Wednesday, September 18, 2013

पाणीटंचाई मुक्तीचा ‘जालना पॅटर्न’

जालन्याचा पाणीप्रश्‍न सन 2013 च्या उन्हाळ्यात जगभरात गाजला. सार्‍या जगाच्या सहानुभूतीच्या नजरा या जिल्ह्याकडे वळल्या. कुचेष्टेच्या स्वरात बोलायचे तर हा ‘दुष्काळी पर्यटनाचा सोहळा’च झाला. पण कधी कधी मोठी आपत्ती इष्टापत्ती ठरते. जालन्याच्या बाबतीच असेच काहीसे घडते आहे. ‘गाव करील ते राव काय करील’ या उक्तीला साजेशी चळवळ जालन्यात उभी राहिली आणि जालन्याकडे सहानुभूतीने वळणार्‍या नजरा कौतुकाने वळविण्याचे बिजारोपण याच उन्हाळ्यातील चार महिन्यांत झाले. हे होत असतानाच विक्रमी कालावधीत, अत्यंत कमी खर्चात सार्वजनिक कामे कशी उभी राहू शकतात, याचा वस्तुपाठही या शहराने घालून दिला... ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’च्या पुढाकाराने हाती घेण्यात आलेले हे काम श्री. रमेशजी पटेल, श्री. सुनीलजी रायठठ्ठा आणि सौ. सपनाजी सुनील गोयल यांच्या नेतृत्वाखाली आकार घेते आहे.

जालन्याचा पाणीप्रश्‍न नेतृत्वाच्या अकर्मण्यतेचा परिपाक आहे, ही बाब असंख्य वेळा अधोरेखित झाली आहे. निजामाच्या काळात 1935 मध्ये खोदण्यात आलेल्या घाणेवाडीच्या तलावाने जालन्याची तहान सातत्याने भागविली. पण 78 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात या तलावात खूप मोठ्या प्रमाणात गाळ साचला आणि साहजिकच तलावाची साठवणक्षमता जेमतेम 25 टक्क्यांवर आली. कुंडलिका नदीवर निधोना गावाच्या उत्तरेकडे बांधण्यात आलेल्या या तलावाच्या बंधार्‍याची रुंदी 836 मीटर तर उंची 15 मीटर आहे. साचलेल्या गाळामुळे ही उंची जेमतेम पाच मीटरपर्यंत राहिली. उंची एक तृतियांश उरली तरी क्षमता त्याच्या अनेक पटीत कमी झाली, कारण पाण्याची खोली कमी झाल्याने बाष्पिभवनाचे प्रमाण वाढले. या तलावातील गाळ उपसला आणि पाण्याची साठवणक्षमता वाढविली, तर आजही हा तलाव जालनेकरांची वर्षभराची तहान भागवेल, हे स्पष्ट दिसत असताना प्रशासन ढिम्म होते आणि लोकप्रतिनिधी उदासीन.

घाणेवाडी तलावातील गाळ
या पार्श्‍वभूमीवर ‘घाणेवाडी जलसंरक्षण मंचा’ची स्थापना ‘विक्रम चहा’चे श्री. रमेशजी पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्यांना श्री. सुनीलजी रायठठ्ठा यांची साथ मिळाली. जालन्याच्या नागरिकांतून काही प्रमाणात निधी उभा राहण्यास प्रारंभ झाला आणि सन 2010 च्या उन्हाळ्यात घाणेवाडी तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ करण्यात आला. तेव्हापासून सलग चार वर्षे, दर वर्षी नित्यनेमाने हे काम सुरू आहे. दर वर्षी तलाव कोरडा पडल्यानंतर साधारणपणे तीन ते चार महिने मर्यादित साधनांद्वारे हे काम केले जाते. साधारणपणे 45 हजार ट्रॅक्टर गाळ दरवर्षी बाहेर काढला जातो. जालन्यातून दरवर्षी साधारण 20 लाख रुपये उभे राहतात आणि त्या द्वारे यंत्रणा वापरात आणून हे काम करण्यात येते. तलावात साचलेल्या गाळाच्या उंचीचा अंदाज या वर्षीच्या उन्हाळ्यात प्रशासनाने पाण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांतून घेता येतो. ‘घाणेवाडी जलसंरक्षण मंचा’ने खोदलेल्या साधारण 10 फुट खोल पातळीच्याही खाली साधारण 10 फुटांचा खड्डा प्रशासनाने घेतला. त्यातही गाळाची पातळी साधारणपणे 2 फुटांची दिसते. याचाच अर्थ, तलावातील सर्वसाधारणपणे गाळाची पातळी 12 फुटांची आहे. मागील चार वर्षांत झालेले काम जेमतेम एक ते दोन टक्क्यांचेच आहे. 670 एकरांच्या तलावातील साधारणपणे 20 ते 25 एकरांच्या क्षेत्रातील सरासरी 8 फुटांचा गाळ काढण्यात आजवर यश आले आहे. याच गतीने हे काम चालू राहिले, तर हे काम साधारण 100 ते 125 वर्षे पुरेल ! प्रशासनाने या कामात पुढाकार घेत किमान 50 ‘पोकलेन’ व ‘जेसीबी’ची यंत्रणा उपलब्ध करून दिली आणि त्याला 250 हून अधिक टिप्परची जोड दिली, तर कदाचित हे काम साधारणपणे पाच उन्हाळ्यांत मिळून पूर्ण हेऊ शकेल आणि जालनेकरांची तहान पूर्णपणे भागवता येईल.

कुंडलिका नदीवरील बंधारे
घाणेवाडी तलावापासून जेमतेम एक किलोमीटर अंतरावर निधोना गाव आहे. कुंडलिका नदी या गावाला वळसा घालून पुढे वाहते. साधारण 8 किलोमीटरचा प्रवास करीत ही नदी जालना येथे पोहोचते. धरणातील गाळाप्रमाणेच या नदीचीही स्थिती झालेली असल्याचे लक्षात आल्यानंतर ‘घाणेवाडी जलसंरक्षण मंचा’ने या नदीवर शिरपूर पद्धतीचे बंधारे बांधण्याचे ठरविले.

राज्यभरात गाजलेल्या ‘शिरपूर पॅटर्न’चे प्रणेते श्री. सुरेश खानापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जालन्यात हे काम सुरू करण्याचे ठरविण्यात आले. मात्र, या कामाचे सार्वत्रिक स्वागत होऊन मदतीचे हात पुढे येण्या ऐवजी अनेकांनी त्यात चक्क अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यातून खचून न जाता मंचाने ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’च्या पुढाकारातून हे काम प्रत्यक्षात उतरविण्याचा निर्धार केला. याचा शुभारंभ झाला 21 एप्रिल 2013 रोजी. 
निधोना गावानजिक या नदीत ‘शिरपूर पॅटर्न’द्वारे सुमारे 500 मीटर पात्र खोल करून त्यावर बांध घालण्याचे ठरवून  ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’ने प्रत्यक्ष कामास प्रारंभ केला. ‘शिरपूर पॅटर्न’चे प्रणेते श्री. सुरेश खानापूरकर यांच्या शुभहस्तेच हा उपक्रमाचा नारळ वाढविण्यात आला. प्रारंभी वाटले तेवढे हे काम सोपे नाही, याची जाणीव हे नदीपात्र खोदताना सर्वांना झाली.




साधारणपणे दोन-तीन फूट खोल गेल्यानंतरच कठिण खडकास सुरवात झाली आणि कामाचा वेग मंदावला. साधारणपणे 30 दिवसांत हे काम पूर्ण व्हावे असे अपेक्षित होते, पण त्याला जास्त वेळ लागणार हे स्पष्ट होऊ लागले. ही सारी कामे पोकलेन आणि जेसीबीद्वारेच चालू होती, हे विशेष.

घाणेवाडी तलावाजवळ असलेल्या या बंधार्‍याला ‘बंधारा क्र. 1’ असे नाव देण्यात आले. या बंधार्‍यानंतर प्रत्येक किलोमीटरवर सुमारे 500 मीटर लांबीचा एक अशा प्रकारे आठ साखळी बंधारे घालण्याची संकल्पना  ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’तर्फे मांडण्यात आली. त्यामुळे या संपूर्ण परिसरात प्रत्येक किलोमीटरवर पाणी साठून ते जमिनीत झिरपेल आणि परिसरातील भूजलपातळी उंचावेल, असे अपेक्षित आहे. पण इथे प्रश्‍न आला आर्थिक क्षमतेचा. त्यामुळे दोन ते सात क्रमांकाचे बंधारे घालण्याचे काम तात्पुरते पुढे ढकलून मंडळाने थेट आठव्या बंधार्‍याचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबादहून जालना शहरात जाताना कुंडलिका नदी ओलांडावी लागते. या नदीवरून जाताना डाव्या हाताला ‘रामतीर्थ बंधार्‍या’चे नाव नदीपात्रात स्पष्टपणे दिसू लागते. हाच तो आठवा बंधारा. या बंधार्‍याने अनेक विक्रम केले. बंधार्‍याचे भूमीपूजन 11 मे2013 रोजी झाले आणि 11 जून 2013 रोजी हा बंधारा संपूर्ण काम संपवून कार्यान्वित झाला होता! नदीपात्रात 500 मीटर लांबपर्यंत साधारणपणे 6 मीटर खोल खोदकाम करून पात्रातील गाळ, माती, वाळू आणि खडक बाहेर काढण्यात आला आणि तो पात्राच्या कडेने सुरक्षित अंतरावर टाकण्यात आला. नदीपात्र तब्बल 50 मीटरपर्यंत रुंद करण्यात आले. आठव्या क्रमांकाच्या या बंधार्‍याची लांबी 50 मीटर आहे. बंधार्‍यालगत नदीची खोली तब्बल 15 फूट आहे. सिमेंट कॉंक्रिटमध्ये बांधण्यात आलेल्या या बंधार्‍यात ‘ओव्हरफ्लो’ होणारे पाणी सांडव्यावरूनच वाहून जाण्याची सोय करण्यात आली आहे. पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे बंधार्‍याच्या मुख्या भिंतीला धक्का पोहोचू नये, म्हणून दगडाचे ‘पिचिंग’ करण्यात आले. 

बंधार्‍याच्या कामातील ‘विक्रमांचा विक्रम’
या बंधार्‍याने अशा प्रकारच्या कामांमध्ये विक्रमांवर विक्रम नोंदविले. वर उल्लेख केल्याप्रमाणे मोठे आकारमान असलेला हा बंधारा ‘सरकारी’ पद्धतीने तयार करायचा, तर नेमका किती काळ लागला असता, याचे उत्तर देणे फारसे अवघड नाही. या साठी किती निधी लागू शकला असता, यावर वेगवेगळी उत्तरे येऊ शकतात, पण कंत्राटदारांच्या खाजगीतील अंदाजानुसार हे काम पूर्ण होण्यासाठी साधारण 6 कोटी रुपयांचे बजेट नक्की लागले असते. हेच काम  ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’ने केवळ 1 कोटी 25 लाखांत पूर्ण केले! भ्रष्टाचार होणार नाही, याची काळजी घेतली आणि कामावर निष्ठा ठेवली, तर काय घडू शकते, याचे उदाहरण म्हणून ‘रामतीर्थ बंधार्‍या’चे नाव सांगता येईल. 4 पोकलेन, 1 जेसीबी आणि 12 टिप्पर यांच्या सहाय्याने मोजून एका महिन्यात 500 मीटर लांब आणि 50 मीटर रुंदीचे नदीपात्र खोदून हा बंधारा पूर्ण करण्यात आला. या साठी 1000 ट्रक रेडीमिक्स कॉंक्रिट वापरण्यात आले. या बंधार्‍यात या वर्षी 16 कोटी लिटर पाणी थांबेल आणि जमिनीत पाझरेल.

संपूर्ण लोकसहभागातून, एका रुपयाचीही सरकारी मदत नसताना हे काम विक्रमी वेळात आणि अत्यंत उच्च गुणवत्ता राखत पूर्ण करण्यात आले. हे काम वेळेत पूर्ण व्हावे, या साठी प्रारंभिक काळात जालना शहरातील काही समाजाभिमुख उद्योजकांनी पुढाकार घेऊन हा खर्च भागविला.

काम पूर्ण झाल्यानंतर आता  ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’ने 1000/-, 500/- आणि 100/- रुपयांच्या पावत्या छापून त्या द्वारे जालना शहरवासीयांकडून निधीसंकलन करण्याते ठरविले आहे. या बंधार्‍यासाठी लागलेले सव्वा कोटी रुपये, निधोना गावाजवळील एक कोटी रुपये आणि घाणेवाडीसाठी दरवर्षी लागणारा सुमारे 25 लाखाचा खर्च लोकसहभागातून उभा राहावा, अशी  ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’ची अपेक्षा आहे. ही अपेक्षा रास्तच म्हणावी लागेल, कारण जालनावासी दरवर्षी पाण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करतात.

किती होतो जालनावासियांचा खर्च?
जालना शहराची लोकवस्ती चार लाखांची आहे. येथील नळाला वर्षातील साधारण सहा महिन्यांच्या काळात महिन्यातून एकदा पाणी येते. काही ठिकाणी बोअर आणि विहिरी आहेत, पण तेथील स्थितीही समाधानकारक नाही, कारण भूजलपातळी खूप खोल गेली आहे. जालन्यात 1 हजार लिटर पाण्याचा टँकर या उन्हाळ्यात साधारणपणे 350 रुपयांप्रमाणे विकला गेला. या हिशेबाने विचार केला, तर प्रत्येकाला पुरेसे ठरेल एवढे पाणी दररोज हवे असेल, तर त्याचा सरासरी खर्च 20 रुपये होतो. म्हणजे एका व्यक्तीमागे दरमहा साधारण 500 रुपयांचा खर्च केवळ पाण्याच्या खरेदीचा असतो. 4 लाख लोकांनी दरमहा प्रत्येकी 500 रुपयांचे पाणी विकत घेणे म्हणजे 20 कोटी रुपये एवढा मोठा, अविश्वसनीय आकडा समोर येतो! चार महिने हा खर्च केला, तर तो आकडा 80 कोटींपर्यंत पोहोचतो! या वर्षीप्रमाणे उन्हाळा लांबला, तर पाच महिने केलेला खर्च 100 कोटींपर्यंत पोहोचतो! ‘टँकर लॉबी’ किती प्रभावी आहे, याचा अंदाज यावरून येतो...!

या हिशेबाने बंधार्‍यांचा खर्च काढला, तर तो सरासरी 2 ते 2.5 कोटींपर्यंत जातो. ‘रामतीर्थ बंधार्‍या’ला लागलेला 1.25 कोटीचा खर्च हा ना नफा ना तोटा तत्वावर केलेल्या कामामुळे कमी राखता आला. त्या साठी लागणारे लोखंड ‘पोलाद’ने मोफत उपलब्ध करून दिले, पिचिंगला लागणारा शेकडो ट्रक दगड विविध शेतकर्‍यांनी मोफत दिला, नदीपात्रातील वाळू-गाळाचा उपसा करताना कमी कष्ट लागले, कमी यंत्रणा लागली, त्यामुळे हा खर्च कमी झाला. प्रत्येक ठिकाणी परिस्थितीनुसार खर्च कमी-अधिक होऊ शकतो. त्यामुळे सरासरी 2 ते 3 कोटी रुपयांचा खर्च गृहित धरला, तरी 24 कोटी रुपयांत हे सर्व 8 बंधारे पूर्ण होऊ शकतात. त्याद्वारे 650 कोटी लिटर पाणि जमिनीत मुरू शकेल. या साठी जालनावासियांनी पुढे येऊन आर्थि मदत उभी करण्याचा निर्धार करणे आवश्यक आहे. शासकीय स्तरावर या विषयात आजवर कोणीही कोणताच पुढाकार घेतलेला नसल्याने, आता शहरवासीयांनीच पाण्याची लढाई पुढे येऊन लढायची आहे, हेच खरे.

अशीच लढाई घाणेवाणी तलावासाठी आहे. सुमारे 650 एकर क्षेत्रातील सरासरी 10 फूटांपर्यंतचा गाळ काढण्याचे काम ‘घाणेवाडी जलसंरक्षण मंचा’च्या वतीने मागील चार वर्षांपासून सुरू आहे. तलाव पूर्णपणे वाळल्यानंतरच गाळ काढण्याचे काम सुरू करावे लागते, त्यामुळे सध्या वर्षातील साधारण आठ ते नऊ महिने हे काम चालते. मागील चार वर्षांपासून 3 पोकलेन, एक जेसीबी आणि 16 टिप्परच्या साह्याने गाळ काढण्याचे काम चालू आहे. दरवर्षी सरासरी 40 हजार टिप्पर गाळ काढला जातो. या कामासाठी जालन्यात वर्षभरात मिळून साधारणपणे 20 ते 25 लाख रुपये उभे करण्यात येतात आणि त्याद्वारे जेमतेम 4 महिने हे काम चालू शकते, या कामाचा खर्च भागविण्यासाठी अधिक रक्कम उभी राहात नाही.
ही लढाई जनतेची, जनतेसाठी
अनेक आर्थिक अडचणी असल्या तरी ही लढाई जनतेचीच आहे आणि ती जनतेनेच लढावयाची आहे, हे निश्‍चित आहे. कोरड्या आश्‍वासनांतून हाती काहीच लागत नाही, हे सर्वांनाच उमगले आहे आणि स्वतःहून उभ्या करीत असलेल्या कामांचे परिणाम जनतेला दिसू लागले आहेत. 2013 च्या भीषण दुष्काळाच्या झळा प्रत्येक व्यक्तीलाच बसल्या आहेत. त्यामुळे हा प्रश्‍न आपल्याच पुढाकाराने सुटू शकेल, याची खात्री समाजाला झाली आहे. आता गरज आहे, ती भरभरून योगदान देत अत्यल्प काळात हे सारे प्रकल्प मार्गी लावण्याची. 

जलतज्ज्ञ श्री. सुरेश खानापूरकर यांच्या मते पाण्याच्या स्थितीवरून समृद्धीचे आडाखे बांधायचे, तर ‘‘दररोज नळाला पाणी येते अशी स्थिती असेल, तर बँकेत आपले ‘फिक्स डिपॉझिट’ आहे, असे गृहित धरावे. बोअरचे पाणी काढावे लागत असेल, तर बँकेचे कर्ज काढावे लागल्याचे लक्षात घ्यावे आणि टँकरने पाणी आणावे लागले, तर तुमची दिवाळखोरी जाहिर झाली आहे, असे गृहित धरावे...’’ या दृष्टीने विचार केला, तर जालन्याने आपली दिवाळखोरी कधीच जाहिर केली आहे. यातून उभा राहायचे असेल, तर लोकसहभागाला पर्याय उरलेला नाही.

जलसंधारणाचे परिणाम...
या पार्श्‍वभूमीवर, जालना जिल्ह्यात झालेल्या या पथदर्शी उपक्रमांचे परिणाम काय झाले? या वर्षी, सन 2013 मध्ये जून महिन्यात अगदी वेळेवर आलेल्या पावसामुळे हे दोन्ही बंधारे पहिल्या पावसात भरले आणि त्या नंतरच्या पावसात भरतच राहिले. पहिल्या बंधार्‍यातून वाहून गेलेले पाणी दुसर्‍या बंधार्‍यात अडकले आणि पाणी जमिनीत मुरण्यास प्रारंभ झाला. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी परिसरातील बोअरला पाणी येण्यास लवकर प्रारंभ झाला आणि विहिरींतील पाण्याची पातळीही अल्पावधीतच वाढलेली दिसली...! नदीपात्रातील बंधारे आणि विस्तारलेले पात्र या मुळे झालेली क्रांती जनतेने प्रत्यक्षात अनुभवली. हे उदाहरण लोकसहभागातूनच आकारास आले!

हा लोकसहभाग कसा मिळतो आहे? एक उदाहरण सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारे ठरावे. रामतीर्थ बंधार्‍याशेजारी एक दानपेटी ठेवण्यात आलेली आहे. त्यात समाजाने आपले योगदान द्यावे, असे अपेक्षित आहे. हे काम सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी एक भिकारी तेथे आला. त्याने तिथले काम पाहिले आणि स्वतःकडे असलेले 21 रुपये त्याने दानपेटीत टाकले...! एका सामान्य भिकारी या भावनेने भारलेला असेल, तर समृद्ध समाजाकडून अपेक्षा ठेवण्यात गैर ते काय?

-दत्ता जोशी
औरंगाबाद

Monday, September 16, 2013

दोस्ताची सुहागरात आणि ‘आलार्म क्लॉक’

मी आत्मवृत्त लिहिणार आहे... लिहायलाच हवे... 
एका सामान्य माणसाच्या आयुष्यातसुद्धा असंख्य वेगळ्या घटना घडत असतात...
माझ्या षष्ट्यब्दीपुर्तीदिनी, १५ जुलै २०३१ रोजी याचे प्रकाशन होईल... 
पुस्तकाचे नाव अजून ठरायचे आहे...

त्यासाठीचे लेखन आतापासूनच टप्प्याने टप्प्याने सुरु केले आहे. कारण, वयाच्या तिशीच्या आतील घटना पुढे विस्मरणात जाण्याची शक्यता... 

या आगामी पुस्तकातील `इब्लिसपणा` या सर्वात छोट्या विभागातील 
हा एक लेखांक... 
अशी काही निवडक प्रकरणे मी इथे अधून मधून शेयर करीन.....
........
  
दोस्ताची सुहागरात आणि ‘आलार्म क्लॉक’

दोस्ताचे लग्न झाल्यावर त्याच्या ‘सुहागरात’च्या तयारीची जिम्मेदारी आपल्यावरच येते ना? 
मी स्वतःहून अशाच एका ‘सुहागरात’च्या तयारीची जिम्मेदारी घेतली आणि त्याची पहिली रात्र आयुष्यभरासाठी संस्मरणीय करून टाकली...! 
कशी? 
तेच तर वाचा...! 

साहित्य? गुलाबाची 500 फुले, समई-तेल-वात-काडेपेटी, अलार्मची पाच घड्याळे, एक स्टूल. साहित्य वाचून गंमत वाटतेय? मग हे सारे करताना आम्हाला किती गंमत वाटली असेल...? ही घटना आहे साधारण 1997-98 ची...!

आमच्या दोस्ताचा विवाहसोहळा मोठ्या उत्साहात, थाटमाटात साजरा झाला. लग्न लावून वर्‍हाड रात्री घरी परतले. सगळीकडे निजानीज झाली. दुसर्‍या दिवशी सर्वांची विश्रांती झाली. लग्नाची तिसरी रात्र ‘सुहागरात’साठी घरच्यांनी मुक्रर केली. एकदा हा ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला, की पुढच्या वाटा ज्याला-त्याला ठावूक असतात. आमचे रस्ते आम्हाला माहिती होते. दोस्ताच्या आयुष्यातील ही संस्मरणीय रात्र ‘अधिक संस्मरणीय’ करण्याचे मी ठरविले आणि दुसर्‍या एका दोस्ताला मदतीला घेऊन तयारीला लागलो. माझ्याप्रमाणेच हा दोस्तही ‘अनुभवी’ होता. 

आधी एका नर्सरीवाल्याला गाठून 500 गुलाबांची ऑर्डर दिली. फुले संध्याकाळी ताजी ताजी दे, असे त्याला सांगून टाकले. दोस्ताच्या आईकडून एक मोठी समई ताब्यात घेतली. तेल-वात-काडीपेटी घेऊन ठेवली. मग सजवायची रुम ताब्यात घेतली. कॉट वगैरे व्यवस्थित, मजबुत आहे की नाही ते चेक केले. गादी तपासून घेतली. नवे बेडशीट-पिलो कव्हर घालून सारी सज्जता तर झाली. कामवालीकडून आधी रूम स्वच्छ करून घेतली. मग रुमला लॉक केले. बाहेर पडलो. दुसरा ‘अनुभवी’ दोस्त सोबत होताच. 

गुलाबाची फुले ताब्यात आल्यानंतर मी त्याला म्हणालो, ‘आपल्याला चार पाच घड्याळे लागतील.’
तो म्हणाला, ‘कशाला?’
मी म्हणालो - ‘तुला काय करायचे? कुठे मिळतील, ते बघ’. 

मग आम्ही चार - पाच मित्रांकडे फिरलो. खणखणीत पण वेगवेगळ्या ट्यून्सचा अलार्म असलेली पाच घड्याळे जमविली. पिशवीत टाकून घरी आणली. मग रुम सजवायला सुरवात केली. फुलांच्या पाकळ्या मोकळ्या केल्या. बेडवर अंथरल्या. इतक्या दाट, की बेडशीट दिसू नये! खोलीभर पाकळ्याच पाकळ्या! गुलाबाच्या ओरिजनल सुगंधाचा घमघमाट सुटलेला! एक स्टूल घेतला. त्यावर कव्हर टाकून समई ठेवली. तेल-वात टाकून ठेवली. रुम तर सज्ज झाली. खूप सुंदर दिसत होती. मग आली अलार्म क्लॉकची पाळी. ही घड्याळे ‘सेट’ केली.

साधारणपणे रात्री 9 च्या सुमाराला समई पेटवली, खोलीतील लाईट घालविले, बाहेर आलो आणि दरवाजा बंद करून मी आणि माझा दुसरा दोस्त दरवाजातच बसून राहिलो. इकडे ‘सुहागरात’वाल्या दोस्ताची (आणि त्याच्या बायकोचीही) बेचैनी वाढत होती. आम्ही खोलीचा ताबा त्यांना देण्यास तयार होतो, पण त्या आधी आमचा ‘मेहनताना’ म्हणून त्यांनी प्रत्येकी हजार हजार रुपये दिले पाहिजेत, असा आमचा आग्रह होता. थोड्या कमी रकमेवर तडजोड झाली. (अर्थात ‘मेहनतान्या’चा आग्रह पैसे मिळविण्यापेक्षाही त्यांची बेचैनी वाढविण्यासाठीच होता, हे सूज्ञ वाचकांनी ओळखलेच असेल! दुसऱ्या दिवशी याच ‘मेहनतान्या’तून त्याला `कोनिका`चे ३ रोल खरेदी करून दिले आणि बाकी पैसेही परत केले, ही गोष्ट निराळी.) अखेर ‘नवपरिणित दाम्पत्या’ने शयनकक्षात प्रवेश केला. त्यांना एकांत देऊन आम्ही तेथून निघून आपापल्या घरी परतलो. 

आता मला उत्सुकता लागली होती - अलार्म घड्याळांनी बजावलेल्या कामगिरीची!
मात्र, दुसर्‍या दिवशी सकाळी दोस्ताकडे जायची हिम्मत होत नव्हती! 

तो काय करील, याची शाश्‍वती नव्हती. कदाचित त्यातील एखादे घड्याळ तो माझ्या डोक्यात फेकून मारण्याचीही शक्यता होती!

मी दुसर्‍या दोस्ताला भरीला पाडले. सकाळी 10 च्या सुमारास घरी फोन करून अंदाज घेण्यास सांगितले. तेव्हा मोबाईल नव्हते. लँडलाईनवर फोन करून त्याने अंदाज घेतला आणि मला ग्रीन सिग्नल दिला.

ग्रीन सिग्नल मिळूनही, मी दबकत दबकतच 12 च्या सुमारास सुहागरातवाल्या दोस्ताच्या घरी पोहोचलो. मी दारापर्यंत पोहोचतो, न पोहोचतो तेव्हाच दोस्त अंगावर धावून आला. घरातच असल्याने बिचार्‍याच्या तोंडी त्यातल्या त्यात सौम्य शिव्या होत्या.
त्याची रात्र ‘संस्मरणीय’ ठरल्याची माझी खात्री झाली.

मी घरात पहिले, आम्ही मोठ्या मिनतवारीने जमविलेली सगळी घड्याळे ‘विकलांग’ झाली होती. एकाची काच फुटली होती. बाकीच्या घड्याळांचे सेल विखुरले होते... मी ते सगळे एकत्र केले!

घरी पोहोचताक्षणी सुरू झालेला दोस्ताच्या शिव्यांचा उमाळा काही मिनिटांनी थोडा थंडावला आणि मग मी आस्थेवाईकपणे चौकशी सुरू केली, तेव्हा दोस्ताने एक एक गोष्ट कबुल करायला सुरवात केली. तो म्हणाला, ‘‘सगळे लाईट बंद करून फक्त समई चालू ठेवायची तुझी आयडिया जबरदस्त होती.’’ म्हटले, ‘ओके.’

मग म्हणाला, ‘अलार्म क्लॉक’ची आयडिया कुणाची?’
म्हणालो- माझी.

दोस्त मोकळ्या मनाने म्हणाला, ‘टायमिंग जबरदस्त जमले होते!’

जमायलाच हवे होते ना. नसते जमले तर आमचा अनुभव काय कामाचा? 

मग त्याने एकेका घड्याळाची संक्षिप्त स्टोरी सांगितली.
त्याने सांगितलेली आणि त्यानुसार `बिटवीन द लाईन्स` आम्ही कल्पिलेली ही ‘उभयपक्षी’ कहाणी येणेप्रकारे -

पहिला अलार्म रात्री 10.30 चा ठेवला होता. ते घड्याळ समईखाली होते. सहज सापडण्यासारखे. त्यांना थोडा डिस्टर्ब झाला, पण घड्याळ लगेचच सापडले. अलार्म डिसेबल केला. सुहागरात पुढे सुरू.

दुसरा अलार्म रात्री 11चा होता. हे घड्याळ भिंतीमध्ये असलेल्या कपाटातील पुस्तकांमागे होते. रंगाचा थोडा भंग झाला पण थोड्या मेहनतीने घड्याळ सापडले. अलार्म बंद केला. माझ्या नावाने चार शिव्या देत त्याने पुढील काम सुरू केले.

तिसरा अलार्म रात्री 12 चा होता. या वेळची ‘वेळ’ जास्तच अडचणीची ठरली. घड्याळ सापडेना, अलार्म चालूच... कारण घड्याळ बुटांच्या कप्प्यात, बुटांत लपविले होते. कसेबसे सापडले... दोस्ताने अलार्म बंद केला आणि घड्याळ जोराने आपटले...

चौथा अलार्म रात्री पाऊण चा होता. या वेळी मात्र स्थिती खूपच बिकट आणि हातघाईची होती! एकीकडे अलार्म घणाणत होता आणि घड्याळ तर सापडतच नव्हते... त्यात चार-पाच मिनिटे गेली... अखेर लक्षात आले, घड्याळ सिलिंग फॅनच्या वर असलेल्या उलट्या वाटीत आहे... त्याने आधी फॅन ऑफ केला. तो लवकर थांबतच नव्हता. चक्क हाताने थांबविला आणि स्टूलवर चढून घड्याळ काढले, अलार्म ऑफ केला आणि फेकून दिले. काच फुटली.

पाचवी वेळ मात्र आणीबाणीची ठरली...! रात्रीचे दोन वाजलेले... सारे काही ‘सुरळीत’ चाललेले... अचानक अलार्म वाजू लागला... दाम्पत्य बेचैन... घड्याळ काही सापडेना. बुटाचा कप्पा, समई ठेवलेला स्टूल, पुस्तकाचा कप्पा... सगळे काही तपासून झाले. आवाज तर चालू होता. खोलीच्या मध्यभागातून येत होता. अखेरचा उपाय म्हणून त्याने कॉटच्या खाली डोकावून पाहिले. घड्याळ कॉटला खालून बांधलेले होते. एखाद्या जीपच्या खाली बॉम्ब बांधतात ना, तसे...! (मग... आमचे डोके आहे बॉस!) हे घड्याळ आम्ही बांधले एवढे मजबुत होते, की त्याला सोडवता येईना. पठ्ठ्याने सारे बळ एकवटून खेचून काढलेे. पण आवाज बंद करण्याचे बटन सापडेना... मग त्याने ते घड्याळ चक्क भिंतीवर जोराने आपटले... घड्याळ फुटले, सेल बाहेर पडले आणि आवाज एकदाचा बंद झाला...! 

त्यानंतरचा आलार्म मी लावलेला नव्हता... पण त्यांच्या मनात धास्ती बसलेलीच होती...!

मी सगळी घड्याळे गोळा केली. नव्याने चालू केली. फुटलेल्या काचा बदलण्यासाठी दुसर्‍या दोस्ताला बाजारात पाठविले... 

अलार्मच्या घड्याळाचा ‘वेगळा’ उपयोग आम्ही प्रयोगात आणून पाहिला होता...!

Monday, August 12, 2013

किश्तवारचे `धर्म`संकट...

किश्तवारमध्ये ईदच्या नमाजानंतर मुसलमान जमावाने हिंदुंवर सशस्त्र हल्ला चढविला. संसदेत केलेल्या निवेदनात सुद्धा हाच उल्लेख आहे. आरंभी अनपेक्षित हल्ल्यामुळे गोंधळलेले हिंदू लवकरच प्रतिकारास सज्ज झाले आणि जम्मू भागात अनेक ठिकाणी त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. हिंदुनी प्रतिकार केला, की तो सर्वधर्मभावास धोका असतो, असा मानवतावाद्यांचा इतिहास सांगतो...!
बाकी चर्चा दूर ठेवून किश्तवारच्या धोक्याची माहिती इथे करून घेवू. ही केवळ एका गावापुरती दंगल नाही, याची नोंद इथे आधी घ्यावी लागेल. १९८८-८९ मध्ये सुमारे २० लाख हिंदुना काश्मीर खोर्यातून विस्थापित व्हावे लागले. लाखाहून अधिक हिंदू पुरुषांची हत्या झाली आणि हजारो हिंदू महिला-मुलींवर बलात्कार झाले. किश्तवार प्रकरण हे काश्मीरच्या दुसऱ्या अहिंदू-करणाची सुरवात आहे.
आपण एक एक मुद्दा समजून घेवू.
हा आहे काश्मीरचा नकाशा.


हा भारतात दाखविला जातो. यातील पाकिस्तानलागतचा आकाशी रंगाचा पट्टा आपण `पाकव्याप्त काश्मीर` म्हणून नोंदवतो. त्या भागातील गावे-जिल्हे सुद्धा भारतीय नकाशावर नोंदविलेले नसतात. नेहरू यांनी १९४७-४८ मध्येच हा भाग प्रत्यक्षात सोडून दिला. मात्र नकाशात तो दाखविला जातो. याला पाकिस्तानात `आजाद काश्मीर` म्हटले जाते.
हा दुसरा नकाशा.
यात जम्मू -काश्मीरचे ५ भाग दिसतात. पहिला कथित `आजाद काश्मीर`, दुसरा गील्गीत – बाल्टीस्तान, तिसरा अक्साई चीन – हा भाग १९६२ च्या `भाई भाई युद्धात` चीन ने आक्रमिला. अक्साई चीन आणि बाल्टीस्तान यांच्या मध्ये असलेला काश्मीरचा एक भाग पाकिस्तान ने चीन ला परस्पर भेट दिला. हा सगळा भाग वजा जाता भारताच्या ताब्यात जेमतेम निम्माच काश्मीर उरतो.


 आता हा नकाशा पाहू. 

या नकाशात भारताच्या ताब्यात असलेल्या काश्मीरच्या भूभागाची जिल्ह्यांच्या स्वरूपातील विभागणी आहे. कुपवाडा, श्रीनगर, बरामुला, बडगाम, बांदीपोर, गनदरबाल, पूंच, पुलवामा, कुलगाम, अनंतनाग, राजौरी, रेसि, रामबन हे भाग काश्मीर खोऱ्यात मोडतात. जम्मू, उधमपूर, दोडा, कथुआ, किश्तवार  हे भाग जम्मू विभागात येतात. कारगिल खोऱ्यातच मोडते पण इथे लोकवस्ती अत्यंत विरळ आहे. उजवीकडे लेह-लडाख आहे.

यापैकी काश्मीर खोऱ्यातून म्हणजे श्रीनगर, बरामुला, बडगाम, बांदीपोर, गनदरबाल, पूंच, पुलवामा, कुलगाम, अनंतनाग, राजौरी, रेसि, रामबन या जिल्ह्यातून १९८८ ते १९९१ या काळात सुमारे २० लाख हिंदुना अनन्वित अत्याचार करून बाहेर काढण्यात आले. तेथे ग्रामीण भागात एकही हिंदू सापडत नाही. शहरी भागात एखाद्या गुरुद्वाराच्या आडोशाला, मंदिरात क्वचित कुणीतरी सापडतो. पण लोकसंख्येचे प्रमाण पहिले तर हे प्रमाण पाव टक्का सुद्धा नाही.

हा सारा भाग भारतापासून तुटल्यात जमा आहे. काश्मीर टूरवर जाऊन आलेले भारतीय पर्यटक सांगतात – 'आता काश्मिरात दहशतवाद उरला नाही.' वस्तुस्थिती ही आहे, की आज काश्मिर भारतात आहे, त्याचे श्रेय जाते सीआरपीएफ ला. हा वेगळा विषय आहे. त्यावर नंतर विस्ताराने लिहीन. पर्यटक फक्त श्रीनगर आणि अनंतनाग जिल्ह्यात जाऊ शकतात. त्यातही केवळ पर्यटकांसाठी आकर्षण असलेल्या भागातच. श्रीनगर शहराच्या जुन्या भागात कोणीही फिरकू शकत नाही. तेथे भारतविरोधी राग धुमसत असतो. इतरत्रही भारतीयांचे स्वागत होते ते प्रामुख्याने पर्यटक म्हणून. तेथील अर्थव्यवस्था केवळ त्यावर अवलंबून आहे. हेच त्याचे कारण.

पुन्हा किश्तवारकडे येऊ. पुन्हा एकदा हा नकाशा पाहा.


किश्तवार जिल्हा हा काश्मीर खोरे आणि हिमाचल प्रदेश यांना थेट जोडतो. यातील निम्म्याहून अधिक भाग अतिरेक्यांनी ग्रासलेला आहे. किश्तवारचे भौगोलिक स्थान पहिले तर लक्षात येईल, की तेथून हिंदुना बाहेर काढले की उरतो फक्त जम्मू, उधमपूर, सांबा आणि कथुआ...

संसदेत अरुण जेटली यांनी किश्तवार हल्ल्यामागे मोठ्या कटकारस्थानाचा उल्लेख केला, ते हेच. आणि मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला हे सुद्धा `१९८८ प्रमाणे आता होणार नाही` चा राग आळवू लागले आहेत. अर्थात हा सारा अब्दुल्ला परिवाराचा पिढीजात दांभिकपणा आहे. ज्या परिवाराच्या कट-कारस्थानामुळे श्यामाप्रसाद मुकर्जी यांच्यासारख्या देशभक्ताला काश्मिरात तुरुंगवासात संशयास्पद स्थितीत मरण आले, तेथून दुसरी अपेक्षा काय करणार?

ही जागे राहण्याची वेळ आहे. किश्तवारमधील हिंदू सुरक्षित राहिले पाहिजेत आणि काश्मीर खोर्यातील प्रत्येक विस्थापिताला त्याच्या गावी परत जाता आले पाहिजे. तरच भारताचे मस्तक मानले जाणारे जम्मू काश्मीर भारतात राहील... अन्यथा लवकरच भारताचा शिरच्छेद होईल. ज्या भूभागातून हिंदू अल्पसंख्य झाले, तो भाग भारतापासून तुटला हे इतिहास लक्षात घ्यावा लागेल...
- दत्ता जोशी.

Wednesday, April 3, 2013

उदयगिरी... माझे ‘गुरुकुल’ !


मी उदगीरच्या उदयगिरी महाविद्यालयातून पदवी मिळविली. या महाविद्यालयाने मला खूप काही दिले. या महाविद्यालयाने सध्या एक स्मरणिका प्रकाशित करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी माझ्याकडे एक लेख मागितला गेला. मी तो आनंदाने लिहिला. या निमित्ताने जुन्या आठवणीना उजाळा देता आला. हा लेख आपणासमोर मांडत आहे...

---------------------------------------------------------------------------------------------
‘कर्माचे डोळे ज्ञान, ते निर्दोष होआवे’... महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या मोठ्या कमानीवरील ‘उदयगिरी’चा मोनोग्राम आणि त्यात असलेले हे ब्रिदवाक्य मी पहिल्यांदा वाचले साधारण 1984-85 मध्ये. शहरातील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात मी तेव्हा बहुदा आठव्या-नवव्या वर्गात शिकत असेन. ‘उदयगिरी’त तेव्हा ‘कॉम्प्यूटर विभाग’ सुरू झाला होता. उदगीरमधील हा बहुधा पहिलाच विभाग. हा कॉम्प्यूटर पाहण्यासाठी इथे आलो. सायकली गेटमधून आत वळविल्या, स्टँडवर लावल्या आणि कॉम्प्यूटर पाहण्याच्या बहाण्याने सगळेच जण उगाच कॉलेजातून भटकून आलो. संध्याकाळची वेळ होती. त्यामुळे कुणी अडविलेही नाही. तेव्हा कॉलेजचे कॅरिडॉर पूर्ण मोकळे होते. एखाद्या धिप्पाड माणसाने बाहू पसरून ‘या’ म्हणत कवेत घेण्यासाठी हाक द्यावी, असा या कॉलेजचा दर्शनी भाग... कॉलेज कॅरिडॉरच्या चारही कोपर्‍यांत असलेले पूर्ण उंचीचे चार आरसे आमच्यासाठी आश्‍चर्याची गोष्ट ठरले होते. ‘इथे कुणीतरी डोळे सर असतात. ते खूप कडक आहेत,’ अशी ऐकीव माहिती कानावर असे. आयुष्यात कधी या कॉलेजात यायचे आहे आणि इथली दोन वर्षे आयुष्यातील महत्वाची संचित ठरणार आहेत, हे त्या काळी ध्यानीमनीही नव्हते...! या कॉलेजमधील 1989-90 आणि 1990-91 ही दोन वर्षे माझ्या आयुष्याला वेगळा आकार देणारी ठरली... काळजावर कोरून राहिली. हे ऋण या जन्मी फिटणारे नाही.000

‘दहावीनंतर पुढे काय’, या प्रश्‍नाला माझ्यासमोर दोन उत्तरे होती. ‘उदयगिरी’तर ‘होम सायन्स’ किंवा ‘लाल बहादूर ज्युनिअर कॉलेज’मध्ये ‘इलेक्ट्रॉनिक्स’. तेव्हा ‘इलेक्ट्रॉनिक्स’चा निर्णय घेतला आणि ‘उदयगिरी’चे नाते लांबणीवर पडले. बारावीनंतर ‘शिवाजी’त ‘बी.एस्सी.’ला प्रवेश घेतला आणि त्याच वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात सहभागी झालो. पुढे पत्रकार व्हायचे, हा निश्‍चय तोवर झाला होता. त्या दृष्टीने वाचन, मनन सुरू झाले होते. त्या कामाला वेळ मिळावा, म्हणून सायन्स सोडून ‘बी.ए.’ घेतले. त्याच काळात पुन्हा एकदा ‘उदयगिरी’चे नाव माझ्या समोर आले. मध्यंतरीच्या काळात तेथील संपन्न ग्रंथालय पाहिले होते. या ग्रंथालयात आतपर्यंत जाऊन पुस्तके हाताळण्याची परवानगी होती. माझ्यासारख्याला ही पर्वणीच वाटली. ‘उदयगिरी’मधील इतर अनेक उपक्रमही मला आकर्षित करू लागले. सर्वात महत्वाची होती डोळे सरांची मोहिनी. मी स्वतः हिंदुत्ववादी विचारांचा अनुयायी असलो, तरी डॉ. ना. य. डोळे सरांबद्दल मनोमन आदर होता. ‘समाजवादी विचारवंत’ ही त्यांची ओळख. पण ‘विचारवंता’च्या परीघाबाहेर पडून त्यांनी अंमलात आणलेला ‘कृतीशील समाजवाद’ आकर्षणाचे केंद्र होता. त्यांच्या व्यक्तिमत्वाची त्या वेळी असलेली ही ढोबळ ओळख पुढे त्यांच्या ‘प्राचार्य’ या आत्मकथनातून घनिष्टतेत बदलली. (पुढे, माझ्या लग्नात सरांनी मला याच पुस्तकाची प्रत भेट म्हणून दिली. ती मी आजही जपून ठेवली आहे.) डोळे सरांबरोबरच इतरही काही नावे माझ्या डोळ्यासमोर होती. माझ्या आवडीच्या असलेल्या ‘मराठी’ विषयात प्रभुणे सर, साधू सरांचे नाव ऐकून होतो. ‘पॉलिटिक्स’साठी प्रा. पी. के. कुलकर्णी आणि प्रा. शेख, सोशियॉलॉजीसाठी प्रा. माकणीकर यांची नावे कामावर येत. ‘बी.ए.एफ.वाय.’ कसेबसे ‘शिवाजी’तून पूर्ण केले आणि 1989 मध्ये ‘सेकंड इअर’साठी ‘उदयगिरी’त प्रवेश घेतला. इथून माझ्यातील परिवर्तनाला प्रारंभ झाला.000

‘पत्रकार व्हायचे’ हा माझा ध्यास होता. त्या साठी मिळेल त्या मार्गाने ज्ञानकण मिळविण्याचा माझा प्रयत्न असे. उत्तम पत्रकारितेसाठी दोन गोष्टी सर्वात महत्वाच्या... वाचन आणि लेखन. वाचनाचा प्रारंभ तसा पाचव्या वर्गात असतानाच झाला होता. पण त्याला निश्‍चित अशी दिशा नव्हती. डोळे सर, प्रभुणे सरांच्या संपर्कात आल्यावर ही दिशा मिळण्यास प्रारंभ झाला. त्यांची पहिली भेट हा सुद्धा संस्मरणीय प्रकार होता. ‘हेच ते प्रभुणे सर, ते मराठी शिकवतात आणि भित्तीपत्रक काढण्यातही त्यांचा पुढाकार असतो,’ असे मला कुणीतरी सांगितले. हे भित्तीपत्रक आपण काढले पाहिजे, हे माझ्या मनाने घेतले आणि एके दिवशी त्यांना पार्किंग स्टँडवरच गाठले. त्यांची जुन्या जमान्यातील लांब ‘लँब्रेटा’ लावून, हातात छोटीशी ब्रिफकेस घेऊन ते स्टाफरुमकडे निघाले, तेवढ्यात मी त्यांना गाठले. ते थोडेसे थबकतील, असे मला वाटले. पण चालता चालताच त्यांनी मला सांगितले, ‘चला, आपण स्टाफरुममध्ये जाता जाता बोलू. माझ्याकडे वेळ नाही.’ मी त्यांच्या मागोमाग निघालो. संवाद साधण्याचा हा असा प्रकार मी प्रथमच अनुभवत होतो! जाता जाताच ‘यंदा मला भित्तिपत्रक चालवू द्याल का?’ अशी विचारणा केली. त्यांनी नकार दिला. ‘मुले आधी उत्सुकता दाखवतात, पुढाकार घेतात आणि नंतर विसरून जातात,’ असा त्यांचा आक्षेप. तरीही मी चिकाटी सोडली नाही. ‘आधी काहीतरी लिहून आणून दाखवा’, या त्यांच्या ‘चाचणी’वर मी कुठला तरी विषय पानभर लिहून त्यांना दाखविला. त्यांनी त्यात ढिगाने चुका काढल्या. पण समाधानाची गोष्ट ही, की ‘तुम्ही सिरियसली करणार असाल, तर भित्तिपत्रक सुरू करू’, असे त्यांनी सांगितले. त्या आधीच्या वर्षी कुणीच पुढाकार घेतला नसल्याने भित्तिपत्रक बंद पडलेले होते. ती जबाबदारी 1989 मध्ये मी स्विकारली आणि ‘अक्षरे’ पुन्हा एकदा नोटीस बोर्डवर झळकले. पहिला अंक संत ज्ञानेश्वरांवर काढल्याचे मला आठवते.000‘अक्षरे’ काढणे हा एक सोहळा असायचा. आधी सरांशी बोलून विषय ठरवावा लागे. ‘हाच विषय का’, याचे समाधान करावे लागे. त्यांनी संमती दिल्यानंतर लायब्ररीत बसून संदर्भ काढायचे. मुद्दे लिहून काढायचे. मुख्य विषयाबरोबरच आणखी काही छोटे छोटे विषय मी त्यात हाताळत असे. हे सारे फुलस्केप कागदावर, कागदाच्या एकाच बाजूने लिहून काढायचे. सकाळी लवकर सरांच्या घरी जायचे. सर ते बारकाईने वाचून पाहात. माझी वाक्यरचना ठीक असे, पण शुद्धलेखनातील चुका हमखास असत. मग ते रागवायचे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार ते सारे दुरुस्त करून घ्यायचे. मग प्रत्यक्ष भित्तीपत्रकाची तयारी सुरू होत असे. बाजारातून ‘ए 1’ आकाराचे कार्डशीट खरेदी करायचे. सोबत स्केचपेन असायचे. त्या कागदावर पट्टीच्या साह्याने पेन्सिलीने रेघा मारून घ्यायच्या. सुवाच्य अक्षरांत (माझे अक्षर तेव्हा सुवाच्य होते!) तो लेख त्या शीटवर लिहून काढायचा. हे लिहितानाच जागेचा अंदाज घेत चित्रांसाठी जागा सोडायची आणि संबंधित विषयाची चित्रे मिळवून तेथे चिकटवायची. हा अंक तयार झाल्यावर पुन्हा एकदा तो अंक, पेन्सिल, खोडरबर, स्केचपेन आणि ब्लेड घेऊन आमची स्वारी सरांच्या घरी दाखल व्हायची. मग सर पुन्हा एकदा तो लेख तपासत. त्यात र्‍हस्व-दीर्घाच्या चुका शोधत. ती अक्षरे ब्लेडने मिटवून तेथे नव्याने ते शब्द लिहिले जात. संपूर्ण अंक अशा प्रकारे ‘शुद्ध’ झाल्यानंतर पेन्सिलने मारलेल्या रेघा खोडरबराने खोडून टाकल्या जात. त्यानंतर हा अंक डोळे सरांच्या सहीसाठी मी घेऊन जात असे. सर तो बारकाईने पाहात. कोपर्‍यात त्यांची सही करीत. बेल वाजवून शिपायाला बोलावत आणि ‘नोटीस बोर्ड’वर तो अंक लावण्यास सांगत... मी त्याच्या पाठोपाठ बोर्डाकडे येई. तो अंक लागल्यावर डोळे भरून पाहून घेई. मला आत्मिक समाधान वाटत असे.000

हे अंक काढणे, हा माझ्या पत्रकारितेचा पाया ठरला. विषय निवडणे, निवडलेल्या विषयाचे समर्थन करण्यासाठीचा आधार शोधणे, विषयाची मांडणी, विस्तार, निष्कर्ष, त्याचे शास्त्रशुद्ध लेखन, व्याकरण, जागेप्रमाणे शब्दांची मर्यादा पाळणे या सार्‍या गोष्टी ‘भित्तीपत्रका’च्या पाठशाळेने माझ्याकडून अक्षरशः घोटून घेतल्या. यात जशी माझी चिकाटी होती, तशीच प्रभुणे सरांचीही. चुका शोधणे, त्या दुरुस्त करून घेणे, हे भित्तिपत्रक नियमितपणे लागणे या पैकी कोणत्याही गोष्टीमुळे त्यांच्या पगारात एका रुपयाचीही वाढ होणार नव्हती, की प्रमोशनसाठी त्याचा फायदा होणार नव्हता. तरीही त्यांनी हे केले. माझी वृत्ती हे त्याचे एक कारण असले, तरी त्यांच्यातील ‘प्रयोगशील व्यक्ती’ हे त्यामागचे महत्वाचे कारण असावे, असे मला वाटते. त्यांनी माझ्यावर सातत्याने नवनवे प्रयोग केले. मी जसे ज्ञानदेव, तुकारामांवर अंक काढले तसाच अंक हिटलरवर काढला. योगायोगाने ते हिटलरचे जन्मशताब्दी वर्ष असल्याची माहिती मी कुठेतरी वाचली. सरांच्या मागे लागून या विषयाला मी मान्यता मिळविली. ‘डोळे सरांची परवानगी घेण्याची जबाबदारी तुमची’, या अटीवर प्रभुणे सरांनी मला परवानगी दिली. मी त्या विषयावर लेखन केले. ‘हिटलर वाईट’ एवढी एकच बाजू जगाला माहिती आहे. पण तो किती चांगला होता आणि शेवटच्या टप्प्यातील युद्धात झालेल्या पराभवऐवजी तो विजयी ठरला असता तर आज जगाने त्याचेच गोडवे गायिले असते. मी हा अंक तयार केला. प्रभुणे सरांनी ‘ओके’ केला आणि सहीसाठी मी तो डोळे सरांकडे नेला. मला सरांची प्रतिक्रिया आजमावयाची होती. सरांच्या समाजवादी विचार परंपरेत हिटलर हा खलनायक होता. या पार्श्वभूमीवर मी सरांसमोर तो अंक ठेवला. त्यांनी शांतपणे तो पाहिला. विचारले, ‘प्रभुणेेंनी पाहिलाय का?’ मी होकारलो. त्यांनी तेवढ्याच शांतपणे माझ्याकडे पाहिले. ते म्हणाले, ‘इथून पुढे असे काही विषय लिहायचे असतील तर आधी माझ्याशी बोलत चला.’ तितक्याच शांतपणे त्यांनी त्यावर सही केली आणि शिपायाला बोलावण्यासाठी ‘बेल’ वाजविली. वैचारिक मतभेद कितीही असोत, संपूर्ण सत्ता तुमच्याच हातात असो, तरीही दुसरी बाजू मांडणार्‍या विचाराला जागा मिळवून द्यायचीच असते, हा संस्कार सरांनी त्या एका कृतीतून मला दिला. तो मला माझ्या 15 वर्षांच्या सक्रीय पत्रकारितेत तटस्थपणे पाहताना, लिहिताना अतिशय मोलाचा ठरला.000

अशीच आणखी एक वेगळी आठवण डॉ. नेल्सन मंडेला यांच्या बाबतची. दक्षिण अफ्रिकेतील स्वातंत्र्याचे व लोकशाहीचे शिल्पकार असलेल्या नेल्सन मंडेला यांच्या कार्याबद्दल माझ्या मनात प्रारंभीपासूनच आदर आहे. सुमारे 22 वर्षांच्या तुरुंगवासानंतर 11 फेब्रुवारी 1990 रोजी त्यांची सुटका करण्यात आली. ही बातमी मी त्या रात्री दूरदर्शनवरील 8 च्या बातमीपत्रात पाहिली. (त्या काळी फक्त दूरदर्शन ही एकच वाहिनी होती. रात्रीचे हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र त्यावर येत असे. इंटरनेट वगैरे तर विषयच नव्हता!) त्यानंतर रात्री उशीरापर्यंतच्या बातम्या, दूरदर्शनने ऐनवेळी तयार करून दाखविलेला विशेष माहितीपट मी पाहिला. विषय समजून घेण्याचा प्रयत्न केला. रात्रीतूनच कच्चा आराखडा लिहून काढला. 12 फेब्रुवारीला सकाळी लवकर उठून पेपर आणले. त्या आधारे मुद्दे काढले. दुकानातून कार्डशीट विकत आणले. सकाळी 11 वाजेपर्यंत माझा ‘अक्षरे’चा ‘नेल्सन मंडेला विशेषांक’ तयार होता! त्यावर सही घेण्यासाठी डोळे सरांकडे गेलो. सरांनी तो अंक पाहिला. वाचून काढला. त्यांच्या डोळ्यांत माझ्याबद्दल कौतुक होते. त्या दिवशी त्यांनी त्यांच्या ऑफिसात मला चहा पाजला...!
000

डोळे सरांनी माझ्यावर असंख्य संस्कार केले. हिंदुत्ववादी विचाराची (किंबहुना कोणत्याही विचाराचे टोक गाठलेली) मंडळी बहुतेक वेळा झापडबंद पद्धतीने विचार करतात. मी हिंदुत्ववादी होतो आणि आहे. तरीही, माझ्या डोळ्यावर झापड नाही. मी डोळसपणे सर्वत्र पाहतो. सर्व विचारांतून चांगले ते स्वीकारण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या विचारधारेतील मान्यवरांनी सांगितलेले चुकीचे ते टाळतो, शक्तीपरत्वे विरोधही करतो. सरांनी मला ‘अमृता प्रीतम’चे रसिदी तिकीट’ आवर्जुन वाचायला दिले होते. एक शिख विचारवंत महिला एका मुस्लिम व्यक्तीसोबत आयुष्यभर कशी राहिली, याचा तो वैचारिक आलेख होता. मला ती कथा भावली. विविध विचारप्रवाहांचा परिचय करून देणारी पुस्तके ते मला त्यांच्या खाजगी संग्रहातून वाचायला देत. त्यांच्या घरी हॉलमध्ये असलेले ना. ग. गोरे, एसेम जोशी, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासह काढलेले त्यांचे फोटो मी नेहेमी न्याहाळत असे. घरासमोरच्या ओसरीतील त्यांच्या झोपाळ्यावर बसायला मला नेहेमीच आवडत असे. ‘कमल, दत्ता आलाय, काहीतरी दे,’ असे ते आत वळून सांगत आणि कमलताई एखाद्या प्लेटमध्ये काहीतरी खायला आणून देत. पाणी-चहा होत असे. दोन-तीन तास गप्पा रंगत. ‘कार्यकर्त्या’ विद्यार्थ्यांबद्दल त्यांना आपुलकी असे. माझा देवणीचा बालमित्र अंकुश गायकवाड, उदगीरचा दिलीप वाघमारे हे छात्रभारतीचे काम करीत. त्यांचे सरांकडे नेहेमीच येणे-जाणे असे. हे समजण्यासारखे होते. पण मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता असूनही आठवड्यातून किमान एकदा तरी त्यांच्या भेटीसाठी घरी जायचो. उदय कॉलनीतील त्या असंख्य संध्याकाळ माझ्या आयुष्यात नवनव्या विचारप्रक्रियांचे दिवे चेतविणार्‍या ठरल्या.000

मी दोन वर्षे कॉलेजात होतो. पण वर्गात नव्हतो! विद्यार्थी परिषदेच्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी मी सतत भटकत असे. कधी शहरात, कधी शहराबाहेर. 1989 मध्ये काश्मीर प्रश्‍न पेटला होता. काश्मीर खोर्‍यातून हिंदूंना हाकलून लावण्याचे षड्यंत्र ‘ऑपरेशन टोपाझ’ नावाने जनरल झियांनी रचलेले होते. तेथील अनन्वित छळाच्या बातम्या वृत्तपत्रांतून येत असत. त्याच काळात डोळे सर, जगन फडणिस, पन्नालाल सुराणा आदी समाजवादी विचारवंतांच्या एका गटाने काश्मीरमध्ये प्रवास करून ‘हे सारे खोटे आहे. तेथील हिंदूंना कसल्याही प्रकारचा त्रास नाही. हिंदू विस्थापित होत नाहीत. सारे काही आलबेल आहे,’ असा एक अहवाल दिला होता. हा अहवाल वस्तुस्थितीच्या विपरित होता. पुढे नोव्हेंबर 1989 मध्ये विद्यार्थी परिषदेने ‘चलो काश्मीर’ची हाक दिली आणि मी उदगिरातील काही कार्यकर्त्यांना घेऊन त्यात सहभागी झालो. तेथून परतल्यानंतर त्या आंदोलनाचे, काश्मिरी हिंदू विस्थापितांचे फोटो असलेला ‘अक्षरे’चा एक विशेषांक तयार केला आणि तो नोटीस बोर्डवर लावण्यासाठी डोळे सरांकडे नेला. या वेळीही त्यांनी परवानगी दिली. त्यांच्याच अहवालाच्या विरोधातील पुरावे या फोटोतून दिसत होते. भविष्यात काश्मिरचे विदारक चित्र सार्‍या जगानेच पाहिले. पुढे, साधारण तीन-चार वर्षांनी, मी पत्रकारितेस प्रारंभ केल्यानंतर माझ्याशी गप्पा मारताना त्यांनी आपल्या अहवालाची चूक मान्य केली होती. पारदर्शी विचारप्रक्रियेचा हा परिपाक होता.000

ही सारी कामे करताना कॉलेजातील ‘इतर’ उपक्रमांतही मी सहभागी झालो. प्रभुणे सरांच्या आग्रहावरून 1989-90 या वर्षीच्या स्नेहसंमेलनात मी एका नाटकात ‘हीरो’ची भूमिका सुद्धा केली. ‘चोरआलेच पाहिजेत’ अशी ती एकांकिका होती. प्रीती पाटील ही या नाटकातील माझी पत्नी. सामाजिक मान्यता मिळविण्यासाठी आपल्या घरी चोरी झाली पाहिजे, असा या एकांकिकेतील नायकाचा आग्रह असतो. त्यातून फुललेला फार्स यात रंगवलेला होता. त्या आधी कधी मी तोंडाला रंग फासलेला नव्हता की नाटकात भूमिका केलेली नव्हती. त्यातही, एका मुलीसोबत काम करणे हा तर माझ्यासाठी अतिशय कसोटीचा क्षण! (आजही ती जुनी आठवण निघाल्यानंतर प्रीती माझ्यावर हसते! ती आता औरंगाबादेत वोखार्ड या बड्या कंपनीत उच्चपदावर कार्यरत आहे.) पण प्रभुणे सरांनी हे काम माझ्याकडून करून घेतले! या नाटकाच्या, त्यातील तयारीच्या असंख्य आठवणी आहेत. हा स्वतंत्र लेखाचा विषय ठरावा. 1990-91 या वर्षात गॅदरिंगमध्ये मी जिद्दीने पेटलो होतो. एका सरांसोबत माझा कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनावरून वाद झाला होता आणि ‘मी माझी योग्यता सिद्ध करून दाखवीन’ असे आव्हान मी त्यांना दिले होते. ही ‘योग्यता सिद्ध करण्या’च्या नादात मी विविध स्पर्धांतून सहभागी झालो. वादविवाद आणि वक्तृत्व या स्पर्धांत मला बक्षिसे मिळणे साहजिक होते. ती माझी ‘मास्टरी’च होती. पण त्या वर्षी मी ‘प्रेमपत्र स्पर्धा - सर्वप्रथम’, ‘पाककला स्पर्धा- सर्वप्रथम’, ‘रांगोळी स्पर्धा - सर्वप्रथम’ ही बक्षिसेही जिंकली! पाककला एकवेळ ठीक, पण प्रेमपत्र स्पर्धेत मला बक्षिस कसे काय मिळाले, हेच मला कळत नव्हते. या स्पर्धेचे परीक्षक असलेल्या संगेवार सरांच्या घरी मी दुसर्‍याच दिवशी जाऊन थडकलो आणि माझ्या बक्षिसाविषयी चर्चा करू लागलो. ‘मला बक्षिस कशामुळे मिळाले?’, अशा विषयावर मी करीत असलेली चर्चा संगेवार सरांसाठीही गमतीचीच होती. कारण या स्पर्धेत अनेक ‘प्रेमवीरां’नी भाग घेतला होता. त्यातील अनेकांनी त्यांना बक्षिस न मिळाल्याबद्दल सरांना ‘जाब’ विचारलेला होता! काही जणांनी तर ‘पुरवण्या’ जोडून प्रेमपत्र लिहिलेले होते, तरीही त्यांच्या पदरी अपयश पडले होते! या पार्श्‍वभूमीवर जेमतेम 15 वाक्यांचे माझे प्रेमपत्र ‘प्रथम पुरस्कार’ देण्याजोगे सरांनी ठरविले. त्यांनी सांगितले, ‘‘तुमच्या प्रेमपत्रातील वेगळेपणा हा बक्षिसासाठी महत्वाचा ठरला. तुमची शैली वेगळी होती, शब्दरचना आणि वातावण वेगळे होते. त्यात कल्पकता होती.’’ आणि खरेच, मी एका वेगळ्याच धुंदीच ते लिहिले होते. ग्रामीण वातावरण डोळ्यासमोर आणून शेत, शिवार, बैल, पिके यांच्या पार्श्‍वभमीवर मी माझ्या कथित ‘प्रेयसी’ला साद घातलेली होती. या वेगळेपणाने मला तेव्हा ते यश दिले. पुढे सन 2004 मध्ये; आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गुरू शिव खेरा यांच्या ‘ब्लू प्रिंट फॉर सक्सेस’ या तीन दिवसीय कार्यशाळेत ‘विनर्स डोन्ट डू डिफ्ट्रंट थिंग्ज. दे डू द थिंग्ज डिफ्रंटली’, चा विचार समोर आला आणि मला संगेवार सरांनी सांगितलेले शब्द आठवले...!000

साधारण 15 वर्षांची ‘सकाळ’ आणि ‘तरुण भारत’मध्ये केलेली विधायक पत्रकारिता संपवून मी सन 2005 पासून मुक्त पत्रकारितेला प्रारंभ केला. जगात जे चांगले आहे, विधायक आणि अनुकरणीय आहे ते सातत्याने समाजासमोर ठेवले पाहिजे, सज्जनपणाचा पुरस्कार केला पाहिजे या अर्थाच्या स्वामी समर्थ रामदास यांच्या ‘सज्जना परीस आळवावे। महत्व देउनी॥ या उक्तीनुसार समाजाचा शोध घेत ‘आयकॉन्स’ नावाने विविध जिल्ह्यांतील आदर्शांचा शोध घेत पुस्तकांची निर्मिती करीत आहे. या प्रत्येक पावलावर मला ‘उदयगिरी’चे संस्कार आठवतात. 1991 ते 2013 या वाटचालीत आयुष्यात बरेच फेरबदल झाले, अनेक प्रसंगांतून तावून-सुलाखून निघालो, गौरवाचे प्रसंग आले तसेच मला आयुष्यात उठविण्याचेही प्रयत्न झाले. खूप काही शिकत गेलो. मी यशस्वी आहे, की नाही हे मला ठावूक नाही, पण मी जे करतो आहे, जे जगतो आहे, त्यात समाधानी निश्‍चितच आहे. या सर्व गोष्टींचा पाया ‘उदयगिरी’तील मंतरलेल्या त्या दोन वर्षांत घातला गेला. माझ्या तारुण्यातील अनेक बर्‍यावाईट प्रसंगांची साक्षीदार ठरलेली ही वास्तू माझ्या दृष्टीने जिवंत आहे. इथला प्रत्येक दगड काहीतरी वेगळी कहाणी सांगतो आहे. अशीच वेगळी कहाणी इथल्या प्रत्येक माणसात होती, आहे.000

कॉलेजच्या गेटमधून आत पाऊल टाकताच सायकल स्टँडवर भेटणारे पांढरेमामा, उजवीकडे कँटीनमध्ये असणारा अण्णा, ऑफिसात असलेला क्लेरिकल स्टाफ, कॉलेजचे सेवक, लॅब असिस्टंट हे सारे मी पाहिलेल्या कॉलेजचे अविभाज्य अंग. मला शिकविणारे किंवा न शिकविणारे सर्व प्राध्यापक हे माझे गुरूच. अनेकांची नावे मला आज आठवत नाहीत, ही माझ्यातील त्रुटी. पण या सर्वांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संस्कार केले. अनेक चांगल्या आठवणी घेत मी कॉलेजचा निरोप घेतला. उदगीर सोडून आता दोन दशके उलटली आहेत. पण आजही उदगीर म्हटले की आधी माझ्या डोळ्यासमोर माझे (आता विकलेले) घर येते आणि त्यानंतर येते ‘महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय’... तेथील ब्रिदवाक्यासह - ‘कर्माचे डोळे ज्ञान, ते निर्दोष होआवे’...!

- दत्ता जोशी