ आता आली होती.

एके दिवशी फोल्डरमधील सारे फोटो क्रमवार लावून घेतले. ते रिड्यूस साईजमध्ये पेज वर घेऊन त्याचे प्रिंटआऊट काढले आणि दररोज सकाळी ते प्रिंट समोर ठेवून योगासनांना सुरवात केली. ही सर्व योगासने प्रामुख्याने चरबी जाळण्यासाठी उपयोगाची ठरणारी होती. योगासने सुरू करण्याआधी सूक्ष्म व्यायाम गरजेचे होते. सूक्ष्म व्यायाम म्हणजे हाताच्या बोटांची उघडझाप करणे, खांदे फिरवणे, पायाच्या घोट्याला व्यायाम करणे आदी. त्याशिवाय श्वासाद्वारे पोट, हृदय आणि जठराला मिळणारा व्यायामही महत्वाचा होता. या सार्‍यांचा फरक महिनाभरात दिसू लागला. वजनकाटा आणखी खाली घसरला. त्यामुळे माझा उत्साह वाढला. पहिल्या आठवडाभरात ग्राऊंडला फेरी मारताना श्वास फुलायचा. तो स्थिर झाला, तसा मी पळण्याचा प्रयत्न करू लागलो. या ग्राउंडचा परीघ साधारण 750 मीटरचा आहे. यातील150-200 मीटर पळून गेलो की धाप लागायची. पण सराव कायम ठेवला. हळूहळू एका दमात एक फेरी पूर्ण होऊ लागली. त्यांतरच्या तीन फेर्‍यांत मिळून 30 -30 टक्के ग्राऊंड पूर्ण होऊ लागले. हा प्रमाणही हळूहळू बदलू लागले आणि एका दमात दोन फेर्‍या मारण्यापर्यंत दम पुरण्याची क्षमता गाठली. पण यामध्ये एक अडचण आली. माझे गुडघे सुजू लागले. डॉक्टरांशी बोललो, तेव्हा ते म्हणाले, ‘वय पाहून पराक्रम करावेत!’ त्यांच्या म्हणण्यानुसार चाळीशीनंतर अचानक जाग येऊन पळायला सुरवात केली आणि त्या आधी गुडघ्यांची हानी झालेली असेल, तर असे पळणे घातक ठरू शकते. नाईलाजाने पळणे बंद करावे लागले, आता नियमितपणे सहा फेर्‍या चालू ठेवल्या. घरातून मैदानात पोहचण्यासाठी साधारण 800 मीटर चालावे लागते. तेथे सहा फेर्‍या पूर्ण करायच्या आणि परतीचे 800 मीटरचे अंतर काटायचे. सर्व मिळून साधारण पाच किलोमीटरचे अंतर होते. या साठी एक तास लागतो.

मैदानावरील फेर्‍या पूर्ण झाल्यानंतर तेथेच पायर्‍यांवर बसून दीर्घश्र्वसन, अनुलोम-विलोम, भस्रिका हे श्र्वासाचे व्यायाम आणि त्या शिवाय इतर बैठी योगासने मी पूर्ण करतो. तेथून घरी परतल्यावर झोपून करावयाची आसने, सर्वांगासन, हलासन हे पूर्ण करतो. चालणे आणि योगासने करताना महत्वाचा भाग होता - परगावी गेल्यानंतर काय करायचे? ‘आयकॉन्स’च्या निमित्ताने सलग 10-15 दिवस मला बाहेर राहावे लागते. अशा वेळी मी एक काम करतो. ज्या शहरात जायचे ते शहर आधी ‘गुगल मॅप’वर पाहून घेतो. तेथे एखादे मोठे मैदान किंवा स्टेडियम आहे का ते पाहातो. असेल तर तो भाग समजून घेतो आणि एखाद्या स्थानिक मित्राकडे त्या परिसरात राहण्याची सोय पाहून घेतो. तसे नसेल तर गावाच्या बाहेरचे हॉटेल पाहातो. सकाळी 6.30 वाजता हॉटेलबाहेर पडतो. गावाबाहेरची दिशा धरून 30 मिनिटे चालत राहतो. तेधून परत फिरतो. लॉजवर येऊन आसने पूर्ण करतो.

नुसतेच चालणे आणि योगासने यांनी वजन कमी होत नसते. त्या साठी आहार नियंत्रण खूप महत्वाचे ठरते. मी मुळात ‘जोशी.’ जन्मजात खवय्या. जिभेवर नियंत्रण ठेवणे खूपच अवघड. काही चांगलंचुंगलं दिसलं, की ते जिभेवर कसे येईल, याचाच विचार. वजन वाढण्याचे हेच महत्वाचे कारण होते. खा-खा खायचे पण ते पचवायचे कसे? व्यायाम नाही, त्यामुळे घाम निघत नाही! आणि एका विशिष्ट वयानंतर प्रत्येकाची शरीरसंस्था हळूहळू बदलत जाते. आधी शरीरावर केलेले अत्याचार आता शरीर खपवून घेईनासे होते. पचनशक्ती मंदावलेली असते. त्याचे एकत्रित परिणाम शरीरावर होतात. 

त्यामुळे पचनाची स्थिती लक्षात घेऊन दिवसाचा क्रम ठरवून घेतला. हा प्रारंभिक दिनक्रम सोप्या ‘उपचारां’त बांधला. असे ठरविले, की आंघोळ केल्यानंतर 20 मिनिटांनी नाश्ता करायचा. पण अट ही, की आंघोळीआधी सारी योगासने झाली पाहिजेत. मात्र फिरून आल्याशिवाय योगासने करायची नाहीत...! परस्पर नियंत्रणातून आपोआपच शिस्त लागली. नाश्ता खूप हेवी ठेवला नाही. जेमतेम भूक भागेल, रात्रीपासूनचा उपवास तुटेल एवढेच पाहिले. मात्र एक गोष्ट आवर्जुन आहारात ठेवली, वाटीभर ताजे दही. रात्री लावलेले विरजण सकाळी वाटीत घ्यायचे... चवीला मधूर दही सकाळी खाणे प्रकृतीला पूरक ठरते. विशेषतः आतड्यांत ‘अल्सरेटीव्ह कोलायटीस’ची लक्षणे असलेल्या माझ्यासारख्या पेशंटसाठी हा महत्वाचा आहार ठरला. सकाळी साधारण 8.30 ते 9 च्या सुमारास नाश्ता झाल्यानंतर दुपारी साधारण 12.30 ते 1 दरम्यान जेवण. त्यात शक्यतो एखादी भाकरी, कमी तिखटाचे वरण, एखादी फळभाजी आणि भात. शक्यतोवर गोड पदार्थ वर्ज्य. संध्याकाळी 4 च्या सुमारास चहा आणि मारीची 2-3 बिस्किटे किंवा राजगिर्‍याचे लाडूू. हे नसतील तर एखाद-दुसरे फळ. संध्याकाळचे जेवण मात्र 7.30 च्या आत. ते अतिशय कमी. म्हणजे अर्धी भाकरी, थोडीशी भाजी. शक्यतो भात टाळतो. दिवसा शक्यतो झोपत नाही. फारच गरज असेल, तर 15-20 मिनिटे वामकुक्षी.

आहाराचे नियंत्रण करताना एक लक्षात आले, की जेमतेम भूक भागेल एवढाच आहार घेतल्याने दिवसभर हलके हलके वाटते. दिवसा झापड येत नाही. महत्वाचे म्हणजे कार्यक्षमता वाढते. उत्साह वाढतो. मला मधुमेह नाही, पण लक्षात आले की चहा किंवा गोड पदार्थांद्वारे पोटात जाणार्‍या शर्करेमुळे तयार होणार्‍या कॅलरी जाळणे अवघड जाते आहे. मग मी गोड पदार्थांवर खूप नियंत्रण आणले. ही माझ्यासाठी खूप मोठी कसोटी होती. मी गोड पदार्थांचा खूप चाहता आहे. एका वेळी मोठ्या आकाराचे 20 गुलाबजाम संपविणे हा अनेकवेळा केलेला प्रकार...! जिलेबी, पेढे, पुरणपोळी, खीर, रसगुल्ले... दररोजच्या जेवणात असे काही गोड असले की आमची जिव्हा प्रसन्न होत असे. ही सवय मोडून काढणे जड गेले. पण ‘मरता क्या नहीं करता?’ अशी माझी स्थिती. चहा सुद्धा कमी किंवा बिन साखरेचा घेऊ लागलो. बाहेर गेल्यावर चक्क ‘चहा सोडला, दूध चालत नाही आणि कॉफी घेत नाही’ असे सांगत असे. लिंबूपाणी हा त्यावरचा पर्याय. या पाण्यात साखर नाही आणि मीठही. फक्त ग्लासभर पाण्यात एक लिंबू पिळलेले...!

आहारावरील नियंत्रणाचा परिणाम म्हणून पचवता येईल एवढाच आहार घेणे सुरू झाले. पुरेसा व्यायाम झाल्याने पचन व्यवस्थित होऊ लागले. त्यामुळे साहजिकच अन्नाचे चरबीत होणारे रुपांतर टळले. शरीरावर साठलेली चरबी झडू लागली. त्याचा पहिला परिणाम गालांवर दिसू लागला. सुजल्यासारखे दिसणारे गाल उतरले. पोटाचा घेर कमी झाला आणि नितंबांचाही...! आधी कमरेला काचणार्‍या पँट घालण्यासाठी आता बेल्ट वापरावा लागतो आहे. आधी बेल्टला बाहेरच्या बाजूने दोन छिद्रे जादा पाडून घेतली होती, त्यातून तो कमरेभोवती बांधता येत होता. आता विरूद्ध दिशेने छिद्रे पाडण्याची वेळ आली आहे. जे शर्ट घालता येत नाहीत म्हणून बाजूला ठेवले होते, ते आता व्यवस्थित येत आहेत आणि नंतरच्या काळात घेतलेले शर्ट आता ‘मोठ्या भावाचे कपडे’ घातल्यासारखे ढगळ होत आहेत...!

नियमितपणे पुरेसा व्यायाम, आहार नियंत्रण आणि योगासने या त्रिसुत्रीचे पालन केले, की वजन नक्की कमी होते, हे मी अनुभवतो आहे. जिभेवर नियंत्रण सर्वात महत्वाचे. त्यानंतर आपोआपच शरीरावर नियंत्रण येऊ लागले. यात मला बर्‍यापैकी यश आले. 17 ऑगस्टपासून 1 जानेवारीपर्यंतच्या या पाच-साडेपाच महिन्यांच्या काळात 82.5 ते 70.5 इथपर्यंत मी पोहोचू शकलो. आता यापुढे वजन घटविणे जास्त कठीण आहे. आतापर्यंत घटले त्यात प्रामुख्याने चरबी होती. आता स्नायूंना पीळ बसणार आहे. तरीही दरमहा 2 किलो अशा हिशेबाने मे अखेर 60 किलोपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. बघुया.. काय होते ते...!